Monday, July 30, 2012

कुंजीरांनी केलेली फुले बदनामी




ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले १८४८ साली शाळेत शिकवायला जात असताना पुण्यातील काही "द्विज" समाजकंटक आणि सनातनी त्यांच्या अंगावर चिखल, शेण,दगड मारीत असत. २०१२ साली त्याच पुण्यातील एक इसम जोतीराव व सावित्रीबाईंची बदनामी करताना आढळुन आला आहे.मात्र त्याने चतुराईने आपण "सत्यशोधक" नाटकाचे लेखक,दिग्दर्शक आणि सावित्रीबाईंची भुमिका करणारी अभिनेत्री यांच्यावर हल्ला करीत आहोत अशी बतावणी केलेली आहे.{"गोपुविरचित सत्यशोधक: ऎसा जोती होणे नाही", परिवर्तनाचा वाटसरू, १६-३० जुन} हे तिघेही जन्माने ब्राह्मण असल्याने त्यांच्यावरच्या या हिंसक हल्ल्याने काहीजण  चेकाळुन गेले आहेत तर काहीजण दचकुन गेले आहेत.या हल्लेखोराने ५०-६० ईंग्रजी पुस्तकातील अवतरणांचा बेफाम मारा करुन आपण फुल्यांवरील एकमेव अधिकारी विद्वान असल्याचा उत्तम भास निर्माण केला आहे.अत्यंत थंड डोक्याने "संतप्तपणाची पोज" घेत तुफान उन्माद निर्माण करण्यासाठी केलेले हे विकृत  लेखण आहे.सदर इसम आपण फुल्यांच्या बाजुचे आहोत असे ओरडून सांगत असला तरी मुलत: तो त्यांचा अवमान कसा करीत आहे हे पुराव्यानिशी मांडण्यासाठी हा लेख.
"सुनियोजित जातीय आणि धार्मिक दंगली घडवुन सर्व ब्राहमण पुरुषांची  कत्तल करण्याची" चिथावणी देणारी पुस्तिका लिहिणारे मराठा सेवा संघाचे श्री. पुरुषोत्तम खेडेकर यांचे किंवा मराठा महासंघाचे पुण्याचे अध्यक्ष श्री.शांताराम कुंजीर यांचे हे लेखण असावे असेच मला ते वाचताना वाटत होते. परंतु हे आकसपुर्ण लेखन करणारे स्कालर आहेत प्रा. विजय कुंजीर!  फुले पतीपत्नीवर लिहिण्यासाठी त्यांचे दोघांचे समग्र साहित्य आणि त्यांची अद्ययावत चरित्रे तरी किमान वाचलेली असावीत अशी माझी या विषयाचा एक विद्यार्थी म्हणुन अपेक्षा होती.कुंजीरांनी हि पुस्तके वाचलेली आहेत असा आरोप मी त्यांच्यावर करुच शकत नाही.कुंजीरांनी फुल्यांची म्हणुन दिलेली बारिकसारिक माहितीही निराधार आणि नकली आहे.कुंजीरांची भाषा शिवराळ आणि मस्तवाल आहेच परंतु त्यांची तात्विक मांडणीही पुरुषी,सरंजामी आणि सत्ताधा-यांचे हितसंबंध जोपासणारी "फुलेविरोधी" मांडणी आहे."भट’,’बामण’,ब्राह्मण्यावरची" त्यांची टिका अनुषंगिक आहे.मुळात फुल्यांची बदनामी करण्यासाठी वापरलेला तो धूर्त डावपेच आहे.
फुलेवादी असणे म्हणजे दररोज त्यांच्या फोटो किंवा पुतळयाची पुजा करणे किंवा चढ्या सुरात आरत्या गाणे नव्हे. "स्त्री-पुरुष समता,जातीनिर्मुलन,ज्ञाननिर्मिती,चिकित्सा आणि संसाधनांचे फेरवाटप" हा फुलेविचारांचा गाभा आहे.कुंजीरांचे लेखन याला पोषक असेल तर ते फुलेवादी आणि ते त्याला घातक असेल तर ते फुलेविरोधी ठरवावे लागते.
कुंजीर आपल्या लेखात तुच्छतेने म्हणतात,"बरे ईंग्रजी येवुनही कृष्णशास्त्रींची बायको काय तारे तोडणार? बामनी पितृसत्ताकतेतील संततीजनन यंत्र ते,तिला ईंग्रजी आले काय की फ्रेंच आले काय ,काय फरक पडणार?" एका स्त्रीविषयीची ही घृणास्पद विचारधारा फुलेवादात बसते काय? "सत्यशोधक" या नाटकात सावित्रीबाईंची भुमिका अत्यंत तळमळीने साकारणा-या पर्ण पेठे यांच्याविषयी कुंजीर म्हणतात,"जोतीराव नाटकभर एका अल्लड शालेय कन्येसम सावित्रीबाईबरोबर संसार करत होते.फुले दुटप्पी वाटतात इतके ते सावित्रीबाईंचे पात्र मुल आहे.एकुण फेन्सी ड्रेस करुन शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलनात फिरत असल्यागत सावित्रीबाई वावरते.इतके पोचट पात्र आहे सावित्रीबाईंचे." आजवर देशभरातल्या ४० हजारांपेक्षा जास्त लोकांनी "तिकीट" काढुन हे नाटक बघितलेले आहे.त्यात फुल्यांवरील अनेक अधिकारी विद्वान,जाणते रंगकर्मी, सामाजिक चळवळींचे नेते,कार्यकर्ते,आणि सामान्य नागरिक यांचा समावेश  होता. दुषित पुर्वग्रहांनी माथेफिरु बनलेल्या "फुकट्या" कुंजीरांचा एकमेव अपवाद वगळता माझ्यासह सर्व प्रेक्षकांना पर्णचा अभिनय आवडलेला आहे. फुले साहित्य, चरित्र, भाषा, समाजव्यवहार  आणि नाट्यव्यवहार यांचे आकलनच जर शाळकरी आणि जातीयवादी असेल तर मग शाळकरीच उपमा सुचणार! कायतर म्हणे पेठेंनी आपल्या मुलीलाच सावित्रीबाईंच्या भुमिकेसाठी का घेतले? मी या नाटकाच्या निर्मितीप्रक्रियेत सुरुवातीपासुन आहे. सर्वप्रथम पेठेंनी या रोलसाठी ब्राह्मणेतर समाजातील अभिनेत्रींचीच निवड केलेली होती.माझ्या परिचयाच्या अशा तिघीजणींना  त्यांच्या व्यक्तीगत अडचणींमुळे तालमी केल्यानंतरही  नाटक सोडावे लागले.शेवटी प्रयोगाचा दिवस जवळ येवुन ठेपल्यानंतर पर्णने  स्वता:हुन ही भुमिका मी करीन पण नाटक झालेच पाहिजे असे कर्तव्यबुद्धीने सांगितले.ज्या लोकांचा कृतज्ञताबुद्धीशी परिचयच झालेला नसतो अशांच्या  पुरुषी,सरंजामी मानसिकतेला ही तळमळ समजणारच नाही.त्यामुळे ते असलेच गरळ ओकणार. या नाटकाची निर्मिती करणारी पुणे मनपा कामगार युनियन सफाई कामगारांसाठी अनेक वर्षे झटत आहे.ज्या लोकांनी आयुष्यात कधीही नाटकात काम केलेले नव्हते अशांना आठआठ महिने अहोरात्र राबुन पेठेंनी रंगमंचावर समर्थपणे व सफाईने उभे केले त्या अतुल पेठेंचे पांग कुंजीरांनी कसे फेडलेत? तर म्हणे मुख्य रोल उच्च वर्णियांना दिलेत आणि दुय्यम रोल बहुजनांना. भरतमुनीचे नाट्यशास्त्र चुकीच्या कारणासाठी साक्षीला उभे करुन कुंजीरांनी आपले ठार अडाणीपणच उघडे केलेय.नाटकात भुमिका करणे हे कायम निम्न जातींचे काम मानले गेलेय.त्यात सगळेच रोल मग ते प्रमुख असोत कि दुय्यम शुद्र-अतिशुद्रच करत आलेत हे कुंजीरांच्या गावीच नाही. कुंजीरांचा दावा आहे की, सावित्रीबाई "व्रत", "प्रकृती" असले ब्राह्मणी शब्द वापरुच शकत नाहीत.त्यावरुन थेठ गोपुंची जात काढुन  ते मोकळे होतात.कुंजीरांनी जोतीराव-सावित्रीबाईंच्या भाषेचा-लेखनाचा काडीमात्रही अभ्यास केलेला नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या साहित्यात त्यांनी अनेकदा "व्रत","प्रकृती" हे शब्द वापरलेले आहेत..{पाहा:महात्मा फुले समग्र वांग्मय, पृ.२६७,६३२ आणि सावित्रीबाई फुले समग्र वांग्मय,पृ.८, ९९} कुंजीरांच्या मते गोपुंची ही भाषा सावरकरी आहे, ब्राह्मणी आहे.मात्र ज्याअर्थी फु्ल्यांनी ही भाषा वापरलीय त्याअर्थी कुंजीर फुल्यांनाच सावरकरी आणि ब्राह्मणी ठरवुन त्यांचा  अवमान करतात हे सिद्ध होते.
या नाटकाद्वारे  मुख्य प्रवाहामध्ये फुल्यांना पोचविण्यासाठी प्रतिभावंत दिग्दर्शक अतुल पेठे यांनी आपल्या आयुष्यातील एक वर्ष स्वत:च्या खिशाला खार लावुन विनामुल्य काम केले.म्हणुन कामगार युनियनने कृतज्ञतेपोटी काही रक्कम पेठ्यांना प्रवासखर्चासाठी दिली.  तीही त्यांनी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तिथल्यातिथे देणगी म्हणुन देवुन टाकली. ही "दानत"  परपुष्ट आणि "शोषक" असणा-या सरंजामदारांना कशी समजणार? या "फुकट्यांचा" अपराधभाव मग जागा झाला. एकीकडे अजाअज,इमावच्या आरक्षणाला संपुर्ण विरोध करणारी आणि त्याच वेळी आम्हालाही इमावमध्ये आरक्षण द्या म्हणणारी ही सत्ताधारी मानसिकता असल्याने कांगावा करुन "दलितांना आरक्षणाऎवजी खाजगी धर्मादाय मार्गाने हे शिकवु पाह्तायत" अशा चोराच्या उलट्या बोंबा मारु लागली.
कुंजीरांचा आरोप आहे की, भांडारकर प्रकरणामुळे मराठा जातीयवादाला उत्तर म्हणुन पेठ्यांनी हे नाटक बसवले. प्रयोगात पुढे मराठ्यांबद्दलचे ९६ कुळी ,पंचकुळी हे उल्लेख गाळल्याबद्दल हेच कुंजीर  तक्रारही करतात.जर यातुन पेठेंना  मराठा जातीयवादाला उत्तरच द्यायचे असते तर हे उल्लेख गाळण्याऎवजी त्यांनी ते अधिक ठळक केले असते.पण तर्कहीन पद्धतीने कुंजीर दोन्हीबाजुंनी बोलत राहतात. दुतोंडी वाचाळपणा करीत पाल्हाळ लावित जातात. या भरताडात कुंजीर मस्तवालपणे असेही सुचवतात की, फुले द्रष्टे नव्हतेच, फुल्यांना संस्कृतचा गंधही नव्हता,ते संस्कृतचे विरोधक होते, फुल्यांना ईतिहासकरणाची जाण नव्हती,फुल्यांना खरी राष्ट्रभक्ती कळलीच नव्हती, फुल्यांचे ’महा्त्मेपण’ जे काही होते ते केवळ ख्रिस्ती मिशन-यांमुळेच होते,ते ब्राह्मणद्वेष्टे होते,ते हिंदु हा शब्द वापरतच नसत. कुंजीरांचे हे सारेच आरोप निराधार आणि अडाणीपणाचे आहेत. जोतीरावांची बदनामी करण्यासाठीच कुंजीरांनी हे आरोप केलेले आहेत.
फुल्यांच्या लेखनात "हिंदु" हा शब्द अनेकदा आलाय.{पाहा:म.फु.स.वा.,पृ.१९७,३३६,३४९,३६३,३६५,४१९} सावित्रीबाईंनी तर या धार्मिक भेदभावावर कवितेतुन प्रश्नही उपस्थित केलेला आहे.{सा.फु.स.वा.पृ.८३-८७} सावित्रीबाई आणि जोतीरावांनी आपल्या लेखनात असंख्य संस्कृत श्लोक  पान नंबरसकट उद्धृत केलेले आहेत.जोतीरावांना संस्कृत भाषेची आवड होती.ते संस्कृत ग्रंथांचे नियमित वाचक होते.त्यांनी  पाठक गुरुजींची खाजगी शिकवणी लावुन संस्कृतचा व्यासंग केलेला होता.{पाहा:आम्ही पाहिलेले फुले,पृ.६१ आणि म.फु. स.वा.पृ.२६४} "इतिहास" आणि "नेशन{राष्ट्र"}विषयक जोतीरावांची मांडणी वाचली की कुंजीरांच्या याबाबतच्या अज्ञानाची किव येते.{स.वा.पृ.२६५,५२३, आणि सा.फु.स.वा.४५-५०} महात्मा फुल्यांच्या जडणघडणीत बुद्ध,अश्वघोष, येशु,प्रेषित महंमद पैगंबर, कबीर, तुकाराम, टामस पेन आणि मिशनरी अशा अनेकांचा वाटा होता.त्यांच्या प्रतिभेचे आणि द्रष्टेपणाचे सारे श्रेय केवळ मिशन-यांना देणे हा फुल्यांचा अवमानच होय.मिशन-यांनी दिलेले शिक्षण जरी महत्वाचे असले तरी ते इतरही अनेकांना मिळाले होते मग ते का नाही फुले बनू शकले? "आपल्याला बालपणीच्या मुस्लीम मित्रांच्या संगतीमुळे हिन्दुधर्माविषयी व जातीभेदाविषयी प्रश्न पडु लागले" असे फुले स्वत:च आवर्जुन नमुद करतात.{म.फु.स.वा.पृ.३३६} पण हे काहीही कुंजीरांनी वाचलेले नसल्याने ते तोंडावर आपटतात.
कुंजीरांनी वारकरी संप्रदायाबद्दल अत्यंत बेजबाबदार,टवाळखोर आणि उथळ मांडणी केलीय.महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे.तो एव्हढ्या सवंगपणे हाताळण्याचा विषय नाही.त्यात फार मोठी सामाजिक गुंतागुंत आहे.फुले स्वत: देहु-आळंदीला वारीच्या काळात व्याख्यानांसाठी जात असत.{आ.पा.फु.पृ.७४-७५} सत्यशोधक समाजाचे बहुतेक सर्व सभासद वारकरी होते.फुल्यांनी केलेली सत्यधर्माची स्थापनाच मुलत: कबीर,तुकारामादी संतांच्या विचारांवर आधारित होती, हे विसरुन कसे चालेल? लोकांपासुन फटकुन राहण्यालाच क्रांतीकारकत्व मानणारे कुंजीरांसारखे लोक एकतर विक्षिप्त {सिनिकल} असतात किंवा दहशतवादी तरी!
कुंजीरांनी मराठी रंगभुमीविषयी अत्यंत गलिच्छ भाषा वापरलेली आहे.मराठीतले पहिले आधुनिक नाटक जोतीरावांनी लिहिलेले आहे.त्याचे नाव "तृतीय रत्न" असे आहे. कुंजीरांप्रमाणे जोतीरावांनाही  संस्कृतचा द्वेष वाटत असता तर त्यांनी त्याचे नाव "तिसरे" रत्न  ठेवले असते.मराठी नाटक,नाटककार आणि रंगभुमी यावरील कुंजीरांची सगळी टिका कमरेखालची आणि हिडीस आहे. ही टिका आपण गोपु किंवा पेठेंवर करित असल्याचे ते भासवित असले तरी त्यांचा खरा रोख पहिले नाटककार महात्मा फुले यांच्यावरच आहे. गोपुंच्या सत्यशोधकची संहिता पुस्तकरुपाने १९९६ पासुन बाजारात उपलब्ध आहे.मग त्यावर हल्ला करण्यासाठी कुंजीर एव्हढी वर्षे का थांबले होते?  पेठेंनी बसवलेले हे नाटक गाजु लागले,त्यातुन खरे फुले लोकांपर्यंत पोचु लागले.ज्यांना फुल्यांचे अपहरण करुन सत्ताधारी वर्गाचे हितसंबंध जपायचे आहेत त्यांना बहुजनांचे लक्ष ख-या प्रश्नांकडुन विचलीत करण्यासाठी ब्राह्मणद्वेषाचे नाटक करावेच लागते. चिकित्सेचे दरवाजे कायमचे बंद करण्यासाठी हेतुपुर्वक शिवराळभाषा वापरायची,जातीय हेत्वारोप करायचे,त्यातुन ब्राह्मण-ब्राह्मणेतरांतील सामाजिक अभिसरण रोखायचे, सगळे काही जन्मावरच ठरते अशी सनातनी भुमिका घ्यायची आणि बुद्ध, फुले, आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचारांची नसबंदी करायची  हे यांचे सत्ताधारी राजकारण असते.हे नाटक बघायला मोठ्या संख्येने जाणा-या बहुजन वर्गाचा बुद्धीभेद करण्यासाठी आणि त्याला नाटक पाहण्यापासुन रोखण्यासाठीच कुंजीरांनी हे लेखन केलेले आहे.
खरेतर कुंजीरांना गोपु,पेठे यांच्यावर साधार,संयत आणि समर्पक वैचारिक टिका करुन ही चर्चा पुढेही नेता आली असती,पण मग ज्ञाननिर्मितीच्या कामांबद्दल तुच्छता पसरवता आली नसती, जातीनिर्मुलन, चिकित्सा, स्त्रीपुरुषसमता या फुलेवादी विषयपत्रिकेकडे लोक वळले असते.तेच तर कुंजीरांना व्ह्यायला नको आहे.
हे नाटक मी अनेकवेळा बघितलेले आहे.ते अत्यंत श्रेष्ट दर्जाचे नाटक आहे.अतुल पेठे यांनी रंगावृती एका मोठ्या उंचीवर नेवुन ठेवलेली आहे.गोपु आणि पेठे यांना "समरसतावादी,प्रतिगामी, बामणी", म्हणणे ही कुंजीरांची जात्यंधता आणि कृतघ्नता आहे.मी तिचा निषेध करतो.या नाटकामुळे फुल्यांचे "जातीय अपहरण" रोखले जात आहे.या नाटकातुन पैसे कमावणे हा त्यांचा हेतु नाही. मोफत, अल्पदरात किंवा चेरिटी शो करुन चळवळीतील अनेक संस्थांना पेठेंनी लाखो रुपयांची मदत या नाटकातुन आजवर मिळवुन दिलेली आहे.कुंजीर ईतके लबाड आहेत की त्यांनी सफाईकामगारांचा आपल्याला कळवळा असल्याचे भासवित त्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवुन हे सारे लेखन केलेले आहे.पण  प्रयोगातील त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.वादासाठी एकवेळ पेठे आणि गोपु तुमचे नाहीत असे मान्य करुया, पण ही सफाई कामगार मंडळी तर तुमची होती ना?मग त्यांना दाद देण्याची तुमची दानत  कुठे गेली? मुळात या वर्गाशी कुंजीरांना काही देणेघेणे असते तर त्यांच्या अपार मेहेनतीवर थुंकण्याचे असले काम त्यांनी केलेच नसते.
"हे नाटक म्हणजे जोतीरावांचे समग्र चरित्र नव्हे.एका मोठ्या माणसाचे अल्पसे दर्शन घडवण्याचा त्यामागे इरादा आहे..फुले पतीपत्नीच्या गौरीशंकराएव्हढ्या कामाचे टेकेडीवजा दर्शन घडवणारा तो एक सत्यशोधक जलशा आहे"असे स्पष्ट आणि स्वच्छ निवेदन नाटकाच्या सुरुवातीलाच गोपुंनी केलेले आहे.नाट्यव्यवहार या विषयातले केवळ वर्तमानपत्री ज्ञान असल्यामुळे अडाणीपणाने या नाटकात "हे का नाही? आणि "ते का नाही?" असले बाष्कळ प्रश्न कुंजीर विचारतात. सगळ्यांची नावे असायला ही संहिता म्हणजे काही  लग्नपत्रिका नाही की वाण्याच्या सामानाची पोतडीही नाही.आजवर फुल्यांवर शंकरराव मोरे यांच्यापासुन  मिरजकरांपर्यंत अनेकांनी नाटके लिहिलेली आहेत. आपापल्यापरिने फुल्यांचा शोध त्यांनी घेतलेला आहे.यातली किती नाटके कुंजीरांनी वाचलीयत किंवा पाहिलीयत याची कल्पना नाही.कारण त्यांचे "फुकट्यांसाठीचे" प्रयोग झालेले नाहीत. एक रटाळ,पाल्हाळिक आणि अत्यंत दुर्बोध लेख खरडणे आणि उत्तम नाटक लिहिणे यात काय फरक असतो,याची प्राथमिक माहिती कुंजीरांनी करुन घ्यायला हरकत नाही.हजारो लोकांना विचार करायला लावणारे,अस्वस्थ करणारे,अनेकांच्या डोळ्यांतुन अश्रु काढणारे हे नाटक म्हणजे फुले-आंबेडकरी चळवळीला ताकद देणारे श्रेष्ट नाटक आहे.आम्ही "सत्यशोधकसाठी" गोपु,पेठे,कामगार युनियन आणि सर्व टीमचे कृतज्ञ आहोत.तुम्ही या कृतघ्नांकडे लक्ष देवु नका. हे नाटक बंद पडावे यासाठीच त्यांचा हा सगळा खटाटोप चालु आहे.त्याला आपण बळी पडता कामा नये.
आजकाल रातोरात प्रसिद्ध होण्याच्या काही क्लुप्त्या पुढे आलेल्या आहेत.ख्यातनाम असलेल्या महात्मा फुले यांच्यासारख्यांची गचांडी धरायची,नळावर धरतात तशा झिंज्या धरणारे वर्दळीवरचे जातीय भांडण गोपु आणि पेठेंशी करीत असल्याचा भास निर्माण करायचा आणि राज्यात जातीय खळबळ माजवुन देत "गाजायचे" ही ट्रिक "पब्लीसिटी स्टंट" म्हणुन कुंजीर वापरित आहेत. पेठे-गोपुंना "बुकलुन" काढताना तुमचा खरा निशाना फुल्यांवर आहे हे आम्हाला कळलेय एव्हढेच आम्ही या नतद्रष्टांना सांगु ईच्छितो.
............................................

Tuesday, July 24, 2012

’सत्यशोधक’, गोपु, अतुल पेठे आणि कुंजीर




ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले १८४८ साली शाळेत शिकवायला जात असताना पुण्यातील काही "द्विज" समाजकंटक आणि सनातनी त्यांच्या अंगावर चिखल, शेण,दगड मारीत असत. २०१२ साली त्याच पुण्यातील एक तथाकथित "विद्वान" जोतीरावांच्या व सावित्रीबाईंच्या बदनामीचे लेखन करताना आढळुन आले आहेत.मात्र त्यांनी चतुराईने आपण "सत्यशोधक" नाटकाचे लेखक,श्री.गोपु देशपांडे,दिग्दर्शक ,अतुल पेठे आणि सावित्रीबाईंची भुमिका करणारी अभिनेत्री, पर्ण पेठे यांच्यावर हल्ला करीत आहोत अशी बतावणी केलेली आहे.{"गोभट्टविरचित सत्यशोधक: ऎसा जोती होणे नाही", अन्वीक्षण,एप्रिल-जुन} हे तिघेही जन्माने ब्राह्मण असल्याने त्यांच्यावरच्या या  हल्ल्याने काहीजण गोंधळात पडले आहेत तर काहीजण खुष झाले आहेत.फुले-आंबेडकरी चळवळीत ब्राह्मणांना शिव्या बसत असतील तर अतिव समाधान वाटणारेही काही लोक आहेत. या लेखात ५०-६० ईंग्रजी पुस्तकातील अवतरणांचा बेफाम मारा करुन आपण फुल्यांवरील एकमेव अधिकारी विद्वान असल्याचा उत्तम भास निर्माण करण्यात आला आहे.अत्यंत थंड डोक्याने "संतप्तपणाची पोज" घेत हे तुफान उन्मादी लेखण करन्यात आलेले आहे.सदर गृहस्थ आपण फुल्यांच्या बाजुचे आहोत असे ओरडून सांगत असल्याने सुखावलेल्या मंडळींना मी सांगु ईच्छितो की हे लेखन फुल्यांचा अवमान क्रणारे आहे. त्याबाबतचे पुरावे मांडण्यासाठी हा लेख.
"सुनियोजित जातीय आणि धार्मिक दंगली घडवुन सर्व ब्राहमण पुरुषांची  कत्तल करण्याची" चिथावणी देणारी "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे"ही पुस्तिका लिहिणारे मराठा सेवा संघाचे श्री. पुरुषोत्तम खेडेकर यांचे किंवा मराठा महासंघाचे पुण्याचे अध्यक्ष श्री.शांताराम कुंजीर यांचे हे लेखण असावे असेच मला ते वाचताना वाटत होते. परंतु हे आकसपुर्ण लेखन करणारे स्कालर आहेत प्रा. विजय कुंजीर! अर्थात या तिघांच्या लेखनात गुणात्मक फरक फारसा नाही. कुंजीरांनी फुले पतीपत्नीवर लिहिण्यासाठी त्यांचे दोघांचे समग्र साहित्य आणि त्यांची अद्ययावत चरित्रे तरी किमान वाचलेली असावीत अशी माझी या विषयाचा एक विद्यार्थी म्हणुन अपेक्षा होती.कुंजीरांनी हि पुस्तके वाचलेली नाहीत.कुंजीरांनी फुल्यांची म्हणुन दिलेली बारिकसारिक माहितीही निराधार आणि नकली आहे.कुंजीरांची भाषा शिवराळ आणि अभिनीवेषपुर्ण आहेच परंतु त्यांची तात्विक मांडणीही पुरुषी,सरंजामी आणि सत्ताधा-यांचे हितसंबंध जोपासणारी "फुलेविरोधी" मांडणी आहे. "भट’,’बामण’,ब्राह्मण्यावरची" त्यांची टिका अनुषंगिक आहे.मुळात फुल्यांची बदनामी करण्यासाठी वापरलेला तो एक धूर्त डावपेच आहे.
फुलेवादी असणे म्हणजे दररोज त्यांच्या फोटो किंवा पुतळयाची पुजा करणे किंवा चढ्या सुरात आरत्या गाणे नव्हे. "स्त्री-पुरुष समता,जातीनिर्मुलन,ज्ञाननिर्मिती,चिकित्सा आणि संसाधनांचे फेरवाटप" हा फुलेविचारांचा गाभा आहे.कुंजीरांचे लेखन याला पोषक असेल तर ते फुलेवादी आणि ते त्याला घातक असेल तर ते फुलेविरोधी ठरवावे लागते.कुंजीर म्हणतात "हे नाटक फुकट होते म्हणुन मी पाहिले.हे नाटक पेशव्यांच्या शनिवारवाड्यापुढे करण्याला कुंजीरांचा तात्विक विरोध होता.मग ते हा प्रयोग बघायला का गेले?तर तो फुकट होता म्हणुन.याचा अर्थ पैसे वाचणार असतील तर त्यांची तत्वे गुंडाळुन ठेवायची तयारी असते याची कबुलीच ते देतात.मला हे नाटक शनिवारवाड्यापुढे करण्यात काहीही गैर वाटत नाही.ज्याकारणाने बाबासाहेब आंबेडकर महोत्सव शनिवारवाड्यासमोर करण्याला प्रतिकात्मक अर्थ आहे,त्याच कारणाने ’सत्यशोधक’ तेथे करणे आवश्यक होते.
कुंजीरांनी आपल्या लेखात ब्राह्मण स्रियांबद्दल तुच्छतेची भाषा वापरलेली आहे. स्त्रीयांविषयीची ही घृणास्पद विचारधारा फुले-आंबेडकरवादात बसते काय? "सत्यशोधक" या नाटकात सावित्रीबाईंची भुमिका अत्यंत तळमळीने साकारणा-या पर्ण पेठे यांच्याविषयी कुंजीर म्हणतात,"जोतीराव नाटकभर एका अल्लड शालेय कन्येसम सावित्रीबाईबरोबर संसार करत होते.फुले दुटप्पी वाटतात इतके ते सावित्रीबाईंचे पात्र मुल आहे.एकुण फेन्सी ड्रेस करुन शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलनात फिरत असल्यागत सावित्रीबाई वावरते.इतके पोचट पात्र आहे सावित्रीबाईंचे." आजवर देशभरातल्या ४० हजारांपेक्षा जास्त लोकांनी "तिकीट" काढुन हे नाटक बघितलेले आहे.त्यात फुल्यांवरील अनेक अधिकारी विद्वान,जाणते रंगकर्मी, सामाजिक चळवळींचे नेते,कार्यकर्ते,आणि सामान्य नागरिक यांचा समावेश  होता. दुषित पुर्वग्रहांनी माथेफिरु बनलेल्या "फुकट्या" कुंजीरांचा एकमेव अपवाद वगळता माझ्यासह सर्व प्रेक्षकांना पर्णचा अभिनय आवडलेला आहे. कुंजीरांचे फुले साहित्य, चरित्र, भाषा, समाजव्यवहार  आणि नाट्यव्यवहार यांचे आकलन  शाळकरी असल्याने त्यांनी  शाळकरी उपमा दिलेली आहे.पेठेंनी आपल्या मुलीलाच सावित्रीबाईंच्या भुमिकेसाठी का घेतले?हा त्यांचा आक्षेप आहे. मी या नाटकाच्या निर्मितीप्रक्रियेत सुरुवातीपासुन आहे. सर्वप्रथम पेठेंनी या रोलसाठी बहुजन समाजातील अभिनेत्रींचीच निवड केलेली होती.माझ्या परिचयाच्या अशा तिघीजणींना  त्यांच्या व्यक्तीगत अडचणींमुळे तालमी केल्यानंतरही  नाटक सोडावे लागले.शेवटी प्रयोगाचा दिवस जवळ येवुन ठेपल्यानंतर पर्णने  स्वता:हुन ही भुमिका मी करीन पण नाटक झालेच पाहिजे असे कर्तव्यबुद्धीने सांगितले.भगवान बुद्ध म्हणतात, कृतज्ञता ही सत्पुरुष भुमी आहे.कुंजीरांसारख्या ज्या लोकांचा कृतज्ञताबुद्धीशी परिचयच झालेला नसतो अशांच्या सरंजामी मानसिकतेला ही तळमळ समजणारच नाही.त्यामुळे ते असलेच गरळ ओकणार. या नाटकाची निर्मिती करणारी पुणे मनपा कामगार युनियन सफाई कामगारांसाठी अनेक वर्षे झटत आहे.ज्या लोकांनी आयुष्यात कधीही नाटकात काम केलेले नव्हते अशांना आठआठ महिने अहोरात्र राबुन पेठेंनी रंगमंचावर समर्थपणे व सफाईने उभे केले.गोविंदराव फुले,शाहीर,लोखंडे,शेटीबा फुले अशा अनेक उत्तम भुमिका करवुन घेतल्या.कुंजीरांचा आक्षेप आहे की पेठेंनी भरतमुनींच्या नाट्यशास्त्रानुसार मुख्य रोल उच्च वर्णियांना दिलेत आणि दुय्यम रोल बहुजनांना.एकतर हे खरे नाही आणि भरताच्या नाट्यशास्त्राची साक्ष काढुन कुंजीरांनी आपले अडाणीपणच उघडे केलेय. नाटकात भुमिका करणे हे कायम निम्न जातींचे काम मानले गेलेय.त्यात सगळेच रोल मग ते प्रमुख असोत कि दुय्यम शुद्र-अतिशुद्रच करत आलेत हे कुंजीरांच्या गावीच नाही. या नाटकातील संवादांवर कुंजीरांचा प्रमुख आक्षेप आहे. तो बरोबर असावा असे प्रथमदर्शनी काहींना वाटतेही.त्यांचा दावा आहे की, सावित्रीबाई, "व्रत", "प्रकृती" असले ब्राह्मणी आणि सावरकरी  शब्द वापरुच शकत नाहीत. त्यावरुन ते थेठ गोपुंची जात काढुन गोपुंनी हे नाटक फुल्यांची बदनामी करण्यासाठीच लिहिल्याचा आरोप करतात.पण त्याआधी कुंजीरांनी जोतीराव-सावित्रीबाईंच्या भाषाशैलीचा काडीमात्रही अभ्यास केलेला नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या साहित्यात त्यांनी अनेकदा "व्रत","प्रकृती" हे शब्द वापरलेले आहेत..{पाहा:महात्मा फुले समग्र वांग्मय, पृ.२६७,६३२ आणि सावित्रीबाई फुले समग्र वांग्मय,पृ.८, ९९} कुंजीरांच्या मते गोपुंची ही भाषा सावरकरी आहे, ब्राह्मणी आहे.पण प्रत्यक्षात ही भाषा फु्ल्यांची असल्याने तेच कुंजीरनितीनुसार सावरकरी आणि ब्राह्मणी ठरतात.हा फुल्यांचा  अवमान नाही?
या नाटकाद्वारे  मुख्य प्रवाहामध्ये फुल्यांना पोचविण्यासाठी प्रतिभावंत दिग्दर्शक अतुल पेठे यांनी आपल्या आयुष्यातील एक वर्ष स्वत:च्या खिशाला खार लावुन विनामुल्य काम केले.म्हणुन कामगार युनियनने कृतज्ञतेपोटी काही रक्कम पेठ्यांना प्रवासखर्चासाठी दिली.  तीही त्यांनी सफाई कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तिथल्यातिथे देणगी म्हणुन देवुन टाकली. ही "दानत" "शोषक" सरंजामदारांना कशी समजणार? या "फुकट्यांचा" अपराधभाव मग जागा झाला. एकीकडे अजाअज,इमावच्या आरक्षणाला संपुर्ण विरोध करणारी आणि त्याच वेळी आम्हालाही इमावमध्ये आरक्षण द्या म्हणणारी ही सत्ताधारी मानसिकता असल्याने कांगावा करुन "दलितांना आरक्षणाऎवजी खाजगी धर्मादाय मार्गाने हे ब्राह्मण शिकवु पाह्तायत" अशा ते चोराच्या उलट्या बोंबा मारतात.महाराष्ट्रातील सत्ताधारी आज अजाअज. इमाव,विजाभज चे शिक्षण बंद करीत आहेत हे आता झाकुन राहिलेले नाही.तेव्हा हा कांगावा शोभत नाही.
कुंजीरांचा आरोप आहे की, भांडारकर प्रकरणामुळे मराठा जातीयवादाला उत्तर म्हणुन पेठ्यांनी हे नाटक बसवले. प्रयोगात पुढे मराठ्यांबद्दलचे ९६ कुळी ,पंचकुळी हे उल्लेख गाळल्याबद्दल हेच कुंजीर  तक्रारही करतात.जर यातुन पेठेंना  मराठा जातीयवादाला उत्तरच द्यायचे असते तर हे उल्लेख गाळण्याऎवजी त्यांनी ते अधिक ठळक केले असते.पण तर्कहीन पद्धतीने कुंजीर दोन्हीबाजुंनी बोलत राहतात. दुतोंडी वाचाळपणा करीत पाल्हाळ लावित जातात. त्यांचा आरोप आहे की "हे नाटक  ब्राह्मणांना मोठेपणा देण्यासाठीच लिहिलेले आहे,यात लोखंड्यांनी केलेला टिळक-आगरकरांचा सत्कार ही अनैतिहासिक घटना  दाखवण्यात आली ती त्याच हेतुने." खरी गोष्ट अशीय की टिळक-आगरकरांना ते तुरुंगात असताना फुले   दहा हजार रुपयांचा जामीन द्यायला गेले होते, तुरुंगातुन सुटल्यावर त्यांचा सत्कार फुल्यांनीच घडवुन आणला होता.पण हे कुंजीरांना माहित नसल्याने ते तो प्रसंगच काल्पनिक ठरवुन मोकळे झाले.
कुंजीर असेही सुचवतात की, " फुले द्रष्टे नव्हतेच, फुल्यांना संस्कृतचा गंधही नव्हता,ते संस्कृतचे विरोधक होते, फुल्यांना ईतिहासकरणाची जाण नव्हती,फुल्यांना खरी राष्ट्रभक्ती कळलीच नव्हती, फुल्यांचे ’महा्त्मेपण’ जे काही होते ते केवळ ख्रिस्ती मिशन-यांमुळेच होते,ते ब्राह्मणद्वेष्टे होते,ते हिंदु हा शब्द वापरतच नसत." कुंजीरांचे हे सारेच आरोप निराधार आणि अडाणीपणाचे आहेत. जोतीरावांची बदनामी करण्यासाठीच कुंजीरांनी हे आरोप केलेले आहेत.
फुल्यांच्या लेखनात "हिंदु" हा शब्द अनेकदा आलाय.{पाहा:म.फु.स.वा.,पृ.१९७,३३६,३४९,३६३,३६५,४१९} सावित्रीबाईंनी तर या धार्मिक भेदभावावर कवितेतुन प्रश्नही उपस्थित केलेला आहे.{सा.फु.स.वा.पृ.८३-८७} सावित्रीबाई आणि जोतीरावांनी आपल्या लेखनात असंख्य संस्कृत श्लोक  पान नंबरसकट उद्धृत केलेले आहेत.जोतीरावांना संस्कृत भाषेची आवड होती.ते संस्कृत ग्रंथांचे नियमित वाचक होते.त्यांनी  पाठक गुरुजींची खाजगी शिकवणी लावुन संस्कृतचा व्यासंग केलेला होता.{पाहा:आम्ही पाहिलेले फुले,पृ.६१ आणि म.फु. स.वा.पृ.२६४} "इतिहास" आणि "नेशन{राष्ट्र"}विषयक जोतीरावांची मांडणी वाचली की कुंजीरांच्या याबाबतच्या अज्ञानाची किव येते.{स.वा.पृ.२६५,५२३, आणि सा.फु.स.वा.४५-५०} महात्मा फुल्यांच्या जडणघडणीत बुद्ध,अश्वघोष, येशु,प्रेषित महंमद पैगंबर, कबीर, तुकाराम, टामस पेन आणि मिशनरी अशा अनेकांचा वाटा होता.त्यांच्या प्रतिभेचे आणि द्रष्टेपणाचे सारे श्रेय केवळ मिशन-यांना देणे हा फुल्यांचा अवमानच होय.मिशन-यांनी दिलेले शिक्षण जरी महत्वाचे असले तरी ते इतरही अनेकांना मिळाले होते मग ते का नाही फुले बनू शकले? "आपल्याला बालपणीच्या मुस्लीम मित्रांच्या संगतीमुळे हिन्दुधर्माविषयी व जातीभेदाविषयी प्रश्न पडु लागले" असे फुले स्वत:च आवर्जुन नमुद करतात.{म.फु.स.वा.पृ.३३६} पण हे काहीही कुंजीरांनी वाचलेले नाही.
कुंजीरांनी वारकरी संप्रदायाबद्दल अत्यंत उथळ मांडणी केलीय.बहुजनांच्या जिव्हाळ्याचा हा विषय एव्हढ्या सवंगपणे हाताळण्याचा विषय नाही.त्यात फार मोठी सामाजिक गुंतागुंत आहे.फुले स्वत: देहु-आळंदीला वारीच्या काळात व्याख्यानांसाठी जात असत.{आ.पा.फु.पृ.७४-७५} सत्यशोधक समाजाचे बहुतेक सर्व सभासद वारकरी होते.फुल्यांनी केलेली सत्यधर्माची स्थापनाच मुलत: बुद्ध-अश्वघोष,कबीर,तुकारामादींच्या विचारांवर आधारित होती. लोकांपासुन फटकुन राहण्यालाच क्रांतीकारकत्व मानणारे कुंजीरांसारखे लोक विक्षिप्त {सिनिकल} असतात!
कुंजीरांनी मराठी रंगभुमीविषयी अत्यंत गलिच्छ भाषा वापरलेली आहे.नाटकाच्या निमित्ताने खुलेआम "संभोग" करता यावा यासाठी नाटक केले जाते ही त्यांची मांडणी संतापजनक आहे. मराठीतले पहिले आधुनिक नाटक १८५४ साली जोतीरावांनी लिहिलेले आहे. त्याचे नाव "तृतीय रत्न" असे आहे.जोतीरावांना  संस्कृतचा द्वेष वाटत असता तर त्यांना त्याचे नाव "तिसरे" रत्न  ठेवता आले असते. मराठी नाटक,नाटककार आणि रंगभुमी यावरील कुंजीरांची सगळी टिका कमरेखालची आणि हिडीस आहे. ही टिका आपण गोपु किंवा पेठेंवर करित असल्याचे ते भासवित असले तरी त्यांचा खरा रोख पहिले आधुनिक नाटककार महात्मा फुले यांच्यावरच आहे.
गोपुंच्या सत्यशोधकची संहिता पुस्तकरुपाने १९९६ पासुन बाजारात उपलब्ध आहे.मग त्यावर हल्ला करण्यासाठी कुंजीर एव्हढी वर्षे का थांबले होते?  पेठेंनी बसवलेले हे नाटक गाजु लागले,त्यातुन खरे फुले लोकांपर्यंत पोचु लागले.ज्यांना फुल्यांचे अपहरण करुन सत्ताधारी वर्गाचे हितसंबंध जपायचे आहेत त्यांना बहुजनांचे लक्ष ख-या प्रश्नांकडुन विचलीत करण्यासाठी ब्राह्मणद्वेषाचे नाटक करावेच लागते. चिकित्सेचे दरवाजे कायमचे बंद करण्यासाठी हेतुपुर्वक शिवराळभाषा वापरायची,जातीय हेत्वारोप करायचे,त्यातुन ब्राह्मण-ब्राह्मणेतरांतील सामाजिक अभिसरण रोखायचे, सगळे काही जन्मावरच ठरते अशी सनातनी भुमिका घ्यायची आणि बुद्ध, फुले, आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचारांची नसबंदी करायची  हे यांचे सत्ताधारी राजकारण असते.हे नाटक बघायला मोठ्या संख्येने जाणा-या बहुजन वर्गाचा बुद्धीभेद करण्यासाठी आणि त्याला नाटक पाहण्यापासुन रोखण्यासाठीच कुंजीरांनी हे लेखन केलेले आहे. ज्यांनी हे नाटक बघितलेले नाही,त्यांची माथी भडकविण्याच्या हेतुनेच   कुंजीरांनी हे लेखन केलेले आहे.नाटक बघितलेले कुंजीरांशी सहमत होत नाहीत.
खरेतर कुंजीरांना गोपु,पेठे यांच्यावर साधार,संयत आणि समर्पक वैचारिक टिका करुन ही चर्चा पुढेही नेता आली असती. चर्चेने बहुजनांचे प्रबोधन होत असते.पण मग ज्ञाननिर्मितीबाबत कुंजीरांना तुच्छता पसरवता आली नसती. जातीनिर्मुलन, धर्मचिकित्सा, स्त्रीपुरुषसमता या फुले-आंबेडकरवादी विषयपत्रिकेकडे लोक वळले तर ते कुंजीरांना नको आहे.
हे नाटक मी अनेकवेळा बघितलेले आहे.ते अत्यंत श्रेष्ट दर्जाचे नाटक आहे.अतुल पेठे यांनी रंगावृती एका मोठ्या उंचीवर नेवुन ठेवलेली आहे.गोपु आणि पेठे यांना "समरसतावादी,प्रतिगामी, बामणी", म्हणणे ही कुंजीरांची चाल आहे.मी तिचा निषेध करतो.या नाटकामुळे फुल्यांचे सत्ताधा-यांकडुन होणारे "जातीय अपहरण" रोखले जात आहे.या नाटकातुन पैसे कमावणे हा पेठेंचा  हेतु नाही. मोफत, अल्पदरात किंवा चेरिटी शो करुन फुले-आंबेडकरी चळवळीतील अनेक संस्थांना पेठेंनी लाखो रुपयांची मदत या नाटकातुन आजवर मिळवुन दिलेली आहे.कुंजीर ईतके लबाड आहेत की त्यांनी सफाईकामगारांचा आपल्याला कळवळा असल्याचे भासवित त्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवुन हे सारे लेखन केलेले आहे.पण  प्रयोगातील त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल ब्र सुद्धा उच्चारलेला नाही. पेठे आणि गोपुंचे राहुद्या. पण ही सफाई कामगार मंडळी तर आपली होती ना?मग त्यांना दाद देण्याची तुमची दानत  कुठे गेली? मुळात या वर्गाशी कुंजीरांना काहीही देणेघेणे असते तर त्यांच्या अभिनयाबद्दल त्यांनी मौन पाळले नसते.
"हे नाटक म्हणजे जोतीरावांचे समग्र चरित्र नव्हे.एका मोठ्या माणसाचे अल्पसे दर्शन घडवण्याचा त्यामागे इरादा आहे..फुले पतीपत्नीच्या गौरीशंकराएव्हढ्या कामाचे टेकेडीवजा दर्शन घडवणारा तो एक सत्यशोधक जलशा आहे"असे स्पष्ट आणि स्वच्छ निवेदन नाटकाच्या सुरुवातीलाच गोपुंनी केलेले आहे.नाट्यव्यवहार या विषयातले केवळ वर्तमानपत्री ज्ञान असल्यामुळे अडाणीपणाने या नाटकात "हे का नाही? आणि "ते का नाही?" असले बाष्कळ प्रश्न कुंजीर विचारतात. सगळ्यांची नावे असायला ही संहिता म्हणजे काही  प्रस्थापितांची लग्नपत्रिका नाही की वाण्याच्या सामानाची पोतडीही नाही.आजवर फुल्यांवर शंकरराव मोरे यांच्यापासुन  मिरजकरांपर्यंत अनेकांनी नाटके लिहिलेली आहेत. आपापल्यापरिने फुल्यांचा शोध त्यांनी घेतलेला आहे.यातली किती नाटके कुंजीरांनी वाचलीयत किंवा पाहिलीयत याची कल्पना नाही.कारण त्यांचे "फुकट्यांसाठीचे" प्रयोग झालेले नाहीत. नाटक फुकट असेल तरच ते बघतात ना! एक बदनामीकारक,खोटारडा,रटाळ,पाल्हाळिक आणि अत्यंत दुर्बोध लेख खरडणे आणि उत्तम नाटक लिहिणे यात  फरक असतो.हजारो लोकांना विचार करायला लावणारे,अस्वस्थ करणारे,अनेकांच्या डोळ्यांतुन अश्रु काढणारे हे नाटक म्हणजे फुले-आंबेडकरी चळवळीला ताकद देणारे श्रेष्ट नाटक आहे.आम्ही "सत्यशोधकसाठी" गोपु,पेठे,कामगार युनियन आणि सर्व टीमचे कृतज्ञ आहोत. हे नाटक बंद पडावे यासाठीच कुंजीरांची ही लेखणकामाठी आहे.त्याला आपण बळी पडता कामा नये.
आजकाल रातोरात प्रसिद्ध होण्याच्या काही क्लुप्त्या पुढे आलेल्या आहेत.ख्यातनाम असलेल्या महात्मा फुले यांच्यासारख्यांची गचांडी धरायची,नळावर धरतात तशा झिंज्या धरणारे वर्दळीवरचे जातीय भांडण गोपु आणि पेठेंशी करीत असल्याचा भास निर्माण करायचा आणि राज्यात जातीय खळबळ माजवुन देत "गाजायचे" ही ट्रिक "पब्लीसिटी स्टंट" म्हणुन कुंजीर वापरित आहेत. पेठे-गोपुंना "बुकलुन" काढताना तुमचा खरा निशाना फुल्यांवर आहे हे आम्हाला कळलेय एव्हढेच आम्ही त्यांना सांगु ईच्छितो.
............................................


Saturday, July 14, 2012

ज्ञानमग्न : प्रा.राम बापट



महाराष्ट्राला श्रेष्ट दर्जाची वैचारिक परंपरा लाभलेली आहे.अनेकविध विषयांवर कसदार आणि कलदार लेखन करणा-या व्यासंगी विद्वानाची फार मॊठी मांदियाळी महाराष्ट्राने प्रसवलेली आहे.महात्मा फुले,न्या.रानडे,राजारामशास्त्री भागवत, डॊ‘बाबासाहेब आंबेडकर, भांडारकर, पां.वा.काणे, लक्ष्मणशास्त्री जोशी, वि.रा.शिंदे, गं.बा.सरदार, नरहर कुरुंदकर,वा.वि.मिराशी, य.दि.फडके, या प्रथम श्रेणीच्या फळीतील अव्वल दर्जाचे विचारवंत असणारे प्रा.राम बापट यांचे २ जुलैला निधन झाले. बापटसर म्हणजे नानाविध विषयांकडे पाहण्याची अंतर्दृष्टी देणारे ज्ञानमग्न शिक्षक होते.सरांना पुणे विद्यापिठातुन निवृत होवुन २१ वर्षे उलटून गेली असली तरी ते दररोज विद्यार्थी,कार्यकर्ते आणि विद्वान  यांच्या गोतावळ्यात चर्चा आणि मंथनात बुडुन गेलेले असायचे.
ते महाराष्ट्राच्या वैचारिक व सामाजिक परंपरेची उकल करणारे महापंडीत होते.विचारांच्या विकासाचे ईतिहासचक्र आणि त्यामागची प्रेरक तत्वे व उर्जा यांच्या शोधात त्यांनी हयात घालवली.ते अविवाहीत होते.सत्तासंबंधावर आधारलेल्या राजकारणाचा आरपार वेध घेत समताधिष्टीत समाजाची उभारणी कशी करायची यावर त्यांचे मुलगामी चिंतन होते.ते सदैव नव्या विचारांचे स्वागत करणारे,नव्या संशोधनाला चालना देणारे संशोधक होते.ते प्रत्येक सिद्धांताची कशोशीने छाननी करणारे,मराठी भाषेच्या अंगभुत लयीवर मांड असणारे  कसदार लेखक होते. देशविख्यात मृदुभाषी वक्ते होते. त्यांना अनेक विषयात गती होती. नाट्यशास्त्र, कला, सौंदर्यशास्त्र, समाजशास्त्र, तत्वज्ञान ते संरक्षणशास्त्र असा फार मोठा अवाका असणारे ते मुलगामी चिंतक होते. सर्व सामाजिक चळवळींबद्दल त्यांना ममत्व होते.बापटसर म्हणजे क्रियाशील असा चळवळ्या महापंडीतच!
गेले काही महिने ते अल्झायमर्सने आजारी होते.तरीही ते सदैव कार्यमग्न असत.गेल्या महिन्यातच त्यांचा फोन आला होता.माझे नवोदित साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण तयार झाले का याची सर चौकशी करीत होते. म्हणाले मला आजकाल आजारपणामुळे काहीसे विस्मरण होते.संमेलनाला मी येणार आहे.पुढची तारीख कोणती ठरलीय ते आठवणीने कळवा.या संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याची बातमी वर्तमानपत्रात आली तेव्हा सरांचा अभिनंदनपर फोन आला होता.त्यानंतर संमेलनाबद्दलचा हा त्यांचा तिसरा फोन होता.हे साहित्य संमेलन काही कारणामुळे पुढे ढकलले गेले आणि आता ते होईल तेव्हा सर असणार नाहीत!
बापटसरांची माझी ओळख  एका शिबिरात झाली.त्यांचे व्याख्यान ऎकणे ही एक वैचारिक मेजवानीच असे.गेल्या ३० वर्षात त्यांची शेकडो व्याख्याने ऎकली.विद्यापिठात शिकत असताना मी त्यांच्या विभागाचा विद्यार्थी नसुनही काहीवेळा आम्ही मित्र त्यांच्या वर्गात बसत असू. १९८९ साली माझे "महात्मा फुले यांची बदनामी:एक सत्यशोधन"हे पहिले पुस्तक प्रकाशित झाले.बाळ गांगल यांनी सोबत साप्ताहिकात महात्मा फुले यांच्यावर बेछूट,शिवराळ आणि निरर्गल टिका केली होती.तिचे साधार खंडन करणारे पुस्तक मी लिहावे यासाठी सरांनी मला प्रोत्साहन दिलेले होते.मी त्यांनाच प्रस्तावनेसाठी गळ घातली.सर म्हणाले मला नक्कीच आवडेल पण तुम्ही प्रा.य.दि.फडके यांची प्रस्तावना घ्या. फडके हे फार मोठे संशोधक आहेत. मुख्य म्हणजे ते "जडीबुटी" संशोधक नाहीत. तुमच्या पुस्तकाला ते अधिक न्याय देवु शकतील.फडके यांचे लेखन जोरकस आणि आक्रमक असते,ते गांगलांचे चांगले वाभाडे काढतील. यानिमिताने  तुमची फडकेसरांशी ओळख व्हावी अशी माझी ईच्छा आहे. मी यदिसरांकडे गेलो.त्यांनी तात्काळ प्रस्तावना दिली.पुस्तक बहुचर्चित आणि विद्वतमान्य ठरले.तेव्हापासुन बापटसरांकडे कधीही जावे,कोणत्याही विषयावर त्यांच्याशी गप्पा माराव्यात हा नित्य परिपाठ झाला.
त्यानंतरचे माझे प्रत्येक पुस्तक आस्थेवाईकपणे वाचुन सर प्रतिक्रिया देत.एखादे पुस्तक मिळाले नाही तर फोन करुन पुस्तक घ्यायला कधी येवु असे विचारत. फुले-आंबेडकरांचे प्रत्येक पुस्तक मुळातुन त्यांनी वाचलेले होते.काही महिन्यांपुर्वी  चित्रमय चरित्राचा बाविसावा खंड त्यांना भेट द्यायला गेलो होतो.पुस्तक बघुन सर हरखले.उत्तम आणि दर्जेदार निर्मितीबद्दल त्यांनी कौतुक केले.सरकारी पुस्तक इतके सुंदर असु शकते यावर विश्वास बसत नाही ,असे म्हणाले.मी पुस्तकाच्या पहिल्या पानावर त्यांचे नाव लिहुन ते त्यांना भेट देणार तर ते म्हणाले,"थोडे थांबा.पुस्तकावर माझे नाव लिहु नका.पुस्तक मला द्या.आठ दिवसात वाचून परत करतो.मी आता माझ्याकडची सगळी पुस्तके वेगवेगळ्या संस्थांना वाटुन टाकली आहेत.आता हेही कोणालातरी देणार,त्यापेक्षा माझी आठवण म्हणुन तुमच्याकडेच ठेवा. मी त्यांच्या घरात नजर टाकली तर खरेच सगळी कपाटे रिकामी दिसत होती.पुस्तके म्हणजे सरांचा जीव की प्राण! आजवर त्यांनी मला वाचायला त्यांच्याकडची कितीतरी पुस्तके आवर्जुन दिली. आठवणीने परत मागुन घेतली.ब्राह्मण-अब्राह्मणबोध सारखी अनेक दुर्मिळ पुस्तके त्यांच्याकडुन मिळाली म्हणुनच मला वाचता आली.दोनच दिवसात सरांचा फोन आला, म्हणाले पुस्तक वाचुन झालेय. मी गेलो तर सरांनी नोट्स काढुन ठेवलेल्या.त्यापुस्तकाविरुद्ध दरम्यान  काही दुषित पुर्वग्रहातुन आणि हितसंबंधीय आकसातुन एकदोन वृतपत्रांनी विरोधात लिहिले होते.सर,म्हणाले,मी पुस्तक संपुर्ण वाचलेय.उत्तम झालेय.त्यानंतर सरांनी तपशीलवार चर्चा केली.कौतुक केले."छापुन आलेली टिका चुकीची आहे.माझा लेखी अभिप्राय देतो.या खोडसाळ टिकेकडे लक्ष देवु नका.मधल्याकाळात तुम्ही ज्यांना मदत केली तीच मंडळी कृतघ्न होवुन आज तुमच्यावर तुटून पडत आहेत,याचा मनस्ताप करुन घेवु नका.असत्य फारकाळ टिकत नसते.महाराष्ट्राने माथेफिरुपणाला कधीही थारा दिलेला नाही." हे सरांचे बोल ऎकुण खुप बरे वाटले.
१९९० साली आम्ही शासनातर्फे महात्मा फुले समग्र वांग्मयाची नवी आवृती काढली.अवघ्या दहा रुपयातील या प्रती लोकांनी रेशनसारख्या रांगा लावुन विकत घेतल्या.सर स्वत:फोटोझिंको प्रेसवर गेले.३तास रांगेत उभे राहिले. त्यांचा नंबर यायच्या आतच पुस्तक संपले.सरांनी मला फोन करुन एक प्रत द्यायची व्यवस्था करता येईल का अशी विचारणा केली.मी माझ्याकडची प्रत घेवुन गेलो. पुस्तक त्यांना दिले तर सर पैसे घेण्याचा आग्रह करु लागले.पुस्तक खास सवलतीच्या दरातील असल्याने त्याचा काळाबाजार होवु नये यास्तव आम्ही एक पथ्य पाळीत असु.हे पुस्तक हरी नरकेंकडुन दहा रुपये या छापील किमतीत विकत मिळाले असे पत्र द्या असे मी सांगताच सरांनी तसे पत्र नी दहा रुपये आनंदाने दिले.ते पत्र आजही मी जपुन ठेवले आहे.
मध्यंतरी सरांनी मी लिहिलेला "भारतीय संविधान आणि ओबीसी" याविषयावरील शोधनिबंध आवर्जुन वाचायला मागुन नेला आणि त्यावर माझ्याशी विस्तृत चर्चा केली.राखीव जागांवर एव्हढे भरपुर लिहिले गेले आहे, पण मग हाच पैलु कसा काय उपेक्षित राहिला? याचे मला आश्चर्य वाटते असे म्हणुन आता तुम्हीच यावर स्वतंत्र पुस्तक लिहा असे आग्रहपुर्वक सांगुन गेले.
आजच्या जागतिकीकरणाच्या काळात परंपरा आणि परिवर्तन यांचा मेळ कसा घालायचा हा मोठा पेच असतो.समाजाने आत्मभान न हरवता आत्मविश्वासाने पावले टाकावीत यासाठी नव्याने निर्माण होत असलेल्या सांस्कृतिक आणि नैतिक मुल्यविषयक प्रश्नांवर विवेकी आणि समतोल मांडणी करावी ती सरांनीच.आस्थेवाईक विश्लेषण,चिकित्सक धांडोळा आणि अनेक पेचप्रसंगांची खुबीदार उकल करण्यात त्यांचा हातखंडा होता.सेमिनार,कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे आणि वैचारिक चर्चांमध्ये ते रमुन जात.त्यांनी फार मोजकेच लेखन केले आहे."परामर्श" हा त्यांचा एकमेव ग्रंथ.६मौलिक प्रस्तावनांचा हा संग्रह.मे.पुं.रेगे,राम मनोहर लोहिया, अशोक चौसाळकर,सदानंद मोरे,गो.मा.पवार आदिंच्या पुस्तकांना लिहिलेल्या या प्रस्तावना एव्हढ्या मुलगामी आणि मौलिक आहेत की हे पुस्तक प्रत्येकाने संग्रही ठेवावे आणि वाचावे असे आहे.आजच्या युगधर्मातील पुरोगामी मुल्यांची बांधिलकी मानुन,अभिनिवेशरहित,समतोल नी तारतम्याने मांडणी करण्यात सर अग्रेसर असत.प्राचीन काळापासुन भारतीय समाज बहुविध व बहुसांस्कृतिक होता.त्याला उच्चतर नैतिक पातळीवर नेणारांबद्दल सरांना अपार ओलावा होता.महाराष्ट्रातील सांस्कृतिक व्यवहार स्वातंत्र्यशील,समतावादी आणि लोकशाहीकरणाला पोषक होण्यासाठी जनसमुहांना विश्वासात घेवुन,अलगपणाची बेटे न रचता, क्रांतिकारकांना जिव्हाळ्याने परंपरेशी जोडीत पुढे गेले पाहिजे.आजचे राज्यकर्ते आपल्या प्रभुत्ववादी नितीकरता संत आणि प्रागतिक परंपरांचा गैरवापर करित असताना या प्रस्थापितांवर सडेतोड तोफ डागली पाहिजे असे सर सांगत असत."सत्य हे एकांगी नसते,पण त्याचे समग्र दर्शन एकदम न होता कलेकलेने होत असते.जसा ज्ञाता असे ज्ञान.सत्याची प्रतिती निरिक्षकाची भुमिका,स्थान,तेज दृष्टीचा टप्पा किंवा पल्ला आणि दृष्टीकोन  यावर अवलंबुन असते.प्रत्येकाने सत्याचा तलाश आपापल्या परिने आणि रितीने लावला पाहिजे, त्यासाठी कायम विनम्र पण टोकदार नी ठाम भुमिका घेतली पाहिजे सोयीपुरता ईतिहासाचा वापर करुन क्रौर्य आणि पशुतेने वागुन उद्याचा चांगुलपणा जन्माला येईल असे मानणारे सामाजिक अंध असतात.समता,न्याय आणि संमीलन या ईतिहासाच्या मुख्य प्रेरणा असतात. वर्तमानाकडे पाठ फिरवणारे लोक हे अटळपणे दुतोंडी भाषा आणि दुटप्पी व्यवहार यांच्या आहारी जातात"हे सरांचे सांगणे होते.वर्ग ,जाती,लिंगभावाच्या विषमतेला विरोध करणारे बापटसर चिकित्सा, साधनशुचिता आणि ज्ञाननिर्मितीची अनावर प्रॆरणा देत जगले आणि तोच संदेश देत शांतपणे आपला निरोप घेते झाले.
...................

Thursday, July 12, 2012

मेरिट कशाला म्हणायचे?

       आरक्षण चर्चा काही निरिक्षणे: राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्यायासाठी आंतरजातीय विवाह, धर्मचिकित्सा, आर्थिक फ़ेरवाटप, स्त्रीपुरुष समता, आरक्षण,साधनसंपत्तीचे समान वाटप,सर्वांना समान संधी हे टप्पे अनिवार्य आहेत.

      १.आरक्षण हा विषय अतिशय संवेदनशिल आहे.काही तासात किती मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, होतेय. याचा अर्थ मिडीयाच्या भाषेत बोलायचे तर हा खुप टीआरपी खेचणारा विषय आहे.
     २.माणसे भरभरुन मते व्यक्त करतात, हे निश्चितच स्वागतार्ह आहे.सर्वांना धन्यवाद.
     ३.काही गंमतीदार मुद्देही पुढे आले.ज्यांना स्वताला आरक्षण हवे आहे, त्यांची "आमची जात ओबीसीत घाला" अशी मागणी आहे, तेही आरक्षणाला विरोध करण्यात पुढे असावेत?ही दांभिकता कधी जाणार?
     ४.काहींचा आरक्षणाला विरोधही आहे, आणि त्याचवेळी त्यांना आर्थिक आधारावर आरक्षणही हवे आहे, हा दुटप्पीपणा का?
     ५.काही कांगावाबहाद्दर आजोबाची शिक्षा नातवाला का वगैरे ?विषयांतर करीत आहेत, किंवा मुळ हेतुला बगल देत आहेत.
     ६.शिक्षेचा सवालच नाही. ओपणवाले मुळात लो्कसंख्येत किती आहेत? अ. जा. अ.ज.+ओबीसी +विजाभज +विमाप्र= ८० टक्के होतात. त्यांना सर्वांना मिळुन आरक्षण किती?५० टक्के. उर्वरित २० टक्केंना जागा किती? ५० टक्के. कुठेय शिक्षा? सर्वांचा १०० टक्के वाटा एकट्याने खायची सवय जडल्याने हा २०टक्के ओपणवाल्यांना अन्याय वाटतोय.या देशाच्या साधनसंपत्तीत सर्वांचा वाटा नाही काय?
    ७.मेरिट कशाला म्हणायचे? फक्त मार्क्स म्हणजे मेरिट? ते कसे मिळाले? त्यांची अनुकुल प्रतिकुल परिस्थिती बघायची नाही?सुशिक्षित पालक, उत्तम शिक्षक, दर्जेदार शाळा,नामवंत क्लासेस,अभ्यासाच्या सोयी,साहित्य,यांच्यामुळे मार्क्स वाढतात, उलटी स्थिती असेल तर कमी होतात, हे बघायला नको?
    ८.गुणवत्ता=उपजत प्रतिभा+अनुकुल परिस्थिती+परिश्रम+संधी.......
    ९.पिढ्यांनपिढ्या संधी नाकारली गेल्याने अनेक मागासांच्या गुणवत्तेला देश मुकला हे का दिसत नाही?
    १०. मागासांमधली अपवादात्मक उदाहरणे{शहरी, नवश्रीमंत, सुस्थितीतील, २ किंवा ३ पिढ्यातील}घेवुन सामाजिक अन्यायाकडुन लक्ष दुसरीकडे वळवायचे टेक्निक जुने झालेय. काही नवे आक्षेप तरी शोधावेत, प्रतिभावंतांकडे एव्हढा दुष्काळ ?
     ११.आरक्षण पालीसीत काही दोष आहेत, हे आम्ही नाकारलेलेच नाही.जरुर दोष दाखवा,विधायक चर्चा करा, पर्याय सुचवा.स्वागतच आहे.

Tuesday, July 10, 2012

न्या.मिश्रा आयोगाला घटनाबाह्य कार्यकक्षा


            "विकासात मुस्लीमांना वाटा देणेच देशहिताचे"ही श्री. हुमायुन मुरसल यांची प्रतिक्रिया वाचली.{सकाळ,दि.१० जुलै.}त्यांनी माझ्या "धार्मिक राजकारणाला सर्वोच्च चपराक"ह्या लेखावर प्रदीर्घ प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार.त्यांना माझा एकही मुद्द खोडता आलेला नाही.त्यांनी जुनी माहिती,गैरलागू आधार आणि गल्लत करणारी उदाहरणे देवुन तकलादु मांडणी केलेली आहे.  मुसलमानातील जातीव्यवस्थेच्या बळींना सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर दिल्या गेलेल्या आरक्षणाचा मी समर्थक आहे.मात्र या आरक्षणाचा आधार धार्मिक असता कामा नये,हे संविधान व न्यायालयाचे मत मला पटते.धार्मिक आरक्षणामुळे मुस्लीमांच्या विकासाला गती मिळण्याऎवजी हिंदु-मुस्लीम झगडे उभे राहतील आणि विकासात गतीरोध निर्माण होईल असे माझे मत आहे.
मुस्लीमांच्या मागासपणाचा आधार धार्मिक नाही. इस्लामला जातीव्यवस्था मान्य नसली तरी मुसलमानांमध्ये ती आहे.अश्रफ,अजलफ आणि अर्जल हे सगळे मुसलमानच असले तरी त्यांची सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्थिती मुळात फार विषम आहे. त्याचा परिपाक म्हणुन त्यांच्यात आर्थिक मागासलेपणा आलाय.
{१}मुरसल यांनी दिलेले भटक्या विमुक्तांच्या सबकोट्याचे उदाहरण  धार्मिक आधारावरील नसुन सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावरील असल्याने ते त्यांच्याच विरोधात जाते.शिवाय महाराष्ट्रात हा सबकोटा राज्याच्या स्थापनेपासुन असला तरी केंद्रीय पातळीवर तो नाही.तेथे विजाभज २७% ओबीसी आरक्षणातच येतात.
           {२}केरळ,कर्नाटक,बंगालमधील धार्मिक कोट्याला आजवर कोणी न्यायालयात आव्हान दिले नाही म्हणुन तो अस्तित्वात असला तरी त्याला घटनात्मक आधार नाही.एखादी गोष्ट केवळ वहीवाटीने घटनात्मक बनत नसते.घटनेत तशी तरतुद असावी लागते.
           {३}कार्यालयीन टिपणाबाबत आणि मंत्रीमंडळाच्या अधिकाराबाबतची मुरसल यांची माहिती जुनी आहे. १६ नोव्हे.१९९२ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाने इंद्र सहानी निकालपत्रात सरकारचे हे अधिकार मर्यादित केले आहेत.कायमस्वरुपी केंद्रीय व राज्य मागासवर्ग आयोगांच्या शिफारशीशिवाय सरकार असे निर्णय घेवु शकत नाही. केंद्र सरकारने आयोगांना का डावलले? असा जाब न्यायालयाने विचारला तो त्यामुळेच.
           {४}न्या.मिश्रा आयोगाला सरकारने दिलेली कार्यकक्षा घटनाबाह्य होती.त्यांना "आर्थिक" व "धार्मिक" आधारावर मागासलेपण शोधायला सांगितले होते. आर्थिक निकषाला  घटनात्मक आधार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने इंद्र सहानी निकालपत्रात सांगितलेलेच आहे.त्यामुळे मिश्रा आयोगाचे उदाहरण गैरलागू ठरते.    
           {५}पहिली घटनादुरुस्ती धार्मिक आधारावर झालेली नाही.मुरसल यांनी अशी गल्लत करण्याऎवजी घटना एकदा काळजीपुर्वक वाचावी....

Monday, July 9, 2012

तुम्ही घरात राहता की गोठय़ात?



आज आदिवासींच्या पाडय़ांवर, भटक्यांच्या पालांमध्ये, अनुसूचित जातींच्या झोपडय़ांमध्ये, ओबीसींच्या शेता-रानात वाचन पोचले आहे. तुकाराममहाराज म्हणायचे, `आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने !’ बलुतेदाराघरी ही रत्ने झळकत आहेत.
`ज्या जागेत माणसे पुस्तकांसह राहतात त्याला `घर’ असे म्हणतात. जिथे माणसे किंवा जनावरे पुस्तकांशिवाय राहतात त्याला `गोठा’ असे म्हणतात.‘ आपण कुठे राहतो? घरात की गोठय़ात? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारून बघितला पाहिजे.
दिवसेंदिवस वाचन कमी होत चाललेय अशी चर्चा आजकाल सगळीकडे ऐकायला मिळते. वाढत्या चॅनेल्स, मालिका, रिऍलिटी शो आदींमुळे लोकांचा वाचनाकडचा ओढा कमी होतोय असे सांगितले जाते. इलेक्ट्रॉनिक मीडिया अतिशय पॉवरफुल आहे. नृत्य, नाटय़, संगीत, आयपीएल असा मनोरंजनाचा जबरदस्त मसाला चॅनेल्सवरून 24 तास बदाबदा वाहत असतो. या खतरनाक मार्यापुढे चिंतनाची मागणी करणार्या वाचनाकडे दुर्लक्ष होणारच असे मानले जाते.
आज वाचन कमी होत आहे असे म्हणणे म्हणजे पूर्वी कधीतरी ते जास्त होते असे मान्य करणे ओघानेच आले. सर्वेक्षणातून पुढे आलेले पुरावे मात्र या म्हणण्याला दुजोरा देताना दिसत नाहीत.

 गेल्या सव्वाशे वर्षात आपल्याकडे वाचन संस्कृती कशी होती याचे ग्रंथबद्ध पुरावे उपलब्ध आहेत. थोर समाजसुधारक गोपाळराव आगरकर यांना वाचनाचे भयंकर वेड होते. शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार या मंडळींनी `वाचनमग्न’ असावे असा त्यांचा आग्रह होता. `सुधारक’ या त्यांच्या वर्तमानपत्रात त्यांनी याबाबतची नाराजी व्यक्त करताना म्हटले होते की, 5 टक्केही सुशिक्षित वाचन करीत नाहीत. पुस्तक हातात धरण्याचा त्यांना कंटाळा येतो हे चिंताजनक होय!
शंकरराव वावीकर यांनी 1896 साली `वाचन’ या नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात ते म्हणतात, “हल्लीचे प्रोफेसर आणि शिक्षक हे टेक्स्टबुकांव्यतिरिक्त काही वाचत नाहीत.” यावरून दिसते ते असे की, सव्वाशे वर्षांपूर्वी आपल्या समाजाचा वाचनदर पाच टक्केही नव्हता.
1848 साली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले व त्यांच्या सहकार्यांनी मुलींची पहिली भारतीय शाळा सुरू केली त्याचवेळी त्यांनी देशातील दलित-बहुजनांसाठीही ज्ञानाची कवाडे उघडली. त्यावेळी भारताची साक्षरता होती अवघी अडीच टक्के! 1901 च्या जनगणनेनुसार ती पाच टक्क्यांवर पोहोचलेली दिसते. आपण स्वतंत्र झालो तेव्हा आपली साक्षरता होती 12 टक्के! आज देशाची साक्षरता 75 टक्केपर्यंत पोहोचलीय तर राज्याची 86 टक्के झालीय. वाचनदर सुमारे 10 टक्के झालाय. 11 कोटींच्या महाराष्ट्रात साडेनऊ कोटी लोक साक्षर असून त्यातील 95 लक्ष ते एक कोटी लोक वाचन करतात, असे वेगवेगळ्या पाहण्यांतून दिसून आले आहे. ग्रंथालये, वाचनालये यातील पुस्तके आणून किंवा व्यक्तीगत ग्रंथ खरेदी करून हे लोक पुस्तके वाचीत असतात. वृत्तपत्रे, नियतकालिके, इ-बुक्स, सोशल मीडिया, ललित वा वैचारिक ग्रंथांच्या या वाचकांचे सामाजिक स्तर जर बघितले तर काय चित्र दिसते?
दीडशे वर्षांपूर्वी भारतीय स्त्रियांची साक्षरता शून्य टक्के होती. म्हणजेच स्त्रीवाचकांची संख्या शून्य टक्के होती. आज सर्व समाजातील स्त्रिया वाचन करताना दिसतात. लिहिताना दिसतात. लोकसंख्येतील निम्मा घटक असणार्या या वर्गात वाचन वाढले की कमी झाले, काय म्हणणार? शिक्षणाचा अधिकार असणारे त्रैवर्णिक (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य) पुरुषांमध्ये पिढय़ान्पिढय़ा साक्षरता होती, वाचनही होते, परंतु शूद्र अतिशूद्र (अनु. जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि भटके विमुक्त) यांना शिक्षणाचाच अधिकार नव्हता त्यामुळे त्यांच्या वाचनाचा सवालच पैदा होत नव्हता. जिथे सार्या देशातील साक्षरताच मुळी अडीच टक्के होती, तिथे वाचनदर पाच टक्के असूनही वाचन संस्कृती किती घरांमध्ये होती असा सवाल विचारला आणि आजची साक्षरता, सामाजिक स्तरनिहाय वाचकप्रमाण आणि वाचनदर यांचा आलेख काढला की वाचन वाढले की कमी झाले याचे खरे उत्तर मिळू शकेल. ज्या तळातल्या घटकांमध्ये वाचन शून्य टक्के होते तेथे ते वाढले की कमी झाले याचे खरे उत्तर मिळू शकेल. ज्या तळातल्या घटकांमध्ये वाचन शून्य टक्के होते तेथे ते वाढले असूनही ते विचारात घेतले जात नाही कारण `संस्कृतायझेशन’ (संस्कृतीकरण) प्रक्रिया! “रिडींग फ्रॉम बिलो” शोधा मग लक्षात येईल की देशातील व राज्यातील वाचन कमी होत नसून वाढतेय! अर्थात तिथेही तिचा (वाचन संस्कृतीचा) विस्तार 100 टक्क्यांपर्यंत झाला पाहिजे असाच माझा आग्रह असणार! मी अल्पसंतुष्ट नाही. तिथेही आज वाचन ही गरज वाटत नाही. घरी पुस्तके असणे हे `स्टेटस सिंबॉल’ वाटत नाही. हजारो रुपयांमध्ये पगार घेणारेसुद्धा पुस्तके फार महाग झालीत, परवडत नाहीत म्हणून घेत नाही, अशी तक्रार करतात. खरे तर महागाई कुठे नाही? सगळीकडेच ती आहे. कपडे महागलेत म्हणून कपडे घालायचे सोडलेत, किंवा अन्नधान्य, भाज्या महागल्यात म्हणून केवळ एकवेळ जेवतो असे म्हणणारे भेटतात का? नाही. म्हणजे महागाई असली तरी गरज असेल तर खरेदी करावीच लागते. पुस्तकांवाचून काय अडते? अशी भावना असल्यानेच ही तक्रार पुढे केली जाते असे माझे स्पष्ट मत आहे. मराठी पुस्तके फारशी स्वस्त नसली तरी इंग्रजी व हिंदी पुस्तकांच्या तुलनेत ती नक्कीच स्वस्त आहेत. खरेदीदार वाढले तर त्यांच्या किंमती आणखी उतरतील.
आज आदिवासींच्या पाडय़ांवर, भटक्यांच्या पालांवर, अनुसूचित जातीच्या झोपडय़ांमध्ये, ओबीसींच्या शेता-रानात वाचन पोचले आहे. फुलते आहे. जिथे अभाव असतो तिथेच त्याचे मोल असते. मुबलक असले की अपचन होते. तुकाराममहाराज म्हणायचे, `आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने!’ आज बलुतेदाराघरी ही रत्ने झळकत आहेत.
इंग्लंड आणि अमेरिका हे ग्रंथांच्या जोरावर मोठे झालेले देश आहेत. वाचन, प्रकाशन आणि लेखन यांना प्रोत्साहन देण्यासाठी विल्यम शेक्सपियरचा जन्मदिवस वाचन दिवस, पुस्तक दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाकडून करण्यात आली. महाराष्ट्रात दरवर्षी मराठीत 2000 तर भारतात विविध भाषांतील सुमारे 90 हजार पुस्तके प्रकाशित होतात. राज्यात शैक्षणिक, धार्मिक व वैचारिक आणि ललित पुस्तकांची दरवर्षी 200 कोटी रुपयांची उलाढाल होते. देशातील ही वार्षिक उलाढाल दहा हजार कोटी रुपयांवर जाते. त्यात 60 टक्के वाटा हा शैक्षणिक पुस्तकांचा असतो. खपामध्ये शैक्षणिक, धार्मिक, व्यापार, उद्योग, ललित आणि त्यानंतर वैचारिक ग्रंथांचा खप असा क्रम असतो. आपल्या देशातील इंग्रजी ग्रंथांची उलाढाल 9800 कोटी रुपयांची आहे ती वेगळीच. देशात एकूण 19 हजार प्रकाशक असून त्यातले एक हजार एकटय़ा महाराष्ट्रात आहेत. इ-बुक्समधील किंडलवर 70 लाखांपेक्षाही अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. साहित्य अकादमी ही जगातील सर्वात मोठी प्रकाशन संस्था आहे.
आपल्या घरी असलेल्या किंवा विकत घेऊन घरी आणलेल्या पुस्तकातून प्राध्यापक जॉन हार्वर्ड यांच्यासारखे एखादे विद्यापीठ निघावे इतका विस्तार आपल्या घरी आलेल्या पुस्तकातून झाला तर वाचन संस्कृती वाढेल. व्यक्ती आणि समूह यांचे यश वाढेल. व्यक्ती आणि समूह मोठे झाले की वाचनसंस्कृतीची टक्केवारी वाढू लागेल. इतके वाचन हे `पॉवरफूल’ असले पाहिजे!
 प्रा. हरी नरके

Sunday, July 8, 2012

महात्मा फुले यांची निर्मिक संकल्पना

----------------------------------------------------------------------
महात्मा फुले यांची निर्मिक संकल्पना 
प्रा. हरी नरके 

महात्मा जोतीराव फुले हे पर्यायी संस्कृतीचे जनक होते. बहुजन समाजाच्या मानसिकतेचं समग्र परिवर्तन करण्यासाठी त्यांनी विचार मांडले, चळवळी चालवल्या. बहुतांश भारतीय समाज हा देव, धर्म, ईश्‍वर, परमेश्‍वर यावर अपार श्रद्धा असलेला आहे. तो पोकळीत जगू शकत नाही. अशा समाजाला विज्ञाननिष्ठा, साधनशुचिता आणि विवेकाच्या आधारावर उभी केलेली बुद्धिनिष्ठ श्रद्धा देण्याची त्यांची धडपड होती. 33 कोटी देवांवर विसंबून असलेल्या समाजाला परंपरा आणि परिवर्तन यांचा सुवर्णमध्य साधून एक नवा विचार त्यांनी दिला. त्यांनी पारंपरिक देव, ईश्‍वर, परमेश्‍वर, संकल्पना नाकारुन "निर्मिका'ची संकल्पना विकसित केली.सत्यशोधकाला 33 नियमांची आचारसंहिता घालून देताना ही निर्मिक संकल्पना त्यांनी पायाभूत मानली आहे. लिंगभाव, वर्ग आणि जातीची विषमता संपूर्णपणे नाकारणारी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावर आधारित ही संकल्पना ते मांडतात. 

""अज्ञानाशी ज्ञान, पांगळ्या अन्नदान, हेच बा स्मरण निर्मिकाचे !!'' ही आपली निर्मिकपूजेची, आराधनेची संकल्पना ते सांगतात. बुद्ध कबीर येशू, महंमद पैगंबर, संत तुकाराम, टॉमस पेन, मिशनरी वृत्ती आणि अमेरिकन उदारमतवाद यांच्या प्रभावातून त्यांची ही संकल्पना विकसित होताना दिसते. सत्यधर्माची, शोषणविरहित आणि सर्वचिकित्सक मानसिकता वाढीला पूरक ठरणारी ही मांडणी काळाच्या ओघात ओढाताण झाल्यानं बाजूला पडली असली तरी भारतीय समाजमनाला ती एक उत्तम पर्याय देते, ही निश्‍चित. 

Wednesday, July 4, 2012

अभिजात मराठी

 प्रा. हरी नरके 
{महाराष्ट्र टाइम्स,दि.२७फेब्रुवारी,२०१२}
अकरा कोटी लोकांची मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. संपन ज्ञानभाषा असणारी मराठी महानुभवांची धर्मभाषाही आहे. मराठीतील साहित्यसंपदा अत्यंत श्रेष्ठ दर्जाची आहे. मराठ्यांनी भारतभर राज्य केले. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानावरही मराठी सत्तेची पताका फडकत होती. ही भाषा बोलणारे लोक देशभर आहेत. त्यामुळे ही फक्त एका प्रांताची भाषा नसून, ती महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे. 

........... 

मराठीत दरवर्षी सुमारे दोन हजार पुस्तके प्रकाशित होतात. पाचशे दिवाळी अंक निघतात आणि छोटीमोठी सुमारे दोनशे साहित्य संमेलने होतात. नामवंत खासगी प्रकाशन संस्था आणि सरकारी प्रकाशने यांची वार्षिक उलाढाल वीस ते पंचवीस कोटी रुपयांपर्यंत असून, पाठ्यपुस्तके, धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारे दोनशे कोटींपर्यंत असावी, असा एका पाहणीचा निष्कर्ष आहे. देशातील एकूण ग्रंथालयांपैकी २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत. 

अशा अभिजात मराठी भाषेला केंद्र सरकारने 'अभिजात' भाषेचा दर्जा मात्र दिलेला नाही. कन्नड, तमिळ, तेलुगू आणि संस्कृत या चार भाषांना तो मिळालेला आहे. भाषेच्या अभिजातपणासंबंधी केंद्र सरकारचे चार निकष आहेत. १) भाषा दीड ते दोन हजार वर्षे जुनी असावी. २) ती भाषा बोलणाऱ्या लोकांनी मौल्यवान वारसा म्हणून जपलेले प्राचीन साहित्य असावे. ३) भाषेची परंपरा तिची स्वत:ची असावी. ४)भाषेचे आधुनिक रूप हे तिच्या प्राचीन रूपांहून भिन्न असले, तरी चालेल; पण त्यांच्यात आंतरिक नाते असावे. हे चारही निकष मराठी भाषा पूर्ण करते. प्राचीन महाराष्ट्री भाषा- अपभ्रंश भाषा- मराठी असा मराठीचा प्रवास आहे. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू यांसारखे श्रेष्ठ ग्रंथ आठशे वर्षांपूर्वी ज्या भाषेत लिहिले गेले, ती त्याच्याआधी किमान हजार-बाराशे वर्षे समृद्ध भाषा होती. 

मराठी भाषेचा जन्म नेमका केव्हा झाला याबाबत कृ. पां. कुलकर्णी यांनी 'मराठी भाषा उद्गम आणि विकास' या १९३३ साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात म्हटले आहे, 'सर्व प्राकृत भाषा, अपभ्रंश आणि संस्कृत या भाषांनी आपापल्या परीने मराठीस जन्माला आणण्यास हातभार लावलेला दिसतो. निरनिराळ्या प्राकृतभाषा बोलणारे निरनिराळे समाज निरनिराळ्या काळी वरून आर्यावर्तातून अनेक कारणांमुळे महाराष्ट्रात उतरले आणि तेथे स्थायिक झाले. त्यांच्या संमिश्र बोलण्यानेच मराठी भाषा बनली. महाराष्ट्र देश ज्याप्रमाणे गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, अश्मक, कुंतल, विदर्भ, कोकण इत्यादी लहान लहान देशविदेशांचा मिळून बनला आणि महाराष्ट्राची लोकवसाहत ज्याप्रमाणे निरनिराळ्या लोकघटकांनी मिळून झाली, त्याचप्रमाणे मराठी भाषा ही निरनिराळ्या प्राकृत भाषांच्या विशेषत: माहाराष्ट्री व अपभ्रंश ह्यांच्या मिश्रणाने बनली. महाराष्ट्र देश, मराठा समाज आणि मराठी भाषा ह्यांची घटना वर दिल्याप्रमाणे ख्रिस्तोत्तर ६००-७००च्या सुमारास झाली. 

इसवीसनपूर्व ६०० पासून प्राकृत भाषांचा काळ सुरू होतो. तो इस ७००पर्यंत टिकतो. भगवान बुद्ध, महावीर, अशोक यांच्यावेळी प्राकृतांची भरभराट होती बृहत्कथा (इसपू १००) ह्याच काळात लिहिली गेली. वररूचीचा 'प्राकृतप्रकाश' हा व्याकरणग्रंथ याच काळातील होय. अश्वघोषाने आपली नाटके याच काळात लिहिली. या काळानंतर पुढे दोनतीनशे वर्षे प्राकृत भाषा वापरात होत्या, हे नाटकांत वापरलेल्या प्राकृतांवरून सिद्ध होते. इ.स. ४०० ते ७०० या काळात महाराष्ट्री अपभ्रंश प्रचलित होती. 'श्री चावुण्डराये करवियले, गंगराजे सुत्ताले करवियेले' हा श्रवणबेळगोळ येथील इ. स. ९८३चा शिलालेख हा मराठीच्या अस्तित्वाचा एक हजार वर्षे जुना पुरावा होय. 'एपिग्राफिआ इंडिका' व 'इंडियन अॅक्टिवेरी' या नियतकालिकांच्या निरनिराळ्या अंकांत जे ताम्रपट आणि शिलालेख प्रसिद्ध झाले आहेत, त्यात मराठी शब्द वापरलेले दिसतात. हे शब्द इ. स. ६८०पासून प्रचलित असल्याचे स्पष्ट होते. 

उद्योतनसुरीने इ. स. ७७८मध्ये 'कुवलयमाला' हा ग्रंथ लिहिला. त्यात 'मरहट्ट' भाषेचा उल्लेख आहे. या ग्रंथात पुढील वर्णन मिळते. 'दढमडह सामसंगे सहिरे अहिमाण कलहसीले य। दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे।' (बळकट, ठेंगण्या, सावळ्या अंगाच्या काटक, अभिमानी, भांडखोर, दिण्णले (दिले), गहिल्ले (घेतले) असे बोलणाऱ्या मराठ्यांस त्याने पाहिले.) 

मराठीच्या वयाबाबत (१) डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरलिखित 'प्राचीन महाराष्ट्राचे २ खंड', (२) 'हाल सातवाहनाची गाथा सप्तशती' - संपा. स. आ. जोगळेकर (३) गुणाढ्याचे 'बृहत्कथा' (४) राजारामशास्त्री भागवत यांचे 'मराठ्यासंबंधी चार उद्गार' आदी ग्रंथ महत्त्वाचे पुरावे देणारे आहेत. गुणाढ्याच्या बृहत्कथेवरून सोमदेवाने 'कथा सरित्सागर' हा महाग्रंथ निर्माण केला. डॉ. केतकर म्हणतात, 'पैशाचीतील मुख्य विश्रुत ग्रंथ म्हटला म्हणजे बृहत्कथा होय. तो करू युद्धोत्तर इतिहासाचा संरक्षक आणि त्याबरोबर इतिहास विपर्यासाचा संरक्षक आहे. बृहत्कथेत प्रतिष्ठानकथा व दक्षिणापथकथा, कुंडिनपूर कथा येत असल्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासास त्या संग्रहाचा उपयोग करणे प्राप्त झाले. वररुचीची महाराष्ट्री बुद्धपूर्व आहे आणि वररुचीचे व्याकरण पाली किंवा अर्धमागधी या भाषांच्या उदयापूवीर्चे आहे, असे आमचे मत आहे. त्या काळात महाराष्ट्री भाषा प्रगल्भ झाली होती आणि प्राकृत भाषांत तीच प्रमुख होती, हे स्पष्ट आहे. ते पुढे म्हणतात, 'महाराष्ट्री भाषा वररुचीच्या काळी होती आणि ती संवर्धित झाली होती. महाराष्ट्राची स्वतंत्र भाषा अगोदर दोनतीनशे वर्षे तरी विकसित होत असली पाहिजे, म्हणजे ख्रिस्तपूर्व पहिल्या सहस्त्रकाच्या पूवीर्च, म्हणजे ख्रिस्तपूर्व दुसऱ्या सहस्त्रकात महाराष्ट्राचा आद्यविकासाचा काल जातो. या भाषेच्या नावास कारण झालेले जे महार आणि रठ्ठ यांचे एकराष्ट्रीकरण जे ख्रिस्तपूर्व दुसऱ्या सहस्त्रकात झाले असावे, असे दिसते. अश्मक राजा कुरु युद्धात पडला आणि कुरु युद्धापासून अश्मकांचे सातत्य आहे, तर महार आणि रठ्ठ यांचे एकराष्ट्रीकरण आणि अश्मक राजाचे सातत्य याची संगती लावण्याचा प्रयत्न अवश्य होतो. अश्मक राज्य सुरू होण्यापूवीर्च महारांच्या देशात रठ्ठांचा प्रसार होऊन महाराष्ट्र बनले असावे आणि त्यांच्या संयुक्त जनतेत अश्मक राजकुल उत्पन्न झाले असावे, असाच इतिहास असावा असे दिसते.' (पृ. १३) 

महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन वाङ्मय म्हणजे हालांची सप्तशती होय. राजारामशास्त्री भागवत म्हणतात, 'बावीसशे वर्षांचा 'मरहठ्ठ' किंवा 'महाराष्ट्र' शब्द आहे असे म्हणण्यास हरकत नाही. संस्कृतात नाटके ज्यावेळी होऊ लागली, त्यावेळी कुलीन व वरिष्ठ जातीच्या बायकांची भाषा 'शौरसेनी' होती. या 'शौरसेनी' भाषेची एक प्रकृती जशी संस्कृत तशीच दुसरी प्रकृती माहाराष्ट्री उर्फ अतिप्राचीन मऱ्हाठी, असे कात्यायन म्हणतो. तर मग सर्व बालभाषांचे मूळ प्राचीन मराठी असा सिद्धांत केल्यास काहीच प्रत्यवाय नाही.' मूळचा शब्द पाहू गेले असता 'पाअड' होय. 'पाअड' शब्दाच्या जवळजवळ संस्कृतात 'प्रकट' हा शब्द येतो. 'पाअड' भाषा='प्रकट' भाषा. म्हणजे अर्थात सर्व लोकांचा व्यवहार व दळणवळण जीत चालते ती. पाअड भाषा पडली वाहत्या पाण्याप्रमाणे. ते सर्वांचे जीवन तेव्हा सर्वांचाच संबंध तिच्याबरोबर. सहजच तीस 'पाअड' म्हणजे सर्वांस समजण्यासारखी असे अन्वर्थक नाव मिळाले. काही काळाने संस्कृत या शब्दाबरोबर मेळ दिसावा म्हणून 'पाअड' शब्दाचे प्रकट रूप न करता 'प्राकृत' असे रूपांतर केलेले दिसते. त्यामुळे प्राकृत हा शब्द संस्कृतात दररोज पाहण्यात येणारे, अर्थात 'क्षुल्लक' या अर्थाचा वाचक झाला. 'शिक्षा' म्हणून वेदाचे एक अंग आहे. त्यात 'प्राकृते संस्कृते चापि' (प्राकृत भाषेत व संस्कृत भाषेत) असा लेख आला आहे. त्यापक्षी प्राचीन काळीही 'प्राकृत' ही स्वतंत्र भाषा समजण्याचा संप्रदाय पुष्कळ दिवसांपासून होता, हे उघड होय. तेव्हा माहाराष्ट्री, सौरसेनी, मागधी व पैशाची या सर्व जितक्या पाअड भाषा होत्या, तितक्या प्राकृत झाल्या व या प्राकृत भाषांचे 'प्राकृतप्रकाश' नावाचे सूत्रमय व्याकरण कात्यायनाने पहिल्यांदा लिहिले. वर लिहिलेल्या पाचही भाषा या पाअड भाषा. इतकेच, की सर्वांत प्राचीन व सर्वांची प्रकृती माहाराष्ट्री उर्फ प्राचीन मऱ्हाठी. महाराष्ट्रीपासून निघाली शौरसेनी. शौरसेनीपासून कालांतराने मागधी व पैशाची या दोन भाषा निघाल्या. तेव्हा मागधी व पैशाची ही दोन्ही प्राचीन मराठीची नातवंडे होत. शौरसेनीची खरी आई म्हणजे प्राचीन मऱ्हाठी भाषा. 

हालाच्या सप्तशतीतील काव्यही लोकवाङ्मय आहे. कुठल्यातरी राज्याच्या राजकवीने केलेले ते काव्य नसून महाराष्ट्रात प्रचलीत असलेल्या लोकप्रिय काव्याचे ते संकलन आहे. त्यात राज्यांच्या दरबाराचे चित्र नसून गावगाड्याचे, पाटलाचे, पाटलाच्या सुनेचे म्हणजेच महाराष्ट्राच्या साध्या ग्रामीण जीवनाचे चित्र पाहायला मिळते. लिलावती ही अद्भूतरम्य कथा हाल राजाबद्दल आहे. त्यातही महाराष्ट्राचा प्राण जे प्रतिष्ठान नगर व तेथील गोला उर्फ गोदावरी नदी व तीत नाहणाऱ्या, अंगाला हळद फासणाऱ्या महाराष्ट्र सुंदरीचे वर्णन आढळते. हा कवी आपल्या भाषेला 'मरहठ्ठ देसी भाषा' असे नाव देतो. 

दुर्गा भागवतांनी राजारामशास्त्री भागवतांच्या संशोधनाचा निष्कर्ष सांगताना म्हटले आहे, की जुनी माहाराष्ट्री संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखवले आहे. 

महाराष्ट्री भाषा ही किमान अडीच हजार वर्षे जुनी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. 

मराठीसाठी प्राध्यापक झटत नाहीत


मराठीसाठी प्राध्यापक झटत नाहीत - नरके
-
Saturday, June 30, 2012 AT 03:15 AM (IST)

पुणे - 'निश्‍चित नोकरी आणि मजबूत पगार असल्यामुळे शिक्षक-प्राध्यापक मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झटत नाहीत, याचा मला शिक्षक म्हणून खेद वाटतो. अनेक भाषा लोप पावत आहेत. मराठी शाळा बंद पडत आहेत. अशा स्थितीत मराठीला सक्षम करण्यासाठी आपण जागे व्हायलाच हवे,'' असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. हरी नरके यांनी गुरुवारी येथे केले.

शिक्षणतज्ज्ञ ग. ह. पाटील स्मृतिप्रीत्यर्थ साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे "अभिजात मराठी भाषा' या विषयावर नरके यांचे व्याख्यान झाले. या वेळी मंडळाच्या कार्यकारी विश्‍वस्त डॉ. मंदा खांडगे, अध्यक्ष डॉ. ज्योत्स्ना आफळे उपस्थित होते.

नरके म्हणाले, 'मराठी श्रेष्ठ दर्जाची भाषा आहे. जे नाही म्हणतात, त्यांचे मत विचारात घेतले जाऊ नये. मराठी ही जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी भाषा आहे. तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक-प्राध्यापकांनी स्वत:हून पुढाकार घ्यायला हवा. पण, विनंती करूनही ते पुढे येत नाहीत. मराठीसाठी विधायक वातावरण निर्माण व्हावे. मराठीला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी आता सर्वांनी एकत्र प्रयत्न करायला हवेत.''

मराठीच्या अस्तित्वासाठी गतिमान व्हा


मराठीच्या अस्तित्वासाठी गतिमान व्हा
- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, July 03, 2012 AT 12:30 AM (IST)
Tags: marathi,   pune
पुणे - मराठी भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, तसेच भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी शिक्षक-प्राध्यापकांनी उदासीनता टाळून मराठीच्या अस्तित्वासाठी गतिमान व्हायला हवे, अशा प्रतिक्रिया साहित्य क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.

निश्‍चित नोकरी आणि मजबूत पगार असल्याने शिक्षक-प्राध्यापक मराठीच्या अस्तित्वासाठी झटत नाहीत, अशी खंत साहित्यिक हरी नरके यांनी ग. ह. पाटील स्मृत्यर्थ आयोजित समारंभात व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर समीक्षक डॉ. शंकर सारडा म्हणाले, ""शिक्षक-प्राध्यापक प्रयत्नशील नाहीत, यात खरोखरीच तथ्य आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावणे, नव्या साहित्याकडे आकृष्ट करणे ही शिक्षक-प्राध्यापकांची कामे आहेत; पण याचा विसर पडत चालला आहे. समीक्षात्मक अभ्यास करून त्यावर भाष्य करणारे, मराठीसाठी मनापासून झटणारे रा. श्री. जोग, पु. ग. सहस्रबुद्धे, व. दि. कुलकर्णी, वा. ल. कुलकर्णी असे शिक्षक-प्राध्यापक हल्ली दिसत नाहीत.''

साहित्यिक ह. मो. मराठे म्हणाले, ""आपल्या विषयात तरबेज, कुशल असलेल्यांनाच शिक्षक-प्राध्यापक म्हणून घेतले जायला हवे; पण तसे होत नाही, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पूर्वी मराठी शिकवणे "चॅलेंज' वाटायचे. ते "चॅलेंज' राहिलेले नाही. आपला विषय विद्यार्थ्यांच्या मनात उतरवणे, हे एक कौशल्य आहे. या गोष्टी प्रथम आत्मसात केल्या जाव्यात.''

नाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे म्हणाले, ""मराठी भाषा शिकवणाऱ्यांनी आपला विषय पुढे नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला हवा; पण "नोकरीसाठी नोकरी' करणारे शिक्षक-प्राध्यापक आपल्याकडे मोठ्या संख्येने आहेत, हे चित्र बदलायला हवे. त्यांनी उदासीनता टाळून अधिक गतिमान व्हायला हवे. मराठीच्या अस्तित्वासाठी नागरिकांचाही सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे.''

प्रा. विलास वाघ म्हणाले, ""मराठी भाषेला ऊर्जितावस्था मिळावी, यासाठी शिक्षक-प्राध्यापकांसमोर सध्या कोणताही कार्यक्रम नाही. ते आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतात, बंद पाळतात, संप करून आग्रहीपणाने भूमिका मांडतात; पण मराठीसाठी ते रस्त्यावर उतरले, असे चित्र अद्याप आपल्याला पाहायला मिळाले नाही.''

... याचाही विचार करावा 
""या प्रश्‍नाबाबत केवळ शिक्षक-प्राध्यापकांना दोष देऊन चालणार नाही. शिक्षणव्यवस्था निर्माण करणाऱ्यांचा तो दोष आहे. त्यांनी या प्रश्‍नाकडे गंभीरपणे पाहायला हवे. मातृभाषेला डावलणे, भरमसाट इंग्रजी शाळांना परवानगी देणे... अशा सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांपुढे मराठीचे अस्तित्व शिक्षक-प्राध्यापकांनी कसे टिकवायचे? याचाही विचार केला जावा,'' असे साहित्यिक रामनाथ चव्हाण यांनी सांगितले.

होय, खरोखरच प्राध्यापक प्रयत्नशील नाहीत... -


होय, खरोखरच प्राध्यापक प्रयत्नशील नाहीत...
-
Sunday, July 01, 2012 AT 03:15 AM (IST)

पुणे - मराठी भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी खरोखरीच शिक्षक-प्राध्यापक प्रयत्नशील नाहीत. याबाबत आता अंतर्मुख होऊन विचार करायलाच हवा, अशा प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.

"निश्‍चित नोकरी व मजबूत पगार असल्याने शिक्षक-प्राध्यापक मराठीच्या अस्तित्वासाठी झटत नाहीत', अशी खंत साहित्यिक हरी नरके यांनी ग. ह. पाटील स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित समारंभात व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख मनोहर जाधव म्हणाले, ""मूठभर शिक्षक-प्राध्यापकांच्या बळावर मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवता येणार नाही. त्यासाठी प्राध्यापकांच्या सांघिक प्रयत्नांची आवश्‍यकता आहे. शिक्षक-प्राध्यापकांच्या संघटनांनीही हा विषय आपल्या अजेंड्यावर घ्यायला हवा. यामुळे या विषयाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होईल.''

आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख श्‍यामा घोणसे म्हणाल्या, ""मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी दुर्दैवाने प्राध्यापक मंडळी कमी पडत आहेत. "मला माझ्या विषयाशी बांधिलकी आहे,' ही भावना लोप पावत आहे. म्हणून या प्रश्‍नावर आता अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. या प्रश्‍नाची जबाबदारी केवळ शिक्षक-प्राध्यापकांनी नव्हे; तर आता समाजानेच उचलायला हवी.''

फर्ग्युसन महाविद्यालयातील मराठीच्या प्राध्यापिका रेखा देशपांडे म्हणाल्या, ""शालेय स्तरावर मुलांचा मराठी विषय पक्का करून घेणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे; पण मुले महाविद्यालयात आल्यानंतर त्यांची शालेय स्तरावरील मराठी पक्की नसल्याचे आम्हाला अनेकदा दिसून येते. हा विषयही विचारात घेतला जावा.''

माजी शिक्षक दीनानाथ गोरे म्हणाले, ""मराठीसाठी हल्लीचे शिक्षक-प्राध्यापक प्रयत्न करीत नाहीत, या मताशी मीही सहमत आहे. मुलांवर इंग्रजी माध्यमाचे शिक्षण लादले जात आहे. इच्छा असूनही त्यांना मराठीतून शिकता येत नाही, अशी सद्यःस्थिती आहे.'' अहिल्यादेवी हायस्कूलच्या मराठीच्या शिक्षिका सविता दाणी म्हणाल्या, ""मराठीसाठी तळमळीने कार्य करणारे, व्यासंग असलेले, कष्ट करून स्वत:ला विकसित करणारे शिक्षक आहेत; पण अशा शिक्षकांचे प्रमाण कमी आहे. आपल्याकडे "मुलांनो, तुम्हीच वाचा धडा' म्हणणारेही शिक्षक आहेत. ते आपली जबाबदारी का झटकत आहेत, याचा शोध घ्यायला हवा.''

Monday, July 2, 2012

गांधींनंतरचा सर्वश्रेष्ट भारतीय कोण?



जागतिकीकरणाच्या आजच्या लाटेत "स्पर्धाच स्पर्धा चोहीकडे" असे वातावरण आहे.थातुरमातुर स्पर्धा आयोजित करायच्या.लोकांना एसएमएस करायला लावायचे आणि त्यातुन मजबूत कमाई करायची असा हा सापळा असतो. काही वाहीन्या आणि प्रिंटमिडीयातील मंडळींनी अलिकडॆच या लाटेत हात धुवुन घेण्याच्या उद्देशाने अशीच एक स्पर्धा घोषित केलेली आहे.महात्मा गांधींनंतरचा सर्वश्रेष्ट भारतीय कोण? हे ठरविण्यासाठीची ही मेरेथोन स्पर्धा आहे.  २६ सदस्यीय ज्युरींनी १०० नामांकनांमधुन ५० नावे निवडलेली आहेत. २५ जुनपर्यन्त वाचक आणि प्रेक्षकांनी केलेल्या मतदानातुन तसेच आजपासुन ३१ जुलैपर्यंत घेतल्या जाणा-या देशव्यापी "ओपिनियन पोल"मधुन १०जणांची नावे निवडली जातील. १५ ओगस्टला त्यातुन एका सर्वश्रेष्ट भारतीयाचे नाव घोषित केले जाईल.
या ५०जणांमध्ये डा.बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरु, सरदार पटेल, जयप्रकाश नारायण, डा.राममनोहर लोहिया,राजगोपालाचारी,विनोबा भावे,कांशीराम,इंदिरा गांधी यांच्यासह नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन आणि मदर तेरेसा यांचाही समावेश आहे.या यादीत उद्योगपती जे.आर.डी.टाटा, शास्त्रद्न्य डा.होमी भाभा,विक्रम साराभाई, ओस्कर पुरस्कार विजेते दिग्दर्शक सत्यजित रे आणि ओलेंपिकमध्ये भारताला होकीची असंख्य सुवर्णपदके मिळवुन देणारे मेजर ध्यानचंद यांचीही नावे आहेत.
चित्रपट,संगित, नाटक,क्रिडा,उद्योग अश्या ग्लेमर असणा-या  आणि माध्यमप्रिय क्षेत्रातील किती लोक या यादीत असावेत? ६० टक्के! रजनीकांत,देव आनंद, दिलीप कुमार, किशोर कुमार, राजकपुर, मिल्खासिंग, कपिल देव, गावस्कर, सचिन तेंडुलकर, विश्वनाथन आनंद, अमिताभ बच्चन, ए.आर.रहमान, लता मंगेशकर आदिंची बाजारातील केवळ लोकप्रियता बघुनच त्यांना या यादीत घातले असावे हे स्पष्टच आहे.या मालिकेतील निम्मे लोक आज हयात असुन त्यांच्या कामाचे मुल्यमापन आत्ता लगेच करण्याची एव्हढी काय घाई होती तेच समजत नाही.बाबासाहेब, नेहरु, पटेल यांच्यासारख्या राष्ट्र्नेत्यांसोबत या हयात मंडळीची  तुलना करणे पोरकटपणाचे आहे.कोणत्याही स्पर्धेत एक संकेत पाळला जातो.स्वत: आयोजकाने किंवा त्यांच्या कुटुंबियांनी त्यात भाग घेवु नये.पण या स्पर्धेच्या आयोजकांपैकी असणा-या  एका मोबाईल कंपनीचे मालकही या यादीत आहेत.संयोजकच स्वत: स्पर्धक असण्याची ही जगातील एकमेव स्पर्धा असावी.
या स्पर्धेवर माझे प्रामुख्याने २ आक्षेप आहेत.{१}पहिले सर्वश्रेष्ट भारतीय म्हणुन महात्मा गांधी यांची निवड कोणी,कधी आणि कोणत्या निकषांच्या आधारे केली हे जाहीर करण्यात आलेले नाही. {२}जाती,धर्म,प्रदेश,भाषा, लिंगभाव,वर्ग,वर्ण आदि भेदांचे माहेरघर असणा-या या देशातील लोकव्यवहार आणि लोकमत घडविण्याची यंत्रणा यांचे भान ठेवण्यात आलेले नाही.
या यादीत अवघ्या सहा महिलांना स्थान देण्यात आलेले आहे.या यादीतील सुमारे ६५%लोक हे भारतीय वर्णव्यवस्थेने ज्या ३ वर्णांना{ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य} "द्विज" मानले त्यातील ६५% आहेत.मुस्लीम समाजातील जातीव्यवस्था सच्चर आणि मिश्रा आयोगांनी अधोरेखित केलेली आहे.त्यामुळे धर्मांतरित द्विजांचा विचार केला तर ही संख्या ८०% वर जाते. भटके-विमुक्त आणि आदिवासींना या यादीतुन बहिष्कॄत करण्यात आलेले आहे.इतर मागास वर्ग आणि अनुसुचित जाती यांचे  प्रतिनिधित्त्व दाखविण्यापुरतेच आहे.
महात्मा गांधी हे एक महान नेते होते यात वादच नाही.देशाच्या स्वातं-यासाठी त्यांनी दिलेले योगदान अभुतपुर्व होते.असे असुनही एक खेदजनक अनुभव आपल्यासमोर मांडला पाहिजे. त्यांच्या साहित्याचे १०० खंड भारत सरकारने प्रकाशित केलेले आहेत.त्यांचा मराठी अनुवाद करण्याचा प्रकल्प महाराष्ट्र सरकारने हाती घेतला होता. ४० खंड प्रकाशित करुन तो बंद करण्यात आला.कारण त्या ग्रंथांची किंमत नाममात्र ठेवुनही त्याला ग्राहकच मिळेना.सरकारने  हे संच शाळा,महाविद्यालये, विद्यापिठे यांना मोफत देण्याची योजना आखली परंतु प्रतिसाद शुन्य.आजही हे खंड निर्मितीखर्चाच्या फक्त एक टक्का भावातही  घ्यायला कोणी तयार नाही. त्यामुळे सरकारची मोठी पंचायत झालेली आहे.ही पुस्तके रद्दीत घालता येत नाहीत आणि गोडावून्स अडकुन पडलेली आहेत.
कविवर्य कुसुमाग्रजांची एक गाजलेली कविता आहे.शिवराय,फुले,बाबासाहेब,टिळक,गांधीजी यांचे पुतळे एकदा गप्पा मारत बसलेले असतात.सर्वांच्या व्यथा ऎकुन गांधीजी म्हणतात,"तुमचे तसे बरे आहे,तुमच्यामागे एकेक जात, किमान पोटजात तरी आहे.माझ्यामागे आहेत केवळ सरकारी कार्यालयांच्या भिंती." गेला महिनाभर आपण एक वाद झडताना बघत आहोत. गांधीवादी,सत्याग्रही म्हनवुन मिरवणारे काहीजण गांधीभवनाची मालकी कोणाची यावरुन एकमेकांच्या झिंज्या उपटित आहेत.
मध्यंतरी राजकुमार हिरानी यांनी "गांधीगिरी" चित्रित करणारा मुन्नाभाई पडद्यावर आणला तो सुपरहिट झाला.
डा.बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींवर अनेकदा प्रखर टिका केलेली आहे."गांधी आणि कांग्रेसने अस्प्रृश्यांचे काय केले?" रानडे,गांधी आणि जिना आदी ग्रंथांत याचे अनेक पुरावे मिळतात."अस्पृशता नष्ट व्हावी म्हणुन गांधीजी प्रयत्न करीत आहेत हे मी कधीच नाकारलेले नाही परंतु ते मुर्खांच्या साम्राज्यात विहार करणा-या तत्वद्न्यान्यापैकी एक योगभ्रष्ट विभुती दिसतात.महात्मा हे एखाद्या वावटळीसारखे असतात, त्यांच्यामुळे धुळ तेव्हढी उडते, समाजाचा स्तर मात्र उंचावत नाही".अश्या कडवट शब्दांत बाबासाहेबांनी हल्ला केलेला आहे.जातीव्यवस्थेच्या प्रश्नांच्या संदर्भात ते दोघे परस्परविरोधी छावणीत राहुनही एकमेकांमुळे विकसित होत गेले असे मानणारा अभ्यासकांचा एक वर्ग आहे.
बाबासाहेबांनी प्रतिकुल परिस्थितीतुन येवुन अपार कष्टाने जी असामान्य उंची गाठली ती बघता, "मेकर्स ओफ युनिव्हर्स" च्या मालिकेत संपुर्ण जगातील गेल्या दहा हजार वर्षातील निवडक १०० महापुरुषांमध्ये त्यांना स्थान देण्यात आलेले आहे.त्यात बुद्ध,महावीर आणि अशोक हे अग्रभागी आहेत.मात्र या मालिकेत गांधीजींना स्थान देण्यात आलेले नाही.
बाबासाहेबांना मत द्या,असे सांगणारे बरेच एसएमएस मला आले.दुसरीकडे स्पर्धेत अजिबात भाग घेवु नका असेही सांगणारे काही निघाले.चळवळीतील लोकांचे फोननंबर मिळविण्याची संघाची ही खेळी आहे,सबब फोन करु नका असेही सांगणारे निघाले.
गांधीजींना परस्पर सर्वश्रेष्ट ठरवुन टाकायचे आणि आता त्यांच्यानंतर कोण ते सांगा असे विचारायचे हा रडीचा डाव नाही काय? बाबासाहेबांसमोर बाजारबुणगे वाटावेत अश्या काही अत्यंत सामान्य कुवतीच्या लोकांना या स्पर्धेत आणायचे हाही नविन प्रकारचा जातीवादच नाही काय? जातीग्रस्त मानसिकता असणारे भारतीय लोक बाबासाहेबांचे मोठेपण कबुल करण्याची दानत आतातरी दाखवतील काय?असे काही प्रश्न आहेत. जनता,ज्युरी आणि बाजार काय करतो ते १५ आगस्टला कळेलच.
ज्या भारतीय मतदारांनी १९५२ आणि १९५४ च्या लोकसभा निवडणुकीत "राज्यघटनेच्या या जनकाला" पराभुत केले होते त्यांना आपली चुक दुरुस्त करण्याची ही संधी आहे.ते आपली चुक दुरुस्त करतील काय?
.....................................................................................................................................................................
{टिप:पहिल्या फेरीचे निकाल हाती आले असुन प्रथम क्रमांकाची मते डा.बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेली आहेत.उरलेल्या ९ जणांमध्ये पं.नेहरु,इंदिरा गांधी,मदर तेरेसा,सचिन तेंडुलकर,वल्लभभाई पटेल,जे.आर.डी.टाटा,अटलबिहारी वाजपेयी,अब्दुल कलाम,लता मंगेशकर असा क्रम आहे.}





धार्मिक राजकारणाला "सर्वोच्च' चपराक


हरी नरके
Monday, July 02, 2012 AT 04:15 AM (IST)
धार्मिक व्होट बॅंकेवर डोळा ठेवून घेण्यात आलेला निर्णय न्यायालयाने रद्दबातल ठरविला; परंतु या संकुचित राजकारणामागची मानसिकता आणि परिणाम यांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. 

ओबीसी आरक्षणात धार्मिक आधारावर 4.5 टक्के सबकोटा देण्याच्या केंद्र सरकारच्या धार्मिक राजकारणाला सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिली, हे बरेच झाले. परंतु या निमित्ताने निर्णयामागच्या मानसिकतेची चिकित्सा आवश्‍यक आहे. अल्पसंख्याकांसाठी वेगळे आरक्षण म्हणजे एक प्रकारे धार्मिक आधारावर आरक्षण देणेच होय, असे न्यायालयाने म्हटले. त्यावर केंद्रातर्फे हे आरक्षण मंडल आयोगाच्या आधारावर असल्याचे सांगितले गेले; तथापि न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला. सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढताना म्हटले आहे, की 1) कोट्यात बकोटा देणे कोणत्याच कायद्यात बसत नाही. 2) आरक्षणाचे धार्मिक गटात विभाजन करणे चुकीचे आहे. 3) सर्वसाधारण ओबीसी आणि उपकोटा श्रेणीत अल्पसंख्याक विद्यार्थी निवडीचे कोणते निकष लावले? 4) सबकोटा मंजुरीसाठी घटनात्मक आणि कायदेशीर पाठिंबा होता काय? 5) कार्यालयीन टिपण तयार करून असा निर्णय घेता येऊ शकतो काय? 6) साडेचार हा आकडा कशाच्या आधारावर काढण्यात आला?

सरकारने निर्णय घोषित केला तेव्हाच तो टिकणार नाही, असे सर्व घटनातज्ज्ञांनी सांगितले होते. तरीही मुस्लिमांची दिशाभूल करण्यासाठीच तो घेण्यात आला होता. खऱ्या विकासाऐवजी विकासाचे केवळ नाटक करण्यावर राजकीय पक्षांची सगळी मदार असते. लोकांच्या मूलभूत प्रश्‍नांना हात घालण्याचे काम गुंतागुंतीचे, मेहनतीचे, दीर्घ पल्ल्याचे असते; पण राजमार्गाने जाण्याऐवजी शॉर्टकट शोधले जातात.लोकशिक्षणापेक्षा लांगुलचालनाचा मार्ग वापरला जातो. मुस्लिम समाजातील काही घटक सामाजिक, शैक्षणिक,आर्थिकदृष्ट्या मागे पडलेले आहेत, हे खरेच आहे. तथापि त्यावरील ठोस उपाययोजना घटनात्मक मार्गातूनच शोधल्या पाहिजेत. मुस्लिम समाजातही जातिव्यवस्था आहे. ती झाकून ठेवून मागासवर्गीय मुस्लिमांची परिस्थिती सुधारणार नाही.

1901 च्या जनगणना अहवालाने मुस्लिमांतील जातिव्यवस्था उघड केली. 1. अश्रफ (उच्चकुलीन), 2. अजलफ (शूद्र) आणि 3. अरजल (अतिशूद्र) हे जातिगट आहेत. परकी आक्रमक सय्यद, शेख, मोगल, पठाण हे आणि हिंदू धर्मातील "द्विज' (ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्‍य) यामधून मुसलमान झालेले स्वत:ला अश्रफ मानतात. कॉंग्रेसच्या मुस्लिम नेत्यांमधील बहुतेक सर्व मंत्री आणि नेते अश्रफ आहेत. त्यांना आरक्षण नाही. त्यांना ते देता यावे आणि मुस्लिम व्होटबॅंक हातातून जाऊ नये, या डावपेचांचा भाग म्हणून हे धार्मिक कोट्याचे पाऊल उचलले गेले होते. अश्रफ हे अजलफ व अरजलशी विवाह संबंध करीत नाहीत. भारतीय संविधानाच्या कलम 15, 16 आणि 340 अन्वये मुस्लिमांतील अजलफ आणि अरजल जातिगटांना "सामाजिक' व "शैक्षणिक' मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण देण्यात आले आहे. त्याचा आधार धार्मिक नाही. मंडल आयोगाने 84 मुस्लिम मागास जातींचा समावेश ओबीसींमध्ये आधीच केलेला आहे. महाराष्ट्रात आज अन्सारी, हजाम, दर्जी, बागवान, तांबोळी, अत्तार, कुरेशी, मण्यार, शिकलगार, फकीर, मुजावर अशा 24 जातींना ओबीसी आरक्षणाचे लाभ मिळत आहेत. त्यामुळे त्यांची ओबीसीचा घटक अशी सामाजिक ओळख निर्माण होत आहे. मुस्लिमांत जाती नाहीतच असा कांगावा करून उच्चवर्णीय (अश्रफ) नेतृत्व लादले गेले आहे. ते बळकट व्हावे व सर्वच मुस्लिमांना आरक्षण देता यावे, याची ही सुरवात होती.
"शहाबानो' प्रकरणाची पुनरावृती आता केली जाईल. कदाचित घटनादुरुस्ती करून धार्मिक आधारावर मुस्लिमांना आरक्षण दिलेही जाईल. एकदा हिंदू-मुस्लिम भांडण सुरू झाले की देशातील सगळे मूलभूत प्रश्‍न बाजूला फेकले जातात. "द्वेषाचे' राजकारण सुरू होते. आज मुस्लिमांना 27 टक्के ओबीसी आरक्षण असताना त्यातील फक्त 4.5 टक्के वेगळे दिल्याने त्यांचा फायदा होईल की तोटा? हा 4.5 टक्के आकडा आणला कोठून? मंडल आयोगाने ओबीसी समाजाची लोकसंख्या मोजताना त्यात हिंदू 44 टक्के आणि मुस्लिम, ख्रिश्‍चन इत्यादींमधील 8 टक्के लोकसंख्या धरली आहे. मंडलने बनविलेल्या एकूण 3743 जातींपैकी अवघ्या 1963 जातींना, ज्या मंडल अहवाल आणि राज्य सरकारच्या याद्यांमध्ये "समान' होत्या, तेवढ्यांनाच मान्यता दिली आहे. जनगणनेत ओबीसी मुस्लिम (अजलफ, अरजल) वेगळे मोजले गेलेले नसल्याने त्यांची संख्या माहीत नाही. सरकारची काल्पनिक आकडेवारी न्यायालयाने नाकारली. मुस्लिमांच्या वाट्याला आरक्षण कमी आल्याची ओरड फसवी आहे. मंडलनुसार 52 टक्के ओबीसींना अवघे 27 टक्के आरक्षण देण्यात आले. त्यातील 22.5 टक्के जागा आजवर रिक्त आहेत. मिळाले अवघे 4.5 टक्के. भारत सरकारचे देशभरात वर्ग 1 ते 4 मध्ये एकूण 30 लाख 58 हजार 506 नोकर आहेत. 27 टक्‍क्‍यांप्रमाणे त्यात 8 लाख 25 हजार 796 ओबीसी असणे गरजेचे होते. मात्र अवघे 1 लाख 38 हजार 680 आहेत. म्हणजे फक्त 4.53 टक्के पदे भरली गेलीत. हा बॅकलॉग न भरता मलमपट्टी म्हणून मुस्लिमांना वेगळे आरक्षण दिल्याने प्रश्‍न कसा सुटणार? त्यातून ओबीसींचा टक्का मात्र अवश्‍य कमी होईल. राष्ट्रपती, पंतप्रधान, निवडणूक आयुक्त यांच्या कार्यालयांत आणि 8 मंत्रालये व 9 विभाग अशा 20 सर्वोच्च ठिकाणी 8,274 महत्त्वपूर्ण पदांवर किमान 2 हजार 234 ओबीसी भरले जाणे अपेक्षित होते. मात्र त्यातील 18 ठिकाणी ओबीसी "शून्य' असून दोन ठिकाणी प्रत्येकी एक ओबीसी आहे, असे भारत सरकारच्या अहवालात नमूद केलेले आहे. ही आहे सरकारी "आस्था'. 98 टक्के भूमिहीन, बेघर, दारिद्य्ररेषेखालील जीवन जगणाऱ्या भटक्‍या विमुक्तांच्या "रेणके आयोग' अहवालावर गेल्या 4 वर्षात शून्य कार्यवाही करणारे हेच सरकार मिश्रा कमिशनच्या अहवालाचे घोडे मात्र पुढे दामटते आहे, यामागे धार्मिक व्होटबॅंकेचे राजकारण आहे. मिश्रा आयोगाला सरकारने दिलेल्या कार्यकक्षेतील "आर्थिक' मागासलेपणाचा मुद्दा घटनाबाह्य होता.

80 वर्षांनी देशात प्रथमच जातवार जनगणना चालू आहे. तिच्यामुळे ओबीसी विकासाला गती मिळणार आहे. त्यांचे सामर्थ्य वाढेल. ते आधीच खच्ची करण्यासाठीच ही दुहीची बीजे पेरण्यात येत आहेत. देशाला आज मागास मुस्लिम जातींच्या सर्वांगीण विकासाची ब्लूप्रिंट हवी आहे; धार्मिक खेळी नव्हे. ओबीसींची ही फाळणी देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेऊ शकते.
(लेखक म. फुले अध्यासनात प्राध्यापक आहेत.) 
प्रतिक्रिया