Sunday, August 4, 2019

गौरवगाथा मालिकेद्वारे राष्ट्रीय कार्य -


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारलेली प्रदीर्घ अशी दूरदर्शन मालिका बनवून व प्रसारित करून 'स्टार प्रवाह' ही वाहिनी एक महत्त्वपूर्ण असे राष्ट्रीय कार्य निभावत आहे, असे माझे मत आहे. प्रस्थापित विषमतावादी व्यवस्थेने माणसातील 'माणूस' मारून टाकला होता. माणसाकडे माणूस म्हणून बघण्याची दृष्टीच हरवून गेली होती. त्यामुळे बाबासाहेबांचा जिवंतपणी आणि महापरिनिर्वाणानंतरही प्रचंड मोठा द्वेष केला गेला.

हा द्वेष अज्ञानापोटी आणि एका रोगट मानसिकतेतून केला जात होता. 'स्टार प्रवाह' ही वाहिनी सध्या बाबासाहेबांवरील जी मालिका प्रसारित करत आहे, ती मालिका जो कोणी नियमितपणे बघेल त्याच्यातला 'माणूस' नक्कीच जागा होईल. बाबासाहेब हा त्याच्या जीवनाचा आदर्श बनेल. 'स्टार प्रवाह'ने बनवलेली ही मालिका अत्यंत जिवंत आणि प्रत्ययकारी बनलेली आहे. यामधील प्रत्येक कलावंताने आपली भूमिका उत्तम रीत्या साकार केली आहे.

त्यातही बाबासाहेबांच्या आत्याची भूमिका ज्या अभिनेत्रीने साकार केलेली आहे, ती तर फारच उत्तम झालेली आहे.बाबासाहेबांची वेगवेगळ्या वयातली चार रूपं या मालिकेत दाखवलेली दिसतात. बाबासाहेबांचे बाल रूप, किशोर वयातील रूप, तरुणपणातील रूप आणि प्रौढपणातील रूप ही सारीच रूपं त्या-त्या कलावंतांनी जीव ओतून साकार केलेली दिसतात.

त्यातही बाल भिवाचे रूप मनाला फार भावलं. किशोर वयात विहिरीचे पाणी पिले म्हणून मारहाण करणाऱ्या लोकांवर भिवाने उगारलेला धोंडा फार महत्त्वाचा वाटला. संवाद अत्यंत सुंदर आहेत. त्याला संगीताचीही उत्तम साथ मिळाली आहे.

बाबासाहेबांचा बाळा दादा हा भाऊ बँड वाजावण्याची नोकरी करण्यासाठी गेला आणि परत आलाच नाही. त्याबद्दल मालिका काहीच बोलत नाही. आनंदाचं लग्न झालं, पण बाळादादाचं लग्न झालं का? तो घरी परत कधीच का येत नाही?

बाबासाहेबांच्या चरित्रातील त्यांचे कर्तृत्व सिद्ध होऊ लागल्या नंतरच्या गोष्टी बहुतांश जणांना माहीत असतात; परंतु त्यांचे बालपण, तरुणपण, त्यांचे बालपणातील व तरुणपणातील सवंगडी, त्यांच्या बहिणी, त्यांची नंतरही आई, त्यांचे मुंबईतले शिक्षक,यांच्याबद्दल लोकांना फारशी माहिती नसते.

बाबासाहेबांच्या व्यक्तिगत जीवनातील अत्यंत महत्त्वाची माहिती, त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग आपल्या वहिनीने जिवंत केले आहेत. आपल्या वाहिनीवरील ही मालिका एका राष्ट्र जाणिवेची आणि संवैधानिक मूल्यांची पेरणी करत आहे. ही पेरणी करत असल्याबद्दल मी 'स्टार प्रवाह' या वाहिनीचे अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो.

मी ही मालिका रोज नियमीतपणे पाहतो. सर्वांनीच बघावी अशी ही उत्तम दर्जाची दूरदर्शन मालिका आहे.
by Prof. Anant Raut- प्रा.अनंत राऊत [ प्रख्यात लेखक-नांदेड ] डॉ. अनंत राऊत
प्रमुख, मराठी विभाग पीपल्स कॉलेज नांदेड.
अध्यक्ष,
युवा प्रबोधन मंच प्रणित संविधान जागरण समिती
भ्र. ध्व - 98 60 52 55 88
ई मेल पत्ता - anantraut65@gmail.com

No comments:

Post a Comment