Showing posts with label वेटींग फॉर व्हिसा. Show all posts
Showing posts with label वेटींग फॉर व्हिसा. Show all posts

Thursday, July 9, 2020

राजगृह: जागतिक वारसा केंद्र, बौद्धांचे उर्जाकेंद्र, विश्वाचे ज्ञानकेंद्र- प्रा. हरी नरके






दादर परिसरातील राजगृहाला तिहेरी महत्व आहे. मुळात तिथे पुस्तकं राहात होती आणि उरलेल्या जागेत आंबेडकर कुटूंबिय राहात होते. ते जागतिक वारसा केंद्र, बौद्धांचे उर्जाकेंद्र/प्रेरणास्थान आणि सार्‍या विश्वाचे ज्ञानकेंद्र आहे. ज्ञानसूर्य बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थळ हे फक्त एक घर नाही. १९३४ ते १९५६ या काळात बाबासाहेब तिथे राहात असत. त्यांनी अनेक पुस्तकं तिथं लिहिली. त्यांचे दोन मास्टरपीसेस "अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट" आणि "वेटींग फॉर व्हीसा" इथेच लिहिले गेले. "स्वतंत्र मजूर पक्षाचा" जन्म इथेच झाला. २७ मे १९३५ मातोश्री रमाबाईंचे महानिर्वाण इथेच झाले. बाबासाहेब सुमारे २८ वर्षे मुंबईच्या चाळीतच राहिले. जेव्हा ते शासकीय विधी महाविद्यालयात प्रोफेसर झाले तेव्हा पोय बावडीची चाळीतली जागा पुस्तकांसाठी फारच अपुरी पडू लागल्याने दादरच्या हिंदू कॉलनीच्या परिसरात त्यांनी दोन प्लाॅट खरेदी केले. बॅंकेचे कर्ज काढून १९३१ ला राजगृहाचे बांधकाम त्यांनी सुरू केले. १९३३ च्या अखेरीस राजगृह बांधून तयार झाले. १९३४ च्या प्रारंभी बाबासाहेब, रमाबाई, यशवंतराव, लक्ष्मीबाई, मुकुंदराव हा आंबेडकर परिवार तिथे राहायला गेला.


आपल्या बंगल्याला "राजगृह" हे नाव देण्यामागे बाबासाहेबांचा एक ठाम विचार होता. बिहार मधल्या नालंदा जिल्ह्यातल्या राजगिर किंवा राजगृहला तथागत अनेकवेळा राहिलेले होते. त्यांनी त्याठिकाणी धम्मप्रवचने दिलेली होती. राजगृह ही मगधांची पहिली राजधानी. बिंबीसार व अजातशत्रू या बौद्ध राजांची कारकिर्द या शहराने पाहीली. सम्राट अशोकाने या स्थानाला भेट दिली होती. इ.स.पुर्व २००० मधील बांधकामाचे अवशेष या शहरात मिळतात. बौद्ध आणि जैन या दोन्ही धर्मांचे पवित्र स्थान म्हणुन या शहराला महत्व आहे. पहिली बौद्ध धम्म संगिती इथेच झाली. "विनयपिटक" या पवित्र बौद्ध ग्रंथाची निर्मिती २२५० वर्षांपुर्वी इथेच झाली. या ग्रंथात महाराष्ट्राचा स्पष्ट उल्लेख मिळतो.


 १९३३ मध्ये राजगृहाचे बांधकाम चालू असताना बाबासाहेबांनी त्यांचे मित्र सुभेदार सवादकर यांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. त्यात आपला धर्मांतराचा निर्णय झालेला आहे व आपला कल बौद्ध धम्माकडे आहे असे त्यांनी स्पष्ट लिहिलेले आहे. येवल्याला त्यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी जी धर्मांतराची  महागर्जना केली ते भाषण राजगृहातच लिहिले गेले होते. काळाराम मंदिर सत्याग्रह, महाडच्या चवदार तळ्याची केस लढण्याची तयारी करणे, शेतकर्‍यांची आंदोलने, खोती विरोधी बिल, कुटुंब नियोजन बिल ह्या सार्‍या ऎतिहासिक गोष्टी राजगृहावरच जन्माला आल्या.



जल उर्जा, सौर उर्जा, औष्णिक उर्जा  या महत्वाच्या असल्या तरी त्यात भारनियमन /लोडशेडींग असू शकते. पण बाबासाहेबांच्या राजगृहातून मिळणारी बौद्धिक उर्जा मात्र कोणतेही भारनियमन नसलेली.


बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह गुणात्मक आणि संख्यात्मक अशा दोन्ही दृष्टींनी देशातला सर्वात मोठा खाजगी ग्रंथसंग्रह होता. सुरूवातीला त्यात ५० हजार ग्रंथ होते. त्यात सतत भर पडत राहिली. नंतर बाबासाहेबांचे बरेचसे वास्तव्य दिल्लीला राहिले. त्यामुळे राजगृहावरील काही पुस्तके तिकडे हलवण्यात आली. नंतर काही पुस्तके सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई व मिलिंद महाविद्यालय, औरंगाबादच्या ग्रंथालयांना दिली गेली.


बाबासाहेबांचा हा ग्रंथसंग्रह त्या काळात बनारस हिंदु विद्यापीठाचे मालवियजी आणि पिलानीचे बिर्ला शेट यांनी खरेदी करण्याची इच्छा दर्शवली होती. त्यांनी काही कोटी रुपये देऊ केलेले असताना व बाबासाहेबांना त्याकाळात आर्थिक निकड असतानाही बाबासाहेबांनी हा ग्रंथसंग्रह विकला नाही. एके ठिकाणी बाबासाहेब म्हणतात, " माझा समाज ज्ञानाचा भुकेला आहे. त्याला शतकानुशतके ज्ञानाची उपासमार सोसावी लागली. त्यांची ही अपुरी राहिलेली तहानभुक माझ्या एकट्यामध्ये सामावलेली असल्याने मी रात्रंदिवस, प्रत्येक सेकंद वाचतच असतो."

राजगृह हे वाचन संस्कृतीचं माहेरघर आहे. ते सार्‍या जगाचे ज्ञानकेंद्र आहे. तमाम बौद्धांचे ते पवित्र तीर्थक्षेत्र आणि प्रेरणास्थान आहे.

बाबासाहेब हे सामाजिक न्यायाचे व ज्ञान निर्मितीचे जागतिक प्रतिक आहेत. राजगृह हे ज्ञाननिर्मितीचे महाकेंद्र आहे.


- प्रा. हरी नरके,
हरी नरके, ९/७/२०२०



Sunday, April 12, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यातील मास्टरपीस- प्रा. हरी नरके, भीमजयंती 20/1










डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल २०२० ला १२९ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञाननिर्मिती, समता, सामाजिक न्याय आणि लोकशाही मुल्यव्यवस्था यांचे प्रतिक होत. या राष्ट्रपुरूषाने अवघ्या ६५ वर्षांच्या आयुष्यात शेपाचशे लोकांनाही जमणार नाही
असे पर्वताएव्हढे काम त्यांनी उभे केले.

त्यांनी लिहिलेल्या साहित्याचे महाराष्ट्र शासनाने आजवर २२ खंड प्रकाशित केलेत. या पुस्तकांचे संपादन करण्याची संधी मला मिळाली याचा मला अभिमान वाटतो. स्मृतीशेष वसंत मून यांच्या निधनानंतर २००१ ते २००६ पर्यंत समितीचा संपादक व सदस्य सचिव म्हणून काम करण्याची जबाबदारी माझ्यावर महाराष्ट्र शासनाने सोपवली होती. त्याकाळात मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणांचे अनेक खंड प्रसिद्ध केले. आधीचे जे मिळत नव्हते त्यांच्या सुधारित आवृत्त्या काढल्या. अनेक नव्या प्रकल्पांना गती दिली. गेली १४ वर्षे मी त्या समितीवर नाहीये तरिही सामान्य जनता आणि चळवळीतले कार्यकर्ते आजही मलाच त्या पुस्तकांबाबत विचारणा करतात, इतके या कामाशी माझे नाते जडलेले आहे.

डॉ. बाबासाहेबांचे मास्टरपीस :-

डॉ. बाबासाहेबांचे आम्ही काय वाचावे असा प्रश्न मला खूपदा विचारला जातो. त्यावर माझे उत्तर असते सर्वच्या सर्व २२ खंड वाचा. मग लोक म्हणतात, आमच्याकडे तेव्हढा वेळ नाही. निवडक पुस्तके सांगा. हा शॉर्टकट झाला. पण हरकत नाही. तुम्ही किमान दीड ते दोन तास बाजूला काढू शकता? वाचनाला देऊ शकता? तेव्हढ्या वेळात वाचायची डॉ. बाबासाहेबांची २ सर्वश्रेष्ठ पुस्तके मी तुम्हाला सांगतो. माझ्या मते हे डॉ. बाबासाहेबांचे मास्टरपीस आहेत. किमान हे तरी वाचाच वाचा. जे एव्हढेही वाचणार नाही त्यांनी बाबासाहेबांचे नावच न घेतलेले बरे!

१९३५ साली लिहिलेली ही २ पुस्तकं आहेत. ती आज मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. इंटरनेटवरही ती उपलब्ध आहेत. { लिंक्स खाली दिलेल्या आहेत. त्या न वाचताच, न पाहताच " लिंक्स द्या, ही पुस्तकं कुठं मिळतील?" असल्या विचारणा घाईघाईत करू नका}  ही आणि बाबासाहेबांची इतर सगळी पुस्तकं मिळण्याची ठिकाणे म्हणजे- मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या ५ शहरांमधील राज्य सरकारची पुस्तक दुकानं. ही पुस्तकं व्हीपीने पाठवली जात नाहीत. ती ऑनलाईन खरेदी करता येत नाहीत. ती पोस्टाने किंवा कुरियरनेही पाठवली जात नाहीत. काही खाजगी विक्रेते आणि काही खाजगी दुकानदार ही पुस्तके ठेवतात, त्यांच्याकडून ती तुम्हाला मिळू शकतील.

१. " अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट," हे लिहिलेले, प्रकाशित केलेले पण न झालेले भाषण आहे. पृष्ठसंख्या सुमारे ५०, शासकीय पुस्तकाची किंमत, रू. १५/- याचा समावेश शासनाच्या लेखन आणि भाषणांच्या पहिल्या खंडात केलेला आहे. याची मराठी भाषांतरे स्वतंत्रपणे प्रकाश सिरसट, वसंत मून आणि गौतम शिंदे यांनी केलेली आहेत. ही सगळी पुस्तके बाजारात सर्वत्र उपलब्ध आहेत.

२. " वेटींग फार ए व्हीजा," हे डॉ. बाबासाहेबांचे आत्मच्ररित्र आहे. ते हस्तलिखित स्वरूपात होते. ते १९९० साली प्रथम प्रकाशित झाले. त्याचा समावेश शासनाच्या लेखन आणि भाषणांच्या १२ व्या खंडात केलेला आहे. पृष्ठसंख्या सुमारे ३०, शासकीय पुस्तकाची {संपुर्ण खंडाची} किंमत, रू. ९५/- याची मराठी भाषांतरे भा.ल.भोळे, { डॉ. बाबासाहेब आंबेडकर- अनुभव आणि आठवणी, ले.सं. नानकचंद रत्तू, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९९८, पृ.३१ ते ५१} आणि शंकरराव खरात, { डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा, इंद्रायणी साहित्य, पुणे, २०१८, } यांनी स्वतंत्रपणे केलेली आहेत. साकेत व इंद्रायणी प्रकाशनाची ही पुस्तके सगळीकडे मिळतात.
पहिले पुस्तक वैचारिक, समाजशास्त्रीय दस्तावेज असे आहे. जातीपातींवर लिहिल्या गेलेल्या हजारो पुस्तकांमधले आऊटस्टॅंडींग म्हणता येईल असे हे सर्वश्रेष्ठ पुस्तक आहे.

दुसरे आत्मचरित्रपर आहे. पहिल्याच्या वाचनाने भारतीय समाजाचे आपले आकलन लख्ख होते, डोळे खाडकन उघडतात तर दुसर्‍याच्या वाचनाने बाबासाहेबांविषयी, त्यांच्या आयुष्यातील संघर्षाविषयी जाणून डोळ्यात आसवं येतात. ह्या महामानवाची ही संघर्षगाथा परिवर्तनाची आस जागवते. लढण्यासाठी बळ देते.

- प्रा. हरी नरके,१२/०४/२०२०

वाचनासाठी लिंक्स:-

http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_waiting.html 
http://drambedkar.co.in/wp-content/uploads/books/category2/6waiting-for-a-visa.pdf
http://ccnmtl.columbia.edu/projects/mmt/ambedkar/web/readings/aoc_print_2004.pdf
https://books.google.co.in/books?id=Eio8BQAAQBAJ&printsec=frontcover&source=gbs_ge_summary_r&cad=0#v=onepage&q&f=false

पुस्तके मिळण्याची ठिकाणे- शासकीय ग्रंथ भांडार -
१. शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथ भांडार, जिल्हाधिकारी कार्यालय व जनरल पोस्ट ऑफिस यांच्या शेजारी,
पुणे स्टेशन, पुणे ४११००१
२. मध्यवर्ती शासकीय ग्रंथ भांडार, चर्नी रोड रेल्वे स्टेशन लगत, मुंबई, ४०० ००४
३. शासकीय ग्रंथ भांडार, तारा राणी पार्क, कोल्हापूर,
४. शासकीय ग्रंथ भांडार,सिव्हील लाईन्स, नागपूर,
५. शासकीय ग्रंथ भांडार, रेल्वे स्टेशन पुलालगत, औरंगाबाद

** पुस्तक पेठ, लक्ष्मीछाया इमारत, आयडीयल कॉलनी ग्राऊंडजवळ, पौड रोड, कोथरूड, पुणे ४११०३८ येथे
मराठी, इंग्रजी, हिन्दीतील सर्व पुस्तके मिळतात.
पुस्तक पेठ
pustakpeth@gmail.com

Sanjay Bhaskar Joshi
sanjaybhaskarj@gmail.com

Madhav Vaishampayan
madhavvaisham@gmail.com

कृपया संपर्क करा-
संजय भास्कर जोशी,09822003411

Wednesday, June 19, 2019

वेटींग फॉर व्हिसा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मास्टरपीस












"डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे" या मालिकेतील खंड १ ते २२ वाचणे ही अभ्यासकांसाठी अविस्मरणीय मेजवानी असते. विद्वत्ता, विज्डम, संशोधन, लेखन यांचे जागतिक मानदंड म्हणजे हे ग्रंथ होत. ज्यांना आपला भारतीय समाज आणि १८९१ ते १९५६ चा काळ याबद्दलचे दस्तऎवज वाचायचे असतील त्यांनी हे ग्रंथ वाचायलाच हवेत.

तथापि काही कारणांनी ज्यांना हे सगळे ग्रंथ वाचता येणे शक्य नसेल त्यांनी त्यातले किमान पाच ग्रंथ तरी वाचायलाच हवेत.
त्यातला मास्टरपीस म्हणजे वेटींग फॉर व्हिसा.

एक विलक्षण ग्रंथ.

हे पुस्तक वाचून ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत, जे लोक हेलावणार नाहीत ती माणसेच नव्हेत.
हे बाबासाहेबांचे संक्षिप्त आत्मचरित्र आहे. अतिशय चटका लावणारे, गलबलून सोडणारे.
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे" या मालिकेतील खंड क्र.१२ मध्ये आम्ही ते छापलेले आहे. [पाहा- पृ. क्रमांक ६५९ ते ६९२] न्य़ुयार्कच्या कोलंबिया विद्यापीठाने हे पुस्तक आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सचिव श्री नानकचंद रत्तू  यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा "डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी", हा मराठी अनुवाद प्रा. भास्कर लक्ष्मण भोळे, यांनी केला आहे. त्या मराठी अनुवादात " प्रवेश परवान्याच्या प्रतीक्षेत " सदर ग्रंथ समाविष्ट आहे. साकेत प्रकाशन, औरंगाबाद, यांनी हा ग्रंथ प्रकाशित केलेला असून त्याची तिसरी आवृत्ती-२०१५, ही अवघ्या रू.१७५/- ला सर्वत्र उपलब्ध आहे.
ह्या पुस्तकाचे हस्तलिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ताक्षरात उपलब्ध आहे.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संग्रहात ते आजही आहे. त्यांनी हे पुस्तक १९ मार्च १९९० ला प्रकाशित केले. राज्य शासनाने बाबासाहेबांचा हा १२ वा खंड १४ एप्रिल १९९३ ला प्रकाशित केलेला असून सुमारे ८०० पृष्ठांचे रॉयल आक्टोव्ह आकारातील हे पुस्तक अवघ्या ९५ रूपयांना सर्व शासकीय ग्रंथ भांडारात उपलब्ध आहे.
हा ग्रंथ प्रत्येकाने वाचायलाच हवा. ज्यांनी तो वाचला नाही त्यांनी काहीच वाचले नाही. अवघ्या अर्ध्या तासात हे पुस्तक वाचून होते. पण ते सून्न करते. कायमचे अस्वस्थ करते. भारतीय समाजाचा आरसा बाबासाहेब आपल्याला त्यात दाखवतात.

ह्या आठवणींनी बाबासाहेब व्याकूळ होत असत. यातल्या गोरेगावच्या प्रवासाच्या आठवणीने ५० वर्षांनंतरही त्यांचे डोळे पानावत असत. त्यांच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट होता.

अवघ्या ३० पृष्ठांचे हे लेखन जागतिक साहित्यातले श्रेष्ठ लेखन आहे.

मंडळी, मग बाबासाहेबांचे हे आत्मकथन वाचणार ना?

-प्रा.हरी नरके, १९ जून २०१९

#वेटींगफॉरव्हिसा