Sunday, March 5, 2017

जी जात नाही ती जात?

भारतीय समाजात लिंगभाव, जात, वर्ग, धर्म आणि वंश ही प्रामुख्याने संस्थात्मक भेदभाव आणि शोषणाची केंद्रे आहेत. आज पीपल ओ‘फ इंडीयाच्या प्रकाशित 43 खंडांनुसार आज देशात 4635 जाती/जमाती अस्तित्वात आहेत. प्रबोधन, सामाजिक चळवळी, लेखन, आधुनिक शिक्षण, विज्ञान, शहरीकरण, औद्योगिकीकरण, जागतिकीकरण यामुळे जातजाणीव काहीशी कमजोर जरूर झालीय पण ती समूळ गेलेली नाही. तीव्रता कमी झाली असली तरी तिचं स्वरूप बदललय. गुंतागुंत वाढलीय. जातजाणीवेची पाळंमुळं खूप खोलवर रूजलेली असली तरी "जी जात नाही ती जात" असली टाळीबाज विधान तपासून घेतली पाहिजेत असं मला वाटतं. हे खरंय की "डीकास्ट" होणं ही सोपी गोष्ट नाही. मात्र दाखल्यावरून जाती काढल्या की त्या समाजातून आपोआप जातील असं मानणारे लोक मला तरी भाबडे वाटतात. समाजात जात होती म्हणून तर ती दाखल्यावर आली ना? जातीनिर्मुलनासाठी ज्यांनी फार मोठी लढत दिली त्यात प्रामुख्याने महात्मा फुले, महर्षि वि.रा.शिंदे, सयाजीराव गायकवाड, राजारामशास्त्री भागवत, शाहू महाराज, डा. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, डा. राम मनोहर लोहिया, साने गुरूजी आणि इतर अनेकांचा मोठा वाटा आहे. आपल्या देशात प्रत्येक जात हे स्वतंत्र राष्ट्र आहे, असं बाबासाहेब म्हणतात. जातीनं श्रेणीबद्ध विषमता निर्माण केली. पायर्‍यापायर्‍यांची किंवा मनोर्‍याची व्यवस्था निर्माण केली असं ते सांगतात. डा. भांडारकर, डा.श्री.व्यं.केतकर, डा.आंबेडकर, जी.एस.घुर्ये, डा. इरावतीबाई कर्वे, एम.एन. श्रीनिवासन आदींच्या मते जाती टिकवण्याचे मुख्य केंद्र जाती अंतर्गत होणारे विवाह हे आहे. जातीनिहाय समाज मान्यता, आर्थिक व संसाधनांची मालकी, सामाजिक प्रतिष्ठेची उतरंड यांचा विचार केल्याशिवाय जातीची ताकद कळत नाही. आजवर संस्कृतीकरण म्हणजे वरच्या जातींचे अनुकरण हा नियम सर्वजाती पाळत होत्या. आता सर्वांमध्ये मागास होण्याची शर्यत लागलीय. मागासलेपणाचे डोहाळे लागलेला आपला देश महासत्ता व्हायची स्वप्नं बघतोय. 1950पासून आपल्याकडे आलेल्या निवडणुक व्यवस्थेने एक दुटप्पीपणा आणला.नेते तोंडाने सतत म्हणत असतात, " फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्राय.जातीपाती गेल्या पायजेलत." खरी गोष्ट ही आहे की हेच चोर जातीसंस्था, जात पंचायती, जातीचे नेते यांना पोसत असतात.कारण जातीची मतबॅंक त्यांच्याद्वारे सांभाळली जाते. बहुजन म्हणवणार्‍या अनेक नेत्यांनी हे पाप केलेलं आहे. "ब्राह्मण - ब्राह्मणेतर" ही मांडणी फुले शिंदे आंबेडकर करीत होते तेव्हा तो लढा नेतृत्वाविरूद्धचा होता. प्रवृत्तीविरूद्धचा होता. गेल्या 65 वर्षात मात्र तो निवडणुका जिंकण्याच्या रणनितीचा भाग बनलेला आहे. तोंडाने सतत जातीनिर्मुलनाची भाषा करायची पण वर्तन मात्र अस्सल जातीयवादी करायचे हे इथल्या 65 वर्षे सत्ता ताब्यात ठेवणार्‍या सत्ताधार्‍यांचं खरं वर्तन राहिलेलं आहे. काही लोक अतिशय भाबडे आहेत. त्यांना जात खरोखरच जायला हवीय पण जात हा शब्द उच्चारणारे सगळेच त्यांना जातीयवादी वाटू लागतात. जातींची मानसिकता किती घट्ट आहे, ती आधी नीट समजून घ्या असं कोणी लिहिलं की हे त्यांच्यावर जातीयवादी म्हणून तुटून पडतात. काही असे बालीश की त्यांना वाटते आजार झाकून ठेवला की बरा होतो.मी जात मानत नाही म्हटलं की संपली जात. काहीजण म्हणतात,आम्हाला महाविद्यालयात येईपर्यंत जातच माहित नव्हती. हे खरं असेल तर असे लोक जातीव्यवस्थेचे लाभार्थी असू शकतात. जातीव्यवस्थेचे बळी असलेल्यांना ही चैन परवडत नसते. मात्र आता जागतिकीकरणानंतर प्रत्येक जातीत नवे वर्ग तयार झालेत. माणसाचा वर्ग बदलला की त्याची वर्गजाणीव बदलते. आज सर्वाधिक आंतरजातीय विवाह करणारात कोणता समाज पुढे आहे? प्रतिष्ठाभंग झाला म्हणून [ Honour Killing ] तरूण मुलामुलींची रानटीपणे हत्त्या करणारे कोण आहेत? आज कोणत्या समाजात सर्वाधिक लोक "डीकास्ट" झालेले आहेत ते लोक पाहात असतात. आज महाराष्ट्रात धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता, ज्ञानसत्ता, सांस्कृतिक सत्ता, प्रशासकीय सत्ता, न्यायसंस्था आणि माध्यमसत्ता यात कोणते समाज प्रबळ आहेत? धार्मिक, राजकीय, आर्थिक, प्रशासनपातळीवर सर्वाधिक बोलणारे, लिहिणारे, तिकीटं देणारे, शेयर मार्केट, बाजार, उद्योग, सहकारी बेल्ट ताब्यात असलेले कोण आहेत हे सारं दिसत असतं. .................. सार्‍याच जातींमध्ये चार चांगली माणसं असतात आणि सर्वच जातींमध्ये काही लबाड आणि बदमाश लोकही असतात. तेव्हा जात जितकी लवकर जाईल तितकं बरं. पण ती आपोआप जाणार नाही. त्यासाठी फुले शिंदे साने आंबेडकर गांधींचा रस्ता पकडायला हवा. स्त्रीपुरूष समता, ज्ञाननिर्मिती व कौशल्यांचा विकास, संसाधनांचे फेरवाटप, आंतरजातीय विवाह, धर्म चिकित्सा आणि संवाद याला पर्याय नाही. ...................

No comments:

Post a Comment