Tuesday, July 29, 2014

"गुणवत्तेच्या जोरावर मुसंडी मारा, आरक्षण नाकारून झेप घ्या"

"गुणवत्तेच्या जोरावर मुसंडी मारा, आरक्षण नाकारून झेप घ्या"
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रा. हरी नरके यांचा सल्ला
पुणे दि. २७: {विजय लडकत यांच्याकडून}
"यशस्वी होण्यासाठी आजच्या मागासवर्गीय तरूणांनी ज्ञान आणि कौशल्ये यांच्या जोरावर झेप घ्यावी, आरक्षणाचं आता काही खरं नाही, ते संपल्यातच जमा आहे. यशाला शो‘र्टकट नसतो. मेहनत, अपार परिश्रम आणि जिद्द यांच्याशिवाय आता दुसरा कोणताही पर्याय नाही. जागतिकीकरणात खाजगीकरणामुळे सरकारी क्षेत्र संपत चालले आहे. खाजगी क्षेत्रात कोणतेही आरक्षण नाही. आपण आरक्षणाचे समर्थक होतो, आहोत, राहू, मात्र ते फक्त दुर्बलांना मिळायला हवे. यापुढे विरोध, घुसखोरी, अतिक्रमण आणि अपहरण यामुळं आरक्षण शुन्यवत होणार हे ओळखून  आरक्षणाशिवाय जगायची सवय करून घ्या," असा सल्ला आज येथे प्रा. हरी नरके यांनी दिला.ते दरोडे सभागृहात महात्मा फुले मंडळाने आयोजित केलेल्या गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते.अध्यक्षस्थानी कमल ढोलेपाटील होत्या. यावेळी महापौर चंचला कोद्रे,स्थायी समितीचे अध्यक्ष बापूसाहेब कर्णे, कृष्णकांत कुदळे,माध्यमिक शिक्षण विभागप्रमुख मीनाक्षी राउत,सुनिल पाषाणकर, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यशस्वी झालेले निखील पिंगळे, उपस्थित होते. बाबुराव धायरकर आणि चांगदेव पिंगळे व त्यांचे सहकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची भरगच्च उपस्थिती होती.
प्रा. नरके पुढे म्हणाले, " जातीची ओळख सोडून द्या. आजचे जग स्पर्धेचे आहे. संगणक आणि सोशल मीडिया यांच्याशी मैत्री करा. ग्रंथांशी झुंज घ्या. कोणतेही काम हलके मानू नका. घाम गाळायची लाज वाटू देऊ नका. चोरी, भ्रष्टाचार, भिक आणि लाचारी यांची नफरत बाळगा. जोतीराव-सावित्रीबाईंचा वारसा पुढे चालवायचा असेल तर स्त्री-पुरूष समता, ज्ञाननिर्मिती,चिकित्सा, जातीनिर्मुलन यांची कास धरा.आपल्यापेक्षा जे दुबळे आहेत त्यांना मदतीचा हात द्या.जातीपाती गाडा. सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय एकात्मता यांच्यावर प्रेम करा.आपली स्वत:ची खणखणीत मोहोर निर्माण करा. जग तुमची दखल नक्की घेईल."
यावेळी अध्यक्ष कमल ढोलेपाटील, महापौर चंचला कोद्रे,स्थायी समितीचे अध्यक्ष बापूसाहेब कर्णे, कृष्णकांत कुदळे, सुनिल पाषाणकर, आणि लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ३५३वा क्रमांक मिळवलेल्या निखील पिंगळे यांचीही   भाषणे झाली.





[महेश जांभुळकर यांच्याकडून]
महात्मा फुले मंडळाच्यावतीने माळी समाजातील दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह व पुष्पगूछ देऊन जेष्ठ विचारवंत हरि नरके यांच्याहस्ते गुणगौरव करण्यात आला . शिवाजीनगरमधील बी. एम. सी. सी. कॉलेजजवळील महात्मा फुले वसतिगृहाच्या दादासाहेब दरोडे हॉलमध्ये हा एस. एस. सी. विद्यार्थी गुणगौरव समारंभ पार पडला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कमल ढोलेपाटील , महापौर चंचला कोद्रे , दि. सासवड माळी शुगर कारखान्याचे अध्यक्ष कृष्णकांत कुदळे , स्थायी समिती अध्यक्ष बापूसाहेब करणे , चंद्रकांत दरोडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शैलजा जगताप , यु. पी. एस. सी. उत्तीर्ण निखिल नंदकुमार पिंगळे , महात्मा फुले वसतिगृहाचे विश्वस्त सुनील पाषाणकर , महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष चांगदेव पिंगळे , बाबुराव धायरकर , माळी आवाजाचे विजयकुमार लडकत आदि मान्यवर उपस्थित होते .
      यावेळी जेष्ठ विचारवंत हरि नरके यांनी सांगितले कि , यशाला कोणताही शोर्टकट नाही , आपण सर्व जण मेहनतीने यश प्राप्त केले आहे , त्यामुळे आपल्या भावी यशामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी केलेले बहुमोल कार्य विसरू नका , त्यांचे विचारांनी आपली वाटचाल करा आपण नक्कीच यशाचे आणखी शिखरे जिंकाल , आज त्यांचे पुणे विद्यापीठाला दिले आहे , यातून त्याच्या कार्याची आपणास प्रचीती होते .
     यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि उपस्थितांचे स्वागत महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष चांगदेव पिंगळे यांनी केले तरपाहुण्यांची ओळख प्रा. भगवान डोके यांनी करून दिली .  सूत्रसंचालन पांडुरंग गाडेकर यांनी केले तर आभार सतीश भुजबळ यांनी मानले . राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली .
  कार्यक्रमाचे संयोजन दिगंबर आल्हाट , अड. रंगनाथ ताठे , सुधाकर आरु , दिलीप करपे , गिरीश झगडे , गुलाबराव रासकर , दत्तात्रय भुजबळ , विजय झगडे , बाळासाहेब बुणगे , मधुकर राउत , धोंडीबा भोंग , हनुमंत टिळेकर यांनी केले होते .

No comments:

Post a Comment