Wednesday, October 18, 2017

सांगण्यासारखं एव्हढंच आहे-

दिवाळी अंकाबद्दल -
"या दिवाळी अंकाचा कागद उत्तम आहे. छपाई मोहरेदार आहे. सजावट आणि इतर निर्मितीमुल्यं दर्जेदार आहेत. तसं या दिवाळी अंकाबद्दल सांगण्यासारखं एव्हढंच आहे." एका मोठ्या दैनिकाचे संपादक टेल्कोच्या कलासागर दिवाळी अंकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. गंमत म्हणजे त्यांनी मारलेला हा टोला लक्षात न आल्यानं आमच्या अधिकार्‍यांनी त्यावर जोरदार टाळ्या वाजवल्या.
टेल्कोच्या वतीनं दरवर्षी दिवाळी अंक काढला जायचा. त्याचा प्रकाशन सोहळा भपक्यात साजरा केला जायचा. मोठमोठ्या लेखक,संपादक, नेत्यांना प्रकाशन समारंभाला निमंत्रित केलं जायचं. आमचे काही उत्साही अधिकारी आणि कामगार यांच्या हौशी लेखनाचा त्या अंकात समावेश असायचा. पहिल्या अंकाच्या प्रकाशनाला पु.ल. आलेले. नेहमीप्रमाणेच त्यांचं भाषण अप्रतिम झालं. या उपक्रमाचं कौतुक करून ते बोलले ते जे. आर.डी. टाटा, टाटा संस्कृती, लिलाताई आणि सुमंत मुळगावकर यांच्याबद्दल. मी तेव्हा टेल्को होस्टेलमध्ये राहत होतो. पुलंनी आपल्या भाषणात स्वरूपाताई नी माझा अतिशय गौरवानं उल्लेख केलेला. त्यामुळे मॅनेजमेंटमधल्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांचा आमच्याकडे बघायचा दृष्टीकोन 180 कोनात बदलला.
हा अंक पहिलटकरणीच्या बाळंतपणासारख्या कौतुक सोहळ्यात तयार व्हायचा. एखादा चांगला लेख, दोनचार बरे आणि उरलेले कचरा असे साहित्य त्यात असायचे. त्याचं कारण संपादक चौकडीचं मुळात साहित्यभान शाळकरी होतं. एखादा बरा वाचक आणि उरलेले केवळ अधिकारी असल्यानं संपादक बनलेले असायचे. ते चतुर असल्यानं त्यांना आमची आठवण प्रकाशनाला मोठा लेखक,संपादक,अभिनेता बोलवतानाच यायची. बाकी आमच्यासारख्या इतरांना संपादकीय टिमचे दरवाजे कायम बंद असायचे.
आमचे एक एच.आर. मॅनेजर अतिशय चापलूस होते.त्यांची एक सवय होती. दरवेळी प्रस्तावना करताना ते एक किस्सा सांगायचे. म्हणजे ते प्रमुख पाहुण्यांना सांगायचे बघा, तुम्ही आमच्या कामगारात प्रचंड लोकप्रिय आहात. कालपरवाच एका कामगाराला तुमचं पुस्तक मशीनवर वाचताना सुपरवायझरनं पकडलं. एरवी आम्ही त्याला मेमो दिला असता पण तो तुमचं पुस्तक वाचतासल्यानं आम्ही त्याच्यावर कारवाई केली नाही. प्रमुख वक्ते जाम खुष व्हायचे.
अर्थात दरवेळी चालून जाणारी ही खेळी एकदा त्यांना चांगलीच भोवली. माधव गडकर्‍यांना त्यांनी हा हातखंडा किस्सा सांगितल्यावर माधवराव म्हणाले, अरे वा, काय सांगताय? मला त्या कामगाराला भेटायचंय.
धावाधाव करून युनिफॉर्ममधला एक कामगार हजर केला गेला. माधवराव चहा घेताघेता त्याच्याशी अतिशय आपुलकीनं बोलले. कामगार, अधिकारी खुष झाले. माधवराव गाडीत बसले. नी माधवरावांनी त्याला जवळ बोलावलं. म्हणाले, आभारीए. या एकदा लोकसत्तेत. बाय द वे माझ्या त्या पुस्तकाचं नाव काय होतं?
कामगार गडबडला. तोवर तो पढवलेला कामगार माधव गडकर्‍यांच्या पुस्तकाचं नाव विसरून गेला होता. तो नेटानं म्हणाला, "एकच प्याला!" माधवराव हसले. म्हणाले, छानय. चालू द्या तुमचं! एकच प्यालाचे लेखक राम गणेश गडकरी 1920 ला स्वर्गात गेले बरं का!"
एकदा तर आणखीच गम्मत झाली. हा किस्सा कार्यक्रमात सांगून झाला. प्रमुख वक्ते काही खुष झालेले दिसले नाहीत. त्याचं कारण एच.आर. साहेबांना नंतर कळलं. वक्ते आपल्या  भाषणात म्हणाले, तुमचे कामगार माझं पुस्तक वाचतात म्हणजे थोरच असले पाहिजेत. फक्त बारीक अडचण एव्हढीच आहे की माझं एकही पुस्तक प्रसिद्ध झालेलं नाही."
टेल्कोत लिलाताई मुळगावकरांमुळे दर महिन्याला रक्तदान शिबीर व्हायचं. आमचे शेकडो कामगार दर चारसहा महिन्यांनी रक्तदान करायचे. पुल गंमतीनं लिलाताईंना रक्तपिपासू बाई म्हणायचे. लिलाताईंनी आमच्यात रक्तदान संस्कृती रूजवली.
माझ्याकडं नियमित रक्तदान केल्यानं पुण्यातल्या तिन्ही रक्तपेढ्यांची कार्डं होती. नात्यात, ओळखीत कोणालाही रक्ताची गरज पडली की आम्ही धावून जायचो.
एकदा माझ्या वहीनींचा फार मोठा अपघात झाला. खुप रक्त गेलं होतं. शिवाजीनगरच्या हर्डीकर हॉस्पीटलमध्ये त्यांना भरती केलेलं होतं. रक्त भरावं लागेल असं डॅाक्टरांनी सांगितलं. आमच्या नातेवाईकात तोवर रक्तदानाबद्दल प्रचंड भिती होती. मी म्हणलं, तुम्ही माझ्यावर सोडा. पण वहिनींच्या रक्तगटाचं दोन रक्तपेढ्यात शॉर्टेज होतं. के.ई.एम.वाले म्हणाले, रक्त मिळेल पण तुम्ही कार्ड असलं तरी रक्तदान करा नी ही बाटली घेऊन जा.
मी दिवसभर पहिली पाळी करून मग हडपसरवरून सायकलनं के.ई.एम.ला गेलो. रक्तदान केलं. त्यांनी दिलेला चहा प्यायलो पण घाई असल्यानं बिस्कीटं खिशात ठेवली नंतर खाऊ म्हणून. सायकल मारत हर्डीकरला पोचलो. सायकल लावताना थोडंसं गरगरल्यासारखं वाटायला लागलं. रक्ताची बाटली डॅाक्टरांच्या हातात देताना मी कोसळलो. मला तिथंच अ‍ॅडमिट करावं लागलं. शुद्धीवर आल्यावर मी डॅाक्टरांना विचारलं, ती रक्ताची बाटली माझ्या हातून पडून फुटली काहो? ते म्हणाले, " नाही. बाटली माझ्या हातात दिल्यावरच तू पडलास. काय झालं होतं? काही आजार आहे का? चक्कर का आली? तुझी शुद्धच गेली होती. जेवला नव्हतास का?"
मी सगळा प्रकार सांगितल्यावर ते म्हणाले, " रक्तदान केल्यावर असं सायकलींग करू नये बाबा. थोडक्यात वाचलास. दवाखाण्यात होतास म्हणून आम्ही इमर्जन्शी ट्रीटमेंट देऊ शकलो. रस्त्यात पडला असतास आणि मागून येणार्‍या एखाद्या वाहनाखाली......"
- प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment