Tuesday, March 7, 2017

दुसरी बाजू

1. लता मंगेशकर यांची हरीष भिमानी व इतरांनी लिहिलेली काही चरित्रे मी वाचलेली आहेत. त्या गायिका म्हणून खरच फार मोठ्या आहेत. त्यासाठी त्यांनी अपार रियाझ केलाय.प्रतिकूल परिस्थितीशी झुंजून, अनेक खस्ता खातखात त्यांनी हे यश मिळवलेले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत एव्हढे लखलखीत यश मिळवणे सोप्पे काम नाही.त्यासाठी त्यांना काही भल्याबुर्‍या गोष्टी कराव्या लागल्या असतील तर मी त्यांचे समर्थन करणार नाही पण त्या समजून तर घेतल्या पाहिजेत.
2. त्यांचे बालपण खूप गरिबीत गेलेय. अभावग्रस्तता ही काय असते ते मी अनुभवलेय. त्यातूनही ही वृत्ती आलेली असू शकते. गरिबांबद्दल मला कणव आहे. सदैव राहिल. त्या सामाजिकदृष्ट्या फारशी प्रतिष्ठा नसलेल्या समाजातून आल्याचे त्यांचे चरित्रकार सांगतात. त्याबद्दल कदाचित त्यांना हिनवले गेलेले असू शकते. आजची त्यांची ही वागणूक कदाचित त्या कडवटपणातूनही आलेली असू शकते. मला माहित नाही,त्यामुळे नक्की सांगता येत नाही. माणसाची जडणघडण करण्यात सामाजिक पर्यावरण व संस्कार फार महत्वाचे असतात.
3.त्यांनी मला सही दिली नाही म्हणून मी त्यांच्यावर नाराज असल्याने त्यांचे काही चांगले गुण मला दिसले नसतील, पण माझे मित्र सुनिल तांबे, समीर परांजपे व इतरांना जर त्यांची बाजू घ्यावीशी वाटत असेल तर त्याचीही काही कारणे असतीलच ना?
4. यश अनेक शत्रू निर्माण करतं. तुम्ही कोणाचंही वाईट न करूनही लोक तुमच्यावर जळत असू शकतात हे मला अनुभवाने माहित आहे. बाई जबरदस्त यशस्वी आहेत, सबब त्यांचीपण दुसरी काही बाजू असू शकते ना?
5.निळू फुले यांनी मला एकदा सांगितले होते की, एका रसिकाने गर्दीत त्यांची कोर्‍या कागदावर सही घेतली. भाऊंनी गडबडीत दिली. त्या दिवशीच्या नाट्यप्रयोगाचे सगळे मानधन मालकाने कापून घेतलेले आढळले. भाऊंनी चौकशी केल्यावर समजले की, त्याने त्या कागदावर लिहिले होते, " माझ्या खात्यावर यांना दहा तिकिटे द्यावीत.पैसे माझ्या मानधनातून कापून घ्यावेत." निळू फुले.
कोणी सांगावे लताबाईंनाही काही असे अनुभव आले असतील.
6. माझी माहिती अपुरी असू शकते, तेव्हढ्यावरून लताबाईंचे समग्र मुल्यमापन करणे अन्यायकारक ठरू शकते.
7. त्यांची गाणी मला आवडतात.मला आवडणार्‍या अनेकांना आवडतात.[उदा.नेमाडे,कसबे] म्हणुन त्यांना सही न देणे माफ आहे.
8. एकदा लताबाईंचा वाढदिवस त्यांच्या वादक साथीदारांनी पार्टी देऊन साजरा केला. बाईंना त्यांनी आवर्जून बोलावलेले होते. त्या हजर होत्या. अचानक कोणीतरी प्रत्येकाने भाषण करून लताबाईंना शुभेच्छा द्यायची टूम काढली.तबलजी आयुष्यात कधी बोललेले नव्हते. सगळ्यांनी आग्रह केला. लताबाईंनीही बोला म्हटले.बिचारा कधीच भाषण केलेला माणूस. ते म्हणाले, "मित्रांनो, लताबाईंची गाणी मला फार आवडतात.आज त्यांच्या वाढदिवशी आपण सगळेजण 2 मिनिटे उभे राहून त्यांना श्रद्धांजली वाहू या." लताबाई न रागावता खिलाडूपणे 2 मिनिटे उभ्या राहिल्या आणि त्यांनी आपल्या प्रेमळ सहकार्‍याच्या शब्दाचा मान राखला.
म्हणून  मला लताबाईंबद्दल आदर आहे.

No comments:

Post a Comment