Tuesday, January 6, 2015

दिल्ली, तेलंगणा आणि महाराष्ट्र : शालेय मुलांसाठी अभिनव उपक्रम

चारही माध्यमांच्या  एक हजार मुलामुलींचा सहभाग









दिल्ली, तेलंगणा आणि महाराष्ट्र यांनी एकत्र येऊन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची १८४ वी जयंती एका अभिनव उपक्रमाद्वारे साजरी केली. एक हजार शालेय मुलामुलींनी त्यात सहभाग दिला. तेलंगणा राज्यातील अदिलाबाद जिल्ह्यातील सतरा शाळांमधील  मराठी, तेलुगू, हिन्दी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा यात सहभागी झाल्या होत्या. प्रा. हरी नरके लिखित पुस्तक  "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले" या मराठी चरित्रग्रंथाचे भाषांतर आजवर इंग्रजी, { एन. सी. इ. आर. टी प्रकाशन, नवी दिल्ली } हिन्दी व तेलुगू आदी  भाषांमध्ये झालेले आहे. त्या पुस्तकावर आधारित परिक्षेचे आयोजन दिल्लीच्या "महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थान" तर्फे करण्यात आले. श्री. सुकुमार पेटकुले आणि सहकार्‍यांनी त्यासाठी परिश्रम घेतले.

"कौन बनेगा विजेता" या उपक्रमाचे आयोजन " कौन बनेगा करोडपती " च्या धर्तीवर करण्यात आले. एक हजार मुलांनी चार भाषांमधील हे पुस्तक वाचून त्यावर लेखी परिक्षा दिली.

त्यात गुणानुक्रमे पहिले आलेल्या ५१ स्पर्धकांना उपान्त्य फेरीत प्रवेश देण्यात आला. त्यांना काही प्रश्न विचारून त्यातले निवडक दहाजण अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. त्यांना प्रत्येकी दहा प्रश्न विचारून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले.

रुपये दहा हजार ते रुपये पाच हजारचे हे विविध पुरस्कार होते. पहिले तिन्ही पुरस्कार मुलींनी जिंकले.या स्पर्धेसाठी मुलामुलींनी केलेला सखोल अभ्यास, दिलेली सळसळती उत्तरे आणि केलेली तळमळीची भाषणे चकीत करणारी होती.

सावित्रीबाईंचे विचार आणि कार्य ह्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या एक हजार मुलांनी आत्मसात केलेले बघणे हा अनुभव विलक्षण भारावून टाकणारा होता.

चारही माध्यमांच्या मुलांचा यातला सहभाग प्रभावित करणारा होता.
............................................................