Wednesday, June 19, 2019

वेटींग फॉर व्हिसा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मास्टरपीस












"डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे" या मालिकेतील खंड १ ते २२ वाचणे ही अभ्यासकांसाठी अविस्मरणीय मेजवानी असते. विद्वत्ता, विज्डम, संशोधन, लेखन यांचे जागतिक मानदंड म्हणजे हे ग्रंथ होत. ज्यांना आपला भारतीय समाज आणि १८९१ ते १९५६ चा काळ याबद्दलचे दस्तऎवज वाचायचे असतील त्यांनी हे ग्रंथ वाचायलाच हवेत.

तथापि काही कारणांनी ज्यांना हे सगळे ग्रंथ वाचता येणे शक्य नसेल त्यांनी त्यातले किमान पाच ग्रंथ तरी वाचायलाच हवेत.
त्यातला मास्टरपीस म्हणजे वेटींग फॉर व्हिसा.

एक विलक्षण ग्रंथ.

हे पुस्तक वाचून ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत, जे लोक हेलावणार नाहीत ती माणसेच नव्हेत.
हे बाबासाहेबांचे संक्षिप्त आत्मचरित्र आहे. अतिशय चटका लावणारे, गलबलून सोडणारे.
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे" या मालिकेतील खंड क्र.१२ मध्ये आम्ही ते छापलेले आहे. [पाहा- पृ. क्रमांक ६५९ ते ६९२] न्य़ुयार्कच्या कोलंबिया विद्यापीठाने हे पुस्तक आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सचिव श्री नानकचंद रत्तू  यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा "डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी", हा मराठी अनुवाद प्रा. भास्कर लक्ष्मण भोळे, यांनी केला आहे. त्या मराठी अनुवादात " प्रवेश परवान्याच्या प्रतीक्षेत " सदर ग्रंथ समाविष्ट आहे. साकेत प्रकाशन, औरंगाबाद, यांनी हा ग्रंथ प्रकाशित केलेला असून त्याची तिसरी आवृत्ती-२०१५, ही अवघ्या रू.१७५/- ला सर्वत्र उपलब्ध आहे.
ह्या पुस्तकाचे हस्तलिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ताक्षरात उपलब्ध आहे.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संग्रहात ते आजही आहे. त्यांनी हे पुस्तक १९ मार्च १९९० ला प्रकाशित केले. राज्य शासनाने बाबासाहेबांचा हा १२ वा खंड १४ एप्रिल १९९३ ला प्रकाशित केलेला असून सुमारे ८०० पृष्ठांचे रॉयल आक्टोव्ह आकारातील हे पुस्तक अवघ्या ९५ रूपयांना सर्व शासकीय ग्रंथ भांडारात उपलब्ध आहे.
हा ग्रंथ प्रत्येकाने वाचायलाच हवा. ज्यांनी तो वाचला नाही त्यांनी काहीच वाचले नाही. अवघ्या अर्ध्या तासात हे पुस्तक वाचून होते. पण ते सून्न करते. कायमचे अस्वस्थ करते. भारतीय समाजाचा आरसा बाबासाहेब आपल्याला त्यात दाखवतात.

ह्या आठवणींनी बाबासाहेब व्याकूळ होत असत. यातल्या गोरेगावच्या प्रवासाच्या आठवणीने ५० वर्षांनंतरही त्यांचे डोळे पानावत असत. त्यांच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट होता.

अवघ्या ३० पृष्ठांचे हे लेखन जागतिक साहित्यातले श्रेष्ठ लेखन आहे.

मंडळी, मग बाबासाहेबांचे हे आत्मकथन वाचणार ना?

-प्रा.हरी नरके, १९ जून २०१९

#वेटींगफॉरव्हिसा

No comments:

Post a Comment