Wednesday, March 1, 2017

जयवंत दळवी आणि तीन व्यक्ती

जयवंत दळवी हे माझे आवडते लेखक.
माझे पहिले पुस्तक त्यांना भेट द्यायला मी गेलो तेव्हा ते घरी नव्हते. घराला कुलूप होते. मी दाराच्या फटीतून पुस्तक आत टाकून आलो.
आठवड्यात दळवींचे सुंदर पत्र. "मी तुझे पुस्तक आधीच विकत घेऊन वाचलेले आहे. मला ते आवडलेय. आता ती प्रत मी माझ्या गावच्या वाचनालयाला भेट देईन आणि तुझ्या सहीची भेटप्रत माझ्याकडे ठेवीन. परत भेटायला नक्की ये. सोबत पुस्तकाच्या किमतीएव्हढा चेक पाठवित आहे. तो स्विकारावा."
मी दळवींना आभाराचे पत्र लिहिले. "चेक तुमची आठवण म्हणून जपून ठेवतोय" असे लिहिले.
त्यांचे उलटटपाली उत्तर आले. "चेकची झेरोक्स प्रत काढून ठेव. चेक बॅंकेत भर. तुझी ती हक्काची कमाई आहे."
आजही तो चेक मी जपून ठेवलेला आहे.
...........................
अलिकडेच गाजलेले भाषण किंवा निधन पावलेली व्यक्ती यामुळे बातम्यांमध्ये झळकलेल्या तीन व्यक्तींविषयीचे माझे अनुभव --
क्र.1;-
मराठवाड्यातले हे नामवंत लोकप्रतिनिधी आणि तुफानी वक्ते. साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या एका इतिहासविषयक अनुवाद ग्रंथावर त्यांनी विधान परिषदेत टिकेची तोफ डागली. साक्षेपी संशोधक डा.य.दि.फडके हे  मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांनी मला यासंदर्भात अधिक शोध घ्यायले सांगितले. सदर ग्रंथ ज्या अनुवादकाने उर्दूतून मराठीत केला होता त्यांना भेटलो. प्रकाशित पुस्तक वाचले. अनुवादात पुस्तकाच्या नावापासूनच गंभीर चुका होत्या. या पुस्तकाचे नायक हे महाराष्ट्रातील नामवंत इतिहासपुरूष असल्याने या चुकांवर गदारोळ होण्याची शक्यता होती. सगळी कागदपत्रे अभ्यासल्यावर असे लक्षात आले की सदर अनुवादकाचे नाव मंडळाला याच वि.प.सदस्याने सुचवले होते. त्यांच्या ते लक्षात आणून दिल्यावर ते म्हणाले, "ठीकाय ना. तेव्हा ते गृहस्थ आमच्या महाविद्यालयात प्राध्यापक होते. आता त्यांचे मॅनेजमेंटशी पटत नसल्याने त्यांना काढून टाकण्यात आलेय.
म्हणजे यांच्या मैत्रीची/वादाची झळ मंडळाला बसणार. पुस्तक रद्द करून नष्ट करावे लागले. त्याची वाच्यता होणार नाही याची दक्षता घेण्यात आली.
काही बिन चिपळ्यांचे तर काही चिपळ्यांचे नारद!
...................
क्र. 2 : -
विदर्भातील या नेत्यांचा लौकिक मुलुखमैदान असा. ***वीर वगैरे म्हणुन ते ओळखले जात. खूप दरारा आणि सततची प्रसिद्धीझोतात राहायची त्यांना सवय.पुढे हा दरारा गेला.
एकदा आम्ही चिखलदर्‍याला मित्रमंडळींसह गेलो असताना रात्री उशीरा विश्रामगृहाचे व्यवस्थापक येऊन गयावया करू लागले. ****** ** हे साहेब आलेत. त्यांच्यासमवेत नेहमीप्रमाणे त्यांची प्रिय व्यक्ती आहे. त्यांना द्यायला एकही खोली खाली नाही. त्यांचे रिझर्व्हेशन नसल्याने आमचीही अडचण आहे. तुमच्याकडचा एक सूट त्यांना देता का प्लीज?"
आम्हाला त्यांनी गाजवलेला काळ माहित होता. आम्ही आमचे सामानसुमान आवरून आमच्याकडचा एक सुट खाली करून त्यांना दिला. या मोठ्या विराची ओळख करून घ्यायला आम्ही उत्सुक होतो.
नेते आले ते आडखळतच. तोंडाने शिव्यांचा रट्टा चालू. सूटमध्ये आल्याआल्या नेत्यांनी व्यवस्थापकाच्या कानाखाली वाजवली.एव्हढा उशीर का लागला म्हणून.तो काहीतरी सांगायला गेला तर हे नेते त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवू लागले. आमची ओळख करून घेण्याची इच्छा एव्हाना मावळली होती.
सभागृहातला राजदंड किंवा हाताशी असता तर पेपरवेट त्यांनी कदाचित आम्हालाही फेकून मारला असता!
.........................
प्र. 3 :-
यांचा ज्येष्ठ लेखक, कवी, प्राचार्य म्हणून दबदबा. 28 वर्षांपुर्वी माझे पहिले पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा मी त्यांना ते भेट द्यायला त्यांच्या घरी गेलो.
त्यांनी माझ्या ओळखीतील एका दांपत्याकडून काही जुनी कागदपत्रे नेलेली होती. ती मला बघायला द्यावित असे पत्र मी या दांपत्याकडून मिळवलेले त्यांना दाखवले. त्यांनी उडवाउडवी सुरू केली.
मी नविन असल्याने व पहिलीच भेट असल्याने विनयपुर्वक बोलूनही त्यांनी एकही कागद दाखवला नाही.
मी परतलो.
पुढे त्यांच्या भेटी होत तेव्हा त्यांना काहीही विचारले तर ती माहिती दडवण्याकडे त्यांचा कल असायचा. अशांना मी "जडीबुटी" संशोधक म्हणतो. सामाजिक कागदपत्रांचे धनही आपली खाजगी मालमत्ता म्हणुन दडवून ठेवणारे.
पुढे महात्मा फुले यांची 11 एप्रिल ही जन्मतारिख मी शोधून काढल्यावर मी त्यावर एक लेख राज्यातील आघाडीच्या वर्तमानपत्रात लिहिला.
तो वाचून हे जडीबुटीवाले भडकले. त्यांचे म्हणणे ते लवकरच हे संशोधन करणार होते. त्याच्या आधीच मी ते करणे हे उद्धटपणाचे वगैरे होते.
त्यांचे ते किंवा इतर संशोधन पुढे 28 वर्षात झालेच नाही.
......................

No comments:

Post a Comment