Saturday, May 5, 2018

मराठीला कशाला पाहिजे अभिजात दर्जा?


जगातली चौथ्या क्रमाकाची सर्वश्रेष्ठ भाषा असलेल्या मराठीला कशाला पाहिजे अभिजात दर्जा?
- प्रा.हरी नरके

कशाला पाहिजे अभिजात दर्जा? असा प्रश्न बडे साहित्यिक विचारतात तेव्हा मला खुप दु:ख वाटतं.
माध्यमं ज्यांचं नित्यनेमानं छापत असतात अशा प्रसिद्धमुल्य असलेल्या थोरामोठ्यांनी असली अडाणी वक्तव्यं करावीत ही मला चिंतेची बाब वाटते.
गेल्या दहा वर्षात ह्या विषयावर उदंड चर्चा झालेली आहे. त्यातलं काहीही ज्यांनी वाचलेलं, ऎकलेलं नसतं, मात्र प्रसिद्धीचं वलय असल्यानं वारेमाप मुक्ताफळं उधळायची हौस असलेले हे लोक आपल्या या अवसानघातकी वक्तव्यांनी मराठीचं नुकसान करीत असतात.

तुम्ही कितीही हुशार असलात म्हणून कशाला पाहिजे ड्रायव्हींग लायसन्स? कशाला पाहिजे मॅरेज सर्टीफिकेट? कशाला पाहिजे शाळा सोडल्याचा दाखला किंवा पदवी प्रमाणपत्र असं विचारून चालतं का? ह्या "थोर" लोकांनी शिवरायांना विचारलं असतं कशाला पाहिजे स्वराज्य? त्यांनी लो. टिळक, म.गांधी,पं. नेहरूनांही विचारलं असतं कशाला पाहिजे स्वातंत्र्य? स्वराज्यानं किंवा स्वातंत्र्यानं असं काय भलं होणारेय?

निरक्षर किंवा अल्पशिक्षितांचा अडाणीपणा परवडला पण अशा ह्या उच्च शिक्षितांचा अडाण**पणा फार महागात पडतो.
स्वत:च्या अज्ञानाची जाहीरात करण्याची ही चढाओढ बघितली की हसावं की रडावं तेच कळत नाही.

होय, आम्हाला मराठी भाषेला अभिजात दर्जा हवाय ते मराठीचं गोमटं व्हावं म्हणून.
मराठी ही स्वतंत्र, स्वयंभू आणि जागतिक भाषा आहे ह्यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी.
गुलामीच्या प्रथेत मालकाचा फायदा असेलही पण गुलामाचा कोणता फायदा असतो?

आमची मायबोली दुसर्‍या अमूकतमूक भाषेची गुलाम आहे, तिची प्रतिकृती [ झेरॉक्स ] आहे, आश्रित किंवा सालगडी आहे अशा वल्गना करणारे लोक मराठीचे सुपुत्र आहेत की मराठीचे मारेकरी?

मराठीला अडीच हजार वर्षांचा वैभवशाली इतिहास असताना मराठीचं वय चोरणारे, ती अवघी 800 वर्षांची भाषा आहे असं पसरवणारे हे महाभाग नेमके कोणाचे हस्तक आहेत?
संस्कृत वाणी देवे केली मग मराठी काय चोरापासून झाली? असा रोकडा सवाल विचारणारे संत एकनाथ आज असते तर त्यांनी आपला सोटा कोणाच्या टाळक्यात हाणला असता?
"माझा मराठाची बोलू कौतुके, अमृतातेही पैंजा जिंके" असं संत ज्ञानेश्वर कोणाला बजावत होते?

जागतिक किर्तीचे भाषातज्ञ प्रा. गणेश देवी ज्या मराठीला जगातली चौथ्या क्रमाकाची सर्वश्रेष्ठ भाषा ठरवतात, ज्ञानपीठ विजेते भाषाशास्त्रज्ञ भालचंद्र नेमाडे ज्या मराठीच्या
अभिजाततेचे पोवाडे गातात, गुलजारही जिथे मराठीची ही मागणी उचलून धरतात तिथे हे विरोध करणारे तथाकथित महाभाग कोण?

तुमचा अस्मात-कस्मात मी नेणेगा,.... माझ्याशी बोलायचं असेल तर मराठीतच बोला असं महापंडीत भटोबास कोणाला ठणकावत होते?

हाल, पादलिप्त, प्रवरसेन, हरिभद्र, उद्योतन सुरी, आणि आपल्या इतर अनेक पुर्वजांनी इ.स.पुर्व 500 ते इ.स. 1200 अशी सतराशे वर्षे मराठी जपली, वाढवली, समृद्ध केली ती पराभूत मानसिकतेसाठी?

पुढे संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकारामांनी, गोडसे भटजी, लोकहितवादी, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साने गुरूजींनी जिच्या वैभवात जागतिक भर घातली ती मराठी हलकी किंवा हिनकस आहे म्हणून?

केंद्र सरकारनं ज्या चार निकषांच्या आधारे सहा भारतीय भाषांना हा दर्जा दिलाय ते चारही निकष मराठीने जर पुर्ण केलेले आहेत, तरी हा दर्जा केंद्र सरकार का देत नाही असा जाब सरकारला विचाराना?
त्याऎवजी कशाला हवा हा दर्जा? 
मराठीला दिला तर इतरांनाही तो द्यावा लागेल,
अभिजातमुळे मराठीचं काय भलं होणार आहे?

असले तेजोभंग करणारे प्रश्न विचारणारे हे लोक कोणाचे हस्तक आहेत?

-प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment