Sunday, February 26, 2017

मराठी भाषा गौरव दिन


27 फेब्रुवारी, ज्ञानपिठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.
यानिमित्ताने मराठी भाषेबद्दल साधक बाधक चर्चा होतेय याचा आनंद वाटतो.
आमच्या काही मित्रांनी अभिजात दर्जा नसला तरी मराठी अभिजातच आहे, दर्जाला महत्व नाही ते थेट अभिजात भाषेचा दर्जा नाही मिळाला तरी बेहत्तर इथपर्यंत लिहायला सुरूवात केलीय. मागे तर आमचे एरवी प्रसन्न असलेले एक पत्रकार मित्र मराठीवर एव्हढे भडकले की मराठी मेली तर काय हरकत आहे अशी विचारणा त्यांनी केली.
या मित्रांना एक नम्र प्रश्न विचारावासा वाटतो. एखाद्या विद्वानाला पदव्या असल्या काय आणि नसल्या काय फारसा फरक पडत नाही, मात्र हेच सत्य पदव्या असलेल्याने मांडले तर त्याला वेगळी झळाळी असते आणि नसलेल्याने मांडले तर त्याच्याकडे लोक कुत्सितपणे बघतात.
मराठी मरते आहे असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणाले, तेव्हा त्यामागे आर्त कळकळ होती, जिद्द होती मराठी जगवण्याची. तशीच भुमिका असूनही जर केवळ एक रणनिती म्हणून मराठी मेली तर काय हरकत आहे असे धक्कातंत्र विधान केले तर त्यामागची भावना वेगळी बनते,पण मराठी मरायलाच हवी, अशा धारणेतून केलेले हे चिंतन असेल तर मी त्यावर काहीही म्हणु इच्छित नाही.
दर्जा मिळविण्यासाठी एका जिद्दीने गेली अनेक वर्षे झटणार्‍यांना मदत करता येत नसेल तर नका करू पण मराठीला हा दर्जाच नको ही भावना मला तरी अनाकलनीय वाटते. जे आपल्या आईच्या मरणासाठी अतिव उत्सुक असतील त्यांना माझ्या शुभेच्छा. मात्र सगळेच असे आहेत असे नाही. आमचे मित्र डॉ. पृथ्वीराज तौर म्हणतात,
"भाषा मरते तेव्हा केवळ काही शब्द संपत नाहीत, तर एक संस्कृती संपून जात असते. एका मानवी समूहाचाच अंत होत असतो. ज्ञान-विज्ञानाच्या चर्चा ज्या काळात जोरकस पद्धतीने केल्या जातात, त्या वेळी भाषांचे मृत्यू दु:खद भासतात...
भाषा कशासाठी? या प्रश्नाचं खूप साधं उत्तर आहे- भाषा असते, ती संवाद साधण्यासाठी. भाषा होती म्हणूनच मानवाला आपल्या भावना, आपले विचार यांची देवाणघेवाण शक्य झाली. भाषेला घडवता घडवता माणूस स्वतःलाही घडवत गेला. किंबहुना मानवाचा सगळा विकास भाषेमुळेच शक्य झाला.
भाषेमुळेच मानवाला संस्कृती मिळाली, भाषेमुळेच सभ्यता निर्माण झाली, भाषेमुळेच विज्ञान अवतरले, भाषेमुळेच तत्त्वज्ञान आणि इतिहासाचे जतन शक्य झाले. भाषा नसती तर काहीच घडले नसते. शक्य नव्हते. जगभरच्या विविध मानवी समूहांनी विविध भाषा जन्माला घातल्या, जोपासल्या. भारतासारख्या देशात काही हजार भाषा आणि बोली बोलल्या जातात. भाषा केवळ भावना, विचार व्यक्त करण्याचे साधन अथवा माध्यम नाही. भाषेचे अस्तित्व एका मानवी संस्कृतीचे अस्तित्व असते. उत्क्रांतीचा एक मोठा अवकाश भाषेमध्ये नांदत असतो. त्यामुळे भाषा मग ती कोणतीही असो, ती टिकवणे महत्त्वाचे आहे.
जागतिकीकरणाच्या रेट्यात सगळ्या जगाला बाजारपेठ करण्याच्या ईर्षेने भाषिक सपाटीकरणाची प्रक्रिया मागच्या दोन-अडीच दशकापासून खूप गतिमान होत आहे. पाठोपाठ छोट्या-छोट्या समूहांच्या भाषाही नष्ट होत आहेत. त्या त्या भाषांसमवेत त्या-त्या भाषेतील ज्ञानाचाही अस्त होत आहे. भाषा मरते तेव्हा केवळ काही शब्द संपत नाहीत, तर एक संस्कृती संपून जात असते. एका मानवी समूहाचाच अंत होत असतो. ज्ञान-विज्ञानाच्या चर्चा ज्या काळात जोरकस पद्धतीने केल्या जात आहेत, त्या वेळी भाषांचे मृत्यू दु:खद आहेत. आत्यंतिक स्वभाषाप्रेमातून अन्य भाषांप्रती विद्वेशाची निर्मितीसुद्धा संवादाला घातक आहे. महत्त्वाचा आहे तो मानवी संवाद आणि म्हणून गरजेचे आहे जगातील प्रत्येक भाषेचे संवर्धन आणि तिची जोपासना करणे. या कविता आपणास भाषिक संवादाच्या सेतूवर घेऊन जातील अशा आहेत."
आज जगात 6 ते 7 हजार भाषा असाव्यात. त्यातल्या दोन हजार मरू लागल्यात.
मुळात भाषा हे संवाद व अभिव्यक्तीचे चलन होय. लोक आपले दैनंदिन व्यवहार भाषेच्या माध्यमातून करतात. ज्ञान, संस्कृती, कला, जगाकडे बघण्याचा स्वतंत्र दृष्टीकोन हे भाषानिहाय वेगवेगळे असू शकतात. भाषा संस्कृतीची जणुकं वाहून नेतात. भाषांना स्वत:चे सार्वभौमत्व असते.
हे विश्व सामान्यपणे 1400 कोटी वर्षांपुर्वी तर आपली पृथ्वी 450 कोटी वर्षांपुर्वी जन्माला आली असे मानले जाते.
माणसाचा पुर्वज 1 कोटी वर्षांपुर्वी जन्मला. पाच लख वर्षांपुर्वीचे आपले पुर्वज व आपण यात महत्वाचा फरक म्हणजे आपण भाषा बोलू शकतो. त्यांना भाषा माहित नव्हती. हावभाव, संगीत, स्वर ही अभिव्यक्तीची माध्यमे टप्प्याटप्प्याने विकसित झाली. भाषांची निर्मिती 70 हजार वर्षांपुर्वी झाली. आपली मराठी भाषा सुमारे 2500 वर्षांपुर्वी जन्माला आली. मुद्रण कलेने मराठी भाषा आणि देवनागरी लिपी टिकण्याची प्रक्रिया गतिमान झाली.
मात्र स्थलांतर, जागतिकीकरण, मराठी भाषकांची उदासिनता आणि पराभूत मानसिकता, जागतिक व भारतीय बाजाराचा मराठीकडे उपेक्षेने बघण्याचा दृष्टीकोन, इंग्रजीचे आक्रमण, परधार्जिणे राज्यकर्ते, केवळ आर्थिक संपन्नतेसाठी आणि दिखाऊ प्रतिष्ठेसाठी इंग्रजीला शरण जाण्यासाठी उत्सुक उच्च मध्यमवर्ग आणि बुद्धीजिवी, नवे तंत्रज्ञान अशा अनेक कारणांनी मराठीवरचे आक्रमण वाढत आहे. मराठी जगेल की मरेल ते मराठी शाळा टिकणार की बंद होणार यावर अवलंबून आहे. ज्या दिवशी मध्यमवर्गाने आणि उच्च मध्यमवर्गाने मराठीचा हात सोडला त्या दिवसापासून मराठीचा वनवास सुरू झाला.
इतर भाषांचा द्वेष नको पण मराठीचा आग्रह हवा. इंग्रजी किंवा हिंदीत बोलणे हे प्रतिष्ठेचे आणि मराठीत बोलणे मागासलेपणाचे असे ज्यांना वाटते त्यांना आम्ही सांगू "माफ करा मराठी अमृतातेही पैजा जिंकणारी आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले, चक्रधर, शेख महंमद,फादर स्टीफनसन,कित्येकांनी मराठीचा जयजयकार केला तो फुकाचा नाही.तो सार्थ आहे.जगातल्या सर्व देशांना राष्ट्रगितं आहेत पण विश्वगीत "पसायदान" फक्त मराठीतच आहे. धनाढ्यलोक जगभर असतील त्र गुणाढ्य मात्र एकट्या मराठीकडे आहे. तेव्हा जगात अवघ्या 10 भाषा टिकल्या तरी मराठी टिकेल.
आज संत एकनाथ असते तर ते सात्विक संतापाने म्हणाले असते, " आंग्लवाणी बाजारे केली मग मराठी काय चोरांपासून झाली?"
तर ज्यांच्या आजी - आजोबांची मातृभाषा मराठीच होती, पण ज्यांचे पालक आणि जे स्वत: इंग्रजी माध्यामातून शिकलेत आणि तरिही ज्यांना मराठीचे प्रेम आहे त्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा.
मात्र आंग्लाळलेल्या ज्यांना इंग्रजीच्या गुलामीचा विशेष अभिमान वाटतो, मराठीची अतिच लाज वाटते, ज्यांना मराठी ही हलकी भाषा आहे, ती ज्ञानभाषा आणि रोजगार देणारी भाषा नाही असे वाटते त्या "कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ" असणार्‍यांना वगळून इतर सर्व मराठीप्रेमींना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दीक शुभेच्छा!

No comments:

Post a Comment