Saturday, May 11, 2019

मृत्यूनंतर

एखादे चटका लावून गेलेले पुस्तक वर्षानुवर्षे आठवत राहते. काळाच्या ओघात नवनवी पुस्तके वाचनात येतात. ते जुने पुस्तक विस्मरणात जाते.
का कोण जाणे मात्र कधीतरी अचानक ते जुने पुस्तक आठवू लागते. पुस्तकातले तपशील विसरलेले असतात. पुस्तकाचा गाभा डोक्यात पक्का कोरला गेलेला असतो.
फार पुर्वी शालेय वयात वाचलेले शिवराम कारंत यांचे एक पुस्तक असेच अचानक धडका मारू लागले. कादंबरी वाचून किमान ४० वर्षे झालेली. एका वृद्धाची नातेसंबंधातली फरपट चित्रित करणारी कथा परतपरत आठवू लागली.

पुस्तकाचे नाव मात्र आठवेचना. पुस्तक सापडेना.
दातात अडकलेल्या बडीशेपेच्या एखाद्या दाण्यानं यावी तशी अस्वस्थता येऊ लागली. पुस्तकाचं नाव आठवायचा खूप प्रयत्न करून झाला. शोधाशोध करून झाली.

पुस्तक सापडत नाही म्हटलं की बेचैनी येते. परतपरत तेच पुस्तक धडका मारू लागतं.
परवा घरातल्या सर्व पुस्तकांची साफसफाई करताना अचानक ते पुस्तक हाती लागलं. अशावेळी होणारा आनंद केवळ अपार नी असीम. हा क्षण जणू युरेका युरेका ओरडण्याचा.
"मृत्यूनंतर" हे ते पुस्तक. कादंबरी. नॅशनल बुक ट्रस्टने १९७५ साली तिचा मराठी अनुवाद प्रकाशित केलेला. अनुवादक केशव महागावकर.
अवघी १८६ पृष्ठांची ही कादंबरी. कारंतांनी १९६० मध्ये लिहिलेली.
कादंबरी अफाट ताकदीची. मानवी नात्यांमधली गुंतागुंत बारकाईनं टिपणारी. पैशासाठी माणसं किती खालच्या पातळीवर उतरतात, हैवान होतात त्याची अस्वस्थ करणारी कथा.यशवंतराव ह्या नायकाची भिडणारी गाथाच.
-प्रा.हरी नरके, ११ मे २०१९

No comments:

Post a Comment