Friday, February 24, 2017

घटनेच्या आधी कसं सांगणार?


गोष्टीत असतो तसा एक राजा होता. त्याने 50 वर्षात अनेक लढाया जिंकलेल्या होत्या.
त्याला अनेक चतुर सल्लागारांचे बळ होते. प्रत्येक शत्रूच्या छावणीत राजाचे पेरलेले हेर असायचे. तिकडेही या राजाला मानणारा मोठा वर्ग असायचा. तेही देश हेच महाराज चालवतात असे भाट म्हणायचे. लढाई मग ती कोणतीही असो, आपले महाराज इतके पोचलेले आहेत, मुरलेले आहेत, की ते ऎनवेळी अशी काही क्लुप्ती लढवतील की तेच जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ होय अशी भाबड्या जनतेची अतिव श्रद्धा होती. तसा अनुभवही होता.
आणि असे 50 वर्षे होतही होते.
एकदा मात्र राजा एक लढाई हरला. महाराज मुद्दामच हरले असणार, अन्यथा त्यांचा पराभव मुळी शक्यच नाही अशी प्रजेची धारणा होती.
राजाने बुद्धीमान सल्लागारांची परिषद आयोजित केली. पराभवावर मंथन करण्यासाठी आत्मपरिक्षण सुरू झाले.
एक जुणेजांणते सल्लागार म्हणाले, महाराज तुमची यावेळची सैन्य रचना चुकल्याने तुम्हे हरलात. तुम्ही घोडदळ पुढे ठेवले पण त्यामागे लगेच हत्तींचं दळ नको होतं.
राजानं नोंद घेतली.
पुढच्या लढाईत राजानं सैन्याची फेररचना केली. राजा जिंकणार असं चित्र असताना शेवटच्या क्षणी राजाची दाणादाण उडाली. राजा चक्क परत पराभूत झाला.
पुन्हा आत्मपरिक्षण.पुन्हा मंथन की काय असतं ते सुरू झालं.
तो सल्लागार म्हणाला, महाराज यावेळची परिस्थिती अगदीच वेगळी होती. तुम्ही परत माती खाल्ली. अहो, अशावेळेला हत्तीचं दळ पुढे हवे होतं.
राजानं पुन्हा पुन्हा नोंद घेतली.
तिसर्‍या लढाईवर जाताना मात्र राजाने आधीच सल्लागारांची बैठक बोलावली.
म्हणाला, मला सांगा, माझा 50 वर्षांचा अनुभव का फोल ठरतोय? माझी अफाट पुण्याई, अपार जादू का चालत नाहीये? आता मला सांगा, मी असं काय केलं म्हणजे या लढाईत मीच विजयी होईन? तुम्ही जसं सांगाल अगदी तसं मी तंतोतंत करतो.
सल्लागार म्हणाला, राजा तू चुकतोयस. घटना घडून गेल्यानंतर त्यात कायकाय चुका झाल्या याचे विश्लेषण करणारा मी तज्ञ आहे. असं घटनेच्या आधी कसं सांगणार?
.................

No comments:

Post a Comment