Monday, April 3, 2017

जागृत म्हसोबा

एका गावातला म्हसोबा प्रत्येकाच्या नवसाला पावतो असं भक्तगण सांगायचे. जिल्ह्यात सर्वत्र त्या म्हसोबाचा बोलबाला होता. नवस बोलायला मोठमोठ्या रांगा लागायच्या.कोंबडी,बकरी यांचे बळी दिले जायचे. रक्ताचा ओहळ वाहात असायचा. म्हसोबा अंगात आलेले अनेक लोक तिकडे पडीक असायचे. हे जागृत देवस्थान असल्यानं कोणी नुसती त्याच्यावर शंका जरी घेतली तरी 24 तासात दणका बसतो, हगवण लागते असेही सांगितले जायचे.
केशवराव विचारे सत्यशोधक विचार पेरत गावोगाव फिरायचे.
ते म्हसोबाला कडकडून भेटले. गच्च मिठी मारून त्यांनी म्हसोबाशी अर्थातास गप्पा मारल्या.
बरोबर एक महिन्यानं ते परत म्हसोबाला भेटायला गेले.
ते पुजार्‍याला म्हणाले," म्हसोबा माझ्या नवसाला का पावला नाही?"
पुजारी म्हणाला, "काय नवस केला होता?"
ते म्हणाले, "मला हगवण लागू दे."
पुजारी म्हणाला, "त्यासाठी नवस करायची गरजच नाही, म्हसोबाबद्दल तुमच्या मनात सन्मान, आदर नसेल तरी हगवण लागेल."
केशवराव म्हणाले, "महिन्यापुर्वी मी आलो, म्हसोबाला मिठी मारली. त्याचवेळी मी त्याचे दोन्ही डोळे काढून नेले. आज महिना झाला, माझ्यावर काहीच कारवाई का नाही झाली?"
पुजारी म्हणाला, "सरळ आहे. तुम्ही डोळेच काढून नेल्यानं अ‍ॅक्शन कोणावर घ्यायची ते म्हसोबाला दिसणार कसं ना?"

No comments:

Post a Comment