Friday, February 8, 2019

बालाजीराव सुतार









बालाजीराव सुतार म्हण्जे फेसबुकवरचे सगळ्यात दणकट आणि पॉप्युलर लेखक.

त्यांचा "दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी" हा पहिलाच कथासंग्रह एकदम कडक म्हंजे जंक्शानच.
एकुण अवघा १६० पानांचा ऎवज. आठ भन्नाट कथा. स्वत:ची कलदार मुद्रा मराठी कथाविश्वावर पदार्पणातच उमटवणारा हा महत्वाचा गडी.

चित्रशैलीतली कथनपद्धती वापरीत बालाजीराव आजच्या गावशिवाराचा, तिथल्या माणसांच्या हाडामांसाच्या अस्सल जगण्याचा, त्यातल्या ताणांचा हादरून टाकणारा अनुभव ह्या कथांमधून थेटपणानं
पोचवतात.

गावगाड्याची घुसळण, पडझड, गावगुंडी आणि घुसमट यांचा अस्सल पट ते उलगडत जातात.

ह्या ८ कथा म्हणजे निव्वळ लेखकीय कारागिरी नसून गावशिवाराचा,शेणामुताचा गजब वास असलेली ती ८ मजबूत लेणी आहेत. अस्वस्थ होणं, सुन्न करणं, डोळे पाणावणं म्हणजे काय असतं ते अनुभवण्यासाठी हा कथासंग्रह वाचायलाच हवा.

बालाजीरावांची कळकळ, मुल्यनिष्ठा आणि समकालीन समज यांचा आवाका निव्वळ थक्क करणारा आहे. रंगनाथ पठारे, भास्कर चंदनशिव, जयंत पवार, आसाराम लोमटे, राजन गवस, किरण येले यांच्या पंक्तीतला हा नव्या दमाचा श्रेष्ठ कथाकार. 

[दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी, प्रथमावृत्ती- जाने. २०१९,पृष्ठे १६०, मूल्य- रू.२००/-]

प्रा.हरी नरके, ८ फेब्रुवारी २०१९

No comments:

Post a Comment