Thursday, December 31, 2020

सावित्रीजोतीरावांनी सहजीवनाचे व्याकरण लिहिले-प्रा.हरी नरके



#सावित्रीउत्सव

जोतीरावांनी लग्नानंतर सावित्रीबाईंना शिकवले. त्या पहिल्या भारतीय प्रशिक्षित शिक्षिका, मुख्याध्यापिका, शिक्षणतज्ञ बनल्या. त्या १ जानेवारी १८४८ ला शिक्षिका बनल्या तेव्हा त्यांचे वय अवघे १७ वर्षे होते. तर भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली तेव्हा जोतीराव अवघे २० वर्षांचे होते. सावित्रीबाई पुढची ५० वर्षे स्त्रिया, मुलं, बहुजन-वंचित समाजासाठी राबत राहिल्या. १८९७ च्या प्लेगमध्ये पेशंट्सवर उपचार करताकरता त्या गेल्या.

आयुष्यभर त्यांनी जोतीरावांना साथ दिली. स्वत: जोतीरावांनी लिहून ठेवल्याप्रमाणे--

(१) ब्राह्मण विधवांसाठी चालवलेल्या बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची चळवळ,

(२) सत्यशोधक विवाह चळवळ,

(३) १८७२ ते ७६ या सलग चार वर्षे पडलेल्या दुष्काळात शेतकरी- कष्टकर्‍यांच्या १००० मुला-मुलींचे पालनपोषन करण्याची चळवळ,

(४) ब्राह्मण विधवांचे सक्तीने होणारे केशवपन थांबवण्यसाठी नाभिक बांधवांचा घडवून आणलेला संप,

या चारही चळवळींचे नेतृत्व सावित्रीबाईंनी केले. जोतीरावांनी त्यांना सम्पुर्ण साथ दिली.

अनेकदा जोतीराव नेते होते, सावित्रीबाई साथीला होत्या, तर या चार प्रसंगी सावित्रीबाई नेत्या होत्या. जोतीराव सोबत होते. हे होते आदर्श सहजीवन. आदर्श सहजीवनाचे व्याकरण लिहिणार्‍या सावित्री-जोतींना विनम्र अभिवादन,.

-प्रा. हरी नरके, 

Tuesday, December 29, 2020

खुल्या जागांवर सर्वांचा हक्क- सर्वोच्च न्यायालयाचा ऎतिहासिक निकाल : प्रा. हरी नरके





उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकारने पोलीसभरती करताना ओबीसींवर केलेल्या अन्यायाबाबत योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने या निकालाद्वारे चपराक लगावलेली आहे. २०२० च्या डिसेंबर महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत एक ऎतिहासिक निकाल दिलेला आहे. खुल्या जागांवर सर्वांचा हक्क असतो, त्या जागा गुणवत्तेवरच भरल्या गेल्या पाहिजेत असा हा ३ न्यायमुर्तींच्या बेंचचा महत्वपुर्ण निकाल आहे. (Saurav Yadav vs The State Of Uttar Pradesh on 18 December, 2020)  देशात ५२ टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसींना न्याय देणार्‍या या निकालाची माध्यमांनी बातमीसुद्धा दिली नाही. माध्यमांनी त्यावर चर्चा करण्याचेही टाळलेले आहे. भारतीय माध्यमे सध्या सनातनी विचारसरणीची गुलाम आहेत आणि त्यात सामाजिक न्यायाला जागा नाही. प्रस्थापित व्यवस्था नेहमीच स्वत:चे उदात्तीकरण करणे आणि महिला, बहुजन, वंचित यांच्या समस्यांबाबत मौनाचा कट करणे यात पटाईत असते.

 न्या. उदय उमेश ललित,  न्या. विनित सरण आणि न्या. एस. रविंद्र भट यांच्या बेंचने हा निकाल दिलेला आहे. 

पोलीसदलात खुल्या जागांवर भरती करण्यात आलेल्या उमेदवारांना प्रवेश परीक्षेत कमी गुण असताना त्यांना योगी सरकारने नोकरी दिली. मात्र त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक गुण असलेल्या ओबीसी उमेदवारांना मात्र नोकरी नाकारण्यात आली नाही म्हणून सौरव यादव यांनी योगी सरकार व अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्ययालयाने आपल्या निकालपत्रात म्हटले आहे की, "The open category is open to all, and the only condition for a candidate to be shown in it is merit, regardless of whether reservation benefit of either type is available to her or him." खुल्या जागा म्हणजे उच्च वर्णियांचे आरक्षण असल्याची समजूत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश अशा भाजपाशाषित राज्यांनी करून घेतली होती. त्यानुसार नोकरभरतीत ओबीसींबाबत खुलेआम भेदभाव आणि पक्षपात करण्यात आलेला होता. उच्च न्यायालयांनीही राज्य सरकारांची तळी उचलून धरणारे निकाल दिलेले होते. त्या सर्वांना सर्वोच्च न्यायालयाने या निकालाद्वारे जबरदस्त चपराक दिलेली आहे. कमी गुण असतानाही केवळ उच्चवर्णिय आहेत म्हणून काहींना नोकर्‍या देणे आणि ओबीसी, एस.सी., एस.टी. उमेदवारांवर अन्याय करणे याची लाटच येऊ लागली होती. ती या निकालाने थोपवली जाईल. खुल्या गटात नोकर भरती करताना जे उमेदवार ओबीसी, एस.सी.एस.टी. प्रवर्गातले असतील व त्यांना उच्चजातीयांपेक्षा अधिक गुण असतील तर त्यांना डावलता येणार नाही असे न्यायालयाने बजावले आहे. 

ओपनच्या जागा ह्या फक्त उच्चजातीयांसाठी असतात, असा भ्रम चतुरपणे पसरवण्यात आलेला आहे. ज्या प्रवर्गांना आरक्षण आहे त्यांनी ओपनमध्ये येऊच नये, तुम्ही दोन्हीकडे असणार तर मग आम्ही उच्चजातीयांनी कुठे जायचे? असले कुटील युक्तीवाद केले जातात. खुल्या जागा काही मूठभरांसाठीच असणे म्हणजे मग ते त्यांचे आरक्षणच होईल. ओपन याचा अर्थच सर्वांसाठीच ओपन. त्यामुळे खुल्या जागांमध्ये तुम्ही कॅटेगिरीवाल्यांनी येता कामा नये हे नॅरेटिव्ह भ्रामक आहे.

आरक्षण हा विषय हेटाळणीचा, वादग्रस्त बनवण्यात या देशातील उच्च्भ्रू आणि ओपिनियन मेकर्स यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रिंट आणि इलेकट्रॉनिक मिडीयात काम करणार्‍या बहुतेकांचे याबाबतचे आकलन शाळकरी स्वरूपाचे असते. अर्थात तरिही ते अधिकारवाणीने त्यावर बोलत असतात, भाष्य करीत असतात हा भाग अलाहिदा. हा लेख आरक्षणद्वेष्ट्यांचे राखीव जागांबद्दल असलेले बालीश आक्षेप आणि २१ अपेक्षित प्रश्नांची अपेक्षित उत्तरे देण्यासाठी लिहिलेला नाही. त्यामुळे पोरकट आणि गावठी मुद्दे उपस्थित करणार्‍या आरक्षणविरोधकांनी या लेखापासून दूर राहावे.

( हा लेख लिहिण्यासाठी अ‍ॅड. बी.एल. सगर किल्लारीकर यांच्याशी झालेल्या चर्चेचा उपयोग झाला.)

- प्रा. हरी नरके,
(२९/१२/२०२०)

Sunday, December 27, 2020

चरित्र मालिकांची शोकांतिका..

 

दातृत्व हा शब्द फिका पडेल इतके काम समाजासाठी करणाऱ्या काही थोर व्यक्ती इतिहासात घडून  गेल्या आहेत. ज्यांनी स्वत:चे मीपण बाजूला सारून, देहभान विसरून, रंजल्यागांजलेल्यांच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. समाजात समता नांदावी आणि माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे एवढीच काय ती अपेक्षा त्यांनी केली. अशाच काही व्यक्तिरेखांवर आधारलेल्या मालिकांना करोनाकाळानंतर प्रेक्षक प्रतिसादाअभावी अर्ध्यातच निरोप घ्यावा लागला आहे.. 

टीआर कमी पडल्याने मालिका बंद होणे स्वाभाविक आहे, कारण सरतेशेवटी हा व्यवहार आहे, लोकांनीच प्रतिसाद दिला नाही तर वाहिन्या आणि निर्मिती संस्था तरी काय करणार?  या घटनेकडे बारकाईने पाहिले तर हा केवळ मालिकाच नाही तर एकूणच अभिरुचीचा मुद्दा वाटतो. कारण चरित्रात्मक पुस्तके वाचण्याचाही कल हल्ली मावळलेला जाणवतो. त्यात महापुरुषांकडे जातीय चष्म्यातून पाहणारा वर्गही अस्तित्वात आहेच. तर दुसरीकडे करोनामुळे लोकांच्या मनावर झालेले परिणाम, जगण्याचे प्रश्न यात लोकांचे प्राधान्यक्रम बदललेले दिसतात. त्यामुळे प्रतिसाद नेमका कशाने कमी झाला हा अजूनही चर्चेचा विषय ठरतो आहे. गेल्या आठवडय़ात ‘सावित्रीज्योती’ मालिका प्रेक्षक प्रतिसादाविना बंद झाली. वर्षभर अथक मेहनतीने उभा केलेला प्रपंच एकाएकी अर्ध्यावर थांबला. अर्ध्यावरच म्हणणे योग्य आहे, कारण अजून चाळीस वर्षांचा आणि महत्त्वाचा कालखंड येणे बाकी होते. सत्यशोधक समाजाची स्थापना, दलितांच्या लढय़ातील योगदान, स्त्रियांसाठी उचललेली पावले, तथाकथिक विचारांना छेद देणारे लेखन अशा नाना गोष्टी मालिकेतून निसटल्या. ज्या लोकांपर्यंत पोहोचायलाच हव्या होत्या. हीच बाब काही महिन्यांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालिकेविषयीही झाली. कथानक नियोजित वेळेपेक्षा अधिक वेगात नेऊन संपवण्यात आले. यानिमित्ताने अनेक प्रश्न वर डोकावू पाहत आहेत, ते म्हणजे थोर व्यक्तिमत्त्वांविषयी जाणून घेण्याची आपली क्षमता संपली आहे, परिस्थिती बदलली आहे की जाणिवेचा मुद्दा आहे?

अनेक चरित्र मालिका आणि चित्रपटांच्या अभ्यास मंडळावर असलेले प्रा. हरी नरके सांगतात, ही केवळ पुस्तकांवर आधारलेली मालिका नव्हती. कारण मधल्या काळात बरेच संशोधन झाले आहे. लोकांना अजूनही न समजलेल्या गोष्टी या माध्यमातून आम्ही दाखवणार होतो. आपल्याला जोतिबांनी केवळ शाळा सुरू केली एवढेच माहिती आहे. पण शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांनी केलेले काम, शेती आणि उद्योगाचे शिक्षण, शैक्षणिक गळतीचा प्रश्न, ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणाची सोय, केशवपनाविरोधात नाभिकांचा संप, १८८० ला केलेला पहिला शिवजयंती उत्सव असे बहुमोलाचे कार्य फुले दाम्पत्याने केले आहे. मालिका अर्ध्यावर थांबली नसती तर तेही पोहोचवता आले असते. ‘व्याख्यानांतून, पुस्तकांतून या व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचतात, पण त्याला मर्यादा येतात. मालिकेच्या माध्यमातून त्या अधिक प्रभावी आणि सचित्र समोर उभ्या राहतात. या मालिकेला सुरुवातीला प्रतिसाद होता, परंतु दोन अडीच महिन्यांतच टाळेबंदी झाली आणि टाळेबंदीनंतर कदाचित लोकांच्या गरजा बदलल्याने प्रेक्षक पुन्हा मालिकेकडे वळला नाही. लोकांपुढे जगण्याचा प्रश्न जटिल असल्याने स्थलांतर, आर्थिक विवंचना असेही मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहेत. मुळात फुलेंसारखी मंडळी भरीव कामगिरी करूनही तेव्हाही अंधारात होती आणि आजही अंधारात आहेत याचे दु:ख वाटते’, अशी खंत नरकेंनी व्यक्त केली.

ऐतिहासिकपट अभ्यासू पद्धतीने उलगडणारे दिग्पाल लांजेकर याविषयी बोलताना म्हणाले, ‘मालिका उत्तम सादर केली गेली होती. तिला प्रेक्षक प्रतिसाद का कमी पडला हा संभ्रमच आहे. उत्तम निर्मिती, उत्तम वाहिनी, हरी नरकेंसारखे अभ्यासक, भूमिकेला न्याय देणारे कलाकार सगळी भट्टी उत्तम जमली होती. परंतु प्रेक्षकांचा कल नेमका लक्षात येत नाही. म्हणजे आपण त्यांना एखादी अभिजात गोष्ट देऊ पाहतोय, पण त्यांनाच ती पाहायची नाही का असे वाटते. एखादा वेगळा विषय आणल्यानंतर त्याला तात्पुरता प्रतिसाद मिळतो, परंतु नंतर त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे नाईलाजाने वाहिन्यांनाही सासूसुनांच्या मालिकांचा पर्याय स्वीकारावा लागतो. प्रेक्षकांनी जर अशा विषयांना उचलून घेतले तर आम्हालाही नवे विषय आणायला उत्साह येईल. शेवटी प्रेक्षकच आपल्याला या दुष्टचक्रातून सोडवू शकतात’. हा करोनाचा फटका असावा असेही लांजेकर यांना वाटते. त्यांच्या मते, कारोनाकाळात लोक वैतागले आहेत. त्यामुळे प्रबोधनापेक्षा मनोरंजनाला अधिक पसंती मिळत असावी. विचार करायला लावणाऱ्या गोष्टी, डोक्यावर नको आहेत लोकांना. विशेष म्हणजे याला कोणताही जातीय रंग वाटत नाही, या मालिकांना सर्व स्तरातून प्रेक्षक पसंती मिळालेली मी पहिली आहे. अगदी मालिका बंद झाल्यानंतरही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या महापुरुषांना आपण एका विशिष्ट चष्म्यातून पाहता कामा नये. सध्या निष्कर्ष काढण्यापेक्षा प्रेक्षकांचा कल अभ्यासणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ‘सावित्रीजोती’ या मालिकांचे निर्माते नितीन वैद्य या विषयावर आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, ‘‘सोनी वाहिनी सुरू झाली तेव्हा आजवर समाजासाठी झटलेल्या २६ व्यक्तिरेखा घेऊन ‘गर्जा महाराष्ट्र’ ही मालिका केली. ज्यामध्ये या सर्व थोर व्यक्तींच्या कामाला उजाळा देण्यात आला. त्यातूनच सुधारणेचा पाया घालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि फुले दाम्पत्याची कथा मालिकेतून मांडण्याचा विचार आला. त्याला संशोधनाची जोड देण्यात आली. या दोन्ही मालिकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ बहुजनांचाच नाही तर सर्वस्तरातून मिळाला. घडलंय ते लपवायचे नाही आणि नाही ते घडवायचे नाही हे आमचे आधीच ठरले होते. दोन्ही व्यक्तिरेखांचे बालपण, जडणघडण सर्व काही पोहोचवले. जेणेकरून ती माणसे काय परिस्थितीत जगली आहेत हे लोकांसमोर येईल. आम्ही आमच्या बाजूने प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु करोनामुळे लोकांची दैनंदिन मालिका पाहण्याची सवय मोडली. प्रतिसाद मंदावला. वाहिन्याही आर्थिक अडचणीत आल्या. त्यामुळे इच्छा असूनही पुढचे शंभर भाग करता आले नाही. पण हा अल्पविराम असेल. पुढचे कथानक आम्ही नक्कीच आणू. महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह या महत्त्वाच्या टप्प्यावर मालिका थांबवतो आहोत. परंतु याचा दुसरा भाग करण्याची प्रेरणा कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

‘त्याकाळात विधवा ब्राह्मण स्त्रियांचा कुटुंबीयांकडूनच छळ होई. त्यातून एखादी स्त्री गरोदर राहिली तर तिला आत्महत्या हा एकमेव पर्याय होता. अशा स्त्रियांच्या बाजूने ते उभे राहिले. अनाथ मुलांचा प्रश्न, मुंबईतील अनेक वास्तूंच्या उभारणीत त्यांचा वाटा, सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाची सांभाळलेली धुरा, प्लेगच्या साथीतील योगदान असा बराच काळ आम्ही दाखवणार आहोत’, असेही वैद्य यांनी स्पष्ट केले.- निलेश अडसूळ

चंगळवादाचा प्रभाव वाढल्याने लोकांना डोक्याला वैचारिक ताण नको असतो. त्यामुळे बुद्धी बाजूला ठेवून कौटुंबिक नाटय़ाला पसंती दिली जाते. आज टेलिव्हिजनचा मोठा वर्ग महिला आणि बहुजन आहेत. त्यांनाच जर आपल्या इतिहासाविषयी जाणून घ्यायचे नसेल तर खेदजनक आहे. ही बेफिकिरी आहे. बाबासाहेब म्हणाले होते, ‘ज्यांना आपला इतिहास माहीत नसतो ते कधीही इतिहास घडवू शकत नाही.’ ही मंडळी केवळ इतिहास नाही वर्तमान आणि भविष्यात कसे वागावे याचे मूल्ये देणारी आहेत. त्यामुळे सर्वस्तरातून अशा विषयांना प्रोत्साहन मिळायला हवे.  

– प्रा. हरी नरके, अभ्यासक   

लोकसत्ता, मुंबई, पुणेसह सर्व आवृत्त्या, रविवार, दि. २७ डिसेंबर,२०२०, पृ.११ लोकसत्ता टीम | December 27, 2020 02:36 am

https://epaper.loksatta.com/2938207/loksatta-mumbai/27-12-2020#page/11/1

https://epaper.loksatta.com/2938426/loksatta-pune/27-12-2020#page/8/1

https://www.loksatta.com/manoranjan-news/savitrijoti-tv-serial-closed-due-to-low-response-from-the-audience-zws-70-2365878/

Web Title: Savitrijoti Tv Serial Closed Due To Low Response From The Audience 

Friday, December 25, 2020

सावित्रीजोती मालिकेचा आजचा शेवटचा एपिसोड चुकवू नका - प्रा. हरी नरके


सावित्रीजोती मालिकेचा आज सायं. ७.३० वा. सोनी मराठीवर सादर होणारा अखेरचा भाग ( एपिसोड ) चुकवू नका.

गेल्या साताठ दिवसात समाज माध्यमांवर तसेच प्रिंट व इलेकट्रॉनिक मिडीयावर या मालिकेला जनतेचा जो अभुतपुर्व पाठींबा मिळाला त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचा राज्य शासन आणि वाहिनीला नक्कीच विचार करावा लागेल. राज्य शासनाकडून सावित्रीजोती मालिकेला अर्थसहाय्य मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. माझा असा प्रयत्न राहिल की निर्माते, वाहिनी आणि राज्यशासन यांच्यामध्ये समन्वय घडवून आणून या मालिकेचे मोजक्या आणि गोळीबंद अशा १०० भागांचे (एपिसोड) दुसरे पर्व सादर करायचे. त्यासाठीच्या पुर्वतयारीत काही दिवस जातील. आपली साथ असेल तर सिझन - २ (दुसरे पर्व) मध्ये ब्रेक के बाद नक्कीच भेटू. 

-प्रा. हरी नरके, 

शनिवार, दि.२६/१२/२०२०

Thursday, December 24, 2020

(२०२१) नविन वर्षाचा संकल्प- ना काहू से दोस्ती, ना काहू से बैर - प्रा. हरी नरके

फेसबुक, ट्विटरवरील अनेक दोस्तलोक माझ्याकडे फोन नंबर मागतात. मी देतो. यापुर्वीही दिलेले आहेत. माझ्या मोबाईलमध्ये अशी साठवलेली नावे (मोबाइल नंबर्स) वीस हजारापार गेलेत. आपण स्नेहापोटी नंबर घेता, जिव्हाळ्यापोटी फोनही करता. मी लेखन-वाचन- करताना, वर्गात शिकवित असताना फोन घेत नाही. मग तुमचा गैरसमज होतो. वेळ मिळेल तसा मी कॉलबॅक करतो. आजकाल त्यातले सत्राशेसाठ नंबर्स हे बॅंका, लोन, विमाकंपन्या, भलत्यासलत्या ऑफर्स यांचे बिनकामाचे असतात. त्यामुळे अननोन नंबर्सचे कॉल घेणे वा त्यांना कॉलबॅक करणे तापदायक झालेले आहे. बर्‍याच जणांना मी मेसेजद्वारे तुमचा निरोप पाठवा असे कळवतो, पण व्हॉट्सॅपच्या व्यसनामुळे असले साधे मेसेज वाचण्याचे कष्ट अनेकजण घेत नाहीत. माझ्याकडे तर व्हॉट्सॅप नाही. लोकांना फोनवरच बोलायचे असते. त्यातही प्रस्तावना करण्यात आठदहा मिनिटे वाया घालवली जातात. मुद्द्याचे बोलायचे सोडून दुनियाभरचे विषय लोक बोलत बसतात. मी सगळ्यांशी बोलायला वेळ आणू कुठून?

मला दिवसाकाठी किमान ७५ ते ८० फोन येतात. कधीकधी तर जास्तही येतात. ते सगळे फोन मी घेत बसलो तर दिवसभर मला दुसरे कामच करता येणार नाही. लोकसम्पर्क ही चांगलीच गोष्ट आहे. गरजू आणि होतकरू लोकांना जमेल तेव्हढी मदत करायला मला आवडतेही. 

मी काही राजकारणी नाही की व्यापारी वा उद्योजक नाही. माझ्याकडे पीए (मदतनीस) नाही. तो ठेवणं मला आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. हे खरंय की काहीलोक खरेच गरजू, होतकरू, समाजाने नाडलेले असतात, त्यांना जमेल तशी मदत करायलाच हवी. कुणाशीही तुसडेपणाने वागण्याचा माझा स्वभाव नाही. स्वभावाला औषद नसते. पण सध्याच्या काळात जसे काही लोक दागिने मोडून खातात, तसे काही लोक गरिबी मोडून खात असतात. काही फुकट मिळतंय म्हटलं की लोक शर्ट फाडूनच रांगेत येऊन उभे राहतात. आपण अतिगरजू असल्याचा बेमालूम देखावा ते उभा करतात. त्यांना ओळखण्यात मी कमी पडतो. त्यावरचा उपाय म्हणजे असल्या तापदायक समाजकार्यातून निवृत्ती घेणं.

लोक मला " जेवन झाले का? आज वार कोणता आहे? आज किती तारीख आहे? तुमच्या घड्याळात किती वाजलेत" असले अवघड प्रश्न विचारीत नाहीत याबद्द्ल मी त्यांचा आभारी आहे. 

अनेक भले लोक मला पुढील कामांसाठी कामांसाठी फोन करतात. " माझ्या चौथीच्या मुलीला फलाण्या विषयावर निबंध लिहायचा आहे, मुद्दे पाठवा, मला शोधनिबंध लिहायचा आहे, तुमच्याकडच्या संदर्भ पुस्तकातले स्क्रीनशॉट मला पाठवा, मला रेशनकार्ड काढून द्या, कुठल्यातरी फलान्याबिस्तान्या लंगोटी पेपरासाठी तुमचा लेख २ दिवसात पाठवा, भाषणासाठी तारखा द्या, वेबिनारसाठी वेळ द्या, अमुकचे जातपडताळणीचे काम अडलेय, ते करून द्या, तमुकला क्रिमीलेयर वा जातीचा दाखला मिळवून द्या, मला वा माझ्या अमूक ढमूक नातेवाईकाला नोकरी मिळवून द्या, लग्नासाठी मला आर्थिक मदत करा, तमूक धार्मिक-सार्वजनिक कार्यक्रमाला वर्गणी पाठवा, माझे लग्न जमवून द्या, मला घटस्फोट मिळवून द्या, अमका भाऊबंद मला त्रास देतोय, पोलिसांना फोन करून मला मदत मिळवून द्या, अमक्यातमक्या मंत्र्याकरवी माझे तमूक व्यावसायिक काम करून द्या, माझी बदली करा किंवा झालेली बदली रद्द करा, तमक्याने फेसबुकवर तमका लेख लिहिलाय त्याला सडेतोड उत्तर द्या, अमुक तमूक विषयावर ताबडतोब पोस्ट लिहा, तमक्यावर किंवा तमकीवर माझे प्रेम आहे, त्यांना पाठवायच्या प्रेमपत्रासाठी मुद्दे पाठवा,...." 

यातले एकही उदाहरण काल्पनिक नाही. यातल्या अनेक कामांशी माझा काडीमात्रही संबंध नसतो. तरी ती कामं मी केली नाहीत की लोक रागावतात, चिडतात, "मग तुमचा उपयोग काय? अजून उत्तर का दिले नाही?" असे थेट विचारतात. जाब विचारतात. नियमबाह्य कामे मी करीत नाही म्हटले की "मग तुमच्याकडे कशाला आलोय?" असा मलाच उलटा प्रश्न विचारतात. कितीतरी खाजगी, व्यक्तीगत कामं जी लोकांनी स्वत: करायची असतात ती करायला लोकं मला सांगतात. ते माझ्यावर मानीव हक्कही दाखवतात. मला काम सांगताना बर्‍याच जणांचा तुम्ही आमचे हक्काचे सेवक आहात असा सूर असतो. ( यालाही अपवाद आहेत, असतात..) 

मी भिडस्त माणूस आहे. कोणलाही दुखवायचे माझ्या जिवावर येते. मी सहज उपलब्ध आहे. फुकटात उपलब्ध आहे. म्हणून तुम्ही तुमच्या सोयीने जमेल तेव्हा फोन करणार आणि थेट हट्ट करणार. सामाजिक मदत म्हणजे भिक नव्हे पण तसाच तो मुलभूत हक्क किंवा अधिकारही नव्हे. आजकाल काही महान लोकांनी व्यावसायिक समाजकार्य किंवा कागदोपत्री समाजकार्य सुरू केल्याने सामान्य लोकांनीही तारतम्य सोडलंय. लोकांमध्ये "तुम्ही आमचं काम करता म्हणजे त्यातही तुमचाच काहीतरी फायदा असणार" असा भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. 

मलाही माझ्या आवडीची, पोटापाण्याची कामं असतात. ती करताकरता मीही थकून जातो. सदासर्वदा लोकसंपर्क नकोसा वाटतो. कधीतरी निवांतपणे वाचत, लिहित बसणं ही माझी गरज असते. त्यांचे काम झालं की लोकांच्या चेहर्‍यावर उमटणारे हसू हे फार मोठे पारितोषिक असते खरे. पण अलिकडे ते फारसे दिसत नाहीत. कृतज्ञतादर्शक भाव दिसण्याऎवजी तुम्हाला " मी ही सेवेची संधी देऊन तुमच्यावरच उपकार केलेत" अशी धारणा वाढत चाललीय. समाजाला अशा सेवाकार्याची फारशी कदर राहिलेली नाही असा अनुभव वरचेवर येतो.

  शिवाय अलिकडे सततच्या भाषणांनी माझा आवाज वरचेवर बसतो. मी जाम थकतो. अगदी गळून जातो. अशावेळी फोनवरही बोलण्याचे मला त्राण नसते. पण लोक ही माझी अडचण समजून घेत नाहीत. त्यांना फक्त त्यांच्या कामाचे पडलेले असते. समाजसेवा ही चांगलीच गोष्ट आहे. आजही तिची गरज आहेच. त्यामुळे यापुढेही ती मर्यादित प्रमाणात, निवडक स्वरूपात चालूच राहिल. पण.. पण... माणसाला कधीतरी निवृत्ती घ्यायला हवी... ४० वर्षे माझ्या अल्प कुवतीनुसार थोडी समाजसेवा करता आली. नव्या पिढीतील युवांनी आता ही जबाबदारी घ्यायला हवी. उरलेल्या आयुष्यात माझ्या आवडीची लेखन-वाचनाची कामं मला करायला हवीत. प्रा. य. दि.फडके मला म्हणायचे, "हरी, तुम्ही लोकसम्पर्कात जो वेळ वाया घालवता तो वाचवला तर तुमच्या हातून दहावीस चांगली पुस्तकं लिहुन होतील. काम वार्‍यावर वाहून जातं. पुस्तकं राहतील."

पुस्तकं लिहून होवोत वा ना होवोत. निदान वाचून तरी नक्कीच होतील. कृपाकरून माझ्याकडे फोननंबर मागू नका. संपर्क करायचा असेल तर मला इमेल करीत चला. तुमच्याकडे आधीच माझा मोबाईल नंबर असेल तर मी फोन उचलला नाही म्हणून परतपरत फोन करण्याऎवजी मेसेजद्वारे संपर्क करा. 

हे खरंय की मलाही अनेकांनी मदत केली म्हणून मी इथवर आलो. तुमच्यापैकीच काहींनी मला संधीची कवाडं उघड़ी करून दिली. आजच्या व्देषमुलक व प्रदूषित खुज्या माणसांच्या, कोरोनाजातीय माणसांच्या जगात गुणांची क़दर करणारी शुध्द माणसं मिळणं दुर्लभच. तुमच्यापैकी काहींनी मला सेवेच्या कामांची संधी दिली, आनंद दिला, त्याबद्दल मी अपार कृतज्ञ आहे. 

कबीरा खड़ा बाज़ार में, सबकी मांगे खैर.

ना काहू से दोस्ती, ना काहू से बैर.

ग्रेस माझे आवडते कवी आहेत. त्यांनी म्हणे दरवाजावर पाटी लावली होती, " आय एम फ्री बट नॉट अव्हेलेबल" 


आपला नम्र,

- प्रा. हरी नरके, 

२४/१२/२०२०

Sunday, December 20, 2020

सावित्री-जोती मालिका अर्ध्यावरच बंद होणार- प्रा. हरी नरके

 








६ जाने. २०२० रोजी सुरू झालेली " सावित्री-जोती : आभाळाएवढी माणसं होती " ही मालिका शनि. २६ डिसेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेतेय. या मालिकेला सर्व स्तरातील जाणत्यांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि सुजाण प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. ती मध्येच बंद होतेय याचे मनस्वी दु:ख आहे. खरं तर आत्ताशी कुठे गोष्टीला सुरूवात झाली होती. मालिका पकडही घेऊ लागली होती. एरवी कोणतीही मालिका न बघणारे काही जाणते लोक ही मालिका आवर्जून बघतात. एक नवा प्रेक्षकवर्ग मालिकांकडे, सोनी मराठीकडे वळू लागलेला होता. काहीलोक वेळ जुळत नसल्याने अ‍ॅपवर ही मालिका बघत होते. पण त्यांची मोजणी टीआरपीमध्ये होत नाही. टीआरपीच्या रेसमध्ये यशस्वी आणि लोकप्रिय असलेल्या सध्याच्या इतर मराठी वाहिन्या आणि मालिकांबदल माझ्या मनात किंचितही आकस नाही. उलट कुतुहलच आहे. कौतुकच आहे. माणसाला निखळ करमणुकीची गरज असते असे मी मानतो. त्याच्या जोडीला ज्ञान, संस्कृती, वर्तमान, जगाचे व जगण्याचे भान वाढवणार्‍या, रंजनातून सामाजिक प्रबोधन, लोकशिक्षण करणार्‍या सावित्रीजोतीसारख्या मालिकाही आवश्यक आहेत. त्या मुल्यभानाची रसद आणि जगण्याचा पैस विस्तारणारी उर्जा पुरवित असतात.


सदैव इतिहासात रमलेल्या मराठी माणसांचा १९-२० व्या शतकातील  समाजसुधारणा, शिक्षण आणि परिवर्तन विचार मनोरंजनतून समजून घेण्यातला रस आटलाय का? कुठलीही कलाकृती ही त्या काळाचं अपत्य असते. प्रस्तुत काळ हा जोती-सावित्रीच्या विचारांना, प्रेरणांना, त्यागाला वा ध्येयवादाला फारसा पोषक नाही. ज्यांच्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग त्या दोघांनी केला त्या स्त्रिया आणि बहुजन समाज हेच टिव्हीच्या सर्व मालिकांचे मुख्य प्रेक्षक आहेत. तेच स्वत:च्या इतिहासाबद्दल, पुर्वजांच्या त्यागाबद्दल, वारशाबदल बेपर्वा आणि बेफिकीर आहेत? बहुजन समाजाला शतकांच्या गुलामीतून बाहेर काढणारे सावित्रीजोतीसारखे लोक बहुजनांनाच आपलेसे न वाटणे हे मला समाजद्रोहासारखे वाटते. हा आप्पलपोटेपणा, करंटेपणा मला फार बोचतो. 


दर्जेदार कंटेण्ट लोकांना हवाच असतो यावर माझा ठाम विश्वास आहे. या मालिकेने सोनी मराठीला एक व्यापक सामाजिक पाया मिळवून दिला. सोनी मराठीचा रिच बहुजनांमध्ये वाढवला. सावित्री-जोतीची कथा सशक्त आहे. दणकट लेखन, कलाकारांचा उत्तम अभिनय, कसदार सादरीकरण, कसबी दिग्दर्शन आणि दशमी क्रिएशनची सर्वोत्कृष्ठ निर्मिती यामुळे ही मालिका अव्वल दर्जाची बनलेली आहे. ही मालिका ज्यांनी बघितली ते तिला अनेक वर्षे विसरणार नाहीत. जे लोक कोणत्याही मालिका बघत नाहीत त्यांना माझी ही पोस्ट लागू नाही.


कदाचित टिव्ही मालिका क्षेत्रातील जाणकारांना, यशस्वी मान्यवरांना माझी ही पोस्ट आवडणार नाही.  " ग्राहक नेहमीच बरोबर असतो, निवडणुकीत पराभूत होणाराने मतदारांना दोष द्यायचा नसतो," या सुभाषितांची माहिती मलाही आहे.  


उंच माझा झोका  ही उत्तम  मालिका चालते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९३५ नंतर आवरती घ्यावी लागते आणि सावित्री जोती तर मध्येच गुंडाळावी लागते. अशाने या जॉनरच्या मालिका करण्याचे धाडस कोण करील? म्हातारी मेल्याचेही दु:ख आहेच, पण काळ बेदरकारपणे सोकावतोय याचे जास्त दु:ख आहे. काहीजण आम्हाला म्हणाले, "टीआरपी नसला तरी मालिका चालू ठेवा." हा भाबडेपणा झाला. व्यवहारात तो चालत नाही. कोणतीही मालिका तयार करायला पैसा लागतो, तो ज्या वाहिनीकडून दिला जातो तिला जाहीरातींद्वारे तो परत मिळत असतो. जाहीराती मिळणे न मिळणे हे सर्वस्वी टीआरपीवरच अवलंबून असते. प्रेक्षकांपासून म्हणजेच टिआरपीपासून फटकून राहून मालिका चालू शकत नाहीत ही कटू असली तरी वस्तुस्थिती आहे.


सावित्री जोती मालिकेला टिआरपी होता, पण तेव्हढा पुरेसा नव्हता. ही बायोपिक असल्याने त्यात हमखास मनोरंजनाचा तद्दन मसाला भरता येत नव्हता. १८२७ ते १८९७ हा काळ उभा करायचा असल्याने प्रवास जास्त खडतर होता. या मालिकेमागचे आमचे, दशमी व सोनी मराठीचे प्रयत्न प्रामाणिक होते. उत्तम टिम आणि ऑनेस्ट स्पिरिट असूनही प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात खेचून आणण्यात आणि टाईमस्पेंड वाढवण्यात आम्ही कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण आम्ही नक्कीच करू. 


सोनी मराठी वाहिनी, दशमी क्रिएशन ही निर्मितीसंस्था, सावित्री-जोतीची आमची सगळी टिम यांचे या ऎतिहासिक आणि दर्जेदार निर्मितीबद्दल मी मन:पुर्वक आभार मानतो. विशेषत: सोनी मराठी वाहिनीचे अजय भाळवणकर, सोहा कुलकर्णी, Sohaa D. Kulkarni, किर्तिकुमार नाईक, Kirtikumar Ojasvini, राजेश पाठक, Rajesh Pathak, दशमीचे नितीन वैद्य, Nitin Vaidya, निनाद वैद्य, Ninad Vaidya व अपर्णा पाडगावकर, दिग्दर्शक उमेश नामजोशी, प्रमुख कलावंत, ओंकार गोवर्धन, Omkar Govardhan, अश्विनी कासार, Ashwini Kasar, पूजा नायक, Pooja Nayak, मनोज कोल्हटकर, Manoj Kolhatkar, लेखक अभिजीत शेंडे, Abhijeet Shende,  प्रसाद ठोसर, Prasad Thosar, निर्मिती प्रमुख, (क्रियेटीव्ह हेड) लेखा त्रिलोक्य, Lekha Trailokya, सोहम देवधर, Soham Deodhar आणि या टिममधील पडद्यामागील सहकारी, तंत्रज्ञ या सर्वांचा मी कृतज्ञ आहे. सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही.


प्रत्येक कलाकृतीची एक नियती असावी. महिला, वंचित - बहुजन आणि अल्पसंख्यकांना काय वाचावं, काय बघावं, कोणत्या विचारात आपलं हित आहे, कशानं आपलं भलं होणार आहे याची जाण आजही असू नये हे वेदनादायी आहे. ५ डिसेंबरला मी या विषयावर एक पोस्ट लिहिली असताना, " आम्ही ही मालिका बघतो, ती चालू ठेवा" अशी एकमुखी मागणी तुमच्यापैकी अनेकांनी केली.  तुमच्या कॉमेंट, तुमचे फिडबॅक सांगतात की सर्व थरातील खूप लोक ही मालिका आवर्जून बघतात. तर मग तो प्रतिसाद टिआरपी मशीनवर का दिसत नाही? याचा अर्थ विद्यमान प्रतिसाद पुरेसा नाही. अजून खुप जास्त प्रतिसाद हवा होता. आम्हाला तशी अपेक्षा आणि विश्वासही होता. 


गाईने पान्हा चोरावा तशी प्रेक्षकांची या मालिकेबाबतची वागणूक राहिली. तमाम स्त्रियांना, चंगळवादी वंचित-बहुजन, अल्पसंख्यकांना आता सावित्रीबाई आणि जोतीरावांपेक्षा तुंबळ करमणूकीचा बेहद्द मारा करणार्‍या काल्पनिक मालिकांची जास्त निकड वाटत असावी. यावरून मराठी समाजाला स्वतंत्र विचार करायला लावणारे, मूल्यनिष्ठा शिकवणारे काही वाचायचे, बघायचेच नाहीये असे समजायचे काय? आजच्या बर्‍याच मालिका प्रेक्षकांना दैववाद, भ्रामक आणि खोटा इतिहास, फॉल्स ड्रामा, बेगडी कहाण्या दाखवित आहेत. अज्ञानमग्न आणि आत्मनाशउत्सुक बहुजन समाजाला ज्ञानद्रोहाचा अनेस्थेशिया देण्याचं काम त्या करीत आहेत. ( यालाही अपवाद आहेत, असतात.. काही उत्तम मालिकाही लोकांनी उचलून धरलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे.) दुसरीकडे सनातनी सत्ताधारी, समुहांना विचारहीन, एकसाची, नशेडी, उन्मादी प्राणी बनवण्यासाठीची लस रात्रंदिन टोचित आहेत. आत्ममग्न बहुजन चळवळी आपल्याच मित्रांच्या कमिटमेंट तपासण्यात मश्गुल आहेत. त्या कोमात गेल्याने त्यांना हा उलट्या पावलांचा प्रवास, हे मतलबी वारे दिसतच नाहीत. 


आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही मालिका पुढची किमान १०० वर्षे डिजिटल स्वरूपात टिकणार आहे. आज नसली तरी उद्या, कदाचित परवा पण या मालिकेची गुणवत्ता नव्या पिढीला समजेल असा मला भरवसा वाटतो. आजच्या बहुसंख्य प्रेक्षकांची इयत्ता, आवड आणि कुवत यांची सरासरी बघता ही मालिका त्यांना बहुधा झेपली नसावी. आज कोरोनाच्या दहशतीखाली जगत असताना मेंदूला झिनझिण्या आणणारी, डोक्याला खाद्य पुरवणारी, काळाच्या पुढची सावित्रीजोतीची गोष्ट त्यांना अनावश्यक वाटत असावी. 


तरिही एव्हढ्या लवकर आम्ही हार मानणार नाही. एका महाकवीनं म्हटल्याप्रमाणे, " काळ अनंत आहे आणि पृथ्वी विपुल आहे." कधीतरी समविचारी लोक आम्हाला भेटतीलच. "अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी सावित्रीजोतीची कहाणी...."  ही खंत जरूर आहे. काही गोष्टींना लोकप्रिय उत्तरं नसतात. असली तरी त्यांची जाहीर वाच्यता माध्यमांमध्ये करता येत नाही. काही गोष्टी आमच्या कक्षेबाहेरच्याही असतात. संघर्ष कुणाला चुकलाय? नजिकच्या भविष्यात कधीतरी उरलेल्या कथाभागावरही मालिका येईल अशी बुलंद आशाय. देशाच्या उज्वल भविष्यासाठी, परिवर्तनवादी विधायक कृतींसाठी आम्ही नव्या उमेदीने, अभिजात आशेने, पोलादी चिवटपणे धडपडत राहू. एक दरवाजा बंद होतो तेव्हा दुसरा दरवाजा उघडतो असं ऎकतो. तोवर धडपडणं, झुंजणं चालूच राहिल. 

- प्रा. हरी नरके, 

संशोधन सल्लागार, "सावित्री-जोती : आभाळाएवढी माणसं होती" 

२०/१२/२०२०

Saturday, December 5, 2020

१७२ वर्षांनीही सावित्री-जोतीचा वनवास काही संपत नाही - प्रा. हरी नरके



१) १८४८ साली सावित्री-जोतीने त्यांच्या दलित-ब्राह्मण-मुस्लिम मित्रांच्या सहकार्याने स्त्री शिक्षणाचा पाया घातला त्याला आता १७२ वर्षे उलटली. जोतीरावांच्या मृत्यूला १३० वर्षे होऊन गेली, पण जिवंतपणी त्यांना जो वनवास सोसावा लागला तो आज १७२ वर्षे उलटली तरी संपायला तयार नाही. पेशवाई आणि ब्रिटीशांचे राज्य गेले, लोकशाही आली, स्त्रिया आणि दलित-बहुजन शिकले, शिक्षणसम्राट झाले, राजकीय सत्तेच्या चाव्या त्यांच्यातल्या काहींच्या हातात आल्या, ते फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र, जय जोती-जय सावित्री असला तोंडदेखला गजर करू लागले, पण त्यांच्या विचारांबद्दल, त्यांच्यात तुमच्या ध्येयवादाबद्दल, जीवनकार्याबद्दल आस्था निर्माण झाली का?

२) १९५४ साली आचार्य अत्र्यांनी खूप मेहनत घेऊन "महात्मा फुले" हा मराठी चित्रपट निर्माण केला. चित्रपट दर्जेदार होता. पण तिकिटबारीवर तो चालला नाही. कारण तुमच्या कार्याचे/विचारांचे लाभार्थी चित्रपट गृहांकडे फिरकलेच नाहीत.

या चित्रपटाचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यात कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा, शाहीर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे, खुद्द आचार्य अत्रे, केशवराव जेधे यांनी भुमिका केलेल्या होता. तो चित्रपट आपल्याला फार आवडल्याचे पत्रही बाबासाहेबांनी अत्र्यांना लिहिले. त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तथापि चित्रपट न चालल्याने अत्रे मात्र कर्जात बुडाले.

३) आज सर्व स्त्रिया, दलित-बहुजन-ओबीसी-अल्पसंख्याक शिकले, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली, त्यांच्यात मध्यम आणि उच्च मध्यम वर्ग तयार झाला. तो उच्चजातीवर्गांचे आंधळे अनुकरण करू लागला. त्याला आपल्या जोती-सावित्रीसारख्या पुर्वजांचे ठार विस्मरण झाले, त्यांच्यासाठी ज्यांनीज्यांनी अपार खस्ता खाल्ल्या त्यांना तो सपशेल विसरला. तो आज निर्बुद्ध करमणुकीत बुडालेला आहे. चंगळवादात आणि दैववादात मश्गूल आहे. त्याला तुम्ही नको आहात.

४) जाने २०२० मध्ये "सावित्री-जोती आभाळाएव्हढी माणसं होती" ही मालिका सोनी मराठीवर दशमी क्रिएशनने सुरू केली. मधला करोना लॉकडाऊनचा चार महिन्यांचा खंड वगळता सुमारे वर्षभर ही मालिका चालू आहे. अनेक जाणकार ही मालिका सवड काढून बघतात. समक्ष भेटीत आणि फेसबुकवर तसे सांगतात. कलावंत, लेखन, दिग्दर्शन, निर्मिती दर्जेदार असल्याचे नमूद करतात पण मग त्याचे टीआरपीमध्ये रुपांतर का होत नाही? ह्या प्रश्नाचे उत्तर काही केल्या मिळत नाही.

५) मनोरंजन वाहिन्यांचे अर्थकारण टीआरपीवर अवलंबून असते. आजूबाजूला प्रचंड स्पर्धा आहे. प्रत्येकजण चांगला टीआरपी मिळवण्यासाठी धडपडतोय. टीआरपी प्रकरण अगम्य आहे. तरिही त्याचा महिमा अगाध आहे. लोकशिक्षण, समाजप्रबोधन, जाणीवजागृती, अभिरूचीनिर्माण यांना त्यात फारसे स्थान असत नाही. असले तर शेवटी कुठेतरी असते. निदान त्यांना प्राधान्य नक्कीच नसते. शिवाय आजचा राजकीय काळही प्रबोधनविरोधी आणि विपरीत. अशावेळी दशमीने आणि सोनी मराठीने वर्षभर अशी मालिका चालवली हेच विशेष. आज या मालिकेचे १८५ भाग पुर्ण झाले. 


१८२७ साली जन्मलेल्या जोतीरावांच्या जडणघडणीची आणि शिक्षण क्रांतीची-कार्याची अतिशय प्रभावी मांडणी मालिकेत करण्यात आली. सध्या मालिकेत १८५२-५३ च्या काळातली कथा दाखवली जात आहे. हाच क्रम आम्हाला १८९७ पर्यंत चालवायचा आहे. पण चालेल का तो? सांगता येत नाही.

६) फेसबुकवर लाइक करण्याला पैसे पडत नाहीत. शिवाय पोस्ट न वाचताही लाईक ठोकता येतो. (एका लाईकला उद्या फेसबुकने शंभर रुपये दर आकारला तर सगळे लाइक चुटकीसरशी गायब होतील.) त्यामुळे फेसबुक/ट्विटरवरची लोकप्रियता अत्यंत फसवी आहे. तिचे शिक्षणात, प्रबोधनात, टीआरपीमध्ये, कशातच रुपांतर होत नाही. फेसबुक्यांची विस्मरण शक्ती अगाध आहे. कृतज्ञताबुद्धी अत्यल्प आहे. 

७) जोतीराव-सावित्रीबाई तुम्ही कपाळकरंट्या, कृतघ्न आणि नतद्रष्ट बहुजनांसाठी अकारण खपलात. तुमचा त्याग सपशेल वाया गेलेला आहे. तुम्ही जे पेरलेत ते फारसे उगवलेले नाही. असलेच तर अत्यल्प उगवलेले आहे. १७२ वर्षांनंतरही अज्ञानमग्न असलेल्या ह्या वाचाळांना, वल्गनावीरांना आणि आत्ममग्न फत्तेलष्करांना माफ करा.

- प्रा. हरी नरके,

०५/१२/२०२०

Friday, November 27, 2020

व्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक -सोमनाथ चटर्जी


पंतप्रधान व्ही.पी.सिंग (जन्म- २५ जून १९३१ : निधन- २७ नोव्हेंबर २००८) हे सर्वसहमती, मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक होते.त्यांनी मंडल आयोगाचा अहवाल लागू केला.त्यातून सामाजिक उलथापालथ झाली.उत्तरेकडील राज्यात हिंसाचार उसळला. या प्रश्नावर संसदेत मी म्हणालो, " मंडल शिफारशींना माझा पाठींबा आहे. आजही देशातील इतर मागास वर्गाची दारूण पिळवणूक होते आहे. त्यांची प्रगती आणि विकास व्हावा यासाठी देशाची साधने आणि संसाधने वापरली जात नाहीयेत."

गुणवत्तेचा प्रश्न नेहमी आरक्षणाच्या संदर्भात पुढे केला जातो. गुणवत्ता ही उच्चवर्णियांची मक्तेदारी आहे असे मी मानत नाही. आरक्षण धोरण कायदेशीर आणि न्यायालयीन तपासणीत टिकलेले आहे.

प्रसारमाध्यमांची मंडल आयोगावरील प्रतिक्रिया निराशाजनक होती.माध्यमांनी व्ही.पी.सिंग यांना खलनायक म्हणून रंगवले. नैतिक आणि स्वच्छ राजकारणासाठी लढणारा एक शिपाई ही त्यांची खरी प्रतिमा पुसून टाकून त्यांच्याविरूद्ध अत्यंत दुष्ट आणि बदनामीकारक प्रचार करण्यात आला. हा प्रकार इतिहासात तरी कधीही घडलेला नव्हता.

संसदेत मी त्यावर म्हणालो, "प्रसारमाध्यमांनी योग्य प्रकारे लोकशिक्षण करायला हवे. दोन्ही बाजूंचे चित्र नीट मांडायला हवे. शिफारशी काय आहेत नी विरोध कशाला आहे हे व्यवस्थित मांडले गेले तर दुषित जनमत बदलू शकेल. आईवडील आणि शिक्षक लहान कोवळ्या मुलांना भडकावित आहेत. विरोधी चळवळ समाजविघातक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हातात गेलेली आहे."

"देशाच्या राजधानीत मंडल समर्थक आमदार खासदारांना घेराव घाला, त्यांना केरोसिनमध्ये बुडवून पेटवून द्या " असा विखारी प्रचार खुलेआम चालू होता. त्याचवेळी भाजपच्या अडवानींनी रथयात्रा काढली. अयोध्येच्या राम मंदिराचा मुद्दा दाखवण्यापुरता होता. त्यांची मुख्य लढाई मंडल आयोगाविरूद्ध होती.मंडल आयोगामुळे मागास जाती संघटित होत होत्या. त्यांच्या विरोधात त्यांना आव्हान देण्यासाठी उच्च जातींचे संघटन करण्यासाठी अडवानींचा हा खटाटोप होता. त्यासाठी धर्माचा वापर केला गेला. संकुचित राष्ट्रवादाला खतपाणी घालणारी भाषणे रथयात्रेता झाली. देशभर विलक्षण धर्मविद्वेषी परिस्थिती तयार करण्यात आली.

अडवानींना बिहारमध्ये अटक झाली. भाजपाने व्ही.पी.सिंग सरकारचा पाठींबा काढला. अडवानींना देशात धर्माच्या नावावर युद्धे घडवायची होती. रथयात्रेच्या मध्यभागी ठळकपणे भाजपाचे निवडणूक चिन्ह मिरवले गेले.

व्ही.पी. सिंगांनी राजीनामा दिला.

सत्ता गमावली तरी एक मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांचा आब वाढला. त्यांची निष्ठा आणि पारदर्शी सरकार देण्याचा त्यांचा प्रयत्न याचे मला फारच कौतुक वाटले. प्रसारमाध्यमे अत्यंत कट्टरपणे त्यांच्या विरोधात होती. त्यांनी व्हीपींच्या अश्लाघ्य बदनामीची मोहीमच राबवली. व्हीपींनी जे काही केले ते योग्यच होते. त्यांची पद्धतही योग्यच होती असे मला वाटते.

-सोमनाथ चटर्जी, तत्वनिष्ठेची जपणूक, [आत्मचरित्र], अनुवाद- शारदा साठे, राजहंस प्रकाशन, पुणे, २०१४, किं.३२५ रूपये.

-प्रा.हरी नरके


Thursday, November 26, 2020

भारतीय राज्यघटना : आपण आणि संविधान साक्षरता -प्रा. हरी नरके





भारतीय संविधान किंवा राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ ला मंजूर करून देशाला अर्पण करण्यात आली म्हणुन आजचा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जाने.१९५० ला ती अंमलात आली. आज ७० वर्षे उलटून गेली असली तरी देशातील सुशिक्षितांपैकी दहातल्या सुमारे नवांनी हे पुस्तक बघितलेलेही नाही, वाचण्याचा तर विषयच नाही. राज्यघटनेबद्द्ल बहुसंख्य नागरिकांमध्ये घनघोर अज्ञान आहे. या पार्श्वभुमीवर काही निरिक्षणे/वैशिष्ट्ये नमूद करायला हवीत.

१) ९ डिसेंबर १९४६ ला घटना सभेची पहिली बैठक झाली. पु्ढे तीनेक वर्षे हे काम चालले. घटना परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते तर मसुदा समितीचे अध्यक्ष कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. घटना परिषदेचे सुमारे ३०० सभासद होते. त्यातले ८२ टक्के सदस्य काँग्रेस पक्षाचे होते. सात जणांच्या मसुदा समितीने घटनेचे प्रत्यक्ष लेखन केले. मात्र अनेकविध अडचणींमुळे यातले बरेचजण गैरहजर असत, अशावेळी हे काम एकहाती बाबासाहेबांनी पार पाडले. त्यामुळे ते संविधानाचे प्रमुख शिल्पकार होत.

 २) असे जरी असले तरी राज्यघटनेचे लेखन म्हणजे एखाद्या कादंबरीचे लेखन नव्हे. बाबासाहेबांच्या मनाला येईल ते लिहिण्याचे स्वातंत्र्य त्यांना नव्हते. लिहिलेला प्रत्येक शब्द पाच स्तंभावर आधारलेला होता. त्याला दरवेळी घटना परिषदेत मतदान घेऊन मान्यता घ्यावी लागत होती. अर्थातच काँग्रेस पक्षाचे बहुमत असल्याने त्या पक्षाच्या श्रेष्ठींच्या मान्यतेनेच पुढे  जावे लागत होते. हे पक्षश्रेष्ठी पाचही जण बॅरिस्टर होते. महात्मा गांधी, पंडीत नेहरु, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद आणि मौलाना आझाद. यातले गांधीजी घटना सभेचे सदस्य नसले तरी ते सर्वाधिक प्रभावशाली होते. त्यांची ३० जानेवारी  १९४८  ला हिंदुत्ववादी नथूराम गोडसेने हत्त्या केली. पण तोवर घटनेचा पहिला मसुदा लिहुन तयार झालेला होतो. जो लगेच २० व २६ फेब्रुवारी १९४८ ला गॅझेट ऑफ इंडीयात प्रकाशित करण्यात आला. तो तुम्ही वाचायला हवा. बाबासाहेब, गांधीजी आणि नेहरू नसते तर आजचे बहुसांस्कृतिक, प्रागतिक, वैश्विक मुल्यांवर आधारलेले मौलिक संविधान आपल्याला मिळाले असते का? बहुधा नाही.

३) घटनेसभेतले ३०० पैकी २० सदस्य खूपच प्रभावशाली/सक्रिय होते. त्यातले ५ याआधी नमूद केलेले आहेतच, उरलेले पुढीलप्रमाणे, अनंतशयनम अय्यंगार, गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादि कृष्णस्वामी अय्यर, शंकरराव देव, जयरामदास दौलतराम, श्रीमती दुर्गाबाई, जे.बी.कृपलानी, टी.टी.कृष्णम्माचारी, एच.सी.मुखर्जी, के.एम.मुन्शी, गोविंद वल्लभ पंत, एन.माधव राव, सत्यनारायण सिन्हा, पट्टाभि सीतारामय्या आणि सय्यद मोहम्मद सादुल्ला. घटना सभेचे मुख्य सल्लागार बी.एन.राव हे होते. 

४) घटना सभेच्या तीन वर्षांच्या प्रत्येक कामकाजाचे इतिवृत्त बारा खंडांमध्ये भारत सरकारने प्रकाशित केलेले आहे. ते कॅड ( CAD ) " कॉन्स्टीट्यूयंट असेम्ब्ली डिबेट" अतिशय मौलिक आहेत. ते वाचल्याशिवाय घटना कशी तयार झाली याचे प्राथमिक ज्ञानही होत नाही.  

५) घटना सभेने विविध उपसमित्या नेमलेल्या होत्या. त्यांचे अहवाल विचारात घेऊनच बाबासाहेबांना घटनेचा मसुदा लिहावा लागला. " द फ्रेमिंग ऑफ इंडीयाज कॉन्स्टीट्यूशन" च्या सहा खंडांमध्ये हे सगळे दस्तावेज छापलेले आहेत. जिज्ञासूंनी ते बघायला हवेत.

६) मुख्य सल्लागार बी.एन. राव यांनी एक मसुदा आधीच तयार केलेला होता. त्याची छाननी बाबासाहेबांनी केली, व त्यातले काही घेतले, काही वगळले. राव यांचे आत्मचरित्र " मेकिंग ऑफ इंडीयाज कॉन्स्टीट्यूशन" खूपच वाचनीय आहे.

७) १८५७ च्या लढाईपासून सुरू झालेला स्वातंत्र्य संग्राम ९० वर्षे चालला. या काळात जनतेने जी स्वप्नं बघितली, त्यांना जी आश्वासने दिली गेली, वायदे केले गेले, चर्चा झाल्या, मंथन झाले, त्या सगळ्यांना न्याय देणे हे सुत्र बाबासाहेबांनी मोलाचे मानून त्याला संविधानात उचित जागा दिली.

८) राणीचा जाहीरनामा, मोर्लेमिंटो सुधारणा, मॉण्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा, साऊथबरो कमिशन, सायमन कमिशन आणि गोलमेज परिषदा यातून १९३५ चा भारत कायदा तयार झाला. तो बाबासाहेबांनी आधारभूत मानला.

 ९) घटनेचा मसुदा प्रकाशित करून जनतेकडून सुचना/अभिप्राय/ सुधारणा मागवण्यात आल्या. आलेल्या हजारो सुचना या तुमच्या - माझ्यासारख्या सर्वसामान्य घरांमधून आलेल्या होत्या. त्यातल्या सुमारे अडीच हजार सुचना स्विकारल्या गेल्या. या अर्थाने तमाम भारतीय जनता संविधानाच्या निर्मितीत सहभागी झालेली होती हे घटनेवर बोलताना लक्षात घ्यायला हवे.

१०) हे खरे आहे की संविधान सभेत उच्च वर्णियांचेच वर्चस्व होते. सुमारे ९० टक्के सदस्य या समाजांतून आलेले होते. ओबीसी, महिला, अल्पसंख्यक अशांना तिकडे पुरेशे प्रतिनिधित्व मिळालेले नव्हते. तरिही बाबासाहेब, गांधीजी व नेहरूजी यांच्यामुळे त्यांचाही विचार झाला. कलम ३२६ अन्वये सगळ्यांना मताधिकार मिळाला. कलम १३ अन्वये जुने कायदे,रूढी,परंपरा, श्रद्धा, समजुती, विश्वास यातले घटनाविरोधी ते सगळे रद्द करण्यात आले, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य आणि समता या चार वैश्विक मुल्यांवर आधारलेली राज्यघटना आकाराला आली. समावेशकता हा राज्यघटनेचा मुख्य गाभा आहे. चातुर्वर्ण्य, बहिष्कृतता, लिंगभाव विषमता, वर्गीय भेदभाव आणि जातीभेद यांना नकार देण्यात आला. परंपरा आणि परिवर्तन यांचा संविधानात मेळ घालण्यात आला.शतकानुशतके वंचित, शोषित, अन्यायग्रस्त राहिलेल्या महिला, शुद्र, अतिशूद्र यांना राज्यघटनेने प्रथमच माणूसपणाचा दर्जा दिला.

११) आज केंद्रीय सत्तेत असलेल्या संघपरिवाराचा संविधानाच्या निर्मितीत कसलाही सहभाग नव्हता, त्रैवर्णिक, पुरूषसत्ताक आणि विषमतावादी, मनुवादी छावणीला काही प्रमाणात तरी जेरबंद केले गेले. म्हणूनच त्यांना हे संविधान नकोय. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. त्यांना मूठभरांची वर्चस्ववादी,बहुजनांना गुलाम करणारी व्यवस्था पुन्हा आणायची आहे.

अशावेळेला  संविधान साक्षर होऊ या. संविधान जनजनात, घराघरात पोचवू या. हे संविधान वाचले तरच आपण वाचू शकू नाहीतर पुन्हा मनुवादी सत्ता अटळ असेल. तुम्ही कोणाच्या बाजूचे आहात? संघ परिवार की संविधान परिवार?

-प्रा. हरी नरके, 

२६ नोव्हेंबर २०२०

Saturday, November 14, 2020

जेव्हा माणूस जागा होतो- चा सुवर्णमहोत्सव





गोदावरी परूळेकर यांच्या " जेव्हा माणूस जागा होतो" या पुस्तकाला यावर्षी ५० वर्षे पुर्ण झाली. आत्मकथन आणि समाजशास्त्रीय दस्तऎवज म्हणून हे पुस्तक मोलाचे आहे. त्याचा सुवर्णमहोत्सव लक्षात ठेऊन हेरंब कुलकर्णी यांनी "आदिवासी भागातील विकास: काय झालं, काय राहिलं" या विषयावर मौजेच्या यावर्षीच्या दिवाळी अंकात काहीजणांना बोलतं/लिहितं केलेलं आहे. मेधा पाटकर, विवेक पंडित, प्रकाश आमटे, वाहरू सोनवणे, बंड्या साने व पुर्णिमा उपाध्याय आणि अशोक ढवळे यांनी मांडलेला लेखाजोखा वाचनीय आहे. हेरंब कुलकर्णी यांचा बीजनिबंध अभ्यासपुर्ण आहे.

मेळघाटातील धाणा या गावातील आदिवासींनी जंगलात पिकं घेतली. ही जमिन वनखात्याच्या मालकीची असल्याने आम्ही  ती पिकं उध्वस्त करू असे अधिकार्‍यांनी घोषित केले. पिक तुडवण्यासाठी हत्ती मागवण्यात आला. आदिवासींच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार अशी ही परिस्थिती होती. पुर्णिमा उपाध्याय यांनी नागपूर उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना पत्र लिहिले. कोर्टाला शनिवार-रविवारची सुट्टी होती. तरिही हे पत्र हीच याचिका माणून त्या न्यायाधिशांनी सरकारी वकिल, वनअधिकार्‍यांना बोलावून घेतले व पिकांची नासाडी करण्याला मनाईहुकुम बजावला. या लेखात त्या न्यायाधिशांचे नाव असायला हवे होते. सध्या न्यायव्यवस्थेचे ज्या प्रकारे राष्ट्रीयकरण झालेले आहे ते पाहता असे वेगळे काम करणार्‍या न्यायाधिशांना दाद द्यायला हवी. हा लेख चांगला आहे,पण त्यात गोदावरी बाईंच्या सदर पुस्तकाचा उल्लेख दिसला नाही. १९०७ साली भीमराव रामजी उर्फ बाबासाहेब आंबेडकर हे मॅट्रीकची परीक्षा पास झाले. ते मुंबई प्रांतातील पुर्वास्पृश्यातील पहिले विद्यार्थी होते. त्यानंतर बरोबर शंभर वर्षांनी २००७ साली मेळघाटातील चिलाटी गावचा पहिला आदिवासी मुलगा एस.एस.सी.ची परिक्षा पास झाला. या दोघांच्या मार्कांमध्येही विलक्षण साम्य आहे. लेखिकेने या मुलाचे नाव द्यायला हवे होते.

प्रकाश आमटेंनी लिहिलेला सगळा लेख आमटे घराण्याच्या थोरवीवरची आरतीच आहे. आमटॆ घराण्याचे योगदान सर्वमान्यच आहे. त्यांनीही हे पुस्तक वाचलेले दिसत नाही किंवा असल्यास त्याचा उल्लेख करायची गरज त्यांना वाटलेली नाही. 

मेधा पाटकरांना आजचे शिक्षण विद्रोह जागा करीत नाही असे वाटते. आजची शिक्षण पद्धती ज्ञानाऎवजी कौशल्याला महत्व देते हे धोरण त्यांना चुकीचे वाटते.

ढवळे यांचा लेख म्हणजे त्यांच्या पक्षाने किती आणि कोणत्या निवडणूका जिंकल्या यांची भली मोठी यादी होय. आदिवासींना जे काही मिळाले ते केवळ ढवळे यांच्या पक्षामुळेच असा जोरदार दावा ते या लेखात करतात. पंडित यांच्या लेखात त्यांनी ढवळ्यांच्या या पक्षीय कामांचा पोलखोल केलेला आहे. वाहरू सोनवणेंना बाहेरच्या लोकांच्या आदिवासींमधील कामांमागे कॉन्स्पीरशी थेयरी दिसते. 

सगळेच लेख वाचनीय आहेत.

- प्रा. हरी नरके

Wednesday, November 4, 2020

बेस्ट कन्नड टेलिव्हीजन शो पुरस्काराच्या निमित्ताने- प्रा. हरी नरके


आजकाल आपण एका विपरीत काळामधून जातो आहोत. एखाद्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमातील प्रश्नानेसुद्धा धार्मिक भावना दुखावल्याचा कांगावा करून त्या कार्यक्रमाविरुद्ध आणि त्याच्या सुत्रसंचालक व निर्मात्याविरूद्ध गुन्हे दाखल होण्याचा हा काळ आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भारतीय संविधानाने दिलेले मुलभूत अधिकार हे सारे खुंटीला टांगून उलट्या पावलांचा प्रवास करणार्‍या सनातन्यांसाठी हा सुगीचा काळ आहे. अशा काळात समाजक्रांतिकारक डॉ० बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीराव - सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर रंजनातुन प्रबोधन, जागरण करणार्‍या टिव्ही मालिका निर्माण करणे, त्या सुरळीतपणे पार पाडणे हे किती जोखमीचे काम आहे त्याबद्दल न बोललेले बरे. अशा मालिकांना सुजाण प्रेक्षकांचा मिळणारा भरिव आणि दणकट प्रतिसाद उमेद वाढवणारा ठरतो. अशा मालिकांना पुरस्कार मिळण्याची सुतराम शक्यता नसते. निदान मराठीत तरी ते शक्य नाही. जोतीराव -बाबासाहेब यांना हयातभर भेदभाव आणि पक्षपात सहन करावा लागला. ते गेल्यानंतर आज एव्हढ्या वर्षांनी परिस्थिती वरवर सुरळीत दिस असली तरी गुंतागुंत अनेकपटींनी वाढलेली आहे. अनेकांच्या मनातला उच्चत्वाचा अहंगंड, सुप्त पातळीवर मनात फुलवलेला विखार आणि परिवर्तनाबद्दलची अढी, समकालीनांबद्दलचा इसाळ यात कोणतीही कसर दिसत नाही. 

आमचे काही लढवय्ये परिवर्तनवादी मित्र तर अशा कामांच्या मागे सुक्ष्मदर्शक भिंगं लावूनच बसलेले असतात. अशा वैचारिक प्रबोधनाच्या कामांमध्ये विरोधकांनी आणलेले अडथळे समजून घेता येतात पण स्वकीयांच्या छावणीतून होणारे हल्ले वेदनादायी असतात. एकवेळ मदत करू नका पण किमान कामाला गतीरोध तरी निर्माण करू नका. या आमच्या विद्वान दोस्तांचं समकालीन परिस्थितीचं आकलन तोकडं आणि दळभद्री. हे स्वत: संपुर्ण निष्क्रिय असतात मात्र दुसर्‍यांच्या कोंबड्याने प्रबोधनाचा सुर्य उगवताच कामा नये यासाठी ते जिवाचा आटापिटा करीत असतात. त्यांच्याकडून शाबासकीचे दोन शब्द सोडा सतत फक्त जळफळाट आणि हेंद्रेपणा वाट्याला येतो. निदान आमची तरी त्यांच्याकडून तशीच अपेक्षा असते, अनुभवही तसाच आहे. हे चक्रम लोक इतके कडवट, द्वेष्टे, करंटे आणि विखारी आहेत की एकवेळ विरोधी छावणी परवडली पण यांचे बोचकारे नकोत.  

जे टीआरपीच्या तगड्या स्पर्धेत असतात त्या इतर मालिकावाल्यांकडून अशा कामांबद्दल बरं बोललं जाण्याची सुतराम शक्यता नसते. त्यामुळे आपली बाबासाहेबांवरील मराठी मालिका दर्जेदार झाली, चार भल्या लोकांना ती आवडली हाच आमचा पुरस्कार आम्ही मानला. कोणी दखल घेवो न घेवो, कोणी शिव्या देवोत, जहरी टिका करोत, नाकं मुरडोत, आपण आपलं कर्तव्य करीत राहायचं. चार शिव्या कमी मिळाल्या तर तोच बोनस समजायचा असा हा विपरीत काळ आहे. महापुरूषांचे विचार कोट्यावधींपर्यंत पोचवण्याचा, मालिकेच्या निर्मितीचा आनंद मोठा असला तरी सतत टांगती तलवार आणि अचुक राहण्याचा भयंकर ताण हे ओझे असते की बक्षीस?  

अशा काळात आपल्या हिन्दीतील मालिकेच्या कन्नड भाषेत डब केलेल्या टिव्ही शोला यावर्षीचा बेस्ट कन्नड टेलिव्हीजन शोचा पुरस्कार मिळावा ही आश्चर्य वाटावे अशी अगदी चमत्कारसदृश्य घटनाच म्हटली पाहिजे.

-प्रा. हरी नरके,

०४/११/२०२०

Monday, November 2, 2020

महात्मा फुले समता परिषदेचा २८ वर्षांचा लेखाजोखा- प्रा. हरी नरके






१९८० साली देशात मंडलपर्व सुरू झाले. १९९० साली विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल लागू केला. त्यानंतर मंडल आणि कमंडल लढाया सुरू झाल्या. मंडलची क्रांती हाणून पाडण्यासाठी संघपरिवाराने रामजन्मभुमी आंदोलनाची प्रतिक्रांती घडवून आणली. मंडल वादंग, महाचर्चा आणि संघर्षातून शतकानुशतके झोपी गेलेला ओबीसी समाज जागा होऊ लागला. लवकरच आकाराला येऊ घातलेली ओबीसी व्होटबॅंक आणि ओबीसी अस्मिता यांची पहिली चाहूल लागली ती राजकीय चाणक्य नरसिंह राव आणि मराठा डिप्लोमॅट शरद पवार यांना. भविष्यवेधी राजकारणात मुरलेल्या या दोघांनी त्यादिशेने पावले टाकायला सुरूवात केली. छगन भुजबळांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये येणे हा या बांधणीच्या नेपथ्याचा पहिला अंक होता. दुसरा अंक होता अर्धसामाजिक-सांस्कृतिक आणि पुर्ण राजकीय अशा महात्मा फुले समता परिषदेची स्थापना.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या स्थापनेला काल २८ वर्षे पुर्ण झाली. विविध स्मारके उभारणे, देशभर ओबीसी समाजाचे भव्य मेळावे घेऊन समाजप्रबोधन, जागृती आणि ओळख निर्माण करणे, फुले साहित्याचे अनुवाद सर्व भारतीय भाषांमध्ये पोचवणे, ओबीसी बजेट आणि जनगणना हे विषय देशपातळीवर लाऊन धरणे, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींमध्ये ओबीसी बंधुभाव व भगिनीभाव निर्माण करणे, राज्यात मंडल आयोग लागू करणे, देशात संपुर्ण मंडलची अंमलबजावणी करण्याचा दुसरा टप्पा म्हणून उच्च शिक्षण संस्थांमध्ये २७ टक्के ओबीसी आरक्षण लागू करणे(२००६) हे प्रवासातले मैलाचे दगड होत. पंचायत राज्यातील २७ टक्के आरक्षणाने एकट्या महाराष्ट्रात पाच लाख ओबीसी कार्यकर्त्यांना राजकीय सत्तेच्या सावलीत पोचता आले. ताकद आणि प्रशिक्षण मिळाले. त्यातून ओबीसींची विधानसभा व लोकसभेत जाण्याची आकांक्षा जागी झाली. त्यामुळे सत्ताधारी जातीला स्पर्धक निर्माण झाले. गावगाड्यावरील शतकांची पकड ढिली होत असल्याच्या जाणीवेने सर्वपक्षीय सरंजामी शक्ती अस्वस्थ झाल्या. फुले-शिंदे-शाहू-आंबेडकरांच्या प्रेरणेतून जाग्या झालेल्या ब्राह्मणेतरांच्या नावावर तोवर एकाच जातीला राजकीय सत्तेचे लाभ घेता येत होते. त्यात वाटेकरी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. २७ टक्के ओबीसी आरक्षण विधानसभेत व लोकसभेत आणण्याची मागणी होऊ लागली, ती ऎरणीवर आणणे आणि तमीळनाडू व बिहार पॅटर्न देशभर विस्तारण्यासाठी भुमिगत हालचाली करणे असा बराच मोठा पल्ला समता परिषदेने २८ वर्षात गाठला. 

याचा अर्थ ही संघटना स्थापन करताना आमच्या डोळ्यापुढे जी जी उद्दिष्ट्ये होती ती सर्व साकार झाली का? "अंशता" असे याचे खरे उत्तर आहे. अनेक  उद्दिष्ट्यांना तर अद्याप हातही घातला गेलेला नाहीये. मधल्या काळातल्या पिछेहाटीनंतर बरेच काही गमवावे लागले. इतकी वेगवान आणि चौफेर वाटचाल आत्मघातकी ठरणार याचा अंदाज होताच पण सनातनी शक्ती इतका भीषण आघात करतील असे वाटले नव्हते. प्रथमच जाग्या होत असलेल्या ओबीसी महाशक्तीला उखडून टाकण्यासाठी सर्वपक्षीय चाणक्य कामाला लागले. "इडी"पिडा  मागे लावण्यात आल्या. ओबीसी अस्मितेचे हे रोपटे उपटून टाकण्याचा सर्वपक्षीय त्रैवर्णिक हायकमांडचा निर्णय झाला.

आज २८ वर्षात अखिल भारतीय समता परिषद देशभरात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, झारखंड, उत्तरांचल, बिहार, नवी दिल्ली, हरियाना, पंजाब, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तरप्रदेश इथे मुळं धरू शकली. विशेषत: महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, दिल्ली, हरियाणा, बिहार, झारखंड या राज्यांमध्ये लाखोंच्या संख्येने समता सैनिक सक्रीय आहेत.

समता परिषदेने महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करून ओबीसींना आरक्षण, शिष्यवृत्त्या आणि इतर असंख्य संरक्षणं मिळवून दिली. पुणे येथिल महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक, नायगाव येथे सावित्रीबाई फुले स्मारक, दिल्ली येथे संसदेच्या परिसरात महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यश आले. केंद्रीय शाळा व नोकऱ्या यामध्ये ओबीसींना आरक्षण, ओबीसी विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती, मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करण्यासाठी पाठपुरावा, पुणे विद्यापीठात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या निधीतून महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळे बसविण्यात आले. पुणे विद्यापीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासह अनेक सामाजिक कार्यात अखिल भारतीय समता परिषदेला यशाचा झेंडा रोवता आला. वीरप्पा मोईली, शरदचंद्र पवार, शरद यादव,  भालचंद्र नेमाडे, अरुंधती रॉय, कुमार केतकर, उत्तम कांबळे, भालचंद्र मुणगेकर, आ.ह.साळुंखे, रावसाहेब कसबे, बाबा आढाव,फादर फ्रान्सीस दिब्रिटो आणि हरी नरके यांना महात्मा फुले पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

एस.पी. महाविद्यालयाच्या मैदानावर डिसेंबर १९९३ मध्ये राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन विकसीत फुले स्मारक राष्ट्रार्पण करण्यात आले. नायगावला सावित्रीबाई फुले स्मारक व शिल्पसृष्टी उभारणे,नायगावचा समग्र कायापालट घडवणे, संसदेच्या प्रांगणात महात्मा फुले यांचा पुर्णाकृती पुतळा, महाराष्ट्र सदनातील फुलेपुतळा, या दोघांचे अस्सल फोटो प्रकाशित करणे आणि त्यांचे ग्रंथ-पुस्तके देशविदेशापर्यंत पोचवणं हे मोठे टप्पे होते. नियमित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे, मेळावे, राजकीय शक्ती प्रदर्शने, निवडणुकांमधील प्रशिक्षणं याद्वारे कार्यकर्त्यांची महाशक्ती उभी करण्यात परिषदेला यश आलेले आहे. ओबीसी जनगणना, ओबीसी बजेट आणि १०० टक्के मंडल लागू करणे, मिळालेले आरक्षण टिकवणे, ओबीसी व्होटबॅंक आणि ओबीसी अस्मिता यांची निर्मिती करणे ही आगामी उद्दिष्ट्ये आहेत. त्यांची संकल्पचित्रे आणि कृतीआराखडा तयार आहे. बघूया कसे आणि किती जमते ते!

-प्रा. हरी नरके, 

राष्ट्रीय सरचिटणीस, अ.भा. महात्मा फुले समता परिषद,

०२/११/२०२० 

Sunday, November 1, 2020

आंबेडकरी चळवळीचे समर्पित सेनानी काशी कृष्णा, दुबई/विशाखापट्टनम यांचे निधन- प्रा. हरी नरके














आंबेडकरी चळवळीची दक्षिण भारत आणि सौदी अरेबियातली धगधगती मशाल, कृतीशील लढवय्या, समर्पित सेनानी, मित्रवर्य कृष्णा यांचे आज सकाळी आजारपणाने निधन झाले. आठवड्यापुर्वीच त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले. ते अविवाहीत होते. कृष्णा यांचे वय ६२ वर्षे होते. ते विशाखापट्टनचे रहिवासी होते. गेली ३० वर्षे त्यांनी दुबई व आबुधाबी येथे उच्चपदावर काम करीत असताना आंबेडकर इंटरनॅशनल मिशनचे काम घराघरापर्यंत पोचवले. १६वर्षांपुर्वी त्यांनी आंबेडकर जयंतीच्या भव्य कार्यक्रमाला मला दुबईला प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रित केले होते. त्या कार्यक्रमाला १५०० भारतीय उपस्थित होते. त्यानंतर डिसेंबर २००९ ला त्यांनी हैद्राबादला जागतिक आंबेडकर विचार परिषदेचे भव्य आयोजन केले होते. मूकनायक या बाबासाहेबांच्या पेपरच्या शताब्द्धीच्या निमित्ताने नऊ महिन्यांपुर्वी त्यांनी विशाखापट्टनला जागतिक पातळीवरील मूकनायक शताब्धीमहोत्सव आयोजित केला होता.


तरूणवयात कृष्णा मुंबईत नोकरी करीत असताना दलित पॅंथरच्या प्रमुख नेत्यांच्या संपर्कात आले व ते पॅंथरचे क्रियाशील सदस्य बनले. पुढे नोकरीनिमित्त ते दुबईला गेले. तिथे त्यांनी चळवळीचे काम अतिशय तळमळीने, मेहनतीने आणि वाहून घेऊन केले. शेवटच्या श्वासापर्यंत ते चळवळीच्या भवितव्याबद्दल झटत आणि बोलत असत. 


मी चळवळीत अनेक लोकांना जवळून पाहिले परंतु असा नि:स्वार्थ आणि ध्येयवादी नेता, कार्यकर्ता बघितला नाही. त्यांच्या बहिणीचे सासरे हे बाबासाहेबांसोबत काम करीत असत. ते आंध्रप्रदेशातील शेड्युल कास्ट फेडरेशनचे प्रमुख नेते होते. ते अनेक टर्म बाबासाहेबांच्या विविध पक्षांचे आमदारही होते.


कृष्णा यांचे निधन हे माझ्यासाठी अतिशय धक्कादायक आणि दु:खद आहे. एक सुहृद, ज्येष्ठ बंधू आणि काळीजतळातला स्नेही गमावल्याचा हा शोक असीम आहे.

कृष्णा, तुझे मिशन आम्ही चालू ठेऊ.

कृष्णाला शेवटचा मानाचा, कृतज्ञ जयभीम.

-प्रा. हरी नरके,

०१/११/२०२०

Saturday, October 31, 2020

अनुसुचित जातीजमातींच्या आरक्षणाचे विरोधक वल्लभभाई पटेल-प्रा.हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहामुळे आणि महात्मा गांधींच्या पाठींब्यामुळे अनुसुचित जाती व जमातींना राज्यघटनेने आरक्षण दिलेले होते. गांधींजींची हिंदुत्ववादी नथुराम गोडसेने ३० जानेवारी १९४८ ला हत्त्या करताच काँग्रेसमधल्या सनातनी गटाने आरक्षणविरोधी उसळी घेतली. त्यांचे नेते होते वल्लभभाई पटेल. पटेल यांचा हिंदुत्ववाद्यांना पुळका असतो, त्याची जी अनेक कारणे आहेत त्यातले मुख्य कारण पटेल आरक्षणविरोधी होते हे होय. गांधीहत्त्येच्या अवघ्या २५ व्या दिवशी पटेलांनी आरक्षणविरोधकांची बैठक बोलावली आणि आरक्षण काढून घेण्याचे डावपेच आखायला सुरुवात केली. पटेल घटना परिषदेच्या अल्पसंख्यांक उपसमितीचे अध्यक्ष होते. राज्य घटनेने अनु. जातीजमातींना दिलेले आरक्षण रद्द करावे असा ठराव स्वत: पटेलांनी ३० डिसेंबर १९४८ च्या उपसमितीच्या बैठकीत मांडला. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कडाडून विरोध केला. ते म्हणाले, " घटना परिषदेने या आधीच आरक्षणाला मान्यता दिलेली असल्याने ते काढून घेण्याचा विषय उपसमितीच्या अधिकारात येतच नाही. सबब हा मुद्दा या बैठकीत आणता येणार नाही." तरिही उपसमितीचे अध्यक्ष असलेल्या पटेलांनी डॉ. आंबेडकरांचा हा मुद्दा फेटाळून लावला. जवाहरलाल नेहरूंनी मात्र या बैठकीत मौन धारण केले. 

पटेलांनी देशभर या मागणीसाठी सनातन्यांची आंदोलने घडवून आणली. पटेलांनी हीच शिफारस घटनासभेत मांडली असता डॉ. आंबेडकरांनी घटना सभेच्या बैठकीतून सभात्याग केला व पुढील ४ दिवस ते कामकाजाला अनुपस्थित राहिले. त्यांनी घटना समितीचा राजीनामा द्यायचे ठरवले. अनु. जातीजमातींना राज्यघटना संरक्षण देणार नसेल तर अशा घटना परिषदेत मी राहणार नाही असे त्यांनी जाहीर केले.

त्यामुळे नाईलाजाने पटेलांनी माघार घेतली  व त्यामुळे अनु. जातीजमातींचे आरक्षण टिकले.


- प्रा. हरी नरके, 

३१/१०/२०२०


संदर्भासाठी पाहा-

१. डॉ. राजा शेखर वुंद्रू, (आय.ए.एस.) " आंबेडकर, गांधी आणि पटेल," ब्लूम्सबेरी प्रकाशन, नवी दिल्ली, २०२०, पृ. २३१ ते २३९


२. Constituent Assembly Debates, vol.5, pp. 259-70, vol. 8, pp. 269-72,   

३. कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी, खंड ७७ वा, पृ.२५,

४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेस, खंड, १३, पृ.९२, पृ. १२७

५. बी. शिवा राव, द फ्रेमिंग ऑफ कॉन्स्टीट्यूशन, खंड ४ था, पृ. ५९९, पृ.७७२-७३, खंड २ रा, पृ. २४७,


Friday, October 30, 2020

पुरूषोत्तम बेर्डे यांचे "क्लोज एनकाउंटर्स"- कामाठीपुर्‍याचे भन्नाट आत्मचरित्र


टूरटूर, हमाल दे धमाल या गाजलेल्या नाटक-सिनेमांमुळे पुरूषोत्तम बेर्डे सर्वांना परिचित आहेत. मराठीत अनेक व्यक्तींची दर्जेदार आत्मकथनं आजवर आलेली आहेत. परंतु बेर्डे यांनी लिहिलेले "क्लोज एनकाउंटर्स" हे मुंबईतील बदनाम वस्ती म्हणुन ओळखल्या जाणार्‍या कामाठीपुर्‍याचे आत्मचरित्र आहे. विशेष म्हणजे ते अतिशय खिळवून ठेवणारे आहे. त्यांनी या परिसरातील गल्ल्या, चाळी, घरं, माणसं यांची इतकी रसरशीत, चटकदार पोर्ट्रेट्स चित्रित केलीयत की सामान्य वाचक ते जाणते समीक्षक असे सारेच या पुस्तकावर लट्टू होतील. बेर्डे कमर्शियल आर्टीस्ट आहेत. गाजलेले कॉपीरायटर आहेत. एकाच वेळी तुफान वाचनीयता, वेधकता, विषयाच्या थेट गाभ्याला भिडणं आणि त्या त्या माणसांचे रसायन मुळासकट उलगडून दाखवणं हे काम खुप आव्हानकारी असतं. ते बेर्डेंनी लिलया पेललेलं आहे. प्रसिद्ध कथाकार आणि नाटककार जयंत पवार यांची या पुस्तकाला लाभलेली "सांगोपांग कामाठीपुरा" ही प्रस्तावना म्हणजे एक श्रेष्ठ कलाकृतीच आहे.

वासुनाका, माहिमची खाडी, चक्र ते मुंबई दिनांक अशा अनेक पुस्तकांनी मुंबईचे उत्तम चित्रण आपल्यासमोर ठेवलेले आहेत. नामदेव ढसाळांच्या कवितांमधली मुंबई जोरदार आहे. पण बेर्डॆंची ही कहाणी केवळ भन्नाट म्हणावी अशी दर्जेदार आहे. 

अलेक्झांड्रा, श्यामू, कासीम बिल्डींग, अन्ना, तात्या अमोणकर आणि अपने बालाका डायरेक्शन, बबलू, येंचू, वच्छा, लोखंडेसर, मनजी, शेट्टी लोक, पेंटर अबूभाई, नूर महम्मद, अंजनीसुत व्यायामशाळा, याद्या, राजम्मा, गवजीबुवा, शूटींग गिटींग आणि ओमाचा मामा, बाळू मिरगी, खेळवाले,  पुंजाताई, रामकिशन तेली, सोनीबाई, षांत, अशा २४ व्यक्तीचित्रांमधून आपल्या काळजाला भिडणारी ही गोष्ट म्हणजे पुलंचे "व्यक्ती आणि वल्ली" ते जयवंत दळवींची "सारे प्रवाशी घडीचे" ही बिगरी ते मॅट्रीक इयत्तेतली पुस्तकं असतील तर "क्लोज एनकाउंटर्स" पोस्ट डॉक्टरल काम आहे. केवळ अफलातून.

हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे. कोरोनातला गैबानेपणा घालवून माईंड एकदम फ्रेश करणारी तुफान कलाकृती. व्हॉट्सॅप या आजाराबद्दल मला तिरस्कारच वाटतो. पण हे पुस्तक व्हॉट्सॅपवर जन्माला आलेय हे कळल्यामुळे मी व्हॉट्सॅप या आजाराला सगळे गुन्हे माफ केलेले आहेत.

अपने राजहंस की बेश्ट निर्मिती. 

"क्लोज एनकाउंटर्स",  पुरूषोत्तम बेर्डे, राक्जहंस प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती- डिसेंबर २०१९, पृष्ठे-२४०, किंमत रूपये ३००/- 

-प्रा. हरी नरके, ३०/१०/२०२०

Sunday, October 25, 2020

विमुक्त भटक्यांचे नुकसान करणारा रेणके अहवाल घटनाविरोधी

संगिता नरके-

विमुक्त भटक्यांचे नुकसान करणारा रेणके अहवाल घटनाविरोधी- लक्ष्मण गायकवाड

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक आणि भटक्याविमुक्तांचे ख्यातनाम नेते लक्ष्मण गायकवाड यांनी आपल्या "




उचल्यानंतर" या आत्मकथनात रेणके आयोगाचे वाभाडे काढलेले आहेत. " या आयोगाचा अहवाल चेयरमन बाळकृष्ण रेणके यांनी मुद्दामहून उशीरा दिल्याने व तो घटनाविरोधी, एककल्ली आणि विमुक्त भटक्यांचे नुकसान करणारा असल्याने केंद्र सरकारने तो कचर्‍याच्या डब्यात टाकल्याचा " घणाघाती आरोप त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. या खळबळजनक पुस्तकात गायकवाड पुढे म्हणतात, " गुळाला मुंगळे चिकटावेत तसे रेणके अध्यक्षपदाच्या खुर्चीला चिकटून राहिले आणि त्यांनी वेळोवेळी फक्त आपला कार्यकाल तेव्हढा वाढवून घेतला. त्यांच्याकडे शासनाने सोपवलेले काम न करता रेणके लाल दिव्याच्या गाडीतून सहली करीत फिरत राहिले. आपणच या आयोगाचे मालक आहोत अशा हटवादी भुमिकेतून रेणकेंनी समाजाची फसवणूक केली. रेणके प्रतिष्ठीत जातीचे असल्याने त्यांना विमुक्तभटक्यांचे प्रश्नच कळले नाहीत. दुराग्रही रेणके आपल्या व्हीआयपीच्या लाल दिव्याच्या गाडीत मजा करीत राहिले आणि त्यांनी मसणजोगी, नंदीबैलवाले अशा वंचितांची फसवणूक केली. आयोगाच्या अध्यक्षपदी रेणकेंऎवजी दुसरी कुणीही व्यक्ती असती तर विमुक्तभटक्यांची अशी फसवणूक झालीच नसती. पंतप्रधान मनमोहन सिंग विमुक्त भटक्यांचे कल्याण करू इच्छित होते, परंतू उशीरा आलेला रेणके अहवाल घटनाविरोधी, एककल्ली आणि विमुक्त भटक्यांचे नुकसान करणारा असल्याने तेही नाराज झाले. आधीच अनुसुचित जाती व अनु. जमातीचे आरक्षण असलेल्यांना तिथून बाहेर काढा ही रेणकेंची शिफारस देशभर फेटाळली गेली. यापुढे रेणकेंनी चळवळीतून निवृत्ती घ्यावी आणि विमुक्त भटक्यांच्या चळवळीपासून दूर राहावे" असा सल्लाही गायकवाड यांनी रेणकेंना दिलेला आहे. गायकवाड यांच्या या टिकेचे स्वागत केले जात असून या भुमिकेला विमुक्तभटक्यांचा फार मोठा पाठींबा मिळत आहे. या पुस्तकाद्वारे रेणकेंच्या आजवरच्या वाटचालीचा बुरखा फाडण्याचे धाडस गायकवाड यांनी केल्याचे कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. या टिकेबद्द्ल आजवर मौन धारण केलेल्या रेणकेंच्या प्रत्युत्तराकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे. 

-  संगिता नरके

पाहा - ( उचल्यानंतर, लक्ष्मण गायकवाड, ( पृष्ठे २७ ते ३० ) संधीकाल प्रकाशन, भाईंदर, ( पुर्व )  ४०१ ११५, प्रथमावृत्ती -आक्टोबर २०२०, पृष्ठे १९२, किंमत रूपये २५०/- )

..................................

पुस्तकासाठी संपर्क- फोन- ९८२०५ ९५२८२, 

लक्ष्मण गायकवाड यांच फोन-९८७०४ ५२४१०


Saturday, October 24, 2020

मनोरंजनाच्या आडपडद्यात संस्कृतीचं राजकारण - प्रा.हरी नरके

 

आज सुमारे ८० कोटी भारतीय लोक टेलिव्हीजन बघतात. त्यातला बहुसंख्य प्रेक्षक हा मनोरंजनाच्या वाहिन्या बघतो. एकट्या मराठीत दररोज विविध वाहिन्यांद्वारे ४० ते ५० मालिका दाखवल्या जातात. सर्वोत्तम टीआरपी मिळवणे हा मुख्य उद्देश डोळ्यापुढे ठेऊन या मालिका तयार केल्या जातात. या टीआरपीवरून वाहिनीला कमी किंवा जास्त जाहीराती मिळतात. या मिळणार्‍या जाहीरातींद्वारे वाहिनीला रेव्हुन्यू (महसूल- पैसा) मिळत असतो. कोणीही केवळ लोकहितार्थ वाहिनी चालवतो नसतो. या उद्योगातून दोन पैसे मिळवण्यासाठीच ही सारी धडपड केली जात असते. त्यात काहीच वावगे नाही. परंतु यामागे केवळ अर्थकारण, व्यापारी दृष्टीकोन एव्हढाच मर्यादित हेतू असतो का? तुम्हाला काय वाटते?

या उद्योगाद्वारे मनोरंजनाच्या आडपडद्यात संस्कृतीचं राजकारण केलं जातं असं तुम्हाला वाटतं का? हे फक्त अर्थकारण नसतं. तर मनोरंजन, माहिती, इतिहास, निखळ करमणुक, गोष्टी सांगणं यांच्याद्वारे जे संस्कार रुजवले जातात ते कोणते असतात? कोणती भाषा, कोणती मुल्यव्यवस्था सातत्याने तुमच्या माथ्यावर मारली जाते? कथा कुठलीही असो जी कटकारस्थानं खेळली जातात, जो चोरटा वा उघड व्याभिचार दाखवला जातो, जो लखलखाट आणि श्रीमंती थाट यांचा मारा केला जातो ते सारे अकारण, हेतूशुन्य असते असे तुम्हाला वाटते काय?

  

 प्रत्येक माणसाला हलक्याफुलक्या, प्रसन्न, बौद्धिक मनोरंजनाची गरज असते. ओढही असते. पण हे सोपे काम नसते. माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. त्याने भाषा,संस्कृती, विचार,तत्वज्ञान,कलांची निर्मिती करून मानवी आयुष्याला सार्थकता दिलेली आहे. पण विविध मनोरंजन वाहिन्यांद्वारे दररोज जो काही रतीब घातला जातो त्याचा भर निर्बुद्ध करमणूकीवर असतो का? असल्यास तो तसा का असतो? प्रेक्षकांना फक्त बघे बनवणं, निष्क्रीय बनवणं, फारसा विचार करु नका, चंगळवादावर भर द्या, जगण्याकडे गम्भीरपणे बघु नका, फक्त मजा करा, मानवी दु:खं, सामाजिक समस्या, संवेदनशीलता, बौद्धिकता यांना फाट्यावर मारा अशी शिकवण या करमणुकीच्या माध्यमातून चलाखीने पेरली जाते का? माणसाच्या अबोध मनाचा कब्जा विशिष्ट्य राजकीय विचारसरणीच्या सुगीसाठी केला जातोय का?

 सुबुद्ध प्रेक्षकांना काय वाटते?

-प्रा. हरी नरके, २४/१०/२०२०

Thursday, October 22, 2020

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आंबेडकर मालिकेबद्दल लिहितात-



सुप्रसिद्ध लेखक, अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आय.ए.एस. अधिकारी (निवृत्त) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेबद्दल लिहितात-

हरी नरके जी, ही मालिका मी पूर्ण एकही भाग न चुकवता पाहिली.. कारण ती जवळपास परिपूर्ण- near perfect होती. बाबासाहेबांचे वैयक्तिक जीवन खूपच भावस्पर्शी पद्धतीने दाखवले, पण मला महत्वाचे वाटले ते या मालिकेने डॉ आंबेडकरांचे वैचारिक व्यक्तीमत्व, सामाजिक, राजकीय व संसदीय कार्य, त्यांचा संघर्ष आणि अखंड अभ्यास हे पैलू फारच सामर्थ्याने दाखवले आहेत. मुख्य म्हणजे या अलौकिक महापुरुषांची मालिका कुठेही प्रचारकी होत नाही,तरिही रंजक राहते .बाबाबासाहेबांचे व रमाई चे काम सागर देशमुख व शिवानी रांगोळे यांनी जणू परकाय प्रवेश करून काम केले व त्यांना पडद्यावर जिवंत केले. त्यांच्यापर्यंत माझे अभिनंदन कळवा. तुम्ही मालिकेचे संशोधक- सल्लागार असल्यामुळे कोणतीही ऐतिहासिक चूक हुडकली तरी सापडणार नाही, हे फार मोठे अवघड काम हरी जी तुम्ही समर्थपणे पार पाडले,त्याबद्दल तुमचे अभिनंदन!

आता मालिका संपली, काय नवीन एवढेच सुंदर पहायचे हा प्रश्न आहे. आणि या प्रशनातच मालिकेचे यश दडलेले आहे!

- Laxmikant Deshmukh लक्ष्मीकांत देशामुख

Wednesday, October 21, 2020

आम्ही या मालिकेद्वारे आमचे कर्तव्य केले

 







स्टार प्रवाह वाहिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील दशमी क्रियेशनची आपली मालिका फार लवकर संपली, अशी हळहळ अनेकांनी व्यक्त केली. काही कृतक मालिका इतक्या बोअर मारतात की प्रेक्षक आता यांना आवरा, यांच्यापासून आम्हाला वाचवा असा धावा बोलतात. अशा पार्श्वभुमीवर ही मालिका आणखी हवी असे वाटत असतानाच ती संपलीसुद्धा.

हजारो चाहत्यांनी मालिकेबद्दल समाधान व्यक्त केले. एकदोघांनी अ, ब, क यांना तुम्ही मालिकेत का दाखवले नाही? अशा विचारणाही केल्या. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एव्हरेस्टच्या उंचीचे व्यक्तीमत्व. त्यांच्या अवतीभोवती उत्तम काम करणारे हजारो नेतेलोक होते. त्यातल्या सगळ्यांना मालिकेत आणणे केवळ अशक्य होते. मी पहिल्या एपिसोडपासून ३४३ व्या एपिसोडपर्यंत सहज मोजदाद केली तेव्हा लक्षात आले की ( मालिकेतल्या सभेत/गर्दीत उपस्थित असलेले एक्स्ट्रालोक सोडून ) ज्यांना मालिकेत कोणतेतरी छोटेमोठे व्यक्तीमत्व साकारायचे होते, किंवा संवाद बोलायचे होते, अशी एकुण १२०० पेक्षा अधिक कॅरेक्टर्स आम्ही दाखवली. तरीही काही नेते राहिले हे खरेय. आम्हाला त्यांनाही मालिकेत दाखवायचे होते. पण नाही जमले ही खंत आहेच... 

एका मित्रांने अशा भावना व्यक्त केल्या की "बाबासाहेबांच्या मालिकेला न्याय देण्यासाठी रिचर्ड अ‍ॅटनबरोच हवे होते." रिचर्ड अ‍ॅटनबरो महानच होते! पण त्यांनी " गांधी " चित्रपटात बाबासाहेबांना किती स्थान दिलेले होते याचा एकदा शोध घ्या. आम्हीही घेतो.

असो. व्यक्ती तितक्या प्रकृती.    

आम्ही या मालिकेद्वारे आमचे कर्तव्य केले. तुम्हाला ती आवडली याचा आम्हाला जरूर आनंद आहे. खरंतर आम्हाला अशा आणि एव्हढ्या कौतुकाची खरंच अपेक्षा नव्हती. टिकेला सामोरं जाण्याचीच आम्ही तयारी ठेवलेली होती. पण एकही वादंग न होता ही मालिका सुरळीतपणे पार पडली. आता हे सामाजिक दस्तावेजीकरण/चित्रीकरण पुढची किमान शंभर वर्षे नव्या पिढ्यांना बघायला हॉटस्टारवर उपलब्ध असेल. तुमच्या नानाविध अपेक्षा, तुम्ही केलेली सकारात्मक किंवा नकारात्मक टिका, तुमच्या अगदी प्रत्येक प्रतिक्रियेची आम्ही विधायक नोंद घेतलेली आहे. तुम्ही हजारोंनी मालिकेचे तोंड भरून कौतुक केलेत, एकदोघांनी मालिकेतल्या उणीवा, त्रुटी, दोष दाखवलेत आणि मालिकेची दखल घेतलीत याचाच आम्हाला आनंद आहे. या प्रतिक्रियांचा उपयोग आम्हाला यापुढचे काम करताना नक्कीच होईल. या अनुभवाच्या प्रकाशात नव्या प्रकल्पांमध्ये आपण भेटतच राहणार आहोत. एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो अशी गावाकडे म्हण आहे. एका मालिकेने थांबून आपल्याला कसे चालेल? ही बाबासाहेबांवरची पहिली मालिका आहे, शेवटची नाही.

असाच लोभ कायम असावा.

स्नेहांकित,

हरी नरके