Sunday, March 4, 2018

या मखलाशी, लबाडी आणि धुर्तपणामागे दडलंय काय?


मराठी अभिजात नाही, तिच्या आधुनिकतेचा आदर करा या मखलाशी, लबाडी आणि धुर्तपणामागे दडलंय काय?

असे लेख लिहिणारे हे तथाकथित भाषा वैज्ञानिक हे संस्कृतचे पीएच.डी. वाले आहेत. इंग्रजीची गुलामी करीत तिचे गोडवे गाणारे हे महाभाग मराठीच्या अभिजात दर्जाला विरोध करून मराठीच्या समृद्धीला, श्रीमंतीला हसत आहेत. यांचा खरा विरोध अभिजात दर्जाला नाही, मराठी भाषेलाच आहे. त्यांना मराठीचा द्वेष वाटतो. मराठीचं बरं झालंलं यांना कसं खपेल? ते मराठीला हलकी समजतात. मराठीला अभिजात दर्जा मिळाला तर ती संस्कृतच्या पंक्तीला बसेल हे यांना नकोय. आम्ही संस्कृत भाषेचा आदर करतो, पण या कर्मठ, सनातनी आणि आकसपुर्ण वृत्तीची आम्हाला चीड आहे.

हे सध्या केरळमध्ये कासारगौड विद्यापीठात चाकरी करतात आणि विद्यापीठांनी भाषांचे भले होत नाही अशी अक्कल आपल्याला शिकवतात. मग द्याना विद्यापीठाचा राजीनामा.
हे मिठाला जागणारे लोक नाहीत. यांनी केरळच्या मल्याळम भाषेला मिळालेला अभिजात दर्जा चुकीचा आहे असे म्हटलेय. हे कृतघ्न लोक आहेत.

हे कसले डोंबलाचे आधुनिक नी भाषा वैज्ञानिक यांना उडीया भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याची 4 वर्षे जुनी घटना माहितही नाही.
ह्यांना अक्षीचा मराठी देवनागरी शिलालेख श्रवणबेळगोळच्या आधीचा आहे याची खबरही नाही.
ह्यांचा हा दांभिक युक्तीवाद कसाय माहितीय?

हे म्हणजे, इंग्रजांनी भारतीयांना म्हणायचे तुम्ही स्वातंत्र्यासाठी लढू नका. तुमच्या गुलाम राहण्यानेच तुम्हाला आदर मिळेल.
हे म्हणजे, डॅाक्टरांनी पेशंटला म्हणायचे, तू बरे व्हायचा प्रयत्न करू नकोस, तू आजारी राहिलास तरच तुला आदर मिळेल.
हे म्हणजे, अंबानींनी तुम्हा आम्हाला सांगायचे पैसे कमावण्याचा प्रयत्न करू नकोस, तू गरीब राहिलास तरच तुला आदर मिळेल.

हे म्हणजे स्वत: आय.आय.टी. मधून जनतेच्या पैशावर पीएच.डी. करायची नी निरक्षरांना सांगायचे शिकू नका, तुम्ही अडाणी राहिलात तरच तुम्हाला आदर मिळेल.
स्वत: बंगल्यात राहणारे हे विद्वान झोपडीवाल्याला सांगताहेत, चांगल्या घराचं स्वप्न बघू नकोस, तू कायम झोपडीत राहिलास तरच तुला आदर मिळेल,

हे म्हणजे, आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळवायचा नी मग इतरांना सांगायचे अभिजातने नुकसान होते, मग सोडा ना संस्कृतचा अभिजात दर्जा.
हे म्हणजे संत ज्ञानेश्वरांना, एकनाथांना नी तुकारामांना सांगणार मराठीत ग्रंथरचना करू नका तरच तुमची भाषा श्रेष्ठ होणार,

तुम्ही मराठीला ज्ञानभाषा बनवूच नका, मराठी माध्यमातून शिकू किंवा शिकवू नका, तुम्ही आमची कायम भाषिक गुलामी करा म्हणजे मग तुम्हाला आदर मिळेल.
शिक्षक विद्यार्थ्याला असे सांगतात काय? बाबा, अजिबात अभ्यास करू नकोस, तू नापास झालास तरच सन्माननीय ठरशील, पास झालास तर मात्र तुझा अनादर केला जाईल?

हे म्हणजे, ज्येष्ठांना आदर मिळत नसतो, फक्त लहानांनाच आदर मिळतो अशी फुसकी सोडण्यासारखे आहे. भारतीय संस्कृती वडीलधार्‍यांचा आदर करायला शिकवते की अपमान करायला शिकवते? बघा काय भाषिक कोलांटउड्या मारताहेत हे डोंबारी, भाषा वैज्ञानिकपणाचे कातडे पांघरूण.
यांना मुळातच मराठीबद्दल जन्मजात आकस आहे. हे वर्चस्ववादी लोक आहेत, मराठीने यांची कायम बटकी राहावे यासाठीच यांचे हे उद्योग चालूयत.

हे षडयंत्र वेळीच ओळखा. मराठीचा अभिजात दर्जा अंतिम टप्प्यात असताना एव्हढी वर्षे गप्प राहिलेले हे लोक हेच टायमिंग का निवडत आहेत? कारण मराठीला मिळणारा लक्षावधींचा पाठींबा बघून यांच्या पोटात दुखू लागलेय. मराठी माणसाचा बुद्धीभेद करणे, त्यांचे मनोबल खच्ची करणे यासाठीचे हे कटकारस्थान आहे. यांचा हेतू शुद्ध असता तर आजवर हे गप्प का होते? एव्हढ्या भाषांना अभिजात दर्जा मिळाला तेव्हा का विरोध केला नाहीत? मल्याळमला सुद्धा अभिजात दर्जा मिळाल्यावर हे विरोध करताहेत, तो मिळताना का गप्प होतात? मल्याळमला विरोध करणारा लेख तिथल्या वर्तमानपत्रात लिहा, नाही केरळमधून तुमची गठडी वळली तर बघा. दक्षिणी भाषांवाले असली थेरं खपवून घेत नाहीत. तुमचे हे लाड फक्त मराठीवालेच खपवून घेतात म्हणून मराठीचा अपमान करण्याची तुम्हाला हिम्मत होते.

नाहीतरी केरळात किंवा महाराष्ट्रात राहायचा यांना काय नैतिक अधिकार आहे असा प्रश्न सामान्य माणूस विचारतोय.

आहो,  तथाकथित भाषा वैज्ञानिकांनो, आम्हाला चांगले माहितीय, तुका म्हणे ऎशा नरा मोजूनी माराव्या पैजारा.......

- प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment