Tuesday, February 14, 2017

प्रवास -- लोकं जब्राट प्रेम करतात


वीसेक वर्षांपुर्वीची गोष्ट.
एप्रिल महिन्यातला व्याख्यान दौरा होता. त्यावेळी मोबाईल नव्हते. गावात फोनसुद्धा फार मोजक्या लोकांकडे असायचे.
पत्रानं मराठवाड्यातली तीन निमंत्रणं स्विकारली होती. अंतरं विचारली तर, "विशेष काय नाय, जवळजवळच आहेत गावं" अशी उत्तरं.
"किती किलोमीटर?" या प्रश्नाला , "ते नाही सांगता यायचं,पण विशेष दूर नाहीत" असं उत्तर.
आधल्या दिवशी परभणीहून संयोजकांनी दिलेल्या नंबरवर फोन केला तर उत्तर मिळालं, "तुम्ही दुपारी 2 वाजता निघा, 6 वाजता पोचा, आधी पोचून तरी काय करणार?"
"मार्ग कोणता?"
"या लातूरमार्गे."
दुपारी 2 वाजता एस.टी. स्टॅंडवर गेलो तर लातूर बस लागलेली होती.
घेतली.
पण ती निघाली, जनता बस. हात दाखवा, एस.टी. थांबवा. ती रेणापूरमार्गे होती. तिने लातूरला पोचायला 6 वाजवले.
परांड्याच्या बसची चौकशी केली तर, "डायरेक्ट बस नाही,पण येडशीला जा, तिथून मिळेल परांडा बस." असं सांगितलं चौकशी खिडकीनं.
लातुर - मुंबई येडसीमार्गे बस लागलेलीच होती. तुफान गर्दी. झुंबडच उडालेली.
कसाबसा घुसलो.
रात्री पावणेआठला ती येडशीला पोचली.
चौकशी खिडकी बंद करून साहेब घरी निघाले होते. म्हटलं, "परांडा बस कधीय साहेब?"
"आहे की आठला."
छान वाटलं. चला पंधरा मिनिटात बस मिळणार.
"तुम्ही बंद करून निघाले काय?"
ते म्हणाले, "हो. शेवटची गाडी गेली, आजचं काम संपलं, निघालो आता घरी."
"आठची बस आहे ना?"
"हो आहेना, उद्या सकाळी आठला".
बापरे! रात्रीची वेळ. अनोळखी गाव.पोचायचं ते गाव अजून 40 किलोमीटरवर.
शेजारच्या पब्लिक फोन बुथवरून फोन केला. उत्तर मिळाले, "आरामात या, लोकं जमायलीत. टाइम लागंल. काय काळजीचं कारण नाय!"
"पण वाहनाचं काय?" म्हणताच ते म्हणाले, "येडशीत, चौकशी करा. टॅक्शी घ्या आणि या."
विचारलं, तर पब्लिक फोन बुथवाला म्हणाला,"हे पुणं मुंबई थोडंच आहे, टॅक्सी मिळायला? इथं कसली टॅक्शीनफॅक्शी?"
मग आता?
"तुम्ही असं करा, इथं थांबू नका. एक किलोमीटरवर धाबा आहे, तिकडं जा. रातच्याला इथं चोराचिल्टाचं लई भ्याव असतंय. दारूडे, जेबकतरे अड्डा टाकत्यात."
पुन्हा फोन केला. मी चिडलो होतो, "निदान मोटरसायकल तरी पाठवा राव घ्यायला!"
तर पलिकडून शांत उत्तर, "बघ्तो, पण लईकरून तुम्हीच या जसं जमल तसं"
पब्लिक फोन बुथवाल्यानं त्याच्या मोटर सायकलवरून धाब्यावर सोडलं, सांगितलं, "हैद्राबादहून येणारी बस घ्या, ती तुम्हाला परांड्याला सोडील."
धाबेवाला म्हणाला, "हैद्राबादहून येणारी बस दिवसाआड येते. आज येईल की नाही नाय सांगता येणार! रात्री बाराच्या पुढं येते ती. आरामात बसा जेवन करा. दोन अडीच तास आहेत."
...रात्री बारा वाजता हैद्राबाद बस आली. तुंबळ गर्दी. कंडक्टर म्हणाला, " जगा नय. उपर बैठना पडेगा. आभी इदर सब लोग खानावाना खायेगा. आराम करेगा. हमको शिर्डी सुबा पहुंचना हैं."
एस.टी.च्या टपावर बसून रात्री अडीच वाजता परांड्याला पोचलो.
एस.टी.स्टॅंडवर 50 ते 60 जण घ्यायला थांबलेले.
मी खूप चिडलो होतो.
घोळ असा होता की गावात फोन होता तो विरोधी गटाकडं. त्यांनी मुद्दामच मला चुकीचा सल्ला दिलेला. तो मला एक सांगत होता, अन संयोजकांना त्याच्या उलटं.
मला येरमाळामार्गे येण्याऎवजी मुद्दामच लांबचा मार्ग घ्यायला लावला होता पठठ्यानं.
मुलं म्हणाली, "सर, वांधा नाय, आपण आत्ताच कार्यक्रम करूया."
आत्ता? रात्री/पहाटे तीन वाजता?
" कायबी प्राब्लम नाय. 300 लोकं वाट बघायलेत तुमची."
आता पाणी माझ्या डोळ्यात होतं!
असे प्रेमाचे श्रोते अन्यत्र कुठे मिळतील?
..............................

No comments:

Post a Comment