Wednesday, December 3, 2014

संधी चालून येते तेव्हा..

http://epaper.eprahaar.in/#
प्रहार,मुंबई, दि. २९ नोव्हेंबर, २०१४ शनिवार पृ.२
http://prahaar.in/relax/269517
November 29, 2014 03:45:17 AM | Author प्रतीक्षा चौकेकर


टीव्ही इण्डस्ट्रीत आपल्याला काम मिळावं, दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी आपल्यालाही नशीबी यावी असं स्वप्न या इंडस्ट्रीत येणा-या प्रत्येक नवोदित कलाकाराचं असतं. त्यांना ही संधी मिळते तेव्हा त्यांच्या आयुष्यात काय बदल होतात, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. पुण्यातून मुंबईत कामाच्या शोधात आलेल्या प्रमीतीला जेव्हा ही संधी मिळते तेव्हा तिचं आयुष्य कसं बदलल याची ही गोष्ट..

pramiti Narake   अभिनयाचं शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक कलाकार शोधात असतो तो एका मोठय़ा ब्रेकच्या. काम मिळावं म्हणून हवी तेवढी मेहनत घ्यायला ते तयार होतात आणि जेव्हा अशी मोठी संधी चालून येते तेव्हा त्यांना काय वाटतं ही जाणून घ्यायची उत्सुकता मला होती, त्यातून प्रमीतीचा चेहरा समोर आला. ‘तू माझा सांगाती’ संत तुकाराम आणि आवलीची संसारगाथा या नावानं संत तुकाराम महाराजांच्या संसाराची कथा ई-टीव्हीवर सुरू झाली. संत तुकाराम यांचं नुसतं वारकरी संप्रदायाशीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राशी एक वेगळंच नातं जोडलं आहे. त्यामुळे या मालिकेचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे.

या मालिकेत आवलीची म्हणजे तुकाराम महाराजांच्या दुस-या पत्नीची भूमिका साकारलीय ती पुण्याच्या प्रमीती नारके हिनं. लहानपणापासून सगळ्याच गोष्टीत पुढे असणा-या प्रमीतीनं आपल्याला मोठं झाल्यावर अभिनेत्री व्हायचं हे पक्क ठरवलं होतं. ती म्हणते ‘लहानपणापासून मला अभिनेत्री बनायचं होतं. कॅमेरासमोर काम करायचं होतं. या क्षेत्रात आल्यावर काम मिळेल की नाही याची खात्री नसते, आणि काम मिळालं तरी याच क्षेत्रात चांगलं करिअर बनेल की नाही याची शाश्वती कोणच देऊ शकत नाही. त्यामुळे माझे बाबा मला सांगायाचे तू यापेक्षा काहीतरी दुसरं करं. पण मला याच क्षेत्रात यायचं होतं त्यामुळे शिक्षण संपल्यानंतर ललीत कला केंद्रातून अभिनयाचं शिक्षण घ्यायला सुरूवात केली.’

दर महिन्याला नवं नाटक बसवं, मोठ मोठय़ा दिग्गजांकडून अभिनयाचे धडे गिरव असं करत करत तीन वर्ष तिची ललीतमध्ये निघून गेली, पण शिक्षण संपल्यानंतर पुढे काय असा प्रश्न तिच्यासमोर होताच यासाठी लवकरात लवकर कामही मिळवायचं होतं म्हणून कमाच्या शोधात पुण्याहून तिनं मोर्चा थेट मुंबईकडे वळवला. मुंबईत आल्यानंतर इतर नवोदितांसारखी पहिली कोणती गोष्ट करायची तर काम शोधायचं हे तिन मनाशी पक्क केलं. ती म्हणते ‘मला काम मिळवायचं होतं, मुंबईत आल्यानंतर मी लगेचच काम शोधायला सुरू केलं. कामाच्या शोधात दिवसातून किमान चार ऑडीशन माझ्या असायच्याच. महिनाभर कामाच्या शोधात मी फार वणवण केलीय. एका महिन्यात मी इतक्या ऑडीशन दिल्यात की त्यांची संख्याही मला आठवत नसेल. एके दिवशी आवलीच्या भूमिकेसाठी ऑडिशन सुरू आहेत असं कळलं आणि तिथे गेल्यावर या भूमिकेसाठी किमान पाचशेच्यावर ऑडीशन झाल्याचं कळलं. आता आपल्याला काही काम मिळणार नाही असं मला वाटलं पण शेवटी हो नाही करत आवलीच्या भूमिकेसाठी मला घेण्यात आलं.’

संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर ही मालिका असल्यानं मालिकेतील कलाकारांचा गोतावळा खूपच मोठा आहे. यात अनेक अनुभवी कलाकार आहेत. या सगळ्या कलाकारांबरोबर काम करण्याची मोठी संधी प्रमीतीकडे आली तेव्हा तिला काय वाटत होतं हे सांगता ती म्हणते ‘माझ्या जोडीला सहकलाकार म्हणून चिन्मय मांडलेकर होता. तो इतका आभ्यासू आहे की त्याच्या सोबत काम करायचं म्हणजे थोडं दडपण होतं, कॅमेरासमोर याआधी मी शॉर्ट फिल्म केल्या होत्या त्यामुळे कॅमेराची भिती नव्हती. पण आपण नवोदित कलाकार त्यामुळे कॅमेरासमोर अभिनय करताना चुकलो तर आपल्यामुळे इतर कलाकारांनाही थांबावं लागणार. त्यांनाही तोच सिन पुन्हा पुन्हा करावा लागणार अशी भिती मला होतं. पण या सगळ्याच कलाकारांनी खूपच सांभाळून घेतलं त्यामुळे काम करताना आणखी मज्जा आली. ’

कलाकारांसोबत काम करताना प्रमीतीनं चिन्मय मांडलेकरचीही खूप स्तुती केली आपल्याला त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तीही पहिल्याच झटक्यात यासाठी ती स्वत:ला खूपच भाग्यशाली मानते ‘ती म्हणते चिन्मयकडून खूपच शिकण्यासारखं आहे आणि कामाची सुरूवात त्याच्यासोबत करायला मिळणं हे भाग्याच आहे, त्याचं वाचनही इतक अफाट आहे. आमच्यापेक्षा तोच जास्त काम करतो, तरी तो त्या कामातून स्वत:साठी वेळ काढतो. खूप वाचन करतो. दर चार दिवसांनी त्याच्या हातातलं पुस्तक बदलतं आणि आपण मात्र काहीच करत नाही, त्यामुळे थोडी स्वत:ची चिड येते पण नेहमी काही वेगळ शिकायला मिळतं याचा आनंद वाटतो.’

आवलीची भूमिका करताना प्रमीतीला काय अनुभव आले असं विचारल्यावर ती म्हणते ‘मला आवली यांच्याविषयी माहिती आधीपासून वाचण्यात आलं होतं, तुकाराम महाराजांच्या आयुष्यावर जी काही पुस्तक लिहली होती त्या पुस्तकातून जी आवली समोर आली ती एक फटकळ, चिडीचिडी, रागीट अशा काहीशा स्वभावाची होती. पण हे पात्र जेव्हा मी स्वत: करायला घेतलं तेव्हा आवलीविषयी जे काही पूर्वग्रह माझे किंवा इतर लोकांचेही असतील ते एका फटक्यात दूर झाले. तिच्या वागण्याची खरी कारणं काय होती ही त्यानिमित्तानं मला कळली आणि ती लोकांनाही कळतील.’

आवलीची भूमिका साकारताना प्रेक्षकांकडून आलेला एक गंमतीदार किस्साही तिनं सांगितला ती म्हणते ‘टीव्हीवर मी नववारी साडीत आणि पारंपारिक दागिने अशा प्रकारची माझी वेशभूषा दाखवण्यात आली आहे त्यामुळे प्रेक्षकांना मला तसंच बघायची सवय झालीय जेव्हा मी बाहेर फिरायला जाते तेव्हा काहीजण पटकन बोलतात तुम्ही आवली आहात मग नववारी साडीत फिरलं पाहिजे. पण त्यांना कळत नाही मी आवलीची भूमिका फक्त पडद्यावर साकारते ते काम संपल्यानंतर माझं वेगळं आयुष्य सुरू होतं.’

प्रमीतीचा या इण्डस्ट्रीतला प्रवास या मालिकेपासून सुरू झालाय, अर्थात या भूमिकेनंतर तिचे काही वेगळ्या योजना असतील पण पुढे व्यवसायिक नाटक आणि सिनेमा तिला करायचा आहे.
.................................

Tuesday, December 2, 2014

नेमाडेसरांच्या सहवासात


नेमाडे, इंग्रजी शाळा, साहित्य संमेलन आणि मी






हा आठवडा अतिशय संस्मरणीय गेला. कायम आठवत राहिल असा.
महात्मा फुले समता पुरस्कारासाठी डा.भालचंद्र नेमाडेसर पुण्यात आले होते. नेमाडे सर आणि सौ.प्रतिभाताईंच्या समवेत चार दिवस पोटभर गप्पा झाल्या.

 तासभर फुले वाडा दोघांनी फुरसतीने आणि आस्थेने पाहिला. सरांचे वाचन -पुस्तकांचे आणि माणसांचे अतिशय भन्नाट आहे. आरपारच घुसतात. विपर्यास करणारे, कांगावा नी कोल्हेकुई करणारे यांना ते छटाकभरही दखलपात्र मानत नाहीत. जबरदस्त झेप आणि भक्कम आत्मबळ यांचे प्रतिकच.

वाड्यावर दहाबारा वाहिन्या आणि विसेक वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी आलेले. त्यांना सरांशी बोलायचे होते. सर त्यांच्याशी बोलायला फारशे उत्सुक नव्हते. पत्रकार मित्रांनी मला गळ घातली. फक्त पुरस्काराबद्दलच विचारायचे या अटीवर मी सरांना विनंती केली.  पुरस्काराबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करायला सर तयार झाले. सर वाड्यातच त्यांच्याशी उभ्याउभ्या बोलले. अनेकांनी सरांचा बाईट घेतला. पुरस्काराबद्दल सर म्हणाले, "आजवर मला अनेक पुरस्कार मिळाले पण महात्मा फुले यांच्या नावाचा पुरस्कार फुल्यांच्या वाड्यावर त्यांच्या स्मृतीदिनी मिळणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा सन्मान आहे. मी फुलेवादी आहे. फुलेंकडून मला तरूण वयात दिशा आणि उर्जा मिळाली. समाज व्यवस्थेचं फुल्यांनी केलेलं विश्लेषण आम्हाला भारतीय समाजाची रचना समजाऊन घ्यायला कायम मार्गदर्शक ठरलं. जात,वर्ग, स्त्रीवाद यांचं फुल्यांचं आकलन द्रष्टेपणाचं आणि खर्‍या अर्थाने देशाला आधुनिक बनवणारं आहे......" सर भरभरून खूप बोलत होते.

जाता जाता एकाने सरांना साहित्य संमेलनाबद्दल विचारलं. सर म्हणाले, "मी त्या विषयावर बोलणार नाही. त्यावर मी खूप बोललोय.  त्याबद्दल बोलणं म्हणजे केवळ वेळ वाया घालवणं आहे. पुन्हापुन्हा बोलून काय उपयोग होणारेय? हा महामंडळाच्या चार रिकामटेकड्या लोकांचा उद्योग आहे. त्यातून साहित्याचं काहीही भलं होत नाही."

पत्रकार म्हणाले, "पण महात्मा फुल्यांनी साहित्य संमेलनाचं निमंत्रण नाकारलं होतं. तुमचं काय?"
सर म्हणाले, " मीही त्याच मताचा आहे. मी संमेलनाला जातच नाही. मला बोलऊ नका असंच मी त्यांना सांगितलय." सर बोलायला तयार नसतानाही त्यांना छेडलं गेलं. जाताजाता त्यांनी मी याविषयावर का बोलू इच्छित नाही म्हणून नकार देण्याचं कारण सांगताना जे म्हटलं त्यालाच अवास्तव आणि भरमसाठ  प्रसिद्धी दिली गेली. गदारोळ माजवला गेला.

सरांच्या संपूर्ण भाषणात या विषयाला त्यांनी स्पर्शही केलेला नाही. ते उत्स्फुर्तपणे फुल्यांवर बोलले. सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांचं त्यांनी विश्लेषण केलं. इंग्रजी शाळा आणि साहित्य संमेलनं यावर या भाषणात ते अवाक्षरही बोललेले नाहीत. तरिही जणु काही ते हे विषय आपल्या भाषणातच  बोलले असा भास निर्माण केला गेला. ही अर्धसत्य आणि अर्धवट पत्रकारिता कोठे चाललीय?

कार्यक्रमानंतर उशीरा आलेले काही वाहिन्या आणि वर्तमानपत्रांचे मित्र मला भेटले.

पुन्हा मागचीच आवृत्ती झाली.एकानं विचारलं,  "मराठी भाषेबद्दल काय सांगाल? इंग्रजी शाळांचं गावोगावी पेव फुटतय, मराठी शाळा बंद पडताहेत यावर उपाय काय?"

यावर सर म्हणाले, " शिक्षण मातृभाषेतूनच झालं पाहिजे. त्यातूनच बुद्धीचा विकास होतो.माणूस मातृभाषेत विचार करतो.त्याला स्वप्नंही आपल्याच भाषेत पडतात. मी भाषाशास्त्रज्ञ आहे. गुलामीच्या मानसिकतेतून इंग्रजीचं स्तोम माजवलं गेलंय. इंग्रजी भाषा शिकायला हवी. माझा तिला विरोध नाही. पण मराठी शाळांमधून उत्तम इंग्रजी शिकवण्याची सोय करा. इंग्रजी शाळांचं गावोगावी पेव फुटतय, मराठी शाळा बंद पडताहेत त्यासाठी प्रसंगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर बंदी घाला. मराठीतून शिकलेलेच लोक मोठे झाले.  महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमातून शिकून श्रेष्ठ शास्त्रज्ञ, लेखक, विचारवंत, नेते झाल्याचं मला एकतरी उदाहरण दाखवा. त्यातून सारे हमाल तयार होतात आयटीतले. इंग्रजी माध्यमात मुलांना घालणं म्हणजे त्यांना पाण्यात बुडऊन मारणं आहे. त्यांची वाढ खुंटते. ते इकडचे ना तिकडचे बनतात. ..........."

बर्‍याच पत्रकारांनी संदर्भ सोडून, विपर्यस्त स्वरूपात सरांना पेश केले. अनेक फेसबुकवीरांनी त्यावर आधारित मुक्ताफळं उधळली. अग्रलेखही  खरडले गेले. नेमाडेंची खिल्ली उडवली गेली. महाराष्ट्र एव्हढा कृतघ्न केव्हा नी कसा बनला?

अनेक वाहिन्यांनी त्यांना यावरच्या चर्चेला निमंत्रित केले. सरांनी सगळ्यांना स्पष्ट नकार दिला. ग्रेट भेटी नाकारणारे नेमाडे या विद्वानांना झेपणारे नाहीत हेच खरे.

नेमाडेसर मला म्हणाले, " बघ, यासाठी मी या लोकांशी बोलत नसतो. ज्यांना मी अनेकदा भेटी नाकारल्यात ते माझ्यावर चवताळणारच ना. जाऊ दे. फुल्यांनी मराठी पत्रकारिता ही "पोटभरू" पत्रकारिता आहे असं तेव्हाच सांगून ठेवलय. साहित्य संमेलन आणि इंग्रजी शाळांचे सारे लाभार्थी लोक नेमाडेंवर तुटून पडलेले, आरडाओरडा नी कांगावा करीत असलेले बघून सर हसत म्हणाले, "यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार? हे एकजात इंग्रजीची गुलाम मनोवृत्ती हाडीमाशी भिनलेले लोक आहेत.

मराठीचा न्यूनगंड असलेले हे पोटार्थी लोक आपण संपूर्ण अदखलपात्र मानले पाहिजेत. त्यांना कसलेही उत्तर देण्याच्या फंदात पडू नकोस. मी फुल्यांबद्दल जे बोल्लो ते फारसे पुढे येऊ नये म्हणुन ते त्याला फाटे फोडतील, शब्दच्छल करतील. विषयांतर नी विपर्यास करतील. ते वाट्टॆल तो कांगावा करतील. हाच यांचा लाडका उद्योग आहे. त्यात त्यांना रमू द्यावं. या विद्वान लोकांना बिच्यार्‍यांना पोटासाठी असलं थोर काहीबाही करावच लागतं.  आपण आपल्या आवडीच्या कामात बुडून जावं."

चला हवा येऊ द्या.

...............................................