Showing posts with label पुतळे. Show all posts
Showing posts with label पुतळे. Show all posts

Tuesday, September 25, 2018

महात्मा फुले यांच्या पुतळ्यासाठी ४४ वर्षे संघर्ष-









महात्मा फुले यांच्या पुतळ्यासाठी ४४ वर्षे संघर्ष- प्रा.हरी नरके

पुणे हे पुतळ्यांचे शहर आहे. जगातील सर्वाधिक पुतळे पुण्यात आहेत असे सांगितले जाते. असतील.
मला कायम इतिहासात रमायला आवडत नाही. पुतळ्यांची तर आता शहरात एव्हढी गर्दी झालीय की त्यांचे कौतुक उरलेले नाही.पण काही घटना ऎतिहासिक असतात. त्यांची माहिती नव्या पिढीला व्हायला हवी. १९२० साली लोकमान्य टिळक गेले. त्यांचा पुतळा त्यावेळच्या रे मार्केटमध्ये [ आताची महात्मा फुले मंडई ] बसवण्यात आला. तिथेच विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचाही अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला. केशवराव जेधे तेव्हा पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. या पार्श्वभुमीवर त्यांनी पुणे न.पा.कडे एक ठराव पाठवला.

महात्मा फुले यांचा पुतळा उभारावा अशी त्यांनी मागणी केली. पुण्यात एखादा बॉम्बस्फोट व्हावा तसा हलकल्लोळ माजला. पुणे न.पा. तेव्हा टिळक गटाच्या ताब्यात होती. डेक्कनवरचा आपटे रोड ज्यांच्या नावाने आहे ते न.पा. अध्यक्ष होते.

जेधे, जवळकर हे तरूण, आक्रमक आणि लढाऊ नेते होते. त्याकाळात सनातन्यांनी महात्मा फुल्यांचे चारित्र्यहनन करण्यासाठी अत्यंत किळसवाणा मजकूर असलेल्या चोपड्या प्रकाशित केल्या. नानाप्रकारे महात्मा फुल्यांची बदनामी करण्यात आली. असे हे कृतघ्न लोक. श्री. गणपतराव नलावडे व श्री. वि.म.फुले यांच्या खांद्यावर बंदुका ठेऊन या चोपड्या छापण्यात आल्या होत्या. त्या धादांत खोट्या होत्या. विकृत होत्या. त्यावर लेखक म्हणून या दोघांची नावे असली तरी त्यांचे असली लेखक "वेगळेच" होते. साधे पत्रही धड लिहिता न येणारे हे दोघे. तिसरे असेच एक घाऊक लेखक म्हणजे चिं.ग.ओक होत. हे मात्र खरेच लेखक होते. हिंदू महासभेचे मामाराव दाते या कामात पुढे होते.

श्री. नलावडे यांच्यामते फुले वाईट होते,  का तर ते कोट घालत होते. ब्रिटीश लोक कोट घालायचे. म्हणून फुले ब्रिटीशधार्जिणे.
आता खुद्द स्वा.सावरकर, लोकमान्य टिळक आणि विष्णूशास्त्री हे तिघेही कोट घालायचे. पण कोटावरून फुल्यांवर फुली मारताना नलावड्यांना हे सुचले नाही. असे हे सनातनी अंधभक्त.

त्यांचा महात्मा फुले यांच्या बदनामीसाठी जातीयवाद्यांनी वापर करून घेतला. त्या बदल्यात वि.म.फुल्यांना पुण्याचे नगरसेवक केले गेले. नलावड्यांना तर महापौरपद दिले गेले. कुर्‍हाडीचे दांडे गोतास काळ. क्षणिक फायद्यासाठी आपण काय करतोय हे त्यांच्या डोक्यात कसे आले नसेल? श्री. विश्वनाथ महादेव फुले हे जोतीरावांचे नातू होते असे रेटून खोटे लिहिले जातेय, सांगितले जातेय. हा बनाव आहे. त्यांचे आडनाव फुले असले तरी त्यांचा जोतीरावांशी नातू वगैरे असला संबंध नव्हता.
ते फुल्यांचे भ्रष्ट, सामाजिक परिवर्तनाला विरोध करणारे भाऊबंद होते. महात्मा फुल्यांच्या वडीलांची जमीन त्यांच्या निरक्षरतेचा गैरफायदा घेऊन वि.म.फुलेंच्या आजोबांनी हडप केलेली होती. त्यामुळे ते घराणे आणि जोतीराव यांच्या घराण्यामध्ये भाऊबंदकीचे वाद - वैर होते. शिवाय जोतीरावांना मूळबाळ नसल्याने वि.म.फुल्यांचा जोतीरावांच्या इस्टेटीवर डोळा होता. पण जोतिराव-सावित्रीबाईंनी यशवंतला दत्तक घेतल्याने या भाऊबंदांचा डाव उधळला गेला.म्हणुन ते जोतिरावांवर भडकलेले होते.
ते घराणे सनातन्यांचे हस्तक होते. अंधश्रद्धाळू आणि कडवे जातीयवादी होते. ते कडक अस्पृश्यता पाळीत असत. अंगात येणे, गंडेदोरे, ताईत, कोंबडे, बकरे बळी देणे हे त्यांचे उद्योग महात्मा फुल्यांना पटणेच शक्य नव्हते.

श्री.वि.म. उर्फ बाबूराव फुल्यांचे नाव सनातन्यांनी सदाशिव पेठेतील म.सा.प. समोरील एका चौकाला दिलेले आहे. महात्मा जोतिराव फुल्यांच्या पुतळ्याला सातत्याने ४४ वर्षे विरोध करणारे सनातनी या वि.म.फुलेंचे नाव मात्र एका चौकाला तात्काळ देतात यातच सगळे आले. ही महात्मा फुल्यांच्या बदनामीबद्दलची बक्षिसी होती.
वि.म.फुल्यांच्या या चोपड्यांची तीव्र प्रतिक्रिया आली. त्यांना समग्र पुणेकर माळी समाजाने सनातन्यांचे बगलबच्चे म्हणून जातीबहिष्कृत केलेले होते.
जाती बहिष्कार ही चुकीचीच कृती आहे. पण अशा संग्रामांमध्ये लोक विवेकबुद्धी कुठे वापरतात?

आपण जोतीरावांबद्दल खोटे लिहिले असे पुढे कबूल करून त्यांनी १९२५ साली माळी समाजाची जाहीर माफीही मागितली होती. त्यांच्या मुलानेच मला व य.दि.ना ही माहिती सांगितली. त्याची नोंद मी माझ्या पुस्तकात केलेली आहे. आपल्या नावाचा वापर करून हे चोपडे लिहण्यात आले असेही त्यांनी स्पष्ट केले.
ह्या पुस्तकाचा समाचार मी माझ्या "महात्मा फुले यांची बदनामी:एक सत्यशोधन " या पुस्तकात ३० वर्षांपुर्वीच घेतलेला आहे. ख्यातनाम संशोधक डॉ. य.दि.फडके सरांनी माझ्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत माझ्या मतांना दुजोरा दिलेला आहे.

महात्मा फुल्यांच्या बदनामीची तीव्र प्रतिक्रिया आली. बहुजन समाजातील हमालांनी महात्मा फुले मंडईतील विष्णूशास्त्रींचा पुतळा हटवा अशी मागणी  केली. तो पुतळा तिथनं काढून न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आणून बसवावा लागला. दरम्यान आचार्य अत्र्यांनी रे मार्केटला महात्मा फुल्यांचे नाव दिलेले होते.

जेधे जवळकरांनी या पुस्तिकांना "देशाचे दुश्मन" हे छोटे पुस्तक लिहून जशास तसे उत्तर दिले. जेधे जवळकरांवर बदनामीचा खटला भरण्यात आला. या चोपड्यांबद्दल नलावडे आणि वि.म. फुले यांच्यावरही बदनामीचे खटले टाकले गेले. ब्रिटीश न्यायाधिशांनी जेधे जवळकरांना दोषी ठरवले. तुरूंगात पाठवले. मात्र तशाच कामांबद्दल नलावडे व वि.म.फुले यांना मुक्त केले गेले. हा ब्रिटीश न्यायाधिशांचा पक्षपात वरच्या न्यायालयात बॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केला आणि वरिष्ठ न्यायालयाने जेधे जवळकरांना मुक्त केले.

महात्मा फुल्यांचा पुतळा पुण्याऎवजी कोल्हापूरला बसवा असा सल्ला नगरपालिकेतल्या सनातन्यांनी दिला होता. महात्मा फुले पुतळ्यासाठी सातत्याने ४४ वर्षे संघर्ष झाला. अखेर ३१ मे १९६९ ला श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पुणे म.न.पा.च्या प्रांगणात महात्मा फुले यांचा पुतळा बसवण्यात आला. पण त्याचा खर्चही म.न.पा.ने केला नाही. माळीनगरच्या साखर कारखान्याने हा पुतळा मनपाला भेट दिला होता.

सध्या हे पुस्तक पुन्हा पुढे आणण्याचे कारस्थान भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील एक आरोपी, मनुपुत्र श्री. संभाजी भिडे आणि बॉम्ब बनवण्याचा ज्यांच्यावर आरोप आहे ते सनातन संस्थेचे कट्टर लोक करीत आहेत. एरवी हिंदू सगळे एक असे कोकलणारे हे जातीयवादी लोक कसे दांभिक असतात बघा, महात्मा फुल्यांची बदनामी करताना फुले हिंदूच होते हे मात्र हे लोक सोयिस्करपणे विसरतात. तर असा यांचा सिलेक्टीव्ह हिंदूजनविचार!

हे लोक आगीशी खेळत आहेत. याची प्रतिक्रिया येणार आणि पुन्हा जातीय चिखलफेक होणार. सोबतकार ग.वा.बेहरे आणि हिंदुत्ववादी बाळ गांगल यांनी ३० वर्षांपुर्वी महात्मा फुल्यांच्या बदनामीची मोहीम हाती घेतली होती. ती त्यांच्या अंगलट आली होती. हाच खेळ पुन्हापुन्हा खेळण्याची सनातन्यांची  चिकाटी विलक्षणच म्हटली पाहिजे.
मात्र यातनं जातीय दुही वाढते. सामाजिक सलोखा नष्ट होतो. एकात्मतेचा विचार मागे जातो हे मनुपुत्र श्री. संभाजी भिडे आणि सनातनचे व हिंदू जनजागरणचे लोक लक्षात घेतील काय?

-प्रा.हरी नरके, २५ सप्टेंबर २०१८