Sunday, October 8, 2017

प्रा.मु.ब.शहासर- उत्तम वक्ते

धुळ्याचे प्रा.मु.ब.शहासर हे उत्तम वक्ते होते. राष्ट्र सेवा दल आणि राजवाडे संशोधन मंदिर या दोन संस्थांसाठी ते खुप झटले. ते नामवंत शिक्षक होते.
मी अण्णासाहेब मगर महाविद्यालयात शिकत असताना विविध आंतर महाविद्यालयीन वादविवाद-वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असे. त्यात प्रवरानगरला सर मला परीक्षक होते. त्याच स्पर्धेत 35 वर्षांपुर्वी सर्वप्रथम राधाकृष्ण मुळी, यमाजी मालकर यांची भेट झाली. मैत्री जुळली. मुळी यांनी त्या उत्स्फुर्त स्पर्धेत आचार्य अत्रे यांच्यावर केलेलं भाषण आजही एव्हढ्या वर्षांनी माझ्या लक्षात आहे.
त्या स्पर्धेनंतर मी शहासरांना भेटून वक्तृत्व, वाचन आणि आवाज यांच्या सुधारणांबद्दल विचारलं. राष्ट्र सेवा दलात असलेले मु.ब. शहासर उंच, गोरे, रूबाबदार, बघताच प्रभाव पाडील असं व्यक्तीमत्व. फर्डे वक्ते. ते मला शांतपणे म्हणाले," हे बघ, वक्तृत्व ही एक कला असली तरी माणसाचं रंगरूप हे जन्मानं मिळतं आणि वक्त्याच्या दिसण्याचा त्याच्या वक्तृत्वावर फार मोठा परीणाम होतो. तुझा रंग एव्हढा काळाभोर आहे की तुझा प्रभाव पडणार नाही. तुझ्या भाषणांकडे लोकांचं लक्षच जाणार नाही. आता तु्झा चेहरा... कधी आरश्यात बघितलायस? .... तर तात्पर्य असं की तू वक्ता बणण्याच्या फंदात अजिबात पडू नकोस. हा नाद सोड." सर बोलत गेले आणि मी खचत गेलो. कुठून झक मारली आणि यांना भेटलो असं झालं. प्रवरानगरहून परत येताना खुप चिडचिड झालेली.
पण मग नंतर मी असा विचार केला की शहासर कदाचित सदहेतूनंही बोलले असतील. मला उचकवावं, पेटवावं हाही हेतू असेल त्याच्यामागे. आता आपण किमान बरा वक्ता नक्कीच व्हायचं. झपाटून वाचायचं. अण्णा म्हणजे प्रा. गं. बा. सरदार यांना भेटून मी त्यावर चर्चा केली. अण्णा म्हणाले, " तू अजिबात खचू नकोस. ते शहांचं व्यक्तीगत मत आहे. मला ते पटत नाही. तुझ्या एखाद्या मुद्द्यानं ते दुखावले असतील. विसरून जा. परत भेटले तर मनात कटुता ठेवू नकोस. मला खात्रीय त्यांना आपलं मत बदलावं लागेल. माणसाला वेगळं मत जरूर असावं. पण विद्यार्थ्यांपुढे ते अशा पद्धतीनं मांडणं मला तरी गैर वाटतं. असं बघ, अजातशत्रू वगैरे हे खरं नसतं. नॉनकमिटल राहणं सोयीचं आणि फायद्याचं असेलही, पण भुमिका घेणं महत्वाचं आहे. सगळी नाटकं करता येतात पण तळमळीचं नाटक नाही करता येत. तुझी ग्रामीण नाळ, वाचन, मेहनत, तुझी ओरिजनॅलिटी तुला खुप पुढे घेऊन जाईल." अण्णांच्यामुळे माझी उमेद वाढली. अशाच शुभेच्छा पु.ल., बाबासाहेब पुरंदरे यांनीही दिलेल्या. बाकीचे पण अनेकजण उत्तेजन द्यायचे. विशेषत: विनायकराव कुलकर्णी, एसेम अण्णा, ग.प्र.प्रधान पाठीशी होते.  सततची मेहनत आणि मित्रांशी सतत वादविवाद यातनंही उर्जा मिळायची. त्याचकाळात चंद्रकांत कुलकर्णी, भूषण गगराणी, अभिराम भडकमकर, सदानंद दाते, विकास आबनावे आणि आणखी कितीतरी मित्र मिळत गेले.
पुरस्कारामागून पुरस्कार मिळत गेल्यानं आत्मविश्वास वाढत गेला. माझ्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य मा.तु.पवार यांनी " हरी, तुला हव्या तेव्हढ्या स्पर्धा कर, फक्त नापास होणार नाहीस याची काळजी घे," असा सल्ला दिला.
आज मागं वळून बघताना गंमत वाटते की त्या अवघ्या 3 वर्षांमध्ये मी 133 वादविवाद, वक्तृत्व, उत्स्फुर्त वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला. बक्षीसं काय कुणाला तरी मिळायचीच. बहुधा माझ्या ग्रामीण पार्श्वभुमीमुळे, तडाखेबंद आणि कळकळीच्या बोलण्यामुळे असेल पण त्याकाळात कधी पहिलं, कधी दुसरं तर कधी तिसरं, पण बक्षीस न घेता परत आलो असं घडलं नाही. बाय द वे शहांच्या वेळी प्रवरानगरलाही मला तिसरं बक्षीस मिळालेलं होतं बरं का. पुढच्या वर्षी तर प्रवरानगरचं पहिलं बक्षीस मला मिळालेलं. तर असो.
मध्यंतरी धुळ्याच्या शरद पाटलांनी कापडण्याच्या ग्रंथालयाच्या कार्यक्रमाला बोलावलेलं होतं.
बघतो तर काय स्टेजवर साक्षात प्रा. मु. ब. शहासर होते. मी त्यांना नमस्कार केला आणि म्हटलं, "सर आज मी जो काही आहे तो केवळ तुमच्यामुळं बरं का!" ते खुष झाले.
संयोजक मला म्हणाले, "एक अडचण आहे. नियोजित अध्यक्ष आजारी असल्यानं येऊ शकत नाहीयेत. तर मु. ब. सरांना करूया का अध्यक्ष?"
मी म्हणलो, " जरूर करा."
शहासर तयार झाले. मात्र त्यांनी अट घातली, म्हणाले," मी हरी नरकेच्या आधी बोलणार."
शहासर उत्तमच वक्ते होते. ते छानच बोलले. मुद्देसूद. अभ्यासपुर्ण.
प्रवरानगरचा प्रसंग त्यांच्या लक्षात होता.
त्यांनी त्याचा उल्लेख त्यांच्या भाषणात आवर्जून केला.
म्हणाले, "मी प्राध्यापक म्हणून अनेक वक्ते घडवले. हरी नरकेला मी प्रवरानगरला परिक्षक होतो. तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं, हा पोरगा चमकणार. मी त्याला तिकडे बक्षीस देऊन तसं भाकीतही केलं होतं. काय हरी, तुझ्या लक्षात आहे ना? असणारच म्हणा. ज्याअर्थी आता स्टेजवर मला भेटल्याभेटल्या नमस्कार करून, तू म्हणालास, " सर, आज मी जो काही आहे तो केवळ तुमच्यामुळं बरं का! त्याअर्थी तुही माझं ऋण मानतोस! ..."
मी तसा फाटक्या तोंडाचा. शहासरांना प्रवरानगरला खरा प्रसंग काय घडला होता, त्याची आठवण करून द्यावी असा खुप मोह झाला. पण आवरला.
म्हणतात ना, ज्याचा शेवट चांगला... सरांच्या विचारात बदल झालाय तर आता जुनं उकरून कशाला काढा?
चुकतात कधीकधी मोठ्या माणसांचे अंदाज! मी माझ्या भाषणात एव्हढंच म्हटलं, "सर, प्रवरानगरला काय घडलं, ते तुम्हाला आणि मला माहित आहे. तुमचं व्हर्जन तुम्ही सांगितलंत. एकच विनंती, निदान यापुढे तरी केवळ दिसण्यावरून कोणाला ठोकू नका. अहो, आपले संत चोखामेळा सांगून गेलेत, " उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलीया रंगा...."
भाषण संपवून मी खाली बसल्यावर शहासर माझा हात आपल्या हातत घेत मला म्हणाले, "आज तू जोरदार बोललास. पुढं ते मला Sorry" म्हणाले.
संयोजक बघतच राहिले. शहासर एकीकडे छान बोललास असंही म्हणताहेत अणि त्याच वेळी Sorry ही म्हणताहेत. एकुण हे काय प्रकरण आहे बुवा?
विनम्र आदरांजली.
- प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment