Saturday, October 7, 2017

तो बच्चे की जान लोगे क्या?

.............शाळेत असताना एक शिकलो होतो, गुरूजी म्हणायचे, दारू फार वाईट. चला दारू नष्ट करूया. निम्मी मी पितो, उरलेली तुम्ही प्या. हाच जुमला मी वापरला आणि काँग्रेसमुक्त भारत करून दाखवला. 95% काँग्रेसवाले माझ्या पक्षात घेतले. उरलेल्यांना तुरूंगात टाकले. संपली ना काँग्रेस! ही वचनपुर्ती नाही? ...............
आजकल बहुत जादती हो रही है. ये सरासर नाइन्साफी हैं. एक आदमीके खिलाफ पुरा सोशल मिडीयाँ टूट पडा हैं. आणि आजवर बाजू घेणारे सगळे भक्त अचानक बिळात जाऊन लपून बसलेत.
कायतर म्हणे तुम्ही निवडणुकीत यांव आश्वासनं दिली होती, नी त्यांव आश्वासनं दिली होती, मारो गोली यार. निवडणुकीतली आश्वासनं ही काय पुरी करण्यासाठी असतात? इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, "गरीबी हटाव" केलं त्यांनी वचन पुरं?
मी देवा ब्राह्मणांसमोर सात जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या, त्यातरी मी कुठे पुर्‍या केल्या? हा ट्रॅकरेकॉर्ड तुम्हाला माहित असतानाही तुम्ही माझ्या शब्दांना भुललातच ना? मुळात निवडणुकीतल्या आश्वासनांवर जे विश्वास ठेवतात ते भोटच.
दरवर्षी एक कोटी नविन नोकर्‍या निर्माण करीन म्हणालो होतो, तशा गेल्या वर्षी लाखभर नोकर्‍या निर्माण केल्याही. 100% काम करूनही तुमचे प्रश्न कायमच? मग ठरवलं एक कोटीची फिगर पुर्णच करायची. 8 नोव्हेंबर 2016 ते 7 आक्टोबर 2017 या अवघ्या 11 महिन्यात केल्या मग एक कोटी नोकर्‍या कमी! गेला लोकांचा रोजगार. बसलेत शंख करीत.
अहो, पंधरा लाखांचं काय घेऊन बसलात? एका वर्षात मुकेश, गौतम, अजिम, बालकृष्ण हजारोच नव्हे लाखो कोटींनी श्रीमंत झाले. अवघ्या एका वर्षात 100 उद्योगपतींची संपत्ती 25% नी वाढली. मित्रों, ही किमया कोणाची? या 100 जणांना अच्छे दिन कोणी आणले? अर्थात मीच! 130 कोटी लोकांना काय आणि 100 लोकांना काय अच्छे दिन आलेच ना?
काँग्रेसच्या काळात कोळसा घोटाळे झाले. मी ठरवलं घोटाळ्यांचं मूळ कारणच नष्ट करायचं. कोळसाच नाही तर घोटाळा कुठुन होणार? तर लगेच लागले बोंबलायला हे कॉमन मॅन. काय तर म्हणे लोडशेडींग करू नका. अरे ज्यांना अंधाराचा अनुभवच नसेल त्यांचा काय डोंबलाचा उजेड पडेल? 
म्हणे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल स्वस्त होऊनही आपल्या देशात महागले, देशाचा जीडीपी कमी झाला, महागाई वाढली, सगळी भंकस. विरोधकांचे हे आरोप खोटे आहेत. तुम्ही 2 रूपये कमी करायला लावून देशाच्या विकासाचा पैसा 2% नी तुम्ही कमी केलात. देशभक्ती अशी हवी की स्वत:हून म्हटलं पाहिजे, 80 च काय 100 रूपये लिटर करा पेट्रोल. विकासाला पैसा हवा तर महागाई होणारच.
त्या एल्फिन्स्टन पुलावर 23 माणसं काय मेली तर तुम्ही लगेच बुलेट ट्रेनबद्दल बोंब ऊठवलीत. माणसं मेल्याशिवाय लोकसंख्या आटोक्यात कशी येणार? तसं मलाही दु:ख झालं. मी तसं ट्विटही केलं. लवकरच राज्यांच्या निवडणुका आल्यात ना!
जीडीपीला काय चाटायचेय? महागाई झाल्याशिवाय शेतकरी जमिनी कशाला विकतील? मग आम्ही पार्टीसाठी जमिनी कशा खरेदी करणार?
पेस्टीसाईडमुळे शेतकरी मेले हा काय माझा दोषय? आणि त्यांचं काय तसेही ते लहर आली की सतत आत्महत्त्या करीतच असतात हो.
जीएसटी लागू करण्याची डेरिंग कोणी केली? तर व्यापारी लागले बोंबलायला. त्यांचं मात्र ऎकायलाच हवं. शेवटी इलेक्षनफंड तेच देणार आहेत. मग काय केली ना जीएसटीत कपात?
पुर्वी 70-80 माणसं मंत्रीमडळात असायची. काय करायचीय ही भारूडभरती? मी अवघ्या अडीच माणसांवर कारभार सोपवला. झाली की नाही बचत? शौरी काय नी सिन्हा काय त्यांच्या नावात फक्त यशवंत! बाकी फक्त शंखध्वनी. सच्ची कामयाबी तो हमारे मुठ्ठीमें बंद हैं!
शाळेत असताना एक शिकलो होतो, गुरूजी म्हणायचे, दारू फार वाईट. चला दारू नष्ट करूया. निम्मी मी पितो, उरलेली तुम्ही प्या. हाच जुमला मी वापरला आणि काँग्रेसमुक्त भारत करून दाखवला. 95% काँग्रेसवाले माझ्या पक्षात घेतले. उरलेल्यांना तुरूंगात टाकले. संपली ना काँग्रेस! ही वचनपुर्ती नाही?
उटसुटके बच्चे को रुलाओ मत यार! भक्तोंको ज्यादा उकसावो मत. आदेश आते ही सब के सब बिळ के बाहेर आ जायेंगे! याद रखो!
-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment