Thursday, June 14, 2018

लढाई सांस्कृतिक वर्चस्वाची की मतबँकेची?





ज्यांच्या क्रांतिकारी विचारांनी आणि चळवळींनी आधुनिक भारत घडला त्यात महात्मा फुले अग्रणी असूनही त्यांची पगडी हे विद्वत्तेचं प्रतिक का नाही मानायची?

आपल्या देशात प्रतिकात्मकेतेला असाधारण महत्व आहे. इथल्या निवडणुका पक्षांच्या चिन्हांवर लढवल्या जातात. 1952 साली तर म्हणे फक्त पक्षाचे निवडणूक चिन्ह असायचे, उमेदवार कोण, त्याचे/तिचे नाव काय याला काहीच महत्व नव्हतं.

ही प्रतिकं सांस्कृतिक वर्चस्व आणि मतबॅंकाच्या अनुनयाची साधनं बनलेली आहेत.

पेशवाई पगडी हे विद्वत्तेचं प्रतिक आहे असं सांगितलं जातं. शिवाजीराजांच्या नातवानं जी पेशवाईची वस्त्रं दिली त्यात ती पगडी होती म्हणे. आजकाल तिचा उल्लेख पुणेरी पगडी असा केला जातो. पाहुण्यांचा सत्कार करताना ती देण्याची पद्धत आहे. पहिले काही पेशवे पराक्रमी होते. पण दुसरा बाजीराव हासुद्धा विद्वत्तेचं प्रतिक?

लोकमान्य टिळक, गो.कृ. गोखले, न्या. रानडे, आगरकर हे पगडी घालायचे. प्रत्यक्षात या प्रत्येकाच्या पगड्या वेगवेगळ्या होत्या असं लोकमान्यांचे नातू जयंतराव टिळक यांनी लिहिलय. हे सगळे मान्यवर आदरणीय आहेत. वंदनीय आहेत. त्यांच्याबद्दल सर्वदूर आदर आहे. आपुलकी आहे.

पण आज जी वापरली जाते ही एकच पगडी सगळ्या पुणेकरांनी स्विकारावी ही सक्ती का?

हे नेमके ठरवले कोणी? कधी ठरवले? कोणाला विचारून किंवा विश्वासात घेऊन ठरवले? की जे आमचे ते सर्वांनी आपोआपच नी निमुटपणे स्विकारायचे असते?

महात्मा जोतीराव फुले पुण्याचेच होते. तरी त्यांची पगडी मात्र पुणेरी नाही, असं का?

एका सांस्कृतिक छावणीने सारे काही ठरवायचे, बळजबरीने सर्वांवर लादायचे आणि तेच अंतिम असल्याचे सांगायचे दिवस गेले आता मालक.

ज्यांच्या क्रांतिकारी विचारांनी आणि चळवळींनी आधुनिक भारत घडला त्यात महात्मा फुले अग्रणी असूनही त्यांची पगडी हे विद्वत्तेचं प्रतिक का नाही मानायची?

एका विशिष्ट जातीच्या संघटनेचे पदाधिकारी वाहिन्यांवर सांगत होते, पुणेरी पगडीच्या ऎवजी फुले पगडी घातल्याने तमाम पुणेकरांचा अपमान झाला. माफी मागितली पाहिजे.

हे तमाम पुणेकर नेहमी एका विशिष्ट वर्गाचे, जातीसमाजाचेच का असतात? त्यात समावेशकता का नसते? इतरांची प्रतिकं बहिष्कृत करणं हीही विद्वत्ताच असणार!

अशा पद्धतीने फुलेपगडी जाहीरपणे नाकारून आपण स्त्री, शूद्रातिशूद्र नवजागृत घटकांचा अपमान करतोय याची जाणीवही ह्या "पुण्याच्या मालकांना" कशी असत नाही?

मुळात हा फुले प्रेमाचा अगर पुणेरी पगडीच्या अपमानाचा विषयच नाहीये.

तुम्ही आम्हाला मतं देत होतात, आम्ही मनपा, राज्य, केंद्रात सत्तेत होतो तोवर गेल्या 50 वर्षात शंभरदा तुमची पगडी मिरवली ना आम्ही डोक्यावर?

दादोजी, भांडारकर, रायगडवरचा वाघ्या कुत्रा, राम गणेश गडकरी, गोब्राह्मण प्रतिपालक की बहुजन प्रतिपालक?, पगड्यांचं राजकारण हे सारे निवडणुका जिंकण्याचे फंडे आहेत याला आमचा नाविलाज हाये.

हे अगदी नकळत, सहज घडतं. त्यावेळी आमच्या मनात जात पात अजिबात नसते. उलट जातपात नष्ट्च झाली पायजेलाय असं आम्ही रात्रंदिन सांगत असतो.

आजवर डोक्यावर पेशवाई पगडी आणि तोंडात "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असा गजर करीत, आम्हाला सामाजिक अभियांत्रिकी साधावी लागली.
आजवर डोक्यावर पेशवाई पगडी आणि तोंडात "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असा गजर करीत, आम्हाला सामाजिक अभियांत्रिकी साधावी लागली.
हर बातका एक टायमिंग होता हैं भिडू. हर एक अ‍ॅक्शन पोलीटिकली करेक्ट होना मांगताय की नय?
मुळात करार तुम्हीच मोडलात. तुम्हाला सांस्कृतिक सत्ता आणि आम्हाला राजकीय सत्ता असं आपलं वाटप ठरलेलं होतं! तुम्ही आम्हाला आताशा मतं देणार नसाल तर तुमची पगडी आम्ही का मिरवावी? मग आम्ही टोपी, पगडी फिरवणारच ना?

आम्ही तुमची पगडी बाद केली तर आमचं काय चुकलं?

पेशव्यांना ही वस्त्रं ज्यांनी दिली त्यांच्याच विद्यमान वंशजांनी म्हणजे दस्तुरखुद्द आम्हीच ती काढून घेतली तर सगळं कसं रितीप्रमाणेच झालं नाही का?

"ते" पगडीमुळे खुश होणार असतील तर एकुण सौदा स्वस्तात पटतोय, असं नाही का तुम्हाला वाटत?

त्यांच्या मतबॅंकेची आपल्याला सक्त गरजाय.

जे आमचे मांडलिक राहतील त्यांचीच पगडी तुमच्या आमच्या डोक्यावर असेल, हा निकाल आम्हाला घेतला पायजेलाय!

शेवटी हे राजकारणाय.
आणि तुम्हाला तर माहिताय आपण 24* 365 राजकारणी आहोत.
....................................

No comments:

Post a Comment