Tuesday, May 28, 2019

पुरोगाम्यांमुळेच आजवर काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता

पुरोगामी प्राणांची बाजी लावून जातीयवादी शक्तींशी लढले म्हणुन काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळत होती - प्रा.हरी नरके

महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी, सेना-भाजपा हे चारही प्रमुख पक्ष आजवर कधीना कधी सत्तेत होते/आहेत. हे मुळात वर्चस्ववादी, जातीय सरंजामी मानसिकतेला प्रमाण मानून चालणारे पक्ष आहेत. त्यांच्या कोणाच्याही विषयपत्रिकेच्या गाभ्यात वंचित- बहुजन- समाजांचे कल्याण हा विषय नव्हता. नाही. त्या पक्षात वंचित बहुजनांचे काही नेते असले तरी ते पक्षाच्या मालकांचे सालगडीच होते. आहेत.

त्यांना पक्षाची धोरणे ठरवण्याचा तीळमात्र अधिकार नव्हता. नाही. त्यांना व्यक्तीगत सत्ता मिळालीही असेल मात्र त्यातून वंचित-बहुजनांचा अजेंडा कधीही अग्रभागी आला नव्हता. येऊही शकत नाही.
वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या दहा ते १२ जागा पडल्या अशी हाकाटी केली जाते. तो निव्वळ राजकीय कांगावा आहे. तो करणारांनी वंचित बहुजनांना आजवर नोकरासारखेच वागवले होते ना?

मूठभर सरंजामदारांचे हे पक्ष वंचित बहुजनांना अपमानास्पद वागणूक देत होते. त्यांचं धर्मनिरपेक्षतेचं प्रेम निव्वळ बेगडी होतं. आहे. तोंडी लावायला सामाजिक न्याय, संविधान आणि फुले-आंबेडकर. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हाच यांचा एकमेव प्रोग्रॅम. यांचे घोटाळेसुद्धा आदर्श! आजवर पुरोगामी प्राणांची बाजी लावून जातीयवादी शक्तींशी लढत राहिले, म्हणुन काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळत होती. परंतु या सत्तेच्या दलालांनी त्याची कधीही जाणीव ठेवली नाही.

राजकारणात तुम्ही मिळवलेली मतं, तुमचा जनाधार, तुमचं उपद्रवमूल्य हीच तुमची शक्ती असते. ती दाखवल्याशिवाय कोणीही तुम्हाला मोजत नाही. राजकारण हा शक्तीपरीक्षेचाच खेळ असतो.

मुंबई मनपाच्या निवडणुकीत मागे राष्ट्रवादीनं एका नगरसेवकाच्या जागेसाठी काँग्रेसशी युती तोडली होती.

गुजरात विधानसभेला एन.सी.पी. नं उभ्या केलेल्या उमेदवारांनी काँग्रेसची मतं खाल्ली म्हणूनच तिथं भाजपाची पुन्हा सत्ता आली.

आता लोकसभेला युपीत स.प. - ब.स.पा. ची मतं काँग्रेसनं खाल्लीच ना?

तेव्हा परिवर्तनवादी जाऊन जाणार कुठे, त्यांना आपल्याशिवाय पर्यायच नाही हा राजकीय ब्लॅकमेलिंगचा सापळा आम्ही आता ओळखू लागलोत. जातीयवादी - धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी आमच्या वळचणीला या, आमचे आश्रित व्हा असा खेळ हे दोघेही वंचित-बहुजानांशी कायम खेळत आले. जातीयवादी - धर्मांध शक्तींना रोखण्याच्या वल्गना करून त्यांच्याशी आतून साटंलोटं [मॅचफिक्सिंग] करणारे हे लोकच मुळात भाजप-सेनेची बी टिम आहेत. त्याचा पुरावाही त्यांच्या विरोधी पक्ष नेत्यांनी दिलाच आहे.

विधानसभेला बरोबरीच्या नात्यानं चर्चा करा, नाहीतर गेलात ढगात असं बजावण्याचा अधिकार वंचित- बहुजन नं कमावला आहे.

-प्रा.हरी नरके, २९ मे २०१९

फेसबुके, ट्विटरे, इलेक्ट्रॉनिक, इद्वान इल्शेषक

एक आटपाट नगर होतं.
तिथं अनेक इद्वान राहात होते. विशेषत: त्यातले पत्रकार, फेसबुके, ट्विटरे, इलेक्ट्रॉनिक आणि प्राध्यापकी इद्वान लईच भारी होते.
राजाचा एका लढाईत दारूण पराभव झाला.
झालं, त्यानं या इद्वानांची बैठक बोलावली. झालेल्या पराभवाची मिमांसा करायला राजानं सगळ्यांना विनवलं. त्यातून आपण आत्मपरीक्षण करू असं राजानं वचन दिलं.
इद्वानांनी २ आठवडे वैचारिक खल केला. शेवटी निष्कर्ष काढण्यात आला की राजानं हत्तींचं दळ पुढं ठेवल्यानं त्याचा पराभव झाला.घोडदळ पुढं पाह्यजेल होतं.

पुढच्या लढाईत राजानं तसं केलं. तरीही राजा हरला.

झालं, त्यानं पुन्हा या इद्वानांची बैठक बोलावली. झालेल्या पराभवाची मिमांसा करायला राजानं सगळ्यांना विनवलं. त्यातून आपण आत्मपरीक्षण करू व झालेल्या चुका दुरूस्त करू असा शब्द  राजानं दिला.
इद्वानांनी ३ आठवडे वैचारिक खल केला. शेवटी निष्कर्ष काढण्यात आला की राजानं घोडदळ पुढं ठेवल्यानं त्याचा पराभव झाला. त्यानं पायदळ पुढं ठेवायला पाह्यजेल होतं.

तिसर्‍या लढाईत राजानं तसं केलं. तरीही राजा परत हरला.

झालं, त्यानं परत एकदा या इद्वानांची बैठक बोलावली. झालेल्या पराभवाची मिमांसा करायला राजानं त्यांना विनवलं. त्यातून आपण आत्मपरीक्षण करू व झालेल्या चुका दुरूस्त करू असा शब्द  राजानं दिला.

इद्वानांनी ४ आठवडे वैचारिक खल केला. शेवटी निष्कर्ष काढण्यात आला की राजानं यावेळी पायदळ पुढं ठेवल्यानं त्याचा पराभव झाला. त्यानं उंटांचं दळ पुढं ठेवायला पाह्यजेल होतं.

तेव्हा चवथ्या लढाईवर जाण्यापुर्वीच राजानं या इद्वानांची बैठक बोलावली. काय केल्यानं आपल्याला यश मिळेल ते सांगा, कोणते डावपेच मी वापरू ते सांगा, मी तसं करतो, असं राजा म्हणाला.

त्यावर समदे इद्वान राजाला म्हणाले, आम्ही पत्रकार हावोत. आम्ही फेसबुके, ट्विटरे हावोत. इलेक्ट्रॉनिक हावोत. आम्ही इद्वान इल्शेषक असल्यानं घटना घडून गेल्यानंतर ती तशी का घडली याची चिकित्सा करीत असतो. मार्गदर्शन करीत असतो.
घटना घडायच्या आधी आम्ही तिच्याबद्दल काहीही सांगू शकत नाही.
-प्रा.हरी नरके, २८ मे २०१९ 

Monday, May 27, 2019

विचारवंतांचा खात्मा करू- राम माधव





मोदी २ मध्ये विचारवंतांचा खात्मा करू- भाजपाचे प्रवक्ते राम माधव यांची स्पष्टोक्ती

भाजपाचे प्रवक्ते राम माधव यांचा इंडीयन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेला खालील लेख सर्वांनी वाचायला हवा. त्यात त्यांनी मोदी २ मध्ये सर्वच क्षेत्रातील धर्मनिरपेक्षतावादी उदारमतवादी विचारवंतांचा आम्ही खात्मा करू असा इशारा दिलेला आहे. देशाच्या अकादमिक-सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्रातून या सर्वांना नष्ट करण्यासाठीच आम्हाला मतदारांनी सत्ता दिलेली आहे असा त्यांचा दावा आहे.

Saturday, May 11, 2019

मृत्यूनंतर

एखादे चटका लावून गेलेले पुस्तक वर्षानुवर्षे आठवत राहते. काळाच्या ओघात नवनवी पुस्तके वाचनात येतात. ते जुने पुस्तक विस्मरणात जाते.
का कोण जाणे मात्र कधीतरी अचानक ते जुने पुस्तक आठवू लागते. पुस्तकातले तपशील विसरलेले असतात. पुस्तकाचा गाभा डोक्यात पक्का कोरला गेलेला असतो.
फार पुर्वी शालेय वयात वाचलेले शिवराम कारंत यांचे एक पुस्तक असेच अचानक धडका मारू लागले. कादंबरी वाचून किमान ४० वर्षे झालेली. एका वृद्धाची नातेसंबंधातली फरपट चित्रित करणारी कथा परतपरत आठवू लागली.

पुस्तकाचे नाव मात्र आठवेचना. पुस्तक सापडेना.
दातात अडकलेल्या बडीशेपेच्या एखाद्या दाण्यानं यावी तशी अस्वस्थता येऊ लागली. पुस्तकाचं नाव आठवायचा खूप प्रयत्न करून झाला. शोधाशोध करून झाली.

पुस्तक सापडत नाही म्हटलं की बेचैनी येते. परतपरत तेच पुस्तक धडका मारू लागतं.
परवा घरातल्या सर्व पुस्तकांची साफसफाई करताना अचानक ते पुस्तक हाती लागलं. अशावेळी होणारा आनंद केवळ अपार नी असीम. हा क्षण जणू युरेका युरेका ओरडण्याचा.
"मृत्यूनंतर" हे ते पुस्तक. कादंबरी. नॅशनल बुक ट्रस्टने १९७५ साली तिचा मराठी अनुवाद प्रकाशित केलेला. अनुवादक केशव महागावकर.
अवघी १८६ पृष्ठांची ही कादंबरी. कारंतांनी १९६० मध्ये लिहिलेली.
कादंबरी अफाट ताकदीची. मानवी नात्यांमधली गुंतागुंत बारकाईनं टिपणारी. पैशासाठी माणसं किती खालच्या पातळीवर उतरतात, हैवान होतात त्याची अस्वस्थ करणारी कथा.यशवंतराव ह्या नायकाची भिडणारी गाथाच.
-प्रा.हरी नरके, ११ मे २०१९