Tuesday, November 7, 2017

नोटाबाणी








इंदोर, दि. 8 नोव्हेंबर 2016 -
सायंकाळी बातम्या बघण्या-ऎकण्यासाठी हॉटेलच्या रूममधला टिव्ही लावला तर सुतकी चेहर्‍याने घातलेली मित्रो, अशी हाक ऎकू आली. आता भारत-पाक युद्ध घोषित होणार म्हणून काळजी वाटायला लागली. पोटात धडकीच भरली ना!
बघतो तर काय? झाली ना नोटाबंदीची घोषणा.
प्रवासात मोजकेच पैसे बरोबर आणलेले. तेही ठेवायला सोयीचं व्हावं म्हणून 500 आणि 1000 च्या नोटांमध्ये. आता काय करायचं?
आधल्याच दिवशी इंदोरच्या पुस्तक दुकानात जाऊन बरीच हिंदी पुस्तकं घेण्यासाठी ऑर्डर दिलेली. उद्या दुकानाला सुट्टीय. परवा या. आणून ठेवतो असं दुकानदार म्हणालेला. मनासारखी पुस्तक मिळणार म्हणून आनंद झालेला.
दुसर्‍या दिवशी गेलो तर दुकानदारानं सगळी पुस्तकं आणलेली होती. पण तो म्हणाला, 1000, 500 च्या नोटा "महज एक कागज का टुकडा" असल्यानं चालणार नाहीत.
त्यामुळे हातातोंडाशी असलेली पुस्तकं न घेताच परत फिरावं लागलं.
संगिताला इंदोरमध्ये महेश्वरी साड्या, कपडे, नमकीन, मिठाई अशी कायकाय खरेदी करायची होती, कागज का तुकडा काय कामाचा? सबब खरेदी कॅन्सल.
इंदोरला जाऊनसुद्धा काहीही न घेता आम्ही हात हलवत परत आलो.
मेहरबानी परतीच्या तिकीटांचं रिझर्वेशन आधीच झालं होतं म्हणून परत तरी येता आलं. नाही तर राहावं लागलं असतं इंदोरातच.
एकच आनंद होता की आता भारतात सुवर्णयुग येणार. अमीर लोकांची चैन की निंद हराम की होणार. गरीबाची मात्र चांदी होणार.
आणि तसंच झालं. सगळ्यांचे अच्छे दिन सुरू झाले.
बघता बघता गरीब मालामाल झाले.
श्रीमंत पार भिकारी झाले.
लाखो - करोडोंचा काळा पैसा बाहेर आला.
भारताचा जीडीपी दोन हजार वर्षात प्रथमच 25% वर गेला.
नवे रोजगार इतके जास्त निर्माण झाले की स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी संपुर्ण बेरोजगारी प्रथमच दूर झाली.
100 टक्के भारतीय श्रीमंत झाले.सारा भारत एका रात्रीत डिजीटल झाल्यानं कार्ड पेमेंटवर कमिशन कमावता येऊ लागले. कामधंदा न करता पैसे कमावण्याचा घरबसल्या नवा मार्ग उपलब्ध झाला. अगदी सरकारी कंपन्याही [महा.विद्युत निर्मिती आणि पारेशन] कार्ड पेमेंट केले तर आजही त्या रकमेवर कमिशन घेतात. धन्य धन्य सरकार.
दुसर्‍या दिवसापासून ए.टी.एम. वर हवे तेव्हढे पैसे सहज उपलब्ध होऊ लागले.
देशात रांगा म्हणून कुठेच नाहीत.
बॅंक कर्मचार्‍यांना तर कामच शिल्लक राहिलं नाही.
सगळा काळा पैसा संपल्यानं देशभर आनंदी आनंद पसरलेला.
असा महान राज्यकर्ता या आधीच आम्हाला का मिळाला नाही असं जो तो एक दुसर्‍यांना विचारू लागला.
पाडवा, दिवाळी, दसरा, आणखी कायकाय एकदमच साजरं करू लागला.120 जणांना रांगेतून मोक्ष मिळाला. आणीबाणीमुळे इंदिराबाईंना जावे लागले होते तसे या नोटाबाणीसाठी कोणाला घालवणार?
तर मित्रो, आजच्या दिवशी वर्षश्राद्ध घालायचं तर काय करता येईल?
आपण तमाम भारतीय आजच्या आपल्या राष्ट्रीय पुण्यतिथीदिनी
सामुदायिक आत्महत्त्या केल्याची आठवण म्हणून
सर्व मिळून दोन मिनिटं उभं राहून स्वत:लाच श्रद्धांजली वाहू या का?
-प्रा. हरी नरके
...........................

No comments:

Post a Comment