Monday, April 3, 2017

4 भिंतींचं घर मी एकटी चालवते

"असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती
माझी आई म्हणते, 4 भिंतींचं घर मी एकटी चालवते!"
-- भीमराव गोपनारायण
माझे कविमित्र भीमराव गोपनारायण यांचा "सर्वा" हा कवितासंग्रह गाजलेला आहे. हे विदर्भातल्या अकोल्याकडचे कवी राज्य परिवहन [एस.टी.] मध्ये वाहक [ कंडक्टर ]म्हणुन काम करतात आणि अतिशय दमदार कविता करतात.
मराठीतलं कवितेचं दालन अतिशय समृद्ध आहे. हाल, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम ते केशवसुत, मर्ढेकर, कोलटकर, चित्रे, ढसाळ,महानोर,
आणि इतर अनेक ही मराठी कवितेच्या सह्याद्रीची उत्तुंग शिखरं आहेत.
मराठीला चार ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले. त्यातले कुसुमाग्रज, विंदा, नेमाडे हे तीन कवी. खांडेकरांनी कविता लिहिली की नाही ते मला माहित नाही, मात्र त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितासंग्रहाला उत्तम प्रस्तावना लिहिलीय.
नारायण सुर्वेंना कालिदास सन्मान मिळालाय. बालकवी, मुक्तीबोध, माधव ज्युलियन, यशवंत, रेगे, बी, अनिल, राय किणीकर, बहिणाबाई, बी.रघुनाथ, ना.वा.टिळक, बा.भ. बोरकर, इंदिरा संत, शांताबाई, मेश्राम, भट, मनोहर, डहाके, तुलसी परब, अरूण काळे, भुजंग मेश्राम, लोकनाथ यशवंत,आरती प्रभू, [चिं. त्र्यं. खानोलकर] यांचे असंख्य चाहते आहेत. पाडगावकर, बापट आणि विंदांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम तुफान लोकप्रिय होते. माडगूळकरांच्या गीतरामायणानं असंख्य लोकांची मनं जिंकली होती. आजही अशोक नायगावकर, अजिम नावाज राही, प्रकाश होळकर,संजय चौधरी, कल्पना दुधाळ, नारायण सुमंत, भरत दौंडकर, व्रजेश सोळंकी, उत्तम कोळगावकर, आसावरी काकडे, संतोष पवार, प्रकाश घोडके, अरूण म्हात्रे, सौमित्र, नीरजा, अनुराधा पाटील, फ.मु., फुटाणे, प्रभा गणोरकर, विठ्ठल वाघ, इंद्रजित भालेराव, संदीप खरे, चंद्रशेखर गोखले, अजय कांडर, प्रदीप निफाडकर, इलाही जमादार, हेमंत दिवटे, श्रीधर तिळवे आदी कवी लोकप्रिय आहेत.
सकस कविता मोठ्या प्रमाणात लिहिली जात असली तरी फुटकळ आणि टाकावू कवितेचं पिकही जोरदार असतं. महाराष्ट्रात बाकी कशाचाही दुष्काळ पडेल पण कवितेचा? छे. केवळ अशक्य.12 कोटी मराठी माणसांमध्ये किमान सव्वाएक कोटी तरी कवी असतीलच.
राज्यात एव्हढे सव्वाएक कोटी कवी तरी कवितासंग्रह म्हणे खपत नाहीत. याचा अर्थ हे कवी आपल्याला ऎकवतात पण इतरांचं विकत घेऊन वाचत नसणार !
कवितासंग्रह आग्रह करूकरू विकत घ्यायला लावणारा कविताप्रेमी एकच माणूस संजय भास्कर जोशी.
तर कवीकुळामध्ये बाबा आदमच्या काळापासून लोकप्रिय असलेल्या या काही वर्ल्डफेमस दंतकथा --
*1.एकदा रस्त्यात पकडा,पकडा असा जोरदार आरडाओरडा झाला. एक जण जीव खाऊन पळत होता, रस्त्यातल्या लोकांनी त्याला पकडलं. " काय रे, चोर्‍या करणं शोभतं का? काय चोरलंस बोल?"
तो म्हणाला, "अहो, मी काहीही चोरलेलं नाही."
"मग तो मागचा दाढीवाला का पकडा पकडा असं जीवखाऊन बोंबलतोय?"
इतक्यात धापा टाकत टाकत दाढीवालेच पोचले. ते म्हणाले, " मी सुप्रसिद्ध कवी महेश केळुस्कर, आकाशवाणीवरून मी माझ्या कविता ऎकवतो. त्या इतक्या मौलिक असतात की ट्रान्झीस्टर, झालंच तर घरातले मोठे रेडीओ अशा सर्वांवरून त्या ऎकता येतात. आज अख्ख्या होल इंडीयात रामदास आठवले सोडले तर माझ्या तोडीचा दुसरा कवी आढळणार नाही. माझ्या कविता संग्रहावर महासवलत योजना चालूय. एक घेतला तर नऊ मोफत.
कविता आवडल्या तर पैसे परत. मला काव्यवाचनाला बोलावणारांना हापूस आंब्याच्या पाच पेट्या भेट देणार शिवाय कौल या चित्रपटाचे दहा पासेस फ्री. कोणालाही आकाशवाणीत बोलावताना माझ्या कविता ऎकण्याची मी अटच घालतो. याला तसाच गळाला लावला होता. मी काय उगीच असिस्टंट डायरेक्टर आहे आकाशवाणीत?
यानं माझं काही चोरलं नाही. पण स्वत:ची कविता ऎकवली आणि माझी न ऎकताच पळत होता !
पकडलेला म्हणाला, " यांची थुकरट कविता ऎकण्यापेक्षा मला पोलीसात द्या, तुरूंगात गेलेलं परवडलं !"
*2. बालगंधर्व नाट्यमंदीरात एक कवीसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. मंत्री कार्यक्रमाला उशीरा पोचले, बघतात तो काय स्टेजवर अवघा एकच कवी. खाली थिएटर हाऊसफुल्ल. ते संयोजकांना म्हणाले, "काय चुकलं, एकच कवी कसा आलाय? इतर का आले नाहीत?"
संयोजक म्हणाले, "सर आलेत ना सगळे. त्याचं कायय की कार्यक्रमाची बातमी वाचून कवीमंडळींनी एव्हढी गर्दी केली की मग आम्हाला आसन व्यवस्थेत बदल करावा लागला. कवींना सभागृहात बसवलंय. वर बसलाय तो रसिक श्रोता आहे."
*3. अलका सिनेमागृहाजवळ लकडी पुल आहे. तिकडे एक महिला पुलावरून नदीत उडी मारीत होती. तिला जिव देताना पोलीसांनी व जागृक पुणेकर नागरिकांनी वाचवलं.
"बाई, का जीव देताय," असं विचारलं, ती म्हणाली, "काय करू? नवरा कवी आहे. मुडदा मला सिनेमा दाखवायला म्हणुन घेऊन आला आणि सिनेमा सुटल्याबरोबर त्याच्या कविता ऎकवायला लागला. मला सांगा सलमान खानचा सिनेमा बघितल्यानंतर असल्या भिकार कविता ऎकण्यापेक्षा जीव दिलेला काय वाईट?"
नवरा म्हणाला, "माझ्या कविता ऎकायला नाही म्हणते म्हणजे ही देशद्रोही नाही का? जिथं माझ्या कवितांची नक्कल थेट आकाशवाणीत महेश केळुस्कर आणि रामदास आठवले मारतात, त्या कवितांना वाईट म्हटलेलं मी कसं चालवून घेईन? ती उडी मारीत होती म्हणून बरं नाही तर मीच ढकलली असती. आता देवेन भाऊंना सांगून मी गोवंशाबरोबरच कवीवंशाच्या रक्षणाचा कायदाच करून घेणार आहे."
*4.एकदा एक कवी हार्ट अ‍ॅटॅक आल्यानं आय.सी.यु.मध्ये अ‍ॅडमिट होते. तब्येत अतिशय सिरियस होती. डाक्टरांनी कवीच्या पत्नीला बोलावलं, म्हणाले, "सर्व नातेवाईकांना बोलावून घ्या. मनाची तयारी करा. जास्तीतजास्त दोन ते तीन तास आहेत तुमच्या हातात."
पत्नी म्हणाली, "डाक्टर काहीही करा,पण यांना किमान 12 तास जगवा. आमचा मुलगा यु.एस.ला असतो. तो निघालाय. 12 तासात दवाखान्यात पोचेल. निदान शेवटची भेट व्हायला हवी."
डाक्टर म्हणाले, "शक्य नाही. कितीही प्रयत्न केले तरी 12 तास शक्यच नाही."
कवीचा मित्र शेजारी उभा होता. तो म्हणाला, " वहीनी, तुम्ही काही काळजी करू नका. माझ्याकडं मस्त आयडीया आहे. मी करतो 12 तासांची व्यवस्था."
मित्र कवीकडं गेला. म्हणाला, "दोस्ता, डाक्टरांनी सगळी आवराअवर करायला सांगितलीय. अरे तू जाणार आता. तू गेल्यावर तुझ्या कविता कोण ऎकविल आम्हाला? हे बघ, कवी जर कविता म्हणता म्हणता गेला तर त्याच्याएव्हढं भारी दुसरं काहीच नाही. ही घे तुझी वही, कर सुरू."
कवी कविता म्हणु लागला...कवी कविता सादर करीत राहिला... कवी कविता...
मुलगा विमानतळावरून धावत धावत दवाखान्यात पोचला. आई त्याला वडीलांच्या खोलीत घेऊन गेली. मुलानं बघितलं, वडील कविता म्हणत होते, कविता ऎकताऎकता त्यांचा मित्र मात्र मरून पडला होता.
*5. रेल्वेनं प्रवास करणारे शेजारी बसलेले 2 प्रवासी एकमेकांची ओळख करून घेत होते. पहिला म्हणाला, "मी कवी आहे."
तेव्हा दुसरा म्हणाला, " मी ठार बहिरा आहे."

No comments:

Post a Comment