Monday, July 2, 2012

धार्मिक राजकारणाला "सर्वोच्च' चपराक


हरी नरके
Monday, July 02, 2012 AT 04:15 AM (IST)
धार्मिक व्होट बॅंकेवर डोळा ठेवून घेण्यात आलेला निर्णय न्यायालयाने रद्दबातल ठरविला; परंतु या संकुचित राजकारणामागची मानसिकता आणि परिणाम यांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. 

ओबीसी आरक्षणात धार्मिक आधारावर 4.5 टक्के सबकोटा देण्याच्या केंद्र सरकारच्या धार्मिक राजकारणाला सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिली, हे बरेच झाले. परंतु या निमित्ताने निर्णयामागच्या मानसिकतेची चिकित्सा आवश्‍यक आहे. अल्पसंख्याकांसाठी वेगळे आरक्षण म्हणजे एक प्रकारे धार्मिक आधारावर आरक्षण देणेच होय, असे न्यायालयाने म्हटले. त्यावर केंद्रातर्फे हे आरक्षण मंडल आयोगाच्या आधारावर असल्याचे सांगितले गेले; तथापि न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला. सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढताना म्हटले आहे, की 1) कोट्यात बकोटा देणे कोणत्याच कायद्यात बसत नाही. 2) आरक्षणाचे धार्मिक गटात विभाजन करणे चुकीचे आहे. 3) सर्वसाधारण ओबीसी आणि उपकोटा श्रेणीत अल्पसंख्याक विद्यार्थी निवडीचे कोणते निकष लावले? 4) सबकोटा मंजुरीसाठी घटनात्मक आणि कायदेशीर पाठिंबा होता काय? 5) कार्यालयीन टिपण तयार करून असा निर्णय घेता येऊ शकतो काय? 6) साडेचार हा आकडा कशाच्या आधारावर काढण्यात आला?

सरकारने निर्णय घोषित केला तेव्हाच तो टिकणार नाही, असे सर्व घटनातज्ज्ञांनी सांगितले होते. तरीही मुस्लिमांची दिशाभूल करण्यासाठीच तो घेण्यात आला होता. खऱ्या विकासाऐवजी विकासाचे केवळ नाटक करण्यावर राजकीय पक्षांची सगळी मदार असते. लोकांच्या मूलभूत प्रश्‍नांना हात घालण्याचे काम गुंतागुंतीचे, मेहनतीचे, दीर्घ पल्ल्याचे असते; पण राजमार्गाने जाण्याऐवजी शॉर्टकट शोधले जातात.लोकशिक्षणापेक्षा लांगुलचालनाचा मार्ग वापरला जातो. मुस्लिम समाजातील काही घटक सामाजिक, शैक्षणिक,आर्थिकदृष्ट्या मागे पडलेले आहेत, हे खरेच आहे. तथापि त्यावरील ठोस उपाययोजना घटनात्मक मार्गातूनच शोधल्या पाहिजेत. मुस्लिम समाजातही जातिव्यवस्था आहे. ती झाकून ठेवून मागासवर्गीय मुस्लिमांची परिस्थिती सुधारणार नाही.

1901 च्या जनगणना अहवालाने मुस्लिमांतील जातिव्यवस्था उघड केली. 1. अश्रफ (उच्चकुलीन), 2. अजलफ (शूद्र) आणि 3. अरजल (अतिशूद्र) हे जातिगट आहेत. परकी आक्रमक सय्यद, शेख, मोगल, पठाण हे आणि हिंदू धर्मातील "द्विज' (ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्‍य) यामधून मुसलमान झालेले स्वत:ला अश्रफ मानतात. कॉंग्रेसच्या मुस्लिम नेत्यांमधील बहुतेक सर्व मंत्री आणि नेते अश्रफ आहेत. त्यांना आरक्षण नाही. त्यांना ते देता यावे आणि मुस्लिम व्होटबॅंक हातातून जाऊ नये, या डावपेचांचा भाग म्हणून हे धार्मिक कोट्याचे पाऊल उचलले गेले होते. अश्रफ हे अजलफ व अरजलशी विवाह संबंध करीत नाहीत. भारतीय संविधानाच्या कलम 15, 16 आणि 340 अन्वये मुस्लिमांतील अजलफ आणि अरजल जातिगटांना "सामाजिक' व "शैक्षणिक' मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण देण्यात आले आहे. त्याचा आधार धार्मिक नाही. मंडल आयोगाने 84 मुस्लिम मागास जातींचा समावेश ओबीसींमध्ये आधीच केलेला आहे. महाराष्ट्रात आज अन्सारी, हजाम, दर्जी, बागवान, तांबोळी, अत्तार, कुरेशी, मण्यार, शिकलगार, फकीर, मुजावर अशा 24 जातींना ओबीसी आरक्षणाचे लाभ मिळत आहेत. त्यामुळे त्यांची ओबीसीचा घटक अशी सामाजिक ओळख निर्माण होत आहे. मुस्लिमांत जाती नाहीतच असा कांगावा करून उच्चवर्णीय (अश्रफ) नेतृत्व लादले गेले आहे. ते बळकट व्हावे व सर्वच मुस्लिमांना आरक्षण देता यावे, याची ही सुरवात होती.
"शहाबानो' प्रकरणाची पुनरावृती आता केली जाईल. कदाचित घटनादुरुस्ती करून धार्मिक आधारावर मुस्लिमांना आरक्षण दिलेही जाईल. एकदा हिंदू-मुस्लिम भांडण सुरू झाले की देशातील सगळे मूलभूत प्रश्‍न बाजूला फेकले जातात. "द्वेषाचे' राजकारण सुरू होते. आज मुस्लिमांना 27 टक्के ओबीसी आरक्षण असताना त्यातील फक्त 4.5 टक्के वेगळे दिल्याने त्यांचा फायदा होईल की तोटा? हा 4.5 टक्के आकडा आणला कोठून? मंडल आयोगाने ओबीसी समाजाची लोकसंख्या मोजताना त्यात हिंदू 44 टक्के आणि मुस्लिम, ख्रिश्‍चन इत्यादींमधील 8 टक्के लोकसंख्या धरली आहे. मंडलने बनविलेल्या एकूण 3743 जातींपैकी अवघ्या 1963 जातींना, ज्या मंडल अहवाल आणि राज्य सरकारच्या याद्यांमध्ये "समान' होत्या, तेवढ्यांनाच मान्यता दिली आहे. जनगणनेत ओबीसी मुस्लिम (अजलफ, अरजल) वेगळे मोजले गेलेले नसल्याने त्यांची संख्या माहीत नाही. सरकारची काल्पनिक आकडेवारी न्यायालयाने नाकारली. मुस्लिमांच्या वाट्याला आरक्षण कमी आल्याची ओरड फसवी आहे. मंडलनुसार 52 टक्के ओबीसींना अवघे 27 टक्के आरक्षण देण्यात आले. त्यातील 22.5 टक्के जागा आजवर रिक्त आहेत. मिळाले अवघे 4.5 टक्के. भारत सरकारचे देशभरात वर्ग 1 ते 4 मध्ये एकूण 30 लाख 58 हजार 506 नोकर आहेत. 27 टक्‍क्‍यांप्रमाणे त्यात 8 लाख 25 हजार 796 ओबीसी असणे गरजेचे होते. मात्र अवघे 1 लाख 38 हजार 680 आहेत. म्हणजे फक्त 4.53 टक्के पदे भरली गेलीत. हा बॅकलॉग न भरता मलमपट्टी म्हणून मुस्लिमांना वेगळे आरक्षण दिल्याने प्रश्‍न कसा सुटणार? त्यातून ओबीसींचा टक्का मात्र अवश्‍य कमी होईल. राष्ट्रपती, पंतप्रधान, निवडणूक आयुक्त यांच्या कार्यालयांत आणि 8 मंत्रालये व 9 विभाग अशा 20 सर्वोच्च ठिकाणी 8,274 महत्त्वपूर्ण पदांवर किमान 2 हजार 234 ओबीसी भरले जाणे अपेक्षित होते. मात्र त्यातील 18 ठिकाणी ओबीसी "शून्य' असून दोन ठिकाणी प्रत्येकी एक ओबीसी आहे, असे भारत सरकारच्या अहवालात नमूद केलेले आहे. ही आहे सरकारी "आस्था'. 98 टक्के भूमिहीन, बेघर, दारिद्य्ररेषेखालील जीवन जगणाऱ्या भटक्‍या विमुक्तांच्या "रेणके आयोग' अहवालावर गेल्या 4 वर्षात शून्य कार्यवाही करणारे हेच सरकार मिश्रा कमिशनच्या अहवालाचे घोडे मात्र पुढे दामटते आहे, यामागे धार्मिक व्होटबॅंकेचे राजकारण आहे. मिश्रा आयोगाला सरकारने दिलेल्या कार्यकक्षेतील "आर्थिक' मागासलेपणाचा मुद्दा घटनाबाह्य होता.

80 वर्षांनी देशात प्रथमच जातवार जनगणना चालू आहे. तिच्यामुळे ओबीसी विकासाला गती मिळणार आहे. त्यांचे सामर्थ्य वाढेल. ते आधीच खच्ची करण्यासाठीच ही दुहीची बीजे पेरण्यात येत आहेत. देशाला आज मागास मुस्लिम जातींच्या सर्वांगीण विकासाची ब्लूप्रिंट हवी आहे; धार्मिक खेळी नव्हे. ओबीसींची ही फाळणी देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेऊ शकते.
(लेखक म. फुले अध्यासनात प्राध्यापक आहेत.) 
प्रतिक्रिया

13 comments:

  1. दै.सकाळ,"धार्मिक राजकारणाला ’सर्वोच्च’ चपराक" या प्रा.हरी नरके {सकाळ,दि.२ जुलै}लेखावर एसएमएस द्वारे खालील प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.
    १.मुस्लीम आरक्षणासंदर्भात अत्यंत मार्गदर्शक लेख..प्रा.संजय गव्हाणे,औरंगाबाद
    २.चांगले विश्लेषक लेखन..अड.असीम सरोदे,पुणे
    ३. लेख वास्तवदर्शी आहे..दिलीप थोरात,पुणे
    ४.लेख आवडला.खरी परिस्थिती समोर मांडली आहे.ओबीसीच्या रिक्त जागा शासनाने त्वरित भरल्या पाहिजेत..आनंदा कुदळे,पिंपरी
    ५.जयभीम.सकाळ्मधील लेखाबद्दल अभिनंदन.प्रा.घोरपडे,फुले आंबेडकर विचारधारा,औरंगाबाद.
    ६.सकाळमधील लेख आवडला.छान आहे.आमच्या मासिकात छापु का?..विजय लडकत, संपा.माळी आवाज,पुणे
    ७.दै.सकाळ.पान.नं.४ वरिल"धार्मिक राजकारणाला सर्वोच्च चपराक हा अप्रतिम नी सत्याचा शोध घेणारा लेख वाचला.अभिमान वाटला..प्रा.अभिजीत पंडित,औरंगाबाद,
    ८.लेख समयोचित आहे.ओबीसी रिक्त जागांबाबतचा मुद्दा समर्पक आहे.ओबीसींचे प्रबोधन नितांत आवश्यक आहे,..शुद्धोधन आहेर,खारघर,मुम्बई
    ९.अतिशय सुन्दर लेख..संदिप जावले,मुंबई
    १०.अतिशय उत्तम विश्लेशण.विशेष आभार.मुस्लीमांनी चिंतन करावे असा लेख..अड.भास्कर्राव आव्हाढ,पुण्र
    ११.विचार सुस्पष्ट आणि दिशादर्शक आहेत..सुधीर दरोडे,बांधकाम व्यावसायिक,पुणे.
    १२.संपादकीय पानावरील मर्मभेदक लेख,अनिल,विद्यार्थी,पुणे विद्यापीठ,पुणे
    १३.सनसनीत चपराक,डा.सुनिल बारावकर,चौफुला,ता.दौंड,जि.पुणे
    १४.चांगला लेख,मुलनिवासींचे ध्रृवीकरण आणि ऊद्बोधन करणारा..रोकडे,बेंक आफ महाराष्ट्र,पुणे.
    १५.लेखाबद्दल अभिनंदन.जय जिजावु.जय सावित्री...द्न्यानेश्वर मोळक, उपायुक्त.पुणे मनपा,पुणे

    ReplyDelete
  2. Deepak Kedar:

    "Dear Sir, Aaapala Dainik Sakalacha Aajcha Lekh vachala aatishye Chikatsak budhine aapan he vichar mandalee... mi aaplye swagat karu eechito... Jay Bhim!! Aapala "... Deepak Kedar
    9 hours ago · like · 2

    Vaibhav Chhaya: "Khup Sundar"
    9 hours ago · like · 1

    Umesh Kudale: "Apratim vivechan..
    Kahi goshti itkya kholyt kadhi samjlya nastya..
    Stadtics tar farach dhakkadayak aahe..
    Thanx sir really thanx.."...{FROM:FACEBOOK}

    ReplyDelete
  3. On 03-07-2012 05:18 PM yogesh hulawale said:
    नरकेनी जी आकडेवारी दिली आहे ती दिशाभूल करणारी आहे खरेतर सरकारी जागांमध्ये OBC मोजताना फक्त १९९३ नन्तर ज्यांची OBC कोत्यांतर्गत नेमणूक झाली आहे त्यांनाच OBC धरले जाते, उलट १९९३ आधी नेमणूक झालेला OBC असला तरी त्याला OPEN मधेच धरले जाते म्हणजे जर १९९३ पूर्वीही नेमणूक झालेले OBC पकडले तर हा backlog ७० % कमी होईल.
    On 03/07/2012 03:35 PM aakash said:
    ओ बी सी लोकांनी बाकीच्यांचे काय नुकसान केले म्हणून त्यांचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना सरकार देत होते ओ बी सी लोकांशी हे सरकार असे का वागत आहे हा मोठा प्रश्नच पडला आहे
    On 03-07-2012 12:29 PM Saket Borgaonkar said:
    आरक्षण कशासाठी? या प्रश्नाचं उत्तर शोधलं तर "आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांना आधार देऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरिता मदत करण्यासाठी" हे पटण्यासारख वाटतं. मग जे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत त्यांना मदत करणे म्हणजे समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गावर अन्याय केल्यासारखा नाही का? यामुळे कोणता सामाजिक विकास घडणार आहे? त्याशिवाय आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण दिल्यास सर्वांना त्याचा फायदा होईल.
    On 03/07/2012 02:18 AM Kaka Saheb said:
    आरक्षणं शिवाय मागासलेल्या जनतेचा जीवनमान उंचावण्यासाठी दुसरे काही उपाय आहेत का? आहे ना. तुम्ही लोक सगळे अमेरिकेला पळा म्हणजे येथील लोकांचे जीवनमान आपोआपच सुधारेल.
    On 03/07/2012 01:12 AM Kiran Chauthe said:
    नरके साहेब तुमच्या लेखावरून असे कळते कि तुम्ही सरसकट सगळेच आरक्षण कसे अयोग्य आहे असे म्हणण्याची हिम्मत दाखवू शकत नाहीत परंतु OBC मधील थोडे कुणाबरोबर share करायचे म्हटले कि लगेच तुम्हाला सगळे "दाल मी कूच कला है|" असे का वाटते? मुळातच आरक्षण हे कसे चूक आहे हे माहिती असूनही केवळ समाज आपल्यावर नाराज होईत या भीतीतून बहुतेकवेळा तुम्ही तिकडे दुर्लक्ष करता. माफ करा मी पण OBC मधेच येतो परंतु मी गर्वाने सांगतो कि मला त्या कुबड्यांची गरज नाही घेतल्या नाहीत. मी माझा समर्थ आहे परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी.

    ReplyDelete
  4. On 03/07/2012 12:28 AM Rokhthok said:
    ५० वर्षे झाली तरी आरक्षण वाले वर येऊ शकले नाहीत तर आता आरक्षण वाढवून काय उपयोग होणार आहे? ... जातीवादी आरक्षणाऐवजी आर्थिक दुबळ्या लोकांना आरक्षण द्या.. ते जास्त महत्वाचे आहे. मला खूप लोक माहित आहेत हे आरक्षणामागे दोन दोन बंगले बांधून मजा करत आहेत आणि तरी आरक्षणाचा फायदा घेत आहेत...
    On 02/07/2012 11:21 PM sunil sangle said:
    OBC मध्ये मुस्लीम लोकांना फार पूर्वी पासून आरक्षण आहे हे मला माहित होता पण हे नवीन काय नाटक काढाल सरकार नि त्या मगच राजकारण काय हे ह्या लेखा मुले कळल. खरच छान लेख आहे.. जो पर्यंत भारतात जात पात मानली जाते. ब्राह्मण स्वताला श्रेष्ट समाजातील तो पर्यंत आरक्षण चालू राहणारच. आणि हो तुम्ही ब्राह्मणांनी हजारो वर्षे हरिजनाचा छळ केलात ना.. मग आता किमान १००-२०० वर्ष गप्प बसा....
    On 02/07/2012 10:11 PM Kishor Nashikkar said:
    स्वतःच्या जातीला आरक्षण मिळाले कि बर वाटत. दुसर्याला द्यायची वेळ आली कि अशी बोंबाबोंब सुरु होते. लेखकाविषयी पूर्वी बराच soft corner होता परंतु गेल्या काही दिवसांपासून मी बघतोय ते फक्त OBC सोडून सगळे कसे चुकीचे आहेत यावरच प्रकाश टाकतात परंतु स्वतःच्या घरातला नंगा नाच त्यांना नाही दिसत.
    On 02/07/2012 08:38 PM Vaibhav Deshpande said:
    ह्या सगळ्या खिचडी मध्ये नरके साहेब काही प्रश्नांची उत्तरे माझ्या सारख्या सामान्य माणसाला देतील काय? १. बाबासाहेब असा म्हणाले होते का कि आरक्षण फक्त १० वर्षांसाठी असावं? २. जर ते असा म्हणाले असतील तर आज ६० वर्षांनी सुधा आरक्षणाची जरूर का वाटावी? ३. जर आरक्षणाची जरूर अजून आहे तर आज पर्यंत काहीतरी चुकला आहे असा वाटता का? ४. जर आज पर्यंत काहीतरी चुकला आहे असा वाटत तर ते काय आणि कसा बरोबर करणार? ५. आरक्षणं शिवाय मागासलेल्या जनतेचा जीवनमान उंचावण्यासाठी दुसरे काही उपाय आहेत का?
    On 02/07/2012 08:32 PM satsangbaba said:
    ".ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्‍य लोक जसे संघटीत आहे " हा जोक आहे ब्राम्हण ब्राम्हण , क्षत्रिय क्षत्रिय सुद्धा संघटीत नाहीत - त्यातल्या त्यात वैश्‍य संघटीत आहेत . प्रश्न तो नाही आहे भारताला एका दृष्ट्या नेत्याची गरज आहे . जो मला वाटत आहे आता २०० वर्षांनी जन्माला येईल
    On 02/07/2012 08:03 PM Sandeep Tardalkar said:
    ओ.बी.सी. मग ते हिंदुतले असोत कि मुस्लीमान्तले, ते धर्माधतेत अडकलेले आहेत. या जाळ्यातून ते सुटले कि केवळ ओ.बी.सी.चेच नव्हे तर अख्या देशाचे सामाजिक-आर्थिक व राजकीय चित्र बदलून जाईल. म्हणूनच त्यांना धार्मिक जाळ्यात अडकवण्याचे सतत प्रयत्न चालू राहतात. हा त्यापैकीच एक प्रयत्न. नरके सरांसारखे विचारवंत ओ.बी.सी.मध्ये जागृती घडविण्याचे अखंडपणे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येवो.
    On 02/07/2012 07:32 PM Namita said:

    ReplyDelete
  5. On 02/07/2012 07:32 PM Namita said:
    नरकेनी जी आकडेवारी दिली आहे ती दिशाभूल करणारी आहे खरेतर सरकारी जागांमध्ये OBC मोजताना फक्त १९९३ नन्तर ज्यांची OBC कोत्यांतर्गत नेमणूक झाली आहे त्यांनाच OBC धरले जाते, उलट १९९३ आधी नेमणूक झालेला OBC असला तरी त्याला OPEN मधेच धरले जाते म्हणजे जर १९९३ पूर्वीही नेमणूक झालेले OBC पकडले तर हा backlog ७० % कमी होईल, शिवाय महत्वाच्या पदांवर नेमणूकी साठी आरक्षण कशाला तिथे तरी निदान गुणवत्तेला प्राधान्य देवूयात
    On 02/07/2012 07:01 PM dilip dongare said:
    जर ओबीसी कोट्यात मागास मुस्लीम जमाती आहेत , मग ४.५% आरक्षणात कोणासाठी होते ? मग निधर्मी भारत म्हणजे जाती जाती तेढ वाढविणे इतकाच राहतो
    On 02-07-2012 06:57 PM sushama said:
    हा आरक्षण प्रकारच राद्द्द केला पाहिजे. स्वातंत्र्याला ६० वर्ष झाली आरक्षण देऊन ५०च्या वर आपल्याला आजून मागास वर्गाला वर आणता येत नसेल तर आरक्षण देऊन उपयोग काय?ह्या करता बाकीच्या समाजाची आणि आणि मागास वर्गाची मानसिकताच बदलायला हवी .स्वताला मागास का म्हणवता?संपूर्ण शिक्षण पध्दतीच बदलली पाहिजे
    On 02/07/2012 05:13 PM Punekar said:
    अतिशय छान लेख आहे
    On 02/07/2012 04:17 PM sudhir said:
    ज्या ओ बी सी लोकांचे मते घेवून हे निवडून आले त्यांचेच नुकसान करायला निघाले आहेत येणाऱ्या निवडणुकीत याचे परिणाम नक्कीच दिसतील
    On 02-07-2012 12:34 PM BHAL PATANKAR said:
    श्री नरकेजीनी लिहिलेले लेखन संदर्भासाठी उपयोगी वाटते. निधर्मीत्वाचा दणका मारताना प्रत्यक्षात सोयीस्कर पणे धार्मिक कार्ड खेळण्याचा उद्योग सगळेच राजकारणी भावना भडकावण्यासाठी करतात हे उघड सत्य पण सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा ठणकावून सांगितल्याने आता शाहबानो प्रकरणासारखे पवित्र घेण्यासाठी व त्यास राष्ट्रपती पदाकडून मान्यता मिळवण्याचा पवित्रा आता खेळला जाणार ह्यासाठी काही ज्योतिषाची गरज नाही
    On 02/07/2012 11:39 AM Jayant said:
    योग्य लेख आहे हा ..सर्व ओबीसी लोकांनी आपसा आपसातील वाद मिटवून एकत्र एवून स्वतची हक्काची वोट बँक करणे काळाची गरज आहे .तरच 8 लाख 25 हजार 796 सरकारी नोकर्या मिळू शकतील ..ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्‍य लोक जसे संघटीत आहे तसे आपण सुद्धा संघटीत होवून समाजचा उत्कर्ष करणे गरजचे आहे .
    On 02/07/2012 11:36 AM Chetan said:
    उत्तम अवलोकन !! सरकार आता तरी जागे होईल अशी अपेक्षा...
    On 02-07-2012 10:00 AM Prashant said:
    A nice column. Very well written.. Looking forward to reading more like these in esakal.

    ReplyDelete
  6. केंद्राने धार्मिक अल्पसंख्याकांना दिलेल्या 4.5 टक्के ओबीसी सबकोट्याला सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या तांत्रिक मुद्‌द्‌यांचा आधार घेऊन हरी नरके यांनी विरोध केला आहे. (सकाळ - 3 जुलै). मुस्लिमांना सबकोटा दिला तर "ओबीसींची फाळणी देशाला दुसऱ्या फाळणीपर्यंत नेईल' असा टोकाचा इशाराही दिला आहे. मुस्लिमांना सत्ता आणि विकासापासून वंचित ठेवण्याचे पद्धतशीर राजकारण स्वातंत्र्यापासून सुरू आहे. मुस्लिमांना पाकिस्तान दिला, त्यामुळे या देशात मुस्लिमांना आता पुन्हा काही मिळणार नाही, ही मुळातली भूमिका आहे. नरके यांच्या लेखातही तिचे पडसाद जाणवतात. त्यांच्या काही
    मुद्‌द्‌यांचा हा परामर्ष.

    1) "ओबीसी कोट्यात सबकोटा देणे कोणत्याच कायद्यात बसत नाही.'
    बलिष्ठ जाती आपला वाटा पळवतील, अशी प्रत्येकाला भीती वाटते. म्हणून महाराष्ट्रात भटकेविमुक्तांना जातीनिहाय सबकोटा पुढीलप्रमाणे विभागून देण्यात आला आहे ः व्हीजे (ए) - 3.0 टक्के, एनटी (बी) - 2.5, एनटी (सी) - 3.5 आणि एनटी (डी) - 2.0 टक्के. पुढे एसबीसीसाठी 2 टक्के कोटा आहे. त्यामुळे सबकोटा देता येत नाही, हे खरे नाही.

    2) धर्माधारीत कोटा मंजुरीसाठी घटनात्मक आधार होता का?
    कर्नाटकात मुस्लिम म्हणून धार्मिक जाती-गटांना स्वतंत्र 4 टक्के सबकोटा गेल्या अनेक वर्षांपासून मिळतो. केरळमध्ये मुस्लिम ओबीसींना 12 टक्के स्वतंत्र कोटा आहे. लॅटिन कॅथॉलिकांना 4 टक्के, तर धर्मांतरित ख्रिश्‍चनांसाठी 1 टक्के कोटा आहे. बंगालमध्ये डाव्यांनी मुस्लिम ओबीसींना स्वतंत्र 10 टक्के कोटा दिला आहे. त्यामुळे केंद्राच्या निर्णयात नवीन आणि घटनाबाह्य असे काही नाही.1950 चा प्रसिडेन्शिअल ऍक्‍ट, अनुसूचित जातीसाठी मुळात केवळ हिंदू धर्मातील अस्पृश्‍यांपुरता मर्यादित होता. त्यानंतर धर्मांतरित शीख दलितांचा आणि नवबौद्धांचा समावेश झाला. त्यामुळे धर्माच्या आधारे आरक्षणाला घटनेत स्थान नाही, हेही खरे नाही.

    3) कार्यालयीन टिप्पणी तयार करून असा निर्णय घेता येऊ शकतो का?
    मंडल आयोगाच्या शिफारशींना अनुसरून ओबीसींना 19 टक्के कोटा देण्यासाठी, त्यानंतर मागासवर्गीयांना नोकरीसाठी वयामध्ये सवलत, शिक्षणासाठी गुणांमध्ये शिथिलता या गोष्टी मंत्रिमंडळाच्या निर्णयाने झाल्या. घटनेच्या चौकटीत बसणाऱ्या विषयासाठी मंत्रिमंडळ निर्णय घेण्यास सक्षम आहे. त्यामुळे कार्यालयीन टिप्पणीचा प्रश्‍न गैरलागू आहे.

    4) 4.5 हा आकडा कसा काढला?
    न्या. रंगनाथ मिश्रा आयोगाने घटनेतील कलम 16 (4) अंतर्गत सर्व धार्मिक अल्पसंख्याकांना 15 टक्के कोटा आणि त्यामध्ये मुस्लिमांना 10 सबकोटा देण्याची शिफारस केली आहे. काही अपरिहार्य कारणांनी सरकारला असा निर्णय घेणे शक्‍य न झाल्यास - मंडल आयोगानुसार धार्मिक अल्पसंख्याकांचा एकूण ओबीसीतील हिस्सा 8.4 टक्के आहे. त्याला अनुसरून ओबीसीच्या एकूण 19 टक्‍क्‍यांतून धार्मिक अल्पसंख्याकांना 8.4 टक्के ओबीसी कोटा आणि मुस्लिमांना त्यांपैकी 6 टक्के सबकोटा द्यावा, अशी शिफारस आहे. उलट केवळ 4.5 टक्के कोटा अन्यायकारक आहे, असे नरके यांना का जाणवले नाही?

    5) घटनादुरुस्ती करून मुस्लिमांना धार्मिक आधारावर आरक्षण दिले जाईल, यासंबंधी नरके यांनी व्यक्त केलेली भीती.
    पहिला घटनादुरुस्ती कायदा 1951 द्वारे घटनेत कलम 15 (4) समाविष्ट करण्यात आले. या घटनादुरुस्तीनेच सरकारला शैक्षणिक आणि सामाजिक मागास जातींच्या उन्नतीसाठी तरतूद करण्याचा अधिकार मिळाला. दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी घटनादुरुस्तीत गैर काय? महाराष्ट्रात मुस्लिमांचे सरकारी नोकरीतील प्रमाण अवघे 3.5 टक्के असून, लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना 65 हजार नोकऱ्या कमी आहेत. 19 टक्‍क्‍यांत मुस्लिम ओबीसीच घ्यावा, असे बंधन थोडेच आहे? हरी नरकेंनी मुस्लिमांच्या खऱ्या विकासाची भाषा, त्यांना सबकोटा नको हे सांगण्यापुरतीच वापरली आहे. मुस्लिमांची वंचितता आणि मागासलेपणाकडे डोळेझाक करून मुस्लिमांना सत्ता आणि विकासात वाटा नाकारण्याचा प्रयत्न देशहिताचा ठरणार नाही. असा वाटा देण्यातूनच धर्मनिरपेक्षता व लोकशाहीचा आदर होईल.
    - हुमायून मुरसल
    (या विषयावरील चर्चा थांबविण्यात येत आहे. - संपादक)sakal..10july 2012

    ReplyDelete
  7. "विकासात मुस्लीमांना वाटा देणेच देशहिताचे"ही श्री. हुमायुन मुरसल यांची प्रतिक्रिया वाचली.{सकाळ,दि.१० जुलै.}त्यांनी माझ्या "धार्मिक राजकारणाला सर्वोच्च चपराक"ह्या लेखावर प्रदीर्घ प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार.त्यांना माझा एकही मुद्द खोडता आलेला नाही.त्यांनी जुनी माहिती,गैरलागू आधार आणि गल्लत करणारी उदाहरणे देवुन तकलादु मांडणी केलेली आहे. मुसलमानातील जातीव्यवस्थेच्या बळींना सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर दिल्या गेलेल्या आरक्षणाचा मी समर्थक आहे.मात्र या आरक्षणाचा आधार धार्मिक असता कामा नये,हे संविधान व न्यायालयाचे मत मला पटते.धार्मिक आरक्षणामुळे मुस्लीमांच्या विकासाला गती मिळण्याऎवजी हिंदु-मुस्लीम झगडे उभे राहतील आणि विकासात गतीरोध निर्माण होईल असे माझे मत आहे.
    मुस्लीमांच्या मागासपणाचा आधार धार्मिक नाही. इस्लामला जातीव्यवस्था मान्य नसली तरी मुसलमानांमध्ये ती आहे.अश्रफ,अजलफ आणि अर्जल हे सगळे मुसलमानच असले तरी त्यांची सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्थिती मुळात फार विषम आहे. त्याचा परिपाक म्हणुन त्यांच्यात आर्थिक मागासलेपणा आलाय.
    {१}मुरसल यांनी दिलेले भटक्या विमुक्तांच्या सबकोट्याचे उदाहरण धार्मिक आधारावरील नसुन सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावरील असल्याने ते त्यांच्याच विरोधात जाते.शिवाय महाराष्ट्रात हा सबकोटा राज्याच्या स्थापनेपासुन असला तरी केंद्रीय पातळीवर तो नाही.तेथे विजाभज २७% ओबीसी आरक्षणातच येतात.{२}केरळ,कर्नाटक,बंगालमधील धार्मिक कोट्याला आजवर कोणी न्यायालयात आव्हान दिले नाही म्हणुन तो अस्तित्वात असला तरी त्याला घटनात्मक आधार नाही.एखादी गोष्ट केवळ वहीवाटीने घटनात्मक बनत नसते.घटनेत तशी तरतुद असावी लागते.{३}कार्यालयीन टिपणाबाबत आणि मंत्रीमंडळाच्या अधिकाराबाबतची मुरसल यांची माहिती जुनी आहे. १६ नोव्हे.१९९२ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाने इंद्र सहानी निकालपत्रात सरकारचे हे अधिकार मर्यादित केले आहेत.कायमस्वरुपी केंद्रीय व राज्य मागासवर्ग आयोगांच्या शिफारशीशिवाय सरकार असे निर्णय घेवु शकत नाही. केंद्र सरकारने आयोगांना का डावलले? असा जाब न्यायालयाने विचारला तो त्यामुळेच.{४}न्या.मिश्रा आयोगाला सरकारने दिलेली कार्यकक्षा घटनाबाह्य होती.त्यांना "आर्थिक" व "धार्मिक" आधारावर मागासलेपण शोधायला सांगितले होते. आर्थिक निकषाला घटनात्मक आधार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने इंद्र सहानी निकालपत्रात सांगितलेलेच आहे.त्यामुळे मिश्रा आयोगाचे उदाहरण गैरलागू ठरते.{५}पहिली घटनादुरुस्ती धार्मिक आधारावर झालेली नाही.मुरसल यांनी अशी गल्लत करण्याऎवजी घटना एकदा काळजीपुर्वक वाचावी....प्रा.हरी नरके

    ReplyDelete
  8. प्रतिक्रिया: FROM: ESAKAL:
    On 10/07/2012 07:35 AM moharir said:
    आरक्षण म्हणजेच विकासात वाटा आणि तो नाही मिळाला नाही तर......अश्या धमक्या? न्यायालयाने हे आरक्षण बेकायदेशीर ठरवून आठवडे लोटले. चर्चा थांबवायची होती तर तेव्हाच थांबवायची. हुमायूनसाहेबाना शेवटचा लेख लिहू देऊनच का चर्चा थांबवातायात?

    ReplyDelete
  9. awdhoot parelkar: by email.
    19:48 (15 hours ago)

    to me
    अचूक मुद्दे.
    मताचे राजकारण करणार्याना समर्पक उत्तर.

    जातवार जनगणनेने ओबीसीचा विकास होईल हे मात्र स्वप्नरंजन आहे. यातून आता सर्वांनी बाहेर यावे.
    ओबीसी आणि आंबेडकरी समाजाने आता थोर नेत्यांची पूजा, स्मारके पुतळे यातून देखील आता बाहेर यावे. एरवी भवितव्य कठीण आहे.

    ReplyDelete
  10. On 10/07/2012 05:00 PM Prof.Ashok Buddhivant said:
    आर्थिक आधारावर आरक्षण देण्याचा विषय घटनाकारांनी घटना परिषदेत चर्चेला घेतला होता.नेहरुंनी देशातील ९९% लोक गरिब असल्याने त्यांना ते देणे अव्यवहारीकपणाचे होईल असे सांगितले.आज रा्ष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण संस्थेच्या पाहणीनुसार देशातील २७ कोटी लोकांनी आयकर भरायला हवा,तथापि अवघे साडेतीन कोटी लोक तो भरतात.उरलेले सर्व आर्थिकदृष्ट्या गरिब असल्याचे सांगतात.त्यामुळे आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर १२१ कोटी भारतीयांपैकी ११७.५.० कोटींना ते द्यावे लागेल,जे सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेले आहे.

    ReplyDelete
  11. On 10/07/2012 03:03 PM ashish said:
    ह्या अभ्यासू लोकांना जात, धर्मावर आधारित आरक्षणे का हवी आहेत? केवळ आर्थिक आधारावर आरक्षण केले तर काय नुकसान होईल? एकूण आरक्षण (जात व धर्मावर) ५०% टक्के आहे, तर ५०% आरक्षण केवळ आर्थिक मागासांना केले तर सगळेच साध्या होणार नाही का? धर्मावर आरक्षण केले, तर शाहरुख, आमीर खान च्या मुलांना आरक्षण देणार का? जातीवर आरक्षण दिले तर गोपीनाथ मुंडेंच्या मुलांना आरक्षण देणार का? जात,धर्मावर आधारित आरक्षणामुळे समाजातले तेढ वाढते, गरज नसलेल्यांना लाभ मिळतो, गरजू उपेक्षित राहतात. हे समजणे अवघड आहे का?
    On 10/07/2012 02:46 PM Minhaj_shaikh said:
    आम्हाला जातीवरून किवा धार्मिक आरक्षण नको.आर्थिक मागासलेपणा वरून आरक्षण द्यावे. देशातले नागरिक समजून पाकिस्तानी समजून नकोय.

    ReplyDelete
  12. [BY EMAIL..PROF,ANAND UBALE}
    Dear Narke sir
    Jay Bhim
    I went through ur article on ur blog.as usual it is based on facts and
    figures. ur articles are always the eye opener. u have, this time
    also, placed a very concrete arguement that cannt be challenged. u
    have disclosed many things about muslim social structure in practice.
    ur stand in the interest of sc st and obc people is seminal and
    threatening to the dominating classes in this country. ur
    interpretation of indian politics is so apt when u argue that hindu
    muslim issue has always been raised in order to divert the attention
    from basic issues of this country.
    sir, there are very few thinkers like u who are ballanced in
    interpretation, understanding and see the things as they are.phule
    ambedkarite thinkers are expected to behave likewise...{from:email by Prof.Anand Ubale, DBAM UNIVERSITY,AURANGABAD}

    ReplyDelete
  13. {FROM:FACEBOOK}...
    Yusuf Shaikh: नरके सर, तुमच्या लेखातून मुस्लीम समाजाचा विकास करण्याविषयी कुठले ठोस उपाय सुचवले गेले आहेत?
    तुम्ही म्हणता, "मुस्लीम समाजातील काही घटक सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागे पडलेले आहेत, हे खरेच आहे. तथापि त्यावरील ठोस उपाययोजना घटनात्मक मार्गातूनच शोधल्या पाहिजेत. मुस्लीम समाजातहि जातीव्यवस्था आहे. ती झाकून ठेवून मागासवर्गीय मुस्लिमांची परिस्थिती सुधारणार नाही."
    १) हि ठोस उपाययोजना काय असेल? ती तुम्ही कधी उघड करणार आहात का?
    २) जर हि उपाययोजना घटनात्मक मार्गातूनच शोधायची असेल तर ती कोण शोधणार? आणि कधी म्हणजे याची काही कालमर्यादा असणार का?
    ३) मुस्लीम समाजातील जातीव्यवस्था कुणी झाकून ठेवली आहे?
    ४) आता फक्त मागासवर्गीय मुस्लिमांची परिस्थिती सुधारायची बाकी आहे व बाकीच्या मुस्लिमांच्या परिस्थितीत सुधारणा करण्याची गरज नाही असं म्हणणं कितीसं सत्य आहे व कितीसं असत्य आहे?
    भारतात अंदाजे १२% मुस्लीम आहेत. पण केंद्रीय व राज्यातील नोकऱ्यामध्ये किती टक्के मुस्लीम आहेत? खाजगी व्यवस्थापनाबद्दल काही बोलायची गरज आहे का? जिथे टक्का-दीड टक्का मुस्लीम नोकऱ्यात आहेत तिथे पुढारलेले मुस्लीम व मागासलेले मुस्लीम हा भेद करणं मुस्लिमांच्यातरी फायद्याचे नाही.
    ९२/९३ च्या दंगलीनंतर देशभर मुस्लीमाकडे संशयित नजरेने पहिले जाते. सरसकट मुस्लीम म्हणजे पाकिस्तानी हि भावना असताना मुस्लिमांचा विकास करायला कोण पुढे येणार?
    स्वातंत्र्यानंतर मुस्लिमांना पध्दतशीरपणे मागास ठेवण्यात आलं. त्यातले चार दोन पुढे आले म्हणजे आख्खा मुस्लीम समाज सुधारला आणि आता फक्त काही मागास मुस्लिमांचाच तेवढा विकास बाकी आहे हि मांडणी सर्वथा चुकीची आहे.
    मी तुमच्यावर कुठलाही आरोप करत नाही पण तुम्ही एवढे सांगा कि "मुस्लिमांचे लांगुलचालन" हा गेली ५०/६० वर्षे कुणाचा मुद्दा आहे?
    आता सर्वांच्याच माहितीकरता एक गोष्ट सांगतो कि पूर्वीही मुस्लिमातील जातीव्यवस्था प्रखर (म्हणजे हिंदू धर्माप्रमाणे) नव्हती. रोटी व्यवहार होते पण आता बेटी व्यवहारही सुरु झाले आहेत. काही मुस्लीम धार्मिक गट मुस्लिमांना आणखी आणखी धार्मिकतेकडे ढकलत आहेत पण ते जातीच्या खुळचट कल्पना उध्वस्त करत आहेत. बेटी व्यवहार सुरु करण्यात यांचीच प्रेरणा आहे...
    {FROM:FACEBOOK}

    ReplyDelete