Tuesday, March 28, 2017

मुस्लीम समाज आणि देशभक्ती



हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग 4 :-
मुस्लीम समाज आणि देशभक्ती
कारगीलची अटीतटीची लढाई चालू होती.
टायगर हिल जर भारतानं जिंकलं तर भारताचा विजय होणार होता.
लढाऊ आणि ज्येष्ठ अधिकारी अजित सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यानं पाक सैन्यावर हल्लाबोल केला. भारतीय सैन्यानं पराक्रमाची शर्थ केली. जिवाची बाजी लावून आपले सैनिक लढले. पण पाकची कुमक मोठी होती. त्यांनी बाजी मारली. आपले जवान एकतर शहीद झाले किंवा गंभीर जखमी तरी.
अजित सिंग यांना माघार घ्यावी लागली.
हा पराभव जवानांच्या लढाऊपणाला, मनोबलाला आरपार छेदून गेला.
जाकीर हुसेन नाईक नावाचा अवघ्या 27 वर्षे वयाचा एक जवान अजित सिंगांना भेटला. त्यानं गनिमी काव्यानं परत हल्ला करण्याची परवानगी मागितली.
रिस्क फार मोठी होती. उरले सुरले सर्व जवान कामी आले असते.
अजित सिंग तयार नव्हते. एव्हाना रात्रीचे अडीच वाजले होते. जाकीर हुसेन नाईक परत परत विनंती करीत होता. त्याचा प्लॅन बढीया होता. अजित सिंग यांनी परवानगी दिली.
आता जाकीर हुसेन नाईक लिड करीत होता.
त्यानं आरोळी ठोकली, "बोलो, अल्ला हो अकबर!"
सार्‍या भारतीय जवानांनी प्रतिसाद दिला, "अल्ला हो अकबर!"
सगळे पाक सैनिक एव्हाना विजयोत्सव साजरा करण्यात मश्गूल होते. खात होते, पित होते, नाचत होते. ते सारेच बेभान झाले होते. त्यांनी हे नारे ऎकले, त्यांची समजूत झाली की पाकीस्थानी सैनिकच येत असणार. ते गाफिल राहिले आणि म्हणता म्हणता भारतीय जवानांनी पाकची सेना कापून काढली. ठार केली. त्यांना सावरायला वेळच मिळाला नाही.
आणि भारताचा तिरंगा टायगर हिलवर डौलानं फडकू लागला.
भारतानं कारगीलचं युद्ध जिंकलं होतं.
जाकीर हुसेन नाईक घोषणा देत होता, "बोलो, भारत माता की जय."
प्रतिसाद मिळत होता, "भारत माता की जय."
सारा आसमंत रात्रीच्या त्या अंधारात घोषणा देत होता, "भारत माता की जय."
स्वातंत्र्याच्या चळवळीत असफाक उल्ला फासावर गेला.
सोलापूरचा कुर्बान हुसेन शहीद झाला.
भारत पाक लढाईत परमवीर अब्दुल हमीद यांनी पराक्रमाची शर्थ केली. त्यांना मरणोत्तर "परमवीर चक्र" दिले गेले.
शहानवाज हुसेन हे सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे वरिष्ठ सेना अधिकारी होते. सरहद्द गांधी उर्फ बादशाह खान, मौलाना आझाद आणि आणखी कितीतरी यांची स्वातंत्र्य चळवळीतली कामगिरी केवळ अभिमानस्पद होती.
हो, पाकीस्तानच्या हिंसक कारवायांनी भारत संतप्त आहे. भारतात सतत अतिरेकी घुसवणं, भारतीयांच्या संरक्षण यंत्रणा पोखरून काढणं, भारतावर वारंवार हल्ले करणं पाककडून चालूच आहे. त्याचा मुकाबला करायलाच हवा.
हो, अतिरेक्यांची नावं वाचताना त्यात बरीच नावं मुस्लीम असल्याचं वारंवार वाचनात येतं, पण म्हणून सरसकट सर्व मुस्लीमांच्या देशभक्तीवर शंका घ्यायची?
सगळे मुसलमान अतिरेकी नसले तरी सगळे अतिरेकी मुसलमान कसे? असल्या अफवा पसरावयाच्या? यामुळे नेमके काय साधेल?
याला उत्तर म्हणुन हिंदूंमधील अतिरेकी किंवा देशद्रोह्यांची नावं पुढं आणायची?
मला हे मान्य नाहीए.
अतिरेकी मग तो कोणीही असू द्या, त्याची गय करता कामा नये, पण उठसूठ कोणाही देशप्रेमी माणसाच्या देशप्रेमावर शंका घेऊन आपण आपल्याच पायावर दगड पाडून घेत नाही आहोत काय?
.......................................
[संदर्भ पाहा- डोमेल ते कारगिल, मेजर जनरल शशिकांत पित्रे, राजहंस प्रकाशन,पुणे,2013, पृ. 243/244]

No comments:

Post a Comment