Monday, April 3, 2017

अंगारवाटा, शोध शरद जोशींचा

अंगारवाटा, शोध शरद जोशींचा - संदर्भमुल्य असलेला चरित्रग्रंथ
काळे भानू हे मराठीतले महत्वाचे लेखक आणि साक्षेपी संपादक आहेत. त्यांनी चार महिन्यांपुर्वी "अंगारवाटा, शोध शरद जोशींचा," हा महत्वपुर्ण चरित्रगंथ लिहून प्रकाशित केलेला आहे. भानू काळे यांनी या चरित्र लेखनासाठी खूप मोठी मेहनत केलेली आहे. स्वत: शरद जोशींचे सहकार्य त्यांना याकामी मिळाले. जोशींचे देशविदेशातील असंख्य सहकारी, मित्र आणि कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेऊन, बोलून, पत्रव्यवहार, लिखित पुरावे, वृत्तपत्रे, ग्रंथ, नियतकालिके यातील पुराव्यांचा वापर करून हे पुस्तक लिहिलेलं असल्यानं त्याला संदर्भमुल्य प्राप्त झालेले आहे.
धनंजय कीर,सुमती देवस्थळी,वीणा गवाणकर यांनी लिहिलेली मराठी चरित्रे लोकप्रिय व विद्वतमान्य ठरलेली आहेत.
अशा मोजक्या चरित्र लेखकांच्या तोडीचं काम काळेंनी केलेलं आहे.
या पुस्तकात त्यांनी शेती आणि शेतकरी यांच्याबाबत दिलेली काही माहिती हादरवून टाकणारी आहे.
केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष व्ही.टी.कृष्णम्माचारी यांनी 28 एप्रिल 1956 रोजी तयार केलेल्या मसुद्यात "शेतीमालाचे उत्पादन 40 टक्क्यांनी वाढवावे व शेतीमालाची किंमत 20 टक्क्यांनी कमी करावी अशी शिफारस केलेली होती."
चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्यात "सारा उत्पादन खर्च लक्षात घेऊन शेतीमालाचा भाव ठरवला जाऊ नये" असे मार्गदर्शक तत्वच होते.
1965 साली कृषि मुल्य आयोगाची स्थापना करण्यात आली.
त्याच्या 1971 सालच्या अहवालात असे नमूद करण्यात आलेले आहे की, "शेतकर्‍यांना त्यांचा संपुर्ण उत्पादन खर्च भरून निघेल अशा किमती देणे अव्यवहार्य होईल. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतील."
शेतकर्‍याची लूट करणे हेच आपल्या देशाचे अधिकृत धोरण होते, आहे, हे वाचून लाज वाटली.
[अंगारवाटा, शोध शरद जोशींचा, भानू काळे, उर्मी प्रकाशन,पुणे,डिसेंबर 2016, पृष्ठे 510+24 आर्टप्लेट, किंमत रू.500 ]

No comments:

Post a Comment