Wednesday, April 12, 2017

बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब

तथागत गौतम बुद्ध यांचं कृ.अ. केळुसकर लिखित चरित्र बाबासाहेबांना मॅट्रीकच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल 1908 साली भेट देण्यात आलं. त्याच्या वाचनानं बाबासाहेब प्रभावित झाले, प्रेरित झाले आणि बुद्धाकडं वळले. पुढची 48 वर्षे डॉ. बाबासाहेब सातत्यानं बुद्ध विचार, कार्य आणि सामाजिक परिवर्तन याबाबत अभ्यास,संशोधन आणि लेखन करीत होते.
1924 साली बार्शीला केलेल्या भाषणात पहिल्यांदा त्यांनी धर्मांतराचा उल्लेख केला.
1933 साली सुभेदार सवादकर यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपण धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला असून आपला कल बुद्धाकडं असल्याचं कळवलं. [ही पत्रं सुभेदार सवादकर यांच्या नात लंडनच्या प्रेरणा तांबे Prerna Tambay यांनी मला उपलब्ध करून दिली.]

13 ऑक्टोबर 1935 ला येवल्याच्या परिषदेत त्यांनी धर्मांतराची ती सुप्रसिद्ध घोषणा केली.
त्यानंतर ते याबाबतीतला समाजमनाचा कल आणि कानोसा जाणून घेण्यासाठी विविध जातींच्या परिषदा आयोजित करू लागले. देशविदेशातील बौद्ध परिषदांना उपस्थित राहून
हा विषय मांडू लागले. जनतेला या विषयाकडं घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी करू लागले.
1950च्या दशकात त्यांनी बुद्धावर स्वतंत्र ग्रंथ लिहिण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
"बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथाच्या 180 प्रती छापून घेऊन अभिप्रायार्थ त्यांनी जागतिक पातळीवरील तज्ञांकडं त्या पाठवल्या. या पुस्तकाची छपाई अशी करण्यात आली होती की त्याच्या पृष्ठाच्या एका बाजुला मजकूर छापलेला होता आणि त्याची मागची बाजू तज्ञांना टिपणं, नोंदी, अभिप्राय लिहिता यावा यासाठी कोरी ठेवण्यात आली होती.
या ग्रंथाच्या छ्पाईसाठी डॉ. बाबासाहेबांकडे निधी नसल्यानं त्यांनी पंतप्रधान नेहरू यांना एक पत्र लिहिलं. 1956 साली बुद्धांच्या 2500 वर्षांच्या निमित्तानं केंद्र सरकारनं नेमलेल्या समितीनं या पुस्तकाच्या काही प्रती आगावू नोंदणी करून घ्याव्यात आणि त्याची रक्कम आगावू द्यावी अशी योजना बाबासाहेबांनी सुचवली होती. नेहरूंनी पुस्तकाची आगावू नोंदणी करून घेऊन त्यापोटी निधी द्यायला किंवा अनुदान द्यायला केंद्र सरकारकडं पैसे नाहीत असं कळवत नकार दिला. मात्र तुम्ही पुस्तक अवश्य काढा, विक्रीला ठेवा, लोक नक्की खरेदी करतील असाही अनाहूत सल्ला दिला.
डॉ. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला लक्षावधी अनुयायांना धम्म दिक्षा दिली.
त्यांनी आलेल्या सुचना विचारात घेऊन या पुस्तकाचं फेरलेखणाचं काम पुर्ण केलं. प्रस्तावना लिहून पुर्ण केली. या प्रस्तावनेत त्यांनी आपली पत्नी डा. सविता यांनी आजरपणात आपल्याला जपल्यानंच हे पुस्तक आपण लिहून पुर्ण करु शकलो अस नमूद केलं. त्यांचं 6 डिसेंबर 1956 ला महापरीनिर्वाण झालं. पीपल्स एज्युकेशन सोसायटीनं प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकात मात्र ही प्रस्तावना छापली नाही.
अनेक वर्षांनी समता सैनिक दलानं प्रकाशित केलेल्या मराठी अनुवादात ती प्रस्तावना प्रथमच छापली.
बाबासाहेबांचं शेवटचं भाषण काठमांडूच्या जागतिक परिषदेतलं 20 नोव्हेंबर 1956 चं मानलं जायचं. आम्ही त्यांच्या भाषणांची तीन पुस्तकं [खंड18] छापली आहेत त्यात आम्ही त्यांचं 25 नोव्हेंबर 1956 चं त्यांनी सारनाथला दिलेलं शेवटचं भाषण छापलेलं आहे.
ज्या जागेवर बसून तथागतांनी धम्मचक्र प्रवर्तनाचं पहिलं भाषण दिलं त्या जागेवर सम्राट आशोकांनी धम्मैक स्तूप बांधला. त्या स्तूपाच्या सावलीत बसून "चलो बुद्ध की ओर" अशी आर्त हाक बाबासाहेबांनी त्यांच्या या शेवटच्या भाषणात दिलेली होती.
- प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment