Monday, January 22, 2018

मधू दंडवते एक भला माणूस-

मधू दंडवते राजकारणाच्या घाणीत राहूनही अतिशय भला माणूस. निळू फुले, डॉ.श्रीराम लागू,सदाशिव अमरापूरकर, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत मी त्यांच्या निवडणुक प्रचाराला त्यांच्या मतदार संघात कोकणात गेलेलो होतो. तिकडे नारायण राणेंची प्रचंड दहशत होती. त्या निवडणुकीत दंडवते पराभूत झाल्याचे खूप वाईट वाटले होते. एकदा नानांचा [मधू दंडवते]
फोन आला. नाथ पैंच्या नावानं आपण महोत्सव घेतोय. तू अवश्य ये.
मी होकार दिला.
रेल्वेचं तिकीट पोस्टानं घरी आलं.
त्यात माझं वय 65 वर्षे लिहिलेलं होतं.तेव्हा मी अवघा तिशीत होतो. मी नानांना फोन केला, तर ते म्हणाले, अरे आपल्या चळवळीत माणसाचं नाव व्हायला वयाची किमान पन्नाशी ओलांडावी लागते. तुझं नाव मी किमान पंधरा वर्षे ऎकतोय. मला वाटलं तू 65 वर्षांचा नक्कीच असशील.
रेल्वेत तिकीट चेकरनं मला वयाबाबत विचारलं. मी माझं ओळखपत्र दाखवलं आणि मधू दंडवतेसायबांची ही चूक असल्याचं त्याला सांगितलं. तो हसला, म्हणाला, असू द्या. त्यांच्यामुळेच ही कोकण रेल्वे झालीय. दुसरा कोणी असता तर मी नियमाप्रमाणं तुम्हाला फाईन मारला असता पण मधुभाई एकदम जंटलमॅन माणूसाय. बिनधास्त राव्हा.
कार्यक्रमाला माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, मधुकरराव चौधरी, नलिनी पंडीत, मेधा पाटकर असे अनेकजण आलेले.
कार्यक्रम छानच झाला. परतताना नलिनीबाईंच्या घरी एक दिवस मुक्काम केला.
एकदा निवडणुक प्रचाराला नाना पुण्याला आलेले. मी सोबत होतो. घोरपडीच्या सभेत मीही बोललो. माझी ओळख सांगताना माझ्या महात्मा फुल्यांवरील पुस्तकांचा सुत्रसंचालकानं उल्लेख केलेला होता.
कार्यक्रम संपल्यावर एक गरीब म्हातारा मला भेटला.म्हणाला, महात्मा फुले तुमच्या ओळखीचे असतील तर त्यांना सांगा माझे घेतलेले 500 रूपये परत करा.
मी हादरलो. महात्मा फुल्यांना जाऊन 100 वर्षे होऊन गेलेली.
म्हातार्‍याला चहा पाजला. शांतपणे नीट विचारपूस केली तेव्हा खरा मामला कळला. राज्य शासनाच्या महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाकडे म्हातार्‍यनं अर्ज केलेला होता. तिथल्या एका कर्मचार्‍यानं 500 रूपये लाच घेऊनही त्या म्हातार्‍याचं काम केलेलं नव्हतं. त्या कर्मचार्‍यालाच म्हातारा महात्मा फुले समजत होता. म्हातार्‍याला महामंडळाच्या कार्यालयात घेऊन गेलो. म्हातार्‍यानं लाचखोराला बरोबर ओळखलं.
महामंडळाचे प्रमुख अधिकारी दैठणकरसाहेब यांच्या मदतीनं त्या कर्मचार्‍याकडून 500 रूपये म्हातार्‍याला परत करायला लावले. शिवाय दैठणकरसाहेबांकडून म्हातार्‍याचं कर्ज प्रकरणही मंजूर करवून मार्गी लावलं.
देवेगौडा पंतप्रधान असताना नाना केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. ते सेवा दलाच्या एका कार्यक्रमाला पुण्यात पुनम हॉटेलात आलेले होते. मीही एक वक्ता होतो. नानांशी छान गप्पा झाल्या. केंद्रीय नियोजन आयोगाने भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली तरच त्यांचे शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि घरकुलाचे प्रश्न सुटतील हे मी नानांना बोललो. ते म्हणाले, तू दिल्लीला ये. आपण तरतूद करू.
मी नानांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली. स्वत: नानांच्या हाताने माझे नाव लिहिलेलं व त्यांच्या सहीचं अपॉंईंटमेंट दिल्याचं पत्र आलं.
आम्ही दिल्लीला जाऊन नियोजन भवनात नानांना भेटलो.
त्या दिवशी नानांचा मूड बिनसलेला होता. दुसर्‍या कुठल्यातरी कारणानं ते वैतागलेले होते. मला बघताच म्हणाले, मला तुझा मुद्दा पटलेला आहे. आय एम कन्विन्स्ड. तू पंतप्रधान देवेगौडांना भेट. त्यांच्याकडून आदेश घेऊन ये. मी भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करतो.
नाना, प्लीज तुम्हीच आम्हाला मदत करा. पीएमओत आमची ओळख नाही. असं मी त्यांना म्हणताच ते उखडले. मला ते जमणार नाही असं म्हणून त्यांनी आम्हाला निराश केलं.
त्यावेळी म.टा.चे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी नितीन वैद्य आणि श्री सुरेंद्र मोहन व विरोधी पक्षाच्या एका खासदारानं आम्हाला पंतप्रधानांची वेळ मिळवायला मदत केली.
पंतप्रधान देवेगौडा बथ्थड होते. त्यांना भटकेविमुक्त, त्यांचे प्रश्न यांचे काडीचेही ज्ञान नव्हते. त्या दिल्ली भेटीत फारसं भरीव असं काहीच हाताला लागलं नाही. तिकीटाचे पैसे फुकट खर्च झाले. मी संतापून नानांना तसं पत्रं लिहिलं. नानांनी पत्राची पोचही दिली नाही.
नाना का चिडले? त्यांना शक्य असूनही त्यांनी दुबळ्या भटक्या विमुक्तांसाठी आपले अधिकार का वापरले नाहीत? आणि शक्य नव्हतं तर आम्हाला दिल्लीचा हेलपाटा आणि खर्च का करायला लावला?
याची उत्तरं कधीच मिळाली नाहीत.
मात्र त्यानंतर मी नानांच्या प्रचाराला कधीही गेलो नाही.
काहीही असो. पण नाना एक भला माणूस होते यात शंकाच नाही!
-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment