Friday, September 21, 2012

जात दाखवुन अवलक्षण





 साहित्य संमेलनात वाद हे झडलेच पाहिजेत असा अ.भा.मराठी साहित्य महामंडळाच्या घटनेत  नियम आहे किंवा कसे याची मला माहिती नाही. चिपळुणला होणा-या संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणुक सालाबादप्रमाणे गाजु लागली आहे.गेल्या ८५ साहित्य संमेलनात न घडलेली जातीय प्रचाराची घटना यावर्षी प्रथमच पाहायला मिळत आहे.त्याचे मानकरी आहेत अध्यक्षपदाचे एक उमेदवार श्री.ह.मो.मराठे! मराठे हे लेखक आणि संपादक म्हणुन प्रसिद्ध आहेत. त्यांनी या निवडणुकीत जातीय प्रचार करुन या निवडणुकीला झेडपीच्या निवडणुकीच्या पातळीवर उतरविले. काही लोक दागिने मोडुन खातात,काही आपली गरिबी मोडुन खातात तशी हमोंनी निवडणुक प्रचारात स्वत:ची जात "मोडुन खायला" सुरुवात केली आहे अशी टिका झाली.हे जाती संमेलन नाही.ही साहित्य संमेलनाची निवडणुक आहे तेव्हा ती साहित्यबाह्य गोष्टींऎवजी वांग्मयीन गुणवत्तेवर लढवावी याचे भान सुटले आणि "जात दाखवुन अवलक्षण" झाले.शिवाय हमोंवर गुन्हा दाखल झाला तो वेगळाच. हमोंना न्यायालयाने जामीन मंजुर केला म्हणुन बरे नाहीतर तुरुंगातुन प्रचार करायची हमोंवर पाळी आली असती.
हमोंनी मतदारांना ४ पानी पाल्हाळिक पत्र लिहुन त्यातली पुर्ण २ पाने ब्राह्मण कार्याला देवुन ही आफत ओढवुन घेतली.आपण आडनावापुरते ’मराठे’ असलो तरी जातीने "ब्राह्मण" आहोत आणि आपणच  ब्राह्मणांचे एकमेव तारणहार आहोत असे त्यांनी आपल्या प्रचारपत्रात  नमुद केलेले आहे.ब्राह्मण समाजाच्या विरुद्धच्या सगळ्या अपप्रचाराला वाचा फोडण्याचे "ईश्वरी कार्य" आपण हाती घेतल्याची माहिती हमोंनी या पत्रकात दिली आहे.
हमो म्हणतात, "गेल्या दिडशे वर्षांपासुन महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेषाचे वातावरण पद्धतशीरपणे तयार करण्यात येत असुन सध्या त्याचा कळस गाठण्यात येत आहे." याचा अर्थ हमोंचा रोख सुचकपणे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याकडे आहे.दिडशे वर्षांपुर्वी त्यांचे स्त्री व दलित शिक्षणाचे काम  सुरु झाले होते. हमोंचा अंगुलीनिर्देश तिकडेच आहे. हमोंनी राज्यघटनेने दिलेल्या सामाजिक  आरक्षणाला जातवार आरक्षण म्हणुन त्याविरुद्ध दंड थोपटलेले आहेत.बहुजन शेतकरी- कष्टक-यांना जमिनीची मालकी देणा-या कुळकायद्यालाही हमोंचा विरोध आहे. त्यांना सगळेच काटे उलटे फिरवायचे आहेत.संमेलनाध्यक्ष सर्वसमावेशक विचारांचा आणि उदारमतवादी असायला हवा. अशा उलट्या पावल्यांच्या प्रवाशाला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडुन देणे साहित्यविश्वाला परवडणारे आहे काय? संमेलनाचे पुर्वाध्यक्ष लक्ष्मणशास्त्री जोशी,गं.बा.सरदार,कुसुमाग्रज,पुल, अत्रे, य.दि.फडके,अरुण साधु,वसंत बापट आदींचा वारसा हमोंना नको आहे. रानडे, आगरकर, केशवसुत,कर्वे,लोकहितवादी यांची तोंडदेखली नावे घेणारे हमो नेमके कुणाचे वारसदार आहेत? सदानंद मोरे यांनी त्यांना  जातविरहीत प्रचाराचे प्रमाणपत्र देवुन त्यांची तळी उचलुन धरली असली तरी हमो हे विष्णुशास्त्री चिपळुणकरांचेच वारसदार आहेत आणि रानडे-केशवसुतांची नावे घेवुन ते त्यांना बदनाम करीत आहेत हे स्पष्ट आहे.
या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण मतदार असल्याने त्यांच्याकडे "भिक्षांदेही करण्यासाठी" हमोंनी हे पत्रक काढल्याची टिका एबीपी माझा वाहिनीने थेटपणाने करुन हमोंच्या जातीय प्रचाराचे वस्त्रहरण केले. वृतपत्रांमधुन टिका सुरु झाल्यावर हमोंनी साळसुदपणाचा आव आणुन केलेला खुलासा  अतिशय विनोदी होता. "एबीपी माझा" शी बोलताना ते म्हणाले, "मी पत्रकात असे कुठे  लिहिलेय की मी ब्राह्मण आहे म्हणुन ब्राह्मण मतदारांनो मलाच मत द्या!" प्रबोधनकार ठाकरे यांच्या आत्मचरित्रात एक आठवण दिलेली आहे.१९२३ च्या राजकीय निवडणुकीत भास्करराव जाधव यांनी, "सातारा जिल्हा मराठा मतदारांचा असुन आपण मराठा आहोत सबब मराठ्यांची मते मराठ्यासच मिळाली पाहिजेत" असे प्रचारपत्रक काढले होते.{ "माझी जीवनगाथा",पान.२४४} आज कायदे बदललेले आहेत. असा थेट जातीय प्रचार करता येत नसल्याने आजच्या "आडनावांच्या मराठ्यांनी"अधिक चतुर मार्ग वापरला आहे इतकेच.पण वृती तीच आहे.
मतदारांमध्ये दोन जातींचे लोक प्रामुख्याने आहेत.एकुणात ४० टक्के मतदार ब्राह्मण असल्याचे हमो सांगत असले तरी प्रत्यक्षात हे प्रमाण ५५ते ६० टक्केपर्यंत असावे असे जाणकारांचे मत आहे.त्याखालोखाल मतदार सत्ताधारी जातीचे आहेत. हमोंना "विरोधीभक्त" ब्रिगेडकरवी ब्राह्मणांचे मसिहा बनायचे आहे.पण ते ब्राह्मणांना गृहीत कसे धरु शकतात? त्यांनी जाणीवपुर्वक जेम्स लेनचे प्रकरण उकरुन काढले आहे.दोन प्रतिगाम्यांमध्ये कायम संगनमत असते हे अनेकदा दिसुन आले आहे.हमो म्हणतात, "जेम्स लेनचे पुस्तक व तो स्वत: यांची भारताच्या सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्तता केली." हमोंची ही मांडणी सत्याला धरुन नाही. सरकारने  लेनच्या बदनामीकारक आणि विकृत पुस्तकावर  बंदी घातली होती. घटनेच्या कलम १९ नुसार असणा-या लेखन व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर न्यायालयाने  ही बंदी उठवली. सरकारने हा आदेश काढताना खुप चुका केलेल्या होत्या.त्याचा फायदा पुस्तकाला मिळाला.पण ही याचिका लेनने केलेली नव्हती किंवा लेनला निर्दोष ठरवावे अशीही मागणी याचिकेत नव्हती.पुस्तक वाचायला मिळावे अशी वाचकांची याचिका होती.लेनला कोर्टाने निर्दोष मुक्त केले ही हमोंची माहिती त्यामुळेच खोटी आहे.ब्राह्मण पुरुषांच्या सरसकट कत्तली करण्याची चिथावणी देणा-या ब्रिगेडच्या पुरुषोत्तम खेडेकरांच्या विखारी पुस्तकाविरुद्ध हमोंनी भुमिका घेतल्याचे ते या पत्रकात आवर्जुन सांगतात. खेडेकरांच्या या पुस्तकाविरुद्ध पोलीसात तक्रार करणारे हमो नसुन शाम सातपुते,संजय सोनवणी आणि मधुकर रामटेके हे पुरोगामी होते.हमोना केवळ लाजेकाजेस्तव नंतर भुमिका घ्यावी लागली पण पोलीसकेस दाखल झाल्यानंतरही हे "शुर शिपाई"  तब्बल सहा महिने या पुस्तकावर मुग गिळुन गप्प राहिले होते.
 हमोंनी लेनच्या वादग्रस्त पुस्तकातील गलिच्छ मजकुर आपल्या पत्रकात जसाच्यातसा उद्धृत केला आहे. हा उद्योग यापुर्वी फक्त संभाजी ब्रिगेडने हजारो पत्रके छापुन केलेला हो्ता. तीच जातीयवादी ब्रिगेड आत्ता जात्यंध हमोंना त्यासाठीच टार्गेट करीत आहे.त्यांनी हमोंवर त्याबाबतचा गुन्हाही दाखल केलेला आहे. ब्रिगेडसारख्या अतिरेकी आणि जातीयवादी  संघटनांना जेम्स लेनचे कोलीत देवुन चिथवायचे आणि तटस्थ मतदारांची सहानुभुती मिळवुन,सनातन्यांची मते पक्की करित निवडुन यायचे अशी गणिते धुर्तपणे  मांडुन हमोंनी हे पत्रक काढलेले असावे. सहानुभुतीच्या लाटेवर  निवडुन यायचे हे डावपेच अंगलट आलेच तर जातीसाठी आपण माती खाल्ली असे सांगुन "जातीवीर" ठरण्याची सोयही यात आहेच. हमोंनी अटक होणार याची खात्री झाल्यानंतर दिलगिरी व्यक्त केली.राजकारणी अटक झाल्यावर हमखास दवाखान्यात भरती होतात. हमो आधीच भरती झाले, यावरुनही त्यांची रणनिती कळायला हरकत नसावी.हा वाद यापुढे कसे वळण घेतो त्यावर मराठे निवडणुक जिंकणार की हरणार ते ठरेल.साहित्यिक हमोंवर जातीप्रेमाने मात केल्याचे हे चित्र खेदजनक आहे.पुरोगामी महाराष्ट्र याचा काय निकाल घेतो ते बघुया!

.................................................................................................................................................................



1 comment:

  1. जातीयवादाचे आणि जातीयवादी हमोंचे आपण काढलेले वाभाडे फारच आवडले .

    ReplyDelete