Friday, February 28, 2014

मराठी अभिजातच


 







प्रा.हरी नरके,
समन्वयक - अभिजात मराठी भाषा समिती, महा.शासन.
...........................................................
दहा वर्षांपुर्वी केंद्र सरकारने तंमीळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.त्यानंतर संस्कृत, तेलगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांनी हा दर्जा पटकावला. गेल्या आठवड्यात उडीयाने ही मान्यता मिळवली.त्यामुळे मराठीचे काय झाले हा प्रश्न विचारला जाऊ लागला. "अभिजात मराठी समितीला मायमराठीचे प्राचीनत्त्व केंद्रापुढे मांडता आलेले नाही," "केंद्र सरकारच्या भाषा समितीने मराठी भाषेचे अभिजातपण स्वीकारले नाही" अशा अफवा पसरवल्या जाऊ लागल्या.खरेतर आमच्या समितीने जुलै २०१३ मध्येच मराठीच्या प्राचिनत्त्वाचे असंख्य पुरावे मराठी अहवालातून केंद्राला सादर केले असून या अहवालाचा इंग्रजी अनुवादही समितीने नोव्हें.२०१३ मध्ये ग्रंथरूपाने सादर केलेला आहे. केंद्रीय पातळीवरील तज्ञांच्या तो विचाराधीन असून फार लवकरच मराठीला अभिजात दर्जा दिला जाईल याची आम्हाला संपुर्ण खात्री आहे.
नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम,  महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, सानेगुरूजी, लक्ष्मीबाई टिळक, मालती बेडॆकर, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, गडकरी, आगरकर, टिळक, रानडे,लोकहितवादी, उद्धव शेळके, नारायण सुर्वे, शिवाजी सावंत, पुल, अत्रे, चिंवी,नामदेव ढसाळ, बाबूराव बागुल, विजय तेंडूलकर, विंदा, कुसुमाग्रज, खांडेकर,यांच्या मराठीचे श्रेष्ठत्व स्वयंभू आहे.
.....................................................................
या विश्वात खूप जैवविविधता आहे.माणूस हा विचारशील प्राणी आहे. अर्थातच प्रत्येक माणूस आपल्या भाषेतून विचार करतो.भाषा ही माणसांची अस्मिता नी एकप्रकारचे ओळखपत्र असते.आपापल्या मायबोलीचा प्रत्येकाला अभिमान असतो.माणूस भाषेच्या माध्यमातून ज्ञाननिर्मिती करतो. साहित्य, विचार, तत्वज्ञान यांच्याद्वारे संस्कृतीची जनुकं एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे वाहून नेण्याच्रे मोलाचे काम होत असते.संशोधक असं सांगतात की लक्षावधी वर्षांच्या मानवी प्रवासात सुमारे ७० हजार वर्षांपुर्वी माणसाने भाषा पहिल्यांदा जन्माला घातली.पुढे जगभरात हजारो भाषा निर्माण झाल्या. आज जगभरात प्रंचंड मोठी भाषक विविधता असून तिचे जतन करण्याची गरज आहे. जगात आज छोट्यामोठ्या २० हजार भाषा असून त्यातल्या मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणार्‍या भाषांची संख्या सुमारे २००० आहे.त्यातल्या ३०% भाषा एकट्या भारतात आहेत. १९०७ साली ग्रियरसनच्या नेतृत्वाखाली पहिले भारतीय भाषा सर्व्हेक्षण झाले.२०१३ साली गणेश देवी यांच्या पुढाकाराने नवे सर्व्हेक्षण सुरू झालेले आहे.
दहा वर्षांपुर्वी केंद्र सरकारने तंमीळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.त्यानंतर संस्कृत, तेलगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांनी हा दर्जा पटकावला. गेल्या आठवड्यात उडीयाने ही मान्यता मिळवली.त्यामुळे मराठीचे काय झाले हा प्रश्न विचारला जाऊ लागला. "अभिजात मराठी समितीला मायमराठीचे प्राचीनत्त्व केंद्रापुढे मांडता आलेले नाही," "केंद्र सरकारच्या भाषा समितीने मराठी भाषेचे अभिजातपण स्वीकारले नाही" अशा अफवा पसरवल्या जाऊ लागल्या.खरेतर आमच्या समितीने जुलै २०१३ मध्येच मराठीच्या प्राचिनत्त्वाचे असंख्य पुरावे मराठी अहवालातून केंद्राला सादर केले असून या अहवालाचा इंग्रजी अनुवादही समितीने नोव्हें.२०१३ मध्ये ग्रंथरूपाने सादर केलेला आहे. केंद्रीय पातळीवरील तज्ञांच्या तो विचाराधीन असून फार लवकरच मराठीला अभिजात दर्जा दिला जाईल याची आम्हाला संपुर्ण खात्री आहे.
गरज आहे ती मराठी माणसांनी आपला ऎतिहासिक न्यूनगंड आणि भाषक करंटेपणा झटकून मराठीचे ला‘बिंग आणि मार्केटिंग करण्याची.बारा कोटी लेकरं एकमुखानं मराठीच्या बाजुनं बोलू लागली तर मराठीला यापासून जगातली कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही.अर्थात मराठी माणसांची अभिरूची इतकी संपन्न आहे की मराठीला वेगळ्या विरोधकांची गरजच नाही.अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी ही जगातली दहाव्या क्रमांकाची भाषा आहे.मराठी ही ज्ञानभाषा आणि महानुभवांची धर्मभाषा आहे. मराठी मातृभाषा असणार्‍या सातवाहन आणि मराठे यांचे राज्य भारतभर तर होतेच पण  पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानावरही मराठीभाषेची  पताका फडकत होती. मराठी बोलणारे लोक आज देशाच्या ३६ ही राज्य आणि प्रदेशात व जगातल्या १०० देशांमध्ये महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. ही फक्त एका प्रांताची भाषा नसून, ती महत्त्वाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषा आहे. मराठीत दरवर्षी सुमारे अडीच हजार पुस्तके प्रकाशित होतात. कोश वांग्मयाच्या बाबतीत मराठी जगातली दुसरी समृद्ध भाषा आहे. पाचशे दिवाळी अंक निघतात आणि छोटीमोठी सुमारे दोनशे पन्नास साहित्य संमेलने होतात. नामवंत खासगी प्रकाशन संस्था आणि सरकारी प्रकाशने यांची वार्षिक उलाढाल व पाठ्यपुस्तके, धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारे अडीचशे कोटींपर्यंत आहे.बालभारती ही जगातील सर्वात मोठी प्रकाशन संस्था असून  ती दरवर्षी १९ कोटी पुस्तके छापते. देशातील एकूण ग्रंथालयांपैकी २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत. लोकराज्य हे भारतातले नंबर एकचे मासिक आहे.
अभिजात भाषा म्हणजे अभिजनांची  भाषा किंवा उच्चवर्णियांची तथा उच्च कुलीणांची भाषा असा भ्रम आपण आजवर जोपासत आलो आहोत. अभिजाततेचा सर्वाधिक महत्वाचा निकष आहे, भाषेची आणि साहित्याची श्रेष्ठता. भाषेचे वय सांगणारे लिखित दस्तावेज दीड हजार वर्षांचे असावेत,भाषिक आणि वाड्मयीन परंपरा स्वतंत्र आणि स्वयंभू असावी, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात  खंड असला तरी त्यात नाते असावे हे उर्वरित निकषही मराठी पूर्ण करते.
मराठी ही संस्कृतोद्भव भाषा नाही.ती संस्कृतपेक्षाही जुनी आहे हे १८८५ सालीच राजारामशास्त्री भागवत यांनी दाखवून दिलेले आहे. श्रीधर व्यंकटेश केतकर, ल.रा.पांगारकर, शं.गो.तुळपुळे, अ‘न फेल्डहाऊस,वि.भि.कोलते आदींनी मराठीचे वय दीड हजार वर्षांपेक्षा जास्त असल्याचे असंख्य पुरावे दिलेले आहेत.ज्ञानेश्वरी,लिळाचरित्र,विवेकसिंधू हे मराठीतले आद्य ग्रंथ आहेत असे आम्ही अडाणीपणाने सांगतो. एव्हढे श्रेष्ठ ग्रंथ बालवयात कोणतीही भाषा कशी प्रसवू शकेल? ’गाथा सप्तसती’ हा दोन हजार वर्षांपुर्वीचा ग्रंथ हा मराठीतला आद्यग्रंथ आहे.एक होता कावळा आणि एक होती चिमणी. चिमणीचे घर होते मेणाचे...प्रत्येक मराठी घरांत सांगितली जाणारी ही गोष्ट. लीळाचरित्रात आलेली असली तरी त्यापूर्वी किमान हजार वर्षे ती लोकपरंपरेत होती.तमिळ भाषेत संगम साहित्य हे अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याचा काळ सुमारे २६०० ते २३०० असा आहे. या साहित्यातही मराठी भाषक लोकांचा उल्लेख आहे. गोदावरी नदीवर धरण बांधण्यासाठी जगभरातून तंत्रज्ञ आले. त्यात मराठीत बोलणारे गवंडी कामात अतिशय प्रवीण आहेत, असे मराठी लोकांबद्दलचे वर्णन सापडते. सातवाहन काळातील एक शिलालेख जुन्नर येथील नाणेघाटात सापडला आहे.२२२० वर्षापूर्वींच्या ब्राह्मी लिपीतील या शिलालेखात   "महारठीनो" असा उल्लेख आहे.
विनयपिटक या पाली भाषेतील बौद्ध धर्मग्रंथात तसेच दिपवंश आणि महावंश या श्रीलंकेतील सिंहली ग्रंथात महारट्ठचा उल्लेख सापडतो.लिहले. दुसर्‍या शतकात वररूचीने ‘प्राकृतप्रकाश’ हा व्याकरण ग्रंथ लिहला. पैशाची, शौरसेनी, मगधी, पाली, महाराष्ट्री या प्रमुख प्राकृत भाषा असून, या सर्वांना मराठीचे नियम लागू पडतात, असा नियम त्यांनी सांगितला आहे. जम्मू-काश्मीरच्या गुणाढ्य याने बृहतकथा हा ग्रंथ पैशाची भाषेमध्ये लिहिला. तो मूळचा वत्सगुल्म म्हणजे वाशिमचा होता. त्यात तो मराठीचा मुक्तहस्ते वापर करतो. हेमचंद्र हा व्याकरणकारही मराठीचे अनेक दाखले देतो. ७व्या शतकातले  हरिभद्र आणि उद्योत्तन सुरी हे मराठीचे अभिजात साहित्यकार आहेत. संस्कृत कवी शुद्रक, महाकवी कालीदास यांनीही मराठीचा वापर केलेला आहे. महाभारतात असंख्य मराठी शब्द आहेत. यज्ञमंडपात मराठीतून बोलायला बंदी घालण्यात आलेली होती याचाच अर्थ हे पंडीत खाजगीत मराठीत बोलत असत, हे स्पष्ट आहे.
हॉर्वड विद्यापीठातील मिखाईल विट्झेल यांनी ‘ट्रेसिंग द वैदिक डायलेक्ट्स’ या ग्रंथात संस्कृत ही वैदिकपूर्व बोलीभाषेतून जन्माला आली असल्याचे दाखवले आहे. मराठी, अपभ्रंश आणि महाराष्ट्री प्राकृत या तीन वेगळ्या भाषा नसून एकाच भाषेची ती तीन वेगवेगळी नावे असल्याचे शेकडो पुरावे आहेत.मराठी{महारठी, महाराष्ट्री} चा जन्मही अशाच एका वैदीकपुर्व बोलीतून झालेला आहे.यावरून मराठीची आई आणि संस्कृतची आजी ह्या बहीणी होत्या असे दिसते. मराठीने संस्कृतकडून जरूर घेतले पण दामदुप्पट परतही केले.आजच्या मराठीवर इतर प्राकृत भाषा, पर्शियन आणि द्राविडीभाषा यांचा प्रभाव आहे. तथापि मराठीचे अस्सल जे आहे ते जगातल्या इतर कोणत्याही भाषेत नाही. म्हणूनच संत एकनाथ विचारतात, " संस्कृतवाणी देवे केली मग प्राकृत काय चोरापासून झाली?"
नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम,  महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, सानेगुरूजी, लक्ष्मीबाई टिळक, मालती बेडॆकर, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, गडकरी, आगरकर, टिळक, रानडे,लोकहितवादी, उद्धव शेळके, नारायण सुर्वे, शिवाजी सावंत, पुल, अत्रे, चिंवी,नामदेव ढसाळ, बाबूराव बागुल, विजय तेंडूलकर, विंदा, कुसुमाग्रज, खांडेकर,यांच्या मराठीचे श्रेष्ठत्व स्वयंभू आहे.
.................................

No comments:

Post a Comment