Saturday, March 3, 2018

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त- पिढी तुझी - माझी

आंतर राष्ट्रीय महिला दिना निमित्त- पिढी तुझी - माझी
संगिता नरके आणि प्रमिती नरके
सामाजिक मागासलेपणा आणि आर्थिक चणचण हातात हात घालून असतात. पण इच्छाशक्ती,बुद्धी आणि कष्टाच्या जोरावर त्यावरही मात करता येते. संगिता ही त्या पिढीची प्रतिनिधी. या प्रयत्नांना प्रामाणिकपणाची जोड असेल तर पुढच्या पिढीचा पाया सर्वार्थाने भक्कम होतो, तिला भरारी घ्यायला बळ देतो, जसं प्रमितीला मिळालं. वाचा या मायलेकींच्याच शब्दात-

--संगिता
माझं बालपण मुंबईत गेलं. महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच लग्न झालं. आमचा आंतरजातीय प्रेमविवाह असल्यानं खूप विरोध झाला. माझं माहेर भटक्या-विमुक्त समाजातलं. हा समाज म्हणजे निरक्षरता, कुपोषण, गुन्हेगारीचा शिक्का बसलेला समाज. पोटासाठी चोर्‍यामार्‍या करण्याचा वारसा लाभलेला समाज. आई-वडीलांनी मुंबईच्या फूटपाथवरून त्यांच्या आयुष्याची सुरूवात केलेली. वडील सामाजिक चळवळीत काम करीत असूनही मुलगाच हवा या हट्टापायी आम्हा ५ बहिणांना जन्म दिला गेला. त्यामुळं कोणतीही हौसमौज आमच्या वाट्याला आलीच नाही. आपल्याला जे मिळालं त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आपल्या मुलांना द्यायचं आणि आपल्याला जे मिळालंच नाही ते सगळंही त्यांना मिळायलाच हवं अशी खूणगाठ मी कळत्या वयात मनात बांधलेली.

वडील कधी घरी नसायचेच. घरात सतत कार्यकर्त्यांचा राबता असायचा. त्यामुळं काही झालं तरी कार्यकर्त्याशी लग्न करायचं नाही असा मी ठाम निश्चय केलेला होता. विद्यापीठ नामांतर आंदोलनात हरीची भेट झाली. तेव्हा तो टेल्कोत रात्रपाळीची पूर्णवेळ नोकरी करीत महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याचवेळी त्यानं चळवळीलाही संपुर्ण वाहून घेतलेलं होतं. त्यामुळं त्यानं जेव्हा मला प्रपोज केलं तेव्हा मी त्याला चक्क नकार दिला.

पुढं आम्ही "झोळ्या जाळा-बेड्या तोडा" परिषदेला औरंगाबादला भेटलो. त्यानंतर अजिंठा - वेरूळचा एकत्र प्रवास झाला. महाडच्या चवदार तळ्यावरील स्त्रीमुक्ती परिषदेनंतर रायगड-प्रतापगड-महाबळेश्वर सहल झाली. आपला जोडीदार शिकलेला हवा. स्त्री-पुरूष समानता मानणारा हवा. व्यसनी नी अंधश्रद्धाळू नसावा. जात, दिसणं, सांपत्तिक स्थिती या गोष्टी फारशा महत्वाच्या नाहीत हे मात्र माझ्या मनात पक्कं होतं. साडेसतरा नळीच्या झोपडीवजा घरात हरी राहायचा. तिकडे "होल वावर इज अवर-गो एनी व्हेअर" अशी पद्धत असल्यानं स्वच्छतागृहाची सोयही नव्हती. तिथल्या मंडळींना त्याची गरजही वाटत नव्हती.

लग्नात मानसिक, शारिरिक, वैचारिक, अनुरूपतेच्या बाबी भक्कमपणे जुळायला हव्यात असं मला वाटे. मुख्य म्हणजे दोघात बलदंड प्रेम हवं. या प्रेमामुळंच शेवटी माझा कार्यकर्त्याशी लग्न न करण्याचा निर्धार ढासळला. आम्ही मोजक्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीनं लग्न केलं. माझं महाविद्यालयीन शिक्षण पुढं चालू राहिलं. फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या प्रभावातून आम्ही दोन निर्णय घेऊन टाकलेले होते.

उच्चशिक्षण पुर्ण झाल्याशिवाय मुल होऊ द्यायचं नाही. नी मुलगा होवो की मुलगी एका अपत्यावर कुटुंबनियोजन करायचं.
लग्नाआधीच हरीनं पिंपरीत छोटी सदनिका घेतली होती. माझ्या सासरी तेव्हा चुलीवर स्वयंपाक व्हायचा, पण हरीनं शाळेत असतानाच गॅस बुक केलेला होता. त्यानं वयाच्या ५ व्या वर्षापासून स्मशानात नोकरी करीत पुणे मनपाच्या शाळेतून शिक्षण घेतलेलं होतं.

त्याच्या घरात पिढ्यानपिढ्या शेतमजुरीची परंपरा असल्यानं त्याला कष्टाची गोडी होती. मात्र भीक, लाचारी आणि चोरीची प्रचंड नफरत होती. त्याचे वडील तो लहान असताना औषेधपाण्याविना अकाली गेले होते. त्यामुळे आणि प्रचंड गरिबीमुळे काटकसर त्याच्या नको इतकी हाडीमाशी मुरली होती. त्याचा कधीकधी अतिरेक झाला की मला त्रास होई. पण तरिही आम्ही उमेदीचे दिवस पोटाला चिमटे घेऊन अतिशय काटकसरीने काढले. आम्हाला त्याचा फायदा असा झाला की आमच्या गरजा अतिशय मर्यादित राहिल्या.

फक्त पुस्तकं विकत घेण्याचं व्यसन वगळता आम्हाला दुसरं कोणतंही व्यसन नाही. भिकेचा आणि लाचारीचा तिटकारा पण चांगल्या जीवनमानाची ओढ यामुळे आम्ही आधी झोपडी, मग दोन खोल्यांची छोटी सदनिका आणि पुढे कोथरूडला दोन बेडरूमचं घर असा प्रवास केला.
सध्या मी लोणकर माध्यमिक विद्यालयात मुंढवा, पुणे इथं काम करते.

प्रमिती ३ महिन्यांची असतानाच मला मोठा अपघात झाला. तिचे खूप हाल झाले. तिला चांगल्या शाळेत घालता यावं म्हणून आम्ही पिंपरीहून कोथरूडला राहायला आलो. तिला मराठी माध्यमात घालायचं आमचं ठरलेलं होतं. अभिनव विद्यालयाचे प्रमुख चिं.स.लाटकर अण्णा यांनी तिला प्रवेश द्यायचं मान्य केलेलं होतं. मात्र आम्हाला तिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचं आहे असं ते गृहीत धरून चाललेले.
अभिनव मराठी माध्यमाची शाळा सुरूही झाली तरी इंग्रजी शाळेचे प्रवेश उशीरा असल्यानं ते निवांत होते. आम्ही हादरलो. तिला मराठी शाळेत घालून आम्ही तिचं नुकसान करू नये असं अण्णांना मनापासून वाटत होतं. शेवटी आमच्या हट्टापुढे त्यांनी नमते घेतले आणि तिला मराठी शाळेत प्रवेश दिला.

हरी एकतर फुले-आंबेडकर ग्रंथ प्रकाशनांच्या कामासाठी मुंबईला मंत्रालयात किंवा व्याख्यानांच्या दौर्‍यांवर सतत घराबाहेर असायचा. मी मुंढव्याच्या लोणकर विद्यालयातली माझी नोकरी सांभाळून प्रमितीच्या अभ्यासाचं बघायचे. प्रमितीच्या शाळेतील कार्यक्रमांना मीच उपस्थित असायचे. प्रमिती अभ्यासात हुशार होती. परंतु तिनं पहिला-दुसरा क्रमांक मिळविण्याऎवजी अभ्यासेतर उपक्रमातही भाग घ्यावा असं मला वाटत असे. बालवाडीपासूनच मी तिला त्यासाठी प्रोत्साहन देत होते. ती कथाकथन, काव्यवाचन, नाट्यछटा, वक्तृत्व, नाट्यवाचन, नृत्य यात सहभागी व्हायची. बक्षीस घ्यायला व्यासपीठावर जायला मात्र बुजायची. ती चित्रकला व गायनाच्या क्लासलाही जायची. पण तिला त्यात फारशी रुची निर्माण झाली नाही. मात्र पोहणे तिने मनापासून एन्जॉय केले. पोहण्याचे सर्व प्रकार तिने आत्मसात केले.

आम्ही तिला भरपूर बालनाट्यं दाखविली. तिला त्याची इतकी गोडी लागली की अनेकदा ती एकट्यानं जायची. काही नाटकं तिनं अनेकवेळा पाहिली. तिला कविता करायला आवडतं. त्या ती मला आवर्जुन वाचून दाखवते. त्या बाबाला दाखव म्हटलं की मात्र ती आपल्या दोघीतलीच गंमत आहे असं म्हणते. सुट्ट्यांमध्ये ट्रेक, ओरीगामी, सुदर्शन रंगमंच यात ती गर्क असायची. सहावीत असताना तिनं एकटीनं हिमाचल, पंजाबचा प्रवास केलेला होता.
चारित्र्य प्रतिष्ठानचा आंतरशालेय आदर्श विद्यार्थीनीचा पुरस्कार तिला मेधा पाटकरांच्या हस्ते टिळक स्मारकला मिळाला होता. त्यावेळी ती म्हणाली होती," आमच्या घरात हजारो पुस्तकं राहतात आणि उरलेल्या जागेत आम्ही तिघं राहतो."

राष्ट्र सेवा दलाची वार्षिक शिबिरं ती चुकवायची नाही. तिथं एका वर्षी प्रसिद्ध दिग्दर्शक अतुल पेठे तिला भेटले. त्यांनी तिची अभिनय क्षमता हेरली. त्यांनी तिची "सत्यशोधक" या नाटकातील सावित्रीबाईंच्या भुमिकेसाठी निवड केली. तिनं तालमीही केल्या. मात्र पुढं ललित कलाच्या वर्गांमुळं तिला ते नाटक सोडणं भाग पडलं. सत्यशोधक खूप गाजलं. पर्ण पेठेनं तो रोल उत्तम केला. परंतु तिच्या उच्च महाविद्यालयीन शिक्षणामुळं तिही पुढील प्रयोगांसाठी वेळ देऊ शकत नव्हती.
हा प्रयोग पाहिल्यावर सतिश आळेकरांनी पेठेंना या रोलसाठी प्रमितीचं नाव सुचविलं, तेव्हा या योगायोगाची मला गंमत वाटली.
दहावीनंतर पुढं काय करावं याबाबत प्रमितीचा निर्णय होत नव्हता. तिचा निर्णय तिनंच घ्यावा असं आम्ही तिला सांगितलं होतं. अभिनयात तिला रस होता. मात्र या क्षेत्रातील अनिश्चितता व अफाट स्पर्धा बघता जोडीला आणखी एखादा आधार असावा असं तिलाही वाटत होतं. त्यासाठी ती जर्मन, मानसशास्त्र, मासकॉम यांचाही विचार करित होती. हरीनं भारतीय प्रशासन सेवेचं क्षेत्रही सुचवुन ठेवलं होतं. तिनं फर्ग्युसनला अकरावी कला शाखेला प्रवेश घेतला.

दरम्यान बारावीतच तिचा ललित कला केंद्रात प्रवेश घेण्याचा निर्णय पक्का झाला होता.
हरी आरक्षण धोरणाचा समर्थक असला तरी आमच्या मुलीनं मात्र ललितकलाला खुल्या गटातूनच प्रवेश घ्यावा यासाठी तो आग्रही होता. प्रवेश परिक्षेत जर यश आलं नाही तर १ वर्ष थांबून पुन्हा प्रवेश परिक्षा द्यायची पण ललितलाच जायचं यावर प्रमिती ठाम होती.

तिनं कसून तयारी केली. चंद्रकांत कुलकर्णींसारख्या नामवंत परिक्षकांनी तिची ललितला निवड केली. गेल्या ३ वर्षात या क्षेत्राचा ध्यास घेऊन ती करीत असलेला अभ्यास, सकाळी ८ ते रात्री १ किंवा २ वाजेपर्यंत तिच्या चालणार्‍या वर्ग, तालमी यात ती आरपार बुडालेली असते. ललितला जातानाची प्रमिती आणि आजची प्रमिती यात खुपच फरक पडलाय. तिचं ट्रान्सफॉर्मेशन झालंय.

तिला कष्टाचं महत्व कळावं, घामाचे पैसे मिळवताना काय वाटतं, हा अनुभव यावा यासाठी तिनं विद्यापिठाच्या "कमवा आणि शिका" योजनेत भाग घेतला. सुट्टीत बिग बझार आणि इतर अनेक ठिकाणी काम करून अर्थार्जन करीत तिनं स्वत:चं शिक्षण घेतलं.

मितुची पिढी अतिशय प्रॅक्टीकल आहे. बोल्ड आहे. जेंडर सेंसेटिव्ह आणि अर्थातच न्यायासाठी आग्रही आहे.
ती जिथं जाईल तिथं तिनं आपली स्पेस मोठी करण्यासाठी झटावं एव्हढीच आमची अपेक्षा आहे.

हरीला सामाजिक चळवळीत आणि लेखन-संशोधनात रस होता, आहे.
मला स्वत:ला अभिनयाची आवड होती. मी तिकडं जावं असं मी एकदा माझ्या पालकांना बोलून दाखवलं तेव्हा ते उखडले होते. ते तसा विचारही करू शकत नव्हते. माझ्या मुलीनं हे क्षेत्र निवडलं याचा मला आनंद आहे. तिचं आवडीचं क्षेत्र तिनंच निवडलं हे महत्वाचं आहे.

तिच्यात कोणताही भाबडेपणा नाही. कठोर परिश्रमांची तिची तयारी आहे. तिनं स्वाभिमानी, निर्भीड, कष्टाळू, संवेदनशील असावं. कितीही स्पर्धा असली तरी ती तिची मुद्रा नक्की उमटविल असा मला विश्वास आहे.
तिचा जोडीदार निवडताना तिनं जात, धर्म, वर्ण, वंश, प्रांत, भाषा असला कोणताही संकुचित विचार करून तिचं निवडीचं क्षेत्र छोटं करू नये असं आम्ही तिला सांगितलेलं आहे. ती जे ठरविल त्याला आमचा संपुर्ण पाठिंबा असेल.
तिनं चांगला माणूस बनावं एव्हढीच आमची अपेक्षा राहणार. तसे संस्कार आम्ही तिच्यावर केलेले आहेत.
..............................
प्रमिती--

माझी लहानपणीची पहिली आठवण म्हणजे बालवाडीत असताना शाळेच्या छोट्याशा सभागृहात पन्नास एक वर्गमित्र-मैत्रिणी आणि पाच-सहा शिक्षकांच्या समोर मी घाबरत घाबरत केलेलं वक्तृत्व स्पर्धेतलं बिरसा मुंडावरचं पहिलं छोटसं भाषण. पण त्या भाषणाच्या आधिचा आणि नंतरचा तासभर माझं अंग आणि मन ज्या गतीनं, ज्या प्रकारे थरथर कापलं होतं ते म्हणजे काही विचारता सोय नाही. त्यानंतर प्रत्येकच स्पर्धेच्यावेळी एन्गझायटीच्या परमोच्च बिंदूशी गाठ पडणं काही चुकत नव्हतं. परंतु तरीही बक्षिसं मिळवणंही चुकत नसल्यानं वारंवार स्पर्धेत उतरतच होतेच.

या सगळ्यात शालेय जिवनातच कधीतरी कलेची, अभिनयाची, नाटकाची गोडी लागली. घरातून आईचा मिळणारा संपूर्ण पाठींबा आणि बाबाचा असलेला आदर्श याचीही खूप मदत झाली. हे सगळं करत असताना तेव्हा गंभीरपणे करीयर म्हणून अभिनयाचा तसा विचार केला नव्हता. पण मनातल्या मनात मी अभिनेत्री व्हायची स्वप्नं नेहमीच रंगवत होते. पण गुप्तपणे. उघडपणे नाही. कारण, एक म्हणजे बाबाची मी आय.ए.एस. व्हावं ही अपेक्षा आणि दुसरं म्हणजे " ज्यांना दुसरं काही जमत नाही, ते पूर्णवेळ अभिनय करतात " हा शाळेत, आपल्या समाजात तेव्हा असलेला गैरसमज.

त्यात मी दिसायला तशी चारचौघींसारखी. त्यामुळं अभिनेत्री व्हायचं असं म्हटल्यावर वर्गातली चार टाळकी फिदीफिदी हसणार याची खात्री होती. पण तरी धीर करून एकदा, "सुंदर दिसण्याचा अभिनयाशी काहीही संबंध नाही" यावरून शाळेतल्या बाईंशी मी वाद घातल्याचं मला आठवतं. तेव्हापासूनच माझी "उद्धट" म्हणून प्रसिद्धी होऊ लागली होती.

शाळा संपली. पण पुढं काय करायचं हे माझं काही ठरत नव्हतं. माझं "गुप्त स्वप्न" तर मला पूर्णत्वास न्यायचंच होतं. पण कसं? हा प्रश्न होताच.

बाबाच्या अपेक्षा अन माझ्या मनाचा कल पाहता आईनं हुशारीनं एक मध्यममार्ग सुचवला. तो म्हणजे मासकॉम. जेणेकरून "इलेक्ट्रॉनिक माध्यमातली पत्रकारिता" म्हणून बाबाही खूश होणार होता आणि "अभिनयाच्या जवळपास जाणारंच हे क्षेत्र आहे" ही तात्पुरती गोळी मलाही पुरणार होती.

त्यानुसार मी ११ वी कला शाखेत प्रवेश घेतला. मराठी माध्यमातून थेट फर्ग्युसन मधल्या सगळ्या कॉन्व्हेंटच्या क्राऊडशी मॅचअप करताना आधी नाकी नऊ आलेले. अभ्यासात मन रमेना अन आर्ट सर्कल मधल्या अंतर्गत राजकारणामुळं तिथंही घुसता येईना. हा काळ म्हणजे माझ्यासाठी करीअरच्या दृष्टीनं अगदीच अंधूक आणि घाबरवून सोडणारा होता. पण त्याचा उलट परिणाम असा झाला, की अनेक पर्याय चाचपडल्यानंतर मी आपल्याला काय करायचं नाहीये, ते पक्कं करून टाकलं.

या सर्व घडामोडींची सर्वात जवळची साक्षीदार म्हणजे माझी मम्मा. माझा कलाक्षेत्राकडे १२०, १३० वरून थेट १८० अंशात वळलेला कल पटवून देऊन बाबाचं मन वळवण्यात ती सफल झाली. आणि मी १२ वी नंतर पूर्णवेळ नाट्यशास्त्राला ललितकला केंद्रात प्रवेश घ्यायचा निर्णय झाला. माझ्या आनंदाला आता पारावार उरला नव्हता.

निर्णय तर झाला. पण प्रवेश प्रक्रीया सोपी नव्हती. लेखी परीक्षा आणि मग शॉर्टलिस्टेड मुलांची प्रत्यक्ष मुलाखत अन परफॉरमन्स टेस्ट व्हायची होती. त्यात लिमिटेड सीटस - फक्त दहा. आता पूर्वीसारखा थरकाप उडत नसला तरी टेन्शन खूप आलं होतं.

दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय आमच्या पिताश्रींनी ओबीसी कोट्यातून प्रवेश न घेता ओपन कॅटेगरीतूनच प्रवेश मिळवायचा असं आपलं धोरण जाहीर केलं होतं. बरं त्यामागं भक्कम विचारसरणी असल्यानं मला काही बोलताही येईना. झपाटून तयारी केली आणि प्रवेश परिक्षेत ओपनमध्ये पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले.

ललितला आल्यानंतर अभिनयाकडं, नाटकाकडं बघण्याची एक वेगळीच दृष्टी मला मिळाली. ललित हा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा टप्पा म्हणावा लागेल.

सतिश आळेकरसर, प्रविण भोळेसर, समर नखातेसर, राजीव नाईकसर यांच्या मार्गदर्शनाखाली मी केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही समृद्ध झाल्याचं मला जाणवतं.

शालेय जिवनातही मी नाटकात कामं केली. पण इथं आल्यावर मी " जाणीवपूर्वक ’ नाटक करायला शिकले.

याकाळात मी माझ्या स्वत:च्या चार संहिताही लिहिल्या. फर्ग्युसनच्या सुरुवातीच्या दिवसांत मला नेहमी खंत वाटत असे, की माझ्या पालकांनी मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं नाही.

पण आता मात्र मला याच गोष्टीचा प्रचंड फायदा होत आहे. माझ्याच वर्गातील इंग्रजी माध्यमातून शिकलेल्यांना जी नाटकाची भाषा दुर्बोध व त्यामुळं कंटाळवाणी वाटते ती मी अगदी सहज समजून घेऊ शकते. माझं मराठी साहित्य मला जवळचं वाटतं. संहिता समजून घेणं, संदर्भ जुळवणी, शैलीचा अभ्यास यासाठी लागणारी समज मराठी माध्यमामुळं प्रगल्भ होत गेली.

अभिनयाच्या वेगवेगळ्या शैलींचा अभ्यास करत असताना मी शेक्सपिअरच्या हॅम्लेट आणि अ मिडसमर नाईटस ड्रीम, मॅक्झीम गॉर्कीचं द लोअर डेप्थ, विजय तेंडुलकरांचं मित्राची गोष्ट, बर्टोल्ट ब्रेक्थचं दी कॉकेशिअन चॉक सर्कल इ. नाटकांत कामं केली. दी कॉकेशिअन चॉक सर्कलचे मुंबईला पृथ्वी थिएटर, दिल्लीला आंतरराष्ट्रीय भारतरंग महोत्सवामध्ये प्रयोग केले. सकाळ व हिंदूमध्ये त्याची छान परिक्षणं आली. संदेश कुलकर्णीसर, अनिरूद्ध खुटवडसर यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करताना नाटकाच्या अनेक अंगांचा सखोल अभ्यासही करता आला.

"संहिता ते प्रयोग" या अभ्यासक्रमा अंतर्गत लेखक आणि दिग्दर्शक याही पातळ्यांवर विचार करण्याची संधी मला मिळाली.

मीही चार संहिता लिहिल्या. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. या सर्व अनुभवांतून मला पुढच्या आयुष्याची दृष्टी मिळत गेली. शिदोरी भक्कम झाली.

आमच्या घरात स्वतंत्र ग्रंथालय काढता येईल एवढी पुस्तकं आहेत. याचा मला खूपच फायदा झाला. केवळ नाटकांचीच नाही तर वैचारिक, कथा, कादंबर्‍या, कविता, संदर्भग्रंथ पटकन हाताशी असतात. यासाठी मी स्वत:ला प्रचंड लकी मानते. ही रसद आयुष्यभर पुरेल.

आता मी ललितकला केंद्रातून पदवीधर होऊन लवकरच बाहेर पडते आहे. अजून खूप काही शिकायचं आहे.
....................................
Sangita Hari Narke -March 1, 2014 ·
"माहेर," मार्च २०१४, पृ.५२ ते ५४


No comments:

Post a Comment