Monday, March 6, 2017

विंदा करंदीकर

भाऊंकडे किश्यांचा अफलातून खजिना असायचा. ते आपल्या तिरकस शैलीत तो सांगताना अगदी हरवून जायचे. अनेकांची फिरकी घेण्यात ते पटाईत होते. त्यातून ते स्वत:लाही वगळायचे नाहीत. मजा म्हणजे ते आपले किस्से सांगताना आपण कसे गंडलो, आपली कशी फजिती झाली किंवा आपल्याला शेरास सव्वाशेर कसे भेटले हे सांगतानाही ते आरपार हरवून जायचे. त्यांनी सांगितलेला हा त्यांच्या फजितीचा किस्सा.
तिघांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम त्याकाळात फार गाजत होता.
कार्यक्रमाची व्यवस्था बघण्याची जबाबदारी फिरती असायची. एकदा एका साखर कारखान्याचे निमंत्रण आले.
स्वत: एम.डी. आले होते निमंत्रण घेऊन.
त्यांना दारातच थांबवून व्यवस्थापक कविवर्यांनी त्यांच्या हातात 27 अटींचा कागद सोपवला. पुढच्या वेळी येताना फोन करून वेळ घेऊन यायला बजावले.
लेखी नियमांप्रमाणे अ‍ॅडव्हान्सची रक्कम द्यायला फोन करून, वेळ घेऊन एम.डी. आले.
परत कविंनी त्यांना दारातूनच कटवले.
एम.डीं.नी हा अनुभव चेअरमनना सांगितला. चेअरमन नामांकित बेरकी राजकारणी होते. त्यांनी 27 नियमांचा कसून अभ्यास केला. नियमाप्रमाणे कवींना रेल्वेची फर्स्ट क्लासची तिकीटं पाठवण्यत आली. स्टेशनवर घ्यायला ए.सी. गाडी पाठविण्यात आली. राहण्या-जेवणाची व्यवस्था ठरल्याप्रमाणे उत्तम करण्यात आली.
कार्यक्रमाला तिन्ही कविवर्य सभागृहात पोचले तर तिकडे सभागृह संपुर्ण मोकळे. स्टेजवर फक्त एम.डी. आणि चेयरमन दोघेच.
कवीवर्यांनी श्रोत्यांची चौकशी केली. तेव्हा चेअरमन  म्हणाले, "तुमच्या 27 अटींमध्ये कार्यक्रमाला श्रोते हवेत अशी अटच नाही. आता तुम्हाला या रिकाम्या सभागृहापुढेच कविता वाचाव्या लागतील."
व्य्वस्थापक कविंच्या लक्षात आपली चूक आली.
भाऊ चेअरमनना म्हणाले, "मुदलात आमच्या माणसाकडून काहीतरी आगळीक झाली असणार. आम्ही कवी जरा विक्षिप्त असतो. मी स्वत: तुमची क्षमा मागतो."
चेअरमन म्हणाले, "अहो, आमचा माणूस 400 किलोमीटरवरून तुम्हाला फोन करून तुमची वेळ घेऊन अ‍ॅडव्हान्सची रक्कम द्यायला येतो. तुम्ही त्याला साधं घरातही घेत नाही. पाणीही विचारीत नाही. एव्हढा माणुसघाणेपणा?"
भाऊंनी व्यवस्थापकांच्या वतीने चुक झाल्याचे मान्य केले. माफी मागितली.
चेअरमननी एमडींना शेजारच्या सभागृहात पिटाळले. तिकडे लावण्यांचा फड रंगलेला होता. एमडींनी स्टेजवर जाऊन घोषणा केली, "मंडळी, शेजारच्या सभागृहात एक सांस्कृतिक प्रोग्राम होणार आहे. आपण सर्वांनी तिकडे जायचेय. चेअरमनसाहेबांचा तसा हुकुम आहे. तो कार्यक्रम झाला की हा कार्यक्रम पुन्हा पुढे सुरू होईल. तर आता जरा चेंज."
5 मिनिटात सभागृह खचाखच भरले. तीन कवींचा काव्यवाचनाचा कार्यक्रम इतका रंगला की लोक लावण्यांचा कार्यक्रम विसरले.
भाऊंनी त्यापुढे व्यवस्थापणाची जबाबदारी मात्र स्वत:कडे घेतली.
.....................

No comments:

Post a Comment