Tuesday, July 24, 2018

नामांतर शहीद विलास ढाणे - स्मृती आणि वेदना









" नमस्कार. मी शिवाजीनगर पोलीस स्टॆशनमधून बोलतोय. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर एका तरूणाने रेल्वेखाली आत्महत्त्या केलीय. त्याच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीवर नामांतर आंदोलनाला माझ्या समाजाचा असलेला विरोध कमी व्हावा यासाठी मी आत्महत्त्या करीत असल्याचे म्हटलेले आहे. त्यात तुमचे नाव मिळाले. आत्महत्त्या करणार्‍या तरूणाचे नाव विलास ढाणे आहे." महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या सोमवारच्या साप्ताहिक बैठकीत आम्ही असताना डॉ. बाबा आढावांना हा फोन आलेला होता. आम्ही सारेच सुन्न झालो. श्रद्धांजली वाहून सभेचे काम आवरते घेण्यात आले.

विलास ढाणे हा सातारा जिल्ह्यातला तरूण. सप्टेंबर 1982 मध्ये मुंबईत नामांतर सत्याग्रह झाला होता. डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पहिल्याच दिवशी 16 हजार नामांतरवाद्यांना अटक करण्यात आलेली होती. त्यात डॉ. बाबा आढाव, डॉ. अनिल अवचट, कॉं. शरद पाटील, बाबूराव बागूल, रावसाहेब कसबे, प्रा. अरूण कांबळे, डॉ. कुमार सप्तर्षी, अंकुश भालेकर, बापूराव जगताप, लक्ष्मण माने आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर आदींचा समावेश होता. आझाद मैदानावर झालेल्या सभेला शुभेच्छा द्यायला तब्बेत बरी नसूनही अण्णा, एसेम जोशी आलेले. ज्या तरूणाने त्यांना उदगीरल जोड्यांचा हार घातलेला होता, तोही उपस्थित होता. त्याने जाहीरपणे क्षमायाचना केली होती. आपल्याला गुमराह केले गेले. आपला वापर केला गेला असे तो म्हणाला. आम्हाला सर्वांना ठाण्याच्या तुरूंगात ठेवलेलं होतं. तिथं या विलास ढाणेचा परिचय झालेला होता. मनस्वी, अत्यंत संवेदनशील तरूण.

नामांतराला विरोध करण्यासाठी भयानक हिंसाचार करण्यात आला होता. गोरगरीबांची घरं जाळण्यात आली होती. निष्पापांना ठार करण्यात आलेलं होतं. माझा समाज हिंसाचारात पुढे आहे याचा गिल्ट विलासला होता.

विलासनं शिवाजीनगर रेल्वे स्टेशनात लोकलखाली आत्महत्त्या केली.

२७ जुलै १९७८ रोजी महाराष्ट्राच्या विधीमंडळात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. १४ जानेवारी १९९४ रोजी ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नाव देण्यात आले.

हे करण्यासाठी 26 वर्षे संघर्ष करावा लागला तेव्हा कुठे हे नामांतर झाले. अनेकांनी अनेक प्रकारे लढा दिला.

पुढे या आंदोलनावर काही पुस्तकं लिहिली गेली. स्मारकं उभी राहिली. पण यातल्या बहुतेकात  डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचासुद्धा उल्लेख नाही मग विलास ढाणेचा कु्ठून असेल?विकीपिडीयावर नामांतर शहीद म्हणून खालील शहीदांचा उल्लेख आहे. त्यात विलासचे नाव नाही.

नामांतर आंदोलनातील शहीद-
The martyrs of Namantar Andolan:
Pochiram Kamble पोचिराम कांबळे, Janardan Mawade जनार्दन मवाडे Gautam Waghmare (गौतम वाघमारे),
Suhasini Bansod (सुहासिनी बनसोड),Govind Bhurewar (गोविंद भुरेवार), Bhalchandra Borkar (भालचंद्र बोरकर),Roshan Borkar (रोशन बोरकर),
Avinash Dongre (अविनाश डोंगरे),Narayan Gaikwad (नारायण गायकवाड),Shabbir Ali Kajal Hussain (शब्बीर अली काजल हुसैन),Chandar Kamble (चंदर कांबळे),
Domaji Kuttarmare (डोमाजी कुत्तरमारे),Janardan Mhaske (जनार्दन मस्के),Ratan Mendhe (रतन मेंढे),Kailas Pandit (कैलास पंडित),Ratan Pardeshi (रतन परदेशी),
Dilip Ramteke (दिलीप रामटेके),Dyneshwar Sakhare (ज्ञानेश्‍वर साखरे),Abdul Sattar (अब्दुल सत्तार),Pratibha Tayade (प्रतिभा तायडे),Diwakar Thorat (दिवाकर थोरात),
Manoj Waghmare (मनोज वाघमारे),Shila Waghmare (शीला वाघमारे)
https://en.wikipedia.org/wiki/Namantar_Shahid_Smarak

नाही चिरा नाही पणती!

शेवटी संत तुकाराम म्हणतात तेच खरे!
-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment