Thursday, January 28, 2021

महात्मा फुले समग्र वाड्मय हा ग्रंथ लवकरच उपलब्ध करून देणार- प्रा. हरी नरके








वाचकांकडून सर्वाधिक मागणी असलेली "महात्मा फुले समग्र वाड्मय, सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय, आम्ही पाहिलेले महात्मा फुले, युगपुरूष महात्मा फुले," आदी पुस्तके लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याला मी प्राधान्य देणार आहे. याशिवाय बरीच नविन पुस्तके प्रकाशित करण्याच्या कामालाही गती देण्यात येईल. नुकतीच राज्य शासनाने महात्मा फुले ग्रंथ  समितीवर सचिव म्हणून माझी नियुक्ती केलेली असून मी नियुक्तीच्या दुसर्‍याच दिवशी कामाला ताबडतोब सुरुवातही केलेली आहे. मागच्या सरकारच्या काळात ही समिती संपुर्ण निष्क्रीय होती. त्यामुळे तो बॅकलॉगही भरून काढावा लागणार आहे. तशी आव्हाने तर बरीच आहेत. पण मला तक्रारींचा पाढा वाचत बसणे, रडगाणी गाणे यात बिल्कुल रस नाही. कितीही अडचणी असल्या तरी माझी बांधिलकी कामाशी आहे. आऊटपुट म्हणजेच रिजल्टशी आहे. सगळ्या सोयीसुविधांमध्ये तर कुणीही काम करील. जिथे कमी तिथे आम्ही. प्रतिकूलतेवर मात करून काम करण्यात तर खरी मजा आहे.

१. फुले-शाहू-आंबेडकर अशा शासनाच्या तीन स्वतंत्र ग्रंथ समित्या असून अद्याप उरलेल्या दोन समितीच्या नियुक्त्या व्हायच्या आहेत. या तिन्ही समित्यांचे कार्यालय एकत्र असते. फोर्टमधील एका जुन्या इमारतीत सुमारे तीनेकशे चौ. फूट जागेत तिन्ही सचिव व समितीचे कर्मचारी आणि सगळे मौलिक दस्तऎवज यांची व्यवस्था असते. कार्यालयीन जागा तर अपुरी आहेच पण कर्मचार्‍यांच्या बहुतेक जागाही रिक्तच आहेत. मंजूर पदांमधील फक्त एक लिपिक व एक शिपाई एव्हढेच मनुष्यबळ तिन्ही समित्यांकडे उपलब्ध आहे. 

२. गेले अनेक महिने कार्यालयाचा इंटरनेट आणि फोन बंद आहे. 

३. लॉकडाऊनच्या काळात कार्यालय बंद होते तेव्हा वाळवीने अनेक नवीकोरी पुस्तके खाऊन टाकलीत.

४. लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा असतात. मुबलक गैरसमजही असतात. त्यामुळे तक्रार म्हणून मी हे लिहित नाहीये तर कोणत्या अडचणीत काम करावे लागते ह्याची कल्पना तुम्हाला असावी म्हणूनच केवळ हे नमूद केलेले आहे. त्याच्याकडे अन्यथाबुद्धीने बघू नये.

५. काहीकाही मंडळींचा तर असा गैरसमज असतो की सचिवपदाला, लाल दिव्याची गाडी, बख्खळ मानधन, मुंबईत राहायला बंगला असे कायकाय असते. 

६. तर असले काहीही नसते. 

७. या पदाचे मानधन किती प्रचंड असते याची तुम्हाला साधारण कल्पना यावी म्हणून सांगतो. तिन्ही सचिवांना मिळून दरमहा नेमके किती मानधन मिळते? सध्या सरकारी चतुर्थश्रेणीतील एका कर्मचार्‍याला (एका शिपायाला) जेव्हढा दरमहा पगार मिळतो त्यात या तिघां सचिवांचे महिन्याचे सगळे मानधन निघते. 

८. प्रवास आणि निवासाची व्यवस्था तुमची तुम्हीच करायची असते. शासन ती जबाबदारी घेत नाही.

९. समिती पुस्तके प्रकाशित करते.पण समितीकडे एकही संशोधन सहाय्यक, संपादन सहाय्यक, मुद्रीत शोधक नसल्याने सचिवालाच पुस्तकाचे सगळे काम करावे लागते.

१०. ह्या समित्या उच्च व तंत्र शिक्षण खात्याकडे असल्या तरी पुस्तकांची छपाई व विक्री उद्योग विभागाकडे असते. त्यामुळे त्यावर सचिवाचे कोणतेही नियंत्रण नसते.

अर्थात हे सगळे असे असले तरी हे प्रश्न सुटोत वा ना सुटोत, तुम्हाला पुस्तकं लवकरात देण्याची हमी मात्र मी देतो.

आपल्या शुभेच्छा/ सदिच्छा मात्र सोबत असू द्याव्यात.

प्रा. हरी नरके, 

२८/१/२०२१


Friday, January 15, 2021

भाऊ परतौनी आला-संजय सोनवणींची खिळवून ठेवणारी कादंबरी-प्रा.हरी नरके





भाऊ परतौनी आला-संजय सोनवणींची खिळवून ठेवणारी कादंबरी-प्रा.हरी नरके

संजय सोनवणी हे चतुरस्त्र लेखक आहेत. ज्या ताकदीने ते वैचारिक ग्रंथ लिहितात त्याच ताकदीने ते कादंबर्‍याही लिहितात. काही लेखक ललित लेखन उत्तम करतात पण ते वैचारिक साहित्यापासून दूर असतात. तर काही याच्या उलटही असतात. या दोन्हींवर मांड असणं म्हणजे एकाच वेळी दोन्ही हातात तलवारी घेऊन दोन्ही हातांनी लढण्याएव्हढे अवघड काम आहे. त्यांची नवी ऎतिहासिक कादंबरी वाचली. 


ही कादंबरी पानिपताच्या लढाईत गायब झालेल्या भाऊसाहेब पेशव्यांवर आहे. ती एकदा हातात घेतली की पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवता येत नाही. गतिमान कथानक, अनेक पातळ्यांवरची गुंफन, कलात्मकता आणि इतिहासावरची पकड यांच्यामुळे ही कादंबरी गारूड करते. यातला काळ १७६१ चा आहे. लेखकाचा इतिहासाचा अभ्यास इतका मजबूत आहे की तो काळ, त्यावेळचे समाजजीवन, पेशवाईतली सत्तेची साठमारी, अनागोंदी, नाना फडणवीसची कुटील राजनिती, निष्ठुरता याचे लेखकाने घडवलेले दर्शन चकित करणारे आहे.  


सोनवणी हे चित्रशैलीचे लेखक आहेत. जणू त्या घटना आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत असे  प्रत्ययकारी, कलात्मक आणि पकड घेणारे रहस्य  ते आपल्याला उलगडवून दाखवतात. पानिपतच्या लढाईत भाऊ मारले गेले असेच मानले जाते. तरिही भाऊसाहेबांचे अनेक तोतये नंतर उपटले होते, त्यांची ओळख पटवून त्यांना शिक्षा करण्यात आली, हे आपल्याला माहित असते. इथे मात्र वेगळेच घडते. ते विस्मयकारी असूनही विश्वासार्ह आहे. रहस्यकथेचा थरार असलेली ही कादंबरी अनेक पातळ्यांवर वाचकांना गुंतवून ठेवते. वाचनियता, कलात्मकता आणि ऎतिहासिक विश्वासार्हता या मापदंडावर ही कादंबरी फार उंचीवर जाते. 

कादंबरीत घडोघडी वाटा, वळणे आणि उड्या यांची मजा आहे. तरिही विेषयांतर नाही. अपघात आणि धक्के असले तरी त्यामुळे रसभंग न होता वाचक अधिकच गुंतत जातो.

एक अफलातून कादंबरी असेच " भाऊ परतौनी आला" चे वर्णन करावे लागेल. अवघ्या १२४ पृष्ठांमध्ये जी जादूभरली सफर सोनवणी वाचकांना घडवतात ती बहारदार आहे.

काही जात्यंधांनी कादंबरी न वाचताच सोनवणींना ट्रोलिंग केले होते. सोनवणींची दृष्टी नितळ, निरामय आणि निर्वैर आहे. त्यांच्यावर जातीयतेचा आरोप करणारे विकृतच असले पाहिजेत. सोनवणी माझे इयत्ता आठवीपासूनचे वर्गमित्र आहेत.  गेल्या वीसेक वर्षात मी त्यांची शंभरेक पुस्तकं वाचली. त्यांचे संशोधन, निर्भिडपणा, लढाऊबाणा, शोधाच्या स्वतंत्र वाटा आणि विषयांची विविधता केवळ स्तिमित करणारी आहे. त्यांचा अवाका आणि झपाटा बहुपेडी आहे. त्यांच्या "असूरवेद"  व  "आणि पानिपत" यासारख्या कादंबर्‍या तर मराठीच्या लेण्या आहेत. 

कादंबरीची गुणवत्ता, वाचकावर गारूड करण्याची ताकद, प्राजक्त प्रकाशनचे जालिंदरभाऊ चांदगुडे यांची देखणी निर्मितीमुल्ये, संतोश धोंगडे यांचे कमाल मुखपृष्ठ आणि अवघी रुपये १६० इतकी रास्त किंमत यामुळे हे पुस्तक सामान्य वाचकांनी अवश्य संग्रही ठेवायला हवे. अवघ्या महिन्यापुर्वी ती प्रकाशित झालीय. सर्व पुस्तक दुकानांमध्ये उपलब्ध आहे.

पुस्तकासाठी संपर्क- ९८९०९५६६९५, प्राजक्त प्रकाशन, १३२८/२९ शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, पुणे, ४११ ००२,

-प्रा. हरी नरके,

१५/०१/२०२१

Tuesday, January 12, 2021

शहाजी राजे, राजवाडे, अभेद आणि अभ्यंकर- प्रा. हरी नरके

 




शहाजीराजे भोसले हे स्वराज्य संकल्पक होते अशी मांडणी इतिहासाचार्य राजवाड्यांनी १०० वर्षांपुर्वी केली. जयराम पिंडे या समकालीन कवीने शहाजीमहाराजांचे चरित्र लिहिलेले होते. त्याला राजवाड्यांनी अतिशय अभ्यासपुर्ण प्रस्तावना लिहिली. राजवाड्यांशी वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्यांच्या अभ्यासापुढे नतमस्तक व्हावे लागते. सारे आयुष्य त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या संशोधनात घालवले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नव्या पिढीतील किती लोक इतिहास संशोधनाला वाहून घेणार आहेत? जयरामच्या पुस्तकाचे नाव आहे, "राधामाधवविलासचंपू" पुस्तक अवघे ७६ पृष्ठांचे आहे. राजवाड्यांची मौलिक प्रस्तावना मात्र त्याच्या तिप्पट म्हणजे २०१ पृष्ठांची आहे. अफाट आणि दणकट काम. शहाजीराजांच्या पदरी असलेल्या ७० गुणी व प्रतिभावंत सल्लागारांची माहिती राजवाड्यांनी या प्रस्तावनेत दिलेली आहे. त्यांच्या सल्ल्यामुळे राजांना ही स्वराज्यसंकल्पना सुचली असावी असे त्यांचे प्रतिपादन आहे. 


यातील २७ क्रमांकावर गंगाधर अभेद यांची माहिती देताना राजवाड्यांनी कमाल केलेली आहे. राजवाडे भाषाशास्त्रज्ञ होते तरीही त्यांनी दिलेली ही व्युत्पत्ती विनोदीच म्हटली पाहिजे.

राजवाडे लिहितात, "अभेद गंगाधर- एकोजीरजा संभाजी राजाच्या मरणोत्तर युवराज झाला, त्याचा अमात्य. ह्याचे आडनाव अभेद. अभेद म्हणजे अभयद. अभयद म्हणजे अभयंकर. अभ्यंकर हे आडनाव चित्पावन दिसते." (पृ.२२) अभेद आणि अभ्यंकर यांचा संबंध नाही हे राजवाड्यांना नक्कीच माहित होते. तरिही शहाजींच्या दरबारात चित्पावन सल्लागार होते हे दाखवण्यासाठीचा हा अट्टाहास होता का? स्वराज्यसंकल्पनेच्या श्रेयात वाटेकरी कोणकोण होते हे दाखवण्यासाठी ही मोडतोड होती का? असा बादरायणी अभिनिवेश इतिहासलेखनात असावा काय?

राजवाड्यांची ही प्रस्तावना प्रत्येकाने एकदा तरी वाचायलाच हवी.

- प्रा. हरी नरके, १२/०१/२०२१

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील हेमा

 












‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील हेमा (प्रमिती नरके) खऱ्या आयूष्यात कशी आहे बघा; वाचा तिची जीवनकहाणी

मराठी टेलिव्हिजनवर अनेक गुणी कलाकार आहेत. त्यांच्या उत्तम अभिनय कौशल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळवून दिले आहे. कमी वेळात त्यांनी प्रसिद्धी मिळवली आहे. अशाच एका अभिनेत्रीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

ही मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचे नाव प्रमिती नरके आहे. ही सध्या कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत काम करत आहे. मालिकेत ती हेमाची भुमिका साकारत आहे. तिच्या या भुमिकेला प्रेक्षकांनी खुप पसंत केले आहे.

ही प्रमितीची पहीली मालिका नाही. या अगोदरही तिने मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. ती टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध नाव आहे. प्रमितीने या अगोदर कलर्स मराठीवरील ‘तु माझा सांगाती’ मालिकेत अवलीची भुमिका साकारली होती. तिच्या या भुमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले.

प्रमितीचा जन्म पुण्यात झाला होता. तिचे शालेय आणि महाविद्यालयिन शिक्षण पुण्यातच झाले. तिला नेहमीपासूनच अभिनयात रुची होती. त्यामूळे तिने शाळेत आणि कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. तिला या गोष्टीचा तिच्या करिअरमध्ये चांगलाच फायदा झाला.

तिने पुण्यातील ललित कला केंद्रातून अभिनयाचे शिक्षण घेतले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तिने पुढील करिअरसाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे तिने मालिका आणि चित्रपटांसाठी ऑडीशन द्यायला सुरुवात केली. तिने अनेक दिवस मेहनत केली. या कालावधीमध्ये तिने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली.

तिला कलर्स मराठीच्या तु माझा सांगाती मालिकेत अवलीची भुमिका मिळाली. तिने अतिशय उत्तम पद्धतीने अवलीची भुमिका छोट्या पडद्यावर साकारली. तिच्या या भुमिकेचं आणि अभिनयाचे खुप जास्त कौतूक करण्यात आले. आजही या मालिकेतील तिच्या कामाचे कौतूक केले जाते.

या मालिकेने तिला घराघरात ओळख निर्माण करुन दिली होती. ती प्रसिद्ध अभिनेत्री झाली होती. आजही लोकं या मालिकेची आठवण काढतात. त्यावेळी अवलीच्या भुमिकेची आठवण काढतात. मालिकेनंतर तिने अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

प्रमितीची अनेक नाटकं हिट झाली आहेत. त्यासोबतच तिने अनेक शॉर्ट फिल्म्स देखील काम केले आहे. ‘डोह ’ या शॉर्टफिल्मसाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तिचं ‘रीड मी इन 5D झोनं’ हे नाटकं विशेष गाजलं.

आज प्रमिती कलर्स मराठीच्या सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत हेमाची भुमिका साकारत आहे. तिच्या या भुमिकेला देखील लोकांनी खुप पसंत केले आहे. या मालिकेत तिची थोडी नकारात्मक भुमिका आहे. वेगवेगळ्या भुमिका करुन ती तिच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांना दाखवत आहे.

BY PRAJAKTA PANDILWAD JANUARY 9, 2021 0 https://mulukhmaidan.com/pramiti-narke-marathi-actress-real-life-story/

https://mulukhmaidan.com/?s=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%87


डिजिटल मराठी वाचकांचे दैनंदिन वाचन- किरण लिमये

‘सजग चॅरिटेबल ट्रस्ट’ ह्या संस्थेच्या वतीने मराठीतील वाचनव्यवहाराच्या संशोधक मेघना भुस्कुटे ह्यांच्या मदतीने वाचनसवयींचे एक सर्वेक्षण ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये केले गेले. हे सर्वेक्षण गुगल फॉर्म्सद्वारे केले गेले आणि समाजमाध्यमांतून ते लोकांपर्यंत पोचले. सुमारे ८५०० प्रतिसाद ह्या सर्व्हेला मिळाले. मराठी वाचकांच्या वाचनसवयी – किती वाचतात आणि काय वाचतात – ह्याचा प्राथमिक अभ्यास करणे हा या सर्व्हेचा उद्देश होता.

1.     स्त्री किंवा पुरुष असण्याचा वाचनासाठी दिल्या जाणाऱ्या वेळेच्या शक्यतेवर काही प्रभाव नाही. म्हणजे ह्या सर्वेक्षणात सहभागी लोक, ज्यांना आपण थोडक्यात स्मार्टफोन वापरू शकणारे मराठी वाचक म्हणू, ह्यांच्यात ते स्त्री आहेत का पुरुष ह्याचा वाचनाला किती वेळ द्यायचा ह्यावर काही प्रभाव नाही असं दिसतंय. हा एक सकारात्मक निष्कर्ष आहे, पण त्याचवेळी तो न-डिजिटल वाचकांना लागू पडेल का हा कुतूहलाचा विषय आहे. घरकाम, स्वतःच्या वाचनावर पैसा आणि वेळ खर्च करण्याची मुभा ह्याबाबतीत स्त्री-पुरुष ह्यांच्यातील भेद मिटत आले आहेत असा एक गट आहे आणि हे भेद अजून आहेत असा एक गट आहे असं मला वाटतं. ह्यातल्या दुसऱ्या गटाबाबत कदाचित ह्या सर्वेक्षणात फारशी माहिती नसावी. त्यामुळे हा सकारात्मक निष्कर्ष आपण थोड्या साशंकतेने साजरा केला पाहिजे.


2.     वैवाहिक स्थितीचा दैनंदिन वाचनाच्या वेळेच्या संभाव्यतेवर वेगळा परिणाम दिसत नाही. व्यक्तीचे प्राधान्यक्रम हे वैवाहिक स्थितीने बदलतात आणि त्यात वाचनासाठी काढलेला वेळ असू शकतो असं मानलं तर वैवाहिक स्थितीचा परिणाम नसणं ह्याचा अर्थ असा असू शकतो कि मुळात अविवाहित व्यक्तीत वाचनाचे प्रणाम जास्त नसावे. शिक्षण, उपजीविकेवर जाणारा वेळ, अन्य मनोरंजन माध्यमे ह्या सगळ्यांचा हा परिणाम असू शकतो. निष्कर्षांतील ही पहिली धोक्याची घंटा.  


3.     ५१-७५ आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्ती ह्या वाचनासाठी जास्त वेळ देतात. डिजिटल माध्यमे वापरू शकणाऱ्या निवृत्त व्यक्ती वाचनासाठी जास्त वेळ देऊ शकतात ह्यात फारसे नवल नाही. ह्या वयोगटात डिजिटल माध्यमे वापरता येणं हाच मुळात एक सकारात्मक भाग मानला पाहिजे. पण ११-१८, १९-३० ह्या वयोगटातील दैनंदिन वाचनकालावधी  हा ३१-५० वयोगटासारखा असणं हे थोडं विचारात पाडणारं आहे. वर विवाहाच्या मुद्द्यात जी चर्चा झाली, शिक्षण, उपजीविका आणि अन्य मनोरंजन माध्यमे, ती इथेही लागू पडते.


4.     शिक्षणाचा दिसणारा संबंध अपेक्षित असा आहे. जास्त दैनंदिन वाचनवेळ असणाऱ्या गटात (चौथा स्तंभ) पदव्युत्तर किंवा अधिक शिक्षण असेल तर जास्त दैनंदिन वाचनकालावधी असण्याची शक्यता वाढते आहे आणि केवळ शालेय शिक्षण असेल तर जास्त दैनंदिन वाचनकालावधी असण्याची शक्यता कमी होते. हा निष्कर्ष शिक्षण आणि वाचन ह्यांच्याबद्दल आपल्या मनात जो पूर्वग्रह असतो त्याच्याशी जुळणारी आहे. इथे हे लक्षात घ्यायला हवं कि आपल्याला परस्परसंबंध (correlation) दिसत आहे, कार्यकारणभाव (causation) नव्हे. अधिक वाचनाची आवड हा अधिक शिक्षण असण्यासाठी कारणीभूत घटकांपैकी एक असू शकतो. [i]      


5.     वस्तीस्थानाचा दैनंदिन वाचनकालावधीशी असलेला संबंध हाही अपेक्षित असाच आहे. अधिक धकाधकी असलेल्या शहरांतील वाचकांत फरक नाही असे चित्र आहे. जिथे ही धकाधकी कमी आहे अशा शहरी भागांत आणि ग्रामीण भागात दैनंदिन वाचनकालावधी जास्त असण्याची शक्यता जास्त आहे. ग्रामीण भागाच्या संबंधाबाबत असं म्हणता येईल कि जर पुस्तकांची उपलब्धता आणि क्रयशक्ती हे घटक अनुकूल असतील (जे सर्वेक्षणात विचारात घेतलेले नाहीत[ii]) तर वाचनकालावधी जास्त असण्याची शक्यता जास्त होते असे असू शकेल.


6.     उपजीविकांच्या बाबतीतही नोकरी करणारी व्यक्ती ही अधिक व्यस्त असते ह्या पूर्वग्रहाशी जुळणारे निकाल आहेत. निवृत्त व्यक्ती, विद्यार्थी, अध्यापन-संशोधन-लिखाण करणाऱ्या व्यक्ती ह्यांचा दैनंदिन वाचनकालावधी जास्त असण्याची शक्यता नोकरदार व्यक्तीहून (जी अध्यापन-संशोधन-शिक्षण ह्यातील नोकरी करत नाही)  जास्त आहे. इथे विद्यार्थी ह्या गटाच्या संबंधाचा विचार ‘वय’ ह्या घटकासोबत केला तर असं दिसतं कि १९-३० वयोगटातील व्यक्ती विद्यार्थी अवस्थेतून अध्यापन-संशोधन-लिखाण ह्यांच्याशी संबंध नसलेल्या नोकरीत जाते तसा तिचा दैनंदिन वाचनकालावधी घटण्याची शक्यता वाढते.


7.     सांख्यिकीय मॉडेलची स्पष्टीकरण क्षमता मर्यादित आहे. क्रयशक्ती, दैनंदिन जीवनातील वेळेचा वापर, वाचनवारसा अशा अनेक महत्वाच्या  घटकांवर सर्वेक्षणात माहिती विचारली गेली नाही. [iii]


ह्या सगळ्या निष्कर्षांचा एकत्र विचार आणि सर्वेक्षणाच्या मर्यादा (एका ठराविक प्रकारचे वाचक आणि वरील मुद्दा 7) लक्षात घेता असं दिसतं कि डिजिटल समाजमाध्यमांवर असणाऱ्या मराठी वाचकांच्या वाचनकालावधीत स्त्री-पुरुष असा भेद दिसत नाही, विद्यार्थी अधिक वाचणारे आहेत ह्या आश्वस्त करणाऱ्या बाबी आहेत, पण महानगरांची आणि अध्यापन-संशोधन-लिखाण ह्या व्यतिरिक्त नोकऱ्यांची वाढलेली धकाधकी वाचनकालावधी कमी करते ही चिंतेत टाकणारी बाब आहे. ह्या दोन घटकांचा संबंध भौतिक समृद्धीशी आहे. येत्या काही वर्षांत अधिकाधिक तरुण व्यक्ती ह्या अशाच धकाधकीचा भाग होणार आहेत आणि ह्या अभ्यासात दिसणारे निष्कर्ष बरोबर असतील तर अशा व्यक्तींचा दैनदिन वाचनकालावधी घटेल अशी शक्यता आहे. साहजिक साहित्याच्या डिमांडवर ह्याचा परिणाम होणार आहे. अर्थात हा नक्त परिणाम दोन घटक परिणामांचा असणार आहे: विद्यार्थी गटाचे वाचन (जास्त) आणि नोकरदार (कमी). जर विद्यार्थी गटाचे परिणाम हा अधिक प्रभावी असेल तर नक्त परिणाम वाढता असू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाचनसवयी हा महत्वाचा घटक ठरतो. वाचनव्यवहार वाढता राहणे ज्यांना हवे आहे त्यांनी catch them young कडे लक्ष द्यायला हवे. लोकांचा  वाचनकालावधी हा विद्यार्थीदशेतून नोकरी-व्यवसायात जाताना घटतो आणि जसे ते निवृत्तीकडे येतात तसा वाढतो, शेवटी त्यांना मिळू शकणाऱ्या निवांत बौद्धिक स्पेसचा हा मामला असावा. पण शहरांची धकाधकी ही मधल्या टप्प्यातील वाचन फारच घटवू शकते आणि निवृत्त/निवांत जगण्याचे वयही लांबवते. येत्या काळांत, ज्यांत समाजात ३१-५० वयोगटाचे प्रमाण वाढणार आहे आणि शहरीकरणही, त्यांत सुरुवातीला मराठी वाचनाची मागणी घटण्याचा कल दिसू शकतो, जो पुढे जाऊन बदलून वाढीकडे येऊ शकतो, जसे समाजातील ५० च्या पुढच्या वयांचे प्रमाण वाढेल. नवे वाचक बनणं आणि वाचणाऱ्या माणसाची वाचनाची खुमखुमी आयुष्याच्या मधल्या टप्प्यात टिकून राहणं ह्या दोन गोष्टी महत्वाच्या ठरतील.   


समारोप


हा सर्वेक्षण मराठी वाचकांतील एका मर्यादित आणि कदाचित भौतिकदृष्ट्या संपन्न किंवा अधिक जागरूक  गटाचा सर्वेक्षण आहे. ह्या सर्वेक्षणाची डेटा मिळवायची पद्धत ही सर्वोत्तम नाही. ह्या मर्यादा लक्षात घेता सर्व्हेतील निष्कर्ष हे अधिक अभ्यासाची गरज अधोरेखित करण्यासाठी आहेत आणि कोणताही अंतिम धोरणात्मक निष्कर्ष ठरवायला नाही. मराठी भाषेबद्दलच्या समाजशास्त्रीय संशोधनात अधिक संख्यात्मक (quantitative) तंत्रांचा वापर करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी हा सर्वेक्षण डेटा उपलब्ध आहे. मराठीतील लेखन-वाचन व्यवहार समृद्ध होण्याच्या प्रक्रियेत हा अभ्यास कारणी लागावा हीच आमची अपेक्षा आहे.   


अधिक अभ्यासाच्या काही स्वाभाविक दिशा असू शकतात. एखाद्या शहरातील व्यक्तींचा अधिक शास्त्रीय sampling द्वारे त्यांच्या वाचनसवयींबाबत सर्व्हे करणं, अधिक वाचणाऱ्या लोकांच्या वाचनसवयी कशा प्रत्यक्षात आल्या ह्यासाठी काही मुलाखती घेणं, विद्यार्थ्यांच्या वाचनसवयींबाबत होणाऱ्या प्रयत्नांचा आढावा घेणं अशी काही उदाहरणे देता येतील. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील भाषाविषयक प्रश्नांत रुची असलेल्या संशोधकांनी, त्यांना उपलब्ध संशोधन रिसोर्सेस ह्या प्रश्नाकडे वळवले तर असे अनेक अभ्यास प्रत्यक्षात येऊ शकतात. ह्या संशोधनाला मराठीच्या संदर्भातच मूल्य आहे असे नाही. विश्वरूपाकार इंग्रजीसमोर राजकीय आणि आर्थिक सामर्थ्यात तोकड्या साऱ्याच भाषांसाठी असे प्रश्न महत्वाचे राहणार आहेत.  


https://kiranlimayeecoblog.blogspot.com/2021/01/blog-post_10.html?spref=fb&fbclid=IwAR0IDs1F8BpWACaj7gIDTLqUab1XgxDf2OPbSCJe1v_egP-nPXj6WpU_mGo

Sunday, January 10, 2021

भिडेवाडा- उंटावरून शेळ्या हाकणारे सरकारी अधिकारी - प्रा. हरी नरके

 




अधिकारी- "हॅलो, मी मंत्रालयातून अमूकतमूक अधिकारी बोलतोय. मी काल तुम्हाला फोन केला होता, तुम्ही का उचलला नाही? मला भिडेवाड्यासंबंधात माहिती हवीय. अमूक ढमूक मंत्र्यांना मला त्याबाबतचा रिपोर्ट सादर करायचा आहे. कुठे आहे हा भिडेवाडा?"

मी- "पुण्यात, बुधवार पेठेत."

अधिकारी- "कोणी बांधलाय तो?"

मी- " तात्यासाहेब भिड्यांनी."

अधिकारी- "त्यांना सगळी कागदपत्रे घेऊन मला भेटायला सांगा."

मी- "ते वारले त्याला आता १७० वर्षे झाली."

अधिकारी- "मग आता कोण मालक आहेत?"

मी- "खाजगी मालकी आहे."

अधिकारी- "वाड्याची अवस्था कशीय?"

मी- " अतिशय वाईट. कुठल्याही क्षणी तो पडेल. तिथले मालक, भाडेकरू दुकानदार, निवासी भाडेकरू कोर्टात गेलेत. मुंबई हायकोर्टात ती केस गेली २० वर्षे पेंडींग आहे."

अधिकारी- "तुम्ही पार्टी आहात का?"

मी- "नाही."

अधिकारी- "मला केस नंबर व कोर्टाची सगळी कागदपत्रे पाठवा. तिथे शाळा कशावरून होती? कोणकोण वादी-प्रतिवादी आहेत त्यांचे मला फोन नंबर द्या. त्यांना मला मंत्रालयात येऊन भेटायला सांगा."

मी- " जोतीराव-सावित्रीबाईंच्या तिथल्या शाळेचे सगळे पुरावे मी कोर्टाला सादर केलेले आहेत. तुम्हाला फक्त निकाल लवकर यावा यासाठी उच्च न्यायालयाकडे शासनामार्फत पाठपुरावा करायला हवा."

अधिकारी- " तुम्ही, मला सगळे पेपर्स आणून द्या आणि वाड्याबद्दलचा रिपोर्ट तयार करून मला मंत्रालयात आणून द्या, मी तो मंत्र्यांना सादर करतो. वाड्याची एकुण जागा किती आहे? सर्व्हे नंबर किती आहे? वाड्याचे जुने व ताजे फोटो काढून मला कागदपत्रांसह २ दिवसात आणून द्या."

मी- " तुम्ही उंटावरून शेळ्या हाकण्याऎवजी जरा बूड हलवा आणि रिपोर्ट बनवा. मी तुमचा नोकर नाही. आणि मला कसले आदेश देताय? तुमच्या कर्मचार्‍यांना जरा कामाला लावा. नाहीतरी फुकटचाच पगार खातात ना ते आणि तुम्हीही?"

- प्रा. हरी नरके,

१०/०१/२०२१


Saturday, January 9, 2021

धन्य ते समाजकार्य आणि धन्य ते एनजीओचे सीईओ - प्रा. हरी नरके

 माझ्या ओळखीचे बरेच कार्यकर्ते त्यांच्यात्यांच्या एनजीओंच्या माध्यमातून उत्तम समाजकार्य करीत आहेत. परंतु म्हणतात ना, व्यक्ती तितक्या प्रकृती. गेल्या महिन्यात मला एक फोन आला.

"मिस्टर हॅरी नडके, यु नो, मी xyz एनजीओचा सीईओ बोल्तोय. वुई आर इन द बिजनेस ऑफ सोशल वर्क. समबडी सजेस्टॆड मी युवर नेम. वुई आर गोन्ना टू सेलिब्रेट हॅपी बड्डे ऑफ सावित्री. वुई आर गोईंग टू अरेंज अ ग्रेट इव्हेंट ऑन इट. मी सत्यवान-सावित्रीबद्दल रिसर्च केलेला आहे. आम्ही इंटरनॅशनल लेव्हलवर समाजकार्य करतो. ३ जानला आम्ही ज्युनियर सत्यवान-सावित्रीवर एक वेबिनार आयोजित करतोय. त्यात बोलायचा तुम्हाला आम्ही चान्स देणार आहोत. yz वेळी हा अडीच तासांचा प्रोग्रॅम असेल. मग या इव्हेंटसाठी तुमचा होकार मी गृहीत धरतो."

"आणखी कोणकोण वक्ते असणार आहेत?"

"नो. नो. यु नो, तुम्ही एकटेच स्पीकर असाल."

"हा कार्यक्रम कोणत्या संघटनेच्या बॅनरखाली असेल?"

" यु नो, आमच्या १८७ एनजीओ यात सामील होतील. यु नो, वुई आर इन द बिजनेस ऑफ सोशल वर्क."

" मला किती वेळ बोलायचे आहे?"

" यु नो, तुम्ही सविस्तर बोला. आमच्या लोकांना ज्युनियर सावित्रीबद्दल काहीच माहीती नाहीये. यु मे टेक ५ मिनिट्स. तुम्ही पाच मिनिटे बोललात तरी आमची हरकत नसेल. यु नो, मला वाटतं एव्हढा वेळ इनफ होईल तुम्हाला."

" या वेबिनारमध्ये किती लोक, डेलिगेट्स, सहभागी होतील? 

"यु नो, या कार्यक्रमात आठ ते दहा तरी लोक, डेलिगेट्स, नक्की सहभागी होतील असा आमचा प्रयत्न असेल."

" मग उरलेल्या २ तास २५ मिनिटात तुम्ही काय करणार आहात?

" यु सी, मी सावित्रीवर इंट्रो करेन, त्यात मिनिमम २५ मिनिटे जातील. आमचे सहभागी ८ लोक प्रत्येकी १५ मिनिटे सावित्रीवर बोलतील. यु नो, दे ऑल आर व्ही आय पीज."

"....."

"मिस्टर हॅरी आमच्या काही अटी आणि शर्ती असतील."

"बोला."

- " यु नो, तुम्हाला वेबिनारसाठी पुर्णवेळ म्हणजे अडीच तास व बिफोरची पंधरा मिनिटे असा सर्व वेळ द्यावा लागेल.

- " यु नो, वक्त्यांना मानधन देण्याची पद्धत आमच्याकडे नाही.

- " यु नो,  तुमच्या भाषणाचे कॉपीराईट आमच्याकडे राहतील.

- " यु नो, ज्युनियर सावित्रीबद्द्ल आम्हाला जास्त माहिती नसल्याने मला इंट्रो, यु नो, प्रास्ताविकासाठी आणि आम्च्या आठ व्ही आय पी लोकांना ज्यु. सावित्रीवर बोलण्यासाठी कार्यक्रमाच्या एक आठवडा आधी तुम्ही मुद्दे /नोट्स लिहून पाठवल्या पाहिजेत. मुद्दे वेगवेगळे हवेत. त्यात व्हरायटी इज मस्ट.

- "यु नो, या वेबिनारसाठी तुम्हाला आमच्या संस्थेला रुपये एक हजार डोनेशन द्यावे लागेल."

- " यु नो, त्याची रिसिट दाखवल्यावरच तुम्हाला आम्ही झूम लिंक व पासवर्ड पाठवू."

- " यु नो, या इव्हेंटमंदे, तुमची इंट्रो मला करावी लागेल, यु नो, 50 वर्ड्समंदे ती मला व्हॉट्सॅप करा."

- " बाय द वे, मिस्टर हॅरी, तुम्ही काय बिजनेस करता? तुमची शॉर्टमंदे इंट्रो द्या."

" धन्यवाद, " म्हणून मी फोन ठेवला.

-प्रा. हरी नरके 

०९/०१/२०२१

Saturday, January 2, 2021

महिला शिक्षण दिन विशेष- प्लेगयोद्धा सावित्रीबाई - प्रा. हरी नरके

 



#सावित्रीउत्सव सावित्रीबाईंनी डॉक्टर यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसरला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या. १८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं. देशभर प्लेगनं हाहाकार माजवलेला होता. सारे भारतीय दहशतीखाली जगत होते. अनेक नेते स्वत:चा जीव वाचवण्यासाठी दुर रानावनात निघून गेले होते. प्लेग संसर्गजन्य रोग असल्याची व रुग्णाला आपण स्पर्श केला तर आपल्यालाही तो होऊ शकतो याची माहिती त्यांना मुलगा यशवंतकडून मिळालेले होती. तरिही त्या जीव धोक्यात घालून प्लेगयोद्धा म्हणून लढत होत्या. मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणार्‍या झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्या आम्ही आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या या शौर्यांगणेची मात्र हवी तेव्हढी दखल घेतली नाही... राजकीय शहीदांचे पोवाडे गाणारी आमची पाठ्यपुस्तके या सामाजिक शहीदाबद्दल तोंडात मिठाची गुळणी धरून असतात. हा भेदभाव, हा पक्षपात का?  उर्वरित लेख वाचण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करावे...https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR0ZNPcH1ainQ-evRAbVMcO-WbORCHYjwdIZegBMqwhoV4k1zqXJXlBfjtU

सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.

सावित्रीबाईंनी आयुष्यभर जोतिरावांना साथ दिली. पण किमान चार आंदोलनांमध्ये त्या आपल्या नेत्याही होत्या असे दस्तुरखुद्द जोतिरावांनीच लिहून ठेवलेले आहे.........

जोतीराव सावित्रीबाईंनी स्वत:च्या घरात एक वसतिगृह चालवलं. दूरदूरहून मुलं शिक्षणासाठी तिथे येत असत. लक्ष्मण कराडी जाया या मुंबईच्या विद्यार्थ्याने या वसतिगृहात राहून सावित्रीबाईंच्या मायेची पाखरण अनुभवली होती. त्याने आठवणीत म्हटलंय, ‘सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंत:करणाची स्त्री मी अजूनसुद्धा कोठे पाहिली नाही. त्या आम्हा मुलांवर आईपेक्षासुद्धा जास्त प्रेम करीत असत.’

दुसर्‍या एका मुलाने आपल्या आठवणींमधे सावित्रीबाईंचा स्वभाव, त्यांची साधी राहणी आणि जोतीराव सावित्रीबाईंचे परस्परांवरील अपार प्रेम यांची विलक्षण हृदय नोंद केलीय.

बरोबर काय न्यायचं आहे?

हा महादू सहादू वाघोले लिहितो, ‘सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंत:करण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी. ती अन्नदान पण फार करी. ती कोणासही जेऊ घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखादेवेळी तात्या तिला म्हणत, ‘इतका खर्च करू नये.’ त्यावर ती शांतपणे बारीक हसत असे आणि ‘बरोबर काय न्यायचे आहे?’ असे तात्यांना विचारीत असे. त्यावर तात्या शांतमुद्रेने थोडावेळ गप्प बसत असत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करीत असत.’

सावित्रीबाईंना स्त्रीजातीच्या उन्नतीची फार कळकळ असे. त्या सुस्वरूप आणि मध्यम बांध्याच्या होत्या. त्यांची मुद्रा नेहमी शांत असे. राग म्हणून काय चीज आहे, ती या बाईच्या गावीच नव्हती. ती नेहमीच हसतमुख असे. मात्र तिचं हसू गालांवर तेवढे दिसून येईल इतकेच ते मर्यादित असे. सावित्रीबाईंना सर्व लोक काकू म्हणत असत. पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे तिला कोण आनंद होत असे. त्यांच्याकरिता मोठ्या आवडीने ती गोडधोड जेवण करीत असे.

जोतीराव सावित्रीबाईंना मोठा मान देत असत. तिला ते बोलताना ‘अहो जाहो’ या बहुमानदर्शक शब्दांनी हाका मारीत असत. सावित्रीबाई तात्यांना ‘शेटजी’ म्हणत. या दोघांत पतीपत्नीत्वाचं खरे प्रेम भरलेलं होतं. सावित्रीबाईंनी नको म्हटलेले काम तात्या कधीही करत नसत. सावित्रीबाई सुविचारी आणि दूरदृष्टीची होती. तिच्याविषयी आप्तजनांत मोठा आदर होता.

पुण्यातल्या शिकलेल्या बायकांचा घरी राबता

मुलींच्या शाळांतून तिने शिक्षिकीणीचे काम केलेलं असल्यामुळे स्त्रीशिक्षणाचा विस्तार झाल्यानंतर सुशिक्षित बायांत तिच्याविषयी पूज्यभाव वाढलेला दिसत होता. तिच्याकडे आलेल्या मुलींना आणि स्त्रियांना ती नेहमी सदुपदेश करीत असे. पुण्यातील मोठमोठ्या सुशिक्षित बाया, पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी आणि रमाबाई रानडे तिच्या भेटीस येत असत.

सावित्रीबाईंचा पोषाख तात्यांप्रमाणेच अगदी साधा असे. तिच्या अंगावर अलंकार नसत. तिच्या गळ्यात एक पोत आणि मंगळसूत्र असे. कपाळावर भलंमोठं कुंकू लावलेलं असे. रोज सकाळी त्या सूर्योदयापूर्वी आंघोळ करून सडासंमार्जन उरकून घेत. त्यांचं घर नेहमी स्वच्छ असे. काकूंना दिवाणखान्यात थोडाही केर अथवा धूळ पडलेली खपत नसे. त्यांच्या घरातील भांडी आणि इतर सामान स्वच्छ असून टापटीपीने ठेवलेलं असे. त्या स्वयंपाक स्वत: करीत. तात्यांच्या खाण्याची आणि प्रकृतीची त्या फार काळजी घेत.

जोतीरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्या. यशवंत डॉक्टर झाल्यानंतर मिलिट्रीत नोकरीला लागला. त्याला नोकरीनिमित्त अनेक देशात जावं लागलं. त्याची बायको राधा उर्फ लक्ष्मी हिचं ६ मार्च १८९५ ला अपघाती निधन झालं. सावित्रीबाई घरी एकट्या उरल्या. यशवंत नोकरीनिमित्त त्यावेळी परदेशात होता.

१८९३ साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी भूषवलं. मुंबईत यावर्षी झालेल्या हिंदू मुस्लीम दंगलीत जीव धोक्यात घालून सावित्रीबाईंनी शांतता प्रस्थापनेचे काम केले. १८९६ च्या दुष्काळात सावित्रीबाई खूप राबल्या. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणार्‍या झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्या आम्ही आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या या शौर्यांगणेची मात्र उपेक्षाच केली. सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.

सावित्रीबाईंनी आयुष्यभर जोतिरावांना साथ दिली. पण किमान चार आंदोलनांमध्ये त्या आपल्या नेत्याही होत्या असे दस्तुरखुद्द जोतिरावांनीच लिहून ठेवलेले आहे.

* २५ डिसेंबर १८७३ रोजी झालेल्या सत्यशोधक विवाहाचे नेतृत्व सावित्रीबाईंनी केले.

* १८६३ साली स्थापन करण्यात आलेल्या बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची कल्पना सावित्रीबाईंची होती. तिथे आलेल्या ३५ ब्राह्मण विधवांची बाळंतपणं त्यांनी पोटच्या मुलींची करावीत अशा मायेनं केली.

त्यातलाच एक मुलगा दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनवले.

* १८७२ ते १८७६ याकाळात पडलेल्या भीषण दुष्काळात गोरगरिबांची सुमारे एक हजार मुलं त्यांनी सांभाळली. जगवली. स्वत: स्वयंपाक करून त्यांना जेऊखाऊ घातलं.

* ब्राह्मण विधवांचे केशवपन करू नये म्हणून नाभिक समाजाला संघटित करून त्यांचे प्रबोधन करून विधवांचे केशवपन, मुंडन करणार नाही यासाठी त्यांचा संप घडवून आणला.

जोतिरावांच्या मृत्यूनंतर स्वत: सावित्रीबाईंनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. आधुनिक भारताच्या इतिहासातली अशी ही बहुधा पहिलीच घटना असावी.

सावित्रीबाई निव्वळ शिक्षिका नव्हत्या तर त्या कवयित्री आणि शिक्षणतज्ञही होत्या. त्यांचा "काव्यफुले" हा कवितासंग्रह १८५४ साली प्रकाशित झालेला होता. त्यात पर्यावरण जागृती, शिक्षणाचे महत्व,

निसर्ग आणि माणसाचे नाते, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मुलन, स्त्रीपुरूष समता अशा विषयांवरच्या मौलिक कविता आहेत.

त्यांनी श्रमाचे आणि तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देणारे कृतीशील शिक्षण देण्यावर भर दिला. शिक्षणातला गळतीचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाय सुचवले व ते अंमलात आणले.

स्त्री-पुरूष समता, ज्ञाननिर्मिती, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, संवाद, वादविवाद, चिकित्सा आणि विद्रोह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले. आधुनिक भारताचा स्त्रीपुरूष समतेचा पाया घालण्याचे कार्य त्यांनी केले. भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात त्यांनी केली.

आजच्या स्त्रियांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात भरारी घेतलेली आहे. त्यांना उर्जा देण्याचे कार्य सावित्रीबाईंच्या जीवनकार्यातून होत असते. त्यामुळे यावर्षीपासून राज्यशासनाने सुरू केलेला #सावित्रीउत्सव आणि सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिवस हे उपक्रम अतिशय मोलाचे आहेत. राजस्थानचे गेहलोत सरकारही ही जयंती राज्यभर उत्सव म्हाणून साजरी करते आहे.

- प्रा. हरी नरके, 

निमित्त- २/३ जाने. २०२१

संदर्भ-

प्रा. हरी नरके, सावित्रीबाई फुले चरित्र, नागानालंदा प्रकाशन, इस्लामपूर, २००५

प्रा.हरी नरके, [ संपा.] सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१८

Friday, January 1, 2021

#सावित्रीउत्सव भिमा कोरेगाव आणि भिडेवाडा - प्रा. हरी नरके

भिमा कोरेगाव आणि भिडेवाडा ही दोन्ही सामाजिक बंडखोरी, व्यवस्था परिवर्तन आणि सामाजिक उलथापालथ यांची प्रतिकं आहेत. देशातल्या पोलादी सनातनी व्यवस्थेला सुरूंग लावणार्‍या ह्या दोन्ही मुलुखमैदान तोफा. भिमा कोरेगाव आता सामाजिक अस्मितेचं प्रतिक बनल्यानं १ जानेवारीला लाखोंना तिथं जाऊन अभिवादन करावसं वाटतं, पण त्याहीपेक्षा खोलवरचं, चौफेर आणि मुलगामी परिवर्तन घडवणार्‍या भिडेवाड्याकडे मात्र आमचं तेव्हढं लक्ष जात नाही. पेशवाई हा प्रस्थापित व्यवस्थेचा किल्ला होता. तिला समग्रपणे मातीत घालण्याचं काम या दोघांनीही केलं असलं तरी जास्त परिणामकारकता नेमकी कशात होती? भिडेवाड्यात की भिमा कोरेगावात? प्रस्थापित फार चतुर असतं. ते कलागती लावून देतं. दिखाऊ किंवा कमी परिणामकारकतेत आम्हाला गुंतवून ठेवतं असं तुम्हाला वाटत नाही? भिमा कोरेगावची लढाई केवळ नागवंशी विरूद्ध पेशवे अशी होती की बारा बलुतेदार, अलुतेदार, कारू, नारू, बहुजन, वंचित, अल्पसंख्यक विरूद्ध प्रस्थापित व्यवस्था अशी होती? तरिही त्यात स्त्रिया नव्हत्या. पण भिडेवाड्यात लिंगभावपिडीत, जातपिडीत, वर्गपिडीत असे सारे सारे होते, ज्ञाननिर्मितीनं केलेलं काम प्रस्थापितांचं कंबरडं मोडणारं होतं. आम्हाला आमचा फोकस शिफ्ट करावा लागेल काय? विचार करा. (लंडनचे मित्रवर्य प्रताप तांबे Pratap Tambay यांच्या कमेंटवरून )  

-प्रा. हरी नरके