Friday, December 18, 2015

पुरस्कारांची खिरापत, नेमकी कोणासाठी?

उदंड झाले पुरस्कार!
पुरस्कारांची खिरापत, नेमकी कोणासाठी?
अतिशय प्रतिष्ठेचे मोजके पुरस्कार त्यागी आणि प्रतिभावंताना देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची समाजभावना खरंतर महत्वाची सांस्कृतिक अशी आवश्यक बाब.
अशा पुरस्कारांची आजही गरज आहेच. अशा पुरस्कार विजेत्यांच्या कामाबद्दल सर्वदूर आदर आणि सन्मानाची भावना असते.

पण आजकाल उदंड झाले पुरस्कार! अशी अवस्था असून पुरस्कारांची घोर विटंबना चालू असल्याचे दिसते.

1. पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात तशी अलिकडे दररोज पुरस्कारांची उधळण चालू असते.  गावगन्ना पुरस्कारांच्या घाऊक खिरापती वाटण्याच्या मोहीमा आत्ताशा चालू असल्याचे दिसून येते. दररोजचे वर्तमानपत्र उघडले की दहावीस सटरफटर लोकांना कोणते ना कोणते पुरस्कार मिळाल्याच्या फोटोसह बातम्या वाचाव्या लागतात. काही मंडळींनी तर पुरस्कारांचे कारखानेच उघडल्याचे दिसते. हा एक अतिशय नफा मिळवून देणारा उद्योग असावा असे दिसते.

2. अनेक पुरस्कारांमध्ये तर पाच पन्नास लोकांना स्मृतीचिन्हे देऊन बोळवले जाते. एरवी मान्यवर वक्ते किंवा सेलीब्रेटी यांना कार्यक्रमांना बोलवायचे तर प्रवासखर्च नी मानधन द्यावे लागते. ते टाळण्याचा नामी उपाय संयोजकांनी शोधून काढलेला दिसतो. पुरस्कार देतोय म्हटले की मानधन नी प्रवासखर्च कोण मागणार?
निवडीचे निकष कोणते? निवड समितीचे परिक्षक कोण? पुरस्कारामागील भुमिका काय? असले काहीही प्रश्न या पुरस्कार देणार्‍या घेणार्‍यांना पडत नाहीत.
आजकाल अशी शेकडो मंडळं किंवा एन.जी.ओ. आहेत की ते वर्षातून एकच कार्यक्रम करतात. पुरस्कारवितरण सोहळा.

दिल्लीत भरपूर व्ही.आय.पी.असल्याने काही चतूर लोकांनी 25 वर्षांपुर्वी हा धंदा सुरू केला. दिल्लीचा पुरस्कार म्हटले की लोक भलतेच खूष होतात. नटून थटून बायकापोरांसह जातात. तिथे गेल्यावर कळते की एकुण पाच हजार लोकांना पुरस्कार दिले जाणार आहेत, आणि एका हातगाडीवर पुरस्काराचे बिल्ले ठेवलेले असतात. आधीच मनिआर्डरने संस्थेची सदस्य फी 500 रूपये भरायची आणि दिल्लीत जाऊन लोकांनी रेशनसारखी रांग लावून दहा रूपयांचा बिल्ला घेऊन तोंडात मारल्यासारखे परत यायचे. बरं झालेली फजिती कोण सांगणार?

3.एका पुरस्कार समारंभाचा गाजलेला किस्सा.
एका पुरस्कार विजेत्याला एकुण सत्तर ऎंशी हार पडले तरी त्यांचा चेहरा पडलेलाच. शेवटी बायको म्हणाली, अहो, असे काय करताय?लोकांनी एव्हढे प्रेमाने हार आणले तर जरा हसा तरी. साहेब म्हणाले, अगं माझ्याकडून चारशे जणांनी हाराचे पैसे नेले होते. चांगलंच गंडवलं की नाही चोरांनी.

4. फसणं,फसवणं, फसवलं जाणं हा राष्ट्रीय उद्योग एकुणातच अतिशय तेजीत असावा. काही मंडळी त्यांच्या गावात अतिशय बदनाम असतात. पण बाहेरच्या मंडळींसमोर सामाजिक कामांचा देखावा करण्यात ते पटाईत असतात. त्यातल्या त्यात वंचित, शोषित, कष्टकरी, भटके यांच्यासाठी आपण काम करतो असा उत्तम बहाणा यांना जमतो. त्यावर लोकवर्गणी मिळवून छानछोकीने राहणे, पुरस्कारामागून पुरस्कार कब्ज्यात घेत फिरणे हेच यांचे जगणे.

5. चोर्‍या न लबाड्या  करण्यात  आणि भिका मागण्यात यांचा हात कोणीच धरू शकत नाहीत. पिढ्यानपिढ्या एव्हढाच हातखंडा उद्योग. मध्यमवर्गिय शहरी लोकांचा सामाजिक जाणिवेचा धागा हेरून तोंड वेंगाडायचे, त्यागाचा आणि समर्पणाचा पाढा वाचायचा, कात्रणांच्या फायली बगलेत मारूनच तयार राहायचे, प्रसिद्धी आणि बिनकष्टाचा मुबलक फायदा आयता चालून येतो.
अशी पुरस्कार खानदाने, लोकभावनांचा अचूक फायदा घेतात. मध्यमवर्गियांची वंचितांना आपण मदत केल्याने पुण्य मिळते ही भावना नेमकी पकडून हे भिकारी पुरस्कार, अनुदाने, वर्गण्या आणि मदती लाटत असतात. हा ओरबाडण्याचा मार्ग आता राजमार्ग होऊ लागलाय काय?

6. निवड समितीच्या दोनदोन फेर्‍या असणार्‍या ठिकाणीही एकाच कामासाठी एकाच घरातील दोनदोन पिढ्यांना दोनतीन वर्षांच्या अंतराने तेच पुरस्कार जेव्हा दिले जातात तेव्हा चकीत व्हायची वेळ येते. बरं एकवेळ सामाजिक काम नसलं तरी चालेल पण निदान चारित्र्य, समाजहिताची मुल्ये आणि छटाकभर तरी प्रतिभा किंवा त्याग असायला हवा की नको? अशावेळी पुरस्काराचे अवमुल्यन झाल्याशिवाय कसे राहील?
................

No comments:

Post a Comment