Tuesday, April 11, 2017

फुले सत्यशोधक की ब्राह्मणद्वेष्टे?

आजवर महात्मा फुले यांच्याबद्दल लिहिणार्‍या आणि बोलणार्‍या वर्गाने फुले = शाळा, हौद, स्त्रीशिक्षण, असं समीकरण करून टाकलेलं आहे.
ही कामं मोलाचीच आहेत पण फुले यांचा तो फक्त एक पैलू आहे. फुले तेव्हढ्यापुरतेच मर्यादित नव्हते.
फुले ब्राह्मणद्वेष्टे होते असं विपर्यस्त चित्रण केलं गेलेलं आहे. जोतीरावांच्या ब्राह्मण समाजाविषयीच्या लेखनाचा सोयिस्करपणे राजकीय हत्त्यार म्हणून वापर करण्यात आलेला आहे. त्यामागे काही राजकीय कटकारस्थानं होती.
वास्तवात फुले यांची टिका नेतृत्वावरची, प्रवृत्तीवरची टिका  होती. त्यावेळी ब्राह्मण समाज ब्रिटीशांखालोखाल अनेक क्षेत्रात नेतृत्व करीत होता, त्यामुळं ती ब्राह्मण समाजावरची टिका असल्याचा गैरसमज निर्माण करण्यात आला.
फुले सत्यशोधक होते. त्यांच्यानंतर या चळवळीचं अपहरण करून तिचं ब्राह्मणेतर चळवळीत रूपांतर करण्यात आलं. सत्यशोधक चळवळीमध्ये ब्राह्मण आणि अब्राह्मण दोघेही होते. मात्र ब्राह्मणेतर चळवळीतले सर्व लोक सत्यशोधक होते काय? या प्रश्नाचं खरं उत्तर "नाही" असंच द्यावं लागेल.
"ख्रिस्त महमद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी!
मानव भावंडे सर्व एकसहा त्याजमध्ये आहां तुम्ही सर्व
बुद्धीसामर्थ्याने सुख द्यावे घ्यावे दीनास पाळावे जोती म्हणे!"
ही आहे फुले यांची मुख्य शिकवण.
[महात्मा फुले समग्र वांड्मय, म. शासन, मुंबई, 1991, पृ. 569]

"भांडणे लागता सर्वांचे वाटोळे पाखंड सोहळे फेका दूर,
येणारे अरिष्ट कसे तरी टाळा शूद्रादिक गळा पडा आता
वेळ आली आत्मपरीक्षण करा निर्मिकास स्मरा जोती म्हणे!"

[महात्मा फुले समग्र वांड्मय, म. शासन, मुंबई, 1991, पृ. 577]

जोतीरावांचे कितीतरी आप्तमित्र ब्राह्मण होते. त्यात भांडारकर, गोवंडे, भिडे, वाळवेकर, जोशी, भवाळकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर, न्या.रानडे, लोकहितवादी अशा अनेकांचा समावेश होता.

जोतीरावांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला.
आपल्या मृत्यूपत्रात या मुलाला आपली संपत्ती मिळावी अशी तरतूद केली.
या मृत्यूपत्रावर त्यांनी साक्षीदार म्हणून जिवलग मित्र भांडारकरांची सही घेतली.
या मृत्यूपत्रातील काही शब्दांचा जाणीवपुर्वक विपर्यास करून काही जातीयवादी संघटना स्वत:चा ब्राह्मणद्वेषाचा अजेंडा सेट करीत असतात.
जोतीराव जर ब्राह्मणद्वेष्टे असते तर त्यांनी ब्राह्मण मुलगा दत्तक घेतला असता का?
त्यालाच आपली संपत्ती मिळावी यासाठी मृत्यूपत्र केलं असतं काय?
ते शासकीय कार्यालयात नोंदवताना त्यावर ब्राह्मण सहकार्‍याची साक्षीदार म्हणून सही घेतली असती काय?
त्यांनी आणि सावित्रीबाईंनी ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणासाठी स्वत:च्या घरात बालहत्त्या प्रतिबंधक गृह चालवलं असतं काय? त्यात 35 ब्राह्मण विधवांची बाळंतपणं केली असती काय?
विधवांचं अमाणूषपद्धतीनं  केशवपन होत असे त्याविरूद्ध नाभिकांचा संप घडवला असता काय?
ब्राह्मण हे आपले भाऊ आहेत असं लिहिलं असतं काय? तेही मानवातली शोभा आहेत असं कौतुक केलं असतं काय?
जे ब्राह्मण स्त्री-शूद्र आणि अतिशूद्र यांना आजही दासानुदास मानतात त्यांची सावली आपल्या प्रेतावर पडू देऊ नये असं जोतीराव त्या मृत्यूपत्रात म्हणतात.
त्यातील अर्थनिर्णायक शब्द वगळून सर्वच ब्राह्मणांची सावली जोतीराव नाकारतात असा दुष्ट प्रचार केला गेला.
ह्या राजकीय दुष्टाव्याला बळी पडून महाराष्ट्रात सामाजिक द्वेषाचं राजकारणं फुललं.
निकोप, निरामय, सत्यशोधक असलेल्या जोतीरावांचा वापर ब्राह्मणद्वेषासाठी किंवा अन्य कोणाच्याही द्वेषासाठी होऊ द्यायचा का?
याचा सारासार विचार करायलाच हवा.
त्यांचं साहित्य असं संदर्भ सोडून वापरण्याला आणि त्याचा विपर्यास करून स्वत:च्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्याला पायबंद घातला जायला हवा की नको?
- प्रा. हरी नरके
....................
संदर्भ 1. आम्ही पाहिलेले महात्मा फुले, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1993
2, महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1998
3. महात्मा फुले - समग्र वांड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1991
.....................................

No comments:

Post a Comment