Thursday, June 21, 2018

प्लॅस्टीक बंदी, पर्यावरण, रोजगार आणि महागाई



परवापासून म्हणजे 23 जूनपासून राज्यात संपुर्ण प्लॅस्टीक बंदी अंमलात येणारेय म्हणे.
प्लॅस्टीक पर्यावरणासाठी घातक असल्यानं त्याच्यावर सरसकट बंदी घालण्याच्या क्रांतिकारी निर्णयाचे जाहीर स्वागत.

प्रख्यात उद्योगपती शंतनूराव किर्लोस्कर यांचं भाषण कॉलेजात भाषण ऎकल्यानं एक खेडूत तरूण अतिशय प्रभावित झाला. नोकरी करायची नाही. उद्योजकच व्हायचं असा त्यानं निर्धार केला.

घरच्या जमीनीचा तुकडा विकून त्यात्नं त्यानं पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीत कारखाण्यासाठी जागा विकत घेतली.
बॅंकेकडं कर्ज प्रकरण केलं. कारखान्याचं बांधकाम अर्ध्यावर असतानाच सिमेंट परवान्याचा शासकीय निर्णय आला.
सिमेंट टंचाई वाढली. काळाबाजार वाढला.
बांधकाम बंद पडलं.

कर्जफेडीसाठी बॅंकेचा तगादा सुरू झाला.

खूप पायपीट करूनही प्रश्न काही सुटेना.

चपला फाटलेल्या, कपडे मळलेले, दाढी वाढलेली अशा स्थितीत हा तरूण सिमेंटसाठी वणवण भटकत होता.

आता आत्महत्त्या करण्याशिवाय पर्याय नाही अशा निर्णयाला तो आला.

त्यावेळचे मुख्यमंत्री एका कार्यक्रमासाठी पुण्यात आलेले होते. 40 वर्षांपुर्वी आजच्यासारखी सिक्युरिटीची भानगड नव्हती. शेवटचा प्रयत्न करायचा. यश आलं तर ठीक नाहीतर मुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन करायचं म्हणून हा तरूण थेट त्यांना जाऊन भेटला.

मुख्यमंत्री ग्रामीण भागातले होते. त्याच्याकडे बघताच त्यांचं काळीज चरकलं.

आस्थेवाईकपणे त्यांनी त्याची विचारपूस केली. त्याच्या भागाची खडानखडा माहिती सीएमना होती. त्याच्या गावातल्या प्रमुख मंडळींबाबतची माहिती विचारून पोरगा खरंच गरजू आहे याची त्यांनी खात्री करून घेतली. त्याला चहा दिला.

" पोरा, काळजी करू नकोस, मी तुला सिमेंट परवाना देतो. मोठा उद्योजक बन. अनेक तरूणांना रोजगार दे," असं ते म्हणाले.
तरूण सुखावला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं.

" किती पोती सिमेंट हवं?" सीएमनी विचारलं.
हिशोब करून तरूण म्हणाला, "सतरा पोती."

सीएम नी पीएला बोलावलं. "या पोराला सतरा हजार सतरा पोत्यांचं परमीट दे," असा आदेश दिला.
पोरगा हादरला. सतरा हजार नको, फक्त सतरा पोती द्या म्हणाला.

सी एम म्हणाले, "अरे बाळा, सतरा पोती तू वापर. उरलेली सतरा हजार खुल्या बाजारात विक. खूप जास्त पैसे घेऊ नकोस. तुझ्यासारख्याच गरजूंना सिमेंट दे. चारपाच रूपये पोत्यामागं ते तुला खुषीनं देतील. ते घे. बॅंकेचं कर्ज फेडून टाक. कारखाना वाढवित ने. निदान दोनतीन हजार पोरापोरींना रोजगार दे."

तरूणाने त्यांचे पाय धरले.

त्यानं बॅंकेचं कर्ज फेडलं.

प्लॅस्टीकचा कारखाना काढला.

फिलीप्स रेडीओ कंपनीनं पहिली खूप मोठी ऑर्डर दिली. फिलिप्स गेली तरी कामाचा व्याप वाढत गेला. उत्पादनं वाढत गेली.

इमानदारीनं उद्योग करीत त्या तरूणानं एकाचे चार कारखाने केले. आज त्याच्याकडे तीनेक हजार कामगार काम करतात.

शासनानं रातोरात प्लॅस्टीक बंदीचा सुलतानी फतवा काढला.
चारही कारखाण्यातले बहुसंख्य कामगार बेकार झाले.

त्या सीएमचा फोटो देव्हार्‍यात ठेवणार्‍या या उद्योगपतीनं आता काय करावं?
मुख्य म्हणजे त्याच्या बेकार झालेल्या कामगारांनी काय करावं? प्लॅस्टीक बंदीचं स्वागत करावं, दुसरं काय करू शकतात ते?

प्लॅस्टीक बंदीला माझा किंचितही विरोध नाही. सरसकट आणि 100% बंदीला आहे. प्रश्न फक्त पद्धतीचा आहे. आर्थिक व्यवहार, प्लॅस्टीकचा सर्वव्यापी वापर, रोजगार आणि महागाई याबाबत काही आक्षेप आहेत, प्रश्न आहेत. त्याची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत.

सरकारने प्लॅस्टीकच्या दुष्परिणामांबद्दल शाळा-महाविद्यालयातून शिक्षण का केले नाही? प्लॅस्टीक साक्षरता निर्माण न करता सरसकट बंदीची घोषणा करणे हे पोरकट पाऊल आहे. लोक प्लॅस्टीक का वापरतात? लोक निसर्गाचे शत्रू आहेत म्हणून? की प्लॅस्टीक अतिशय स्वस्तात, सहज आणि मुबलक उपलब्ध आहे म्हणून? आज औषधे, बिस्किटे, चॉकलेट, अन्नपदार्थ, दूध, पाणी, आदी सार्‍यांची रॅपर्स  प्लॅस्टीकची असतात. ती सगळी बाद करणं व्यवहार्य आहे? शक्य आहे?

अमूकमुक्त तमूक मुक्त असली दिवास्वप्नं पाहणारांची डोकी खरंच ठिकाणावर आहेत का? 100 % प्लॅस्टीक मुक्ती अशक्य नी अनावश्यक आहे. जे प्लॅस्टीक रिसायकल होते, ज्याचा पुनर्वापर होतो त्यावर बंदी कशाला? केवळ निवडणूक फंडाची सोय व्हावी म्हणून?
 
लोकशिक्षण, प्रबोधन, टप्प्याटप्प्याने बंदीचे पाऊल उचलून करायची लोकजागृत हे काहीही न करता गझनीस्टाईलनं केलेली ही बंदी यशस्वी होईल की बुमरॅंग होईल?

1. हा निर्णय खरंच अंमलात येणारेय की संबंधितांना मलिदा मिळवून देण्यासाठी उगारलेला हा दट्ट्या आहे? म्हणजे कायद्याप्रमाणं दंड पाच हजार. प्रत्यक्षात 2500 द्या. पावती न घेता सुटका करून घ्या.

त्याऎवजी प्लॅस्टीकवर टप्प्याटप्प्याने जबरदस्त कर बसवा. ते इतके महाग करा की त्याची खरेदी करणं आणि त्याचे उत्पादन करणे परवडणार नाही. आपोआप प्लॅस्टीकचा वापर कमी होईल. ज्याचा पुनर्वापर करता येत नाही अशा पातळ पिशव्या आदी प्लॅस्टीकवर मात्र बंदी घाला. मात्र संपुर्ण प्लॅस्टीकमुक्ती हे दिवास्वप्न आहे.

2. हा निर्णय खरंच व्यवहार्य आहे का?
पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, दुधाच्या पिशव्या, दुकानात, विमानात आणि हॉटेलात केला जाणारा प्लॅस्टीकचा वारेमाप वापर प्रत्यक्षात थांबला तर त्या जागी कागदाचा वापर होणार म्हणजे त्यासाठी पुन्हा झाडांची अतिरिक्त कत्तल होणार. हे निसर्गाची, पर्यावरणाची हानी करणारं नाही?

3. या बंदीमुळे संबंधित वस्तूंच्या किंमती वाढणार. नोटाबंदीचा आत्मघातकी निर्णय, जीएसटी आणि पेट्रोल- डिझेल दरवाढीनं आधीच होरपळलेला सामान्य माणूस प्लॅस्टीक बंदीच्या निर्णयामुळे होणार्‍या महागाईत आणखी गाळात जाणार नाही काय?

4. आधीच प्रचंड बेरोजगारी असलेल्या देशात यातनं आणखी बेरोजगारी वाढेल, आहेत त्यांच्या नोकर्‍या जातील आणि त्यांच्या पोटावर पाय येईल, य कामगारांचं पुनर्वसन करणार की त्यांनी आत्महत्या करायच्या? भर पावसाळ्यात बंदी येणार, म्हणजे गळणार्‍या झोपड्यांवर घातलेले प्लॅस्टीक कागद हटवायचे आणि पावसात भिजायचे. किती भारी!

टप्प्याटप्प्याने उत्पादन कमी करीत नेले असते व 40 वर्षे अस्तित्वात असलेला हा उद्योग पुनर्वसित केला असता तर बंदी अधिक प्रभावी ठरली असती.
- प्रा.हरी नरके

..................

Tuesday, June 19, 2018

मीही माझ्या वडीलांचा एक फोटो काढला असता-



माझ्याकडे माझ्या वडलांचा फोटोसुद्धा नाही. ते गेले तेव्हा आमची गरिबी इतकी होती की ते खुप आजारी असताना त्यांना दवाखाण्यात न्यायला किंवा औषधे आणायलाही पैसे नव्हते. फोटो कुठून काढणार?

त्यांचा आजार खूप वाढला तेव्हा वेदनेने ते कळवळायचे. त्या वेदना खूप वाढल्या की त्यांना गुंगी यायची किंवा ते बेशुद्ध पडायचे. त्यांच्या पोटात खूप दुखत असायचं. चक्कर यायची आणि दोन शब्द बोलले तरी दम लागायचा.

त्याकाळात ते आमच्या झोपडीत न राहता मोकळ्या आभाळाखाली शेतातल्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली राहायचे. बहुधा आपल्या सततच्या कण्हण्यामुळे, भयंकर वेदनांमुळे आपल्या छोट्या लेकरांना त्रास व्हायला नको, किंवा शेतात खुल्या आभाळाकडं बघत मोकळ्या हवेत त्यांना बरं वाटत असावं म्हणून असेल.

सकाळ, दुपार, संध्याकाळ मी त्यांच्यासाठी शेतात भाकरी घेऊन जायचो. मला शेतातल्या साप, विंचू यांची भिती वाटायची. एकदा भाकरी घेऊन जाताना मला विंचू चावला होता. तेव्हा खूप दुखलं होतं. मी दिवसभर रडत होतो.

बाबा, गोधडीवर मलूल पडलेले असायचे. त्यांना जेवन जातच नसे. आंघोळ करण्याइतकं त्यांच्या अंगात त्राण नसायचं. मग मी विहीरीतनं पाणी काढून फडक्यानं त्यांचं अंग पुसून द्यायचो.

त्यांच्या वेदना फारच वाढल्या की कधीतरी ते खिशातून दहा किंवा वीस पैसे काढून माझ्याकडे द्यायचे. मी औषधाच्या दुकानात जाऊन क्रोसिनच्या गोळ्या आणून त्यांना द्यायचो.

ससूनला जायला आई, वडील दोघेही घाबरायचे. तिकडे सरकारी डॅाक्टर गरिबाला "ढोस" देऊन मारून टाकतात असं त्यांना सांगण्यात आलेलं होतं. खाजगी डॅाक्टर परवडणं शक्यच नव्हतं. आई पहाटेपासून संध्याकाळपर्यंत कुठेकुठे राबायची तेव्हा झोपडीतली चूल पेटायची.
परीक्षेला जाताना मी त्यांच्या पाया पडलो तेव्हा ते काहीतरी पुटपुटले. " चांगली शाळ शिक. पास हो. तुझा निकाल येईपर्यंत मी असेन की नाही मला माहित नाही," असं ते म्हणत होते असं आई म्हणाली.
ते तिथेच झाडाखालीच गेले. अकाली गेले. वयाच्या 50 च्या आतच.

ते गेले तेव्हा मी इतका लहान होतो की आई रडली म्हणून मी रडलो. तोवर मी मृत्यू पाहिलेला नव्हता.

वडील म्हटलं की मला नेहमी फक्त एव्हढंच आठवतं. बाकी आठवणी काही नाहीतच.

पुढे बरे दिवस आले तोवर ते जगले असते तर मीही त्यांचा एक फोटो काढला असता.

-प्रा.हरी नरके

Monday, June 18, 2018

सत्यशोधक महान पंडीत डॉ. आ.ह. साळुंखे अमृत महोत्सव सोहळा


या भव्य ऎतिहासिक सोहळ्यातील भाषणात मी मांडलेल्या मुद्यांचा सारांश-

1] 11 मे 1888 ला मुंबईतल्या हजारो कष्टकर्‍यांनी जोतीराव फुले यांच्या सत्कारार्थ आयोजित केलेल्या सोहळ्याची मला आज आठवण होते. या सामान्य माणसांनी जोतीरावांना महात्मा ही पदवी दिली. डॉ. आ.ह. साळुंखे यांचे गेल्या 55 वर्षातले चौफेर आणि अफाट कार्य पाहता त्यांना आपण "सत्यशोधक महान पंडीत" हा सन्मान बहाल करायला हवा.

2. "धर्मशास्त्राचा इतिहास" हा महाग्रंथ लिहिल्याबद्दल पां.वा.काणे यांना "भारत रत्न" हा सर्वोच्च सन्मान बहाल करण्यात आला. डॉ. आ.ह. साळुंखे यांनी गेली 55 वर्षे अपार व्यासंग आणि संशोधनाद्वारे लिहिलेल्या 53 ग्रंथांमधून धर्मशास्त्र, संस्कृती, इतिहास यांच्या क्ष्रेत्रात फेरलेखन करून नवा अन्वयार्थ लावून ज्ञानाची नवनिर्मिती केलेली आहे. याबद्दल "भारत रत्न" हा सन्मान त्यांच्याकडे चालत यायला हवा होता.

3. निवडणुक काळात ज्यांना बहुजनांची आठवण येते त्यांचेच राज्यात 15 वर्षे आणि केंद्रात 10 वर्षे सरकार होते. त्यांनी हे का केले नाही?

4. एका सत्कार सोहळ्यात एक महानेते म्हणाले, साळुंखे सरांच्या पायावर डोके ठेवावेसे वाटते. आता डोके ठेवणारांनी आपली सत्ता असताना गेल्या 15 वर्षात डॉ. आ.ह. साळुंखे यांनी तयार केलेले राज्याचे सांस्कृतिक धोरण का लागू केले नाही?

5. एका जातीला टार्गेट करून राजकीय सत्ता मिळवता येत असेलही, पण सामाजिक परिवर्तन नाही करता येत. सगळ्याच जातीत चोर आहेत नी भली माणसंही आहेत.

6. साळुंखेसर फक्त बहुजनांचे नाहीत ते समग्र भारताचे आहेत. त्यांना छोटं करू नका.

7. ज्यांनी त्यांना कधीही कुलगुरू केले नाही, डी.लीट दिली नाही, त्यांची पुस्तकं विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाला लावली नाहीत, त्यांचे प्रेम खरे आहे की निव्वळ राजकीय, ते तपासले पाहिजे.

8. डॉ. आ.ह. साळुंखे यांचे अनंत पैलू मला भावतात. प्रतिभावंत संशोधक, धर्मशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, शिस्तबद्ध प्रशासक, कुटुंबवत्सल, निसर्गप्रेमी, प्रवासात रमणारा आणि सामान्य माणसात खुलणारा, अतिशय हळवा, संवेदनशील, कोवळ्या मनाचा, आरपार विनयी, सहृदय भला माणूस.

सरांना 125 वर्षांचे उदंड आयुरारोग्य लाभो.
-प्रा.हरी नरके

Thursday, June 14, 2018

लढाई सांस्कृतिक वर्चस्वाची की मतबँकेची?





ज्यांच्या क्रांतिकारी विचारांनी आणि चळवळींनी आधुनिक भारत घडला त्यात महात्मा फुले अग्रणी असूनही त्यांची पगडी हे विद्वत्तेचं प्रतिक का नाही मानायची?

आपल्या देशात प्रतिकात्मकेतेला असाधारण महत्व आहे. इथल्या निवडणुका पक्षांच्या चिन्हांवर लढवल्या जातात. 1952 साली तर म्हणे फक्त पक्षाचे निवडणूक चिन्ह असायचे, उमेदवार कोण, त्याचे/तिचे नाव काय याला काहीच महत्व नव्हतं.

ही प्रतिकं सांस्कृतिक वर्चस्व आणि मतबॅंकाच्या अनुनयाची साधनं बनलेली आहेत.

पेशवाई पगडी हे विद्वत्तेचं प्रतिक आहे असं सांगितलं जातं. शिवाजीराजांच्या नातवानं जी पेशवाईची वस्त्रं दिली त्यात ती पगडी होती म्हणे. आजकाल तिचा उल्लेख पुणेरी पगडी असा केला जातो. पाहुण्यांचा सत्कार करताना ती देण्याची पद्धत आहे. पहिले काही पेशवे पराक्रमी होते. पण दुसरा बाजीराव हासुद्धा विद्वत्तेचं प्रतिक?

लोकमान्य टिळक, गो.कृ. गोखले, न्या. रानडे, आगरकर हे पगडी घालायचे. प्रत्यक्षात या प्रत्येकाच्या पगड्या वेगवेगळ्या होत्या असं लोकमान्यांचे नातू जयंतराव टिळक यांनी लिहिलय. हे सगळे मान्यवर आदरणीय आहेत. वंदनीय आहेत. त्यांच्याबद्दल सर्वदूर आदर आहे. आपुलकी आहे.

पण आज जी वापरली जाते ही एकच पगडी सगळ्या पुणेकरांनी स्विकारावी ही सक्ती का?

हे नेमके ठरवले कोणी? कधी ठरवले? कोणाला विचारून किंवा विश्वासात घेऊन ठरवले? की जे आमचे ते सर्वांनी आपोआपच नी निमुटपणे स्विकारायचे असते?

महात्मा जोतीराव फुले पुण्याचेच होते. तरी त्यांची पगडी मात्र पुणेरी नाही, असं का?

एका सांस्कृतिक छावणीने सारे काही ठरवायचे, बळजबरीने सर्वांवर लादायचे आणि तेच अंतिम असल्याचे सांगायचे दिवस गेले आता मालक.

ज्यांच्या क्रांतिकारी विचारांनी आणि चळवळींनी आधुनिक भारत घडला त्यात महात्मा फुले अग्रणी असूनही त्यांची पगडी हे विद्वत्तेचं प्रतिक का नाही मानायची?

एका विशिष्ट जातीच्या संघटनेचे पदाधिकारी वाहिन्यांवर सांगत होते, पुणेरी पगडीच्या ऎवजी फुले पगडी घातल्याने तमाम पुणेकरांचा अपमान झाला. माफी मागितली पाहिजे.

हे तमाम पुणेकर नेहमी एका विशिष्ट वर्गाचे, जातीसमाजाचेच का असतात? त्यात समावेशकता का नसते? इतरांची प्रतिकं बहिष्कृत करणं हीही विद्वत्ताच असणार!

अशा पद्धतीने फुलेपगडी जाहीरपणे नाकारून आपण स्त्री, शूद्रातिशूद्र नवजागृत घटकांचा अपमान करतोय याची जाणीवही ह्या "पुण्याच्या मालकांना" कशी असत नाही?

मुळात हा फुले प्रेमाचा अगर पुणेरी पगडीच्या अपमानाचा विषयच नाहीये.

तुम्ही आम्हाला मतं देत होतात, आम्ही मनपा, राज्य, केंद्रात सत्तेत होतो तोवर गेल्या 50 वर्षात शंभरदा तुमची पगडी मिरवली ना आम्ही डोक्यावर?

दादोजी, भांडारकर, रायगडवरचा वाघ्या कुत्रा, राम गणेश गडकरी, गोब्राह्मण प्रतिपालक की बहुजन प्रतिपालक?, पगड्यांचं राजकारण हे सारे निवडणुका जिंकण्याचे फंडे आहेत याला आमचा नाविलाज हाये.

हे अगदी नकळत, सहज घडतं. त्यावेळी आमच्या मनात जात पात अजिबात नसते. उलट जातपात नष्ट्च झाली पायजेलाय असं आम्ही रात्रंदिन सांगत असतो.

आजवर डोक्यावर पेशवाई पगडी आणि तोंडात "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असा गजर करीत, आम्हाला सामाजिक अभियांत्रिकी साधावी लागली.
आजवर डोक्यावर पेशवाई पगडी आणि तोंडात "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असा गजर करीत, आम्हाला सामाजिक अभियांत्रिकी साधावी लागली.
हर बातका एक टायमिंग होता हैं भिडू. हर एक अ‍ॅक्शन पोलीटिकली करेक्ट होना मांगताय की नय?
मुळात करार तुम्हीच मोडलात. तुम्हाला सांस्कृतिक सत्ता आणि आम्हाला राजकीय सत्ता असं आपलं वाटप ठरलेलं होतं! तुम्ही आम्हाला आताशा मतं देणार नसाल तर तुमची पगडी आम्ही का मिरवावी? मग आम्ही टोपी, पगडी फिरवणारच ना?

आम्ही तुमची पगडी बाद केली तर आमचं काय चुकलं?

पेशव्यांना ही वस्त्रं ज्यांनी दिली त्यांच्याच विद्यमान वंशजांनी म्हणजे दस्तुरखुद्द आम्हीच ती काढून घेतली तर सगळं कसं रितीप्रमाणेच झालं नाही का?

"ते" पगडीमुळे खुश होणार असतील तर एकुण सौदा स्वस्तात पटतोय, असं नाही का तुम्हाला वाटत?

त्यांच्या मतबॅंकेची आपल्याला सक्त गरजाय.

जे आमचे मांडलिक राहतील त्यांचीच पगडी तुमच्या आमच्या डोक्यावर असेल, हा निकाल आम्हाला घेतला पायजेलाय!

शेवटी हे राजकारणाय.
आणि तुम्हाला तर माहिताय आपण 24* 365 राजकारणी आहोत.
....................................

Sunday, June 10, 2018

नाटक! आणि घरात!!- प्रमिती नरके, म.टा.संवाद



पुण्यातील काही तरुण रंगकर्मींनी नुकताच पुण्यात 'रीड मी इन 5D झोन' या नाटकाचा एक अफलातून प्रयोग केला. बंगल्यात मोजक्याच प्रेक्षकांसमोर व्हारांडा, परसदार, गच्ची, घरातली एखादी खोली यांनाच स्टेज करून, वेगवेगळ्या पातळ्यांवर सादर झालेल्या या नाविण्यपूर्ण प्रयोगाविषयी...
......................
'…शेवटी नाटक जिवंत राहिलं पाहिजे', असं अनेक रंगकर्मींना म्हणताना आपण ऐकलं असेल. परंतु एखादी कला, एखादं माध्यम किंवा एखादी जीवनशैली टिकून राहण्यासाठी बदलत्या काळाच्या गरजांनुसार रूढ अर्थाने प्रचलित असणाऱ्या त्याच्या अस्तित्वामध्ये सातत्याने काही बदल घडवणं, आणखी पैलू पडताळून पाहणं आणि शक्यता शोधणं आवश्यक आहे, असं आम्हाला - थिएटर फ्लेमिंगो आणि बडे मुछवाले - मंडळींना वाटतं. आजपर्यंत नाटक करत असताना विषय, मांडणी, फॉर्म, अभिनय शैली या सगळ्याचा वरील संदर्भात विचार करत असतानाच 'How about performing space?' असा एक विचार मनात आला... आणि विनायक कोळवणकर या आमच्या कन्सेप्ट डिझायनर आणि एडिटरने लगेच कामाला सुरुवात केली. आमचा मित्र आणि 'बडे मुछवाले' संस्थेचा संस्थापक अभिनव काफरे याच्या घरी, सिंहगड रोड, पुणे इथे एका दुमजली रो-हाऊसमध्ये, या घराचाच रंगमंच म्हणून वापर करता येईल का असा विचार सुरू झाला.

मग सिंहगड रोडवरची ती सन सिटी सोसायटी, तिथे राहणाऱ्या लोकांचं सोशिओ-इकोनॉमिकल स्टेटस, राहणीमान, जाणिवा काय असतील इथून प्रवास सुरू झाला. या सगळ्याचा अभ्यास करून विनायकने वीस-पंचवीस लहान लहान गोष्टी डेव्हलप केल्या. त्यातल्या निवडक चार गोष्टींमधून मग नाटकाचं कथानक उभं राहिलं. संवाद लिखाणाचं काम अक्षय संतने केलं. त्यानंतर अॅक्टर्स 'इन' झाले.

अॅक्टर म्हणून काम करत असताना सुरुवातीला हे सगळं फारच मजेशीर आणि सोपं वाटलं. ना खोटं वय प्ले करायचं होतं, ना कुठला 'कॅरेक्टर रिसर्च' नावाचा घाट घालायचा होता. वाचनाला सुरुवात झाली तेव्हाच ठरलं की जितकं जास्त नैसर्गिक पद्धतीने बोलता येईल, तसंच आणि तेवढंच बोलायचं-वागायचं. माझ्या पात्राचं नाव जसप्रीत होतं. ही दिल्लीची पंजाबी मुलगी शिक्षणासाठी गेली काही वर्षं पुण्यात स्थायिक असलेली. हिंदी ही माझी जिव्हाळ्याची भाषा असल्यामुळे तोडकं-मोडकं मराठी बोलणारं हे पात्र साकारताना मला फारच जास्त मज्जा आली. पहिला सीन घडतो हॉलमध्ये. त्या घराच्या हॉलची आम्ही अॅक्टर्सनी स्वत:च आमच्या 'बॅचलर्स फ्लॅट'ची लिव्हिंग रूम बनवली. अभिनव नाटकाचं नेपथ्य सांभाळत होता. त्याने आम्हाला हवी तशी त्याच्या घरातल्या फर्निचरची फेरफार - अॅडीशन - सबस्ट्रॅक्शन करू दिली. भिंतीवर ती टिपिकल फेअरी लाइटसची माळ आणि रेड बोर्डवर जसप्रीत आणि नंदिनीच्या आप्तेष्टांचे फोटोग्राफ्स आले. सगळ्यात भन्नाट पार्ट होता या नाटकाचं मंचन आणि आवाज. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी डोक्यात होती की आपण आपल्या घरात ज्या आवाजात बोलतो, जसे वावरतो तसंच सगळं करायचं होतं. वरकरणी पाहता जरी हे सोपं वाटत असलं, तरी आजवर शिकलेल्या, केलेल्या नाटकाच्या सगळ्या नियमांची पाटी स्वच्छ कोरी करून नवीन धडे गिरवायचे होते. 'माझा आवाज प्रेक्षकांपर्यंत जाईल का, माझी पाठ दिसतेय का, माझा अभिनय पोहोचतोय का' हे मुद्देच गायब झाले होते. नवीन चॅलेंज असं होतं की, 'मी फूटभर अंतरावरून 'प्रमिती' न वाटता खरी 'जसप्रीत' वाटतेय का, हे माझं घर वाटतंय का?' अॅक्टरसाठी अवघड गोष्ट असते की अभिनयाच्या मोहाला आवर घालणं आणि तेच आम्हाला एक हजार टक्के करायचं होतं. एक मिनीटसं एक्स्प्रेशन जरी कमी-जास्त झालं तरी ते दिसणार होतं सहज. सो आता 'टू अॅक्ट' विसरून 'टू बी'चा प्रवास सुरू झाला. या फक्त असण्याच्या प्रक्रियेमध्ये साहजिकच संवादांची लीलया मोडतोड झाली. दिग्दर्शकाने तशी पूर्ण मुभा देऊनच ठेवलेली होती. घरातला वावरही प्रत्येक तालमीत वेगळा होऊ लागला आणि डेलीबरेटली तो शेवटपर्यंत कधीच 'ब्लॉक' नाही झाला.

अशाच प्रकारे पुढचे किचनमध्ये, बॅकयार्डमध्ये, जिन्याने वर जाऊन बेडरूममध्ये आणि शेवटी गच्चीवर असे सगळे प्रसंग उभे राहिले.

आणखी एक गंमत अशी की हे सगळं रीयल टाइममध्ये घडत होतं. त्यामुळे पहिल्या सीनमधल्या एखाद्या गोष्टीचा संदर्भ तिसऱ्या सीनमध्ये किंवा चौथ्या सीनचा धागा घेऊन शेवटचा सीन घडायचा असं काहीसं स्ट्रक्चर तयार झालं. त्यात जेव्हा प्रेक्षक 'इन' झाले तेव्हा तर आणखीनच मजा. बऱ्याचदा असं होई की एक-दोन प्रेक्षक तिसऱ्याच सीनमध्ये रमलेत आणि पुढे रीयल टाइमनुसार चौथा सीन सुरू झालाय. ही सगळी गंमत बाहेरून बघताना विनायक, अभिनव आणि मधुराची पण धांदल उडत असणार. मधुरा संपूर्ण नाटकाचं व्यवस्थापन पाहत होती.

तालमींपासून ते प्रयोगांदरम्यान अजूनही काही गोष्टी बदलत होत्या. त्यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जिन्यासमोर लावलेलं एक भलं मोठ्ठं पेंटिंग. सहा बाय नऊच्या पिवळ्या रंगवलेल्या कॅनव्हासवर काही चित्रं, काही गोष्टी रंगवलेल्या, अडकवलेल्या आणि चिकटवलेल्या होत्या. त्यात एक चप्पल, एक अंडं, तीन-चार पक्ष्यांच्या नक्षी असलेल्या फ्रुट-फोर्कच्या रंगीत काड्या, तारेनं बनवलेलं घरटं, चावी, कात्री, कबुतराचं पीस, पेनाचं टोपण, आणखी काही अशाच गोष्टी होत्या. रोज गेल्यावर त्यात काहीतरी बदल झालेला असायचा. रसास्वादाच्या दृष्टीने त्यातून प्रत्येकजण आपला आपला अर्थ घेऊन जात असणार. एक दिवस तर चक्क त्या जागी एक राजा-राणी शृंगार करत बसलेत असं पेंटिंग होतं. त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी अनामिका आणि सचिन - ज्यांचा तिथे सीन घडायचा - त्यांना खूप भरभरून चिडवलं. पण गमतीचा भाग वगळता, खरंच या प्रोसेस दरम्यान दिग्दर्शकाने अशा काही गोष्टी पेरल्या होत्या की ज्यामुळे त्या दिवशीच्या प्रयोगाला एक वेगळीच दिशा प्राप्त होई. एका प्रयोगात तर सीनमध्ये भांडण सुरू असताना खुद्द विनायक दारुड्याचा अवतार करून आमच्यात आला. याची काहीच पूर्वकल्पना नसणारे आम्ही गोंधळून, गलका करून त्या तमाशा करणाऱ्या पात्राला हाकलून लावलं. हे सगळं इतक्या वेगात आणि अविश्वसनीय पद्धतीने घडलं की प्रेक्षकांना तो तालीम केलेला नाटकाचाच भाग असल्यासारखं वाटलं. एका प्रयोगात अचानक दिवे गेले आणि आम्ही मोबाइलचे टॉर्च ऑन करून सीन केला. पाच मिनिटांत लाइटस आले तेव्हा पुन्हा बंद केला आणि सीन सुरू राहिला अगदी तसाच, जसं आपल्या घरात दिवे गेल्यावर जगणं सुरू राहतं तसं. प्रेक्षकांना तोही प्लॅन्ड एलिमेंट वाटला. एका प्रसंगात अचानक वरून पाणी पडतं आणि अनेकदा त्याचे शिंतोडे प्रेक्षकांच्या अंगावर उडत. याचीही सगळ्यांना गंमत वाटे. मुळात आमचा, इथे खरंच हे प्रसंग घडत आहेत असं भासवण्याचा हेतू साध्य होई.

प्रेक्षकांना बसायला आम्ही कुठलीच वेगळी व्यवस्था केलेली नव्हती. त्यामुळे अनेकदा आमच्या मागे, पुढे, शेजारी कुठेही प्रेक्षक बसलेले किंवा उभे असत. त्यानुसार ठरलेल्या (पण कधीच पक्क्या न ठरलेल्या) गोष्टी बदलत जात. याला आम्ही 'Read me in 5D zone' असं नाव देण्यामागची कल्पना हीच होती की आपण सिनेमागृहात 3D, 4D सिनेमे पाहतो. पण त्याहीपुढे जाऊन प्रेक्षकांना जेव्हा गंध, स्पर्श आणि स्वत: मूव्ह होत प्रसंग अनुभवण्याचा डायमेंशन मिळतो, तेव्हा ते आम्हाला कसं वाचतील...…

नाटकाचा सूत्रधार - अक्षय - प्रेक्षकांना बाजूच्या चौकातल्या एका हॉटेलमध्ये भेटायचा. तिथे तुम्ही आता कशा प्रकारे गोष्टी अनुभवणार आहात याबद्दल त्यांना एक हलकीशी कल्पना दिली जायची आणि मग त्यांना घेऊन तो घरात म्हणजेच आमच्या 'रंगमंचीय अवकाशात' प्रवेश करे. इथून पुढचा खेळ प्रेक्षकांना आपल्याला हव्या त्या जागी उभं राहून, बसून, झोपून पाहण्याची गंमत अनुभवता येई. बऱ्याचदा प्रेक्षकांना आपण चोरून बाजूच्या घरात डोकावून पाहतोय की काय असा थ्रिलिंग फील येई, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. ही एक प्रकारे या फॉर्मला मिळालेली पावतीच होती.

या क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांना आम्ही प्रयोगासाठी बोलावलं होतं. सर्वांनी या नावीन्यपूर्ण प्रयोगाचं स्वागत आणि कौतुक केलं. चांगले-वाईट मुद्दे सांगितले. निसटलेले क्षण मिळवून दिले, त्यानुसार आम्ही प्रयोग-दरप्रयोग बदल करत गेलो. त्यामध्ये अमोल पालेकर, संध्या गोखले, अतुल पेठे, अनिरुद्ध खुटवड, मोहीत टाकळकर, उमेश कुलकर्णी असे अनेक मान्यवर होते. एक 'गोड रंगाचे' नाट्य-सिने दिग्दर्शक असं म्हणाले की- 'आमच्या काळात आम्ही नाटक करायचो, तेव्हा अगदी शेवटच्या रांगेतल्या प्रेक्षकांपर्यंत आमची देहबोली आणि आवाज पोहोचतोय की नाही हे बघायचो. तुम्ही आताची पोरं असं खुसुरपुसुर नाटक करताय, पण करा. तुम्हाला काय कोणी स्पर्धक नाही. तुम्ही करत राहा.' मुळात आजच्या प्रेक्षकालाच त्या तथाकथित 'शेवटच्या' रांगेत बसून नाटक बघायचंय का, हा आमचा मुद्दा आहे. रूढ पद्धतीने नाटक करण्यावर आमचं मुळातच प्रेम आहे. हा सगळा घाट जो घातला गेला तो 'अॅमेझॉन' आणि 'नेटफ्लिक्स'च्या प्ले-पॉझ-प्ले खेळणाऱ्या, नवीन जाणिवा, नवीन हुशारीने जगणाऱ्या प्रेक्षकाची नाटकाकडे ओढ निर्माण व्हावी, किंवा टिकून राहावी (जिवंत रहावी) यासाठी! त्यासाठी यातील विषयही तसेच आजच्या जाणिवेचे, बदलत्या पिढीच्या रोजच्या जगण्यातलेच तरीही दुर्लक्षिले जाणारे असे निवडले आणि आमची अशीच इच्छा आहे की हा एवढा प्रचंड रिस्पॉन्स बघता, लवकरात लवकर असे अजून अनेक प्रयोग व्हावेत आणि आम्हाला यातही स्पर्धा निर्माण होऊन आणखी नवीन काहीतरी शोधण्याचं बळ मिळावं! - प्रमिती नरके
Jun 10, 2018, 10:34AM IST Maharashtra Times
म.टा.संवाद, रविवार, दि. 10 जून 2018, पृ. 3
https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/drama-and-the-house/articleshow/64515067.cms

Monday, June 4, 2018

महर्षि कर्व्यांच्या स्मृतींना अभिवादन-




महर्षि धोंडो केशव कर्वे एक फार मोठा भला माणूस. अतिशय द्रष्टा. प्रांजळ.
3 व 4 जून 1916 ला त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली.

18 एप्रिल 1858 चा त्यांचा जन्म. ते 104 वर्षे जगले. 29 आक्टोबर 1958 रोजी त्यांचा भारत रत्न देऊन सन्मान करण्यात आला.

मात्र पुरस्कार घ्यायला कर्वे दिल्लीला वेळेत पोचू शकले नाहीत. कारण हिंगण्याच्या तलाठ्यानं गृहचौकशी अहवालात राष्ट्रपती भवनला कळवलेलं होतं, महर्षि कर्वे नावाचा इसम या गावात आढळून आला नाही.
पुढे त्याची विभागीय चौकशी झाली तेव्हा त्यानं सरकारी उत्तर दिलं, मला श्री धोंडो केशव कर्वे माहित होते, महर्षी कर्वे हा इसम कोण ते मला माहित नव्हतं. माझ्या दप्तरात तशी नोंद नव्हती.

कर्व्यांनी शतकापुर्वी विधवांसाठी होस्टेल काढणं, महिला विद्यालय व त्यानंतर महिला विद्यापीठाची स्थापना करणं, स्वत: एका विधवेशी लग्न करणं ही सारीच क्रांतिकारक पावलं.

बोटी बंद होत्या म्हणून ते कोकणातून [मुरूड] मुंबईला शिकायला चालत गेले. केव्हढी ही ज्ञाननिष्ठा.
गावानं त्यांना तालुक्याचं भूषण म्हणून गौरवलेलं असताना कर्व्यांनी एका विधवेशी लग्न केलं म्हणून ब्राह्मण जातीनं त्यांना "जिल्हादूषण" म्हणून वाळीत टाकलं.
कर्व्यांच्या पुनर्विवाहाने नाराज झालेल्या नाशिकच्या गंगालहरी या वर्तमानपत्राने लिहिले, "कर्वे हा खर्‍या ब्राह्मण बीजाचा बच्चा नसणार." जातीबंधने व पुर्वापार चाली पाळूनच अशी लग्ने व्हावीत असे कर्वे मानत असत.
सं. शारदा हे नाटक लिहुन ज्यांनी मराठी रंगभुमीवर सुधारणवादी विचार मांडला त्या देवलांनी कर्व्यांच्या संस्थेला देणगी दिली. त्यातून बांधण्यात आलेल्या मंदिरात हिंदू अस्पृश्यांना या मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही अशी अट लिहिलेला बोर्ड लावलेला असे.
"पण लक्षात कोण घेतो?" ही विधवांबद्दलची बंडखोर कादंबरी लिहिणार्‍या ह.ना.आपटे यांचा महिला विद्यापीठाला विरोध होता.
मुंबईत शिकवण्या करून राहताना खुप गरीबी कर्व्यांच्या वाट्याला आलेली.

पुण्यात फर्ग्युसनमध्ये प्राध्यापक झाल्यावर त्यांनी ब्राह्मण विधवांसाठी आश्रम काढला. त्यासाठी निधी जमवण्याकरिता ते देशभर फिरले. अनेकदा अपमान सोसले. जननिंदा तर कायमचीच पदरात पडायची.

मुर्ती छोटी पण धीराची. जिद्दीची.

ज्या ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकलं त्यांच्याच विधवा लेकीबाळींच्या भल्यासाठी काम करणं ही साधी गोष्ट नाही.

त्यांनी 1915 साली आपले आत्मवृत्त लिहिले. 1928 साली त्याला पुरवणी जोडून त्याची सुधारित आवृत्ती काढली. 1958 मध्ये त्यांच्या शतकमहोत्सवानिमित्त 1928 ते 1958 च्या नोंदीच्या आधारे पटवर्धनांनी त्यांचे चरित्र लिहिले. वाचताना गलबलायला होते.

एखाद्यानं समाजासाठी किती सोसावं?
3 व 4 जून 1916 ला त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली.
वयाच्या सत्तरीत त्यांनी निराश होऊन लिहिलं, भारतीय स्त्रीयांच्या उच्च शिक्षणाला हजारो वर्षे जावी लागतील.
आज स्त्रियांनी उच्च शिक्षणात घेतलेली आघाडी बघून कदाचित आपला अंदाज चुकला याची त्यांनी प्रांजळ कबुली दिली असती.
कर्वे बुद्धीने बेताचे होते असे त्यांच्या या पुस्तकाच्या प्रस्तावनाकारांनी, रॅंग्लर परांजपे यांनी लिहून ठेवलंय. एव्हढा त्याग करणारा बंडखोर माणूस बुद्धीने बेताचा असेल असं मला तरी वाटत नाही. कर्वे यांच्या तीक्ष्ण बुद्धीचच हे काम.

मुलींना उच्च शिक्षण का द्यायचं यामागचं कर्व्यांचं म्हणणं असं, "बायकांना प्रपंच चांगला करता यायला हवा. प्रत्येक बाईला किमान 5 माणसांचा स्वयंपाक कोणाच्याही मदतीशिवाय करता यायला हवा. त्याशिवाय तिला पदवी मिळता कामा नये. गृहीणीची कर्तव्ये व जबाबदार्‍या यांचे शिक्षण पदवीला दिलेच पाहिजे. स्वच्छता, आरोग्य, नीटनेटकेपणा बाईला अत्यावश्यक."
या कामाला लोकमान्य टिळकांचा पाठींबा मिळावा म्हणून कर्वे त्यांना भेटले. स्त्रीयांना उच्च शिक्षण देता कामा नये अशी भुमिका टिळकांनी घेतली. ते म्हणाले, "उच्च शिक्षणामुळे स्त्रिया संशयवादी बनतील व आपले गृहसौख्य लयाला जाईल."

शिक्षणखात्यातले एक उच्च अधिकारी तर म्हणाले, "उच्च शिक्षणामुळे स्त्रीया स्वैराचारी बनतील आणि वाट्टेल तसले बूट आणि कपडे घालून नाचरेपणा करायला लागतील."
1927 साली अखिल भारतवर्षीय स्त्रीयांची पहिली शैक्षणिक परिषद झाली. तिने ठराव केला, "बायकांना मातृत्वाचा आदर्श आणि घर सुंदर, आकर्षक व स्वच्छ कसे ठेवावे याचे उच्च शिक्षण दिले जावे."

मुंबई विद्यापीठात स्थापनेपासून वकिलीची, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत होती. 1871 पासून विद्यापीठाने मराठी शिकायला बंदी घातली.

कर्वे म्हणतात, मराठी माणूस हा भांडखोर असणार हे ठरलेलेच आहे. त्याने मराठी भाषेची साथ सोडल्यानेच त्याच्या शिक्षणाचे नुकसान झालेले आहे.
कर्वे एम.ए. ला गणितात नापास झाले होते. आपण फार भित्रे आणि लाजाळू होतो असेही कर्वे म्हणतात.
त्यांचे वयाच्या 15 व्या वर्षी लग्न झाले तेव्हा त्यांच्या बायकोचे वय 9 वर्षे होते. ती एका मुलाला,रघुनाथाला जन्म देऊन अकाली गेली.
कर्व्यांच्या आईची चार मुले जन्मत:च गेली म्हणून पुढे त्यांच्या आईने एका मुलाचे नाव भिकू ठेवले व कर्व्यांचे नाव धोंडा ठेवले. अशी नावे शूद्रांमध्येच ठेवली जात.

कर्व्यांनी गावी शाळा काढली तेव्हा त्या शाळेत मात्र ब्राह्मणेतरांना प्रवेश नाकारण्यात आला होता.

कर्व्यांच्या हिंगण्याच्या आश्रमात महर्षि वि.रा.शिंदे यांच्या विधवा बहिणीला, बायजाक्काला प्रवेश दिला गेला नाही. कारण संस्थेचा नियम होता फक्त ब्राह्मण विधवांनाच प्रवेश मिळेल.
पुढे विद्यापीठात मात्र तो शिथिल करण्यात आल्याने पहिल्या 25 वर्षात तिथे शिकलेल्या 201 मुलींपैकी 1 धनगर, 1 तेली, 4 वाणी, 11 मराठा व 184 ब्राह्मण होत्या.

ब्राह्मणांनी बेटीव्यवहार हा फक्त ब्राह्मणातच करावा, पंक्तीव्यवहारात पुर्वपरंपरा पाळावी असे कर्वे सांगतात.
अस्पृश्य जर स्वच्छ, संभावित आणि रितीभाती पाळणारा असेल तर त्याच्यासोबत भोजन करायला मात्र आपली हरकत नाही असेही कर्वे म्हणतात.

स्त्री शिक्षणासाठी झटलेल्या सर्व भारतीयांचा कर्वे आवर्जून ऋणनिर्देश करतात मात्र ते चुकूनही महात्मा फुल्यांचा अथवा सावित्रीबाईंचा उल्लेख करीत नाहीत.
या पुस्तकात फुले, शाहू, बाबासाहेब यांच्या नावाला जागासुद्धा नाही याने मन खंतावते.

कर्वे यांच्या महिला विद्यापीठात शिकवणारे आणि महात्मा फुले यांच्याबद्दल लिहिणारे पहिले लेखक म्हणजे प्रा. गं.बा. सरदार होत. त्यांनी आपले हे पुस्तक कर्व्यांना सप्रेम भेट दिलेले होते.

ते मला 25 वर्षांपुर्वी पुण्याच्या आप्पा बळवंत चौकातील रद्दीच्या दुकानात मिळाले.
ते आजही माझ्याकडे सुरक्षित आहे.

महर्षि कर्व्यांच्या कामाला काही व्यक्तीगत आणि काही काळाच्या मर्यादा असतीलही पण त्यांनी स्त्रीशिक्षण आणि स्त्री-पुरूष समतेच्या वाटा सुकर केल्या हे विसरता कामा नये.

102 वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी महिला विद्यापीठाची पुण्यात पायाभरणी करणार्‍या महर्षि कर्व्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.

- प्रा.हरी नरके

Friday, June 1, 2018

1 जून- गुरूजींनी लावलेली जन्मतारीख -



माझ्या लहानपणी आम्ही ज्या गरीब वस्तीत राहात होतो, तिथं माझ्या आईची एक मानलेली बहीण होती.
ही शांतामावशी माझ्या आईला सतत सांगायची, "सोनाई, पोराला शाळेत घाल."

आमच्या घरात कष्टाची परंपरा होती, शिक्षणाची नव्हती. त्यामुळं आई टाळाटाळ करायची. कुठं शिकून पोराला ब्यालीस्टर व्हायचंय? शेतात राबायला कशाला पाह्यजे साळा? उलट सिकलेली पोरं कामचुकार  बनतात, असा तिचा सवाल होता. शिवाय मी त्याकाळात शेजारच्या स्मशानात साफसफाईचं काम करायचो. शाळेमुळे तो रोजगार बुडणार ही आईला भिती. महिन्याला बख्खळ 5 रूपये पगार मिळायचा मला.

एके दिवशी मात्र शांतामावशीच्या भुनभुनीला आई कंटाळली. माझ्या थोरल्या भावाला म्हणाली, "उद्या हरीला मुंढव्याच्या साळंत घेऊन जा. त्या शांताचा एक बाबासाह्यब म्हणुन नातेवाईक हाय, त्यानं तिचं न तिनं माझं डोस्कं खाल्ल्यंया. नुसतं साळा, साळा, आन साळा.
घाल एकदाच साळंत. बघू काय दिवं लावतोया ते!"

दुसर्‍या दिवशी डोक्याला ओंजळभर खोबरेल तेल चोळून, तेलाचे ओघळ दोन्ही गालावरून वाहात असलेली आमची वरात पुणे मनपा शाळा क्रमांक 53 वर धडकली.
भाऊ म्हणाला, "गुर्जी, याला साळंत घ्या."
गुरूजी म्हणाले, " तुम्ही फार उशीर केलात. आता वर्षं संपलं. पुढच्या वर्षी 1 जूनला या."

भाऊ म्हणाला, "शिकलेले हुकलेले असतात असं ऎकलं होतं. अहो, काल आमचा पाडवा झाला. नवं वर्सं सुरू झालं. आन तुम्ही म्हणताय वर्षं संपलं. असं उलटं अस्तय शिक्षाण."

शालेय वर्ष, मार्च-एप्रिल वार्षिक परीक्षा, पाडवा, 1 जून, शाळेचा पहिला दिवस असं कायकाय गुरूजी भाऊला सांगत राहिले.
भाऊ म्हणाला, "आमचं हातावरचं पोट हाये. आज खाडा झाला. दिवसाचा पगार बुडाला.

परत दोन महिन्यांनी 1 जुनला साळंत येण्यासाठी खाडा करणं परवडत नस्तंय. नाहीतरी शिकून काय ब्यालीस्टर होणारेय व्हयं पोरगा?"

गुरूजी समंजस होते. त्यांनी नाव, जन्मतारीख, पत्ता असं कायकाय भावाला विचारलं. भावाला माझी जन्मतारीख काय सांगता आली नाय.

"गोकूळ अस्टमीला जनमलाय. नाव क्रिस्ना ठेवायचं होतं. पण आमचे एक काका त्या नावचं असल्यानं ह्याचं नाव हरी ठेवलं बघा. पुण्याचं धरण फुटून 2 वर्सं झालती बघा."

गुरूजींनी हिशेब केला, पानशेत धरण फुटलं 1961 ला. त्यानंतरची 2 वर्ष म्हणजे 1963. गोकुळ अष्टमी असतीय जुलै-आगष्ट्ला. पण शाळा सुरू होते 1 जूनला. तर "ह्याची जन्मतारीख 1 जून 1963, काय?"
भाऊ म्हणाला, "चालतय. लिहा कायपण. काय फरक पडतोया?"
गुरूजींनी तसं एका कागदावर लिहिलं. त्यावर भावाचा अंगठा घेतला आणि एकदाची माझी उदारणार्थ प्रवेशप्रक्रिया वगैरे संपन्न झाली.

गुरूजी मला म्हणाले, "वस्तीतल्या मुलांसोबत 1 जून 1969 पासून शाळेला यायचं. गैरहजेरी चालणार नाय, काय?"

कांबळे गुरूजी वैराग बार्शीचे होते. आम्हाला चौथीला खुप छान शिकवायचे. फार भला माणूस. ते मला वाचायला चांदोबा आणि इतर पुस्तकं द्यायचे.
घरी नेऊन जेऊ घालायचे.

त्यांच्या घरात बाबासाहेबांचा फोटो होता.

ह्यांच्या सांगण्यामुळंच शांतामावशीनं आईला सांगून मला शाळेत घातलं.
तर मी गुरूजींकडून बाबासाहेबांचा एक फोटो मागून घेतला. त्याला लाकडी फ्रेम करून तो आमच्या झोपडीत लावला. वर्षं होतं 1972.

आई त्या फोटोपुढं दररोज संध्याकाळी दिवा लावायची. उदबत्त्या लावायची. सणवाराला त्याला हार घालायची.

"माह्या शांताचा नातेवाईक हाय. लई मोठ्ठा ब्यालीस्टर व्हता बाबा. ह्याच्यामुळंच आमच्या हरीला मी साळंत घातलं," असं आल्यागेल्याला कौतुकानं सांगायची.
आमचे काही नातेवाईक मात्र चिडले. हा फोटू आपल्या घरात कशाला? वाळीत टाकतील ना जातवाले.
त्या फोटोपायी मला त्यांचा मारही खावा लागला.

पण आई ठाम होती. "फोटू काढणार नाय."
" आमच्या वाईट काळात कोण नातेवाईक आल्ता मदतीला का जात आल्ती?
ह्या बाबासाह्यबामुळं माझं पोरगं शिकतया.  फोटो राहणार म्हणजे राहणारच.

ज्यांना हा फोटू आवडत नाय त्यांनी आमच्या झोपडीत येऊ नाय.

त्यांच्यावाचून आमचं कायपण अडलेलं नाय!"
आईनं नातेवाईकांना ठणकावलं.
-प्रा. हरी नरके