Showing posts with label महात्मा फुले. Show all posts
Showing posts with label महात्मा फुले. Show all posts

Thursday, June 18, 2020

विवेकवादी गोपाळ गणेश आगरकरांचा १२५ वा स्मृतीदिन : प्रा. हरी नरके









वयाच्या अवघ्या ३९ व्या  वर्षी  अकाली वारलेल्या गोपाळराव आगरकरांना जाऊन काल १२५ वर्षे झाली.          (जन्म, टेंभू, सातारा, १४ जुलै १८५६; मृत्यू : पुणे, १७ जून १८९५)  कोरोना आणि एकुणच मराठी समाजाचा आगरकरांबद्दलचा थंडपणा यामुळे त्यांचे स्मरण फारसे कोणाला झाले नाही. हेही आपल्या रितीला धरूनच झाले म्हणा! आगरकरांनी ज्या मध्यमवर्गीयांच्या सुधारणेसाठी आपली हयात घालवली त्यांनी आगरकरांचा विचार स्विकारला, त्यानुसार उच्चशिक्षण घेतले, आधुनिक राहणीमान, जीवनमान स्विकारले पण आगरकारांचं नाव मात्र टाकून दिलं. विचारसुद्धा सगळा नाही घेतला. सोयीचा तेव्हढा घेतला. त्यांचा ध्येयवाद, त्यांचे समर्पण नाही घेतले. त्यांचा सुधारणावाद, बुद्धीप्रामाण्यवाद नाही घेतला. त्यांच्या विवेकनिष्ठेऎवजी त्यांच्या विरोधकांचा धार्मिक उन्माद आणि तुच्छतावाद मात्र आवर्जून घेतला. विज्ञाननिष्ठा नाकारली आणि पुरोहितशाहीची  मानसिकता घेतली.

अशा आप्पलपोट्यांसाठी आगरकर हकनाकच गेले म्हणायचे. आगरकर विवेकवादी होते. ते गरिबीतून कष्टाने शिकले. उत्तम सरकारी नोकरी आणि छान कमाई झाली असती तर तिच्यावर पाणी सोडून मध्यमवर्गीयांच्या अंधश्रद्धा दुर व्हाव्यात, स्त्रियांनी आधुनिक केशभुषा, वेशभुशा स्विकारावी, भरपूर शिकावे, कर्तबगारी गाजवावी, बालविवाह करू नयेत, विधवांचे पुनर्विवाह सन्मानाने व्हावेत, विधवांचे केशवपन करू नये, सती जाण्याची गरज नाही हे विचार लेखनाद्वारे मांडीत राहिले.  त्यावरून टिळकांशी मतभेद झाल्यावर आपला स्वत:चा "सुधारक" हा पेपर काढून विचारकलहाला घाबरू नका, चर्चेमुळे, वादविवादामुळे समाज समृद्ध होतो, मराठी माणूस हा मुलत: कलहशील आहे. कळवंड करणारा, भांडकुदळ आहे, त्याला चेतवित राहिले. जागवित राहिले.

"सुधारक" या पेपरला ब्राह्मणवाद्यांचा किती विरोध असावा? पुढे फाशी गेलेल्या चाफेकर बंधूंनी सुधारकाच्या संपादकाला अंधारात गाठून मारहाण करण्यासाठी तरूण हवेत अशी जाहीरातच वर्तमानपत्रात दिलेली होती.

ते आधी केसरी, मराठाचे व नंतर सुधारकाचे संपादक असताना लोकशिक्षण, लोकजागृती, लोकसंघटन आणि लोकरंजन हे सुत्र उराशी बाळगून लिहित राहिले. कोल्हापूरच्या शिवाजीराजांना ब्राह्मण दिवाण बर्वे त्रास देत होते. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी अग्रलेख लिहिले. बर्व्यांनी अब्रुनुकसानीचा खटला भरला. ब्रिटीश कोर्टाने दहा हजार रुपयांचा जामीन मागितला. त्याकाळचे (१८८०-८१) दहा हजार रुपये म्हणजे आजचे सुमारे दहा कोटी रुपये. अशा संकटाच्या घडीला त्यांनी रात्री अकरा वाजता तार केली. मदत मागितली. महात्मा जोतीराव फुले त्यांच्या मदतीला धावले. सत्यशोधक समाजाचे खजिनदार रा. बा. उरवणे यांनी रोख दहा हजार रुपये मुंबईला कोर्टात पोचते केले. पुढे टिळक-आगरकरांना न्यायालयाने साडेतीन महिन्यांची शिक्षा सुनावली. ते सुटले तेव्हा जोतीरावांच्या सुचनेवरून सत्यशोधकांनी डोंगरीच्या तुरूंगाबाहेर जल्लोश केला. एका रथातून त्यांची मिरवणूक काढली. त्यांचा जंगी सत्कार केला. त्यांना मानपत्र दिले. हे सगळे खुद्द टिळकांनीच पुढे केसरीत लिहिलेय. तिथूनच मी हे उद्धृत करतोय. (पाहा: केसरी, ३ ऑक्टोबर १८८२)

जोतीरावांनी त्यांच्याशी काही वैचारिक मतभेद असतानाही कायम त्यांना पाठींबा दिला, सहकार्य केले. विवेकवादी असूनही आगरकरांची वैचारिक भुमिका  ही होती की, "जे काही करणे ते मूळ आर्यत्व न सांडता करावे," याच्याउलट फुले आर्यत्वाचे कणखर विरोधक होते.

लोकहितवदी, न्या.रानडे, आगरकर, कर्वे ही भलीच माणसं होती. पण महापुरूषांनाही मर्यादा असतातच. काही काळाच्या, काही स्वत:च्या. आगरकरांनी ज्या कुटुंबसुधारणेचा ध्यास घेतला होता ती आता बर्‍यापैकी साध्य झालेली आहे. लोकहितवादी आयुष्यभर लोकहितार्थ झटले. पण त्यांची लोकांची कल्पना बघितली तर ती सर्वसमावेशक दिसत नाही. ती लोक म्हणजे अभिजन अशी मर्यादित दिसते, अशी टिका ख्यातनाम इतिहासकार अरविंद देशपांडे यांनी केलेली आहे. (पाहा: महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, १९९८, पृ. ५ ) न्या. रानडे प्रकांडपंडीत होते. सुधारक होते. पण व्यक्तीगत जीवनात सुधारणा करताना पाय मागे घेणारे होते असे त्यांचे चरित्रकार न.र.फाटक सांगतात. ( पहिली बायको वारल्यावर विधवेशी लग्न करण्याऎवजी ९ वर्षांच्या मुलीशी जिल्हा न्यायाधिश असलेल्या ३२ वर्षांच्या रानड्यांनी लग्न केले.) कर्व्यांनी विधवांच्या शिक्षणासाठी काम केले पण फक्त ब्राह्मण विधवांसाठीच ते काम करीत राहिले.

या पार्श्वभुमीवर जोतीराव फुले यांची समाजक्रांतीची भुमिका या समकालिनांना पेलवली नाही. या विवेकी माणसाने जोतीराव वारले तेव्हा ती बातमीही दिली नाही. टिळकांनी दिली नाहीच पण आगरकरांनीही सुधारकात ती दिली नाही याबद्दल इतिहासकार य. दि. फडके यांनी खेद व्यक्त केलेला आहे. जोतीराव धर्मांतर करून कधीही ख्रिस्ती झाले नाहीत. त्यांनी "सत्यधर्मा"ची मांडणी केली. तरिही आगरकर त्यांना "रेव्हरंड जोतिबा" असे हिनवतात. आगरकरांचे भावविश्व शहरी होते. त्यामुळे त्यांच्या लेखनात शेती, शेतकी, शेतकरीजगत यावर फारसे काही लिहिलेले आढळत नाही.


सामाजिक समता, स्त्री-पुरुषसमता आणि विज्ञान‌निष्ठा‌ ही आगरकरांची जीवनमुल्ये होती.  ते बाळ गंगाधर टिळकांचे समकालीन, आधी मित्र आणि नंतर कट्टर विरोधकही. ते केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना टिळक व आगरकर एकत्र आले. दिनांक १ जानेवारी १८८० रोजी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना झाली. आगरकर १८८१ मध्ये एम.ए. झाल्यावर या शाळेत शिकवू लागले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले. पुढे  टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची व १८८५ मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले.

ते थोर प्रबोधनकार होते. भौतिकता, ऐहिकता, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक मुल्यांवर आधारलेला मराठी समाज उभा राहावा यासाठी ते झुंजले. महाराष्ट्रसमाजाला समाजपरिवर्तन, विवेक, बुद्धिप्रामाण्यवाद व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देण्यासाठी ते बोलत-लिहित राहिले. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती मिळावी या कारणे त्यांनी देह झिजवला. आपल्या समाजात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन यावा, ग्रंथप्रामाण्य नष्ट व्हावे, बुद्धीला पटेल तेच स्वीकारले जावे, केवळ अंधानुकरण करीत रूढीवादी जीवन जगु नये असा प्रचार ते करीत राहिले. रुढीप्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त अशी समाजधारणा बनावी हे त्यांचे स्वप्न होते. स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत, आधुनिक पादत्राणे वापरली पाहिजेत, स्त्रियांनी पुरूषांच्या बरोबरीने काम करावे हे आज सहज स्विकारले गेलेले विचार ज्याकाळात समाज नाकारीत होता तेव्हा आगरकर भांडत होते. ज्यांच्यासाठी ते भांडत होते त्यातल्या ९९ टक्क्यांना मात्र याची आज जाणीवसुद्धा नाही. आठवणीचा मुद्दाच नाही.

आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी समाजसुधारणा? या वादात ते आधी समाजसुधारणा या मताचे होते. त्यांचे सुधारक हे वर्तमानपत्र इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काहीकाळ ना. गो.कृ. गोखले यांनी सांभाळली होती.

बुद्धीला जे पटेल ते बोलणार व शक्य ते आचरणात आणणार हा त्यांचा बाणा होता. " विचारकलह" हा समाजस्वास्थ्यासाठी अत्यावश्यक आहे, प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य असलेच पाहिजे ह्याचे ते पुरस्कर्ते होते. त्यावेळी सनातनी आजच्यासारखेच आक्रमक होते. संघटित होते. हिंसकही होते. ब्रिटीश राज्य असले तरी सामाजिक जीवनात अजूनही पेशवाईच होती. त्यामुळे पुण्यातल्या सनातन्यांनी सर्व सुधारकांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती.

वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी आगरकर गेले.

आचार्य अत्रे यांनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात १९३४ मध्ये आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.

आज त्यांच्या नावे काही पुरस्कारही दिले जातात. साहित्य संस्कृती मंडळाने तीन खंडात आगरकर-वाङ्मय प्रकाशित केलेले आहे. (संपादक : म. गं. नातू. दि. य. देशपांडे) त्यातल्या निवडक लेखांचा संग्रह प्रा. ग.प्र. प्रधान यांनी संपादित केलेला असून त्याचे प्रकाशन साहित्य अकादमीतर्फे झालेले आहे. "शोध बाळगोपाळांचा" हे य.दि.फडके यांचे पुस्तक व विश्राम बेडेकरांचे "टिळक-आगरकर" हे नाटक प्रसिद्ध आहे. "डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे १०१ दिवस", हे आगरकरांचे स्वत:चे अनुभवकथन व त्यांनी शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठीत केलेले भाषांतर ’विकार विलसित’ वाचनीय आहे.

या विवेकपुरूषाला विनम्र आदरांजली.

- प्रा. हरी नरके, १८/६/२०२०



Friday, May 15, 2020

तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजच होय आरसा

"महात्मा जोतीराव फुले यांना मी आपला गुरू मानतो. माळी समाजात त्यांचा जन्म झाला. पुष्कळ मराठे त्यांचे शिष्य होते. परंतु आजची परिस्थिती मोठी चमत्कारिक झालेली आहे. जोतीरावांचे नाव आज कोणीच घेत नाही. आम्ही घेतो. घेणारच. आम्ही चळवळ करतो म्हणून इतर लोक आमच्याकडे खुनशीपणाने पाहात आहेत.

शिकलेली माणसे नुसती पोटभरू असून भागणार नाही. "

"तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजच होय आरसा." शिक्षणाचा उपयोग असा झाला पाहिजे. आपण आपले मन पवित्र केले पाहिजे. आपला सद्गुणांकडे ओढा असला पाहिजे. शिक्षणाबरोबर माणसाचे शीलही सुधारले पाहिजे. शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे.

" कबीर कहे कुछ उद्द्यम किजे, आप खाये और औरनको दिजे," या कबीराच्या दोह्याप्रमाणे उद्योग करा. आपण खा, दुसर्‍यांनाही द्या. स्वत:चे घर प्रथम सांभाळा, मात्र समाज कार्यालाही मदत करा. ज्ञान हे काही केवळ रोजगाराचे साधन होऊ शकत नाही. ज्ञान जीवनाच्या समग्र उन्नतीचे हत्त्यार आहे.

नाशिक सत्याग्रहाचा अनुभव तुम्हाला सांगतो. प्रथम माझ्यासोबत भाऊराव गायकवाड व अवघे पाचसहाजणच होते. आम्ही रात्रभर वाट पाहिली. सकाळपर्यंत एकही गडी सत्याग्रहाला आला नाही. सकाळी आम्ही पाच-सहा जणांनी मिरवणूक काढली. आमच्यावर दगडफेक झाली. नंतर आम्हाला १५ ते २० सत्याग्रही मिळाले. नंतर लोक वाढत गेले. इतके वाढले की आम्ही पाच वर्षे सत्याग्रह करू शकलो....

लहाणपणी मला माझी आई सांगायची मोठ्या माणसांना मामा म्हणत जा. मी पोस्टमनला मामा म्हणायचो. [ हशा आणि टाळ्या ] ...

प्रत्येकाने आपल्या घरात बुद्धाचा फोटो लावला पाहिजे. बुद्ध मार्गदाता आहे."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ३ जून १९५३, मुंबई, रावळी कॅंप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड १८/३, पृ. ३५७/५८

Wednesday, April 29, 2020

संघाची लबाडी - संघाने उभे केले महात्मा फुले यांचे नकली / डमी वंशज- प्रा. हरी नरके, रा.स्व.संघ 14












सुमारे साडेचार वर्षांपुर्वी संघाने पुण्याजवळ एक मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. तेव्हा गोदीमिडीयाला हाताशी धरून खोट्या बातम्यांचा पाऊस पाडण्यात आला. त्यातली एक फुसकी म्हणजे अर्धी चड्डी घातलेल्या काही बनावट लोकांचे फोटो आणि व्हीडीओ व्हायरल करण्यात आले. ते महात्मा फुल्यांचे वंशज असल्याची दवंडी पिटण्यात आली. स्वत: जोतीरावांनी आपल्या हयातीमध्येच असे लिहून ठेवले होते की " हे लोक आपले वारस नाहीत, " अशांच्याच पुढच्या पिढ्यांना भजनी लावून ते जोतीरावांचे वारस असल्याची प्रसिद्धी संघ देत आहे. महात्मा फुल्यांचे अपहरण करण्याचा हा बनाव साडेचार वर्षांपुर्वी मी उधळून लावला होता.


पुण्याचे एक पत्रकार शैलेंद्र परांजपे यांना यासाठी हाताशी धरण्यात आले. ते आमच्याशी खाजगीत बोलताना संघाची टर उडवायचे. वर्षानुवर्षांची ओळख. पण त्यांनी कधी कळूच दिले नाही की ते संघवाले आहेत. जशी मोदीफडणविसांची सत्ता आली तसे यांचे खरे रूप उघडे पडले. परांजपे चक्क संघाची तळी उचलून धरायला लागले.

त्यांनी डी.एन.ए.मध्ये ही बातमी दिली. मी तात्काळ खुलासा केला, बातमी खोटी आहे. महात्मा फुल्यांना मुलबाळ नसल्याने त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतलेला होता. त्याला मुलगा झाला नाही. त्यामुळे फुले आडनावाचे कोणीही फुले वंशज शिल्लकच नाहीत. केवळ आडनाव हा पुरावा मानायचा तर प्रत्येक भोसले आडनावाचा माणूस छत्रपती शिवरायांचा वंशज मानावा लागेल. महात्मा फुले यांच्या हयातीतच काही भाऊबंद, फुले मंडळी, जमिन आणि घरदाराच्या लोभाने, पिढीजात वादांमुळे किंवा सनातन्यांचे हस्तक म्हणून जोतीराव -सावित्रीबाईंच्या विरोधात गेलेले होते. क्रांतिकारक विचार पेलायला काळीजही मोठे लागते. छटाकभर काळजाचे लोक सनातन्यांचे हस्तक बनू शकतात. क्रांतिकारक नाही. त्यातल्या काही बुटक्या लोकांना हाताशी धरून संघ हाच फुले विचार चालवतो असं वदवणं हे किळसवाणं होतं. ज्यांनी महात्मा फुले वाचले नाहीत, त्यांचे पुस्तकही हातात धरलेले नाही असे लोक टिव्हीवर येऊन फुलेविचार आणि संघ किती जवळचे आहेत यावर पोपटपंची करीत होते.  पढवलेले सुमार लोक दुसरं काय करणार?

स्वत: जोतीरावांनी आपल्या हयातीमध्येच आपल्या मृत्यूपत्रात स्पष्ट केलेले आहे, की आपले कोणीही भाऊबंद हे आपले वारस नाहीत, अशांच्याच पुढच्या पिढ्यांना संघ फुलेवारस म्हणून प्रसिद्ध देत होता. आजही हे कारस्थान चालूच आहे.

डी.एन.ए.चे संपादक उदय निरगुडकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यावर त्यांनी माझा खुलासा संपादित स्वरूपात प्रकाशित केला. [पाहा-परिशिष्ट १]

अशाच खोट्या बातम्या लोकमत दैनिकातही झळकळ्या होत्या. लोकमतचे मुख्य संपादक दिनकर रायकर यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर लोकमतनेही माझा खुलासा छापला. [पाहा-परिशिष्ट २]

ह्याच खोडसाळ बातम्या ए.बी.पी. माझा वाहिनीवरही देण्यात आल्या होत्या. तिकडेही संपादक श्री राजीव खांडेकर यांच्याकडे मी पाठपुरावा केल्यावर त्यांनी माझ्या खुलाशाचा बाईट बातम्यांमध्ये दाखवला. मात्र तो ऑनलाईनवर ठेवण्यात आला नसल्याने त्याची लिंक उपलब्ध नाही.

त्यावेळी आय.बी.एन. लोकमतवर यानिमित्ताने संपादक मंदार फणसे यांनी एक "बेधडक" चर्चा घेतली होती. तिच्यामध्ये मी सहभागी झालेलो होतो. त्या चर्चेत मी संघाचा खोटेपणा सप्रमाण उघडा पाडला होता. [ पाहा- परिशिष्ट ३]

यावेळी संघाची असत्यकथन, सत्यापलाप आणि खोटा इतिहास रचण्याची साखळी उघडी पाडणारा ब्लॉगही मी लिहिला होता. [ पाहा-परिशिष्ट-४ ]

" Is RSS trying to cash in on Jyotiba Phule’s legacy using wrong lineage " असा लेख मुंबई मिरर [ दि. 12 january 2016, mumbai mirror] या इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला होता. त्यात मिररच्या प्रतिनिधी अलका धुपकर यांनी माझा दावा नोंदवला होता. [ पाहा परिशिष्ट-५] 


लोकमतने माझे म्हणणे विस्ताराने छापले होते, " राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात झालेल्या ' शिवशक्ती संगम' कार्यक्रमात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या वंशजांनी हजेरी लावल्याच्या बातमीवरून सध्या बरेच चर्वित-चर्वण सुरू आहे. मात्र महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक व अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगत ही बातमी वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा केला आहे.
प्रा नरके म्हणतात, ' प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला गणवेशात उपस्थित असणारे हे वंशज महात्मा फुले यांच्या कुटुंबातील नाहीत.' नरके यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे:

१) महात्मा फुले यांना मुलबाळ झालेले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतलेला होता, त्याचेही हे वंशज नाहीत.
२) जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच आज फुल्यांचे वंशज/कुटुंबिय म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
३) जो थोरला भाऊ महात्मा फुले यांच्यासोबत राहात नव्हता, जो विभक्त होता आणि स्वतंत्र होता, फुले हयात असतानाच ज्याचा मृत्यू झाला होता, त्यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीतील आजच्या सदस्यांना महात्मा फुले यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणता येणार नाही.

४) महात्मा फुले यांनी त्यांचे मृत्यूपत्र तयार करून ते २५ जुलै १८८७ रोजी ब्रिटीश सरकारच्या नोंदणी कार्यालयात नोंदवले होते. ते मी स्वत: २५ वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले: समग्र वाड्मय" या राज्य शासन प्रकाशित ग्रंथात प्रसिद्ध केले आहे. ते पृष्ठ ६३५ ते ६४८ वर उपलब्ध आहे. त्यात फुले यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केलेले आहे.

५) महात्मा फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा आजच्या मंडळींच्या पूर्वजांनी केला होता तेव्हाही तो स्वत: सावित्रीबाईंनी अमान्य केला होता. जोतीरावांच्या अंत्ययात्रेचे नेतृत्व स्वत: सावित्रीबाईंनी केले.

६) राजाराम फुले यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीने कोणत्या संघटनेत काम करावे याचे त्यांना स्वातंत्र्य आहे, मात्र त्यांनी आपण महात्मा फुल्यांचे कुटुंबिय/ वारसदार म्हणून दावा करणे उचित नाही.

मी माझ्या ब्लॉगमध्ये लिहिले होते, 

" स्वत: सावित्रीबाई व महात्मा फुले यांना मूलबाळ झाले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला होता.त्याला त्यांनी डॉक्टर केले.पण आपला वारसा त्याच्याकडे सोपवतानाही त्याला काही अटी घातल्या. त्यावरून स्पष्ट होते की फुले जैविक वारसा महत्वाचा मानत नव्हते तर वैचारिक वारसा महत्वाचा मानत होते. हे लोक डॉ.यशवंत जोतीराव फुले यांचेही वंशज/ वारस नाहीत. ते जोतीरावांच्या भाऊबंदापैकी असलेल्यांचे वंशज/ वारस आहेत. जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच फुल्यांचे वंशज म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न करणे हे नैतिकदृष्ट्या उचित नाही.

2. महात्मा फुले यांचे मृत्यूपत्र त्यांनी सरकार दरबारी नोंदवले होते. ते मी स्वता: 25 वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले :समग्र वाड्मयात" प्रसिद्ध केले आहे. { पाहा, पृ.635 ते 648 } त्यात फुल्यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केले आहे. आज याच घराण्यातील मंडळी फुल्यांचे वारसदार म्हणून मिरवित आहेत हे अनैतिहासिक होय.

3. आपला मयत भाऊ राजाराम व आपण स्वतंत्र होतो, तो आता वारलेला आहे पण त्याच्या मुलाचा गणपतचा आपल्या मालमत्तेवर हक्क किंवा दावा नाही. तसेच तो आपला वारस नाही असे फुले यात नोंदवतात. फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा भाऊबंध आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा करू लागले तेव्हा तो सावित्रीबाईंनी अमान्य केला व स्वत: अंत्ययात्रेचे नेतृत्व केले. तेव्हा जे भाऊबंद कधीच फुल्यांसोबत नव्हते ते जर आपण फुल्यांचे वारस आहोत असा दावा करीत असतील तर ते हास्यास्पद आहे.

4. फुल्यांचे सच्चे वैचारिक वारसदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म.वि.रा.शिंदे, रा. शाहू छत्रपती, कर्मवीर भाऊराव, ना.मे.लोखंडे आणि केशवराव विचारे हे होते. पुढच्या काळात हा वारसा गं.बा.सरदार, य.दि.फडके, गो.पु.देशपांडे, बाबा आढाव, भा.ल.भोळे, शरद जोशी, रावसाहेब कसबे, भालचंद्र नेमाडे आदींनी पुढे नेला.

जे कधीच फुल्यांच्या चळवळ व विचारांसोबत नव्हते ते फुल्यांच्या मृत्यूनंतर 125 वर्षांनी आज अचानक वारसा सांगायला पुढे सरसावले आहेत हे हास्यास्पद आहे. रा.स्व.संघाला अशा बनावट आणि तकलादू मना्च्या श्लोकांची रचना करावी लागावी हे त्यांच्यासाठी लज्जास्पद आहे. 

विद्यमान फुले मंडळींनी कोणत्या संघटनेत जावे हे त्यांचे स्वातंत्र्य आहे. ते महात्मा फुल्यांचे वारसदार असल्याचा नकली दावा करीत आहेत. फुलेविचारांच्या बोगस प्रमाणपत्रांचे वाटप ते करू शकत नाहीत. तो नैतिक अधिकार महात्मा फुले व सावित्रीबाईंचा ध्येयवाद सच्चेपणाने पुढे नेणारांनाच आहे. इतर लांडग्यांना नाही.

संघाच्या घृणास्पद वर्तनाचे असे कितीतरी पुरावे देता येतील. 
तेव्हा बलाढ्य रा.स्व. संघाला माझ्यामुळे [मी त्यांचा खोटापणा सिद्ध केल्याने] माघार घ्यावी लागल्याने संघ संतापणे स्वाभाविक आहे. संघ तोंडघशी पडला तो माझ्यामुळे नाही,त्यांच्या लबाडीमुळे. असत्याचा सहारा  घेतल्याने. महात्मा फुले सत्यमेव जयते चे पुरस्कर्ते होते. संघाने तेव्हापासून आपल्या चेल्याचपाट्यांकरवी अफवा पसरावायला सुरूवात केली. तेच ते त्यांचे गेल्य ९५ वर्षांचे जन्मापासूनचे अफवातंत्र. 

अहो, कळलं का, हरी नरके तर आमचेच आहेत. अरे लबाडांनो, मी तुमचा होतो म्हणून तुमचा खोटारडेपणा जगाच्या वेशीवर टांगला काय? जो सज्जड पुराव्यांनिशी तुम्हाला उघडं पाडतो, तुम्हाला जाहीरपणे चॅलेंज करतो तो तुमचा असतो म्हणून काय? मी संघाला गेल्या ३२ वर्षात अनेकवेळा उघडं पाडलं पण संघाच्या लबाड्या काही थांबत नाहीत. उद्या संघाच्या आणखी एका लबाडीबद्दल वाचा- 

संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.https://harinarke.blogspot.com/


प्रा. हरी नरके, ३०/४/२०२०



....................................
परिशिष्ट १-

Thursday, January 21, 2016
Morally improper to call Rajaram's descendants as Mahatma Phule's: Prof Hari Narke
http://www.dnaindia.com/mumbai/report-morally-improper-to-call-rajaram-s-descendants-as-mahatma-phule-s-prof-hari-narke-2167460
DNA,Online, 21 Jan.2016

Morally improper to call Rajaram's descendants as Mahatma Phule's: Prof Hari Narke
dna had published a report on January 11 on the descendants of Rajaram Phule participating in an RSS event of Shiv Shakti Sangam at Marunji village on the outskirts of Pune on January 3.
Researcher on Mahatma Phule's life and works prof Hari Narke has said it is not morally proper to project the Rajaram Phule's descendants as those of Mahatma Phule as the latter gave importance to ideological inclination than biological lineage. Narke pointed out that Mahatma Phule himself had disowned his elder brother Rajaram by registering his will.

dna had published a report on January 11 on the descendants of Rajaram Phule participating in an RSS event of Shiv Shakti Sangam at Marunji village on the outskirts of Pune on January 3. Narke said the report headline said three members of the Phule family, who are descendants of Mahatma Phule, had attended the event, which is far from reality as, Narke said, they are in no way descendants of Mahatma Phule.

He added that Mahatma Phule and his wife Savitribai had adopted the son of a Brahmin widow, who went on to become a doctor. While adopting the boy, Phule had put the condition that if the boy did not adhere to Satyashodhak Samaj principles, his wife should look for another one to adopt, Narke said, reiterating the fact that Mahatma Phule gave importance to ideological inclination rather than biological lineage.
The professor also said that Mahatma Phule's will had clearly mentioned that neither his elder brother Rajaram nor his son Ganpat could have any share in his property. "So when Mahatma Phule himself had disowned his brother, how can his brother's descendants claim to be Mahatma Phule's?" he asked.

Morally Improper To Call Rajaram's Descendants As Mahatma Phule's: Prof Hari Narke...
.............................................

परिशिष्ट -२
Monday, January 18, 2016
RSS च्या व्यासपीठावरील 'ते' फुल्यांचे वंशज नव्हेतच

http://m.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=11284626
ऑनलाइन लोकमत, सोमवार, दि.18 जानेवारी, 2016.First Published: 18-January-2016 : 13:25:00
Last Updated at: 18-January-2016 : 13:54:11
RSS च्या व्यासपीठावरील 'ते' फुल्यांचे वंशज नव्हेतच - हरी नरके
पुणे, दि १८ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात झालेल्या ' शिवशक्ती संगम' कार्यक्रमात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या वंशजांनी हजेरी लावल्याच्या बातमीवरून सध्या बरेच चर्वित-चर्वण सुरू आहे. मात्र महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक व अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगत ही बातमी वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा केला आहे.
प्रा नरके म्हणतात, ' प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला गणवेशात उपस्थित असणारे हे वंशज महात्मा फुले यांच्या कुटुंबातील नाहीत.' नरके यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे:
१) महात्मा फुले यांना मुलबाळ झालेले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतलेला होता, त्याचेही हे वंशज नाहीत.
२) जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच आज फुल्यांचे वंशज/कुटुंबिय म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
३) जो थोरला भाऊ महात्मा फुले यांच्यासोबत राहात नव्हता, जो विभक्त होता आणि स्वतंत्र होता, फुले हयात असतानाच ज्याचा मृत्यू झाला होता, त्यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीतील आजच्या सदस्यांना महात्मा फुले यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणता येणार नाही.
४) महात्मा फुले यांनी त्यांचे मृत्यूपत्र तयार करून ते २५ जुलै १८८७ रोजी ब्रिटीश सरकारच्या नोंदणी कार्यालयात नोंदवले होते. ते मी स्वत: २५ वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले: समग्र वाड्मय" या राज्य शासन प्रकाशित ग्रंथात प्रसिद्ध केले आहे. ते पृष्ठ ६३५ ते ६४८ वर उपलब्ध आहे. त्यात फुले यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केलेले आहे.
५) महात्मा फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा आजच्या मंडळींच्या पूर्वजांनी केला होता तेव्हाही तो स्वत: सावित्रीबाईंनी अमान्य केला होता. जोतीरावांच्या अंत्ययात्रेचे नेतृत्व स्वत: सावित्रीबाईंनी केले.
६) राजाराम फुले यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीने कोणत्या संघटनेत काम करावे याचे त्यांना स्वातंत्र्य आहे, मात्र त्यांनी आपण महात्मा फुल्यांचे कुटुंबिय/ वारसदार म्हणून दावा करणे उचित नाही.

uesday, January 12, 2016
ते फुल्यांचे वारस नव्हेत!....
............................................

परिशिष्ट ३
आय.बी.एन.लोकमतवरील बेधडक कार्यक्रमाची लिंक-
https://www.youtube.com/watch?v=NjL7LqCqBzE
bedhadak 12 Jan 16 on Mahatma Phule family's 4th, 5th generation and RSS show
News18 Lokmat
23 K views 4 years ago

......................................................................

परिशिष्ट-४
माझा त्यावेळी लिहिलेला ब्लॉग-
1. स्वत: सावित्रीबाई व महात्मा फुले यांना मूलबाळ झाले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला होता.त्याला त्यांनी डॉक्टर केले.पण आपला वारसा त्याच्याकडे सोपवतानाही त्याला काही अटी घातल्या. त्यावरून स्पष्ट होते की फुले जैविक वारसा महत्वाचा मानत नव्हते तर वैचारिक वारसा महत्वाचा मानत होते. हे लोक डॉ.यशवंत जोतीराव फुले यांचेही वंशज/ वारस नाहीत. ते जोतीरावांच्या भाऊबंदापैकी असलेल्यांचे वंशज/ वारस आहेत. जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच फुल्यांचे वंशज म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न करणे हे नैतिकदृष्ट्या उचित नाही.

2. महात्मा फुले यांचे मृत्यूपत्र त्यांनी सरकार दरबारी नोंदवले होते. ते मी स्वता: 25 वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले :समग्र वाड्मयात" प्रसिद्ध केले आहे. { पाहा, पृ.635 ते 648 } त्यात फुल्यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केले आहे. आज याच घराण्यातील मंडळी फुल्यांचे वारसदार म्हणून मिरवित आहेत हे अनैतिहासिक होय.

3. आपला मयत भाऊ राजाराम व आपण स्वतंत्र होतो, तो आता वारलेला आहे पण त्याच्या मुलाचा गणपतचा आपल्या मालमत्तेवर हक्क किंवा दावा नाही. तसेच तो आपला वारस नाही असे फुले यात नोंदवतात. फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा भाऊबंध आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा करू लागले तेव्हा तो सावित्रीबाईंनी अमान्य केला व स्वत: अंत्ययात्रेचे नेतृत्व केले. तेव्हा जे भाऊबंद कधीच फुल्यांसोबत नव्हते ते जर आपण फुल्यांचे वारस आहोत असा दावा करीत असतील तर ते हास्यास्पद आहे.

4. फुल्यांचे वैचारिक वारसदार डा. बाबासाहेब आंबेडकर, म.वि.रा.शिंदे, रा. शाहू, कर्मवीर भाऊराव आणि ना.म.लोखंडे, केशवराव विचारे हे होते. पुढच्या काळात हा वारसा गं.बा.सरदार,य.दि.फडके, गो.पु.देशपांडे, बाबा आढाव, भा.ल.भोळे, शरद जोशी, रावसाहेब कसबे, भालचंद्र नेमाडे आदींनी पुढे नेला.

जे कधीच फुल्यांच्या चळवळ व विचारांसोबत नव्हते ते फुल्यांच्या मृत्यूनंतर 125 वर्षांनी आज अचानक वारसा सांगायला पुढे सरसावले आहेत.

त्यांनी कोणत्या संघटनेत जावे हे त्यांचे स्वातंत्र्य आहे पण ते फुल्यांचे वारसदार म्हणुन प्रमाणपत्रांचे वाटप करू शकत नाहीत एव्हढेच.
.......................................

परिशिष्ट -५
मुंबई मिरर मधील लेख-
Is RSS trying to cash in on Jyotiba Phule’s legacy using wrong lineage
12 january 2016 mumbai mirror

Read more at:

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/is-rss-trying-to-cash-in-on-jyotiba-phules-legacy-using-wrong-lineage/articleshow/50541087.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppsthttps://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/is-rss-trying-to-cash-in-on-jyotiba-phules-legacy-using-wrong-lineage/articleshow/50541087.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/is-rss-trying-to-cash-in-on-jyotiba-phules-legacy-using-wrong-lineage/articleshow/50541087.cms
................................................

Tuesday, April 28, 2020

महात्मा फुल्यांना देशद्रोही म्हणणारे भिडे मोदी फडणविसांचे लाडके कसे?, रा.स्व.संघ 13














महात्मा फुल्यांना देशद्रोही म्हणणारे भिडे मोदी फडणविसांचे लाडके कसे?- प्रा. हरी नरके

२००७ साली मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा फुल्यांवर गरळ ओकले. सनातन प्रभातमध्ये बातमी आली की महात्मा फुले हे देशद्रोही होते असे भिडे म्हणाले. ही मुक्ताफळे प्रकाशित झाल्यानंतर मी काही लोकांशी बोललो. ओबीसी म्हणजे तमाम थंड आणि बत्थड लोक. कोणाचीच काहीही प्रतिक्रिया दिसली नाही.

त्याच दिवशी मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा पुरूषोत्तम खेडेकरांचा निवृत्तीसमारंभ होता.त्यांनी आग्रहाने बोलावले म्हणून मी गेलो. पुण्याच्या अल्पबचत भवनमध्ये निरोप समारंभ होता. कार्यक्रमाला त्यावेळचे शिक्षण मंत्री वसंत पुरके, [काँग्रेस] राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे, [राष्ट्रवादी] भाजपाचे पांडुरंग फुंडकर, आय.पी.एस. अधिकारी विश्वास नांगरे पाटील असे अनेक दिग्गज मंचावर उपस्थित होते. माझ्या भाषणात मी मनोहर भिड्यांच्या महात्मा फुले विषयक संतापजनक वक्तव्याचा ती बातमी सर्वांना दाखवून जाहीर निषेध केला. मात्र निरोपाच्या जल्लोशात त्यावर प्रतिक्रिया द्यायच्या मूडमध्ये कोणीही नव्हते.

मी नंतरही अनेकांशी बोललो. उपयोग झाला नाही. एकहाती लिहित राहिलो. बोलत सुटलो. ज्यांच्या विरोधात बोलत-लिहित होतो त्या भिड्यांनी मात्र खुन्नस ठेवली.

बहुजन समाजाचं एकूण खूप कठीण प्रकरण आहे. जिथं जोतीराव-सावित्रीबाईंची सून [दत्तक पुत्र यशवंतची बायको] पुण्यात खडक माळ आळीत बेवारस म्हणून मेली. तिची मयत पुणे नगरपालिकेने केली. हाकेच्या अंतरावर जेधे मॅन्शन म्हणजे महात्मा फुल्यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक चळवळीचे पुढे ब्राह्मणेतर चळवळीत रूपांतर झाले होते, त्या ब्राह्मणेतर चळवळीचे नेते केशवराव जेधे यांचे निवासस्थान तसेच कार्यालय होते. तेव्हा १९३० साली चळवळ जोरात होती.

त्यांनी तिच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले असेल असे मी म्हणणार नाही. नसेल आले लक्षात. तीही भिक मागून जगली. विनातक्रार मरून गेली. तिच्या पोटच्या लग्न झालेल्या मु्लीनं जिथं आईच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली नव्हती, तिथं इतर कुणी का मदतीला यावं ना? बहुजन समाज बिचारा आपापले संसार, देवदेव, बायकामुलांचे वाढदिवस आणि कशाकशात बिझी असतो. त्याला तरी काय दोष देणार ना? सगळे लोक रोजीरोटीच्या शोधात, संपुर्ण थंड, आत्ममग्न, स्वत:चा इतिहास माहित नसलेला, कोणतीही महत्वाकांक्षा नसलेला, मुर्दाड समाज. बहुजन हा या पृथ्वीतलावरचा विलक्षण प्राणी आहे.

त्यांच्या मेंदूत निसर्गाने मेमरी इरेज [ डिलीट] केलेले सॉफ्टवेअर बसवलेले असल्याने त्यांना विस्मरणाचे अतोनात वरदान लाभलेले असते.

या देशात जे स्वत:ची जात सोडून राबतात, त्यांच्या मदतीला लोक येतात का? की घर का न घाट का अशी त्यांची अवस्था होते? फुल्यांचा किंवा शिंद्यांचा विषय निघाला की लोक म्हणतात, बघतील त्यांचे समाज. बघा ना महर्षि वि.रा.शिंदे यांना आपण किती सहज विसरलो. राजर्षि शाहू छत्रपतीही पंधरावीस वर्षांपुर्वीपर्यंत दु्र्लक्षितच तर होते.

फुलेही बाबासाहेबांनी जवळ केले म्हणून आज जे काही दिसतात, अन्यथा आजवर आपला समाज फुल्यांन ठार विसरूनसुद्धा गेला असता. लोकांचंही काय चुकतंय? फुल्यांनी काय माळी महासंघ काढला होता? नाही ना! उलट माळी म्हणतात, त्यांनी आमच्यासाठी कुठं काय केलं? हे खरंय की फुल्यांनी एकट्या माळ्यांसाठी काहीच केलं नाही. कधीकधी वाटतं फुले तुम्हारा तो चुक्याच.

माणसानं कसं आपापल्या जातीपुरतं बघावं. खरंतर स्वत:पुरत बघावं. आपलं घर, आपला संसार. बायकापोरं. बाकी सगळं झूट. समाज, कृतज्ञता, भविष्य,... गये भाडमें.













तर हेच आंबापुत्र, मनुसमर्थक मनोहर भिडे मोदी-फडणविसांना परमवंदनीय आहेत. फडणवीस-मोदी पाच वर्षे महात्मा फुले यांना भारतरत्न द्यायचं गाजर दाखवित राहिले. २०१९ च्या निवडणुकीआधी फडणवीस सरकारनं म्हणे केंद्राला शिफारस केली, महात्मा फुले नी स्वा. सावरकरांना भारतरत्न द्या म्हणून. द्यायचं नव्हतंच. फक्त निवडणूक स्टंट करायचा होता. आजच एक मित्र सांगत होता, कोणा संघोट्या उपाध्यायनं म्हणे त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. एकट्या सावरकरांना भारतरत्न द्या. तो देशद्रोही फुले त्यांच्या सोबत नको.


प्रा.हरी नरके, २९/४/२०२०

Sunday, April 12, 2020

महात्मा फुले यांच्या लेखनाची समग्रता आणि संपादक प्रा.हरी नरके








महात्मा फुले यांच्या लेखनाची समग्रता- प्रा. केदार काळवणे

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले हे समताकेंद्री आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत. ते सामाजिक क्रांतिकारक,समाजशिक्षक,सर्जनशील लेखक आणि कृतिशील विचारवंत होते.प्रस्थापित परंपरागत व्यवस्थेविरूध्द रचनात्मक विद्रोही भूमिका घेणारे आणि सनातनशास्र मोडीत काढत नव्या समाजव्यवस्थेची मागणी करणारे थोर समाजसुधारक म्हणून त्यांचे कार्य अक्षर ठरलेले आहे.शोषित समूहांचे नायक म्हणून त्यांनी लढलेले सामाजिक युध्द समानतेचे मूल्य रूजवण्यासाठी मोलाचे ठरले आहे.स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारलेल्या आजच्या सर्व प्रकारच्या लोकशाहीची बीजभूमी ही एकोणिसाव्या शतकातील महात्मा फुले यांचे ऐतिहासिक क्रांतिकार्य हीच आहे.

या क्रांतिकार्याला अनेकविध पैलू आहेत.जातवर्णवर्गस्रीदास्यमुक्तीसाठीचा संघर्ष,धर्मचिकित्सेतून नवधर्मतत्त्वज्ञानाची पुनर्मांडणी आणि पर्यायी संस्कृती निर्माणाची पायाभरणी करणारे इहवादी समाजचिंतक म्हणून हे कार्य मानवतेचा परीघ व्यापक करणारे ठरलेले आहेत.त्यांचे जीवन,कार्य आणि साहित्य यात कमालीची एकवाक्यता-एकरूपता होती.म्हणूनच हे लेखन महत्त्वाचे ठरलेले आहे. सार्वकालिक जीवनतत्त्वे आणि वैश्विक मूल्यांचे प्रकटीकरण,समकालीन सामाजिक वास्तवाची जनकेंद्री अभिव्यक्ती,तत्कालीन शोषणाची सामाजिक-सांस्कृतिक परिप्रेक्षात परखड मीमांसा,इतिहास व वर्तमानाचा विवेकवादी अन्वयार्थ,वाचकांवर वैचारिकतेचा सखोल संस्कार करणारे,लेखक व वाचकांना प्रेरक ठरणारे,लेखन परंपरा निर्मिणारे आणि बहुसंख्यांच्या लोकभाषेचा माध्यम म्हणून वापर या कारणांनी हे लेखन अभिजात ठरलेले आहे.त्यांचे सर्व लेखन‘महात्मा फुले समग्र वाड्मय’या ग्रंथात उपलब्ध आहे.

महात्मा फुले यांच्या समग्र वाड्मयाचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे १९६९ साली प्रथम प्रकाशन झाले होते.धनंजय कीर व स.गं.मालशे त्याचे संपादक होते.मंडळाच्या वतीने सहा आवृत्त्या प्रसिध्द झालेल्या आहेत.या संपादनात य.दि.फडके यांचाही मोलाचा वाटा आहे.’तृतीय रत्न ‘(१८५५)हे मराठीतले पहिले आधुनिक नाटक,‘पवाडा:छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा’ (१८६९) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले बहुजनवादी मराठी काव्यचरित्र,सांस्कृतिक शोषणाची मीमांसा करणारे ब्राम्हणांचे कसब(१८६९) व गुलामगिरी (१८७३) हे गद्यलेखन;भारतीय शेतकर्यांचा आक्रोश प्रथमच मांडणारा‘शेतकर्याचा असूड’(१८८३) हा कथा-निबंधात्मक ग्रंथ आणि सत्य व नितीवर आधारलेल्या वैश्विक धर्माचे तत्त्वज्ञान विशद करणारा‘सार्वजनिक सत्यधर्म’ (प्रकाशन:१८९१)या तत्त्वज्ञान ग्रंथासह अखंडात्मक काव्यरचना व इतर उपलब्ध लेखनाचा अंतर्भाव या समग्र वाड्मयात केलेला आहे.

हे वाड्मय मराठी साहित्यातले अक्षर साहित्य आहे.बहुजनांचे क्रांतिविज्ञान त्यातून साकार झाले आहे.भारतीय शोषित समूहाच्या आवाजाचे अनेकविध स्वर नि स्तर-अस्तर त्यामधून उजागर झाले आहे.जागतिक वाड्मयातही या लेखनाचे श्रेष्ठत्त्व अधोरेखित झाले आहे.गेल्या पन्नास वर्षात या ग्रंथाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या.१९९१ साली महात्मा फुले स्मृतीशताब्दी निमित्ताने काढलेली य.दि.फडके संपादित आवृत्ती विकत घेण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या.त्यावेळी पु.ल.देशपांडे, गोविंद तळवलकर,राम बापट,डाॅ.श्रीराम लागू, ना.धो.महानोर,शंकरराव खरात,रा.चिं.ढेरे यांनी रांगेत उभे राहून हा ग्रंथ विकत घेतला होता.२००६ साली निघालेली आवृत्तीही हातोहात संपली.या ग्रंथाची मागणी होत होती.ती मागणी १२ वर्षानंतर २०१८ साली पूर्ण झाली.

महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती,महाराष्ट्र शासन यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्ताने त्यांच्या समग्र वाड्मयाची सुधारित आवृत्ती २०१८ साली प्रसिध्द झालेली आहे.ही समितीची प्रथमावृत्ती आहे.८६२ पृष्ठांच्या या आवृत्तीचे साक्षेपी संपादन फुले-शाहू-आंबेडकर यांच्या लेखन-विचाराचे अभ्यासक प्रा.हरी नरके यांनी केलेले आहे.ही आवृत्ती अनेकार्थाने महत्त्वपूर्ण आहे.जवळपास दोनशे पृष्ठांचा अलक्षित व दुर्मिळ मजकूराचा समावेश या आवृत्तीत केलेला आहे.तो फुले अभ्यासक-वाचकाला उपयुक्त ठरणारा आहे.

यात यशवंत फुले यांनी लिहिलेले महात्मा फुले यांचे आद्य चरित्र,त्यांची सामाजिक पत्रकारिता, त्यांनी कमिशनर म्हणून केलेले काम, सत्यशोधक चळवळीतील ऐतिहासिक दस्तऐवज,महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याशी केलेला पत्रव्यवहार,विश्राम रामजी घोले,केशवस्वामी व्यंकय्या अय्यावरू,रत्नाम्माबाई अय्यावरू यांनी महात्मा फुले यांच्या लेखन आणि कार्यासंबंधी दिलेले अभिप्राय,त्यांच्या मूळ लेखनाच्या प्रस्तावना आदी लेखन समाविष्ट केलेले आहे.या ग्रंथाला प्रा.हरी नरके यांनी एकतीस पृष्ठांचे चिकित्सक संपादकीय लिहिलेली आहे.महात्मा फुले यांच्या समग्र कार्य आणि लेखनाचा अर्करूपी गाभी तीमधून विशद झाला आहे.महात्मा फुले यांचे कार्य समजून घेताना हे संपादकीय मोलाचे ठरते.महात्मा फुले यांच्या कार्याची महत्ता तीमधून ध्वनित झालेली आहे.

प्रा. नरके पहिल्या आवृत्तीपासून या ग्रंथाशी संबंधीत आहे.तसेच त्यांनी महात्मा फुले यांच्या संबंधीचे मौलिक संशोधनही केलेले आहे.त्यामुळे ही आवृत्ती त्यांनी अधिक परिपूर्ण करत अद्यावत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.महात्मा फुले यांचे आजपावेतो उपलब्ध असणारे ललित-वैचारिक समग्र लेखन,महत्त्वाचा पत्रव्यवहार, त्यांच्या कार्यासंबंधीची विविध कागदपत्रे,विविध ग्रंथाच्या प्रस्तावना,मूळ छायाचित्रे, तत्कालीन वर्तमानपत्रातील बातम्या, महात्मा फुले यांचा जीवनपट, संदर्भ टीपा,निवडक शब्दांचा कोश आणि संदर्भ सूची यांचा समावेश या ग्रंथात असल्याने हा ग्रंथ परिपूर्ण वाटतो.

महात्मा फुले समजून घेण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व साहित्य या ग्रंथात समाविष्ट केलेले आहे.ही सामग्री विविध ज्ञानशाखांच्या अभ्यासकांना साह्यभूत ठरणारी आहे.हा ग्रंथ इतिहास लेखनाचे विश्वसनीय साधन आहे.या आवृत्तीत समाविष्ट केलेला ऐवज ऐतिहासिक दस्तावेज आहे.प्रा.नरके यांनीच महात्मा फुले यांची खरी जन्मतारीख आणि खरे छायाचित्र शोधून काढलेले आहे.महात्मा फुले यांच्या कार्य-लेखनाचा प्रचार-प्रसार मागील तीस वर्षात त्यांनी सातत्याने केलेला आहे.त्यांच्याच प्रयत्नातून महात्मा फुले यांचे समग्र वाड्मय  इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलगू, तामिळ, बंगाली, उर्दू, गुजराती अशा तेरा भाषेत अनुवाद  झालेले आहे.इतर नऊ भाषेतील अनुवादाचे काम सुरू आहे.म्हणून त्यांनी संपादित केलेल्या प्रस्तुत आवृत्तीला मूल्य प्राप्त झालेले आहे.
   

महात्मा फुले यांचे समग्र लेखन हे विषमतामुक्त समाजनिर्मितीचे तत्त्वज्ञान आहे.‘माणूस’आणि त्याच्या लौकिक सुखाचा शोध या लेखनाने घेतलेला आहे.मानवमुक्तीचा जाहिरनामा म्हणून हे लेखन महत्त्वाचे आहे. श्रेष्ठ मानवी मूल्यांचा जागर या लेखनाने घडविलेला आहे.समकालीन सामाजिक वास्तव आणि इतिहासगत सांस्कृतिक संघर्ष या लेखनातून समोर आलेला आहे.सामाजिक समताविचार हे या लेखनाचे केंद्रसूत्र आहे.शेती,उद्योग,शिक्षण,समाज-संस्कृती, इतिहास, धर्म, साहित्य,भाषा आदी व्यवस्थासंबंधीचे मूलगामी आणि व्यवस्था परिवर्तनाचे मूल्ये असलेले मानवतावादी चिंतन यातून प्रकट झालेले आहे. सामाजिक समता,स्वातंत्र्य,बंधुता,न्याय,सत्य,निती,प्रेम आदी वैश्विक मूल्यांचा अविष्कार या लेखनातून झालेला आहे.

परकीय अभिजनांनी(आर्य)येथील मूलनिवासी बहुजनांना अज्ञानी ठेवून सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, मानसिक गुलाम केले.त्यांचे ‘माणूस’म्हणून अस्तित्त्व नाकारून आपले वर्चस्व प्रस्थापित करत शोषण केले.याची परखड आणि चिकित्सक मीमांसा आधुनिक काळात प्रथमच महात्मा जोतीराव फुले यांनी केली.त्यांचे हे समग्र लेखन अभिजनांचा बुरखा फाडणारे आणि बहुजनांना सत्याची जाणीव करून देणारे असे आहे.म्हणूनच आपल्या सांस्कृतिक परंपरेकडे बघण्याची नवी दृष्टी देणारे हे लेखन महत्वाचे आहे.महात्मा फुले यांच्या लेखनाची ही समग्रता कोणत्याही काळातील समाजपुनर्रचनेसाठी उपयुक्त ठरणारी आहे.

- केदार काळवणे,सहायक प्राध्यापक, मराठी विभाग, शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब, जि. उस्मानाबाद. पिन:४१३५०७, ईमेल: kedar.kalwane.28@gmail.com          मो: ७०२०६३४५०२

‘आपलं महानगर’या वर्तमानपत्रातील ‘सारांश’पुरवणीतील आजचा लेख.
••••••••••••••••••••••••••

Saturday, April 11, 2020

जोतीरावांना चुकुन लागली दाढी, दुरूस्तीला ६५ वर्षे : फुले पुतळ्यासाठी ४४ वर्षे संघर्ष - प्रा. हरी नरके










महात्मा फुले म्हटले की फेटा किंवा फुले पगडी आणि दाढी हे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. महात्मा फुल्यांना दाढी नव्हती. ती एका चित्रकाराच्या चुकीनं लागली.

आपल्या भारतीय समाजात एखादी गोष्ट रुजायला फार काळ जाऊ द्यावा लागतो आणि जर रुजलेली गोष्ट चुकीची असेल तर ती गोष्ट दुरूस्त करायलाही फार झटावं लागतं.
एका चित्रकाराच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळं महात्मा फुल्यांना दाढी चिकटली आणि ती काढायला ६५ वर्षे लागली.

त्याचं असं झालं.....

जोतीराव १८९० च्या २८ नोव्हेंबरला गेले. त्यानंतर त्यांची छोटी चरित्रं अनेकांनी लिहिली. मात्र त्यांचं विस्तृत आणि सप्रमाण चरित्र लिहिण्याचा संकल्प सत्यशोधक पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी सोडला. ते विदर्भातले चिखलीचे. ते महाराष्ट्रभर फिरले. त्यावेळी हयात असलेल्या सर्व फुलेवाद्यांना ते प्रत्यक्ष भेटले. त्यांच्याकडून फुल्यांच्या आठवणी लिहून घेतल्या. चरित्राचे दस्तावेज जमा केले. पाटलांनी खूपच मेहनत घेतली.

१९२७ साली जोतीरावांची जन्मशताब्दी होती. त्यावर्षात हे पुस्तक प्रकाशित करायचा त्यांचा निर्धार होता.
पुस्तकाची छपाई पुण्याच्या छापखान्यात चालू होती. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर जोतीरावांचा फोटो छापण्यासाठी ते फोटोची शोधाशोध करू लागले. त्यांना मिळालेले सर्वच फोटो हे कॉपिंगवरून  कॉपिंग केलेले असल्यानं त्यात अस्पष्टपणा आलेला होता.

जोतीरावांना आपला भाऊ मानणार्‍या एका महिलेकडं अस्सल फोटो असल्याचं पाटलांना समजलं. तिच्याकडं फोटो होता, पण तो देव्हार्‍यात ठेवलेला होता. तिनं एक दिवसासाठी पाटलांना तो दिला. त्या फोटोला अनेक वर्षे गंध, हळदकुंक लावल्यानं आणि दुधानं धुतल्यानं ओघळ आलेले होते. त्याकाळात स्वयंपाक चुलीवर केला जायचा त्या धुरानंही तो फोटो काळपट पडलेला होता. पाटलांनी फोटो मुखपृष्ठकाराला दिला. त्यावरून चित्र काढताना जोतीरावांच्या चेहर्‍यावरचे पाण्याचे ओघळ म्हणजे दाढी असावी असा चित्रकाराचा गैरसमज झाला.
फुल्यांनी तरूणपणात दाढी राखलेली होती परंतु पुढे त्यांनी ती काढून टाकली. ते मोठे व्यापारी, कंत्राटदार, पुण्याचे आयुक्त आणि पुणे कमर्शियल अ‍ॅंड कॉट्रॅंक्टीग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. ते अतिशय टापटीपीनं राहायचे. मात्र त्याकाळात आजच्यासारखी कटिंग सलून्स नसायची. दर चार दिवसांनी केस कापणारे नाभिक घरोघर जावून केस कापायचे.

जोतीरावांच्या चेहर्‍यावर दोन दिवसाचे खुंट वाढलेले होते. चित्रकारानं पठ्ठ्यानं त्याची रितसर दाढीच बनवून टाकली.

पंढरीनाथ पाटलांची बहीण गावी वारल्याची त्यांना तार आल्यानं पाटील गावी चिखलीला गेले.
इकडं मुखपृष्ठ छापून तयार झालं. पुस्तकाची बांधणीही झाली. पाटलांना पुस्तक थेट प्रकाशन समारंभातच बघायला मिळालं.

चित्रकाराची ती चुक ६५ रूजली. ती दुरूस्त करताना माझ्या नाकी नऊ आले. दरम्यान त्या चित्रावरून अनेकांनी तैलचित्रे तयार केली होती. महाराष्ट्र शासनानं सुद्धा असंच एक बटबटीत तैलचित्र करून घेऊन सर्वत्र लावलेलं होतं. तेही अनेक ठिकाणी रूजलं होतं. हे सारं दुरूस्त करणं सोपं काम नव्हतं. १९८९ पासून प्रक्रिया सुरू करून तिची पुर्तता व्हायला १९९३ साल उजाडावं लागलं. पाटलांनी जमवलेल्या त्या आठवणींचं संकलन केलेलं पुस्तक मी १९९३ साली "आम्ही पाहिलेले महात्मा फुले" या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेलं आहे.

१८ एप्रिल १८८४ ला जोतीरावांनी काढलेल्या त्यांच्या या फोटोची काचेची एक फूट बाय एक फूट अशी मोठ्ठी निगेटिव्ह मिळाली. त्यावरची धूळ झटकून त्यावर बरीच तांत्रिक मेहनत करावी लागली. पुण्याचे सत्यशोधक गोपीनाथराव पालकर यांच्या वाड्यात त्यांच्या वडलांच्याकडे एकुण सुमारे २०० निगेटिव्हज होत्या.
फोटोग्राफर विजय व सरोजा परूळकर यांच्याकडून तांत्रिक प्रक्रिया करून घेण्यात यश आलं.

डॅा. बाबा आढाव यांचं प्रमुख मार्गदर्शन मिळालं. छायाचित्रकार प्रा. गजानन शेपाळ आणि शासकीय फोटोझिंको मुद्रणालयाचे व्यवस्थापक सय्यद यांचे तांत्रिक सहकार्य मिळवून मला हे छायाचित्र एकदाचं शासनातर्फे प्रकाशित करता आलं. अर्थात मंत्रालयातल्या काही सनातनी बांबूनी बरेच अडथळे आणायचा आणि या कामाला कोलदांडा घालायचा प्रयत्न केला. श्री छगन भुजबळ यांच्यामुळे त्या आघाडीवर यश मिळवता आले. यापुढं तरी हेच अधिकृत कृष्णधवल छायाचित्र सर्वत्र लावलं जाईल याची आपण दक्षता घ्यायला हवी.

पुणे हे पुतळ्यांचे शहर आहे. जगातील सर्वाधिक पुतळे पुण्यात आहेत असे सांगितले जाते. असतील. पण ते जसं पुतळ्यांचं, विद्येचं, संस्कृतीचं केंद्र आहे तसंच तो सनातन्यांचाही अड्डा आहे.

मला इतिहासात रमायला फारसं आवडत नाही. पण काही ऎतिहासिक घटना अशा असतात की त्यांची माहिती नव्या पिढीला व्हायलाच हवी. १९२० साली लोकमान्य टिळक गेले. त्यांचा पुतळा पुण्याच्या रे मार्केटमध्ये [ आताची महात्मा फुले मंडई ] बसवण्यात आला. तिथेच सनातन्यांचे शंकराचार्य असलेल्या विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचाही अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला. सत्यशोधक केशवराव जेधे तेव्हा पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. या दोन पुतळ्यांच्या पार्श्वभुमीवर त्यांनी पुणे नगरपालिकेकडे एक ठराव पाठवला.

महात्मा फुले पुणे नगरपालिकेचे आयुक्त होते, त्यांचा पुतळा नगरपालिकेने उभारावा अशी त्यांनी त्यात मागणी केली. सनातनी पुण्यात एखादा बॉम्बस्फोट व्हावा तसा हलकल्लोळ माजला. पुणे न.पा. तेव्हा टिळक गटाच्या ताब्यात होती. डेक्कन जिमखाण्यावरचा आपटे रोड ज्यांच्या नावाने आहे ते आपटे न.पा. अध्यक्ष होते.

जेधे, जवळकर हे तरूण, आक्रमक आणि लढाऊ नेते होते. त्याकाळात सनातन्यांनी महात्मा फुल्यांचे चारित्र्यहनन करण्यासाठी अत्यंत किळसवाणा मजकूर असलेल्या चोपड्या प्रकाशित केल्या. नानाप्रकारे महात्मा फुल्यांची बदनामी करण्यात आली. असे हे कृतघ्न लोक. श्री. गणपतराव नलावडे व श्री. वि. म. फुले यांच्या खांद्यावर बंदुका ठेऊन या चोपड्या छापण्यात आल्या होत्या. त्या धादांत खोट्या होत्या. विकृत होत्या. त्यावर लेखक म्हणून या बहुजनातल्या दोघांची नावे असली तरी त्यांचे असली लेखक "सदाशिव पेठेतले" होते. साधे पत्रही धड लिहिता न येणारे हे दोघे. ते काय डोंबलाचे पुस्तकं लिहिणार? तिसरे असेच एक घाऊक लेखक म्हणजे चिं. ग. ओक होत. हे मात्र खरेच लेखक होते. हिंदू महासभेचे मामाराव दाते या कामात पुढे होते. नासक्या आंब्याच्या रेशीमकिड्यांचे हे पुर्वज. यांचेच वारसदार म्हणजे बाळ गांगल आणि दंगलबाज किडेगुरूजी.

गणपतराव नलावडे यांच्यामते महात्मा फुले वाईट होते,  का तर ते कोट घालत होते. ब्रिटीश लोक कोट घालायचे. म्हणून फुले ब्रिटीशधार्जिणे. म्हणून वाईट! कालच्या माझ्या पोस्ट वर यांनी शाखेमध्ये केस भादरावेत तसे मेंदू भादरलेला एक किडा लिहितो, " पण तो फुले ख्रिस्ती होता ना?" किती भयानक विष भरलेय यांनी बहुजनांच्या मेंदूत.

आता खुद्द स्वा. सावरकर, लोकमान्य टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि हेडगेवार हे सगळेच कोट घालायचे. पण कोटावरून फुल्यांवर फुली मारताना नलावड्यांना हे सुचले नाही. असे हे विकृत सनातनी.

महात्मा फुले यांच्या बदनामीसाठी जातीयवाद्यांनी त्यांचा वापर करून घेतला. त्या बदल्यात वि. म. फुल्यांना पुण्याचे नगरसेवक केले गेले. नलावड्यांना तर महापौरपद दिले गेले. कुर्‍हाडीचे दांडे गोतास काळ. क्षणिक फायद्यासाठी आपण काय करतोय हे त्यांच्या डोक्यात कसे आले नसेल? श्री. विश्वनाथ महादेव फुले हे जोतीरावांचे नातू होते असे रेटून खोटे लिहिले गेले, सांगितले गेले. हा बनाव होता. त्यांचेही आडनाव फुले असले तरी त्यांचा जोतीरावांशी नातू वगैरे असला काहीही संबंध नव्हता.

ते चुलतनिलत घराण्यातले होते. त्यांचे पुर्वज कायम महात्मा फुले यांच्या विरोधी छावणीत राहिलेले. थोडक्यात ते महात्मा फुल्यांचे भ्रष्ट असे सामाजिक परिवर्तनाला विरोध करणारे भाऊबंद होते. महात्मा फुल्यांच्या वडीलांची जमीन त्यांच्या निरक्षरतेचा गैरफायदा घेऊन वि. म. फुलेंच्या आजोबांनी हडप केलेली होती. त्यामुळे ते घराणे आणि जोतीराव यांच्या घराण्यामध्ये भाऊबंदकीचे वाद - वैर होते. शिवाय जोतीरावांना मूळबाळ नसल्याने वि. म. फुल्यांचा जोतीरावांच्या इस्टेटीवर डोळा होता. पण जोतिराव-सावित्रीबाईंनी यशवंतला दत्तक घेतल्याने या भाऊबंदांचा डाव उधळला गेला. म्हणुन ते जोतिरावांवर जळत होते. ते घराणे सनातन्यांचे हस्तक होते. अंधश्रद्धाळू आणि कडवे जातीयवादी होते. ते कडक अस्पृश्यता पाळीत असत. अंगात येणे, गंडेदोरे, ताईत, कोंबडे, बकरे बळी देणे हे त्यांचे उद्योग महात्मा फुल्यांना पटणेच शक्य नव्हते.

 सनातन्यांनी बक्षीस म्हणून वि.म. उर्फ बाबूराव फुल्यांचे नाव सदाशिव पेठेतील महाराष्ट्र साहित्य परिषदेसमोरील चौकाला दिलेले आहे. महात्मा जोतीराव फुल्यांच्या पुतळ्याला सातत्याने ४४ वर्षे विरोध करणारे सनातनी या वि. म. फुलेंचे नाव मात्र एका चौकाला तात्काळ देतात यातच सगळे आले. ही महात्मा फुल्यांच्या बदनामीबद्दलची बक्षिसी होती.

वि. म. फुल्यांच्या या चोपड्यांची तीव्र प्रतिक्रिया आली. त्यांना सनातन्यांचे बगलबच्चे म्हणून समस्त माळी समाजाने जातीबहिष्कृत केलेले होते.

{ माझ्यामते जाती बहिष्कार ही चुकीचीच कृती होती } पण सामान्य माणसांचा तो आक्रोश होता.

पुढे काही वर्षांनी आपल्या नावावर जोतीरावांबद्दल खोटेनाटे लिहून छापले गेले होते अशी कबुली देऊन त्यांनी माळी समाजाची जाहीर माफीही मागितली होती. त्यांच्या मुलानेच मला व य.दि.फडके यांना ही माहिती सांगितली. त्याची नोंद मी माझ्या पुस्तकात ३० वर्षांपुर्वीच केलेली आहे. आपल्या नावाचा वापर करून हे चोपडे लिहण्यात आले असे त्यांनी जाहीरपणे सांगितल्यामुळे सनातन्यांचे बिंग फुटले. ह्या बदनामीकारक पुस्तिकेचा खरपूस समाचार मी माझ्या "महात्मा फुले यांची बदनामी:एक सत्यशोधन " या पुस्तकात ३० वर्षांपुर्वीच घेतलेला आहे. ख्यातनाम संशोधक डॉ. य.दि.फडके यांनी माझ्या या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत माझ्या मतांना दुजोराही दिलेला आहे.

महात्मा फुल्यांच्या बदनामीची महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया आली. बहुजन समाजातील हमालांनी महात्मा फुले मंडईतील विष्णूशास्त्रींचा पुतळा हटवा अशी मागणी  केली. आंदोलन पेटले. शेवटी सनातन्यांना माघार घ्यावी लागली. तो पुतळा तिथनं काढून न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आणून बसवावा लागला. दरम्यान आचार्य अत्र्यांनी रे मार्केटला महात्मा फुल्यांचे नाव दिलेले होते.

जेधे जवळकरांनी या बदनामीकारक चोपड्यांना "देशाचे दुश्मन" हे छोटे पुस्तक लिहून जशास तसे उत्तर दिले. जेधे जवळकरांवर बदनामीचा खटला भरण्यात आला. या चोपड्यांबद्दल नलावडे आणि वि.म. फुले यांच्यावरही बदनामीचे खटले टाकले गेले. ब्रिटीश न्यायाधिशांनी जेधे जवळकरांना दोषी ठरवले. तुरूंगात पाठवले. मात्र तशाच कामांबद्दल नलावडे व वि. म. फुले यांना मुक्त केले गेले. हा ब्रिटीश न्यायाधिशांचा पक्षपात वरच्या न्यायालयात बॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केला आणि वरिष्ठ न्यायालयाने जेधे जवळकरांना निर्दोष मुक्त केले.

महात्मा फुल्यांचा पुतळा पुण्याऎवजी कोल्हापूरला बसवावा असा सल्ला नगरपालिकेतल्या टिळक पक्षीय सनातन्यांनी दिला होता. पुढे महात्मा फुले यांच्या पुतळ्यासाठी ४४ वर्षे सातत्याने संघर्ष झाला. अखेर ३१ मे १९६९ ला यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पुणे म.न.पा.च्या प्रांगणात महात्मा फुले यांचा पुर्णकृती पुतळा बसवण्यात आला. पण त्याचा खर्चही म.न.पा.ने केला नाही. माळीनगरच्या साखर कारखान्याने हा पुतळा मनपाला भेट दिला होता. हरिभाऊ गिरमे, एल. टी.कुदळे आदींचा त्यात पुढाकार होता.

ह्या बदनामीकारक पुस्तिका सध्या पुन्हा समाजमध्यमांवर पुढे आणण्याचे कारस्थान मनुपुत्र संभाजी भिडे आणि दाभोळकर- पानसर्‍यांच्या हत्येतले सनातन संस्थेचे आरोपी करीत आहेत. एरवी हिंदू सगळे एक असे कोकलणारे हे जातीयवादी लोक कसे दांभिक असतात बघा, महात्मा फुल्यांची बदनामी करताना फुले हिंदूच होते हे मात्र हे लोक सोयिस्करपणे विसरतात. तर असा असतो यांचा सिलेक्टीव्ह हिंदूजनविचार!

हे लोक आगीशी खेळत आहेत. याची प्रतिक्रिया येणार आणि पुन्हा जातीय चिखलफेक होणार. सोबतकार ग.वा.बेहरे आणि हिंदुत्ववादी बाळ गांगल यांनी ३० वर्षांपुर्वी महात्मा फुल्यांच्या बदनामीची मोहीम हाती घेतली होती. ती त्यांच्या अंगलट आली होती. हाच खेळ पुन्हापुन्हा खेळण्याची सनातनी रेशीमकिड्यांची चिकाटी विलक्षणच म्हटली पाहिजे.

मात्र यातनं जातीय दुही वाढते. सामाजिक सलोखा नष्ट होतो. एकात्मतेचा विचार मागे जातो हे मनुपुत्र श्री. संभाजी भिडे, सनातनचे आणि हिंदू जनजागरणवाले लोक लक्षात घेतील काय?

मित्रहो, आज जयंतीदिनी महात्मा फुल्यांना अभिवादन करून मोकळे होऊ नका. ह्या जातियवादी रेशीमकिड्यांना रोखण्याच्या कामात तुमचा काय सहभाग असणार आहे तेही सांग आणि मुख्य म्हणजे कामाला लागा. तरच तुमच्या या अभिवादनाला काही अर्थ असेल.

- प्रा. हरी नरके, ११ एप्रिल २०२०

संदर्भासाठी पाहा:
** *  प्रा हरी नरके, महात्मा फुले - यांची बदनामी, एक सत्यशोधन, सुगावा प्रकाशन, पुणे, मार्च १९८९

** * पंढरीनाथ सीताराम पाटील, महात्मा फुले यांचे चरित्र, पुणे, १९२७

*** संपादक-प्रा हरी नरके, आम्ही पाहिलेले महात्मा फुले, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९३, २०१९ 

Wednesday, April 8, 2020

उद्योगपती आणि नेशन बिल्डर महात्मा जोतीराव फुले : प्रा. हरी नरके





उद्योगपती आणि नेशन बिल्डर महात्मा जोतीराव फुले : प्रा. हरी नरके
११ एप्रिल २०२० रोजी महात्मा जोतीराव फुले यांची १९३ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने -
जोतीराव 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे [Pune commercial & contracting Company] कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामं केली. जोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही. जोतीराव हे स्वत:च्या तेलानं जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते. वर्गणीवर समाजकार्य करण्याची प्रथा तोवर निर्माण झालेली नव्हती. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून त्यांनी समाजकार्य केलं.

जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय.

‘बिल्डर’ हा शब्द आज वेगळ्या अर्थानं प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्यानं तो वापरताना काळजी घ्यावी लागते. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे सत्यशोधकांनी केलेली आहेत. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि जोतीरावांच्या कंपनीचे भागीदारही होते. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेलं आहे. जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा,येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामं त्यांनी केली. त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली.

नेल्सन मंडेला आणि बराक ओबामा भारत भेटीवर आलेले असताना आपण त्यांना फुले यांनी १८७३ साली [१४७ वर्षांपुर्वी ] लिहिलेल्या "गुलामगिरी" ह्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद भेट दिला. ते दोघेही भाराऊन गेले. फुले यांनी हे पुस्तक निग्रोमुक्तीच्या चळवळीला अर्पण केलेले आहे. संपुर्ण आशिया खंडातील हा एकमेव विचारवंत आहे की ज्यानं दिडशे वर्षांपुर्वी विचारांचं जागतिकीकरण केलेलं होतं..........


ख्यातनाम विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांनी जोतीरावांना आधुनिक भारताचे "शिल्पकार" मानलेले आहे. डा.बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरूस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानानं सांगायचे. १९३२ साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी म्हणाले होते, "जोतीराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा वोही थे." स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फुल्यांना "समाज क्रांतिकारक" म्हणून गौरविले होते. तीन अगदी भिन्न वैचारिक छावण्यांमधील या नेत्यांनी फुल्यांचा गौरव केलेला आहे.

जोतीरावांचा जन्म ११ एप्रिल १८२७ ला झाला. अवघ्या सात वर्षांनी या घटनेला २०० वर्षे पूर्ण होतील. त्यांना ६३ वर्षांचे आयुष्य लाभले. कोणताही महापुरूष हा त्या काळाच्या मर्यांदांनी वेढलेला असतो. फुले द्रष्टे, योद्धा आणि समाजक्रांतिकारक असले तरी त्यांनाही काळाच्या मर्यादा होत्याच. आज त्यांचा कालातीत वारसा कोणता याचा विवेक करायला हवा. आजच्या जागतिकीकरणाच्या संघर्षशील जिवनात असे काही फुल्यांकडून आपल्याला मिळण्याची शक्यता आहे काय? असल्यास किती आणि कोणत्या गोष्टी याचा विचार करायला हवा.

जोतीरावांनी सर्वांना शिक्षण, ज्ञाननिर्मिती, कौशल्यनिर्मिती, स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचं काम केलं.

जोतीराव आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले. त्यांनी स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य केलं. ते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे [Pune commercial & contracting Company] कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामं केली. जोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही. जोतीराव हे स्वत:च्या तेलानं जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते. वर्गणीवर समाजकार्य करण्याची प्रथा तोवर निर्माण झालेली नव्हती. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून त्यांनी समाजकार्य केलं.

‘बिल्डर’ हा शब्द आज वेगळ्या अर्थानं प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्यानं तो वापरताना काळजी घ्यावी लागते. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे सत्यशोधकांनी केलेली आहेत. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि जोतीरावांच्या कंपनीचे भागीदारही होते. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेलं आहे. जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा,येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामं त्यांनी केली. त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली.

जोतीरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचंही काम केलं जाई. बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिलं. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ प्रकाशित केलं. या कंपनीचं पुण्यात पुस्तकविक्री केंद्र होतं.

सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतीरावांकडे होती.
ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे.

एक अव्वल दर्जाचे यशस्वी व्यापारी, उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतीरावांचा नावलौकिक होता. सामाजिक कार्यकर्ता आणि यशस्वी उद्योगपती असा संगम फार विरळाच म्हटला पाहिजे.

कितीतरी मोठी कामं या कंपनीमार्फत त्यांनी केल्याच्या कागदोपत्री नोंदी मिळालेल्या आहेत. १५० वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिरावांचेच प्रोत्साहन होते.

नेल्सन मंडेला आणि बराक ओबामा भारत भेटीवर आलेले असताना आपण त्यांना फुले यांनी १८७३ साली [१४७ वर्षांपुर्वी ] लिहिलेल्या "गुलामगिरी" ह्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद भेट दिला. ते दोघेही भाराऊन गेले. फुले यांनी हे पुस्तक निग्रोमुक्तीच्या चळवळीला अर्पण केलेले आहे. संपुर्ण आशिया खंडातील हा एकमेव विचारवंत आहे की ज्यानं दिडशे वर्षांपुर्वी विचारांचं जागतिकीकरण केलेलं होतं.

डॉ. जी.एस.घुर्ये आणि डॉ. एम.एन.श्रीनिवासन यांच्या अनेक वर्षे आधी महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजाचं विशेषत: जातीव्यवस्थेचं ज्या पद्धतीनं शास्त्रीय विश्लेषण केलं होतं ते पाहता, जोतीराव हेच आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ ठरतात. त्यांचं हे लेखन आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे.

रिपोस्ट-

प्रा. हरी नरके, ०८/०४/२०२०
.......................

संदर्भ १. संपादक-प्रा हरी नरके, आम्ही पाहिलेले महात्मा फुले, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९३, २०१९

२. संपादक-प्रा हरी नरके, महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९८

३. संपादक-प्रा हरी नरके, महात्मा फुले - समग्र वाड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१३

४. पंढरीनाथ सीताराम पाटील, महात्मा फुले यांचे चरित्र, पुणे, १९२७

५. संपा. प्रा. हरी नरके-प्रा. य. दि. फडके, महात्मा फुले गौरव ग्रंथ, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९३,२००६,

६. संपादक-प्रा हरी नरके, महात्मा फुले : साहित्य आणि चळवळ, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००६, २०१९


Tuesday, April 7, 2020

आद्य शिवचरित्रकार : महात्मा जोतीराव फुले- प्रा. हरी नरके





११ एप्रिल २०२० रोजी महात्मा जोतीराव फुले यांची १९३ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपुर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. अशावेळी शिवाजी महाराजांवरचं पहिलं मराठी पुस्तक महात्मा फुल्यांनी लिहिलं. १८०६ सालापासून मराठी [ देवनागरी ] छापखाना सुरू झाला.

१८०६ साली विल्यम कॅरेचं पहिलं मराठी पुस्तक छापण्यात आलं. [ ग्रामर ऑफ मराठा लॅण्गवेज, grammar of maratha language ] तेव्हापासूनचा इतिहास शोधून पाहा. मराठीतलं शिवरायांबद्दलचं पहिलं पुस्तक जोतीरावांचं आहे. जून १८६९ मध्ये ते प्रसिद्ध झाले.

मुंबईतील ओरिएन्टल छापखान्यात छापलेले हे पुस्तक मुंबईत काळबादेवीला वासुदेव बाबाजी नवरंगे यांच्या तर पुण्यात स्वत: जोतीरावांच्या वेताळ पेठेतील [ नंतरची गंज पेठ व सध्याची महात्मा फुले पेठ ] पुस्तकांच्या दुकानात विक्रीला ठेवलेले होते. त्याची किंमत अवघी सहा आणे ठेवण्यात आलेली होती. हे पुस्तक जोतीरावांनी परमहंस सभेचे अध्यक्ष दिवंगत रामचंद्र बाबाजी राणे यांना अर्पण केले होते. शिवराय एव्हढे मोठे होते की ते अमक्याएव्हढे मोठे होते अशी इतर कोणाची त्यांना उपमा द्यायची असेल तर दुसरी व्यक्तीच उपमेला समोर दिसत नाही इतके महाराज मोठे होते, असे फुले या पोवाड्यात सांगतात. छत्रपतींचे जीवन व कार्य याविषयी भरभरून आदर व्यक्त करून तेच आपली कार्यप्रेरणा आहेत असेही जोतीराव सांगतात. सुमारे एक हजार ओळींचा हा प्रदीर्घ पोवाडा आहे. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या व मी संपादीत केलेल्या महात्मा फुले समग्र वाड्मयात तसेच इंटरनेटवरही हा पोवाडा उपलब्ध आहे. [ लिंक खाली दिली आहे.]

सदर पुस्तकाच्या लेखनासाठी आपले ब्राह्मण बालमित्र भांडारकर यांनी आपल्याला सहकार्य केले अशी कृतज्ञतापुर्वक नोंद जोतीरावांनी प्रस्तावनेत आवर्जून केलेली आहे. " ख्रिस्त महमद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी जोती म्हणे!"   हेच तर त्यांचे ब्रीद होते. हे शिवचरित्र लिहिण्यासाठी जोतीरावांनी अनेक संदर्भ साधनांचा धांडोळा घेतला. मराठीतील विविध बखरी, फारशीमधील तवारिखा, इतिहास ग्रंथ, इंग्रजी भाषेतील नानाविध ऎतिहासिक पुस्तके यांचा सखोल व्यासंग करून मोठ्या तयारीनिशी जोतीरावांनी हा ग्रंथ सिद्ध केला. गेली १५१ वर्षे तो सर्वत्र उपलब्ध आहे. किती शिवप्रेमींनी तो वाचलाय? उलट बहुतेक सगळेच उच्चभ्रू शिवचरित्रकार आणि शिवशाहीर या पुस्तकाची ठरवून उपेक्षा करतात.

" अति महारथी क्षत्रियाचा बाळ यवनाचा काळ त्रेतायुगी !१!
स्वभावे तो शूर रणी भिडणार लढे अनिवार देशासाठी !२!"

शिवराय देशासाठी लढत होते असे सांगणारे पहिले इतिहासकार, शिवशाहीर महात्मा जोतीराव फुले होत. त्यांना हा मान का नाकारला जातो?

हा चरित्रपर पोवाडा असल्याने यात तोवर उपलब्ध असलेल्या सर्व ऎतिहासिक संदर्भांचा त्यांनी वापर केलेला आहे. यात इतिहास असला तरी तो कोरडा, नीरस नाही. त्यात रसरशीत काव्य आहे. जोतीरावांच्या प्रतिभेचा आणि धगधगत्या शिवनिष्ठेचा हा ताम्रपट आपणही एकदा वाचावा. मी गेली ३२ वर्षे या पुस्तकावर बोलतोय. लिहितोय. मराठीत शिवरायांवर अनेक चरित्रपर आणि ललित पुस्तकं उपलब्ध आहेत. सत्यशोधक कृ. अ. केळुसकर, नरहर कुरूंदकर, बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई, वसंत कानेटकर, सेतुमाधव पगडी, दि. वि. काळे, वा. सी. बेंद्रे, गजानन भास्कर मेहेंदळे, गोविंद पानसरे, जयसिंगराव पवार आणि इतर अनेकांनी आपापले शिवछत्रपती मांडले. प्रत्येक विचारी माणसाने आवर्जून वाचावीत अशी ४ शिवचरित्रं निवडायची असतील तर म. फुले, केळुसकर, दि. वि. काळे आणि सेतुमाधवराव पगडी यांची निवडावी लागतात.

बहुजन समाजाला एक महानायक, महापुरूष देण्याचा जोतीरावांचा उद्देश होता. कोणतीही चळवळ उभी करायची असेल तर ५ गोष्टींची गरज असते.

१. आदर्शपुरूष वा स्त्री, जिच्या पावलावर पाऊल टाकून प्रगती करण्याची प्रेरणा सामान्य माणसाला मिळेल.

२. कार्यक्रमपत्रिका, परिवर्तनाचा कृतीकार्यक्रम, [ जोतीरावांनी ज्ञाननिर्मिती, स्त्रीपुरूष समता, जातीनिर्मुलन, धर्मचिकित्सा, नैसर्गिक संसाधनांचे फेरवाटप ही विषयपत्रिका दिलेली होती.]

३. संघटना- सुरूवातीला शिक्षण संस्था आणि नंतर सत्यशोधक समाजामार्फत संघटित कार्य जोतीरावांनी केले.

४. नेतृत्व- जोतीराव, सावित्रीबाई यांच्या नेतृत्वाखाली उभी राहिलेली ही चळवळ पुढे लहुजीवस्ताद साळवे, ना.
मे. लोखंडे, कृ. पां. भालेकर, ताराबाई शिंदे, डॉ. विश्राम रामजी घोले, तान्हुबाई बिर्जे, धोंडीराम कुंभार, सावित्रीबाई रोडे, गंगाधरभाऊ म्हस्के, महाराजा सयाजीराव गायकवाड, महर्षि वि. रा. शिंदे, राजर्षी छ. शाहू महाराज, भास्करराव जाधव, गोपाळबाबा वलंगकर, केशवराव विचारे, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, कर्मवीर भाऊराव पाटील, मुकुंदराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे, सी. के. बोले, कृष्णाजी अर्जून केळूसकर अशा असंख्य मान्यवरांच्या सहभागाने आणि नेतृत्वाने मोठी होत गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर तिला वैश्विक उंची प्राप्त करून दिली.

५. तत्वज्ञान- जोतीरावांनी सनातन संस्कृती नाकारून पर्यायी भारतीय संस्कृती निर्माण करण्याचे सत्यशोधकी तत्वज्ञान विकसीत केले.

हा ग्रंथ लिहिताना शिवरायांच्या इतिहासाच्या माध्यामातून वरिल सगळी उद्दीष्टे गाठण्यासाठी जोतीरावांनी मांडणी केलेली आढळते.

शहाजी महाराजांना विजापूरमध्ये कैद करण्यात आले तेव्हा शिवरायांच्या पत्नी सईबाई वयाने खूप लहान होत्या. शिवराय अडचणीच्या प्रसंगी आपल्या या पत्नीशी विचारविनिमय करीत असत हे नागरिकांच्या मनावर बिंबवण्यासाठी फुले सांगतात, " सईबाईंनी मसलत सुचवली, तसे महाराज वागले आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली." ऎतिहासिकदृष्ट्या हे खरे की खोटे हे महत्वाचे नाही. आपल्या आदर्शांचे अनुकरण समाज करीत असतो आणि म्हणून आदर्श काय करीत होते हे लोकांपुढे उलगडऊन दाखवणे गरजेचे असते. बहुजन समाजात स्त्रियांचा सन्मान वाढवायचा असेल तर शिवाजी महाराज असे करायचे तुम्हीही करा हे सांगण्याचा यामागचा हेतू उघडच दिसतो. शिवाजीमहाराज हे आपले तमाम भारतीयांचे आदर्श होत हे पटवून देणारे फुले पहिले.

या पोवड्यात अशा कितीतरी जागा अहेत की ज्यांची विस्तृत चर्चा पुढे कधीतरी करता येईल.

शिवरायांच्या तेजस्वी कर्तृत्वाचा आलेख रेखाटताना जोतीराव म्हणतात,
"सोसिले उन्हातान्हाला भ्याला नाही पावसाला
डोंगर कंगर फिरला यवन जेरीस आणला
लढवी अचाट बुद्धीला आचंबा भुमीवर केला
बाळगी जरी संपत्तीला तरी बेताने खर्च केला
वाटणी देई शिपायाला लोभ द्रव्याचा नाही केला
राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला नाही दुसरा उपमेला!"

हे पुस्तक लिहून आणि प्रकाशित करूनच जोतीराव थांबले नाहीत. त्यांनी शिवचरित्रावर व्याख्याने द्यायचा,पोवाडे गायचा धडाका लावला. १८८० साली जोतीराव रायगडावर गेले. महाराजांच्या समाधीची त्यांनी पुजा केली. पुण्यात येऊन स्वारगेटजवळच्या हिराबागेत [ शिवाजी मराठा शिक्षण संस्थेजवळ]  गंगारामभाऊ म्हस्के [ मराठा ] आणि चाफळकर स्वामी [ ब्राह्मण ] या मित्रांच्या सोबत सत्यशोधक समाजातर्फे पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी केली. तिथून ही जयंती मुंबईला लालबाग परळला रावबहादूर लोखंड्यांनी नेली. त्यानंतर १५ वर्षांनी लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीला हजेरी लावली. इतिहास लिहिणार्‍या उच्चभ्रूंनी मात्र शिवजयंतीचे सगळे श्रेय एकट्या टिळकांना देऊन टाकले. खरा इतिहास सांगतो, शिवजयंती सुरू महात्मा फुल्यांनी केली होती, लो. टिळकांनी ती पुढे नेली. टिळकांचे नातू जयवंतराव टिळक यांना याचे भान होते. त्यामुळे आपल्या आत्मचरित्रात टिळकांनी ती सुरू केल्याचा दावा न करता त्यांनी ती पुढे आणली अशी कबुली जयवंतराव देतात.

फुल्यांच्या रायगड भेटीच्या आणि शिवजयंतीच्या बातम्या तत्कालीन केसरीने जरी दिल्या नसल्या तरी दिनबंधूने त्या दिलेल्या आहेत. दिनबंधूच्या जुन्या फायलींमध्ये आजही त्या आहेत. शिवाय माधवराव बागल, वि. द. घाटे, फुले चरित्रकार, पं. सी. पाटील, धनंजय कीर, आचार्य अत्रे, मुकुंदराव पाटील, केळुसकर, जेधे, जवळकर, प्रबोधनकार, पाळेकर, श्रीपतराव शिंदे आदी मान्यवरांनी त्याच्या नोंदीही केलेल्या आहेत. तरिही काही सनातन्यांना म्हणे हे पुरावे मान्य नाहीत. का तर केसरीत तशी नोंद नाही ना! हे नासक्या आमराईतले रेशीमकिडे हा व्हायरस भयंकर आहे. त्यांचे मानायचे तर केसरीने जोतीराव व सावित्रीबाई यांच्या मृत्यूच्या बातम्या ज्याअर्थी दिलेल्या नाहीत त्याअर्थी ते वारलेच नाहीत असेही मानावे लागेल!


हा अफवाबाज विषाणू सातत्याने बुद्धीभेदाचा रणगाडा चालवित असतो. बहुसंख्य बहुजन तिला बळी पडत असतात. जातीविद्वेशाने सडलेल्या या प्रतिगामी मेंदूंनी आजपर्यंत जोतीरावांच्या या आद्यशिवचरित्राची वा जयंतीकार्याची दखलच घेतलेली नाही. याउलट जोतीरावांच्या अन्य लेखनातल्या नोंदी संदर्भापासून तोडून, विकृत करून जोतीरावांनी शिवरायांची बदनामी केलीय अशा आवया यांनी उठवल्या. आजही हाच उद्योग चालू आहे. १८६९ पर्यंत शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातले एकही पत्र उपलब्ध झालेले नव्हते. स्वाभाविकच उपलब्ध ऎतिहासिक कागदपत्रांच्या आधारे शिवरायांचे औपचारिक शिक्षण झालेले नसावे अशा समजुतीने त्या अर्थाची नोंद जोतीरावांनी केली. मात्र अफवागॅंगकडून हा एकच शब्द तेव्हढा निवडून विकृतपणे पेश केला जातो, आणि फुलेबदनामीचे दुकान चालवले जाते. एखाद्या लेखकाचा एखादा सुटा शब्द नुसता बघून उपयोग नसतो तर त्याचा काळ, संदर्भ, हेतू आणि त्या लेखकाचे इतर लेखन हे सारे एकत्रितपणे बघावे लागते. अंडरवर्ल्डच्या टोळ्या जशा देशासाठी घातक आहेत तशाच या अफवागॅंग समाजशत्रू होत.

आर.एस.एस.चे स्वयंसेवक बाळ गांगल हे डबल पीएच.डी. होल्डर यात आघाडीवर होते. त्यांचा बुरखा मी ३२ वर्षांपुर्वीच माझ्या "महात्मा फुल्यांची बदनामी : एक सत्यशोधन " या ग्रंथात सप्रमाण फाडला होता. हिंदुत्ववादी बेहर्‍यांच्या सोबतमध्ये गांगलांनी १९८८ साली महात्मा फुल्यांवर भयंकर गरळ ओकलेली होती. फुल्यांनी शिवरायांची बदनामी केल्याचा धादांत खोटा आरोप गांगलांनी केलेला होता. आजही काही सडक्या आंब्यातले किडे हीच गोबेल्सची मोहीम चालवित असतात. देव, धर्म, देश यांचे नाव घेत बहुजनांचा बुद्धीभेद करून इतिहासाचा गैरवापर करीत ही विषवल्ली फोफावत राहते.

म्हणूनच संदर्भसाधनांच्या शोधात सतत राहावे लागते, त्यांच्या प्रकाशात इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. संदर्भसाधनांचा शोध आणि सत्यशोधन ही सतत चालणारी प्रक्रीया आहे. ती अथकपणे सुरूच ठेवावी लागेल. बहुजनांना या कामात फारसा रस नसतो. वाचन, चिंतन, संशोधन यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. अर्थात तशी गोडीही नसते. ते प्रतिगामी विद्वानांना रखेल्या ठेवाव्यात तसे आपल्या पदरी ठेवतात. हे बाळगलेले कावेबाज सनातनी इतिहासाचा विपर्यास आणि विकृतीकरण यात तरबेज असतात. प्रबोधन, परिवर्तनपर उपक्रमांना अदखलपात्र मानणे हा त्यांचा पहिला कट असतो. तरिही चळवळी, नेते वाढतच राहिले तर त्यांच्यावर हल्ले करणे, नेतृत्वाचे चारित्र्यहनन करणे, नेत्यांच्या हत्येच्या सुपार्‍या देणे, हत्त्या करणे, ही दुसरी पायरी असते. तरिही ते संपले नाहीत, उलट वाढतच राहिले, समाजमान्य होत गेले तर त्यांचे अपहरण करणे ही तिसरी पायरी असते. या अवस्थेत सध्या शिवराय, बाबासाहेब आदी महापुरूष सापडलेले आहेत. अर्थात अपहरण करण्यामागे स्विकारण्याचा प्रामाणिक हेतू नसतो. त्यांच्या क्रांतिकारक विचारात भेसळ करून ते विकृत करीत राहणे हे मुख्य अभियान असते. मधूनमधून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मानणारे लोक झोपलेत की जागे आहेत याचाही अंदाज घेतला जातो. तो अंगलट आला तर प्रसंगी माघार घेऊन तह केला जातो. विकृतीकरण मात्र जारीच राहते.  २०१४ पासून या शक्तींनी पुन्हा उचल खाल्लेली आहे. केंद्रात आणि राज्यात नरेंद्र-देवेंद्रांची सत्ता आल्याबरोबर या आमराईतील रेशीमकिड्यांना रसद मिळू लागली. हे घाशीराम कोतवाल पुन्हा मस्तवाल झाले.

जोतीरावांचे अनुयायी, मित्र आणि सत्यशोधक विद्वान कृष्णाजी अर्जून केळुसकर यांनी १९०६ साली सुमारे ६०० पृष्ठांचे प्रदीर्घ असे मौलिक शिवचरित्र लिहिले. केळुसकर मराठा कुणबी असल्याने शतकानंतरही हे पुस्तक दुर्लक्षित आहे. शिवचरित्राच्या लेखन-प्रकाशनाने केळुसकारांचे हातच पोळले होते. या पुस्तकासाठी व याच्या इंग्रजी अनुवादासाठी [ अनु. एन.एस. ताकाखाव ] त्यांनी बॅंकेचे कर्ज काढले. ग्रंथशत्रू असलेल्या बहुजनांनी या पुस्तकाकडे ढुंकुनही बघितले नाही. तोवर शिवराय मध्यमवर्गीयांचे डार्लिंग वा रोजगाराचे साधन झालेले नव्हते. ते सेलिब्रीटीही झालेले नव्हते. तसे ते फार नंतर झाले. त्यामुळे मध्यमवर्गीयांनीही हे पुस्तक घेतले नाही. केळुसकर गुरूजी आपले विद्यार्थी भीमराव आंबेडकर यांच्यासोबत डोक्यावर या पुस्तकाचे गठ्ठे घेत घरोघरी फिरून शिवचरित्र घ्या हो शिवचरित्र घ्या! अशी बहुजनांना विनवणी करायचे. कोणाही मराठा, कुणबी, माळी, आगरी, भंडारी बहुजनांना हे पुस्तक खरेदी करावेसे वाटले नाही. परिणामी केळुसकरांवरील कर्जाचा बोजा वाढतच गेला. बॅंकेच्या जप्तीच्या नोटीसा यायला लागल्या. केळुसकर हवालदिल झाले. अश्रू गाळू लागले. कुठून आपल्याला ही अवदसा आठवली असे त्यांना झाले.

 ते शाहू महाराजांकडे गेले. महाराजांनी शिवचरित्राच्या २५० प्रती तात्काळ विकत घेतल्या. कर्ज फेडण्यासाठी मदतीचे आश्वासनही दिले. आपण लग्नाला बडोद्याला चाललोय, आल्यावर भेटा, असे महाराज म्हणाले. पण महाराज मुंबईत अचानक, अकाली वारले. केळुसकर ग्वाल्हेरला शिंदे सरकारांकडे गेले. आपण लंडनला तातडीने निघालोय, आल्यावर भेटा, नक्की मदत करू असे आश्वासन माधवराव शिंदे यांनी दिले. पण शिंद्यांचे लंडनमध्येच निधन झाले. केळुसकर इंदूरला तुकोजीराव होळकर महाराजांकडे गेले. तुकोजीराव पडले धनगर राजे.आजूबाजूला डझनावारी मराठा संस्थानिक असताना ज्याअर्थी केळुसकर गुरूजी आपल्याकडे आलेत त्याअर्थी  मदत करायला हवी म्हणून त्यांनी २५ हजार रूपये तात्काळ दिले आणि केळुसकर कर्जमुक्त झाले. केळुसकरांनी पुस्तकाच्या ५०० प्रती होळकर महाराजांना भेट पाठवल्या. पण त्या मिळायच्या आतच होळकरांची गादी ब्रिटीशांनी खालसा केलेली होती. अशी झाली केळुसकरांच्या शिवचरित्राची फरपट.

अर्थात आजही बहुजनांना ना केळुसकर माहित आहेत, ना होळकर, ना शिवचरित्र! उत्तम चालूय!
सदैव धार्मिक गुंगीत असलेले बहुजन आणि स्पर्धाभावनेने पछाडलेले पुरोगामी हे सनातन्यांच्या बुद्धीभेदाला पुन्हापुन्हा बळी पडतात. कावेबाज प्रतिगामी सनातनी व्यवस्थेकडून विकृतीकरणाचे हे उद्योग चिवटपणे चालूच राहतात. बहुजन पुरोगामी सोयर्‍यांनो, अशाच गाढ झोपा काढा. तुम्हाला गुंगीची, झोपेची नितांत गरज आहे. तुम्हारा कुछ नही होनेवाला. तुम्ही गुलामीतच सडणार. तुमची तीच लायकी आहे. तुमची झोप हीच जोतीरावांना जयंतीनिमित्तची खरी आदरांजली असेल!

प्रा. हरी नरके, ०७/०४/२०२०

संदर्भ-

https://shivray.com/mahatma-fule-povada/

https://archive.org/details/MahatmaPhuleSamgraVanmay5Avruti/mode/2up

* संपा. प्रा. हरी नरके, महात्मा फुले समग्र वांड्मय, महाराष्ट्र शासन,मुंबई, २०१३

* पंढरीनाथ सीताराम पाटील, महात्मा फुले यांचे चरित्र, पुणे, १९२७

* संपा. माधवराव बागल, सत्यशोधक हिरक महोत्सव ग्रंथ, कोल्हापूर,१९३३

* संपा. प्रा. हरी नरके, आम्ही पाहिलेले फुले, महाराष्ट्र शासन,मुंबई, १९९३,२०१९

* संपा. प्रा. हरी नरके-प्रा. य. दि. फडके, महात्मा फुले गौरव ग्रंथ, महाराष्ट्र शासन,मुंबई,१९९३,२००६,

* छत्रपति शिवाजी महाराज, दिनकर विनायक काळे, पुणे विद्यापीठ, पुणे, प्रथमावृत्ती, १६ मार्च १९६०

* संपा. प्रा. हरी नरके, महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९८

* संपा. धनंजय कीर, गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर आत्मचरित्र व चरित्र, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, १९७७, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, २०१४

* सरस्वती पब्लिशिंग कंपनी, वरदा प्रकाशन,पुणे व साकेत, औरंगाबाद यांनी प्रकाशित केलेले केळूसकर लिखित शिवचरित्र

* प्रा. हरी नरके, महात्मा फुल्यांची बदनामी : एक सत्यशोधन, सुगावा, पुणे, १९८९

* दिनबंधू मधील बातम्या