Thursday, March 29, 2018

गंगाधर पानतावणे-

गंगाधर पानतावणेसर- -प्रा.हरी नरके

गंगाधर पानतावणेसरांनी गेली 50 वर्षे अस्मितादर्श त्रैमासिक एकहाती पेलले होते. अनेकांना त्यांनी लिहते केले. अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अनेकांना बोलते केले. अनेकांच्या पुस्तकांवर त्यांनी परीक्षणे प्रकाशित केली. दोनतीन पिढ्या त्यांनी घडवल्या.

अस्मितादर्शचा अंक नियमितपणे यायचा. जाहीराती नसताना अंक काढणे खरंच अवघड. आजवर सामाजिक चळवळीतील अनेकांनी वर्गण्या नेल्या, एकदोन अंक आले की पुढे अंक बंद. अस्मितादर्श हा एकमेव अपवाद.
माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झाल्यावर धुळ्याच्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाला सरांनी मला बोलावलं होतं.

औरंगाबादच्या त्यांच्या घरी "श्रावस्ती"वर अनेकदा भेटीगाठी झालेल्या. ते आजारी असताना तीनचारदा त्यांना भेटायला गेलो होतो. बर्‍याच गप्पा होत असत.

सर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समितीवर होते. त्यांना मी बाबासाहेबांच्या खंड 18 च्या तिन्ही भागांची संदर्भ सूची तयार करण्याबाबत विनंती केली. त्यांनी भाग 1 व 2 ची सूची बनऊन दिली.

एका ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाला नागपूरला मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांचा फार मोठा ताफा उपस्थित होता. आंध्रच्या मुख्यमंत्र्यांवर त्याच आठवड्यात नक्षली हल्ला झालेला होता. स्टेजवर प्रवेशासाठी फोटो लावलेले पोलीस आयुक्तांच्या सहीचे ओळखपत्र घेणे सक्तीचे करण्यात आलेले होते.

सिक्युरिटीवाल्यांनी सरांकडे प्रवेशपत्र नसल्याने व स्टेजवर खुप गर्दी असल्याने सरांची बसण्याची व्यवस्था स्टेजवर केली नाही. त्यांना पहिल्या रांगेत बसावे लागले. त्याबद्दल सर माझ्यावरच रागावले. तो राग ते कधीही विसरले नाहीत. स्वत:च्या मानसन्मानाबाबत ते अतिशय सजग असत.

त्यांचे रागलोभ फार तीव्र होते. एखाद्यावर नाराज झाले की त्याला कायमचे ब्लॅकलिस्ट करून टाकायचे.

माझी आजवर 40 पुस्तके प्रकाशित झालीत. त्यातल्या एकावरही अस्मितादर्शमध्ये एक ओळही सकारात्मक छापून आली नाही. खंड 21 वर कडक टिका करणारे लेख त्यांनी छापले. मात्र वारंवार विनंती करूनही आमचा खुलासा त्यांनी छापला नाही. बाबासाहेबांच्या साक्षेपी पत्रकारितेवर त्यांचे संशोधन होते. बाबासाहेब दोन्ही बाजूंना स्थान देत असत. पानतावणेसरांनी मात्र अस्मितादर्शमध्ये कधीही दुसरी बाजू छापली नाही.
आपला-परका याबाबतची त्यांची निवड काटेकोर असायची.

एक मनस्वी वक्ता, लेखक, संपादक, प्राध्यापक म्हणून त्यांचे मौलिक योगदान कायम स्मरणात राहील. खुप आठवणी आहेत.

-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment