Sunday, April 7, 2019

लोकांच्या जीवनमरणाचे सारेच विषय गायब का ?



निवडणुका हा लोकशाहीतला प्रबोधनाचा काळ असतो. निदान असायला हवा. लोकशिक्षण, लोकजागृती, मतपरिवर्तन, सामुहिक शहाणपण आणि जनमत घडवणं यावर भर असायला हवा. २०१४ च्या निवडणुकीत गुजरात मॉडेल, विकास, सुशासन, महागाई, काळा पैसा हा अजेंडा होता. मग २०१९ च्या निवडणुकीत ५ वर्षातले भारत मॉडेल हा विषय का नाही? आधीचे सारेच विषय गायब का केले गेलेत? पंतप्रधानांचे आपल्या पाच वर्षातल्या कामगिरीवर मौन का? नोटाबंदी, जीएसटी, गायगुंडांकडून, झुंडींकडून घडवलेले हत्या/हिंसाचार, ॲट्रोसिटी, बेरोजगारी, महागाई यावर बोलण्याऎवजी पं.प्र. ६० वर्षातल्या इतिहासाची उजळणी करण्यात वेळ का वाया घालवताहेत? अचानक असा सिलॅबस बदलण्यात का आलाय? इतिहास सोडा, वर्तमानाबद्दल बोला. भविष्याचे तुमचे स्वप्न सांगा. राष्ट्रीय सुरक्षा,सर्जिकल स्ट्राईक, हिंदुत्ववादी आंतकवाद, गोरक्षा, हिंदुत्ववादी राष्ट्रवाद, पाकिस्तान एव्हढेच विषय जीवनमरणाचे असतील तर मग भारत मॉडेल, विकास, सुशासन, महागाई, काळा पैसा,गरिबी,शेती,बिजली,सडक,पाणी, आरोग्य,शिक्षण, निवारा,रोजगार यांचे काय झाले? त्यांचा कार्यपुर्ती अहवाल कोण देणार? तुमचे ५ वर्षांचे रिपोर्टकार्ड कुठेय? पं.प्र.महोदय, तुमचे प्रगतीपुस्तक दाखवा आणि सोबत २०१९ ते २०२४ चे आपले व्हीजन काय? अजेंडा काय? हेही सांगा. त्याच्यावर बोला ना काहीतरी-- भारताला शिव्या घालीत जगणं ही पाकीस्तानची रित आहे. तुम्ही त्याच धर्तीवर भारताला पाकीस्तानकेंद्री का बनवताय? भारताला पाकीस्तानच्या त्या पातळीवर का नेताय? भारताच्या तुलनेत पाकीस्तान हा किरकोळ देश आहे. आपली अनेक राज्ये आकार, लोकसंख्या, अर्थव्यवस्था यादृष्टीने पाकपेक्षा मोठी आहेत. एकट्या महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्थासुद्धा पाकच्या कितीतरी मोठी आहे. तेव्हा भारताला महान करता येत नसेल तर तर ठीकाय. मात्र एका छटाकभर देशाच्या बरोबरीने भारताला उभे करून भारताला निदान छोटंतरी करू नका. भारतपण जपा. - प्रा.हरी नरके, ५ एप्रिल २०१९

No comments:

Post a Comment