Sunday, June 30, 2013

समाजक्रांतीचे उर्जाकेंद्र




{महाराष्ट्र टाइम्स, दि.२९ जून २०१३, संपादकीय पान, सर्व आवृत्त्या}

समाजक्रांतीचे उर्जाकेंद्र
प्रा. हरी नरके


जोतिराव आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले. त्यांनी स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य केले. ते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. 
..........................................................
आधुनिक भारताच्या सामाजिक जडणघडणीत महाराष्ट्राचा, विशेषत: पुण्याचा, लक्षणीय वाटा आहे. १९व्या शतकात पुणे हे भारतीय प्रबोधन चळवळींचे केंद्र होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकहितवादी, न्या. रानडे, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, आगरकर, महर्षी कर्वे, बायजा कर्वे, महर्षी शिंदे आदींनी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींना ऊर्जा पुरवली. पुण्यातील त्यावेळच्या जुन्या गंज पेठेतील फुलेवाडा सुमारे ५० वर्षे सामाजिक चळवळींना रसद पुरवित होता. या वाड्याच्या खाणाखुणा पाहताना या अभिमानास्पद इतिहासाचा पोवाडा आपल्या कानात गुंजत राहतो. 

पूर्व पुण्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक पर्यावरण संमिश्र आणि विविधतेने नटलेले आहे. सर्व जाती, धर्मांचे कष्टकरी या भागात राहतात. तेथील वाड्यातच जोतिराव फुले यांचा ११ एप्रिल १८२७ रोजी जन्म झाला. मिशनऱ्यांच्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले. १८४८मध्ये त्यांनी देशातील मुलींची पहिली भारतीय शाळा सहकाऱ्यांच्या मदतीने भिडे वाड्यात सुरू केली, तेव्हा सावित्रीबाई याच वाड्याचा उंबरठा ओलांडून सार्वजनिक जीवनात पहिले पाऊल टाकत्या झाल्या. भारतीय स्त्रियांचे सार्वजनिक जीवन अशा रीतीने येथून सुरू झाले. भारतातील प्रौढ साक्षरता अभियान १८५४मध्ये याच वाड्यात सुरू झाले. रात्रीच्या स्त्री-पुरुषांच्या दोन पहिल्या शाळा याच वाड्यात सुरू झाल्या. 

विधवांच्या बाळंतपणाची सोय करणारे केंद्र आणि देशातील पहिला भारतीय माणसांनी चालवलेला अनाथाश्रम (बालहत्या प्रतिबंधक गृह) येथेच सुरू झाला. अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाला पाण्याचा हक्क देणारा पहिला हौद याच वाड्यात आहे. १८७३ साली याच घरात स्थापन करण्यात आलेला सत्यशोधक समाज देशातील सर्वदूर ग्रामीण भारतात पसरलेले पहिले जनआंदोलन ठरले. येथेच जोतिरावांनी मराठीतील पहिले आधुनिक नाटक 'तृतीय रत्न' लिहिले. १८६९ साली शिवरायांचा पोवाडामय चरित्रपट येथेच निर्माण झाला. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या मुक्ती चळवळींना अर्पण करण्यात आलेला 'गुलामगिरी' हा ग्रंथ येथेच जन्माला आला. 'शेतकऱ्यांचा असूड' आणि सार्वजनिक सत्यधर्माचे क्रांतिकारक तत्त्वज्ञान येथेच साकारले. आयुष्यातील ५० वर्षे सामाजिक परिवर्तनाची लढाई लढून जोतिराव-सावित्रीबाई या दोघांचेही पार्थिव येथेच विसावले. जोतिरावांची समाधी याच वाड्यात आहे. 

राज्य सरकारने १९६७ साली हे घर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. १९९३ साली छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून त्याची फेरउभारणी करून ते तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले. या वाड्याला राष्ट्र्पतींनी समतेचे राष्ट्रतीर्थ म्हणून 'समता भूमी' घोषित केले. सुमारे १४० वर्षे जुन्या असलेल्या या वाड्यात जोतिरावांचे वडिलोपार्जित घर, ज्याचा जुना गंज पेठ, घर नं. ३९५, होता ते आणि त्यांनी स्वकष्टार्जित कमाईतून खरेदी केलेले घर यांचा समावेश आहे. जोतिरावांच्या नोंदणी केलेल्या मृत्युपत्रात त्यांनी या घराचे सर्व तपशील दिले आहेत. 

यातले त्यांनी नवे बांधलेले घर ११ खणांचे होते. त्याच्या पूर्वेला रस्ता, पलीकडे तुंबडीवाले बैराग्याची आणि बापूभाई पिठवाल्याची घरे, पश्चिमेला बोळापलीकडे राजाराम गोविंदराव फुले यांची दोन घरे, दक्षिणेला बोळापलीकडे रामचंद्र किसन कुंभार यांचे घर व बाबाजी राणोजी फुले यांची बखळ; तसेच उत्तरेला रस्ता आणि नगरपालिकेचे पाण्याचे दोन हौद होते. यातील काही जागा वडिलोपार्जित, काही जोतिरावांनी लिलावात खरेदी केलेली, तर काही खरेदीद्वारे घेतलेली होती. जोतिरावांचे घर नं. ३९४, हे तीन खणांचे दीड मजल्याचे होते. त्याच्या पूर्वेला रा. कि. कुंभार, पश्चिमेला खंडोजी कृष्णाजी व बाबाजी राणोजी फुले, दक्षिणेला सटवाजी कृष्णाजी फुले यांची घरे. तर उत्तरेला बा. रा. फुले यांची बखळ होती. जोतिरावांची स्वत:ची खरेदी केलेली बखळ जागा ४३ फूट लांबी २८ फूट रुंद होती. याशिवाय आणखी दोन बखळ जागा त्यांनी विकत घेतल्या होत्या. १८९४पर्यंत ही घरे जोतिरावांच्या नावे होती. पुढे १९०७पर्यंत ती यशवंत फुले, त्यानंतर ती १९०९ ते १९१० याकाळात चंद्रभागा यशवंत फुले यांच्या नावे होती. त्यांनी २८ ऑक्टोबर १९१०ला ही वास्तू देडगेंना १०० रुपयांना विकली. त्यांच्याकडून ती १९२३पासून सावतामाळी फ्री बोर्डिंगने खरेदी केली. १९६७ साली महाराष्ट्र सरकारने ही घरे ताब्यात घेतली. 

जोतिराव आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले. त्यांनी स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य केले. ते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे कार्यकारी संचालक होते. ही कंपनी बांधकाम आणि इतर व्यापारी क्षेत्रात कार्यरत होती. पुणे-नगर रस्त्यावरील येरवड्याचा (बंडगार्डन) पूल बांधण्याच्या १८६९ सालच्या कामाचे उपकंत्राट त्यांच्या या कंपनीला मिळाले होते. या कामाला खडी, चुना, आणि दगड पुरविण्याचा मुख्य ठेका त्यांच्याकडे होता. १०० वर्षे मुदतीचा हा पूल आज १४४ वर्षांनंतरही मजबूत आहे. जोतिरावांच्या कंपनीने केलेली महत्त्वाची कामे म्हणजे कात्रजचा बोगदा आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. जोतिरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचेही काम केले जाई. बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या 'वज्रसूची' या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिले. जोतिरावांनी ते 'जातीभेद विवेकसार' प्रकाशित केले. या कंपनीचे पुस्तकविक्री केंद्र होते. सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतिरावांकडे होती. ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. 

स्वत:च्या शाळांमध्ये त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून सर्व मुला-मुलींना शेती व उद्योगाचे शिक्षण सक्तीचे केले होते. १५० वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिरावांचेच प्रोत्साहन होते. टिळक-आगरकरांना पहिल्या तुरुंगवासात जामीन द्यायला आणि सुटकेनंतर त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यातही तेच दोघे पुढे होते. १८६९ साली जोतीरावांनी शिवचरित्र लिहिले. १८८५ साली त्यांनी देशात पहिल्यांदा शिवजयंती उत्सव सुरू केला. रायगडवरील शिवसमाधीची डागडुजी केली आणि शिवरायांना महानायक म्हणून लोकमानसात प्रस्थापित केले. पुण्यात हिराबागेत आणि मुंबईला लालबाग-परळ भागात करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमांच्या नोंदी उपलब्ध आहेत. 

Sunday, June 23, 2013

शरीरसंबंध हेच लग्न?






वटसावित्रीचा सण नुकताच साजरा करण्यात आला. युनोने हाच दिवस नेमका विधवादिन म्हणून घोषित केला. दरम्यान संमतीने ठेवलेले शरीरसंबंध हेच लग्न होय, हा मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय खळबळ माजवून गेला. चित्रपट अभिनेता शाहरूख खानने बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान चाचणी केल्याची अफवा उठवली गेली. या सार्‍या घटनांमुळे समाज आणि स्त्रिया ही चर्चा पुन्हा एकदा ऎरणीवर आलेली आहे.
  शाहरूख खान याने गर्भलिंग चाचणी केल्याची बातमी मिड- डे या इंग्रजी वृत्तपत्राने दिली होती. हीच बातमी काही मराठी वृत्तपत्रांनीही दिली. नंतर चॅनलवाल्यांनी ही बातमी चालविली.सतत प्रसिद्धीच्या झोताची चटक लागलेल्या एका महिला कार्यकर्तीने तर कोणतीही शहानिशा न करता यानिमित्ताने चमकून घेण्यासाठी दवाखाना आणि किंग खानवर सरळ कारवाईची मागणीच केली. माझाच "तारा अजिंक्य" या तोर्‍यात उठसूठ कोणावरही बदनामीकारक आरोपांचा  "वर्षाव" करण्याची ही उथळ वॄती स्त्री चळवळीला मारक ठरते. आता दवाखान्याने मानहाणीची नोटीस देवून बाईंच्या माफीची मागणी केलेली आहे.
मुळात शहारूख खानने कुठे तरी मला मुलगा होणार आहे,असे वाक्तव्य केले होते,त्यावरून साप,साप म्हणून भुई धोपटण्याचा हा प्रकार घडला.मात्र शहारूख खान याने हे वक्तव्य कुठे आणि कधी केले होते,याची माहिती कोणाकडेही नव्हती.
भारतात ज्या दिवशी असंख्य सौभाग्यवती वडाला फेर्‍या मारीत होत्या तोच दिवस नेमका युनोने विधवादिन म्हणून घोषित केला.भारतीय संस्कृतीमध्ये मिथक कथांना खूप महत्व आहे. नवर्‍याचे प्राण यमाकडून परत आणणार्‍या सावित्रीची कथा महाभरतात आहे. हजारो वर्षे तिच्या प्रभावाने अनेक स्त्रिया वटसावित्रीची ही पुजा  करीत आल्यात. सालाबादप्रमाणे अनेक भाविक आणि उच्चशिक्षित स्त्रियांनी हा सण उत्साहात  साजरा केला. आमच्याकडे येणारी मदतनिस मुलगी सकाळीच माझ्या पत्नीला विचारीत होती, "ताई, तुम्ही का जात नाही वडाला फेर्‍या मारायला?" माझी बायको म्हणाली, "माझा आणि माझ्या नवर्‍याचा या प्रकारांवर विश्वास नाही. मुळात आमचा पुनर्जन्मावरच विश्वास नाही. हा जन्म आनंदात जावा एवढीच आमची मनापासूनची धडपड आहे."
तिला काही हे पटलेले दिसले नाही. "असे कुठे असते काय? यांचे आपले जगावेगळे काहीतरीच!" असे काहीसे भाव तिच्या चेहर्‍यावर होते.
कुमुद पावडे यांच्या "अंत:स्फोट" मध्ये एक प्रसंग आहे. त्यांच्या आत्याला चांगली ४० वर्षे संसार केल्यानंतर नवर्‍याने सोडले. कारण दिले, "बायको आवडत नाही!"आत्या माहेरी भावाकडे येऊन राहू लागली. वटसावित्रीच्या दिवशी भक्तीभावाने वडाला सात फेर्‍या मारून "हाच नवरा सात जन्म मिळू दे"अशी प्रार्थना करून आली. कुमुदने आत्याला विचारले,"ज्या नवर्‍याने तुला सोडले, तो कशाला सात जन्म हवाय तुला?" आत्या म्हणाली, त्याने त्याचा धर्म सोडला, आपण कशाला आपला धर्म सोडायचा? मी फेर्‍या मारणारच!" कुमुदने कपाळावर हात मारुन घेतला.
आत्याच्या नवर्‍याने दरम्यान दुसरी बायकोही केली.तरी आत्याच्या फेर्‍या चालूच! कुमुद म्हणाली," अगं आत्या, तू म्हणतेस हाच नवरा सात जन्म हवा, त्याची दुसरी बायको म्हणते हाच नवरा सात जन्म हवा, म्हणजे हीच सवत तुला सात जन्म मिळणार!" आत्या हादरली, म्हणाली "नको गं बाई, ही सवत मला नको." आत्याने वडाला फेर्‍या मारायचे तात्काळ बंद केले.
मध्यंतरी आम्ही एक सर्वेक्षण केले होते.यादिवशी वडाला फेर्‍या मारणार्‍या स्त्रियांच्या आम्ही मुलाखती घेतल्या. त्यांच्याकडून एक प्रश्नावली भरून घेतली. यात मुद्दाम शहरी,ग्रामीण, निरक्षर ते पीएच.डी., मजुरी करणार्‍या ते आय.ए.एस.,वय वर्षे १५ते ८५ असा सगळा मोठा स्त्री गट घेतला होता.
तुम्ही दबावापोटी ही पूजा करता की मनापासून करता? हाच नवरा तुम्हाला सात जन्म खरेच हवाय का? या प्रश्नावर २५% महिलांचे उत्तर होते, "हो. नवरा खूप छान आहे. आमचा संसार खूप सुखाचा आहे.ही पूजा मी मनापासून करते."
५३% महिला म्हणाल्या, सात जन्माचे सोडा, याच जन्मात नवरा नको झालाय. उल्ट्या फेर्‍या मारायची सोय असती तर आत्ताच मारल्या असत्या.पण काय करणार? फेर्‍या नाही मारल्या तर नवरा मारहाण करणार.शेजारीण संशय घेणार. एव्हढा ताप कुणी सांगितलाय?फेर्‍या मारा मोकळे व्हा."
१३% महिला म्हणाल्या," ही आमची गुंतवणूक आहे. लग्न झाले तेव्हा नवरा खूप वाईट वागायचा. २०/२५ वर्षे खूप मेहनत घेतली. नवर्‍याचे लाड केले. कायदा, नातेवाईक, संघटना सारे फंडॆ वापरले. नवरा आता दुरूस्त झालाय. आता हाच सात जन्म हवा. दुसरा करायचा म्हणजे कोणताही असला तरी भारतीय "नग"असणार. म्हणजे पुन्हा उमेदीची २०/२५ वर्षे वाया घालवावी लागणार. त्यापेक्षा आमची ही गुंतवणूक कामी येईल."
६% बायका म्हणाल्या," आम्ही मनापासून पूजा करतो. आमची  देवाला एकच प्रार्थना आहे. देवा एक मेहरबानी कर.हाच जन्म सातवा घोषित कर."                                                                                                                                                                                                         शरीरसंबंध हेच लग्न होय, या तामिळनाडूमधील मद्रास उच्च न्यायालयाच्या ताज्या निकालपत्राने कुटुंबसंस्थेत भुकंप घडवून आणला आहे. कोईमतूर येथील कौटुंबिक न्यायालयामध्ये एका महिलेने पोटगीसाठी प्रकरण दाखल केले होते. नवर्‍याचे चपलांचे दुकान आहे व त्याचे उत्पन्न २५ हजार आहे, असा दावा तिने केला होता. या नवर्‍यापासून दोन मुले जन्माला आल्याचा तिने दावा केला होता. दुसरीकडे नवर्‍याने सदर अर्जदार ही आपली लग्नाची बायको नसल्याचा बचाव सादर केला होता.पतीने तो दुकानदार नसून, चपलांच्या गोडाऊनमध्ये  नोकर असल्याचे  न्यायालयाच्या निदर्शनास आणले होते. हे दोघेही  मुस्लिम धर्माचे आहेत.कौटुंबिक न्यायालयाने   दोन्ही मुलांची पोटगी म्हणून पित्याने  ५00 रुपये रक्कम द्यायचा आदेश दिला. पण महिला ही लग्नाची बायको असल्याचे सिद्ध करू न शकल्याने तिला पोटगी नाकारली. या निकालाविरुद्ध महिलेने मद्रास उच्च न्यायालयात अपील दाखल केले. या अपिलाच्या सुनावणीला सदर पुरुष हजर राहिला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने एकतर्फी निर्णय दिला आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                
दुसर्‍या अपत्याच्या जन्मावेळी त्या महिलेचे सीझरिंग ऑपरेशन करावे लागले होते. त्यासाठी संमतीपत्रावर प्रतिवादीने नवरा म्हणून स्वाक्षरी केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने महिलेला पत्नीचा दर्जा दिला.निकालात न्यायालय असे म्हणते, की दोन्ही व्यक्ती एकत्र होत्या व संमतीने त्यांनी शरीरसंबंध केला होता. त्यामुळे संमतीने शरीरसंबंध झाला, त्यावेळी महिलेला पत्नीचा दर्जा प्राप्त झाला आणि पुरुषाला पतीचा दर्जा प्राप्त झाला. एवढेच नव्हे, तर या दोन व्यक्तींमधील विवाह हा नोंदणीकृत झाला नसला तरीदेखील सदर विवाह वैध आहे. वैध विवाहासाठी असणारी सप्तपदी किंवा  कबूलनामा अशा गोष्टी महत्त्वाच्या नसून, शरीरसंबंध हा महत्त्वाचा असल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.  हिंदू विवाह कायद्यामध्ये विवाह पूर्ण होण्यासाठी सप्तपदी होण्याचे बंधन आहे.
पारसी विवाहामध्येदेखील आशीर्वाद नावाचा महत्त्वाचा विधी कायद्याने आखून दिला आहे. अन्य धार्मिक कायद्यांमध्ये आणि विशेष विवाह कायद्यामध्येही आवश्यक गोष्टींची यादी आहे. परंतु या निकालपत्रामुळे या सर्व गोष्टी गौण झाल्या असून, शरीरसंबंध हा एकच निकष महत्वाचा बनला आहे.                                                                                                                                   आजपर्यंत कायद्याने विवाहपूर्व संबंधांना आणि विवाहबाह्य संबंधांना कधीच मान्यता दिलेली नाही. विविध कायद्यांतील तरतुदींत अशा कृत्यांना प्रतिबंध केला असून, तो गुन्हा मानलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये  मद्रास उच्च न्यायालयाच्या या  निकालपत्राने बरेच गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.हिंदू विवाह कायदा १९५५ सालचा आहे. सर्वच कायद्यांमध्ये काळानुरूप बदल करणे गरजेचे असते. आज आपल्या समाजामध्ये विवाहाशिवाय एकत्र राहणारी काही तरूण जोडपी आहेत. "लिव्ह इन रिलेशनशिप"च्या या वाढत्या प्रकाराला कायद्याच्या चौकटीत बसवण्याचा मुद्दा विचारार्थ आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे हे निकालपत्र सर्वोच्च न्यायालयात टिकेल किंवा नाही हेही पाहावे लागेल. भारतीय विवाह संस्थेच्या गढीला या निकालाने जोरदार हादरा दिला एव्ह्ढे मात्र खरे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

वटसावित्री : बाईच्या नजरेतून....







भारतीय संस्कृतीमध्ये मिथक कथांना खूप महत्व आहे. नवर्‍याचे प्राण यमाकडून परत आणणार्‍या सावित्रीची कथा अशीच एक जब्राट कथाय.हजारो वर्षे तिच्या प्रभावाने अनेक स्त्रिया वटसावित्री करीत आल्यात. आज अनेक भाविक स्त्रिया तो वटसावित्रीचा सण साजरा करताहेत. आमच्याकडे येणारी मदतनिस मुलगी सकाळीच माझ्या पत्नीला विचारीत होती, "ताई, तुम्ही का जात नाही वडाला फेर्‍या मारायला?" माझी बायको म्हणाली, "माझ्या नवर्‍याचा या प्रकारांवर विश्वास नाही.माझाही नाही.मुळात आमचा पुनर्जन्मावरच विश्वास नाही.हा जन्म आनंदात जावा एवढीच आमची धडपड आहे."
तिला काही हे पटलेले दिसले नाही."असे कुठे असते काय? यांचे आपले जगावेगळे काहीतरीच!" असे काहीसे भाव तिच्या चेहर्‍यावर होते.कुमुद पावडे यांच्या "अंतस्फोट" मध्ये एक प्रसंग आहे. त्यांच्या आत्याला चांगली ४० वर्षे संसार केल्यानंतर नवर्‍याने सोडले. कारण दिले, "बायको आवडत नाही!"आत्या माहेरी भावाकडे येऊन राहू लागली. वटसावित्रीच्या दिवशी भक्तीभावाने वडाला सात फेर्‍या मारून "हाच नवरा सात जन्म मिळू दे"अशी प्रार्थना करून आली. कुमुदने आत्याला विचारले,"ज्या नवर्‍याने तुला सोडले, तो कशाला सात जन्म हवाय तुला?" आत्या म्हणाली, त्याने त्याचा धर्म सोडला, आपण कशाला आपला धर्म सोडायचा? मी फेर्‍या मारणारच!" कुमुदने कपाळावर हात मारुन घेतला.
आत्याच्या नवर्‍याने दरम्यान दुसरी बायकोही केली.तरी आत्याच्या फेर्‍या चालूच! कुमुद म्हणाली," अगं आत्या, तू म्हणतेस हाच नवरा सात जन्म हवा, त्याची दुसरी बायको म्हणते हाच नवरा सात जन्म हवा, म्हणजे हीच सवत तुला सात जन्म मिळणार!" आत्या हादरली, म्हणाली "नको गं बाई, ही सवत मला नको." आत्याने वडाला फेर्‍या मारायचे तात्काळ बंद केले.
आम्ही एक सर्वेक्षण केले. वडाला फेर्‍या मारणार्‍या स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्याकडून एक प्रश्नावली भरून घेतली.यात शहरी,ग्रामीण, निरक्षर ते पीएच.डी., मजुरी करणार्‍या ते आय.ए.एस.,वय वर्षे १५ते ८५ असा मोठा गट घेतला. 
तुम्ही दबावापोटी ही पूजा करता की मनापासून करता? हाच नवरा तुम्हाला सात जन्म खरेच हवाय का? या प्रश्नावर २५% महिलांचे उत्तर होते, "हो. नवरा खूप छान आहे. आमचा संसार खूप सुखाचा आहे.ही पूजा मी मनापासून करते." 
५३% महिला म्हणाल्या, सात जन्माचे सोडा, याच जन्मात नवरा नको झालाय. उल्ट्या फेर्‍या मारायची सोय असती तर आत्ताच मारल्या असत्या.पण काय करणार? फेर्‍या नाही मारल्या तर नवरा मारहाण करणार.शेजारीण संशय घेणार. एव्हढा ताप कुणी सांगितलाय?फेर्‍या मारा मोकळे व्हा."
१३% महिला म्हणाल्या," ही आमची गुंतवणूक आहे. लग्न झाले तेव्हा नवरा खूप वाईट वागायचा. २०/२५ वर्षे खूप मेहनत घेतली. नवर्‍याचे लाड केले. कायदा, नातेवाईक, संघटना सारे फंडॆ वापरले. नवरा आता दुरूस्त झालाय. आता हाच सात जन्म हवा. दुसरा करायचा म्हणजे कोणताही असला तरी भारतीय "नग"असणार. म्हणजे पुन्हा उमेदीची २०/२५ वर्षे वाया घालवावी लागणार. त्यापेक्षा आमची ही गुंतवणूक कामी येईल."
६% बायका म्हणाल्या," आम्ही मनापासून पूजा करतो.एकच प्रार्थना आहे देवाला. देवा एक मेहरबानी कर.हाच जन्म सातवा घोषित कर."
तुम्ही "बाई" असाल तर यातल्या कोणत्या गटात/ टक्क्यात येता? पुरूष असाल तर बाईच्या नजरेने जगाकडे बघा.वटसावित्रीच काय अलीबाबाची सगळी गुहा खुली होईल....

Thursday, June 13, 2013

कृषिवल: नव्या पर्वाची पेरणी


मराठी वृत्तपत्र सृष्टीचा इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. लोकशिक्षण,जागरण, लोकरंजन आणि माहितीच्या प्रसारात वर्तमानपत्रांनी मोठे आणि भरिव योगदान दिलेले आहे.प्रामुख्याने शिक्षण, साहित्य, संस्कृती, सामाजिक क्षेत्र आणि माध्यमे यांचा वर्तमान आलेख सांगतो की. त्यांचा प्रवास धर्म, व्रत,व्यवसाय आणि आता किफायतशीर धंदा असा  वेगाने होऊ लागला आहे. टिकून राहण्यासाठी करावी लागणारी जागतिक पातळीवरची तीव्र स्पर्धा,राजकारण्यांचा सर्वदूर हस्तक्षेप, सर्वच क्षेत्रात मूल्यांचा होत असलेला र्‍हास आणि सोशल मिडीया,मोबाईल असे बदलते प्रवाह यामुळे वातावरण ढवळून निघत आहे. जाहिरातदार आणि वाचक यांना आकर्षित करून घेण्यासाठी तर्‍हेतर्‍हेचे फंडे वापरले जात आहेत. वर्धापन दिनाच्या निमित्ताने पानसुपारी,हळदीकुंकू,चहापानाचे किंवा स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करून वाचक भेटीचा घाऊक कार्यक्रम करण्यावर सगळ्यांचाच भर असतो.
कृषिवल हे शेतकरी-कामगारांच्या चळवळीतून जन्माला आलेले आणि आपले स्वत्व आणि वेगळे अस्तित्व कायम राखलेले वॄत्तपत्र आहे.परवा कॄषिवलचा ७७वा वर्धापन दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.राज्यातील अनेक तरूण स्तंभ लेखक अलिबागला जमले होते.राज्यातील स्तंभ लेखकांची पहिली विचार परिषद आयोजित करून कृषिवलने औपचारिक-अनौपचारिक असे रसरशित साहित्य संमेलन पार पाडले. मान्सूनचा पहिला पाऊस आणि विचारांची मुसळदार बरसात असा अनोखा सोहळा यानिमित्ताने अलिबागला संपन्न झाला. दुसर्‍या दिवशी रायगड जिल्ह्यातील सर्व वॄत्तपत्रांच्या ग्रामीण पत्रकारांची कार्यशाळा आयोजित करून कॄषिवलने  एक नवा पायंडा पाडला. या जोमदार आणि बहारदार पेरणीद्वारे कॄषिवलने एका नव्या पर्वाची सुरूवात केलेली आहे.
१८७८ साली पुण्यात पहिले ग्रंथकार संमेलन आयोजित करण्यात आले होते.त्यातून आजच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा जन्म झाला.आज या संमेलनाला दरवर्षी लाखो रसिक उपस्थित असतात आणि कोट्यावधी रूपयांची ग्रंथविक्री होते.ही देशातील सगळ्यात मोठी ग्रंथ,ग्रंथकार आणि रसिकांची महाजत्रा असते.नेमेची येतो पावसाळा अशा पद्धतीने साहित्य संमेलन आणि वाद यांचे अतूट नाते आहे.दशवार्षिक जनगणना,पंचवार्षिक निवडणुका आणि दरवर्षीचे साहित्य संमेलन यांनी मराठी माणसाच्या भावजीवनात जब्राट स्थान पटकावलेले आहे.
१९९० चे दशक हे २०व्या शतकातले शेवटचे दशक होते. शतकभरातील विविध क्षेत्रातील वैचारिक धांडोळा आणि लेखाजोखा मांडण्यासाठी विचारवेध संमेलने भरवण्यात आली.सखोल वैचारिक आदानप्रदान करणारा मौलिक उपक्रम म्हणून या संमेलनांनी  लक्षणीय योगदान दिले.शतकभराचा चिकीत्सक शोधपट अभ्यासकांना श्रीमंत करून गेला.
गेली काही वर्षे ख्यातनाम लेखक राजन खान पाचगणीजवळ खिंगर येथे पावसाळ्यात ३ दिवसांचे अनौपचारिक साहित्य संमेलन भरवित असतात.कोणतीही आखीव रेखीव कार्यक्रम पत्रिका नसूनही मोठेमोठे लेखक आणि रसिक गोळ्यामेळ्याने इथे साहित्याचा आनंद घेतात.खूप मजा येते.हे भन्नाट साहित्य शिवार आता भलतेच जोमात फुलले आहे. पुण्यात आणि इतर अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडतात.जगातल्या उत्तमोत्तम  चित्रपटांची ही महापर्वणी म्हणजे चित्रपट रसिकांची दिवाळीच असते.अभिरूचीला पैलू पाडणारे हे पर्व मनाची कवाडे सताड उघडायला भाग पाडते.
या चारही मौलिक कार्यक्रमांचा संगम घडवण्याची अनोखी किमया कृषिवलच्या या परिषदेने साधली होती.
नेटका आणि विचारगर्भ उद्घाटन सोहळा, ३ ज्वलंत आणि संवेदनशील विषयांवरील परिसंवाद, लघुपट महोत्सव, कवीसंमेलनम आणि पुस्तक लोकार्पण सोहळा अशा भरगच्च कार्यक्रमांनी पहिला दिवस संस्मरणीय ठरला.
दादू:एक नि:शब्द हुंदका{दिग्दर्शक:किरण साष्टे}, पंचगंगा:द जर्नी{दिग्द. अनुप जत्राटकर} या २ लघुपटांनी पर्यावरण प्रदूषणाचे नदी,समुद्र नी मासेमारीवर होणारे विपरित परिणाम कलात्मक पद्धतीने ताकदीने टिपले होते. लाइफ सर्कल{दिग्द.प्रथमेश इनामदार} या लघुपटाने मानवी भलेपणातून अनाथांना मायेची पाखर घालणारे "माझे घर"ची भेट घडवून आणली.दर्जेदार निर्मितीमूल्ये, पकड घेणारी कथा, भिडणारी मांडणी यामुळे या युवा दिग्दर्शकांनी फार मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत.दादुची व्यथा तर काळजाला आरपार भेदून जाते.वेळेअभावी या दिग्दर्शकांशी चर्चा होऊ शकली नाही याची रुखरुख वाटत राहिली.
"ही जात का जात नाही?" या परिसंवादातील प्रा.जी.एस.भोसले, भगवान दातार,निलेश येलगुंडे,आलोक जत्राटकरा अणि जगदीश मोरे यांची मांडणी अंतर्मुख करणारी होती. ताजे टवटवीत चिंतन, प्रांजळ आत्मपरिक्षण,सखोल व्यासंगातून आलेले संदर्भ आणि वर्तमानातील सगळी गुंतागुंत चिमटीत पकडणारी ही चर्चा खूप काही टोकदार असे देउन गेली.खरेतर हा वादग्रस्त आणि ज्वलंत विषय असतानाही वादाऎवजी निखळ संवाद घडला हे एक आश्चर्यच म्हटले पाहिजे.
"माझी बाईमाणसाची कहाणी" सांगितली, सुजाता पाटील, स्मिता थोरात, मधू निमकर, अश्विनी सातव-डोके, प्रियदर्शिनी मोरे-कदम, श्रद्धा वार्डे आणि स्मिता पाटील-वळसंगकर यांनी. कवयत्री,पत्रकार, उद्योजक,शासकीय अधिकारी, मुख्याध्यापिका,कार्यकर्ती आणि संपादक अशा विविध पदांवर नी  भुमिकांमध्ये काम करणार्‍या या महिलांनी स्त्री जीवनातील विविध समस्यांची गुंतागुंत अलगदपणे उलगडवून दाखवली.मतमतांतरे आली आणि अंतरविरोधही टिपले गेले.प्रश्न अनेकपदरी आहे आणि स्त्री-पुरूष दोघे मिळून झटल्याशिवाय तो मार्गी लागणार नाही अशा स्वरूपाची उमेद वाढवणारी ही चर्चा होती. स्त्री प्रश्नावरची चर्चा असल्याने त्यात स्त्रियाच बोलणार हे उचितच होते पण कवी संमेलनात जसे स्त्री-पुरूष दोघे सहभागी झालेले होते तसेच प्रत्येक परिसंवादात व्हायला हरकत नव्हती.
"लिहिल्याने काय फरक पडतो?" या चर्चेत वाचन आणि लेखन संस्कृतीने जगणे कसे सुंदर होते ह्यावर शाम जोगळेकर,राहूल कदम, विलास नाईक,बाळ सिंगासने,अभिजीत पेंढारकर, अशोक धुमाळ झकास बोलले.लिहिले नाही तर काय फरक पडणार आहे असा प्रश्न स्वता:ला विचारत या वक्त्यांनी चर्चेत अनेक रंग भरले. कविसंमेलनात दिलीप पांढरपट्टॆ यांनी आपल्या खेळकर शैलीने उंची कायम ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न केला.सुनील पाटील, हर्षवर्धन पवार,सुजाता पाटील,स्मिता पाटील-वळसंगकर आदींच्या कविता दर्जेदार होत्या. स्थानिक नवोदित कवींना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न स्तुत्य असला तरी त्यामुळे उत्तम कवितेसोबतच कविता कशी असू नये त्याचेही प्रात्यक्षिक मिळून जाते.
प्रतिम सुतारची मिमिक्री हे खास आकर्षण होते. डा.श्रीराम लागू, शरद पवार, राज ठाकरे, दिलीप प्रभावळकर यांच्या नकला अप्रतिम होत्या.
दुसर्‍या दिवशी पत्रकारितेतील बदलते प्रवाह सर्व ताकदीनिशी अनेक स्टार आणि ज्येष्ट पत्रकारांनी टिपले. एबीपी मा्झा चे प्रसन्न जोशी यांनी जोरदार बेटींग केली.दोन्ही दिवस न्या.यशवंत चावरे आणि कृषिवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांचा सहभाग खूपच महत्वाचा ठरला.परिषदेला दोन्ही दिवस जाणकार रसिक आणि दर्दी साहित्यप्रेमींनी उदंड गर्दी केली होती.
कृषिवलचे संपादक संजय आवटे हे तरूण पिढीतले व्यासंगी,साक्षेपी आणि सामाजिक प्रश्नांची सखोल जाणीव असणारे महत्वाचे संपादक आहेत. ते लिहितात जितके चित्रशैलीत तितकेच बोलतातही मार्मिक! त्यांची भाषणे ही एक मेजवाणीच होती.त्यांची या परिषदेमागची संकल्पना प्रत्यक्षात आणायला.त्यांना पूर्वतयारीसाठी फारसा वेळ मिळालेला नसतानाही ही परिषद त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्‍यांनी फार मोठ्या उंचीवर नेली.या परिषदेने एक नवी वाट चोखाळलेली आहे.आजवर कोणत्याही बड्या वर्तमानपत्रानेही न केलेला परिषदेचा असा पराक्रमी उपक्रम कृषिवलच्या टिमने उत्तुंग यशस्वी करून दाखवलेला आहे.
गेली ३ वर्षे चिमुकले कृषिवल मराठीतली "द हिंदू" ची जागा भरून काढण्याचा अटोकाट प्रयास करीत आहे.संजय आवटेंमध्ये ती क्षमता आहे.त्यांची सर्वंकष आणि दमदार वाटचाल बघता आणि या ऎतिहासिक परिषदेचे घवघवीत यश पाहता ते मराठी वर्तमानपत्रांमधले द हिंदू नक्कीच उभे करू शकतात अशी आशा करायला खूप जागा आहे.ही पेरणी नव्या पर्वाची आहे हे निर्विवाद!











महात्मा फुले वाडा:समाजक्रांतीचे उर्जाकेंद्र



आधुनिक भारताच्या सामाजिक जडणघडणीत महाराष्ट्राचा आणि विशेषत: पुण्याचा लक्षणीय वाटा आहे. १९ व्या शतकात पुणे हे भारतीय प्रबोधन चळवळींचे केंद्र होते.महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकहितवादी, न्या.रानडे, रमाबाई रानडे, पंडीता रमाबाई, आगरकर, महर्षि कर्वे,बायजा कर्वे, महर्षि शिंदे आदींनी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींना उर्जा पुरवली.पुण्यातील त्यावेळच्या जुन्या गंज पेठेतील  फुलेवाडा सुमारे ५० वर्षे सामाजिक चळवळींना रसद पुरवित होता.
या वाड्याच्या खाणाखुना पाहताना या अभिमानास्पद इतिहासाचे पोवाडे आपल्या कानात गुंजत राहतात.
पुर्व पुण्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक पर्यावरण संमिश्र आणि विविधतेने नटलेले आहे.सर्व जाती धर्मांचे कष्टकरी या भागात गोळ्यामेळ्याने राहत असतात. या वडीलोपार्जित घरातच जोतिराव फुल्यांचा ११ एप्रिल १८२७ रोजी जन्म झाला.मिशन‍र्‍यांच्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले. १८४८ साली त्यांनी देशातील  मुलींची पहिली भारतीय शाळा आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने भिडे वाड्यात सुरू केली तेव्हा सावित्रीबाई याच वाड्याचा उंबरठा ओलांडून सार्वजनिक जीवनात पहिले पाउल टाकत्या झाल्या.भारतीय स्त्रियांचे सार्वजनिक जीवन अशारितीने इथूनच सुरू झाले.भारतातील प्रौढ साक्षरता अभियान १८५४ साली याच वाड्यात सुरू झाले.रात्रीच्या स्त्री-पुरूषांच्या दोन पहिल्या शाळा याच वाड्यात काढण्यात आल्या.
विधवांच्या बाळंतपणाची सोय करणारे केंद्र आणि देशातील पहिला भारतीय माणसांनी चालवलेला अनाथाश्रम{बाल हत्त्या प्रतिबंधक गृह} इथेच सुरू झाला.अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाला पाण्याचा हक्क दॆणारा पहिला हौद याच वाड्यात आहे. १८७३ साली याच घरात स्थापन करण्यात आलेला सत्यशोधक समाज देशातील सर्वदूर ग्रामीण भारतात पसरलेले पहिले जनआंदोलन  ठरले. इथे बसूनच जोतीरावांनी मराठीतील पहिले आधुनिक नाटक "तृतीय रत्न" लिहिले. १८६९ साली शिवरायांचा पोवाडामय चरित्रपट इथेच निर्माण झाला.अमेरिकेतील निग्रोंच्या मुक्ती चळवळींना अर्पण करण्यात आलेला "गुलामगिरी" हा ग्रंथ इथेच जन्माला आला.शेतकर्‍यांचा असूड आणि सार्वजनिक सत्यधर्माचे क्रांतिकारक तत्वज्ञान इथेच साकारले.आयुष्यातील ५०वर्षे सामाजिक परिवर्तनाची लढाई लढून जोतीराव -सावित्रीबाईं दोघांचेही पार्थिव इथेच विसावले.जोतीरावांची समाधी याच वाड्यात आहे.
१९६७ साली सरकारने हे घर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले.१९९३ साली छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून त्याची पुनर उभारणी करून ते राष्ट्रपती डा.शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले.या वाड्याला राष्ट्र्पतींनी समतेचे राष्ट्रतीर्थ म्हणून "समता भुमी" घोषित केले.
सुमारे १४० वर्षे जुन्या असलेल्या या वाड्यात जोतीरावांचे वडीलोपार्जित घर,ज्याचा जुना गंज पेठ,घर नं.३९५, होता ते आणि त्यांनी स्वकष्टार्जित कमाईतून खरेदी केलेले घर यांचा समावेश आहे.जोतीरावांच्या नोंदणी केलेल्या मृत्युपत्रात त्यांनी या घराचे सर्व तपशील दिलेले आहेत.
यातले त्यांनी नवे बांधलेले घर ११खणांचे होते.त्याची दक्षिण-उत्तर लांबी ६५ फूट असून दक्षिणेकडील पुर्व पश्चिम रूंदी ४५ फूट होती. तर उत्तरेकडील रुंदी २८फूट होती.त्याच्या पुर्वेला रस्ता, पलिकडे तुंबडीवाले बैराग्याची आणि बापूभाई पिठवाल्याची घरे,पश्चिमेला बोळापलिकडे राजाराम गोविंदराव फुले यांची २घरे, दक्षिणेला बोळापलिकडे रामचंद्र किसन कुंभार यांचे घर व बाबाजी राणोजी फुले यांची बखळ,तसेच उत्तरेला रस्ता आणि नगरपालिकेचे पाण्याचे दोन हौद होते.यातील काही जागा वडीलोपार्जित, काही जोतीरावांनी लिलावात खरेदी केलेली, तर काही खरेदीद्वारे घेतलेली होती.जोतिरावांचे घर नं. ३९४, हे ३खणांचे दीड मजल्याचे होते.त्याची ओट्यासकट पुर्वपश्चिम लांबी ३२ फूट आणि दक्षिण-उत्तर रुंदी १६ फूट होती.त्याच्या पुर्वेला रा. कि.कुंभार,पश्चिमेला खंडोजी कृष्णाजी व बाबाजी राणोजी फुले, दक्षिणेला सटवाजी कृष्णाजी फुले यांची घरे तर उत्तरेला बा.रा.फुले यांची बखळ होती. जोतीरावांची स्वता:ची खरेदी केलेली बखळ जागा ४३फूट लांबी २८ फूट रुंद होती.याशिवाय आणखी २ बखळ जागा त्यांनी विकत घेतलेल्या होत्या.त्यांच्या पुर्वेला राजाराम फुले, पश्चिमेला महंमद मीरखान , दक्षिणेला हरीबा फुले, उत्तरेला भोपाजी कुंभार यांची घरे होती. जोतिरावांच्या या घरांना नगरपालिकेने वेळोवेळी दिलेले घर नंबर पुढीलप्रमाणे होते, ३९५,४०५, ३९४,३७७,५२७,४०८,जुना गंज पेठ. १८९४ पर्यंत ही घरे जोतीरावांच्या नावे होती. पुढे१९०७ पर्यंत ती यशवंत फुले, त्यानंतर ती १९०९ ते १९१० याकाळात चंद्रभागा यशवंत फुले यांच्यानावे होती.त्यांनी २८ आक्टोबर१९१० ला ही वास्तू देडगेना रु.१००ना विकली.त्यामुळे १९१२ पासून मारूती कृष्णाजी देडगे यांच्यानावे ही घरे होती.त्यांच्याकडून ती १९२३ पासून सावतामाळी फ्री बोर्डींगने खरेदी केली.१९६७ साली महाराष्ट्र सरकारने ही घरे ताब्यात घेतली. असा सगळा प्रवास झाला.
याच घराच्या स्नानगृहाची डागडुजी आणि दुरूस्ती करण्यासाठी त्यांनी पुणे नगरपालिकेकडे परवानगी मागणारा अर्ज केलेला होता.तेव्हा {१८७६ ते १८८३ या काळात} फुले  पुण्याचे आयुक्त होते.  आजच्या सत्ताधिशांच्या बेकायदेशीर बांधकाम मोहिमांच्या पार्वभुमीवर हे सारे अविश्वसनीय वाटावे असेच नाहीका? सार्वजनिक कार्याला आपली रोजगार हमी मानण्याचा तो काळ नव्हता.जोतीराव आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले.ते ख्यातनाम उद्योगपतीही होते.त्यांनी  शेअर मार्केट विपूल लेखन केलेले आहे.महात्मा जोतिराव फुले हे प्रामुख्याने समाजक्रांतिकारक, शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचे अद्याप पुरेसे लक्ष गेलेले नाही.
जोतीराव हे स्वत:च्या तेलाने जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते. वर्गणीवर समाजकार्य करण्याची प्रथा तोवर निर्माण झालेली नव्हती. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून त्यांनी समाजकार्य केले.ते ‘पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी’चे कार्यकारी संचालक होते. ही कंपनी बांधकाम आणि इतर व्यापारी क्षेत्रात कार्यरत होती. पुणे-नगर रस्त्यावरील येरवडय़ाचा (बंडगार्डन) पूल बांधण्याच्या १८६९ सालच्या कामाचे उपकंत्राट त्यांच्या या कंपनीला मिळालेले होते. या कामाला खडी, चुना, आणि दगड पुरविण्याचा मुख्य ठेका त्यांच्याकडे होता. १०० वर्षे मुदतीचा हा पूल आज १४४ वर्षांनंतरही मजबूत आहे. त्याचे रहस्य जोतीरावांच्या कंपनीने संचोटीने केलेल्या कामात आहे.
‘बिल्डर’ हा शब्द आज वेगळ्या अर्थाने प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्याने तो वापरताना काळजी घ्यावी लागते. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत,भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे सत्यशोधकांनी केलेली आहेत. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि भागीदारही होते. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेले आहे.जोतीरावांच्या कंपनीने केलेली महत्त्वाची कामे म्हणजे कात्रजचा बोगदा आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामे त्यांनी केली. त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली.
जोतीरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचेही काम केले जाई.  बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिले. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ प्रकाशित केले. या कंपनीचे पुस्तकविक्री केंद्र होते. सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतीरावांकडे होती. ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतीरावांचा नावलौकिक होता. सामाजिक कार्यकर्ता आणि यशस्वी उद्योगपती असे कॉम्बिनेशन फार विरळेच म्हटले पाहिजे.
स्वत:च्या शाळांमध्ये त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून सर्व मुला-मुलींना शेती व उद्योगाचे शिक्षण सक्तीचे केले होते.kAn Industrial department should be attached to schools in which children would learn useful trades And crafts and be able on leaving school to maintain themselves comfortably and independentlyl ही त्यांची भूमिका होती. दीडशे वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात.द्रष्टे शिक्षणतज्ञ म्हणून जोतीरावांची प्रस्तुतता आजही कमी झालेली नाही.सामाजिक न्यायासाठी त्यांनी शुद्र-अतिशुद्रांना आरक्षण देण्याची मागणी केली.
शेतकरी सुखी व्हायचा असेल तर उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव शेतीमालाला मिळाला पाहिजे. शेती आधुनिक पद्धतीनेच केली पाहिजे. शेतीला नळाद्वारे (ठिबक सिंचनाचे बीजरूप) पाणी पुरवठा केला पाहिजे. त्यासाठी धरणे, विहिरी, तलाव, तळी बांधली पाहिजेत, कायमस्वरूपी सिंचन सुविधा हवी, नैसर्गिक खते आणि संकरित बियाणे वापरली पाहिजेत.शेतीधंद्याला उद्योग, व्यापाराची जोड दिली पाहिजे. दूध, अंडी, लोकर असे पूरक उद्योग सुरू केले पाहिजेत. शेतीबरोबरच शेतक ऱ्यांनी उद्योग व व्यापारात उडी घेतली पाहिजे. एकटी शेती कधीच परवडत नसते. ‘शेतक ऱ्याचा असूड’ या पुस्तकात जोतीरावांनी शेतीविकासाचे संकल्पचित्र रेखाटले. व्यापारी पिके, कॅनालचे पाणी आणि आधुनिक पीक पद्धती यांचा आश्रय घेणे कसे गरजेचे आहे ते पटवून देतात. या घरातून त्यांनी उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिक क्षेत्रातील लक्षणीय कामगिरी केली.
१८७६ ते १८८३ याकाळात ते पुण्याचे आयुक्त {कमिशनर} होते. घरोघरी बंद नळाद्वारे पाणी पुरविण्याची योजना यशस्वी करण्यासाठी ते झटले.उत्तम रस्ते, शाळा, आरोग्य, शहर स्वच्छता यावर त्यांचा भर होता.गव्हर्नरच्या स्वागतावर अनाठायी पैसा उधळण्याला तसेच मंडईच्या बांधकामाला त्यांनी विरोध केला.त्याच पैशाचा वापर शिक्षणासाठी करावा असा त्यांचा आग्रह होता.
 भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतीरावांचेच प्रोत्साहन होते.टिळक-आगरकरांना पहिल्या तुरुंगवासात जामीन द्यायला आणि सुटकेनंतर त्यांचा मानपत्र देवून सत्कार करण्यातही तेच दोघे पुढे होते.१८६९ साली जोतीरावांनी शिवचरित्र लिहिले. १८८५ साली  त्यांनी देशात पहिल्यांदा शिवजयंती उत्सव सुरू केला. रायगडवरील शिवसमाधीची डागडुजी केली आणि शिवरायांना महानायक म्हणुन लोकमाणसात प्रस्थापित केले. पुण्यात हिराबागेत आणि मुंबईला लालबाग-परळ भागात करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमांच्या नोंदी उपलब्ध आहेत.
.........................................................................................





Sunday, June 9, 2013

महाराष्ट्राची दिल्लीत नवी ओळख - भव्यतम लेणे










दिल्लीतील नविन महाराष्ट्र सदनाचे उद्घाटन नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते झाले.दिल्लीतील लाल 
किल्ला,राष्ट्रपती भवन,संसद भवन यासारख्या दिमाखदार वास्तूंच्या यादीत महाराष्ट्राने ही नवी भर घातली आहे.लालकिल्ला,फतेपुर शिक्री ,ताजमहाल इथली भव्यता आणि कलात्मकता काळजाला भावते. या पार्श्वभुमीवर नविन महाराष्ट्र सदनाची वैभवशाली आणि दिमाखदार भव्यता आणि कलात्मकता मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहात नाही.
आपला पुण्याचा शनिवारवाडा आग्र्याच्या लाल किल्ल्यापुढे खुजा वाटतो.आपली राज्यातील बरीच बांधकामे अगदीच चिमुकली असतात.सरकारी कार्यालये म्हणजे तर ओंगळवाण्या बांधकामाचे नमुनेच असतात.या पार्श्वभुमीवर छगन भुजबळ यांच्या कलात्मक आणि भव्य सौंदर्य दृष्टीतून साकारलेले हे सदन बघून महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावते.
आपल्या ऎतिहासिक वाड्यांमधील शिसवी लाकडातील नक्षीदार कलाकुसर आणि महिरप या सदनात साक्षात पाषाणात उभी करण्यात आलीय. ऎतिहासिकता आणि आधुनिकता यांचा अद्वितीय मिलाफ हे या सर्व कामांचे ठळक वैशिष्ट्य आहे.हे महाराष्ट्र सदन बघुन कोणालाही आता  महाराष्ट्र बघायलाच हवा अशी ओढ निर्माण व्हावी ह्या हेतुनेच हे सारे उभे केल्याचे पदोपदी जाणवते.ही अपार चुंबकशक्ती पर्यटकांना महाराष्ट्र भुमीत खेचुन आणल्याशिवाय राहणार नाही असेच हे अद्वितीय वास्तुशिल्प आहे.जणु सह्याद्रीची सगळी भव्यता या सदनात एकवटली आहे.या सदनाचे खास आकर्षण आहे,भव्य ग्रंथालय,महाराष्ट्राच्या समग्र संस्कृतीचे दर्शन घडविणारे संग्रहालय आणि आधुनिक चित्र,शिल्प,साहित्य,संगित,नाट्यविषयक प्रदर्शनी लावण्यासाठी कलादालन.
वास्तुकला आणि वास्तुशास्त्र यांच्या क्षेत्रात महाराष्ट्राने   मोठे योगदान दिलेले आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा म्हणून अनेक भव्य राजवाडे, कलात्मक घरे आणि देखण्या इमारती दाखविता येतात. या वारशाचे जतन आणि संवर्धन करताना, त्याचप्रमाणे नवीन बांधकाम करताना उपयोगिता आणि सौंदर्य-दृष्टी यांचा मेळ घालण्याचा  प्रयत्न महत्वाचा असतो. सदनाचे बांधकाम करताना महाराष्ट्रातील नेवासा पाषाण, राजस्थानातील बन्सी पहाडपुर स्टोन आणि जगप्रसिद्ध इटालियन मार्बल यांचा वापर करण्यात आला आहे.वास्तुशिल्पांचे कलात्मक नमुने म्हणुन प्रसिद्ध असलेल्या पुणे,सातारा,नाशिक,इंदोर, महेश्वर आदी ठिकाणचे ऎतिहासिक वाडे,राजवाडे,महाल,हवेल्या अश्या नामांकीत वास्तुंचा सखोल अभ्यास करुन ती शैली इथे वापरण्यात आलेली आहे.मात्र हे बांधकाम म्हणजे केवळ प्रतिकृती होवु नये,ते एक भव्यतम लेणे व्हावे याची दक्षता घेण्यात आली आहे.त्यामुळेच प्रवेशद्वारावरील मेघडंबरी, पोर्चची भव्य आणि देखणी कमान,मुख्य प्रवेशद्वारातुन आत आल्यानंतरची थक्क करणारी विशालकाय स्वागतिका, थुईथुई नाचणारे मोर आणि समोर असलेली महाराष्ट्र मुद्रा. भव्य झुंबरे,महिरपा आणि सज्जे, होळकरी वास्तुशिल्पाची उत्कटता जिवंत करणारी भली थोरली रुंदच रुंद मार्गिका. राज्यपाल आणि मुख्यमंत्री महोदयांचे शामियाने शोभावेत असे सुसज्ज कक्ष .कुठल्याही राजवाड्यातील दरबार हा‘‍लची स्मृती जागे करणारी ऎतिहासिक पण आधुनिक सभागृहे,सारेच मराठेशाहीच्या वैभवशाली दौलतीची आठवण करुन देणारे बांधकाम.
सिरमूर प्लॉट, कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली हा भूखंड तत्कालीन ब्रिटीश सरकारने हिमाचल प्रदेश येथील सिरमूर महाराज यांना 1930 साली वाटप केला होता. त्यामुळे सदर भूखंडाचे नांव ‘सिरमूर प्लॉट’ असे झाले. 1932 साली हा भूखंड बडोद्याचे सयाजीराव महाराज यांनी विकत घेतला. दुसऱ्या महायुध्दाच्या वेळी संरक्षण मंत्रालयाने सेना अधिकाऱ्यांच्या वापराकरिता आणि इमारतींच्या बांधकामासाठी सदर भूखंड आपल्या ताब्यात घेतला. तो 1999 पर्यंत केंद्र सरकारच्या ताब्यात होता. 1951 साली केंद्र सरकारने दिल्लीतील राजघराण्यांच्या सर्व मालमत्ता, संबंधित राज्य सरकारच्या मालकीच्या असतील, असे घोषित केले. त्यामुळे, हा भूखंड तत्कालीन मुंबई सरकारच्या मालकीचा झाला. “बॉम्बे स्टेट रिऑर्गनायझेशन आक्टनुसार बॉम्बे स्टेटचे गुजरात आणि महाराष्ट्र असे विभाजन झाल्यानंतर, गुजरात राज्याबाहेरील  सर्व मालमत्ता महाराष्ट्र राज्याच्या ताब्यात आल्या. महाराष्ट्र सरकारला सदर भूखंडाच्या मालकीबाबत 1970 साली कळले. त्यानंतर केंद्र शासनाकडे भूखंडाचा ताबा घेण्याबाबत पाठपुरावा व प्रयत्न केल्यानंतर 10 मे 1999 रोजी 6.18 एकर भूखंडाचा ताबा, ‘आहे त्या स्थितीत’ महाराष्ट्र शासनाला देण्यात आला.
सन 2000 ते 2005 या कालावधीत वरील भूखंडावर अर्थसंकल्प किंवा खाजगीकरणाच्या माध्यमातून नवीन अत्याधुनिक सुविधा असलेले महाराष्ट्र सदन उभे करण्याचे काम  विविध अडचणींमुळे   झाले नाही.हा परिसर "ल्युटीयन्स झोनमध्ये" येत असल्याने येथे उंच इमारती बांधायला मनाई आहे.अंधेरी (प.) येथिल लिंक रोड शेजारील महाराष्ट्र शासन व प्रादेशिक परिवहन विभागाच्या ताब्यातील भूखंड झोपडपट्टीने वेढला होता.सदर भूखंडावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी प्राधिकरणाने मे. के.एच.चमणकर यांची खाजगी विकासक म्हणून नेमणूक केली होती.उपरोक्त झोपडपट्टी विरहित जागेवर उपलब्ध होणारे चटईक्षेत्र विकासकास देऊन, त्या बदल्यात रु.100 कोटी किंमतीची अनेक शासकीय  इमारतींची बांधकामे व 1000 कायम स्वरुपी संक्रमणकालीन निवासस्थाने, अशा एकत्रित प्रस्तावास मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीने दि.28 ऑगस्ट 2006 रोजी मान्यता दिली. य़ातून नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाची अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज इमारत, मुंबई येथील हाय माऊंट अतिथीगृहाची पुनर्बांधणी, प्रादेशिक परिवहन विभागाची कार्यालये, निवासस्थाने व इतर बांधकामे करण्याचा निर्णय घेण्यात आला.  त्यानुसार, महाराष्ट्र सदनाच्या नवीन इमारतीच्या कामाची दि.27 नोव्हेंबर 2006 रोजी सुरूवात झाली. सदर भूखंडावरील अतिक्रमणे, न्यायालयीन बाबी तसेच बांधकामासाठीच्या विविध परवानग्या मिळविण्यासाठी लागलेला वेळ, यामुळे बांधकामास विलंब झाला.
सदर प्रकल्पाचे वास्तुशास्त्रज्ञ मे.पी.जी.पत्की यांनी पुणे येथील विश्रामबाग वाडा, शनिवार वाडा, इंदौर व महेश्वर येथील होळकरांचे वाडे तसेच नाशिक व सातारा येथील ऐतिहासिक वास्तु-शिल्पांचा सखोल अभ्यास करुन महाराष्ट्राची संस्कृती आणि वारसा यांचे दर्शन घडविण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाची आखणी केली. त्यानुसार नवी  दिल्ली  येथील  इतर सर्व  राज्यांच्या  अतिथीगृहांच्या  तुलनेत  अव्वल दर्जाचे महाराष्ट्र सदन उभे राहिले. ही संपूर्ण इमारत सेंट्रली एसी आहे.
महाराष्ट्र सदनाच्या नवीन इमारतीचे बांधकाम 1,70,707 चौ.फु. इतके असून त्यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री यांचेकरीता विशेष कक्ष आहेत. मंत्री व राज्यमंत्री यांच्याकरीता 24 तर मुख्य सचिव व अप्पर मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकरिता 6 कक्ष असून  आमदारांकरिता 20 कक्ष तयार करण्यात आले आहेत. 80 साधारण कक्ष, अपंगांकरिता 2 विशेष कक्ष आणि कर्मचाऱ्यांकरिता 4 कक्ष असे एकूण 138 कक्ष उभारण्यात आले आहेत. या  नवीन  इमारतीमध्ये  अत्याधुनिक  सुविधांसह  एक मोठे सभागृह, स्वतंत्र व्हिडीओ कॉन्फरन्स कक्ष तसेच 5 बैठक कक्षांसह एक पत्रकार परिषद कक्ष देखील आहे. तसेच व्ही.आय.पी.भोजनकक्ष, सामान्य भोजनकक्ष, सांस्कृतिक केंद्र, संग्रहालय, वाचनालय, सुसज्ज व्यायामशाळेसह ३६० गाडयांकरिता पार्किंगची सोय देखील करण्यात आली आहे.
या सदनाच्या प्रांगणात राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पुर्णाकृती पुतळे उभारण्यात आले असून सदनात राजर्षी शाहू महाराज व यशवंतराव चव्हाण यांचे पुर्णाकृती तर सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांचे अर्ध-पुतळे बसविण्यात आले आहेत.
स्मारकाची उभारणी महाराष्ट्रातील वैभवशाली वास्तु-शिल्प, कला, संस्कृती यांच्याआधारे करण्यात आली आहे. उपयोगिता आणि सौंदर्यदृष्टी यांचा मेळ साधून एक भव्य असे “श्रेष्ठ वास्तुशिल्प”  दिल्लीत साकारले आहे.महाराष्ट्राची ही वास्तूमुद्रा दिल्लीत महाराष्ट्राची मान आणि शान उंचावल्याशिवाय राहणार नाही.
................................................................