Showing posts with label युवक. Show all posts
Showing posts with label युवक. Show all posts

Friday, December 7, 2018

संतती नियमनाच्या लोक चळवळीचे पहिले प्रवर्तक




देशाच्या खांद्यावर लोकसंख्येचे अवजड ओझे - एकाच अपत्यावर थांबा असे डॉ. बाबासाहेबांनी 1938 मध्येच सांगितले होते.
आज रोजी भारताची लोकसंख्या 135 कोटी 42 लक्ष 94 हजार 272 आहे. जगातली अवघी 2 टक्के भुमी असलेल्या भारतात जगातली 18 टक्के लोकसंख्या राहते. हे असेच चालू राहिले तर हा देश नजिकच्या भविष्यात कोलमडून पडेल. 1930 च्या दशकात लोकसंख्येच्या विस्फोटाचा हा धोका ओळखून संतती नियमनाची लोक चळवळ देशात सर्वप्रथम उभी करणारे पहिले नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत.
1937 सालच्या ब्रिटीश भारतातील "स्वतंत्र मजूर पक्षाच्या" निवडणुक जाहीरनाम्यात बाबासाहेबांनी संतती नियमनाच्या कायद्याचे अभिवचन दिले होते.
ते त्यांनी 10 नोव्हेंबर 1938 रोजी पुर्ण केले. त्यांच्या पक्षाच्या वतीने मुंबई विधीमंडळाच्या अधिवेशनात संतती नियमन विधेयक सादर करण्यात आले.
[ पाहा- मुंबई विधीमंडळ चर्चा, खंड, 4, भाग 3, पृ.4024 ते 38 ]
स्वतंत्र मजूर पक्षाचे आमदार पी.जे.रोहम यांनी सादर केलेले हे विधेयक डॉ. बाबासाहेबांनी तयार करून दिलेले होते. रोहम यांनी केलेले भाषण मराठीत होते.
जन्मदर महत्वाचा नसून पोषणदर महत्वाचा आहे.
पुरस्कार आणि शिक्षा पद्धतीद्वारे कुटूंब नियोजन मोहीम चालवा,
सरकारतर्फे सर्व विवाहीतांना कुटुंब नियोजनाची साधने मोफत पुरवा,
शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहन द्या,
मुलं किती असावीत आणि कधी होऊ द्यावीत याचा निर्णय पत्नीला घेऊ द्या,
स्त्रियांच्या आणि बालकांच्या आरोग्याची हमी द्या,
प्रगत देशांच्या तुलनेत भारत खूप मागे असताना, याच वेगाने लोकसंख्या वाढली तर भारत संकटात सापडेल.
गुणवत्तापुर्ण शिक्षण, आरोग्य, पोषण आहार, निवारा, घरं, रोजगार आणि आनंदी जीवनमान प्रत्येक मुलामुलीला मिळणं हा त्यांचा हक्क आहे.
भारतात जास्त मुलं जन्माला घालणं हा राष्ट्रीय गुन्हा ठरवला पाहिजे,
हे बाबासाहेबांचे द्रष्टे विचार आजही कालसुसंगत नी मार्गदर्शक आहेत.
प्रगत देशातील दरडोई Consumption आणि भारतातली अपुरी उपलब्धता सांगताना डॉ. बाबासाहेब, दूध, मटण, फळं, साखर, गहू, भाजीपाला, यांची सरळ आकडेवारीच देतात.
दुर्दैवाने त्यावेळच्या हिंदू महासभा, मुस्लीम लिग, काँग्रेस, अगदी कम्युनिष्ट या सार्‍यांनीच या बिलाला विरोध केला.
परिणामी ते फेटाळले गेले.
80 वर्षांपुर्वी या बिलाचे स्वागत करणारे फक्त दोघेच द्रष्टे लोक भारतात होते.
समाजस्वास्थकार प्रा.र.धो.कर्वे आणि जे.आर.डी. टाटा. कर्व्यांनी समाजस्वास्थमधून या विषयावर जागृती चालवली होती. त्यांच्यावर सनातन्यांनी अश्लीलतेच्या नावाखाली खटले भरले तेव्हा त्यांचे वकीलपत्र घेऊन बॅरिस्टर बाबासाहेब त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले.
कुंटुंब नियोजन बिल फेटाळले गेले तरी 10 डिसेंबरला [1938] डॉ. बाबासाहेबांनी मुंबईत युवक परिषद घेऊन एकाच अपत्यावर थांबा असा सल्ला युवकांना दिला.
1952 सालच्या निवडणुकीतही आपल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यात त्यांनी कुटूंब नियोजनाचे वचन दिलेले होते.
डॉ.बाबासाहेब : शेतकर्‍यांचे सच्चे मित्र
शंभर वर्षांपुर्वी म्हणजे १९१८ साली डॉ. बाबासाहेबांनी शेतीवर "स्माल होल्डींग्ज इन इंडीया" हा शोधग्रंथ लिहिला होता. त्यात त्यांनी शेती आणि शेतकरी यांच्या समस्या सोडवण्याचा मार्ग सांगितला होता.
1. शेतकरी निरक्षरता व अन्य कारणांनी कुटुंबनियोजन करीत नाहीत त्यामुळं होणारी जास्त मुलं आणि मग शेतीचे होणारे वाटे म्हणजे तुकडे यातून उभे राहणारे अनेक प्रश्न यांची चर्चा त्यांनी केली होती. तुकडेबंदीचा मार्ग सांगुन त्यांनी अशी शेतं एकत्र करून शेतकर्‍याला एका ठिकाणी दिल्यास शेती करणं सोयीचं होईल असं सुचवलं. पुढं स्वतंत्र भारतात असा जमीन एकत्रीकरणाचा कार्यक्रम राबवला गेला.
2. बाबासाहेब म्हणतात, मुख्य समस्या आहे शेतीवर वाढणार्‍या बोजाची. शेतीवर ज्याकाळात 80 टक्के लोक अवलंबून होते तेव्हा ते म्हणतात यातले 60 टके लोक इतर क्षेत्रात हलवले पाहिजेत. शेतीवर वाढणारा बोजा कमी करण्यासाठी शेतकर्‍यांनी आपली मुले शेतीवर अवलंबून न ठेवता त्यांना व्यापार, उद्योग, शिक्षण, सेवा क्षेत्रात घातले पाहिजे.
3. शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा ही त्यांची मुख्य शिफारस आहे. त्यामुळं उद्योगाला जशी शासकीय मदत मिळते तशी शेतीला मिळेल.
4. शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावेत यासाठी शासकीय धोरणं आखली जावीत.
5. शेतीला 24 तास आणि 365 दिवस सिंचनाची सोय उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे असं ते म्हणतात.
6. शेती आधुनिक पद्धतीनं करायला हवी. शेतीला जोडधंदे, पुरक उद्योग, दुध, अंडी, लोकर आदींची जोड द्यायला हवी.
असें झालं नाही तर शेतकरी संकटात सापडेल आणि त्याला जगणं मुश्कील होईल अशा इशारा त्यांनी 100 वर्षांपुर्वी दिला होता हे त्यांचे द्रष्टेपण होते. आज आपल्या देशात शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आत्महत्त्या करीत आहेत. बाबासाहेब 100 वर्षांपुर्वी जणू काही हा इशाराच देत होते.
त्यांनी कुलाबा [आताचा रायगड] जिल्ह्यात शेतकरी समुदायाची आंदोलनं संघटित केली. विधीमंडळावर शेतकर्‍यांचे मोर्चे काढले.
त्यांच्या "स्वतंत्र मजूर पक्षातर्फे" त्यांनी मुंबई विधीमंडळात जमीनमालक खोतांविरुद्ध विधेयक आणून फार मोठे जनआंदोलन उभारलं होतं. त्या चळवळीमुळंच पुढं कुळकायदा आला आणि शेतकरी समुहांना जमीन मालकी मिळाली. शेतीसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी १९४२ ते १९४६ या काळात केंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार पुढे आणला. दामोदर, महानदी, कोसी नदी, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणे आणि विजनिर्मिती प्रकल्प हाती घेतले.
देशात जलसाक्षरता आणि उर्जा साक्षरता निर्माण करण्यासाठी ते झटले.
आज राज्यात जेव्हा भीषण दुष्काळ पडतो, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते, अशावेळी वीज आणि पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना सगळ्याच जातीधर्माच्या मंडळींना बाबासाहेबांचा हा काळाच्या पुढचं बघणारा आवाका चकीत करून जातो.
डॉ. बाबासाहेब हे आज सामाजिक न्यायाचं प्रतिक बनलेले आहेत. खरंतर ते सच्चे शेतकरी मित्र होते आणि सर्वांना कसायला जमीनी मिळायला हव्यात अशी त्यांची भुमिका होती. त्यासाठी खाजगी जमीनमालकी रद्द करून सर्व जमीनी सरकारच्या मालकीच्या कराव्यात असा त्यांचा आग्रह होता.
- प्रा.हरी नरके
युवा किसान, गुरूवार दि. ६ डिसेंबर २०१८

Wednesday, October 3, 2018

अभिव्यक्ती स्वातंत्र्य व पहिली बाजू आणि दुसरी बाजू









पहिली बाजू- श्रेष्ठ कवी दिनकर मनवरांची वादग्रस्त कविता आणि 'दृश्य नसलेल्या दृश्यात' हा कवितासंग्रह दर्जेदार आहे. हा कवितासंग्रह अभ्यासक्रमात असल्यामुळे समकालीन समृद्ध वाड्मयीन आकलनाला बळ मिळते. सदर कवितासंग्रह अभ्यासक्रमातून काढा, त्यांच्या या कवितासंग्रहावर बंदी घाला अशी मागणी गैर आहे. मनवर यांच्या या संग्रहातली ती एकच ओळ मूळ कवितेतून तोडून काढून त्यावर हल्ला करणं साहित्य संस्कृतीच्या निकोप वाढीला घातक आहे. समाजाच्या भावना दुखावल्या ही तक्रार मला निव्वळ राजकीय वाटते. हे अस्मितांचे राजकारण आपल्याला विनाशाकडे घेऊन जाईल.

मुंबई विद्यापीठाच्या ज्या अभ्यास मंडळाने हे पुस्तक अभ्यासक्रमाला लावले होते त्यांनीच एकमताने निमूटपणे त्यातली ही कविता अभ्यासक्रमातून रद्दही केली.
ही कविता असलेला हा संग्रह विद्यापिठीय पाठ्यपुस्तक म्हणून टीवायबीएच्या अभ्यासक्रमाला लावण्याला श्रमजिवी संघटना आणि आदीवासींच्या अनेक संघटनांनी विरोध केला होता.

दुसरी बाजू- ही कविता वर्गात शिकवणारी प्राध्यापिका एक तरूण आदीवासी स्त्री असेल तर तिला ही कविता वर्गातील १०० युवकयुवतींपुढे वाचून दाखवताना काय वाटेल?
त्या वर्गात असलेल्या कोवळ्या वयाच्या तरूण आदीवासी मुलींना काय वाटेल? त्यांच्या शेजारी वर्गात बसणार्‍या इतर मित्रमैत्रिणींना काय वाटेल? याचा विचार अभ्यास मंडळाने केला होता काय? शेरे-ताशेरेंने भरलेले बुणगे हा विचार कुठून करणार म्हणा?

अगदी शिकणार्‍या, शिकवणारात कोणीही आदीवासी नसले तरी कोणत्याही समाजाच्या स्त्री प्राध्यापकांना ही कविता मोकळेपणाने भर वर्गात वाचता येईल काय? शिकवता येईल काय?
वर्गात त्यांना ही कविता शिकताना, शिकवताना लज्जा वाटणार नाही एव्हढा आपला समाज प्रगल्भ झालाय काय? आपला समाज खुला, निरामय नाही. लिंगभावाची ही निकोपता आपल्यात नसल्याने एखाद्या पुरूष प्राध्यापकाने वर्गात कवितेची ही ओळ वाचताना माझ्याकडे सहेतूक बघितले अशी तक्रार दाखल झाली तर त्या पुरूष प्राध्यापकावर काय बिलामत ओढवेल हेही समजून घ्या.

स्त्री ही कोणत्याही समाजाची असली तरी ती माणूस म्हणून आदरणीयच आहे. इथे कोणत्या समाजाची स्त्री आहे हा मुद्दा महत्वाचा नाही. स्त्री आहे हा मुद्दा महत्वाचा आहे.

या आदीवासी शब्दाच्या जागी समजा मराठा, ब्राह्मण, माळी, बौद्ध किंवा अन्य कोणत्याही समाजाचा उल्लेख असता तरीही शिकवताना अडचण आलीच असती.

टीवायबीएचा वर्ग म्हणजे वयोगट २० वर्षाचा. या तरूण वयात शारिरिक कुतूहल जागृत होऊन मुलंमुली नाजूक स्थितीतून जात असतात. या गोंधळलेल्या वयात भर वर्गात स्त्रीच्या खाजगी अवयवाचा हा उल्लेख करणे मस्ट आहे?

कवीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायलाच हवे.
लोकशाहीत वयोगट, अभ्यासक्रम, क्लासरूम आणि स्त्रीसुलभभावना हे सारे पुस्तक अभ्यासक्रमाला लावताना विचारात घेतले असते तर अभ्यास मंडळावर ही नामुष्की ऒढवली नसती. ही असली भुरटी आणि बिनकण्याची अभ्यास मंडळे काय कामाची?
-प्रा.हरी नरके, ३ आक्टोबर २०१८

Thursday, July 26, 2018

संतांच्या एक पाऊल पुढे असलेल्या मनूने केलेला स्त्री गौरव-






" व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." [9/19]
" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [5/152]
" पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [5/154]
" स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात." [9/14]
" पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [9/15]
" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते."[9/46]
................................
सार्थ श्रीमनुस्मृती हा मूळ संस्कृत श्लोकांसह त्यांचा मराठी अनुवाद देणारा वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट यांचा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचायला हवा. विशेषत: सर्व सामाजातील स्त्रिया आणि माळी, साळी, तेली, कुणबी, वंजारी, आगरी, भंडारी, शिंपी, सोनार, सुतार, नाव्ही आदींनी आवर्जून वाचायला हवा.
संस्कृत पाठशाळा चालवणारे बापटशास्त्री प्रस्तावनेमध्ये लिहितात, " मनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे व त्याची योग्यता इतर कोणत्याही स्मृतीपेक्षा अधिक आहे.सनातन धर्माचा जीव असे जे चार आश्रम व चार वर्ण त्यांची व्यवस्था या स्मृतीमध्ये जशी स्पष्ट दिसते तशी ती वेदांमध्ये आढळत नाही...स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांचा या स्मृतीमध्ये पूर्णपणे विचार केलेला आहे"

मनुस्मृतीवर मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लकभट्ट, राघवानंदसरस्वती, नंदन,रामचंद्र, गोविंदराज, श्रीमाधवाचार्य, धरणीधर, श्रीधरस्वामी, रूचीदत्त, विश्वरूप, भोजदेव व भारूचि अशा एकंदर चौदा महापंडितांनी निरनिराळ्याकाळी केलेल्या चौदा टिका सर्वमान्य आहेत."

या सर्व टिकांचे आठ खंड भारतीय विद्या भवनने प्रकाशित केलेले आहेत.

आचार्य नरहर कुरूंदकर, डॉ. प्रदीप गोखले, डॉ. आ.ह.साळुंखे व भदन्त आनंद कौशल्यायन यांचे मनुस्मृतीवरचे ग्रंथ अतिशय मौलिक आहेत.

मनुस्मृती हा ग्रंथ बारा अध्यायांचा असून त्याचे 2634 श्लोक आहेत.

बापटशात्रींचा मराठी अनुवाद पुढे देत आहे. [कंसात अध्याय व श्लोक क्रमांक दिलेला आहे.]

" सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरूषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे.यास्तव ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहात नाहीत." [2/13]
" माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरूषाने एकांतात बसू नये." [2/15]
" ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत." [3/8]
" जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये." [ 3/11]
" ज्या कुळामध्ये पिता, पती द्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात." [3/56]

" नवर्‍याने बायकोसोबत एका ताटात जेवन करू नये. तसेच पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये." [4/43]
" आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऎका- बाल्यावस्थेत मुलीने, तरूण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये." [5/47]
" स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये." [5/48]
" पिता, पती,पुत्र यांच्यावेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस निंद्य करते." [5/49]
" पति जरी विरूद्ध असला तरी स्त्रिने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत." [5/150]

" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [5/152]
" पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [5/154]
" पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय." [5/155]
" स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये." [5/162]
" स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपली पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो." [5/166]

" पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे." [5/168]

" पिता,पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या आधीन ठेवावे. सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे." [6/2]
" विवाहाच्या पुर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही.योग्य नाही." [ 6/3]
" स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसर्‍याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचारदोष होत." [9/13]
"स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात." [9/14]
"पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [9/15]

" स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतत." [9/18]
" व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." [9/19]

" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते."[9/46]
-प्रा.हरी नरके 

Tuesday, July 24, 2018

नामांतर शहीद विलास ढाणे - स्मृती आणि वेदना









" नमस्कार. मी शिवाजीनगर पोलीस स्टॆशनमधून बोलतोय. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर एका तरूणाने रेल्वेखाली आत्महत्त्या केलीय. त्याच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीवर नामांतर आंदोलनाला माझ्या समाजाचा असलेला विरोध कमी व्हावा यासाठी मी आत्महत्त्या करीत असल्याचे म्हटलेले आहे. त्यात तुमचे नाव मिळाले. आत्महत्त्या करणार्‍या तरूणाचे नाव विलास ढाणे आहे." महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या सोमवारच्या साप्ताहिक बैठकीत आम्ही असताना डॉ. बाबा आढावांना हा फोन आलेला होता. आम्ही सारेच सुन्न झालो. श्रद्धांजली वाहून सभेचे काम आवरते घेण्यात आले.

विलास ढाणे हा सातारा जिल्ह्यातला तरूण. सप्टेंबर 1982 मध्ये मुंबईत नामांतर सत्याग्रह झाला होता. डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पहिल्याच दिवशी 16 हजार नामांतरवाद्यांना अटक करण्यात आलेली होती. त्यात डॉ. बाबा आढाव, डॉ. अनिल अवचट, कॉं. शरद पाटील, बाबूराव बागूल, रावसाहेब कसबे, प्रा. अरूण कांबळे, डॉ. कुमार सप्तर्षी, अंकुश भालेकर, बापूराव जगताप, लक्ष्मण माने आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर आदींचा समावेश होता. आझाद मैदानावर झालेल्या सभेला शुभेच्छा द्यायला तब्बेत बरी नसूनही अण्णा, एसेम जोशी आलेले. ज्या तरूणाने त्यांना उदगीरल जोड्यांचा हार घातलेला होता, तोही उपस्थित होता. त्याने जाहीरपणे क्षमायाचना केली होती. आपल्याला गुमराह केले गेले. आपला वापर केला गेला असे तो म्हणाला. आम्हाला सर्वांना ठाण्याच्या तुरूंगात ठेवलेलं होतं. तिथं या विलास ढाणेचा परिचय झालेला होता. मनस्वी, अत्यंत संवेदनशील तरूण.

नामांतराला विरोध करण्यासाठी भयानक हिंसाचार करण्यात आला होता. गोरगरीबांची घरं जाळण्यात आली होती. निष्पापांना ठार करण्यात आलेलं होतं. माझा समाज हिंसाचारात पुढे आहे याचा गिल्ट विलासला होता.

विलासनं शिवाजीनगर रेल्वे स्टेशनात लोकलखाली आत्महत्त्या केली.

२७ जुलै १९७८ रोजी महाराष्ट्राच्या विधीमंडळात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. १४ जानेवारी १९९४ रोजी ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नाव देण्यात आले.

हे करण्यासाठी 26 वर्षे संघर्ष करावा लागला तेव्हा कुठे हे नामांतर झाले. अनेकांनी अनेक प्रकारे लढा दिला.

पुढे या आंदोलनावर काही पुस्तकं लिहिली गेली. स्मारकं उभी राहिली. पण यातल्या बहुतेकात  डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचासुद्धा उल्लेख नाही मग विलास ढाणेचा कु्ठून असेल?विकीपिडीयावर नामांतर शहीद म्हणून खालील शहीदांचा उल्लेख आहे. त्यात विलासचे नाव नाही.

नामांतर आंदोलनातील शहीद-
The martyrs of Namantar Andolan:
Pochiram Kamble पोचिराम कांबळे, Janardan Mawade जनार्दन मवाडे Gautam Waghmare (गौतम वाघमारे),
Suhasini Bansod (सुहासिनी बनसोड),Govind Bhurewar (गोविंद भुरेवार), Bhalchandra Borkar (भालचंद्र बोरकर),Roshan Borkar (रोशन बोरकर),
Avinash Dongre (अविनाश डोंगरे),Narayan Gaikwad (नारायण गायकवाड),Shabbir Ali Kajal Hussain (शब्बीर अली काजल हुसैन),Chandar Kamble (चंदर कांबळे),
Domaji Kuttarmare (डोमाजी कुत्तरमारे),Janardan Mhaske (जनार्दन मस्के),Ratan Mendhe (रतन मेंढे),Kailas Pandit (कैलास पंडित),Ratan Pardeshi (रतन परदेशी),
Dilip Ramteke (दिलीप रामटेके),Dyneshwar Sakhare (ज्ञानेश्‍वर साखरे),Abdul Sattar (अब्दुल सत्तार),Pratibha Tayade (प्रतिभा तायडे),Diwakar Thorat (दिवाकर थोरात),
Manoj Waghmare (मनोज वाघमारे),Shila Waghmare (शीला वाघमारे)
https://en.wikipedia.org/wiki/Namantar_Shahid_Smarak

नाही चिरा नाही पणती!

शेवटी संत तुकाराम म्हणतात तेच खरे!
-प्रा.हरी नरके

Friday, July 20, 2018

हिंदुधर्म सुधारक आर्यसमाज, स्वामी अग्निवेश, लोकशाही आणि हिंसेचा विखार -





आर्य समाजाचे संस्थापक आणि सत्यार्थप्रकाश या ग्रंथाचे लेखक स्वामी दयानंद सरस्वती यांची 1875 मध्ये पुण्यात भाषणे आयोजित करण्यात आलेली होती. सुधारकांतर्फे त्यांची पुण्यात
मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे समजताच सनातन्यांनी त्याच रस्त्यावरून गर्दभानंदाची [गाढवाची] मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला.

न्या.म.गो.रानडे यांच्या विनंतीवरून स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मिरवणूकीला महात्मा जोतीराव फुले यांनी समर्थन दिले. खरं तर कट्टर वेदाभिमानी असलेल्या दयानंदांबरोबर फुल्यांचे काही मतभेद होते.

तरिही आर्य समाजाची समाजसुधारणावादी भुमिका लक्षात घेऊन फुले त्यांच्या रक्षणासाठी धावले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 1936 साली लाहोरच्या ज्या जातपात तोडक मंडळाने भाषण आयोजित केले होते ती मंडळी आर्य समाजाची होती. पुढे मतभेदांमुळे तो कार्यक्रम रद्द केला गेला. "अ‍ॅनिहीलेशन ऑफ कास्ट" हे क्रांतिकारी पुस्तक म्हणजे त्याच कार्यक्रमासाठी लिहिलेले भाषण होय.

स्वामी अग्निवेश [वय 78 वर्षे] हे आर्य समाजाचे प्रमुख नेते. गेली 60 वर्षे ते सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय आहेत.
एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अमाणूस हल्ला केला. झारखंड मधील या हल्ल्याचा निषेध.
मतभेद असतील तर त्यावर बोला, लिहा, ते जाहीरपणे मांडा. न्यायालयात जाऊन खटला भरा. घटनेच्या चौकटीत राहून शांततामार्गाने निदर्शने करा.
लोकशाहीत हिंसेला स्थान नाही.

हल्लेखोरांच्या पक्षाच्या मिडीया सेलच्या एका नेत्याने त्यावर फेसबुकवर लिहिले "यह था वो विवादित भाषण जिसके बाद हमारी पार्टीके कार्यकर्ताओं ने वामपंथी अग्निवेश को जमकर धोया 👊😁 #शाबास_शेरों 👍"
आता झारखंडचे एक मंत्री म्हणतात, "प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वामी अग्निवेश यांनी स्वत:वरचा हा हल्ला प्रायोजित केलेला होता."

जो स्वामी अग्निवेश यांची हत्त्या करेल त्याला आपण दहा लाखाचा पुरस्कार देऊ असे एकाने याच फे.बु. पोस्टवर घोषित केलेय.
एकाने स्वामी अग्निवेश हे जयभीमवाले असल्याने त्यांच्यावर हल्ला झाला ही कौतुकास्पद बाब असल्याचे म्हटलेय. एकाने म्हटलेय त्यांना खूप कमी मारले, त्यांची जीभ कापायला हवी होती. एकाने म्हटलेय त्यांना जिवंतच का सोडलेत?

कुठे नेऊन ठेवलाय भारत माझा? 1875 साली पुण्यात दयानंदांना विरोध झाला. आता दीडशे वर्षांनी स्वामी अग्निवेश यांना झारखंडमध्ये थेट मारहाण. आपण 1875 च्याही मागे चाललोय का? हा उन्माद भारताला विकासाकडे घेऊन चाललाय की हिंसाचाराकडे? की विकासाच्या नावाखाली हिंसाचाराकडे? महासत्ता होण्याचा बहुधा हाच एकमेव मार्ग असावा!

-प्रा.हरी नरके

Wednesday, July 11, 2018

संतती नियमनाच्या लोक चळवळीचे पहिले प्रवर्तक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर


जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त- संतती नियमनाच्या लोक चळवळीचे पहिले प्रवर्तक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
देशाच्या खांद्यावर लोकसंख्येचे अवजड ओझे - एकाच अपत्यावर थांबा असे डॉ. बाबासाहेबांनी 1938 मध्येच सांगितले होते.

आज रोजी भारताची लोकसंख्या 135 कोटी 42 लक्ष 94 हजार 272 आहे. जगातली अवघी 2 टक्के भुमी असलेल्या भारतात जगातली 18 टक्के लोकसंख्या राहते. हे असेच चालू राहिले तर हा देश नजिकच्या भविष्यात कोलमडून पडेल. 1930 च्या दशकात लोकसंख्येच्या विस्फोटाचा हा धोका ओळखून संतती नियमनाची लोक चळवळ देशात सर्वप्रथम उभी करणारे पहिले नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत.

1937 सालच्या ब्रिटीश भारतातील "स्वतंत्र मजूर पक्षाच्या" निवडणुक जाहीरनाम्यात बाबासाहेबांनी संतती नियमनाच्या कायद्याचे अभिवचन दिले होते.

ते त्यांनी 10 नोव्हेंबर 1938 रोजी पुर्ण केले. त्यांच्या पक्षाच्या वतीने मुंबई विधीमंडळाच्या अधिवेशनात संतती नियमन विधेयक सादर करण्यात आले.
[ पाहा- मुंबई विधीमंडळ चर्चा, खंड, 4, भाग 3, पृ.4024 ते 38 ]


स्वतंत्र मजूर पक्षाचे आमदार पी.जे.रोहम यांनी सादर केलेले हे विधेयक डॉ. बाबासाहेबांनी तयार करून दिलेले होते. रोहम यांनी केलेले भाषण मराठीत होते.

जन्मदर महत्वाचा नसून पोषणदर महत्वाचा आहे.
पुरस्कार आणि शिक्षा पद्धतीद्वारे कुटूंब नियोजन मोहीम चालवा,
सरकारतर्फे सर्व विवाहीतांना कुटुंब नियोजनाची साधने मोफत पुरवा,

शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहन द्या,
मुलं किती असावीत आणि कधी होऊ द्यावीत याचा निर्णय पत्नीला घेऊ द्या,
स्त्रियांच्या आणि बालकांच्या आरोग्याची हमी द्या,

प्रगत देशांच्या तुलनेत भारत खूप मागे असताना, याच वेगाने लोकसंख्या वाढली तर भारत संकटात सापडेल.
गुणवत्तापुर्ण शिक्षण, आरोग्य, पोषण आहार, निवारा, घरं, रोजगार आणि आनंदी जीवनमान प्रत्येक मुलामुलीला मिळणं हा त्यांचा हक्क आहे.

भारतात जास्त मुलं जन्माला घालणं हा राष्ट्रीय गुन्हा ठरवला पाहिजे,
हे बाबासाहेबांचे द्रष्टे विचार आजही कालसुसंगत नी मार्गदर्शक आहेत.

प्रगत देशातील दरडोई Consumption आणि भारतातली अपुरी उपलब्धता सांगताना डॉ. बाबासाहेब, दूध, मटण, फळं, साखर, गहू, भाजीपाला, यांची सरळ आकडेवारीच देतात.

दुर्दैवाने त्यावेळच्या हिंदू महासभा, मुस्लीम लिग, काँग्रेस, अगदी कम्युनिष्ट या सार्‍यांनीच या बिलाला विरोध केला.

परिणामी ते फेटाळले गेले.

80 वर्षांपुर्वी या बिलाचे स्वागत करणारे फक्त दोघेच द्रष्टे लोक भारतात होते.

समाजस्वास्थकार प्रा.र.धो.कर्वे आणि जे.आर.डी. टाटा. कर्व्यांनी समाजस्वास्थमधून या विषयावर जागृती चालवली होती. त्यांच्यावर सनातन्यांनी अश्लीलतेच्या नावाखाली खटले भरले तेव्हा त्यांचे वकीलपत्र घेऊन बॅरिस्टर बाबासाहेब त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले.

कुंटुंब नियोजन बिल फेटाळले गेले तरी 10 डिसेंबरला [1938] डॉ. बाबासाहेबांनी मुंबईत युवक परिषद घेऊन एकाच अपत्यावर थांबा असा सल्ला युवकांना दिला.

1952 सालच्या निवडणुकीतही आपल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यात त्यांनी कुटूंब नियोजनाचे वचन दिलेले होते.

आजच्या दिवशी त्या द्रष्ट्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आणि त्यांच्या विचारातून देशाला प्रेरणा मिळो हीच सदिच्छा.
- प्रा.हरी नरके

Sunday, June 10, 2018

नाटक! आणि घरात!!- प्रमिती नरके, म.टा.संवाद



पुण्यातील काही तरुण रंगकर्मींनी नुकताच पुण्यात 'रीड मी इन 5D झोन' या नाटकाचा एक अफलातून प्रयोग केला. बंगल्यात मोजक्याच प्रेक्षकांसमोर व्हारांडा, परसदार, गच्ची, घरातली एखादी खोली यांनाच स्टेज करून, वेगवेगळ्या पातळ्यांवर सादर झालेल्या या नाविण्यपूर्ण प्रयोगाविषयी...
......................
'…शेवटी नाटक जिवंत राहिलं पाहिजे', असं अनेक रंगकर्मींना म्हणताना आपण ऐकलं असेल. परंतु एखादी कला, एखादं माध्यम किंवा एखादी जीवनशैली टिकून राहण्यासाठी बदलत्या काळाच्या गरजांनुसार रूढ अर्थाने प्रचलित असणाऱ्या त्याच्या अस्तित्वामध्ये सातत्याने काही बदल घडवणं, आणखी पैलू पडताळून पाहणं आणि शक्यता शोधणं आवश्यक आहे, असं आम्हाला - थिएटर फ्लेमिंगो आणि बडे मुछवाले - मंडळींना वाटतं. आजपर्यंत नाटक करत असताना विषय, मांडणी, फॉर्म, अभिनय शैली या सगळ्याचा वरील संदर्भात विचार करत असतानाच 'How about performing space?' असा एक विचार मनात आला... आणि विनायक कोळवणकर या आमच्या कन्सेप्ट डिझायनर आणि एडिटरने लगेच कामाला सुरुवात केली. आमचा मित्र आणि 'बडे मुछवाले' संस्थेचा संस्थापक अभिनव काफरे याच्या घरी, सिंहगड रोड, पुणे इथे एका दुमजली रो-हाऊसमध्ये, या घराचाच रंगमंच म्हणून वापर करता येईल का असा विचार सुरू झाला.

मग सिंहगड रोडवरची ती सन सिटी सोसायटी, तिथे राहणाऱ्या लोकांचं सोशिओ-इकोनॉमिकल स्टेटस, राहणीमान, जाणिवा काय असतील इथून प्रवास सुरू झाला. या सगळ्याचा अभ्यास करून विनायकने वीस-पंचवीस लहान लहान गोष्टी डेव्हलप केल्या. त्यातल्या निवडक चार गोष्टींमधून मग नाटकाचं कथानक उभं राहिलं. संवाद लिखाणाचं काम अक्षय संतने केलं. त्यानंतर अॅक्टर्स 'इन' झाले.

अॅक्टर म्हणून काम करत असताना सुरुवातीला हे सगळं फारच मजेशीर आणि सोपं वाटलं. ना खोटं वय प्ले करायचं होतं, ना कुठला 'कॅरेक्टर रिसर्च' नावाचा घाट घालायचा होता. वाचनाला सुरुवात झाली तेव्हाच ठरलं की जितकं जास्त नैसर्गिक पद्धतीने बोलता येईल, तसंच आणि तेवढंच बोलायचं-वागायचं. माझ्या पात्राचं नाव जसप्रीत होतं. ही दिल्लीची पंजाबी मुलगी शिक्षणासाठी गेली काही वर्षं पुण्यात स्थायिक असलेली. हिंदी ही माझी जिव्हाळ्याची भाषा असल्यामुळे तोडकं-मोडकं मराठी बोलणारं हे पात्र साकारताना मला फारच जास्त मज्जा आली. पहिला सीन घडतो हॉलमध्ये. त्या घराच्या हॉलची आम्ही अॅक्टर्सनी स्वत:च आमच्या 'बॅचलर्स फ्लॅट'ची लिव्हिंग रूम बनवली. अभिनव नाटकाचं नेपथ्य सांभाळत होता. त्याने आम्हाला हवी तशी त्याच्या घरातल्या फर्निचरची फेरफार - अॅडीशन - सबस्ट्रॅक्शन करू दिली. भिंतीवर ती टिपिकल फेअरी लाइटसची माळ आणि रेड बोर्डवर जसप्रीत आणि नंदिनीच्या आप्तेष्टांचे फोटोग्राफ्स आले. सगळ्यात भन्नाट पार्ट होता या नाटकाचं मंचन आणि आवाज. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी डोक्यात होती की आपण आपल्या घरात ज्या आवाजात बोलतो, जसे वावरतो तसंच सगळं करायचं होतं. वरकरणी पाहता जरी हे सोपं वाटत असलं, तरी आजवर शिकलेल्या, केलेल्या नाटकाच्या सगळ्या नियमांची पाटी स्वच्छ कोरी करून नवीन धडे गिरवायचे होते. 'माझा आवाज प्रेक्षकांपर्यंत जाईल का, माझी पाठ दिसतेय का, माझा अभिनय पोहोचतोय का' हे मुद्देच गायब झाले होते. नवीन चॅलेंज असं होतं की, 'मी फूटभर अंतरावरून 'प्रमिती' न वाटता खरी 'जसप्रीत' वाटतेय का, हे माझं घर वाटतंय का?' अॅक्टरसाठी अवघड गोष्ट असते की अभिनयाच्या मोहाला आवर घालणं आणि तेच आम्हाला एक हजार टक्के करायचं होतं. एक मिनीटसं एक्स्प्रेशन जरी कमी-जास्त झालं तरी ते दिसणार होतं सहज. सो आता 'टू अॅक्ट' विसरून 'टू बी'चा प्रवास सुरू झाला. या फक्त असण्याच्या प्रक्रियेमध्ये साहजिकच संवादांची लीलया मोडतोड झाली. दिग्दर्शकाने तशी पूर्ण मुभा देऊनच ठेवलेली होती. घरातला वावरही प्रत्येक तालमीत वेगळा होऊ लागला आणि डेलीबरेटली तो शेवटपर्यंत कधीच 'ब्लॉक' नाही झाला.

अशाच प्रकारे पुढचे किचनमध्ये, बॅकयार्डमध्ये, जिन्याने वर जाऊन बेडरूममध्ये आणि शेवटी गच्चीवर असे सगळे प्रसंग उभे राहिले.

आणखी एक गंमत अशी की हे सगळं रीयल टाइममध्ये घडत होतं. त्यामुळे पहिल्या सीनमधल्या एखाद्या गोष्टीचा संदर्भ तिसऱ्या सीनमध्ये किंवा चौथ्या सीनचा धागा घेऊन शेवटचा सीन घडायचा असं काहीसं स्ट्रक्चर तयार झालं. त्यात जेव्हा प्रेक्षक 'इन' झाले तेव्हा तर आणखीनच मजा. बऱ्याचदा असं होई की एक-दोन प्रेक्षक तिसऱ्याच सीनमध्ये रमलेत आणि पुढे रीयल टाइमनुसार चौथा सीन सुरू झालाय. ही सगळी गंमत बाहेरून बघताना विनायक, अभिनव आणि मधुराची पण धांदल उडत असणार. मधुरा संपूर्ण नाटकाचं व्यवस्थापन पाहत होती.

तालमींपासून ते प्रयोगांदरम्यान अजूनही काही गोष्टी बदलत होत्या. त्यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जिन्यासमोर लावलेलं एक भलं मोठ्ठं पेंटिंग. सहा बाय नऊच्या पिवळ्या रंगवलेल्या कॅनव्हासवर काही चित्रं, काही गोष्टी रंगवलेल्या, अडकवलेल्या आणि चिकटवलेल्या होत्या. त्यात एक चप्पल, एक अंडं, तीन-चार पक्ष्यांच्या नक्षी असलेल्या फ्रुट-फोर्कच्या रंगीत काड्या, तारेनं बनवलेलं घरटं, चावी, कात्री, कबुतराचं पीस, पेनाचं टोपण, आणखी काही अशाच गोष्टी होत्या. रोज गेल्यावर त्यात काहीतरी बदल झालेला असायचा. रसास्वादाच्या दृष्टीने त्यातून प्रत्येकजण आपला आपला अर्थ घेऊन जात असणार. एक दिवस तर चक्क त्या जागी एक राजा-राणी शृंगार करत बसलेत असं पेंटिंग होतं. त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी अनामिका आणि सचिन - ज्यांचा तिथे सीन घडायचा - त्यांना खूप भरभरून चिडवलं. पण गमतीचा भाग वगळता, खरंच या प्रोसेस दरम्यान दिग्दर्शकाने अशा काही गोष्टी पेरल्या होत्या की ज्यामुळे त्या दिवशीच्या प्रयोगाला एक वेगळीच दिशा प्राप्त होई. एका प्रयोगात तर सीनमध्ये भांडण सुरू असताना खुद्द विनायक दारुड्याचा अवतार करून आमच्यात आला. याची काहीच पूर्वकल्पना नसणारे आम्ही गोंधळून, गलका करून त्या तमाशा करणाऱ्या पात्राला हाकलून लावलं. हे सगळं इतक्या वेगात आणि अविश्वसनीय पद्धतीने घडलं की प्रेक्षकांना तो तालीम केलेला नाटकाचाच भाग असल्यासारखं वाटलं. एका प्रयोगात अचानक दिवे गेले आणि आम्ही मोबाइलचे टॉर्च ऑन करून सीन केला. पाच मिनिटांत लाइटस आले तेव्हा पुन्हा बंद केला आणि सीन सुरू राहिला अगदी तसाच, जसं आपल्या घरात दिवे गेल्यावर जगणं सुरू राहतं तसं. प्रेक्षकांना तोही प्लॅन्ड एलिमेंट वाटला. एका प्रसंगात अचानक वरून पाणी पडतं आणि अनेकदा त्याचे शिंतोडे प्रेक्षकांच्या अंगावर उडत. याचीही सगळ्यांना गंमत वाटे. मुळात आमचा, इथे खरंच हे प्रसंग घडत आहेत असं भासवण्याचा हेतू साध्य होई.

प्रेक्षकांना बसायला आम्ही कुठलीच वेगळी व्यवस्था केलेली नव्हती. त्यामुळे अनेकदा आमच्या मागे, पुढे, शेजारी कुठेही प्रेक्षक बसलेले किंवा उभे असत. त्यानुसार ठरलेल्या (पण कधीच पक्क्या न ठरलेल्या) गोष्टी बदलत जात. याला आम्ही 'Read me in 5D zone' असं नाव देण्यामागची कल्पना हीच होती की आपण सिनेमागृहात 3D, 4D सिनेमे पाहतो. पण त्याहीपुढे जाऊन प्रेक्षकांना जेव्हा गंध, स्पर्श आणि स्वत: मूव्ह होत प्रसंग अनुभवण्याचा डायमेंशन मिळतो, तेव्हा ते आम्हाला कसं वाचतील...…

नाटकाचा सूत्रधार - अक्षय - प्रेक्षकांना बाजूच्या चौकातल्या एका हॉटेलमध्ये भेटायचा. तिथे तुम्ही आता कशा प्रकारे गोष्टी अनुभवणार आहात याबद्दल त्यांना एक हलकीशी कल्पना दिली जायची आणि मग त्यांना घेऊन तो घरात म्हणजेच आमच्या 'रंगमंचीय अवकाशात' प्रवेश करे. इथून पुढचा खेळ प्रेक्षकांना आपल्याला हव्या त्या जागी उभं राहून, बसून, झोपून पाहण्याची गंमत अनुभवता येई. बऱ्याचदा प्रेक्षकांना आपण चोरून बाजूच्या घरात डोकावून पाहतोय की काय असा थ्रिलिंग फील येई, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. ही एक प्रकारे या फॉर्मला मिळालेली पावतीच होती.

या क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांना आम्ही प्रयोगासाठी बोलावलं होतं. सर्वांनी या नावीन्यपूर्ण प्रयोगाचं स्वागत आणि कौतुक केलं. चांगले-वाईट मुद्दे सांगितले. निसटलेले क्षण मिळवून दिले, त्यानुसार आम्ही प्रयोग-दरप्रयोग बदल करत गेलो. त्यामध्ये अमोल पालेकर, संध्या गोखले, अतुल पेठे, अनिरुद्ध खुटवड, मोहीत टाकळकर, उमेश कुलकर्णी असे अनेक मान्यवर होते. एक 'गोड रंगाचे' नाट्य-सिने दिग्दर्शक असं म्हणाले की- 'आमच्या काळात आम्ही नाटक करायचो, तेव्हा अगदी शेवटच्या रांगेतल्या प्रेक्षकांपर्यंत आमची देहबोली आणि आवाज पोहोचतोय की नाही हे बघायचो. तुम्ही आताची पोरं असं खुसुरपुसुर नाटक करताय, पण करा. तुम्हाला काय कोणी स्पर्धक नाही. तुम्ही करत राहा.' मुळात आजच्या प्रेक्षकालाच त्या तथाकथित 'शेवटच्या' रांगेत बसून नाटक बघायचंय का, हा आमचा मुद्दा आहे. रूढ पद्धतीने नाटक करण्यावर आमचं मुळातच प्रेम आहे. हा सगळा घाट जो घातला गेला तो 'अॅमेझॉन' आणि 'नेटफ्लिक्स'च्या प्ले-पॉझ-प्ले खेळणाऱ्या, नवीन जाणिवा, नवीन हुशारीने जगणाऱ्या प्रेक्षकाची नाटकाकडे ओढ निर्माण व्हावी, किंवा टिकून राहावी (जिवंत रहावी) यासाठी! त्यासाठी यातील विषयही तसेच आजच्या जाणिवेचे, बदलत्या पिढीच्या रोजच्या जगण्यातलेच तरीही दुर्लक्षिले जाणारे असे निवडले आणि आमची अशीच इच्छा आहे की हा एवढा प्रचंड रिस्पॉन्स बघता, लवकरात लवकर असे अजून अनेक प्रयोग व्हावेत आणि आम्हाला यातही स्पर्धा निर्माण होऊन आणखी नवीन काहीतरी शोधण्याचं बळ मिळावं! - प्रमिती नरके
Jun 10, 2018, 10:34AM IST Maharashtra Times
म.टा.संवाद, रविवार, दि. 10 जून 2018, पृ. 3
https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/drama-and-the-house/articleshow/64515067.cms

Friday, March 9, 2018

मी कुणाशी नी कधी लग्न करावं ते खासदार ठरवणार?




खा. गोपाळ शेट्टींचं मुलींच्या सज्ञानतेवर आणि आंतरजातीय विवाहावर प्रश्नचिन्ह--

सत्ताधारी पक्षाच्या मुंबईच्या एका खासदारांनी आंतरजातीय विवाहाला विरोध करणारं खाजगी विधेयक लोकसभेत मांडलंय.  त्यांनी मुलींच्या सज्ञानतेवर आणि आंतरजातीय विवाहांवर  प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मुलींनी आईवडीलांच्या पसंतीनुसारच विवाह केला पाहिजे. ते ठरवतील त्याच्याशी लग्न करायचं तर मुलीचं वय18 चालेल.मात्र जर मुलींना स्वतंत्रपणे, आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न करायचं असलं, आपल्या आवडीनिवडीनुसार लग्न करायचं असलं तर मात्र लग्नाचं कायदेशीर वय वाढवून 21 वर्षे करावं.

प्रेमविवाहांबद्दल ते किती तुच्छतेनं बोलत होते.

मुलं - मुली 18 वय पुर्ण करताच मतदार होतात. राज्याचं नी देशाचं सरकार निवडतात.
पण लग्नासाठी मात्र मुलीचंही वय 21 हवं असं म्हणणार्‍या या खासदारांना निवडून देऊन चुक तर केली नाही ना?
त्यांच्या अकलेचं खोबरं झालंय का?

आता खाणं पिणं, लेणं नेसणं याबरोबरच आमचं लग्नाचंही स्वातंत्र्य यांना हिरावून घ्यायचंय.

काय चाललंय काय?
कुठे नेऊन ठेवलाय देश माझा?

मी कुणाशी नी कधी लग्न करावं ते खासदार  कोण ठरवणार?

युवकहो, तुम्हाला हे मान्य आहे?

-प्रा.हरी नरके

..........................

[संदर्भ- एबीपी माझा वाहिनीवरील बातमी व खासदार महोदयांचा बाईट]
http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-legal-consultant-rama-saroday-on-girls-age-issue-519599
नवी दिल्ली : पालकांच्या संमतीशिवाय मुलींच्या लग्नाचं वय 21 करा : भाजप खासदार गोपाळ शेट्टी
Updated 08 Mar 2018 08:48 PM
महिला दिनादिवशीच मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टींनी मुलींच्या सज्ञानतेवर आणि आंतरजातीय विवाहांवर  प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.आई-वडिलांच्या समंतीशिवाय लग्न करायचं असल्यास मुलींसाठी ...]

Wednesday, October 18, 2017

प्रमोद मांडे- एक समर्पित संशोधक


टेल्कोच्या नोकरीतनं मला जी अतिशय अस्सल बावन्नकशी आणि अव्वल प्रतिभावंत माणसं मिळाली त्यात प्रमोदचं स्थान पहिलं होतं. प्रमोदचं जाणं माझ्यासाठी आरपार दु:खद आहे.
प्रमोद 24 तास 365 दिवस गडकिल्ल्यांमध्ये, आकाश दर्शनात आणि इतिहास संशोधनात रमलेला असायचा. आम्ही 21 वर्षे टेल्कोत एकत्र काढली. प्रमोद भीडभाड न ठेवणारा नी अतिशय स्पष्टवक्ता होता. कमालीचा मनस्वी. एखाद्याला स्विकारलं तर त्याच्यावर जीव ऒवाळून टाकायचा. चिडला तर मात्र मग खैर नाही. कोणतीही गोष्ट हात राखून करणं त्याला साफ नामंजूर होतं. आम्ही कंपनीत आठ तासाच्या काळात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा एकत्र गप्पा मारत असू. वाचन, गप्पा, अखंड भ्रमंती हे जगणे. जेवायला जातायेताना तर आम्ही हमखास बरोबर असू. आम्ही दोघेही मुळचे वेल्डर कम गॅस कटर. त्यामुळंच बहुधा इतिहास नी वर्तमान हा भविष्याशी जोडायचा छंद दोघांनाही होता. तो आधी सोमवारात 15 ऑगष्ट चौकात एका खोलीत राहायचा.मी खुपदा त्याच्या घरी जायचो.
प्रमोद पहिल्यांदा शिवसैनिक होता. त्याच्या अतिव आग्रहाखातर मी एकदा त्याच्याबरोबर दसर्‍याला शिवाजी पार्कवरच्या शिवसेनेच्या मेळाव्यातले बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऎकायला सुद्धा गेलो होतो. छत्रपती शिवाजी राजे नी बाळासाहेब हे त्याचे विक पॉईंट.
तो अजमेरा कॉलनीत राहायला आला तेव्हा माझ्या अगदी शेजारच्याच इमारतीत राहायचा. तो नियमितपणे घरी सामना घ्यायचा. एकदा त्याच्या घरी गेलो असताना सामना दिसला नाही. मी म्हटलं कारे बंद केलास की काय सामना? म्हणाला,हो रे. दोन दोन पेपर परवडत नाहीत.
म्हटलं, दोन दोन कशाला घ्यायला हवेत?
तो म्हणला, अरे बाबा, आजकाल सामनातल्या बातम्या खर्‍या की खोट्या ते शोधायला दुसरा पेपर घ्यावा लागतो ना, त्यापेक्षा डायरेक्ट दुसराच घेतलेला काय वाईट?
प्रमोद तसा अतिशय फटकळ. शिवसेनेच्या गारूडातून लवकरच तो बाहेर पडला. शिवरायांच्या प्रेमात मात्र कायम आकंठ बुडालेला राहिला.
18 डिसेंबर 2016 ला त्याच्या वाढदिवसाला मी त्याच्या फेसबुकवर लिहिलं. त्याला शुभेच्छा दिल्या. त्याला किती मनापासून आनंद झाला. तो त्यानं व्यक्तही केला. तो मला "माझा प्राचीन काळापासूनचा मित्र " असं म्हणायचा.
मी लिहिलं होतं, 
"प्रमोद मांडेसर,
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.
जीवेत शरद: शतम!
एक जबरदस्त उत्साही आणि समर्पित माणूस आहेत मांडेसर. लय भारी.
मी त्यांना गेली 38 वर्षे ओळखतो.
तुमच्या बरोबर टेल्कोत शेकडो वेळा मारलेल्या गप्पा आज आठवतात.
सर, तुमच्या स्कुटरवर मागे बसून म.सा.प. निवडणुकीत केलेला प्रचार,प्रवास आठवतो.
करपे वाडा, 15 ऑगष्ट चौक ते अजमेरा कॉलनी येथील त्यांच्या घरी झालेल्या असंख्य भेटी स्मरतात.
बालगंधर्व कला दालनातील त्यांची शहीदांवरील प्रदर्शनं, अभ्यासपुर्ण भाषणं, जोरकस युक्तीवाद यांचा मला लाभ झालाय.
माझ्या अनेक कार्यक्रमांना, भाषणांना आवर्जून उपस्थित राहून त्यांनी दिलेली दाद मला बळ देऊन गेलीय.
किल्ले, ट्रेकिंग, शिवराय, सह्याद्री, तारांगण आदींचे चालतेबोलते विद्यापिठ म्हणजे मांडे सर. त्यांचे लेखन संदर्भमुल्य असलेले भरिव लेखन आहे.
त्यांच्याबरोबर एका साध्याश: ट्रेकला मला यायचंय, अशी इच्छा मी व्यक्त केल्यावर त्यांनी मला ट्रेकला नेले. पावसाळा, अमावस्येची भीषण रात्र, सह्याद्री, जमीन निसरडी आणि माझा पहिला ट्रेक सरांसोबत. लिंगाणा!
केवळ अविस्मरणीय.
चालताना साधारणपणे अडीच हजार वेळा घसरून आपटलो.
पुढची सहा महिने दररोज रात्री झोपलो की लिंगाण्यावरून मी खाली दरीत पडतोय अशी स्वप्नं मला पडत होती.
माझा आयुष्यातला तो पहिला ट्रेक
आणि अर्थातच शेवटचा. [ गंमत सोडा ]
मित्रा, यशवंत झालास, किर्तीवंत झालास. आणखी मोठा हो.
असा मित्र मला मिळाला, ज्याचा मला अभिमान वाटतो."
तेव्हा माहित नव्हतं, हा गडी आपल्याला असं मध्येच सोडून जाणार आहे.
मी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीला उभा होतो. माझा मतदारसंघ खुप मोठा होता. प्रमोद अनेकदा त्याची स्कूटर काढायचा आणि मग त्याच्यासोबत मी प्रचाराला जायचो. मतदारांना भेटून तो ह्याला मत द्यायचं बरं का असं आग्रहानं सांगायचा. त्याचे शेकडो फॅन्स होते. एक माजी खासदार त्याचे चाहते होते. ते पहिलवान होते. स्टार्चचं धोतर, टोपी, कोल्हापुरी चपला, गंधाचा टिळा असा जोरदार मामला. या प्रचारादरम्यान त्यांची अचानक भेट झाली. प्रमोदनं त्यांची माझी ओळख करून दिली. निवडणुक म्हणताच ते म्हणाले, " तुम्ही एक काम करा. मतदारांची मला एक लिस्ट द्या. आपुण त्यांना उचलून डायरेक्ट आमच्या साखर कारखाण्याच्या गेस्ट हाऊसवर नायतर एखाद्या रिसॉर्टवर नेऊन ठेऊ. नरकेसर, काय काळजी करायची नाय. मांडेसाहेबांचे तुम्ही मित्र म्हणल्यावर म्या समदं इलेक्शान हातात घेतो मायला. आपल्याला लई अनुबाव हाय."
प्रमोद म्हणाला, " नाय नाय, तुम्ही यात पडू नका. हे वेगळं प्रकरण आहे. अशानं मामला बिघडून जाईल सगळा." ते नाराज झाले. म्हणाले, " काय राव. परचेसिंग नाय, टेंडर नाय, बजेट नाय असल्या फुसक्या इलेक्षणला तुम्ही लोकांनी उभारलाच कशाला?"
तो माझ्या भाषणांना आवर्जून यायचा. शिवाजी मराठामधल्या एका भाषणात मी शिवरायांच्या काही पत्रांवर बोललो होतो. महाराजांच्या एका पत्रात त्यांनी प्रभावळीच्या सुभेदाराला कसे खडसावले होते त्याचा महत्वाचा पुरावा उपलब्ध आहे त्याची चर्चा केली होती.
"ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो?" असं महाराज सुनावतात हे संदर्भासहीत मी स्पष्ट केलं.
कार्यक्रम संपल्यावर प्रमोद मला म्हणाला, हरी, तू दिलेला संदर्भ बरोबर आहे. पण तुमच्याबाबतीत तुम्ही केवळ ब्राह्मण आहात म्हणून मी कसलीही सवलत देणार नाही, मुलाहिजा, पर्वा करणार नाही असं महाराज का म्हणतात? कारण त्याकाळात सामाजिक, राजकीय जीवनात ब्राह्मण म्हणून विशेष वागणूक मिळत असणार असं तुला वाटत नाही का?"
त्याचं निरीक्षण अतिशय सूक्ष्म असायचं. तो जातीपातीच्या भावनेला मूठमाती दिलेला फार मोठ्या जिंदादिल मनाचा माणूस होता. वक्ता नी इतिहासकार होता.
प्रमोदनं लिहिलेली सगळीच पुस्तकं महत्वाची आहेत-
1. स्वातंत्र्य संग्रामातील अग्निशलाका,
2. गडकिल्ले महाराष्ट्राचे,
3. स्वातंत्र्य संग्रामातील समिधा,
4. स्वातंत्र्य संग्रामातील अंगार,
5. सह्याद्रीतील रत्न भांडार,
6. 111 क्रांतिकारकांचे संक्षिप्त जीवन.
प्रमोदचं वक्तृत्व अमोघ होतं. त्यानं हजारो भाषणं दिली.
अभ्यासकांची,ट्रेकर्सची, गडकिल्ले प्रेमींची पिढी घडवली. त्याला उत्तम स्मरणशक्ती लाभलेली होती. अर्थात सतत किल्ल्यांवर फिरण्यात आणि सह्याद्रीच्या भटकंतीत त्याच्या शरीराची खुप आबाळ झाली. तो बेदरकार असायचा. गडकिल्ले हाच श्वास होता.
माझी मुलगी प्रमिती लहान असताना एकदा प्रमोदसोबत सिंहगडावरील एका मोहिमेत सहभागी झाली होती. प्रमोदनं दाखवलेला किल्ला, रात्री घडवलेलं तारांगण दर्शन, त्याचं चित्रशैलीतलं इतिहास कथन यानं ती इतकी भारावून गेली की तिला त्या कार्यक्रमाच्या आठवणी एव्हढी वर्षे उलटून गेली तरी आजही लख्ख आहेत.
प्रमोद, लगा, तू फार मोठ्या ट्रेकला एकटाच पुढं निघून गेलास हे काय तू बरोबर केलेलं नाय गड्या! हे तुझं वागणं मला अजिबात आवडलेलं नाय!
- प्रा.हरी नरके

Wednesday, September 27, 2017

आणि गायब सरकारचं अस्तित्व ठळकपणे जाणवू लागलं-





2 तास उशीराला ते उशीर मानत नसणार! "समयपर रहना हमारी प्रतिबद्धता है. आमची विमानं कायम वेळेवरच सुटतात." विमानातील हवाईसुंदरी पाठ केलेली वाक्यं कृत्रिमपणे म्हणत होती. तरी बरं विमानाला 2 तास उशीर झालेला होता.
इम्फाळला पोचलो तेव्हा जोरदार पाऊस पडत होता. आता भिजावं लागणार असं वाटत होतं. मात्र चक्क विमान कंपनीचे कर्मचारी प्रत्येक प्रवाशाला छत्री देत होते. इतकं मस्त वाटलं.
आम्ही इम्फाळचा कांगला किल्ला बघायला गेलो होतो. किल्ल्यासमोर ग्रुप फोटो काढावा म्हणून एका युवकाला आमचा फोटो काढतोस का? अशी विनंती केली. तो चक्क लाजला आणि दूर पळाला. मुलींच्या घोळक्यातली एक युवती धीटपणे पुढे आली आणि म्हणाली मी काढते. तिने वेगवेगळ्या अ‍ॅंगलमधून आमचे फोटो काढून दिले. इकडच्या बाजारात विक्रेत्या बहुधा महिलाच असतात. दुकानं, हॉटेल्सही महिलाच चालवतात. महिला निर्भय आणि कष्टाळू आहेत.

ईशान्य भारतात पहाटे 5 वाजताच सुर्य उगवतो. मात्र संध्याकाळी 5 वाजता अंधार पडतो. 6 वाजता सर्व दुकाने, हॉटेल्स अगदी ए.टी.एम.सुद्धा बंद होतात.
मनीपूर, नागालॅंड, मिझोराम ही राज्यं अशांत राज्यं मानली जातात. पावलापावलांवर सीमा सुरक्षा दलाचे जवान हातात मशिनगन्स घेऊन पहारा देताना दिसतात.
हायवेवर तर फारच कडक सुरक्षा असते. हायवे लॅंडस्लाईडिंग, पावसाळ्यामुळं पडलेले दहाबारा फूट आकाराचे प्रचंड खड्डे आणि कापले गेलेले रस्ते यामुळे केवळ पायवाटा बनलेले.
निसर्ग हिरवाकंच आणि शेकडो किलोमीटर सलग साथीला.
सरकार तुमच्या साथीला, अशा पदोपदी केवळ जाहीराती दिसतात. अर्थात सरकारचं अस्तित्व खड्ड्यांमधून जाणवत राहतं. विकासाचे वादे कापले गेलेले रस्ते बोंबलून सांगत असतात.
दर पंचवीस किलोमीटरला हायवेवरील सीमा सुरक्षा दलाच्या चेकपोस्टवर वाहनांची व प्रवाश्यांची नोंदणी करावी लागते. एक मराठी जवान भेटला. म्हणाला, वाहतुक बहुधा बंद आहे. तिकडून गेले तीन दिवस एकही वाहन आलेले नाही. काहीतरी गडबड असावी. आम्हाला परत जाणेही शक्य नव्हते. आमच्या विनंतीवरून त्यानं दहावीस ठिकाणी फोन करून चौकशी केली. कुठे फोन उचलला जात नव्हता तर कुठे माहित नसल्याचं सांगितलं जात होतं.
आम्ही पुढे जायचं ठरवलं. जसं गाव जवळ आलं तसं सीमा सुरक्षा दल, स्थानिक पोलीस सगळे गायब झालेले. प्रशासन, पोलीस, तमाम सरकार गायब. पाचसहा किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या.
चौकशी केली तर गडबड आहे, रस्ता अडवलेला आहे, एव्हढंच उत्तर मिळे. प्रत्येक वाहनचालकाच्या चेहर्‍यावर मुर्तीमंत भिती.
आमचा ड्रायव्हर आसामी होता. गोड आणि कर्तव्यदक्ष युवक. तो म्हणाला, तुम्ही टुरिस्ट असल्यानं तुम्हाला सोडतील.
त्यानं आमची गाडी पुढं काढली आणि गावकर्‍यांनी जिथे रस्ता रोको केलेला होता तिथवर नेली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या झाडांना एक दोरखंड बांधून रस्ता अडवलेला होता. पलिकडं खाटा टाकून महिला बसलेल्या होत्या. " आम्हांला शांतता हवी, निष्पाप महिलांच्या हत्त्या थांबवा" असे फलक त्यांच्या हातात होते. बहुतेक सगळ्या मनीपूरी भाषेत बोलत होत्या. एकदोघांना इंग्रजी, हिंदी येत होतं.
आम्ही त्यांच्याशी बोललो. सीमा सुरक्षा दलानं चकमकीत 3 गावकर्‍यांच्या हत्त्या केल्याचा त्यांचा आरोप होता. त्यात एक गरोदर महिलाही मारली गेलेली असल्यानं गावकरी चिडले होते. त्यांच्याशी बोलणी करायला कोणीही सरकारी अधिकारी 3 दिवस झाले तरी फिरकलेला नव्हता. सरकार नावाची गोष्टच तिथं शिल्लक नव्हती.
"अब तुम्हारे हवाले वतन साथियों," असं सरकार रस्ता बंद करणारांना म्हणत असणार. परिसरातले सरकारी अधिकारी, पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान पळून गेलेले. कोणीही वाली नाही अशी अवस्था. अगतिक रस्ता. असहाय्य प्रवाशी.
आम्ही महाराष्ट्रातून आलोय असं सांगून आम्हाला सोडावं अशी विनंती केली. ते म्हणाले, जोवर पोलीस मारले गेलेल्यांची प्रेतं आमच्या ताब्यात देत नाहीत तोवर आम्ही कोणालाही सोडणार नाही. विशेषत: महिला अत्यंत संतप्त होत्या. किती वेळ लागेल काहीच सांगता येत नव्हतं.
मागं जाणं शक्यच नव्हतं.
आम्ही त्यांच्याशी बोलत राहिलो. त्यांना प्रेतावर अंथरायला दुरवरच्या बाजारातून शाली आणायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी आमची गाडी मागितली. गाडी द्यावी तरी धोका आणि नाही द्यावी तरी संकट होतं.
आम्ही गाडी दिली. ड्रायव्हर आणि संभाजीदादा त्यांच्या सोबत गेले.
आम्हाला बसायला युवकांनी खुर्च्या आणून दिल्या. महिला तावातावानं बोलत होत्या. पोलीस प्रशासनाला बहुधा शिव्या घालत असाव्यात. हजारो ट्रक डायव्हर्स चिडीचूप बसलेले होते. वातावरण अत्यंत तणावग्रस्त आणि स्फोटक वाटत होतं.
संभाजीदादानं त्या तरूणांना चहा, तंबाखू दिला. गप्पा मारतामारता आमची सगळी माहिती सांगितली. आम्ही केवळ गरिब मराठी लेखक आहोत याची त्यांना खात्री पटवून दिली. त्यांनी शाली घेतल्या. तासाभरात आमची गाडी परत आली. त्या गावकर्‍यांनी आमची गाडी पलीकडेच दूर थांबवली. आम्हाला चालतचालत नेऊन गाडीत बसवले आणि तुमच्याशी आमचं भांडण नाही, तुम्ही सुखरूप जा असा आम्हाला निरोप दिला.
आणि आमची सुखरूप सुटका झाली.
मिजोराम, नागालॅंड, अरूणाचल प्रदेशला जाण्यासाठी रितसर इनर लाईन परमिटस काढावी लागतात. आम्ही ती काढून ठेवलेली होती. पोलीसांनी आमची सगळी कागदपत्रे तपासली. परमिट तपासले. सगळे ठीक आहे, मात्र पैसे [लाच] घेतल्याशिवाय आम्ही कोणालाही राज्यात प्रवेश देत नाही असं आम्हाला दरडावलं.
आणि सरकारचं अस्तित्व आम्हाला ठळकपणे जाणवू लागले. याला म्हणतात 66 इंची सरकार.
-प्रा.हरी नरके

Saturday, July 15, 2017

मध्यमवर्गाचे काय झाले?

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय मध्यमवर्गाचा उदय, या वर्गाची स्वातंत्र्यचळवळीतील भूमिका यांविषयी ‘द इंडियन मिडल क्लास’ या पुस्तकातील मांडणीचे परिशीलन या लेखाच्या पूर्वार्धात केले गेले. स्वातंत्र्योत्तर काळात हा वर्ग सुरुवातीला नव्या राष्ट्रबांधणीच्या ध्येयाखाली व नेहरूपर्वातील सरकारी धोरणांमुळे विस्तार पावला. मात्र, १९९० नंतर खासगी क्षेत्राच्या वाढत्या प्रभावामुळे हा वर्ग बाजारपेठेवर अधिकाधिक विसंबला आणि त्याचे वर्गस्वरूपच पालटून गेले. मध्यमवर्गातील या मन्वंतराची चर्चा हे पुस्तक करते..
या लेखाच्या पूर्वार्धात (शनिवारी, ८ जुलै) आपण वसाहतकाळात भारतीय मध्यमवर्गाचा उदय कसा झाला, हे पाहिले. या लेखात आपण स्वातंत्र्योत्तर काळात  मध्यमवर्गाची वाटचाल कशी झाली, हे पाहू या.
‘द इंडियन मिडल क्लास’ या पुस्तकातील मांडणीवरून एक गोष्ट स्पष्ट दिसते, ती म्हणजे, वसाहतकाळापासून निर्माण झालेला मध्यमवर्ग व स्वातंत्र्योत्तर १९९० सालापर्यंतचा नवा मध्यमवर्ग यात थोडासा फरक आहे.  वसाहतकालीन मध्यमवर्गाला दीर्घकाळ वसाहतवाद्यांशी संघर्ष करावा लागला व तो करताना त्याला नव्या राष्ट्राच्या बांधणीची सूत्रेही जनतेसमोर ठेवावी लागली. १९३७ च्या निवडणुकीद्वारे मिळालेली अल्पकालीन सत्ता सोडली तर स्वतंत्र झाल्यावर सगळेच नव्याने उभे करावे लागणार होते. स्वातंत्र्योत्तर मध्यमवर्गावर याचे ओझे होते. पण याच्या चिंतनाची सुरुवात १९४० च्या आसपास झालेली दिसते. या संदर्भातल्या प्रयत्नांचा उल्लेख पुस्तकात आहे. तसेच तत्कालीन ‘बॉम्बे प्लॅन’चाही सविस्तर उल्लेख केला आहे. यातून या वर्गाच्या चिंतनाची दिशा स्पष्ट होते.
पं. नेहरू आणि मध्यमवर्ग
स्वातंत्र्योत्तरकाळातील मध्यमवर्ग आकाराने व विस्ताराने वाढला याचे श्रेय अर्थातच नेहरूंच्या धोरणांना जाते, याची दखल घेऊन भारताच्या विकासातील एकूणच नेहरूपर्वाचा आढावा लेखकांनी घेतला आहे. हा आढावा घेताना कोणत्या गरजांमधून व पर्यायांमधून नेहरूंचे धोरण आकाराला आले, हे मात्र लेखकद्वयांनी नोंदवलेले नाही. ते गृहीत धरूनच विवेचन पुढे जाते. त्यामुळे नेहरूंच्या धोरणांबद्दल आधीच गैरसमज असलेल्यांना या धोरणांमागची परिस्थिती लक्षात येत नाही. सोव्हिएत मॉडेलचे नेहरूंना आकर्षण असले तरी त्यातील व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच त्यांना मान्य नव्हता. संपूर्ण मुक्त अर्थव्यवस्था त्यांना मान्य नव्हती. शिवाय स्पर्धेसाठी इथली खाजगी भांडवलशाही बाल्यावस्थेत होती. उत्पादक शक्तींची ब्रिटिशांनी पूर्ण वाताहत केलेली होती. अशा वेळी ‘राज्यसंस्थे’ (स्टेट) ला पुढाकार घेतल्याशिवाय गत्यंतर नव्हते. नेहरूंनी नेमके तेच केले. म्हणून संमिश्र अर्थव्यवस्था राबवली गेली. बॉम्बे प्लॅनच्या सूत्रधारांनाही हे भान होते. या प्लॅनचा जो तपशील लेखकांनी दिला आहे तो पाहता लोकशाहीच्या चौकटीत राज्याच्या पुढाकाराने आर्थिक नियोजन हाच पर्याय होता व तोच स्वीकारला गेला. इथे राज्याला फक्त औद्योगिकीकरणासाठीच पुढाकार घ्यावा लागला नाही तर शिक्षण, रस्ते, रेल्वे, आरोग्य अशा अनेक पातळ्यांवर पुढाकार घ्यावा लागला. लेखकद्वयांनी म्हटल्याप्रमाणे, स्वातंत्र्योत्तर काळातील मध्यमवर्गाचा विस्तार नेहरूंच्या सार्वजनिक क्षेत्राविषयीच्या धोरणामुळे अधिक झाला. यात खाजगी क्षेत्राचा प्रभाव तुलनेने कमी होता. सरकारी यंत्रणेचा प्रचंड विस्तार झालाच, शिवाय अनेक नव्या संस्था अस्तित्वात आल्या. त्यांचाही हातभार या प्रक्रियेला लागलाच. एकंदरीत १९४७ – १९९० या काळातला मध्यमवर्ग सरकारी धोरणांमुळे विस्तारला. पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, हा विस्तार ‘कल्याणकारी राज्या’च्या (वेल्फेअर स्टेट) चौकटीत, राज्यावलंबी व संरक्षित भांडवलशाहीच्या चौकटीत झाला. अजूनही बाजारपेठ खुली नव्हती. हा मध्यमवर्ग प्रागतिक, लोकशाही, धर्मनिरपेक्षता यांविषयी आस्था असणारा, गरिबांना विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी कल्याणकारी मार्गाचे समर्थन करणारा व सांप्रदायिकता विरोधी होता. त्याचा राष्ट्रवादही प्रागतिक होता. भारताची एक नवी प्रतिमा या वर्गाने उभी केली. मात्र, इथे युरोपातील देशांप्रमाणे मध्यमवर्गीयांतून बळकट नागरी समाज मात्र उभा राहिला नाही. उलट इथला राजकीय वर्गच बळकट राहिला.
नव्वदोत्तर मध्यमवर्ग
१९९० नंतरच्या नवमध्यमवर्गाचे सविस्तर विश्लेषणही लेखकांनी केले आहे. जागतिकीकरणाच्या स्वीकारानंतर आयात – निर्यातीवरची बंधने उठली, परकीय भांडवलावरचे बंधन उठले. बाजारपेठ मुक्त व प्राधान्याची झाली. नियंत्रित अर्थकारण व मुक्त राजकारण याऐवजी आता मुक्त अर्थकारणाने नियंत्रित केलेले राजकारण असा बदल झाला. मुक्त बाजारपेठेमुळे ग्राहकीय अर्थकारणाची चलती सुरू झाली, तर विकासातून राज्याच्या माघारीला सुरुवात झाली. त्याच्या परिणामी खाजगी क्षेत्रात अनेक नवीन उपक्रम सुरू झाले. १९९० पूर्वीचा व नंतरच्या मध्यमवर्गातील फरकाबाबत लेखकांनी केलेली मांडणी मार्मिक आहे. १९९० पूर्वीचा मध्यमवर्ग राज्यसंरक्षित क्षेत्रात वाढला, तर नव्वदोत्तर मध्यमवर्ग राज्याबाहेर स्पर्धात्मक क्षेत्रातील उपक्रमांतून घडला. तो राज्यापेक्षा बाजारपेठेवर (व ग्राहक असण्यावर) जास्त अवलंबून आहे. या फरकामुळे नव्वदोत्तर नवमध्यमवर्गाचे स्वरूपच बदलले. १९९० पूर्वीच्या मध्यमवर्गात दलित – आदिवासी – महिला यांचे प्रमाण कल्याणकारी राज्याच्या चौकटीत योजलेल्या संरक्षक उपायांमुळे वाढत होते. आता राज्यच कमजोर झाल्याने व विकासाच्या संधी राज्यक्षेत्राबाहेर खाजगी क्षेत्राकडे गेल्याने व तिथे संरक्षक उपाय नसल्याने या समाजगटांचे मध्यमवर्गातील प्रमाण फार वाढण्याची शक्यता नाही. हे समाजगट कौशल्य विकासाच्या सर्व संधी पदरात पाडून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे नव्वदोत्तर मध्यमवर्गाच्या  विस्तारातून विषमताही वाढली. हा नवमध्यमवर्ग जुन्या (१९९० पूर्वीच्या) मध्यमवर्गाप्रमाणे ‘सामाजिक’ नाही. राष्ट्रबांधणीचे कोणतेही दडपण त्याच्यावर नाही. त्यामुळे ‘राष्ट्रा’च्या मूलभूत पायाविषयी (धर्मनिरपेक्षता, इ.) त्याला फारशी फिकीर नाही. केवळ विकासाचे भूत त्याच्यावर स्वार आहे. तो स्वत:लाच राष्ट्र मानतो व राजकीय वर्ग, राजकीय प्रक्रिया यांना तुच्छ मानतो. (अण्णा हजारे यांचे आंदोलन आठवावे!) नव्वदोत्तर अर्थकारणाने भारतातील शहरीकरणाचा वेगही वाढत असल्याने मध्यमवर्गाची राजकीय उपस्थितीही ठळक झाली. निर्भया प्रकरण, लोकपाल आंदोलन यांच्यात  ही उपस्थिती दिसली. (पण खरलांजीप्रकरणी मात्र दिसली नाही.) त्यातून या वर्गाचा राजकीय आत्मविश्वास व अहंकारही वाढला. लेखकद्वयांनी म्हटल्याप्रमाणे, या नवमध्यमवर्गात दलित, आदिवासी यांचा भरणा तुलनेने कमीच आहे. स्त्रियांचा सर्व क्षेत्रांत वावर वाढला, पण पुरुषप्रधान चौकटीला धक्का लागला नाही. आजही मोठमोठय़ा कंपन्यांच्या महिला सीईओ ‘आपण घर सांभाळूनही महत्त्वाची पदे सांभाळतो’, असे अभिमानाने सांगतात तेव्हा आश्चर्य व खेदही वाटतो.
अधिकाधिक उपभोगाची पातळी, वाढते उत्पन्न, भौतिक गोष्टींचे आकर्षण व वस्तूंची मालकी, उपभोगवादी पर्यटन ही नव्या मध्यमवर्गाची वैशिष्टय़े आहेत. त्याशिवाय हा वर्ग – लेखकांनी म्हटल्याप्रमाणे- उदारीकरणाचा समर्थक, संरक्षक उपायांचा विरोधक, अनुदानांचा विरोधक, केवळ मेरिटचा आग्रह धरून सामाजिक न्यायाकडे दुर्लक्ष करणारा, राज्याच्या संकोचाचा आग्रह धरणारा असा आहे. म्हणूनच नव्वदोत्तर काळात विकासाचा दर वाढला, मध्यमवर्गाचा विस्तार वाढला, आकार वाढला, उपभोगाचे भान वाढले, (राहणीमान व जीवनशैलीत मूलगामी फरक झाला) तरीही विषमतेचे प्रमाण वाढले, असा निष्कर्ष लेखकांनी काढला आहे. याशिवाय या वर्गाचे वर्तन माध्यमांनी अधिकाधिक नियंत्रित केले आहे. बहुतांशी जाहिरातींचे ‘टारगेट’ हा मध्यमवर्गच आहे, हे लेखकद्वयांचे निरीक्षण याचीच साक्ष देते. मात्र हाही वर्ग एकसंध नाही, त्यात अनेक फळ्या आहेत. यातील राखीव जागांच्या आधारावर आलेला वर्ग त्यामुळेच ‘राज्य’विरोधी आंदोलनांपासून बाजूला राहतो. कारण त्याला आजही मुक्त अर्थव्यवस्थेत आपल्याला न्याय मिळेल असे वाटत नाही. राज्याच्या संरक्षित क्षेत्रातच त्याचे प्रमाण वाढू शकते. अर्थात, यालाही भविष्यकाळात किती वाव राहील याची शंकाच आहे.
नवमध्यमवर्ग व ‘ओळख’
मध्यमवर्गातील प्रदेशनिहाय वैविध्य विकासातील असमतोलानुसार वेगवेगळे रूप धारण करते. प्रादेशिक पक्ष हे याचेच एक रूप. याचा चांगला ऊहापोह लेखकांनी केलेला आहे. तसेच वैविध्यांचे अस्मिताजन्य संघटनेत रूपांतरण होण्याविषयीची चर्चाही पुस्तकात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण अजूनही दुर्लक्षणीय नाही व खाजगी क्षेत्रातील रोजगार धिम्या गतीने (व तंत्रज्ञानावलंबी धोरणांमुळे) वाढतो आहे, हे लेखकांचे निरीक्षण लक्षात घेता विविध प्रांतांतील या गटांना राखीव जागा का हव्यात याचा उलगडा होतो. त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील दलित – आदिवासी कर्मचारी स्वत:ची वेगळी ‘ओळख’ (Identity) का जतन करतात, याचाही उलगडा लेखकांनी केला आहे. या समूहांतील व्यक्ती कितीही ‘वर’ गेली तरी तिची ‘अचीव्हमेंट’ व्यक्तीची न पाहता त्या त्या समूहाच्या सक्षमीकरणाच्या अंगाने त्याकडे पाहिले जाते. याचे दडपण या व्यक्तींवर असतेच. त्यामुळे आपापल्या जातसमूहाला, कुटुंबाला मदत करणे त्यांना आपले कर्तव्य वाटते. परिणामी ‘व्यक्ती’ म्हणून त्या कितीही कर्तृत्ववान असल्या तरी त्यांची ‘ओळख’ जुनीच राहते.  याचे वर्णन ‘प्रायमसी ऑफ कम्युनिटी आयडेन्टिटी ओव्हर क्लास आयडेन्टिटी’ असे लेखक करतात.
नव्वदोत्तर नव्या मध्यमवर्गाच्या बाहेर (व्याख्येनुसार) असणाऱ्या एका मोठय़ा गटाचा उल्लेख लेखकद्वयांनी ‘मध्यमवर्गाकांक्षी’ (Aspirational Middle  class) असा केला आहे. तुटपुंज्या उत्पन्नावर असंघटित विभागात पडेल ते काम करणारा हा वर्ग मोबाइलचा वापर करणारा, जीवनशैलीत बदल झालेला, इंग्रजी शिक्षणाच्या शाळेत मुले घालणारा असा आहे. केवळ उत्पन्नाच्या व सामाजिक दर्जाअभावी तो मध्यमवर्गीय म्हणता येत नाही, पण त्याची आकांक्षाही सोडत नाही. या नव्या मध्यमवर्गाच्या विस्तारावर भविष्यात संकोच पावण्याची वेळ येण्याची शक्यता दिसते. याचे मुख्य कारण म्हणजे, खाजगी क्षेत्राच्या पायावर या नव्या वर्गाची भरभराट झाली असली तरी रोजगाराची शाश्वती नाही. एक अस्थिरता या सर्वाना व्यापून आहे. त्याचबरोबर जगभरची आताची तंत्रज्ञानाची दिशा लक्षात घेता ‘स्वयंचलित’ (ऑटोमेशन) उद्योगांकडे वाटचाल चालू आहे. काम न करताच किमान उत्पन्न देण्याचे मनसुबे जाहीर होताहेत. हे तंत्रज्ञान माणसांनाच ‘डिलीट’ करणारे आहे. हे लक्षात घेता, आजचे ‘मध्यमवर्गीय’ उद्याचे ‘आकांक्षी मध्यमवर्गीय’ होऊ शकतात याची जाण ठेवायला हवी.
या अकादमिक पद्धतीच्या पुस्तकात आकडेवारी, अहवाल व इतर अभ्यास यांची विपुलता आहे. पण काही घटना – ज्या राजकीय प्रवाहांचे प्रतिनिधित्व करतात – त्यांचा मात्र अभाव आहे. कदाचित अकादमिक चौकटीत हे बसत नसावे. उदा. आज मोठय़ा प्रमाणावर मध्यमवर्ग ग्राहकीय पद्धतीने वागत आहे व नव्या धर्मसदृश संप्रदायांच्या आहारी जातो आहे. सामाजिक सुधारणांबाबत तटस्थ भूमिका घेत आहे. (शनिशिंगणापूर व तत्सम घटना आठवाव्यात.) पं. नेहरूंनी आपल्या आत्मचरित्रात याच वर्गातून फॅसिझमची बीजे पेरली जातील असे म्हटले होते, त्याची आज आठवण होते. आजचे सामाजिक – धार्मिक – सांस्कृतिक वास्तव फॅसिझमचे आहे व राजकीय लोकशाहीशी ते विसंगत आहे याची जाण मध्यमवर्गात दिसत नाही, कारण विकास व रोजगारापुढे हा वर्ग बाकी सारे क्षुद्र मानतो. राजकीय प्रक्रिया व राजकीय वर्गावर त्याचा विश्वास नाही. एखाद्या कल्याणकारी हुकूमशहाच्या शोधात तो दिसतो. यात लोकशाहीचा बळी जाण्याचा धोका आहे, हे वेळीच ओळखले पाहिजे. अर्थात, याला अपवाद आहेत, पण ते अपवादच. थोडक्यात, आजचा मध्यमवर्ग सामाजिकतेकडून वैयक्तिकतेकडे, अभावग्रस्तांकडून चंगळवादाकडे, सामाजिक न्यायाकडून  करिअरकडे असा प्रवास करतोय याची जाणीव या पुस्तकातून स्वच्छपणे होते. अभ्यासक व कार्यकर्त्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे, वाचलेच पाहिजे असे आहे.
http://www.loksatta.com/athour-mapia-news/the-indian-middle-class-book-by-surinder-jodhka-1511955/
‘द इंडियन मिडल क्लास’- किशोर बेडकिहाळ | लोकसत्ता शनिवार दि. July 15, 2017

‘द इंडियन मिडल क्लास’
लेखक : सुरिंदर एस. जोधका / असीम प्रकाश
प्रकाशक : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
पृष्ठे : २३२, किंमत : २९५ रुपये
(समाप्त)
किशोर बेडकिहाळ kishorbedkihal@gmail.com

Thursday, April 20, 2017

मौनाचा कट?

समाजाच्या संवेदना आरपार बधीर झाल्यात काय?
शीतल वायळनं बापाकडं हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून आत्महत्त्या केली. प्रसार माध्यमांनी थोडी चर्चा केली. नवे विषय पुढे येताच हा विषय मागे पडला.
मध्यंतरी म्हैसाळच्या घटनेत मुलींची गर्भातच अवैध हत्त्या करण्याचा विषय पुढे आला, थोडी चर्चा झाली, मग तोही मागे पडला.
खरा प्रश्नाय तो हा की अशावेळी लोकमानस का हलत नाही? का ढवळत नाही?
स्त्रीप्रश्न, [लिंगभाव] वर्ग, जात, पर्यावरण, कुटुंबनियोजन अशा अनेक बाबतीत समाजमन बधीर का?
या मुद्द्यांवर प्रमुख राजकारणी, जाणते नेते, त्यांचे चेलेचपाटे साधी प्रतिक्रियासुद्धा देत नाहीत. राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर असे विषय नसतातच. यावर काम करणारांना कसलीही राजकीय प्रतिष्ठा नाही असं परवा डॉ. नीलम गोर्‍हे या शिवसेनेच्या प्रवक्त्या एका वाहिनीवर जाहीरपणे म्हणाल्या.
कोपर्डीची घटना निषेधार्ह आणि संतापजनक होती. धिक्कारार्हच होती. त्याबाबत समाजमन चवताळून उठलं, हे योग्यच झालं, पण मग सोनई, खर्डा, निमखेडी, मलकापूर, बुलडाणा, मनिषा हिंगणे अशी हत्त्याकांडं नी शीतल वायाळ आत्महत्त्या झाली तेव्हा समाज का संतापत नाही?
कुटुंब नियोजन, आर्थिक विषमता, हुंडा, सोकॉल्ड ऑनर किलींग, पर्यावरणाचे प्रश्न यावर बहुजन मौन बाळगतात आणि जात, लिंगभाव, वर्गीय विषमता यात बुद्धीवाद्यांना रस नाही.
अशा प्रश्नांवर बोलायचीही त्यांची तयारी नसेल तर अवघड आहे. हा आप्पलपोटेपणाय की सोयिस्कर स्विकारलेला शहामृगी पवित्राय?
अवघा समाज एव्हढा बथ्थड का बरं झाला असावा?
@ प्रा. हरी नरके

Monday, April 3, 2017

अभिनेता जितेंद्र

अभिनेता जितेंद्र 7 एप्रिलला वयाची 75 वर्षे पुर्ण करीत असताना त्याला आपल्या पहिल्या चित्रपटाची नक्कीच आठवण येत असणार.
व्ही. शांताराम हे अतिशय नामवंत निर्माते आणि प्रतिभावंत दिग्दर्शक. त्यांनी जितेंद्रला ’गीत गाया पत्थरोने’ या चित्रपटात सर्वप्रथम नायकाची भुमिका दिली.
त्यासाठी त्याला लेखी करार करावा लागला. त्याला मानधन म्हणून एकुण 20 हजार रूपये देण्यात आले. या करारानुसार पुढील 3 वर्षे त्याला इतर संस्थेच्या चित्रपटात काम करता येणार नव्हते.
जितेंद्रचा ’गीत गाया पत्थरोने’ हा पहिलाच चित्रपट खुप गाजल्यामुळे जितेंद्रला प्रचंड मागणी आली. एक निर्माता त्याला एका चित्रपटासाठी 1 लाख रूपये द्यायला तयार झाला. जितेंद्र व्ही. शांताराम यांना भेटला. परवानगी द्यावी अशी त्यानं विनंती केली. त्याबदल्यात व्ही.शांताराम यांच्याकडून मिळालेली सर्वच्या सर्व रक्कम म्हणजे 20 हजार रूपये त्यांना परत करायची त्याने स्वत:हून तयारी दाखवली.
व्ही.शांताराम हे व्यवहाराच्या बाबतीत अतिशय काटेकोर आणि कठोर होते. त्यांनी जितेंद्रला एका अटीवर परवानगी द्यायची तयारी दाखवली.
ते म्हणाले, " तुला मिळणार्‍या रकमेतले 20 हजार रुपये तू घे आणि उर्वरित 80 हजार रूपये माझ्या कंपनीच्या खात्यात आणून भर."
जितेंद्रला ही अट मान्यच करावी लागली.

खिसेकापूला फाशी

नगरात होणार्‍या चोर्‍या आणि पाकीटमार्‍यांना आळा घालण्यासाठी महाराजांनी अतिशय कडक पावलं उचलायचं ठरवलं.
त्यांनी जाहीर केलं की यापुढं खिसेकापूला जाहीरपणे भर चौकात फाशी देण्यात येईल. हजारो लोकांपुढे गुन्हेगाराला फाशी दिली की सगळ्यांना जरब बसेल. पुन्हा कुणीही खिसा कापण्याची हिंमत करणार नाही. 
मोठा गाजावाजा करून एका खिसेकापूला हजारो लोकांसमोर फाशी देण्यात आली.
त्या गर्दीचा फायदा घेऊन 16 जणांचे त्याठिकाणी खिसे कापले गेल्याचं कार्यक्रम संपल्यावर दाखल झालेल्या तक्रारींवरून महाराजांना कळलं. सतरावे खुद्द महाराजच होते.

सनातनी केशवराव विचारे

तरूणपणी केशवराव विचारे कमालीचे सनातनी होते. तासंतास देवपुजा, व्रतवैकल्यं आणि नवससायास यात बुडून जायचे.
सत्यशोधक भास्करराव जाधव हे गावोगाव, शिक्षणाचं महत्व सांगणारी भाषणं करायचे.
ते अंधश्रद्धांवर टिका करायचे. अडाणीपणा, लाचखोरीवर तुटून पडायचे.
जुन्या विचारांची काही मंडळी त्यांच्यावर चिडून असायची. भास्करराव आपल्या देवाधर्माला शिव्या देतात, त्यांना कायमचा धडा शिकवा, त्यांचा आवाज बंद पाडा, असा अपप्रचार त्यांनी चालवला होता. भास्कररावांची सभा उधळून लावायची, त्यांना मारहाण करायची आणि तरिही नाहीच ऎकलं तर त्यांना ठारच मारायचं असा प्लॅन केशवराव विचारे व त्यांच्या मित्रांनी आखला.
केशवराव व त्यांचे पंधरावीस पहिलवान मित्र तयारीनिशी भास्कररावांच्या कार्यक्रमाला गेले.
भास्कररावांनी त्यांच्या भाषणात देवाधर्माला पहिली शिवी दिली की त्यांच्यावर हल्ला करायचा असं केशवरावांनी सर्वांना सांगून ठेवलं होतं.
भास्करराव अतिशय विद्वान होते. संपुर्ण मुंबई राज्यात ते मॅट्रीकच्या व पदवी परीक्षेत पहिले आलेले होते.
त्यांचं भाषण अतिशय रंगलं. भाषण संपलं.
केशवराव त्यांना भेटायला गेले. म्हणाले, " तुम्ही तर आमच्या देवाधर्माला शिवीगाळ करता असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. आज काय विसरलात काय शिव्या द्यायला?"
भास्करराव म्हणाले, " मी आजवर कधीच शिवीगाळ केलेली नाही. करणार नाही. ज्यांच्याकडं विचार नसतात, ते शिवीगाळ करतात. मला काय गरज शिवीगाळीची?"
केशवराव विचारे त्या दिवसापासून सत्यशोधक झाले.

एल्फिन्स्टन आणि स्वातंत्र्य

माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि स्वातंत्र्य
माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन हा मुंबई प्रांताचा गवर्नर असताना त्याचा एक ब्रिटीश मित्र त्याला भेटायला गेला. संध्याकाळची वेळ होती.
मित्राची अपेक्षा होती की एल्फिन्सटन आपल्याला पेयपान देईल. पण तसं काही झालं नाही. एल्फिन्सटन लेखन करण्यात व्यस्त होता.
मित्रानं विचारलं, " एव्हढं काय लिहितोयस?"
"पाठयपुस्तकं लिहितोय, भारतीय मुलांसाठी." एल्फिन्स्टन म्हणाला.
मित्र नाराज झाला. "भारतीय लोक रानटी आहेत. त्यांना अजिबात शिकवू नये. तसं केल्यास ते जागृत होतील आणि स्वातंत्र्य मागतील. आपल्याला हा देश सोडून जावं लागेल."
एल्फिन्स्टन म्हणाला, " तुझं खरंय."
"अरे मग कशाला शिकवायचं आपण त्यांना? आहेत तसेच अज्ञानी आणि गुलामीत राहू देत सडत."
एल्फिन्स्टन म्हणाला, "मित्रा, स्वातंत्र्य हे असं मूल्य आहे की जन्माला आलेला प्रत्येक माणूस स्वातंत्र्य मागणारच. फरक एव्हढाच आहे की शिकला तर माणूस लवकर स्वातंत्र्य मागेल. अर्थात नाही शिकला तरी एक ना एक दिवस उशीरा का होईना पण माणूस स्वातंत्र्य मागणारच."
एल्फिन्स्टन पुढं म्हणाला, "आपण भारतीयांना शिकवतोय त्यात आपलाच फायदा आहे. माणसं अडाणी असतील तर त्यांच्यावर जास्त काळ राज्य करता येईल, पण जेव्हा ती उठाव करतील तेव्हा ती तुझ्यामाझ्या वंशजांना तलवारीनं कापून काढतील आणि आपण त्यांना शिकवलं तर ते जा म्हणून नक्कीच सांगतील पण ते तोंडानं आपल्या वंशजांना चले जाव म्हणून सांगतील."
.................

गरिबीचा प्रश्न सुटत नाहीत-

भिक आणि मदतीतून गरिबीचा प्रश्न सुटत नाहीत-
शरद जोशींनी 11 भुमिहिनांना प्रत्येकी अडीच एकर सरकारी जमिन स्वप्रयत्नांनी मिळवून दिली. त्यांनी सामुदायिक शेती करावी यासाठी जोशींनी त्यांना तयार केले. बॅंक अधिकारी विहीरीसाठी आवश्यक ते कर्ज द्यायला तयार झाले. बांधबंदिस्तीचे सर्व साहित्य शासकीय योजनेतून मोफत द्यायला सरकारी अधिकारी तयार झाले. मात्र त्यांनी एक अट घातली. त्या 11 कुटुंबांनी मजुरी स्वत: करावी. शरद जोशी स्वत: त्यांच्यासोबत राबायला तयार झाले. प्रत्येक कुटुंबातून किमान दोघांनी व शरद जोशी अशा 23 जणांनी शेतावरच राहायला जायचे, दिवसभर काम करायचे व तिथेच राहायचे ठरले. दुसर्‍या दिवशी सकाळपासून कामाला सुरूवात करायचा निर्णय झाला.
दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे निघून 40 किलोमीटर स्कूटर ताबडीत जोशी शेतावर पोचले तेव्हा एकही जण आलेला नव्हता. तास दोनतास वाट बघून जोशी स्वत: घरोघर फिरले. कसीबशी 22 ऎवजी अवघी 9 माणसं हाती लागली, त्यांना जीपमध्ये घालून जोशी शेतावर घेऊन गेले. जोशी स्वत: अंग मोडून कामाला लागले. सर्वांनी शेतातले दगडगोटे दिवसभर जमा केले. संध्याकाळी सगळ्यांनी कंदीलाच्या उजेडात भाकरी खाल्ल्या. जेवन झाल्यावर दोघांनी काहीतरी अडचणी काढल्या आणि आम्ही रात्रीचे आता घरी जातो, पण उद्या सकाळी प्रत्येक घरातल्या दोघांना पकडून सोबत घेऊन येतो असं सांगून ते निघून गेले.
उरलेले जोशींसोबत त्या उघड्या माळरानावर झोपले.
सकाळी उठून जोशी परत कामाला लागले. प्रत्यक्षात रात्री परत गेलेले तर गेलेच पण नवा कोणीही शेतातल्या कामाकडे फिरकला नाही. दरम्यान गावात कोणीतरी वारल्याचं कळताच कामावरचे सगळेच गावात पळाले. त्यांच्या त्या सामुदायिक शेतीवर घाम गाळायला एकटे शरद जोशी शिल्लक राहिले होते. 11 पैकी एकालाही जमिन कसण्यात रसच नव्हता. मिळालेली जमिन गिर्‍हाईक मिळालं की विकायची आणि भुमिहिन बनून नविन जमिन मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा यातच ते गुंतले होते. दरम्यान शरद जोशींचे पदरचे 2 हजार रूपये यात खर्च झाले होते.
.................
[अंगारवाटा, शोध शरद जोशींचा,भानू काळे,उर्मी प्रकाशन,पुणे,डिसेंबर 2016, पृ.96 ते 98]

Tuesday, March 28, 2017

जेआरडी टाटा यांचा विमानप्रवास

जेआरडी टाटा यांचा विमानप्रवास
जेआरडी टाटा एअर इंडीयाचे चेअरमन होते. एकदा त्यांना कलकत्त्याला जायचे होते. ते बोर्डींग पास घेत असतानाच एक प्रवासी धावतपळत आला. त्याला अर्जंट कलकत्त्याला जायचं होतं. विमानात तर एकही जागा शिल्लक नव्हती. जेआरडींनी आपले तिकीट कॅन्सल केले आणि ते त्या प्रवाशाला द्यायला लावले. त्यानं जाताना जेआरडींचे खुपखुप आभार मानले.
काऊंटरवरचा कर्मचारी जेआरडींना म्हणाला, "सर, तुम्ही तिकीट रद्द करून त्यांना का दिले?"
जेआरडी म्हणाले, "अरे ते संघानिया नावाचे उद्योगपती आहेत. त्यांची आई आजारी आहे. तिला भेटायला तातडीनं कलकत्त्याला पोचणं आवश्यक होतं त्यांना. माझं काय मी नंतरच्या फ्लाईटनं गेलो तरी चालण्यासारखं आहे. शिवाय मी चेअरमन असल्यानं मला तिकीट मोफत आहे. पण ते पैसे भरणार होते. तेव्हा गरजू ग्राहकाला प्राधान्य द्यायचं हे नेहमी लक्षात ठेव."
.............
एकदा जेआरडी दिल्ली-मुंबई फ्लाईटनं प्रवास करीत होते. ते स्वच्छता गृहात जाऊन बराच वेळ झाला म्हणून हवाई सुंदरीला काळजी वाटली. चेअरमन आहेत, शिवाय म्हातारं माणूस आहेत. तेव्हा बघितलेलं बरं म्हणून तिनं जाऊन दरवाजावर टकटक केलं.
जेआरडींनी दरवाजा उघडला, तिनं पाहिलं, त्यांच्या हातात कापडाचे रूमाल होते, ते नीट लावून ठेवत होते.
ते तिला, म्हणाले, "हे बघ ग्राहकांसाठी ठेवलेले हे सगळे रूमाल खाली पडले होते. ते खराब झाले असते ना. म्हणून मी ते परत उचलून ठेवत होतो."
ती संकोचून म्हणाली, "अहो, तुम्ही कशाला असलं हलकं काम करताय? मला सांगायचंत, मी केलं नसतं का?"
जेआरडी म्हणाले," एकतर तू कामात होतीस. आणि काम कोणतंही हलकं वगैरे नसतं. मी चेअरमन असलो तरी शेवटी या कंपनीचा मीही एक भाग आहे, तेव्हा माझ्या घरचं काम करण्यात कसला आलाय कमीपणा?"
...............

दिलीपकुमारचा विमानप्रवास

सुपरस्टार दिलीपकुमारचा विमानप्रवास
अभिनेता दिलीपकुमार लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाचा काळ होता. एके दिवशी त्याला मुंबईचे शूटींग संपवून संध्याकाळच्या फ्लाईटने दिल्लीला 
जायचे होते. सामान्यपणे विमान कोणासाठीही थांबवून ठेवले जात नाही, परंतु खुद्द कॅप्टन आणि विमानातले सगळेच कर्मचारी दिलीपकुमारचे फॅन होते. आणि दिलीपकुमारची इंट्री झाली. सगळ्यच प्रवाशांनी त्याचे जोरदार स्वागत केले. त्यानं सर्वांना अभिवादन केलं.
बिझनेस क्लासमध्ये तो बसला तेव्हा त्याच्या लक्षात आलं आख्खं विमान आपल्याकडं बघतय. मात्र शेजारच्या म्हातार्‍याला त्याची काहीच खबर नव्हती. तो पेपर वाचत बसला होता.
दिलीपकुमारनं मुद्दामच उठून खाली बसताना तोल गेला असं दाखवत म्हातार्‍याला धक्का मारला. पेपरमधून डोकं बाहेर काढत म्हातारा दिलीपकुमारकडं बघून हसला आणि परत पेपर वाचू लागला. हा अपमान दिलीपकुमारला फारच झोंबला. बघून परत पेपर वाचत बसतो काय? त्यानं पुन्हा तसंच केलं. म्हातार्‍याकडं बघत सांगितलं, "मी सुपरस्टार दिलीपकुमार."
ते वृद्ध गृहस्थ अतिशय नम्रतेनं म्हणाले, " हो का. धन्यवाद. बाय दे वे काय करता आपण?"
दिलीपकुमार म्हणाला, " तुम्ही सिनेमे पाहात नाही?"
ते म्हणाले, "नाही हो, मी या वयात फक्त अठराच तास काम करू शकतो. अनेक वर्षांपुर्वी मी शाळेत असताना माझ्या आईसोबत एक बघितला होता. तोच एकमेव."
दिलीपकुमारचा इगो दुखावला गेला. " तुम्ही आहात तरी असे कोण?"
ते वृद्ध अतिशय आपुलकीनं म्हणाले, " तरूण मुला, माझं नाव जे. आर. डी. टाटा. मी एक सामान्य उद्योजक आहे."

दोन तर्‍हा

दोन तर्‍हा
एक नेते पहिल्यांदा जेव्हा राज्यमंत्री झाले, तेव्हा ते मलबार हिलवर एका मोठया पदावरील व्यक्तीला भेटायला गेले. सोबत एक मोठा हार. 2 किलो पेढे, शाल असा सगळा जामानिमा घेऊन ते गेले होते. त्यांनी नेत्यांना हार घातला, शाल पांघरली, पेढे दिले, म्हणाले, "साहेब तुमच्या आशीर्वादानं आज मला हे राज्यमंत्रीपद मिळालं." त्यांनी आभार वगैरे मानले.
सरकारी बंगला असल्यानं प्रोटोकाल म्हणून आता चहा येईल, मग चहा येईल अशी वाट बघितली, पण चहा काही आला नाही.
शेवटी त्यांनी चुळबूळ करून बघितली. आणि मग हिय्या करून म्हणाले, "साहेब आम्ही निघावं का आत्ता?"
तेव्हा ते साहेब शांतपणे म्हणाले, "अहो, तुमचं काम 15 मिनिटांपुर्वीच संपलेलं आहे, तरीही तुम्ही का बसलाय मला माहित नाही. निघा आता, मलाही पुण्याला जायचंय मुलाला भेटायला."
......................
एका केंद्रीय मंत्र्यांच्या सेक्रेटरींचा दिल्लीहून फोन आला.
"अमूकतमूक विषयावर मंत्री महोदयांना तुमच्याकडून काही माहिती हवीय. दिल्लीला भेटायला येऊ शकाल का?"
मी म्हटलं, "मला आवडलं असतं, पण मी आज परदेशात चाललोय. महिना भरानं परत येईन, तेव्हा ठरवू या भेटायचं. चालेल ना?"
ते मंत्रीमहोदयांना विचारून सांगतो म्हणाले.
महिनाभरानं त्यांचा परत फोन आला. म्हणाले," स्वत: मंत्रीमहोदयच पुणे दौर्‍यावर येत आहेत. कधी भेटू शकाल?"
वेळ, ठिकाण सारं निश्चित झालं.
ठरल्याप्रमाणे मी आपली स्कूटर दामटत क्विन्स गार्डनच्या सरकारी विश्राम गृहावर गेलो. तिकडे सामसूम होती.
सामान्यपणे केंद्रीय मंत्री येतात तेव्हा त्यांचा लवाजमा, बडेजाव फार मोठा असतो.
मला वाटलं, बहुधा मंत्र्यांचा दौरा रद्द झाला असणार.
तरीही आलोच आहोत तर स्वागत कक्षात चौकशी करावी म्हणून गेलो. तिथले कर्मचारी डुलक्या घेत होते. मी विचारलं, तर म्हणाले, "मंत्री आलेत. वर एक नंबर व्ही आय पी कक्षात आहेत."
वर जाऊन मी बेल वाजवली. पायजमा, बनियानमध्ये खुद्द मंत्र्यानीच दरवाजा उघडला. स्वागत केलं. चहा विचारला. तेच स्वत: चहा घेऊन आले. मग चहा घेता घेता आमच्या गप्पा झाल्या. ते छोटी वही हातात घेऊन टिपणं घेत होते.
केंद्रीय मंत्री इतका साधा असू शकतो?
एका खासदारांच्या पादुका प्रसादाची साता उत्तराची कहाणी सध्या देशभर गाजत असल्यानं हा अनुभव सहज आठवला.