Tuesday, January 12, 2021

शहाजी राजे, राजवाडे, अभेद आणि अभ्यंकर- प्रा. हरी नरके

 




शहाजीराजे भोसले हे स्वराज्य संकल्पक होते अशी मांडणी इतिहासाचार्य राजवाड्यांनी १०० वर्षांपुर्वी केली. जयराम पिंडे या समकालीन कवीने शहाजीमहाराजांचे चरित्र लिहिलेले होते. त्याला राजवाड्यांनी अतिशय अभ्यासपुर्ण प्रस्तावना लिहिली. राजवाड्यांशी वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्यांच्या अभ्यासापुढे नतमस्तक व्हावे लागते. सारे आयुष्य त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या संशोधनात घालवले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नव्या पिढीतील किती लोक इतिहास संशोधनाला वाहून घेणार आहेत? जयरामच्या पुस्तकाचे नाव आहे, "राधामाधवविलासचंपू" पुस्तक अवघे ७६ पृष्ठांचे आहे. राजवाड्यांची मौलिक प्रस्तावना मात्र त्याच्या तिप्पट म्हणजे २०१ पृष्ठांची आहे. अफाट आणि दणकट काम. शहाजीराजांच्या पदरी असलेल्या ७० गुणी व प्रतिभावंत सल्लागारांची माहिती राजवाड्यांनी या प्रस्तावनेत दिलेली आहे. त्यांच्या सल्ल्यामुळे राजांना ही स्वराज्यसंकल्पना सुचली असावी असे त्यांचे प्रतिपादन आहे. 


यातील २७ क्रमांकावर गंगाधर अभेद यांची माहिती देताना राजवाड्यांनी कमाल केलेली आहे. राजवाडे भाषाशास्त्रज्ञ होते तरीही त्यांनी दिलेली ही व्युत्पत्ती विनोदीच म्हटली पाहिजे.

राजवाडे लिहितात, "अभेद गंगाधर- एकोजीरजा संभाजी राजाच्या मरणोत्तर युवराज झाला, त्याचा अमात्य. ह्याचे आडनाव अभेद. अभेद म्हणजे अभयद. अभयद म्हणजे अभयंकर. अभ्यंकर हे आडनाव चित्पावन दिसते." (पृ.२२) अभेद आणि अभ्यंकर यांचा संबंध नाही हे राजवाड्यांना नक्कीच माहित होते. तरिही शहाजींच्या दरबारात चित्पावन सल्लागार होते हे दाखवण्यासाठीचा हा अट्टाहास होता का? स्वराज्यसंकल्पनेच्या श्रेयात वाटेकरी कोणकोण होते हे दाखवण्यासाठी ही मोडतोड होती का? असा बादरायणी अभिनिवेश इतिहासलेखनात असावा काय?

राजवाड्यांची ही प्रस्तावना प्रत्येकाने एकदा तरी वाचायलाच हवी.

- प्रा. हरी नरके, १२/०१/२०२१

No comments:

Post a Comment