Monday, October 8, 2018

कविंची थोरवी-



१. रवी एकदा आजारी पडला. त्याचे मोठे ऑपरेशन करावे लागले. ते फसले. रवीची प्रकृती वेगाने ढासळू लागली. डॉक्टरांनी रवीच्या पत्नीला बोलावून घेतले. म्हणाले, मनाची तयारी करा. नातेवाईकांना बोलाऊन घ्या. तुमच्या हातात फक्त चार तास आहेत.
बाई म्हणाल्या, आमचा मुलगा अमेरिकेत असतो. तो वडलांना भेटायला निघालाय पण त्याला इथे पोचायला किमान आठदहा तास तरी लागतील. तुम्ही काहीही करा, पण यांना किमान आठदहा तास तरी जगवा. मुलाची शेवटची भेट घेऊ द्या.
डॉक्टर म्हणाले, ते शक्य नाही.
तिथे रवीचा एक मित्र उभा होता. तो मोठा कवी होता. तो म्हणाला, वहिनी, तुम्ही काहीच काळजी करू नका. मी करतो काहीतरी आयडीया.
तो रवीकडे गेला. डॉक्टरांनी सांगितलेले वास्तव त्याने त्याला सांगून टाकले. वर म्हणाला, मित्रा, तू आता जाणार. मग तुझ्या कविता आम्हाला कोण ऎकवणार?  असं करू या. तू कविता म्हणत म्हणत जा. ही घे तुझी कवितेची वही.
रविला कविता म्हणत म्हणत जगाचा निरोप घेण्याची कल्पना फारच आवडली.
तो कविता म्हणू लागला. कवीमित्र कविता ऎकत, दाद देऊ लागला.
मुलगा धावत धावत दवाखाण्यात पोचला.
आई म्हणाली, बेटा, घाई कर. बाबांशी शेवटचे दोन शब्द बोलून घे. तुझ्या वडीलांकडे वेळ फार कमी आहे.

मुलगा १२० च्या स्पीडने वडीलांच्या रूममध्ये घुसला. बघतो तर काय वडील कविता म्हणत होते. ऎकणारा त्यांचा कविमित्र मात्र मरून पडला होता.
[हरी शंकर परसाई यांची कथा]

२. एका कविसंमेलनाला केंद्रीय मंत्री श्री अंबादास राठवले या स्वत:ला कवी समजणार्‍या नेत्यांना बोलावलेले होते. ते नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे उशीरा पोचले. बघतात तो काय, थिएटर हाऊसफुल्ल. स्टेजवर कवी मात्र एकच.
त्यांनी संयोजकांना विचारले, असे कसे झाले?
एकच कवी? नाही, मी आहे म्हणा. पण, ...
संयोजक म्हणाले, असं नाहीये. आम्ही बैठक व्यवस्थेत थोडा बदल केलाय.
श्रोत्याला स्टेजवर बसवलय.
थिएटरमध्ये बसलेले सगळे कवी आहेत. ते म्हणतात, मंत्रीमहोदय जर कवी असतील तर आम्ही महाकवी आहोत.

३. रस्त्यावर एकजण ओरडत होता. पकडा, पकडा.
पुढे पळणार्‍या एकाला गर्दीने शिताफीनं पकडलं.
तोवर धापा टाकत टाकत मागचा तिथं पोचला.
लोकांनी त्याला विचारलं, काय चोरलं या भामट्याने?
तो म्हण्ला लेकाच्याने स्वत:ची कविता मला ऎकवली आणि माझी न ऎकताच पळत होता.

४. नोएंट्रीतून जाणार्‍या एकाला ट्रॅफिक हवालदारानं पकडलं.
दंडाची पावती फाडली.
तो म्हणाला, मी दंड भरणार नाही. मला या जगाचे नियम लागू होत नाहीत. मी कवी आहे.
आणि शिवाय नोएंट्रीचा बोर्ड मला दिसला नाही.
हवालदार म्हणाला, बोर्डची गरजच काय? जे न देखे रवी ते देखे कवी. कविवर्य,  काढा पाचशे रूपये!

[ ऎकलेले- वाचलेले- सुचलेले- फॉरवर्ड आलेले ]
-प्रा. हरी नरके, ७ आक्टोबर २०१८

No comments:

Post a Comment