Sunday, May 31, 2020

डॉ. बाबा आढाव- अंगमेहनती, कष्टकर्‍यांचा लढवय्या सखा : प्रा. हरी नरके














१९७० च्या दशकातली आठवण आहे. मला बाबांच्या नाना पेठेतील घरी काही पुस्तकं द्यायला जायचं होतं. बाबांना फोनवर पत्ता विचारला तर म्हणाले, "तू एक काम कर, नाना पेठेत आलास की प्रकाश ऑईल मिल कोणालाही विचार. प्रकाशच्या बरोबर समोरचं घर माझं." मी सायकलवर नाना पेठेत पोहचलो. एका चौकात ट्रॅफिक हवालदाराला विचारलं, "प्रकाश ऑईल मिल कुठेय?" तो म्हणाला, " सरळ जा. डॉ. बाबा आढावांचं घर विचारा. कोणीही सांगेल. त्यांच्या घरासमोरच आहे प्रकाश मिल."


बरंच पुढे गेल्यावर पुन्हा एकदा खात्री करावी म्हणून एका दुकानदाराला विचारलं तर त्यानंही त्याच शब्दात सांगितलं. जवळ पोचल्यावर चौकात एका हमालाला विचारलं तर तो म्हणाला, " पाव्हनं, तुम्ही परकाश मिल नका इचरू. ती नाय माहित कुनाला. तुम्ही आप्लं बाबांचं घर इचारा बगा. कोनीपण आंदळा सांगतोय  बगा!"


खूप लहानपणी आम्ही काही दुखलं खुपलं तर हडपसरच्या साने गुरूजी रूग्णालयात जायचो. पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा चौकशी करताना एका हॉटेलवाल्याला विचारलं, तर तो म्हणला, " साणे गुर्जी काय आप्ल्यावाल्याला माहित नाय ब्वॉ. पण पुढच्या चौकात बाबा आढवांचा दवाखाना आहे. तिकडं जा. १०० टक्के गुण येतोय बगा. मोक्कार पैसं कशाला घालवताय? बाबांच्यात २ रुपयात काम होतंय बगा." दवाखान्यावर साने गुरुजी रुग्णालय असाच बोर्ड होता. मात्र पंचक्रोशीत तो फेमस होता आढवांचा दवाखाना म्हणूनच. वैद्यकीय क्षेत्रात इतकं उत्तम काम बाबांनी केलेलं होतं.


माझ्या एका सदाशिव पेठी मित्राच्या घरी सगळं काही चितळेंचं हवं असायचं, दुध, बाकरवडी, श्रीखंड. पण त्यांना भजी मात्र हमाल पंचायतीचीच हवी असायची. का? तर तशी चव पुण्यातल्या इतर कुठल्याही हॉटेलात मिळायची नाही. हमालांना नेमकं माहित असतं उत्तम बेसन कोणतं, शुद्ध तेल कोणतं? बनवणार्‍या हमाल कष्टकरी महिलांच्या हाताला छान चव असल्याने ही भजी अख्ख्या होल पुण्यात फेमस. मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफ्रेशर कोर्सच्या सगळ्या प्राध्यापकांना हमाल पंचायतीचं जेवन दिलं होतं, त्याची आठवण आजही प्राध्यापक काढतात.


व्ही.पी.सिंग पुण्यात आले की ही भजी खायला हमाल पंचायतीवर यायचे. एकदा तर त्यांना मी बाबांच्या स्कूटरवर मागे बसून बंडगार्डनला जाऊन ही भजी खाताना बघितलंय. व्हीपी राजघराण्यातले होते, पण बाबांशी त्यांचं छान जमायचं. सगळा जामानिमा, प्रोटोकॉल गुंडाळून ते बाबांच्या स्कूटरवर बसायचे. फिरायचे. ते जास्त काळ पंतप्रधानपदी टिकले असते तर हमाल, कष्टकरी, अंगमेहनती, असंघटितांसाठी त्यांनी फार भरीव काम केलं असतं. त्यांनी मंडल आयोग लागू केला त्यामागे बाबांचीच प्रेरणा होती.


बाबांना राजकारण आणि राजकारणी यांच्याबद्दल तीव्र नफरत आहे. त्यांची ही अढी कमालीची धारदार आहे. महात्मा फुले स्मारकाचा राष्ट्रार्पण सोहळा आम्ही तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते केला होता. त्या कार्यक्रमात बाबांचा राष्ट्रपतींच्या हस्ते भव्य सत्कार करावा अशी सुचना मी मांडली. छगन भुजबळांनी ती मान्य केली. मात्र बाबा होकार देतील का अशी त्यांना शंका होती. त्याला कारणही तसेच होते. या स्मारकावर मी भुजबळांना सर्वप्रथम घेऊन आलो. 


ह्या कामाची स्थानिक जबाबदारी मीच पाहात होतो. भुजबळांमुळे एका विशिष्ट समाजाचे या कामाभोवती कोंडाळे जमू लागले. या कामात बाबांचा सल्ला घ्यावा असं मी खूपदा सुचवलं. पण भुजबळ शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले असल्याने बहुधा त्यांच्या मनात समाजवाद्यांबद्दल अढी होती. ते टाळाटाळ करू लागले.


मग मी बेरकीपणा केला. माझ्या एका पत्रकार मित्राकरवी मी एक बातमी छापून आणली. महात्मा फुले स्मारकाला अमूकतमूक जातीचे कुंपण अशी. जादूची कांडी फिरावी तसे भुजबळ बदलले. बाबांना भेटूया का म्हटल्यावर तात्काळ हो म्हणाले. आत्ताच जाऊ या म्हणाले.

मी बाबांच्या घरी फोन केला आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री भुजबळ, फुले स्मारकाबद्दल चर्चा करायला, तुमचे मार्गदर्शन घ्यायला अर्ध्या तासात तुमच्या भेटीला येत आहेत असे कळवले. आम्ही बाबांच्या घरी गेलो. मी दोघांना बोलते करायचा अटोकाट प्रयत्न केला. पण बाबाच ते. ते भुजबळांशी डायरेक्ट अवाक्षरही बोलेले नाहीत. बाबा मला उद्देशून बोलायचे. " हरी, असं करायला हवं, तसं करायला हवं."


घरी आलेल्या मंत्री भुजबळांचा त्यांनी मान ठेवला नाही याचा मला राग आला. भुजबळही माझ्यावर नाराज झाले. त्यामुळे सत्काराला बाबांची पुर्वसंमती घे असे त्यांनी मला बजाऊन सांगितले. मी बाबांना राष्ट्रपतीच्या सत्काराला नाही म्हणू नका अशी गळच घातली. आठवडाभर विचार केल्यावर मगच त्यांनी लेखी होकार दिला. या कार्यक्रम पत्रिकेला राष्ट्रपती कार्यालयाची मंजूरीही मिळाली. मात्र कार्यक्रम दोन दिवसावर आलेला असताना बाबांनी अचानक घुमजाव केले. आपण हा सत्कार स्विकारणार नाही असे पत्रक काढून  त्यांनी घोषित केले. मी मात्र तोंडघशी पडलो. पुढे बाबांना आम्ही महात्मा फुले समता पुरस्कार द्यायचे ठरवले. परत भुजबळांनी मला आखरी वॉर्निंग दिली. यावेळी जर बाबा आले नाहीत तर परत कधीही त्यांना बोलवायचे नाही असे त्यांनी ठरवले होते. पण बाबांनी माझी लाज राखली. ते आले. पुरस्कार स्विकारला. पुरस्काराची रक्कम रू. एक लाख स्विकारून त्यांनी स्वत:चे पंचवीस हजार त्यात घातले. ती रक्कम त्यांनी विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी देऊन टाकली..


 बाबांना मी पितृतुल्य मानतो. त्यामुळे त्यांच्या स्वभावदोषांकडे, त्यांच्या खोडीलपणाकडे दुर्लक्ष करायची मला सवय झालेली आहे.


किती दिवस स्कूटरवर फिरणार? त्यांनी आता फोरव्हीलर घ्यावी असे मला खूप दिवस वाटत होते. हमाल पंचायतीच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना तसा आग्रह केल्यावर बाबा तयार झाले. मला म्हणाले, " तू टेल्कोत आहेस तर टाटांशी बोलून ते हमाल पंचायतीला डिलर्स कमिशनएव्हढी रक्कम कमी करतील असं बघ." मी सगळी उस्तवारी केली. त्याकाळात २५ हजार रूपये कमी किंमतीत टाटा सुमो बाबांना मिळणार याची व्यवस्था केली.


पण पुन्हा बाबांनी मला तोंडघशी पाडले. सार्वजनिक पैशाचा वापर काटेकोरपणे करण्याबद्दल बाबा अतिदक्ष असतात. त्यांनी ऎनवेळी टाटा सुमो न घेता दुसरर्‍याच कंपनीची गाडी घेतली. का? तर ती १३०० रुपये कमी किमतीत मिळाली म्हणून. आमचे वरिष्ठ, रावळसाहेब माझ्यावर नाराज झाले, म्हणाले, " बाबा भला माणस छे! त्यांना पैशाची अडचण होती तर मी स्वत: माझ्या खिशातले दहा हजार रुपये भरले असते."


बाबांमुळे मला बालवयातच महात्मा फुले भेटले. त्यांचं बोट धरूनच मी शाळकरीवयात पहिल्यांदा फुले वाड्यावर गेलो. त्यांच्या गाडीतूनच मी पहिल्यांदा मुंबईल गेलो. खाडीपुलावर गाडी थांबवून बाबांनी असा असतो समुद्र हरी, असं मला सांगितलं. त्यांच्यामुळेच मी मंडल आयोग चळवळ, नामांतर आंदोलन, विषमता निर्मुलन शिबीर, भटक्यांची चळवळ अशा शेकडो उपक्रमात भाग घेतला. त्यांच्यासोबत मी लाल डब्यातून म्हणजे एसटीतूनही खूप फिरलोय. लहान वयात ज्यांनी मला बोटाला धरून महाराष्ट्र दाखवला त्यात डॉ. बाबा आढाव आणि डॉ. नीलम गोर्‍हे यांचा नंबर पहिला-दुसरा आहे. महात्मा फुले समता प्रतिष्ठानचं काम मी करायला लागलो. दर सोमवारच्या मिटींगला मी न चुकता जायचो. समता व्याख्यानमालेतलं प्रत्येक व्याख्यान मी राहायला हडपसरला असो की पिंपरीला, सायकलवरून जाऊन ऎकायचो. माझ्या जडणघडणीत बाबांचा सर्वाधिक वाटा आहे.


एकदा माझ्या टेल्कोतील एक अधिकारी बाबांना माझ्याबद्दल सांगायला लागले तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, " निर्मल, तुम्ही मला हरीबद्दल काहीही सांगू नका. त्याची चुंगी बोटभर होती तेव्हापासून म्हणजे तो बाळुत्यावर, पाळण्यात होता तेव्हापासून मी त्याला ओळखतो. तो माझा बालपणापासूनचा पेशंट आणि पोरगा आहे." निर्मल खजील झाले. बाबा गेल्यावर ते मला विचारीत होते, बाबा म्हणाले, ती चुंगी काय असते? तू कसा काय जकात नाक्यावर असायचास?


 बाबांचा स्वभाव अतिशय मिश्किल आणि रसिक आहे. चळवळीची गाणी, महात्मा फुल्यांचे अखंड, शेरोशायरी याचा त्यांना नाद आहे. त्यांच्यासोबतचा प्रवास कधीच बोअर होत नाही. त्यांचा खळाळता झरा अखंड वाहतच असतो. चुटके सांगणे, नकला करणे, मध्येच ड्रायव्हरला स्पीड, ब्रेक, क्लचबाबतच्या सुचना देणे असे अव्याहत चालू असते. बाबांची झोप हुकमी आहे. मनात  आणले की त्यांचा तात्काळ डोळा लागतो. दहापंधरा मिनिटात ते पुन्हा फ्रेश होतात. लोणावळा, शिरवळ, सरदवाडी इथं त्यांच्या मित्रांची/चाहत्यांची हॉटेल्स आहेत. तिकडे पाचदहा मिनिटे थांबून चहा, वडापाव, मिसळ किंवा कोरडी भेळ असं खाणं झालं की निघाली गाडी पुढे. रस्त्यात स्वागताला हमाल येतात. पंचायतीच्या कष्टाच्या भाकर केंद्रावर नेतात, तिकडची पिठलं भाकरी हातावर घेऊन खाताखाता बाबा मिटींग करतात की निघाले पुढे. बाबांचा कामाचा उरक अफाट आहे. ( बाबांसोबत केलेले दौरे यावर स्वतंत्रपणे लिहायला हवे.)


माझ्या लग्नात बाबाच वरबाप होते. तेच साक्षीदार म्हणून पहिली सही करणारे होते. खिश्यातली सोनचाफ्याची फुलं सगळ्यांना प्रेमानं वाटणं हा त्यांचा नित्यपरिपाठ आहे. बाबांना चहा सोडला तर इतर कसलंही व्यसन नाही. त्यांचं अक्षर मोत्यासारखं आहे. बाळ गांगल यांनी जेव्हा महात्मा फुले यांच्यावर गरळ ओकले तेव्हा मी त्यांना सप्रमाण दिलेलं पहिले उत्तर बाबांनी वाचले आणि त्यांच्या देखण्या हस्ताक्षरात मला ते लिहून दिले.


आम्ही सारे १ जूनवाले.  आमच्या शिक्षकांनी आम्हाला जन्मतारखा दिलेल्या. त्या काळात शाळा १ जूनला सुरू व्हायच्या म्हणून आमचे सगळ्यांचे जन्म एकाच दिवशी झालेले दिसतात. वर्षं तेव्हढी वेगळी. तारखा मात्र १ जून.

एकदा बाबा टिळक रोडवरून स्कूटरवरून जात होते. मी टिळक स्मारकाच्या गेटवर उभा होते. त्यांनी मला बघितलं. स्कूटर थांबवली. माझ्याजवळ आले नी म्हणाले, " अरे हरी, आज तुझा वाढदिवस ना! चल तुला मिसळ खायला घालतो. त्यांनी खिश्यात हात घातला आणि दीडरूपया खिश्यातून काढला व माझ्या हातावर ठेवला. तो माझा आयुष्यातला साजरा झालेला पहिला वाढदिवस आणि ते मला मिळालेलं पहिलं प्रेझेंट होय. तेव्हा मी २० वर्षंचा होते. बाबा स्कूटरवर बसले तेव्हा माझ्या लक्षात आलं की आज त्यांचाही वाढदिवस आहे. मी त्यांना थांबवलं आणि समोरच्या फुलवाल्याकडून एक गुलाब घेऊन त्यांना दिला. त्यांचा चेहरा उजळला. बाबा फार मधाळ हसतात. ते हसले आणि त्यांनी स्कूटरला किक मारली


उद्या बाबा आयुष्याची नव्वदी पुर्ण करून ९१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. बाबांनी त्यांच्या आयुष्यातली ९० पैकी ७५ वर्षे चळवळीत खर्ची घातली. त्यांची ना कुणी ५० साजरी केली, ना षष्ठब्धी, ना पंच्याहत्तरी, ना सहस्त्र चंददर्शन! अगदी साधी साधी माणसंही असे सत्कार करतात/करवतात. पण बाबांचा अशा सत्कारांना स्पष्ट विरोध असल्याने त्यांनी असल्या सत्कारांना/कार्यक्रमांना कधीही संमती दिली नाही. बाबांना सत्कार, सन्मान यांचा एकुण तिटकाराच आहे.


बाबा १९६२ ते १९७१ या काळात पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते. नागरी आघाडीतर्फे बाबांनी नाना पेठेचे प्रतिनिधीत्व केले. दोन्ही वेळेस ते याच वार्डातून निवडून गेले. ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, भाई वैद्य, काँग्रेसचे नेते शिवाजीरीव ढेरे, नामदेवराव काची, नामदेवराव मते असे मान्यवर त्यांचे पालिकेतील सहकारी होते. बाबा राजकारणातच राहते तर आपल्या गुणवत्तेवर ते महापौर, आमदार, मंत्री नक्कीच झाले असते. बाबा कुणबी मराठा असूनही राजकारणात रमले नाहीत. त्यांनी मराठ्यांच्या जातजाणिवांवर कडाडून हल्ला करणार्‍या पुस्तिका लिहिल्या. स्वजातीवर जाहीर टिका करणारे, हे तर शेटजीभटजीचे गुलाम/दास म्हणून बरसणारे बाबा हे मी ऎकलेले पहिले वक्ते आहेत. बाबांचं वक्तृत्व अस्सल आहे. ते कणवेनं बोलतात. अपार कळवळ्याने बोलतात. असा दुसरा वक्ता मी ऎकलेला नाही. ते कष्टकर्‍यांच्या भाषेत बोलतात. छोटीछोटी वाक्यं, बोलकी उदाहरणं, आजचे संदर्भ आणि कष्टकर्‍यांच्या घामाचा वास त्यांच्या शब्दांना असतो.


आणीबाणीत बाबा १९ महिने तुरूंगात होते. त्यावेळी त्यांचा आरएसएस सुप्रिमो बाळासाहेब देवरस यांच्याशी संबंध आला. त्यांच्याशी व इतर स्वयंसेवकांशी तुरूंगात झालेल्या चर्चांवरून त्यांनी रा.स्व.संघाच्या हिंदुराष्ट्र संकल्पनेचे वाभाडे काढणार्‍या २ पुस्तिका लिहिल्या. संघाचे दांभिक रूप उलगडवून दाखवणारे पहिले मराठी लेखक बाबा आहेत.


जातीय दंगली रोखण्यासाठी बाबांनी राष्ट्रीय एकात्मता परिषद आयोजित केली. उद्घाटन पु. ल. देशपांडे यांनी केले. संघावर ताशेरे ओढताना पुल कडाडले, अर्ध्या चड्ड्या घालून काठ्या फिरवित केलेल्या कवायतींवर ते म्हणाले, " मला फाजील शिस्तीचं कौतुक काय सांगताय? अहो, त्या चिमुकल्या मुंग्यासुद्धा एका रांगेत चालतात. वांझोट्या कवायतींनी ताकद दिसते, सामाजिक परिवर्तन होते का? अजिबात नाही."


बाबांनी पायाभरणी केलेल्या चळवळींची, विधायक उपक्रमांची यादी शतकाधिक आहे. एक गाव एक पाणवठा, एक गाव एक मसणवटा, सामाजिक कृतज्ञता निधी, हमाल पंचायत, कष्टाची भाकर, कागद काच पत्रा पंचायत, रिक्षा पंचायत, धरण ग्रस्तांच्या पुनर्वसनाची चळवळ, भटक्यांची चळवळ ही यादी अशीच वाढते आहे. आज नव्वदीतही बाबा अनेक पातळ्यांवर झुंजताहेत.


बाबा उत्तम लेखक आहेत. त्यांचं "एक गाव एक पाणवठा" हे पुस्तक मौज प्रकाशनानं काढलंय. "सुंबरान " मेहतांनी काढलंय तर इतर अनेक पुस्तकं नविन इंदलकर व श्रीविद्या प्रकाशन आणि म.फु.समता प्रतिष्ठाननं काढलीयत.


बाबा गेली ५० वर्षे प्रतिष्ठानचं पुरोगामी सत्यशोधक हे मासिक चालवतात.
त्याचे य. दि. फडके, सीताराम रायकर, अनिल अवचट, किशोर बेडकीहाळ आदींनी संपादित केलेले विशेषांक मौलिक होते. दत्ता काळबेरे आणि बापू विरूळे  त्यांना गेली ५० वर्षे संपादन सहाय्य करतात.



देशातल्या ५० कोटी असंघटितांसाठी बाबांनी मनमोहन सिंगांच्या काळात अपार झुंजून अंब्रेला कायदा मिळवला. १९६९ पासून झालेले हमाल, माथाडी कायदे हे बाबांच्या लढ्याचेच फलित आहेत.


बाबा हे महात्मा फुले यांचे खरे वारस आहेत. फुले यांचे सहकारी गोपाळबाबा वलंगकर, ना.मे. लोखंडॆ, कृ.पां. भालेकर, जागृतीकार पाळेकर, नंतरचे नेते जेधे, जवळकर आदींचे साहित्य आणि चरित्रे यांच्या प्रकाशनात बाबांचा पुढाकार होता. आहे. ते संशोधक नसले तरी समता प्रतिष्ठानचा संशोधन विभाग हे बाबांचे मोठे काम आहे.


काल एबीपी माझा वाहिनीच्या कट्ट्यावर बाबांची मुलाखत झाली. राजीव खांडेकर, प्रसन्ना जोशी आणि सहकार्‍यांनी बाबांना बोलते केले. एक तास भुर्कन संपला. बाबांना नेतृत्वची दुसरी पिढी का घडवता आली नाही या प्रश्नावर बाबा प्रांजळपणे म्हणाले, "मीही माणूसच आहे. माझ्या स्वभावात काही दोष आहेत. त्यामुळे माझ्याकडून काही उणीवा राहिल्या हे मी कबुल करतो."

बाबांना मी अनेक वर्षे अतिशय जवळून बघितल्याने माझ्या हे लक्षात आलेय की बाबा इतर कुणाच्याही हाताखाली किंवा सोबत काम करू शकत नाहीत. ते एकांडे शिलेदार आहेत. त्यामुळे त्यांच्या सगळ्या उपक्रमात तेच एकखांबी तंबू असतात. इतरांनी विशेषत: त्यांच्या पुर्वीच्या सहकारी, कार्यकर्ते, अनुयायांनी स्वतंत्रपणे केलेल्या लेखनाला, कार्यक्रमांना, उपक्रमांना बाबा कधीही मान्यता देत नाहीत.


माझीच दोन उदाहरणं सांगतो. महात्मा जोतीरावांनी लिहिलेले अखंड आकाशवाणीवर गायले जावेत ही बाबांची जुनी इच्छा. मी आणि सुषमा देशपांडेने खूप मेहनतीने " गीतफुले" ही ध्वनीफित बनवली.
देवदत्त साबळेचे अप्रतिम संगीत, शाहीर साबळे, शाहीर विठ्ठल उमप, रवींद्र साठे, रंजना जोगळेकर, शरद जांभेकर आदींचे अनवट स्वर अशी छान कॅसेट बनवली. बाबांना तिची प्रत दिली. त्यांनी ती ऎकली. त्यांना ती आवडलीही असावी. पण त्यांनी तसे कधीही बोलून दाखवले नाही. उलट असे काम झालेलेच नाही अशाच पद्धतीने ते पुढेही कायम बोलत राहिले.


"महात्मा फुले यांची बदनामी: एक सत्यशोधन" हे बाळ गांगलना दिलेले उत्तराचे माझे पुस्तक खूप गाजले. त्याला अनेक पुरस्कार मिळाले. बाबांना मी पुस्तकाची प्रत दिली. त्यांनी रागाने पुस्तक घेतले आणि दूर भिरकाऊन दिले. मी हादरलोच. ते चिडलेले होते. काहीतरी पुटपुटत होते. त्या पुस्तकात त्यांचा सहभाग नव्हता याचा त्यांना राग आलेला असावा.


सावित्रीबाई फुले यांच्या अस्सल छायाचित्रावरून रंगीत तैलचित्र करवून घेऊन मी छगन भुजबळांच्या माध्यमातून शासनातर्फे ते प्रकाशित करवले. ते राष्ट्रीय महापुरूषांच्या मालिकेत समाविष्ट करायला लावले. नायगावला सावित्रीबाईंचे स्मारक आणि शिल्पसृष्टी यांची उभारणी भुजबळांच्या माध्यमातून करवली. प्रत्यक्ष फिल्डवर महिनोन महिने त्यासाठी काम केले.


पुढे तशी बातमी एका वर्तमानपत्राने दिली असता बाबांनी त्यांच्या पीएमार्फत खुलासा प्रकाशित करायला लावला आणि ते काम त्यांनी केल्याचा दावा केला. मला वाईट वाटले. खरे तर त्या छायाचित्रावरून कोणकोणा चित्रकारांकडून मी पोर्ट्रेटस बनवून घेतली, ती कुठे आणि कशी छापली याचा बाबांना पत्ताही नव्हता, आजही नाही. असो. मोठ्या माणसांच्या या छोट्याछोट्या खोडी म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला हवे. बाबांचे माझ्यावर इतके उपकार आहेत की या बाबी छटाकभरसुद्धा भरणार नाहीत. कायम लक्षात आहे ते त्यांचे देणे. शिकवणे.


विद्यापीठ नामांतर हा बाबांचा ध्यास होता. बाबांनी त्यासाठी अनेकदा कारावासही भोगलेला होता. त्यातल्या एका कारावासात तर मीही त्यांच्यासोबत होतो. बाबा अतिशय स्वाभिमानी आहेत. मुळात बहुतेक सर्व राजकारण्यांबद्दल बाबांच्या मनात अढी आहे हे मी आधी नमूद केलेलेच आहे. त्याला तशीच काही कारणेही आहेत म्हणा.


१४ जाने. १९९४ ला शरद पवारांनी नामांतर केले याचा बाबांना फार आनंद झाला. ते पवारांचे अभिनंदन करायला, पुष्पगुच्छ घेऊन गेले. त्यांचे पवारांकडे इतर कसलेही काम नव्हते. पवारांनी त्यांना मुद्दाम ताटकळत बसवून ठेवले. दोनेक तासांनी बाबांना अतिशय मानणारे एक ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री तिकडे आले. त्यांनी बाबांना असे बसलेले पाहिले. त्यांनी बाबांना हाताला धरून आत नेले. बाबा नकोनको म्हणत होते, पण मंत्र्यांनी ऎकलेच नाही. ते पवारांना आवडले नाही. पवार अतिशय कर्टली म्हणाले, " बाबा बाहेर थांबा, मी बोलावतो तुम्हाला." या घटनेला आज २७ वर्षे झाली तरी हा अपमान बाबा विसरलेले नाहीत. अशा गोष्टी त्यांच्या जिव्हारी लागतात.


व्यक्तीगत आणि सार्वजनिक जीवनातील लख्ख चारित्र्य, सार्वजनिक पैशांबाबतची साधनसुचिता, कष्टकर्‍यांविषयीचा अपार कळवळा याबद्दल बाबांना १०० पैकी १०० गुण द्यावे लागतील.



महात्मा फुले हा बाबांचा विक पॉईंट आहे. आज बाबा नसते तर महात्मा फुले विसरले गेले असते असे म्हणता येईल इतके मोठे काम त्यांनी केलेले आहे. एक आठवण आहे. सारस बागेसमोर सावित्रीबाई फुले यांचा अर्धपुतळा आहे. त्याला फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून कोप्च्यात टाकले होते. फुलवंताबाई झोडगे, बाबा यांच्यासोबत आम्ही महापौरांना भेटायला गेलो होतो. महापौर बाबांच्या दूरच्या नात्यातलेच होते. ते या कामाबद्दल टाळाटाळ करताहेत म्हटल्यावर बाबांचा पारा चढला. तर ते महापौर म्हणाले, " बाबा आपल्याला काय करायचेय, बघतील सावित्रीबाईंचे जातवाले."


बाबा कडाडले, "महापौर, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. सावित्रीबाई झाल्या नसत्या तर तुमचे आजी-आजोबा, आई-बाप शिकले नसते आणि आज तुम्ही या पदावर पोचू शकला नसतात हे विसरू नका. आज नैतिकतेचा कोणताही ’अंकुश’ तुमच्यावर नसल्यानेच तुम्ही मस्तवाल झालेले आहात. तुम्ही आधी माफी मागा!"
बाबांचा नैतिक दरारा असा होता, आहे की महापौरांनी तात्काळ माफी मागितली.


त्यांनी एका सहआयुक्तांना बोलवून घेतले. बाबांनी त्यांना कामाचे स्वरूप सांगितले. आश्चर्य म्हणजे ते सहआयुक्तही नेमके तसेच बोलले जे आधी महापौर बोलले होते. बाबा इतके संतापले की त्यांना शब्दच सुचेनात. ते सहआयुक्त ओबीसी होते. बाबा त्यांना म्हणाले, " तुम्ही आज अधिकारी कोणामुळे झालात? तुम्हाला या मनपा भवनमध्ये भिक मागायला तरी कोणी येऊ दिले असते का? ही कृतघ्नता मी खपवून घेणार नाही. मी गेटबाहेर सत्याग्रह सुरू करतोय. जोवर हे काम होणार नाही तोवर मी अन्नपाणी घेणार नाही." ते अधिकारी चपापले, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि ताबडतोब काम सुरू केले. अतिक्रमणे एका दिवसात हटवली गेली.


- प्रा. हरी नरके, ३१/५/२०२०

Saturday, May 30, 2020

रसाळ आणि लोभस ग. प्र. प्रधान --प्रा. हरी नरके


महाराष्ट्र विद्यालयात शिकत असताना लिहिलेला पुणे दर्शन हा प्रबंध दाखवायला मी प्रा. ग. प्र. प्रधान यांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो. तेव्हा ते विधान परिषदेवर आमदार होते. त्यांनी व त्यांच्या पत्नीने अतिशय मायेनं स्वागत केलं. पाणी, सरबत आणि सोबत एक केळी त्यांनी माझ्या समोर आणून ठेवली. माझा प्रबंध आस्थेवाईकपणे चाळला. २ दिवसांसाठी माझ्याकडे ठेव मी वाचून त्यावर तुला अभिप्राय देतो असं म्हणाले.


मी २ दिवसांनी गेलो तेव्हा त्यांनी २०० पृष्ठांचा प्रबंध वाचून त्याच्यावर अभिप्राय लिहून ठेवलेला होता. एका शाळकरी विद्यार्थ्याने केलेल्या या संशोधनपर लेखनाचे त्यांनी अभिप्रायात मनापासून कौतुक केलेले होते.


त्यांचे हाजीपूर हे युद्धकथांचे पुस्तक त्यांनी मला भेट दिले. माझी माहिती घेतली आणि मी एका कबरस्थानात काम करुन शाळा शिकतो हे ऎकल्यावर ते म्हणाले, "कसलीही मदत लागली तर संकोच न करता मला सांगायला ये. तुला दरवर्षी वह्या-पुस्तकांची मदत करायला मी माझ्या घराशेजारच्या मंडई मंडळाला सांगतो." त्यांनी मंडळाच्या अध्यक्षांना माझ्यासमोरच तसा फोनही केला.


त्यानंतर अधूनमधून त्यांच्याकडे जात असे. त्यांचे बोलणे अतिशय रसाळ आणि लोभस होते. दरवेळी एक नविन पुस्तक ते मला द्यायचेच.


नामांतर आंदोलनात त्यांच्यासोबत तुरूंगात मला राहायला मिळाले. सगळेच त्यांना मास्तर म्हणायचे. मास्तर चहाचे शौकीन होते. मात्र इतर कसलेही व्यसन त्यांना नव्हते. आजकाल कार्पोरेटरसुद्धा किती भाव खातात. मास्तर मात्र आमदार असूनसुद्धा इतके साधे, प्रेमळ आणि विनयी होते की ते आमदार आहेत यावर विश्वासच बसू नये. ते साधनेचे संपादक असताना त्यांनी माझ्याकडून काही लेख लिहून घेतले. ते ठळकपणे छापले. ‘मी भोळाभाबडा, प्रसंगी काहीसा बावळट आहे असे लोकांना वाटते. खरं तर त्यांचा हा समज कायम ठेवण्यात फायदा समजलेला मी एक धूर्त माणूस आहे’ असे ते म्हणत. वाचन, लेखन आणि वाचलेल्यातील जे आवडले ते इतरांना सांगणे, हा मास्तरांचा परिपाठ होता.


त्यांना मी महात्मा फुले यांच्या कवितांचे इंग्रजी भाषांतर करायला सांगितले. त्यांनी त्या कविता (अखंड) परत वाचल्या आणि मला भेटायला बोलावले. मला म्हणाले, " अरे ह्या कविता म्हणजे आग आहे आग. मला त्यांचा अनुवाद करायला मिळणे हा माझा सन्मान आहे. मात्र माझा पिंड मवाळ आहे. समन्वयवादी आहे. मी या जहाल कवितांना न्याय देऊ शकणार नाही. मुळात मला ही आग झेपणार नाही. त्यासाठी तसाच कणखर माणूस हवा." त्यांनी मला त्यासाठी एक नावही सुचवले. मी त्यांच्याशी संपर्क केला मात्र त्यांना वेळ नसल्याने ते अनुवाद करू शकले नाहीत. त्यानंतर मी भालचंद्र नेमाडे सरांना ह्याकामी विनंती केली.


आपल्या भाषांतरविषयक मर्यादा इतक्या नेमकेपणाने समजलेले किती लोक असतात? प्रधानमास्तर म्हणजे नितांत सोज्वळ, पवित्र आणि सौम्य प्रकृती. साक्षात शुचिता, आस्था आणि करूणेचं प्रतिकच! दहा वर्षांपुर्वी मास्तर गेले. २९ मे २०१० रोजी त्यांचे निधन झाले, ते ८८ वर्षांचे होते.






-प्रा. हरी नरके, ३०/५/२०२०

Friday, May 29, 2020

डॉ. माईसाहेब : आंबेडकरांच्या समर्पित जीवनसाथी- प्रा. हरी नरके



"या ग्रंथाची रचना करण्याचे काम मी हाती घेतले तेव्हा मी आजारी होतो. आणि अद्यापही मी आजारीच आहे. गेल्या पाच वर्षात माझ्या तब्बेतीत अनेक चढउतार झाले. त्यातील काही टप्प्यांवर माझी प्रकृती इतकी चिंताजनक झाली होती की, डॉक्टर्स मी विझती ज्योत ( Dying Flame) असल्याचे बोलत असत. या मालवत्या ज्योतीला यशस्वीपणे प्रज्वलित ( Sucessfully rekindling ) करण्यात माझी डॉक्टर पत्नी व माझ्यावर उपचार करणारे डॉ. मालवणकर यांचे वैद्यकीयशास्त्रातील कौशल्य कारणीभूत आहे. मी त्यांचा अत्यंत कृतज्ञ आहे. ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या " द बुद्धा अ‍ॅण्ड हिज धम्मा" च्या प्रस्तावनेतून )






डॉ. माईसाहेब आंबेडकर या तत्वनिष्ठ, करारी बाण्याच्या आणि कुशाग्र बुद्धीमत्तेच्या लढवय्या नेत्या होत्या. त्यांची माझी पहिली भेट मुंबईत १५ ऑगष्ट १९८२ रोजी झाली. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या नामांतर परिषदेच्या त्या उद्घाटक होत्या. त्यांचे भाषण अतिशय कळकळीचे आणि जोशिले होते. कार्यक्रम संपल्यावर मी त्यांना भेटलो. त्यांना जयभीम केल्यावर त्यांनी माझ्याकडे बघत अतिशय खणखणीत आवाजात जयभीम असा प्रतिसाद दिला. कुठून आलास, काय करतोस असे त्यांनी जिव्हाळ्याने विचारले. मी तेव्हा  बारावीला शिकत होतो. हे मी त्यांना सांगताच " अच्छा म्हणजे तू पुण्याचा आहेस तर, आलास कसा?" त्यांनी विचारलं. मी या परिषदेला डॉ. बाबा आढाव, डॉ. अनिल अवचट, गंगाधर आंबेडकर यांच्यासोबत आलो होतो. मी तसे सांगताच त्यांनी विचारलं, " घरी कोणकोण असतं? आईवडील काय करतात? राहतोस कुठे? "


" माझे वडील मी फार लहान असतानाच वारले, आई मजूरी करते, मी साडेसतरा नळीवरील दांगटवस्ती या झोपडपट्टीत राहतो. "

" सत्याग्रहात येणार असशील तर अटक होईल. तुरूंगात राहावे लागेल, तयारी आहे?" त्यांनी विचारले. मी हो म्हणालो. त्यांना कौतुक वाटले असावे. त्यांनी माझ्या पाठीवर थोपटले.


सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी व एसेम जोशी यांनी केले. पहिल्याच दिवशी सोळा हजार लोकांना अटक झाली. मी लहान असल्याने  बहुधा मला  नेत्यांच्या बराकीत ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. त्याचा मला खूप फायदा झाला. रावसाहेब कसबे, शरद पाटील, बाबा आढाव, कुमार सप्तर्षी, अनिल अवचट, अरूण कांबळे, लक्ष्मण माने, अंकुश भालेकर, बाबूराव बागूल, ग.प्र. प्रधान, विजय मोरे, दिनकर साक्रीकर, महंमद खडस, सुभाष लोमटे आदी १०० मान्यवरांच्या सोबत सुमारे महिनाभर एकत्र राहता आले. आम्ही राजकीय कैदी असल्याने श्रमदान किंवा कष्टाचे काम काहीच नव्हते. मग काय झोपेचे ६/७ तास सोडले तर बाकी सगळा वेळ चर्चा, व्याख्यानमाला, प्रश्नोत्तरे, शाहीरी गाणी, गप्पाच गप्पा.


दररोज १७ ते १८ तास चर्चा. माईसाहेब आम्हा कैद्यांना भेटायला जेलवर यायच्या. मृणालताई, अहिल्या रांगणेकर, डॉ. नीलम गोर्‍हेही यायच्या. याच सत्याग्रहाने मला सुनिल तांबे, नितीन वैद्य असे जिवाभावाचे मित्र मिळवून दिले. ( सत्याग्रहाच्या या अनुभवावर पुन्हा कधीतरी विस्ताराने लिहायला हवे. )


आमची सुटका करताना जेलरने दिलेले प्रमणपत्र मी अतिशय जपून ठेवलेले आहे. मला तो फार मोठा पुरस्कार वाटतो.

पुढे मित्रवर्य विजय सुरवाडे यांच्यामुळे ( ते माईंचे सेक्रेटरी होते. त्या विजयला मानसपुत्र मानायच्या ) माईसाहेबांच्या खूप भेटीगाठी झाल्या. एकतर दरवर्षी आम्ही माईंसोबत ६ डिसेंबरला चैत्यभुमीवर जायचो. दरवर्षी जयंतीच्या कितीतरी कार्यक्रमात त्यांच्यासोबत मला स्टेजवर बसता आले, भाषण करता आले, त्यांचे भाषण ऎकता आले याचा मला अभिमान वाटतो.

याचकाळातला त्यांच्यासोबतचा एक फोटो विजयरावांमुळे उपलब्ध झाला. त्यात माईसाहेबांसोबत मी, विजय सुरवाडे, देवचंद अंबादे व वसंत मून दिसत आहेत.  " डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे" खंड १ ते १६ यासाठी मूनांचे अफाट योगदान आहे. मी मूनांसोबत ११ वर्षे काम केले. त्यांचा माझ्यावर फार जीव होता.


त्यांचे प्रत्येक पुस्तक ते मला भेट द्यायचे. आज त्यांच्या या पुस्तकांवरच्या सह्या बघताना अनेक आठवणी दाटून येतात. मून अभ्यासू, जिगरबाज आणि तत्वनिष्ठ होते. पण ते गवई गटाचे असल्याने बहुधा त्यांच्या मनात माईंबद्दल एक अढी होती. माई हयात असेपर्यंत मूनांनी रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेसच्या रॉयल्टीची सरकारी फाईल सतत फिरती ठेवली आणि बाबासाहेबांच्या पत्नी म्हणून  त्यांना या रॉयल्टीचा एक रूपयाही मिळू दिला नाही. मूनांच्या मृत्यूनंतर त्यांचे पद माझ्याकडे आले.


तेव्हा तहसीलदार मूनांनी फाईल ( नस्ती ) कशी दाबून किंवा फिरती ठेवून माईंना कपरदीकही मिळू दिली नाही ते कळले आणि खेद वाटला. मी ताबडतोब सगळ्या पुर्तता करून घेऊन रॉयल्टीचा पहिला चेक काढला, पण तोवर २९ मे २००३ ला माई गेलेल्या होत्या. तो पहिला धनादेश प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांना सुपुर्द करतानाचा क्षण आजही माझ्यासाठी ताजा आहे.

माईंच्या अनेक आठवणी आहेत. त्यातल्या किमान २ तरी इथे द्यायलाच हव्यात. मित्रवर्य अरूण खोरे यांनी आम्हा काही मित्रांच्यासोबत "दलित साहित्य संशोधन संस्था" स्थापन करायचे ठरवले. उद्घाटनाला उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांना निमंत्रण द्यायला आम्ही दिल्लीला गेलो. आमच्या भेटीत त्यांनी निमंत्रण स्विकारताना माईसाहेबांबद्दल अतिशय आपुलकीचे उद्गार काढले.


आमच्या व माईंच्या अशा दोन्ही कार्यक्रमांसाठी ते पुण्याला आले. आमचा कार्यक्रम बालगंधर्वला झाला. दुसर्‍या दिवशी सकाळी माईंचा कार्यक्रम होता. सिंबॉयोसिसने उभारलेल्या आंबेडकर मेमोरियलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या स्मारकाच्या टेकडीवरील सरकारी जागेच्या हस्तांतराचे काही सोपस्कार बाकी राहिलेले होते. त्यावेळी बोलताना माईंनी स्टेजवर बसलेल्या मुख्यमंत्री मनोहर जोशींना अधिकारवाणीने त्याबद्दल फटकारले. जोशीबुवा गोरेमोरे झाले. माई जरा जास्तच कडक बोलल्या होत्या.


त्यांना जोशींचे नावच आठवत नव्हते. त्या फटकळपणे म्हणाल्या, "मी मुख्यमंत्र्यांना सांगते, उगीच फाईल लांबवू नका. नाही तर मी बाळला ( बाळासाहेब ठाकरे ) सांगून काम करून घेईन. बाबासाहेबांच्या स्मारकाला नाही म्हणता म्हणजे काय?" आणि आपल्या एका मैत्रिणीकडे वळून त्या म्हणाल्या, " कोण ग तो मुख्यमंत्री? मला त्याचे नावच आठवत नाही बघ, वय झालं ना!"

आणि स्टेजवरील मुख्यमंत्र्यांकडे बघत त्यांनी विचारले,   "काय हो मि. सीएम, नाव काय तुमचे?" हशा आणि टाळ्यांचा गजर झाला.

मनोहर जोशी तुपटपणे आणि खोट्या विनयाने म्हणाले, " मॅडम, मी मनोहर जोशी."   "हा तर मि. जोशी, ताबडतोब आदेश काढा नाहीतर गाठ माझ्याशी आहे. माहित आहे ना मी कोण आहे ते? मी मिसेस आंबेडकर आहे म्हटलं!"  पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. कदाचित माईंनी प्रोटोकॉल पाळला नसेल पण  सीएमचेही कान अधिकारवाणीने उपटणारे कुणीतरी आहे याचा आम्हाला सॉलीड आनंद झालेला.

माझी माईंशी जवळीक आहे म्हणून मला बरीच बदनामीही सोसावी लागली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर माईंबद्दल काही नतद्रष्टांनी अफवांचे अभियान चालवून आंबेडकरी समाजाचे मत त्यांच्याबद्दल कलु्षित केले. त्यामुळे माईंना २५ वर्षे अज्ञातवास सोसावा लागला. त्या आर्थिक हालाखीत जगल्या. हालाखीतच गेल्या. त्यांनी मानहानी आणि बदनामी झेलली. पण आंबेडकर म्हणूनच जगल्या आणि आंबेडकर म्हणूनच गेल्या.

माझा माईंच्या बरोबरचा फोटो बघून एका मनोरूग्ण कार्यकर्त्याने त्याच्या गलिच्छ चोपड्यात मलाही गोवले. माईसाहेबांनी म्हणे बाबासाहेबांची कथित हत्या केली तेव्हा मी त्यांना मदत केली होती. आत्ता यात एक छोटीशी अडचण इतकीच आहे की, बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर ७ वर्षांनी माझा जन्म झालेला आहे. तेव्हा मी त्यावेळी दिल्लीला कसा असेन असा प्रश्न त्या माथेफिरूला पडला नाही.


असो. माईंच्यामुळे बाबासाहेबांना काही ऎतिहासिक कामं करायला आयुष्य मिळालं असं स्वत: बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. माईंचे आत्मकथन अतिशय महत्वाचे आहे. विजय सुरवाडे आणि देवचंद अंबाडे यांचे या ऎतिहासिक ग्रंथाबद्दल मन:पुर्वक आभार. ते आवर्जून वाचा. वाल्मिका एलिंजे- अहिरे यांनी अलिकडेच माईंवर एक पुस्तक लिहिलेय. तेही वाचा.

माईसाहेबांच्या ऎतिहासिक योगदानाला कृतज्ञतापुर्वक जयभीम!
............................................................
डॉ. माईसाहेब उर्फ सविता भीमराव आंबेडकर
माहेरचे नाव- शारदा कृष्णराव कबीर
जन्म- २७ जाने. १९०९, जन्मस्थळ- दादर, मुंबई,
परिनिर्वाण- २९ मे २००३, जे. जे. हॉस्पीटल, भायखळा, मुंबई.

डॉ. आंबेडकरांच्या सहवासात, आत्मचरित्र,
लेखनसहाय्य व संपादन, विजय सुरवाडे,
प्रकाशक- देवचंद वि. अंबादे, तथागत प्रकाशन, तिसगाव, कल्याण पूर्व, जि. ठाणे, ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन, मुंबई करिता )

प्रथमावृत्ती-२४ मार्च १९९०, सुधारित आवृती, मे २०१३,

किंमत रू.५००/-
एकुण पृष्ठे-४८६+३२+६४= ५८२,
पुस्तकासाठी संपर्क-९७६ ९२९ ८६ १९



- प्रा.हरी नरके, २९/५/२०२०


Thursday, May 28, 2020

काळीज पिळवटून टाकणारे मजूरांचे लोंढे - प्रा. हरी नरके












गेला महिनाभर प्रवासी मजूरांचे होत असलेले हाल बघताना काळीज पिळवटून जाते. किती भयंकर यातनांमधून जाताहेत हे बांधव. खरं तर ज्यांना ज्यांना काळीज आणि मेंदू आहेत त्या सर्वांनी अस्वस्थ व्हावं असं हे भयकारी वास्तव आहे. पण एन.डी.टि.व्ही.चा अपवाद वगळता इतर वाहिन्यांना हे हाल, हे जगणं का दिसत नाहीत? का भिडत नाही? तो बातम्यांचा ठळक आणि मुख्य विषय का होत नाही? भारतीय माध्यमांचा हा बधीरपणा संतापजनक आहे. लाजिरवाणा आहे. माध्यमांचा इतका सरकारधार्जिणेपणा तर १९७५ च्या आणीबाणीतही नव्हता.


दुसरीकडे सामान्य माणसाला दहशत बसावी, रोज धडकीच भरावी अशा बेजबाबदार पद्धतीनं याच वाहिन्या कोरोनाच्या बातम्या दाखवत आहेत. बातम्या देणारांचे किंचाळणारे आवाज जणू काही तरी वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचा भास निर्माण करताहेत. इतका बथ्थडपणा का? यांना कुणालाच संवेदना नाहीत? हे अपार हाल सोसणारे, तडफडून मरणारे लोक यांचे कुणीच नाहीत? यात ह्युमन व्हॅल्यू असलेले बातमीमूल्य नाही? सरकारचे व भारतीय माध्यमांचे हे संवेदनाशून्य वर्तन बघताना शरम वाटते. त्यांना असे वाटते की हे मजूरलोक भारतीय नाहीतच. कुठून आणत असतील हे सरकारी दलाल एव्हढे बधीरपण?

हे सरकार गरिबांचे कधीच नव्हते. ज्या तुघलखी बाण्याने नोटाबंदी, जीएसटी आणि कोणतेही नियोजन न करता अचानक केलेला लॉकडाऊन हे गरिबविरोधी निर्णय घेतले गेले त्यावरून सरकारचे वर्तन माणूसघाणे आणि निर्दयपणाचेच ठरते. सरकारला आणि त्यांच्या मातृसंघटनेला फक्त उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत आणि अब्जाधीश यांचेच हित बघायचे आहे. कारण तेच त्यांचे लोक आहेत. गरिबांचे कर्दनकाळ म्हणूनच या तथाकथित ५६ इंचाची नोंद इतिहासाला करावी लागेल.

एकाचढ एक माथेफिरू भरलेत युपी, एम.पी. बिहार राज्यात आणि पीएमओ, रेल्वे आणि अर्थखात्यात. इतके लोभस आणि खोटे चित्र रंगवतात हे नीच ट्विटरवर! कुठे फेडाल ही पापं? गरिबांची हाय तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही मुर्दाडांनो.

रस्त्यावरील भिकार्‍यांचे पुनर्वसन करणार्‍या डॉ. सोनावणे यांची मुलाखत बघत होतो. ते म्हणाले, भिकार्‍यांमध्ये दोन प्रकारचे गट कार्यरत आहेत. एक ज्यांना कामधंदा न करता आयते खायची सवय लागलेली आहे, असे सराईत, धंदेवाईक, जातीगत भिकारी आणि दुसरा ज्यांना वृद्धत्व, अपंगत्व किंवा गंभीरस्वरूपाचे आजारपण यांच्यामुळे काम करणे शक्य होत नाही असे मजबूर लोक.

मला यातली पहिल्या प्रकारची मानसिकता गुन्हेगारी स्वरूपाची वाटते. दुसर्‍या प्रकारातील लोकांसाठी कल्याणकारी भुमिकेतून समाज आणि सरकारने काम करायला हवेच. मात्र पहिल्या प्रकारच्या लोकांना ठोकून काढून सक्तीने कामाला जुंपले पाहिजे.

आपल्या देशात भिक मागण्याचेही धार्मिक उदात्तीकरण केले गेलेले आहे. कधी ते भिक्षुकीच्या तर कधी दक्षिणेच्या नावावर. लक्षावधी साधू, संन्याशी, मठपती यांचे त्यामुळेच तर फावले असून भिकारचाळे करणारे हे लोक ही त्यांचीच निर्मिती आहे. शारिरिक वा बौद्धिक श्रम न करता निव्वळ आयते खाणारे लोक हे देशावरचा बोजा आहेत. असे समुहच्या समुह असणे हे देशावरचे संकट मानायला हवे. का पोसायचे या बाजारबुणग्यांना? असे कोट्यावधी वळू पोसणारा देश कसा प्रगती करणार?

मी स्वत: झोपडपट्टीतून आलोय. बालमजुरी करीत शिकलोय. टोकाची गरिबी मी अनुभवलीय. कोणतीही शासकीय सवलत न घेता मी इथवर आलोय. मला गरिबांविषयी, श्रमिकांविषयी कळवळा वाटतो. पण तो आंधळा नाही.

त्यामुळे काही गरिबांची खटकणारी एक गोष्ट नोंदवायलाच हवी. शंभर वर्षे झाली, र.धों.कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जे. आर. डी. टाटा यांनी कुटुंब नियोजनाचे महत्व सांगून. भयावह गरिबी असताना २०२० मध्येही जेव्हा पोराबाळांचे लेंढार वाढवणारे काही लोक मला दिसतात तेव्हा डोक्यात तिडीक उठते. आणीबाणीत कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम बूमरॅंग झाला आणि १९७७ पासून लहान कुटुंबाचा बोजवारा उडाला.


झोपडपट्टीत राहणारी, फूटपाथवर राहणारी ही कोट्यावधी गरिब जनता कधीतरी स्वत:च्या उत्कर्षासाठी कुटुंबनियोजनाकडे वळणार की नाही? छोटे कुटुंब हा पॅटर्न आजही का आपलासा होत नाही? जन्माला येणारे प्रत्येक गरिब मूल बाळूत्यावरून ( पाळण्यातून ) उठते आणि थेट बालकामगार बनते. कमावता हात बनते. हे कधीतरी थांबल्याशिवाय ही उपासमार, हे हालाखीचे दिवस, कसे टळणार?

सावित्रीबाईंनी - जोतीरावांनी मुलींच्या, मागासवर्गियांच्या, बहुजनांच्या शिक्षणाचे काम सुरू केले त्याला पाऊणेदोन शतके उलटली. छ. शाहू, सयाजीराव, कर्मवीर भाऊराव, बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्व आमच्या कानीकपाळी ओरडून सांगितले. तरिही अद्याप आमच्यात ज्ञानाची आच निर्माण होत नसेल तर कसे थांबणार आमचे हे नष्टचर्य?

राज्यकर्त्यांच्या नियोजनशून्यतेवर जरूर बोललेच पाहिजे.आसूडा मारलेच पाहिजेत. पण आमच्या गरिबांच्या चुकांचेही आत्मपरीक्षण केले तरच या आपत्तीमधून आम्ही काही तरी शिकलो असे म्हणता येईल. येरे माझ्या मागल्या आणि पुढले पाढे पंचावन्न!

- प्रा. हरी नरके, २८/५/२०२०

Wednesday, May 27, 2020

भालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन- प्रा. हरी नरके














भालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन- प्रा. हरी नरके
शाळकरी वयात कोसला वाचली. खोलवर भिडली कोसला. लागोपाठ तीनदा वाचली. कोसलानं केलेलं गारूड त्यानंतर तिची कितीतरी वाचनं झाली तरी आजही उतरलेलं नाही. जी पुस्तकं, जे लेखक त्या वयात खूप आवडले होते त्यातले बरेचसे आता आवडत नाहीत. फार थोडे लेखक याला अपवाद आहेत. तेव्हाही आवडले, आजही आवडतात या यादीत नेमाडे अव्वल आहेत.


खरं तर मी नेमाडे वाचणार नव्हतो. कारण त्याकाळात पुल हे माझे दैवत होते. नेमाडे त्यांच्यावर टिका करतात म्हणून मी नेमाडेंवर फुली मारलेली होती. एकदा पुलंशी तावातावाने बोलताना मी नेमाडेंबद्दल काहीतरी बोलून गेलो. भाई म्हणाले, " हरी, तू नेमाडेंची कोसला वाचलीयस का?" मी म्हटलं, "नाही वाचली आणि वाचणारही नाही." ते म्हणाले, "असं का?"  मी त्यांना कारण सांगताच ते हसायला लागले. त्यांनी कपाटातून कोसला काढली आणि माझ्या हातात ठेवली. म्हणाले, " ही आधी वाच नंतर आपण बोलू नेमाडेंवर."


मी कोसला वाचली आणि नेमाडेंच्या प्रेमात पडलो. माझा भाई ( पु.ल. देशपांडे ) बद्दलचा आदर वाढला. भाई म्हणाले, "त्यांनी माझ्यावर किंवा आणखी कोणावरही टिका केली तरी त्यांची कोसला ही मराठीतली सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे हे माझं मत कधीही बदलणार नाही. तुझ्या पुढच्या पिढीने आमच्या वादात पडू नये. हे वाद तात्कालिक असतात. काळाच्या रेट्यापुढे ते आपोआप मोडीत निघतात. टिकतं ते फक्त श्रेष्ठ साहित्य!"


आज आजूबाजूला अनेक किडके साहित्यिक आणि समीक्षक बघतो तेव्हा पुलंच्या मनाच्या मोठेपणाची आठवण येते.


पुढे मी बिढार, जरिला, झूल, हुल याही कादंबर्‍या वाचल्या. मनापासून आवडल्या. त्या सुनिताताईंना फारशा आवडलेल्या नव्हत्या. मला मात्र आवडल्या. भिडल्या. महत्वाच्या वाटल्या.

महाराष्ट्रातील जातीजमातींच्या ताब्यातील शिक्षणसंस्था आणि तिथलं ओंगळवाणं राजकारण यांचा नेमाडेंनी घेतलेला वेध स्तिमित करतो. जातीयता, प्रादेशिकता, शिक्षणाचा बाजार आणि मराठीच्या विविध बोलींची रसरशीत रूपं यांचा जो गोफ या कादंबर्‍यांमध्ये नेमाडॆंनी विणलाय तसं इंद्रधनुष्य मराठीतल्या अन्य लेखकांना क्वचितच जमलंय.


नेमाडे हे बहुआयामी व्यक्तीमत्व आहे. माझ्या दृष्टीने ते थोर आहेत कारण त्यांना अनंत पैलू आहेत.


पहिलं, नेमाडे आजचे लेखक आहेत. अतिशय दणकट लेखक आहेत. पाचदहा वर्षात लेखक मागे पडतात, विसरले जातात. आज ५७ वर्षे होऊनही नेमाडेंची कादंबरी शिळी होत नाही. लोकप्रियता आणि विद्वतमान्यता असे दोन्हीही साध्य केलेले लेखक मराठीत चारपाचसुद्धा नाहीत. नेमाडे त्यात अग्रभागी आहेत.


दुसरं, जातीव्यवस्थेवर टिका करणारे मोजके का होईना लेखक मराठीत आहेत. पण जातीव्यवस्थेवर आसूड ओढणारे आणि स्वत:च्या जातीचीही सालटी काढणारे एक महात्मा जोतीराव फुले आणि त्याच जातकुळीचे दुसरे नेमाडे आहेत. ही यादी आणखी वाढवायची झाली तर रंगनाथ पठारे सोडले तर आज तरी मला पहिल्या श्रेणीतले कुणी दिसत नाहीत.


स्वत:च्या जातीवर टिका करायला फार मोठे धैर्य आणि नैतिकबळ असावे लागते, ते नेमाडेंमध्ये जबरदस्त आहे. असे बळ असलेले काही लोक आजूबाजूला जरूर आहेत पण ते प्रथम श्रेणीचे ललित लेखक नाहीत.


तिसरे कारण नेमाडे द्रष्टे आहेत. त्यांचा आवाका लांब पल्ल्याचा आहे. त्यांची जातीव्यवस्थेबद्दलची मांडणी वादग्रस्त आहे. त्यांची इतर बरीच मतं अनेकांना पटत नाहीत. पण ती मांडण्याचं धाडस नेमाडेंमध्ये ठासून भरलेलं आहे. याविषयावर स्वतंत्रपणे केव्हातरी लिहायला हवे.


आजची भारतीय जातीव्यवस्था नेमाडेंना जितकी आरपार समजलीय तितकी समजलेले विचारवंत क्वचितच दिसतात.


माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झाल्यावर नेमाडेसरांचे पोस्टकार्ड मला आले. आपल्या आवडत्या लेखकाने आपले पुस्तक वाचावे आणि त्याबद्दलचा अभिप्राय पत्राद्वारे कळवावा याचा आनंद अपार असतो. त्याच महिन्यात कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठाच्या सेमिनारमध्ये नेमाडेसरांची भेट झाली.


मी त्यांना भेटलो. माझी ओळख सांगितली. मी त्यांच्या पायाला स्पर्श करणार तोच त्यांनी मला मिठी मारली. त्या भेटीत नेमाडेसरांचे रसायन नेमके काय आहे ते थोडेथोडे उलगडायला लागले. गेली ३१ वर्षे त्या केमिस्ट्रीचे नवनवे पदर उलगडतोच आहे. आजही हे काम पुर्ण झालेले नाही.


दरम्यान टिकास्वयंवर आले. त्याला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. लोकसत्ताकार अरूण टिकेकरांनी छाछू वादाला पुरस्कार नावाचा अग्रलेख लिहून त्यावर टिकेची झोड उठवली. टिकेकरसरांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध असूनही मी या अग्रलेखावर खरपूस टिका केली. टिकेकरांशी तावातावाने वादही घातला. त्यातनं टिकेकरांची नाराजीही ओढवून घेतली.


बहुप्रतिक्षित हिंदू आली आणि तुफान गाजली. मला हिंदूही आवडली. त्यानंतर सरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.

नेमाडॆंवर जळणारा फार मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. खरंतर अशा भरपूर जळाऊ लाकडाच्या वखारीच आहेत असं म्हटलं तरी चालेल. माझा एक मित्र तर दर महिन्या दोन महिन्याला काहीही बादरायणी संबंध जोडून नेमाडॆंवर फेसबुकवर बरसत असतो. नेमाडॆंनाही वादविवाद आवडतात. तेही सुरसुरी आल्यासारखे त्यात भाग घेतात. नेमाडॆंमध्ये अफाट उर्जा आहे.

मध्यंतरी आम्ही त्यांना महात्मा फुले समता पुरस्कार दिला. तो स्विकारायला ते प्रतिभाताईंसमवेत सहकुटूंब सवड काढून आले. सलग तीन दिवस सरांचा सहवास लाभला. मोकळ्याढाकळ्या गप्पा हा सरांचा विशेष.



मी त्या उभयतांना फुलेवाडा दाखवला. सुमारे तासभर सर त्यात रमून गेले.


कार्यक्रमाच्या स्टेजवर चढताना माझे पत्रकारमित्र अद्वैत मेहता यांनी सरांची पुरस्काराबाबतची भुमिका आम्हाला हवीय, तेव्हढी घेऊन देण्याची मला गळ घातली. नेमाडेसर मिडीयापासून दहा हात दूर असतात. मी त्यांना बाईट देण्याची विनंती करताच त्यांनी ती ताबडतोब फेटाळून लावली.


मला म्हणाले, तुला कल्पना नाही, हे पत्रकार लोक फार चावट असतात. त्यांना तिसर्‍याच कुठल्यातरी गोष्टीत रस असतो. पुरस्काराबाबबतची भुमिका हा फक्त त्यांचा बहाणा आहे. या डॅंबीश लोकांना मी कधीच जवळ करीत नाही.

अद्वैतच्या भरोश्यावर त्यांना मी पुन्हापुन्हा विनवत राहिलो. शेवटी सरांना माझी कणव आली. ते वाहिन्यांशी बोलायला तयार झाले. पण मला म्हणाले, त्यांना सांग, मी प्रत्येकाशी वेगवेगळे बोलणार नाही, सगळ्यांना एकच बाईट देईन.

सगळे तयार झाले. सर महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, त्यांच्या विचारातील क्रांतिसुत्रे यावर भरभरून  बोलले. बाईट संपला. आम्ही जायला वळलो. चार पावले गेलो. इतक्यात जाताजाता एकाने विचारले, " सर, साहित्य संमेलन तोंडावर आलेय, जाणार का?" नेमाडेसर उसळले आणि चिडून म्हणाले, मी असल्या रिकामटेकड्यांच्या उद्योगाकडे फिरकत नसतो."

पुरस्कार वितरण समारंभ अप्रतिम झाला. सरांचे समाजशास्त्रज्ञ महात्मा फुलेंवर अफलातून भाषण झाले. पण त्यातले अवाक्षरही कुणी दाखवले नाही. बहुतेक सगळ्या वाहिन्यांनी साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग यावर दिवसभर दळण दळले.


असा काही वाद रंगवला की त्यावर मग आजचा सवाल आणि बेधडक, आणि कायकाय कार्यक्रम घेतले गेले. नेमाडॆसर अशा चर्चांना वाहिन्यांवर जात नाहीत म्हणून मग गाड्याबरोबर नळ्याची यात्रा तसे मला बोलावले गेले. अर्थातच मी वाहिन्यांवर गेलो नाही.

पण माझ्यामुळे सरांवर हा प्रसंग ओढवल्याने मला फार अपराधी वाटले. सर मजेत होते. मला म्हणाले, "सोड रे, काय घेऊन बसलास? कोण बघतो या  ****ट  वाहिन्या. तुला सांगतो, म्हणूनच मी बोलत नव्हतो. तर तुला त्यांचा फार पुळका. एक सांगतो. पत्रकार हा कधीही कोणाचाही मित्र नसतो. तो फक्त पत्रकार असतो, हे यापुढे कायम लक्षात ठेव."


मराठीला अभिजात दर्जा मिळायला पाहिजे हा माझा लेख लोकराज्यमध्ये प्रकाशित झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सचिव विजय नहाटा आणि संचालक प्रल्हाद जाधव यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली.

मी नेमाडेसरांना भेटलो. त्यांचा प्रमाण मराठीला ( पुणेरी) अभिजात दर्जा मिळायला विरोध होता. मी माझी भुमिका सांगितली. मी वर्‍हाडी, खानदेशी ( अहिराणी ) कोकणी, मराठवाडी आदी ५२ बोलीभाषा हीच खरी मराठी असे सांगताच सर खुलले. त्यांनी सगळे सहकार्य देऊ केले. पुढे आमचे अध्यक्ष पठारेसरही त्यांचे निकटवर्तीय असल्याने आम्ही नेमाडेसरांना याबाबतीत भरपूर त्रास दिला. खूपदा भेटलो. चर्चा केल्या.


तासनतास सरांसोबत बैठका झाल्या. नेमाडेसरांची मराठीनिष्ठा इतकी बावन्नकशी आहे की, ते प्रत्येक बैठकीला येताना आमचा अभिजातचा मसुदा वाचून त्यावर टिपणं काढून मगच बैठकीला यायचे. त्यांच्या सुचना अत्यंत मौलिक, नेमक्या आणि शास्त्रशुद्ध असायच्या.

आम्हाला आमच्या मसुद्याचे त्याबरहुकुम फेरलेखन करावे लागायचे. हे करताना त्यांनी कधीही कंटाळा केला नाही. एव्हढे सगळे करूनही आभारात त्यांच्या नावाचा उल्लेखसुद्धा नको अशी नेमाडेसरांनी आम्हाला तंबी दिली. त्यामुळे आमचाही नाईलाज झाला. आमच्या अभिजात मराठी प्रकल्पाला सर्वाधिक मदत, मार्गदर्शन आणि अचुकता येण्यासाठीचे सहकार्य जर कोणी केले असेल तर ते नेमाडेसरांनी केले.


पण त्यांनी आमच्याकडून आधीच कबूल करून घेतल्याने आम्ही त्यांचा साधा आभारातही उल्लेख करू शकलो नाही. पुढे हा अहवाल आम्ही राज्य शासनामार्फत भारत सरकारला सादर केला. तो छाननीसाठी साहित्य अकादमीकडे पाठवला गेला. तिथे नेमाडेसरांनी मराठीची बाजू इतक्या जोरकसपणे मांडली की या अकादमीच्या भाषा समितीने एकमताने हा अहवाल स्विकारला आणि मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी एकमताची शिफारस लेखी शिफारस केंद्र सरकारला केली.


नेमाडेसरांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या कवितांचे इंग्रजी भाषांतर करावे यासाठी मी त्यांना अनेकदा भेटून गळ घालत असे. फुले त्यांचेही आवडते असल्याने तेही विचार करायचे.

पण त्या काळात सर अनेक व्यापांमध्ये बुडालेले होते. मुख्य म्हणजे त्यांना निवृत्तीनंतरचे पेन्शन मिळत नसल्याने त्याचा पाठपुरावा करताकरता ते मेटाकुटीला आलेले होते. एकदा त्यांना तुमचे पेन्शनचे काम माझ्यावर सोपवा, तुम्ही भाषांतराला वेळ द्या अशी मी योजना सुचवली.

ती त्यांनी मान्य केली. प्राध्यापकाच्या नोकरीत सरांनी ब्रेक घेतलेला होता. म्हणजे ते महाराष्ट्राबाहेर गोव्याला काही वर्षे गेलेले होते, त्यामुळे त्यांना सलग सेवेअभावी पेन्शन मिळत नव्हते. मी आमचे उच्च शिक्षण खात्याचे तत्कालीन सचिव जे. डी. जाधव यांना भेटलो. त्यांनी आत्मियतेने केसमध्ये लक्ष घातले. आणि जादूची कांडी फिरावी तसे घडले. फाईल मार्गी लागली. जेडीसर म्हणाले, नेमाडॆंनी माझे एक काम केले तरच मी त्यांच्या फाईलवर अंतिम सही करीन.

आता आली का पंचायत?

नेमाडेसर तसे अतिश्य वल्ली आहेत. किंचित विक्षिप्त म्हटले तरी चालेल. मला भिती होती की ते म्हणतील, "उडत गेली पेन्शन, मला जेडींची अट मान्य नाही." मी त्यामुळे जेडींचे काय काम आहे ते विचारायचे टाळत होतो. पण एकदा भीड रेटून त्यांना त्यांची अट/काम मी विचारले. त्यांनी काय सांगावे?

तर ते म्हणाले, "नेमाडे माझी आवडते लेखक आहेत, त्यांनी एकदा माझ्याकडे चहाला यायला हवे!"
हत्ततेरीकी! एव्हढेच ना?

नेमाडॆसर मंत्रालयात चहाला आनंदाने आले. मोठा चहासोहळाच झाला तो. त्यांनी चहासाठी दहा मिनिटे दिलेली होती. प्रत्यक्षात गप्पा इतक्या रंगल्या की तीन वेळा चहा झाला.

-प्रा. हरी नरके, २७/५/२०२०




माझा कोविड-१९ चा अनुभव- By Sayali Rajadhyaksha


लॉकडाऊन काळात खाली व्यायाम करायलाही परवानगी नसल्यानं मी घरात स्टेशनरी सायकलवर व्यायाम करते. १६ मेला सकाळी सायकल करायला घेतली तेव्हाच मनातून कराविशी वाटत नव्हती. मी म्हटलं आपल्याला कंटाळा आलाय दुसरं काही नाही. मी तसंच स्वतःला ढकलत १५ किलोमीटर केले. शेवटचे ५ किलोमीटर अगदी नको वाटत असताना केले. दुपारी झोपले तेव्हा चेहरा आणि मान गरम लागत होतं. संध्याकाळी बाजूच्या बिल्डिंगमध्ये असणा-या सासुबाईंना भेटून येऊ असा विचार केला आणि जागची उठले तेव्हा चक्कर आली. अंगही गरम होतं. थर्मामीटरवर बघितलं तेव्हा १०० ताप होता.

एकतर मला ताप कधीच येत नाही. कसलंही इन्फेक्शन झालं तरीही ताप येत नाही. ताप आला तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. क्रोसिन घेतलं आणि ताप उतरला. दुस-या दिवशी इतका थकवा होता की संपूर्ण दिवस मी झोपून काढला. तिस-या दिवशी मी बरी होते पण दुपारी निरंजनला ताप आला. तेव्हाच माझ्या मनानं नोंद घेतली की हा कोविडचा ताप आहे. कारण दोघांना पाठोपाठ ताप यायचं काहीच कारण नव्हतं. त्याच दिवशी आमच्या कॉलनीतले एकाच कुटुंबातले ४ जण पॉझिटिव्ह असल्याचं कळालं होतं.

त्या मित्राला फोन केला तेव्हा त्यानं त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या टेस्टसाठी मेट्रोपोलिसवाल्यांना बोलावणार असल्याचं सांगितलं. आम्हाला लक्षणं होतीच, त्यामुळे आमच्या डॉक्टर मित्रानं प्रिस्क्रिप्शन दिलं. संध्याकाळी आम्हा चौघांची टेस्ट झालीही.

त्यानंतरच्या दिवशी मला १०० ताप येतच होता. माझी वास आणि चवीची जाणीव पूर्ण गेली होती. निरंजनला प्रचंड थकवा होता. बुधवारी दुपारी टेस्ट रिझल्ट आले. मुली निगेटिव्ह होत्या आणि आम्ही दोघे पॉझिटिव्ह होतो. लगोलग मुलींची रवानगी आजीकडे केली आणि आम्ही दोघे घरातच आयसोलेट झालो. खरं सांगायचं तर घरातच होतो त्याआधीही कित्येक दिवस. फक्त भाजी आणायला बाहेर पडायचो ते सोडलं तर.

संध्याकाळी बांद्रा इस्टमधल्या कोविड पेशंट बघणा-या एकमेव जीपीकडे गेलो. त्यांनी सगळी हिस्टरी घेतली. दोघांनाही डायबेटिस आणि ब्लडप्रेशर काहीही नाही. ऑक्सिजन सॅच्युरेशन चांगलं होतं. त्यामुळे सरकारी प्रोटोकॉलप्रमाणे त्यांनी औषधं लिहून दिली. आम्ही घरी आलो. त्या दिवसापासून माझ्या तापानं चांगलाच जोर धरला. त्यानंतरचे पाच दिवस रोज १०१-१०२ असा ताप येत राहिला. थकवा प्रचंड होता. पोट खराब झालं. वास आणि चवीची जाणीव आधीच गेलेली होती. निरंजनला ताप नव्हता पण थकवा होता. दोघेही गलितगात्र झालो होतो.

घरात दोघेच. कुणाला प्रत्यक्ष मदत करायची परवानगी नाही त्यामुळे जसं जमेल तसं चहा करणं, पाण्याच्या बाटल्या भरणं हे करत होतो. सुदैवानं आमच्या सोसायटीतले लोक सुबुद्ध आहेत. माझ्या मैत्रिणींनी आपापसात बोलून रोज नाश्ता आणि जेवण पाठवायला सुरूवात केली. त्यातल्या बहुतांश साठीच्या वरच्या आहेत. सध्या घरात कुणालाही मदत नाहीये, पण आमची परिस्थिती जाणून घेऊन त्यांनी डबे पाठवणं सुरू केलं ते अजूनही सुरू आहे.

मला दोन दिवसांपासून आता ताप नाही. वास आणि चव परत यायला लागलंय. दोघांनाही थकवा आहे पण बाकी काही नाही. रोज ऑक्सीमीटरवर ऑक्सिजन मोजत असल्यानं बाकी काळजी नव्हती. ऑक्सिजन सॅच्युरेशन नॉर्मल असणं हे कोविडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते बिघडलं की न्युमोनियासदृश परिस्थिती निर्माण झालीय अशी शक्यता असते. निरंजनला दम्याचा त्रास आहे त्यामुळे ती काळजी आम्ही घेत होतो.

या काळात महानगपालिकेकडून रोज तीनदा फोन येत होता. लक्षणं काय आहेत, ती किती तीव्र आहेत हे विचारण्यासाठी. या टीममधल्या डॉक्टरांनी स्वतःचे वैयक्तिक नंबर दिले होते आणि २४ तासांत कधीही फोन केलात तर चालेल असं सांगितलं होतं. परवा डॉक्टरांची एक टीम घरी येऊन आम्हाला तपासून गेली. झिंकच्या गोळ्या देऊन गेली. महानगरपालिका उत्तम काम करते आहे याबद्दल शंकाच नाही. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

मुळात मला कोविडची साथ सुरू झाली तेव्हापासूनच हे आपल्यालाही कधी ना कधी होणार आहे याची जाणीव होतीच. कारण येत्या काही महिन्यांमध्ये सगळ्यांनाच यातून जावं लागणार आहे. त्यामुळे मला भीती अजिबातच नव्हती. झाल्यावरही मला क्षणभरही काळजी वाटली नाही. डॉक्टर फारोख उदवाडियांचा व्हॉट्सएपवर आलेला मेसेज अनेकांनी वाचला असेल त्यांनी त्यात तपशीलवार कोविड झाल्यावर काय काय होईल हे लिहिलेलं होतं. मला अगदी डे बाय डे तसंच झालं. मी डॉक्टर बडवेंना मेल केली की मी कोविड पॉझिटिव्ह आहे. त्यावर त्यांची – काळजी करू नका, काहीही गंभीर नाही, गरम पाणी प्या, सात दिवस आयसोलेशन करा आणि आराम करा अशी मेल आली. मग तर मी निश्चिंतच झाले.

हा व्हायरस नवीन आहे त्यामुळे तो कसा वागेल याची अजूनही कुणालाच पूर्ण माहिती नाही. मला वाटलं होतं की मला संसर्ग होईल तेव्हा लक्षणं नसतील इतका माझा स्वतःच्या इम्युनिटीवर विश्वास होता. पण तसं झालं नाही मला त्यानं चांगला दणका दिला. उलट निरंजनला नेहमी ताप येतो तर त्याला फक्त दोन दिवस आणि तोही १०० ताप आला. आमच्या कॉलनीत १३ लोक पॉझिटिव्ह आहेत. त्यातल्या फक्त ६ जणांना लक्षणं आहेत बाकीच्यांना लक्षणं नाहीत. आता कॉलनीत कुणीतरी सुपरस्प्रेडर असणार. आम्हाला निरंजनच्या आईकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता, तिथे सोडलं तर बाकी आम्ही कुठेच जात नव्हतो.

माझ्या अनुभवातून एक सांगते, लक्षणांकडे लवकर लक्ष दिलं, योग्य काळजी घेतलीत तर आठ दिवसात बरं होता. नाही नाही मी कोरोनाला हरवण्याचा कानमंत्र देत नाहीये (त्यासाठी उघडा डोळे, बघा नीट!), ना मी कोरोनाबरोबरचं युद्ध जिंकल्याचं ऐलान करतेय. कारण मुळात हे ना युद्ध आहे ना आपल्याला कुणावर मात करायचीय. हे एका नवीन विषाणूनं होणारं इन्फेक्शन आहे. विषाणूचं नाव नॉवेल करोना आहे आणि त्यामुळे होणा-या आजाराचं नाव कोविड-१९ आहे.

हे इन्फेक्शन कुणालाही होऊ शकतं. त्यातून बहुतांश लोकांना बरं वाटतं. काही दुर्दैवी लोकांना कठीण परिस्थितीतून जावं लागतं किंवा जीव गमवावा लागतो. पण ही शक्यता सगळ्याच संसर्गांमध्ये असते. तेव्हा घाबरू नका. परवा एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की भारतात फार कमी लोकांना वेंटिलेटर लागताहेत. ही बातमीही आश्वासकच नाही का?

मराठी वृत्तवाहिन्यांचं वाईट रिपोर्टिंग बघू नका. इथे 12 रूग्ण सापडले अशा बातम्यांकडे लक्ष देऊ नका. कारण ते ना दहशतवादी आहेत ना कुणाचा जीव घ्यायला आलेत. ते आजारी पडलेत.

सोशल डिस्टंसिंग पाळाच, सॅनिटायझरचा वापर करा, सतत साबणानं हात धुवत राहा, गरज नसताना गर्दीत जाऊ नका. मास्क वापरा. इतकं करूनही संसर्ग झालाच तर मात्र घाबरू नका. आणि कृपया ज्यांना संसर्ग झालाय त्यांना वाळीत टाकण्याचे फालतू प्रकार करू नका. ही वेळ उद्या आपल्यावरही येणार आहे हे पक्कं ध्यानात असू द्या.

आमच्या इन्फेक्शनचे दहा दिवस उलटून गेलेत आणि आम्ही दोघेही आता दुस-यांना संसर्ग न देण्याच्या स्टेजमध्ये आलो आहोत. आम्ही दोघेही उत्तम आहोत! 😊

#कोरोनाचेदिवस #कोरोनाडायरीज #कोरोनाचेअनुभव #माझाकोविडअनुभव

- सायली राजाध्यक्ष





Monday, May 25, 2020

फुगवलेला भोपळा फुटणारच! - संजय आवटे



२०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला सोडून दोन्ही कॉंग्रेसकडे शिवसेना येत होती, तेव्हा ती अनैसर्गिक तिघाडी ठरेल, असे मी म्हटले होते. (अर्थात, असे तिघे एकत्र येणे मला हवे होते आणि हे सरकार टिकणार, हेही ठावे होते. निकाल लागला त्याचदिवशी तसे भाकीत मी केले होते. पण, ते सोडा.) मुळात, शिवसेनेने भाजपसोबत निवडणूक लढवली होती. मोदींचे 'पोस्टर' तिथे महत्त्वाचे होते आणि देवेंद्रांचे कथित वलयही. मतदारांनी शिवसेनेला मत दिले नव्हते, तर युतीला दिले होते. असे असताना, भाजपला सोडून उद्धव दोन्ही कॉंग्रेससोबत आले.

एक वेळ, २०१४ च्या निवडणुकीनंतर हे घडले असते, तर ते समजण्यासारखे होते. कारण तेव्हा सगळे पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. पण, आता युती विरुद्ध आघाडी असा सामना असताना आणि युतीला सुस्पष्ट बहुमत मिळालेले असताना, उद्धव यांनी युती तोडली. त्याला कारण मुख्यमंत्रिपदाचे असो अथवा शिवसेनेने घेतलेला अपमानाचा सूड असो, पण त्या क्षणी विश्वासघात भाजपचा झाला, हे खरेच होते.

असा विश्वासघात भाजपने बिहारमध्ये केला किंवा अन्य अनेक राज्यांत काय उद्योग केले, ते संदर्भ म्हणून ठीक आहेच, पण तरीही देवेंद्र फडणवीसांविषयी एका मोठ्या वर्तुळात सहानुभूती निर्माण होऊ शकली असती! खुद्द ठाकरेंनाही देवेंद्रांच्या डोळ्यांना डोळे भिडवताना कदाचित कसरत करावी लागली असती.

मात्र, 'ती' घटना घडली.

देवेंद्रांचं गाढव तर गेलंच होतं. पण, राजभवनातल्या पहाटेच्या शपथविधीनं त्यांचं उरलंसुरलं ब्रह्मचर्यही गेलं! शिवसेनेनं केलेली तिघाडी अनैसर्गिक होती. मात्र, ती अवैध नव्हती. देवेंद्रांनी जे केलं ते अवैध, अनैतिक, अनैसर्गिक असं सगळं होतं.

त्यानंतर देवेंद्रांचा खरा पोपट झाला. नव्या आघाडी सरकारचा जो भव्य शपथविधी सोहळा शिवाजी पार्कात झाला, तिथे देवेंद्र आल्यानंतर त्यांची जी जाहीर थट्टा लोक करत होते आणि 'मी पुन्हा येईन' असे चित्कार त्या अंधारात उमटत होते, तेव्हा याची खात्रीच पटली.

मात्र, तरीही देवेंद्र सावरतील, अशी आशा होती.

राज्यातला सगळ्यात तरूण महापौर, विरोधी पक्षात असतानाचा तडाखेबंद नेता, पाच वर्षे राज्यातली प्रत्येक निवडणूक जिंकणारा मुख्यमंत्री, सर्व भाषांमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांवर बॅटिंग करणारा हजरजबाबी 'परफॉर्मर' अशा रुपात ज्यांनी देवेंद्रांना पाहिले, त्यांना ती आशा होतीच.

मात्र, 'बुडत्याचा पाय खोलात'प्रमाणे देवेंद्र आणखी खोलातच जात राहिले. नव्या सरकारचे अभिनंदन करण्याऐवजी विधिमंडळातून सभात्याग करत राहिले. काही दिवस गेले आणि 'कोरोना'चे संकट आले. कोणतेही संकट ही विरोधकांसाठी सगळ्यात मोठी संधी असते. कारण, सरकार कोणाचेही असो, आपत्तीच मोठी असेल, तर लोकांमध्ये अस्वस्थता असतेच.

ही तर जागतिक महामारी. अशावेळी देवेंद्र लोकांसोबत उभे राहिले असते, जनआंदोलनांसोबत उभे ठाकले असते, तर त्यांना जनाधार खरोखरच मिळू शकला असता. त्यांची 'संघ'टना स्वतःची नेहमीच ख्याती सांगत असते की, आपत्ती व्यवस्थापनासाठी ती नेहमी सज्ज असते. मग, देवेंद्रांनी काहीच कसे केले नाही! पुणे, पिंपरी, नागपूर, पनवेलसह ज्या महानगरपालिका त्यांच्याकडे आहेत, त्यांनी 'कोरोनामुक्ती'चे मॉडेल का नाही सिद्ध केले? ही अशी संधी होती की लोकांनी देवेंद्रांचे सगळे अपराध माफ करत त्यांना पुन्हा किमान 'नॉर्मल' स्थान तरी दिले असते.

पण, ज्या राजभवनाने त्यांना बदनाम केले, त्याच राजभवनाच्या अंगणात त्यांनी आपले रणांगण सुरू केले. 'राजभवन' आणि देवेंद्र यातच एक थट्टेचे सूत्र होते. देवेंद्र त्यात पुन्हा अडकत राहिले. मग, ठाकरेंच्या आमदारकीमध्ये मोडता घालणे असो की राजभवनातून मुख्यमंत्र्यांना त्रास देणे असो. त्यामुळे, उलटेच झाले.

लोकांना उद्धव यांच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागली. तीन वेळा उद्धव यांच्या हातातोंडाशी आलेले मुख्यमंत्रिपद संकटात आले, पण अखेर ते सहीसलामत सुटलेच. पहिल्यांदा तेव्हा, जेव्हा शिवसेनेला सरकार बनवण्यासाठी राज्यपालांनी बोलावले आणि सेना तोंडावर आपटली. दुस-यांदा, उद्धव यांचे मुख्यमंत्री म्हणून नाव खुद्द शरद पवारांनी घोषित केले आणि तिकडे राजभवनात रातोरात हा खेळ झाला. आणि, तिस-यांदा म्हणजे आता, जेव्हा मुख्यमंत्र्यांची आमदारकीच अवघड झाली होती. पण, उभा महाराष्ट्र उद्धव यांच्यासोबत उभा राहिला आणि निर्विघ्नपणे ते मुख्यमंत्री झाले.

खरे तर, केंद्रातल्या सत्तेचा पुरेपूर वापर करत, 'कोरोना'च्या काळात देवेंद्रांनी लोकांच्या सोबत उभे राहायला हवे होते. पक्षीय राजकारणाला बाजूला ठेवत लोकांशी नाते जोडायला हवे होते. तसे करणे तर दूरच, उलट देवेंद्र वरचेवर अधिकच हास्यास्पद होत गेले. शिवाय, देवेंद्र, चंपा वगैरे मोजके वगळले तर बाकी भाजपचा कोणीही नेता चकार शब्द बोलत नाहीए.

सोलापूरचे सुभाष देशमुख यांच्यासारखा माजी मंत्री असो किंवा देवेंद्रांचे लाडके सदाभाऊ खोत किंवा देवेंद्रांच्या नादात आपले सगळेच गमावलेले महादेव जानकर असे मित्र असोत. रावसाहेब दानवेंसारखा हास्यनेताही चार हात दूर आहे.

नितीन गडकरी तर यात पडूही इच्छित नाहीत. उलट, रविवारी महाविकास आघाडीतील मंत्री नागपुरात गडकरींच्या अंगणात, म्हणजे घरी गेले. आणि, त्यांनी मिळून शेतक-यांशी ऑनलाइन संवाद साधल्याच्या बातम्या आहेत.

त्यामुळे, 'कॉमेडियन ऑफ द डिकेड' असा किताब एकट्या देवेंद्रांनाच मिळेल, अशी सगळी व्यवस्था झाली आहे. ('विनोद' नाव असलेल्यांनाही ती संधी नाही!) त्यांचे वर कोणी ऐकत नाही, असे म्हणावे तर, विधान परिषदेची उमेद्वारी आपल्याला हवी त्याला देवेंद्र देऊ शकतात. खडसे, पंकजा, बावनकुळे, तावडेंचा काटाही ते काढू शकतात.

पण, वाल्याचा वाल्मिकी करणा-या या पक्षात, या वाल्याला त्याच्या पापात सहभागी होणारा वाटेकरी मिळत नाहीए!

एकचालकानुवर्ती सत्तेच्या नशेत शत्रू, स्पर्धक, स्पर्धक ठरू पाहाणारे मित्र, टीकाकार असे सारेच संपवताना, भयाण संपलेपण स्वतः देवेंद्रांच्या वाट्याला आले आहे.

हेच ते देवेंद्र, जे अजिंक्य नव्हते केवळ, तर 'यशवंतराव चव्हाणांनंतरचा महाराष्ट्राचा सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री' अशा थाटात त्यांची वर्णने केली जात होती.

वसंतराव नाईकांनंतर, आपली टर्म पूर्ण करणारा एकमेव आणि मुख्यमंत्रिपदाची टर्म पूर्ण करणारा सर्वात तरूण असा मुख्यमंत्री तर देवेंद्र ठरलेच. पण नरेंद्रनंतर दिल्लीत देवेंद्रच अशी वल्गना सुरू झाली. (अमित शहांनी काय करायचं मग!) महाराष्ट्र हे काही छोटे राज्य नव्हे.

मोदी- शहांच्या गुजरातपेक्षाही मोठे. देवेंद्रांची प्रतिमानिर्मिती त्यामुळे आणखी जोरकसपणे होत होती. माध्यमे त्यासाठी दिमतीला होतीच. लोकांचा काय संबंध? 'इमेज मेकिंग' कंपन्या आणि माध्यमंच तर आता नेता उभा करतात! मग, स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या देवेंद्रांच्या चुकांविषयी तेव्हा कोण कसा जाब विचारेल? महापुरात माणसं मरत असताना जनादेश यात्रा काढणा-या महापुरूषाला कोण बोलेल?

जो या प्रतिमेच्या विपरित बोलेल, तो वैरी!

'आपलीच प्रतिमा होते आपलीच वैरी' हे त्यांना तेव्हा समजले नाही. पण, त्यांची फुगवलेली ही प्रतिमाच त्यांचा कर्दनकाळ ठरली.
'मनी, मीडिया, मॅनेजमेंट आणि मार्केटिंग' या चार गोष्टींनी तुमची प्रतिमा भोपळ्यासारखी फुगेलही, पण कधीतरी भ्रमाचा हा भोपळा फुटल्याशिवाय राहात नाही.

मला विचाराल तर, गेल्या पाच वर्षांतले देवेंद्रांचे जे थोर 'पोर्ट्रेट' रंगवले गेले, ते तद्दन खोटे होते. पण, तेवढेच आज रंगवले जाणारे त्यांचे 'व्यंगचित्र'ही खरे नाही. 'नॉर्मल' देवेंद्र फडणवीस हा सरासरीपेक्षा अधिक क्षमता असणाराच राजकीय नेता आहे. फुगवल्यामुळे ही वेळ त्यांच्यावर आली असेलही, पण अद्यापही वेळ गेलेली नाही. वेळ कधीच जात नसते. देवेंद्रांच्या संघटनेला आणि त्यांच्या त्या आदर्शवादाला माझा कायम विरोध असला, तरीही देवेंद्रांसारखा नेता राजकारणाच्या पटलावर असला पाहिजे, या मताचा मी आहे.

स्वतःला न फुगवता, न किंचाळता, त्यांनी 'नॉर्मल' व्हावे. माणसासारखे बोलावे. माणसांच्या भाषेतले, माणसांचे राजकारण करावे.
देवेंद्रांच्या हातात आणखी वय आहे...!

Friday, May 22, 2020

कोरोना - भीती ते अनुभूती - Dr Sushma Gaikwad-Jadhav







By Dr. Sushma Gaikwad-Jadhav- कोरोना - भीती ते अनुभूती

किट घातल्यानंतर संपूर्ण ड्युटी संपेपर्यंत बाथरूमला जाता येत नाही किंवा साध घोटभर पाणीहि पिता येत नाही. ड्युटी संपल्यावर संपूर्ण किट व्यवस्थीत काढून, नखशिखांत शरीर व सर्व घातलेल्या कपड्यांना स्वच्छ करणे गरजेचे असते. सरासरी सहा तास ड्युटी करणाऱ्या व्यक्तीला डोंनिंग, डोफिगंच्या वेळा पकडून सात ते साडेसात तास खाण्या पिण्याविना व लघुशंकेविना रहावं लागतं. PPE मधे अतिशय उकाडा जाणवतो. घामाच्या धारा सगळी कडून ओघळत रहातात. एकावर एक दोन मास्क असल्यामुळे नीटसा श्वास घेता येत नाही व अधूनमधून तोंडानी श्वासोच्छवास घ्यावा लागतो. जास्त बोलताना व पायऱ्या चढताना थोडी धाप लागते. गॉगल व फेस शिल्डवर धुक्यासारखं सतत जमा होत रहात. दोनएक तासांनी मास्कची कडा, बांधलेल्या मास्कच्या दोऱ्या, गॉगल रुतायला लागतो, काय आणि कुठे दुखतंय तेच कळत नाही आणि हात लावून ते व्यवस्थितही करता येत नाही. नाकातोंडाच्या चित्रविचित्र हालचाली करून रुतणारा मास्क ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करावा लागतो. ओठ सुकले तर त्यांच्यावर जीभ फिरवायलाही भीती वाटते.

...................................

कोरोना व्हायरसचा संसर्ग नक्की कधी सुरु झाला, हे त्या चीनच्या जिवालाच माहित. पण आपल लक्ष साधारण जानेवारी-फेब्रुवारीपासून त्याच्याकडे गेल. बिचारे चीनचे लोक, बिचारे जर्मनीचे लोक म्हणता म्हणता आपणच कधी बिचारे झालो कळलंच नाही आणि रात्रीतून घडाव असं सगळं बदललं. शाळा, थेटर्स, हॉटेल, दुकाने ,रहदारीचे रस्ते सार ओसाड पडल. प्रत्येकाच्या मनात एक अगतिक भीती, मळभ निर्माण झाली. मास्क आणि सॅनिटायजर जीवनाचे अविभाज्य भाग बनले. लोक एकमेकांकडे,प्रत्येक वस्तूकडे संशयित नजरेने बघू लागली, सगळीकडे जाहिरातीमध्ये चित्रविचित्र हावभाव करून नाचणारा हिरव्या रंगांचा कोरोना व्हायरस दिसायला लागला.

क्लिनिक चालू होत पण नेहमीचा उत्साह वाटत नव्हता. पेशंट कमी झाले होते. येणारा दचकत, बिचकत यायचा. क्लिनिकमधून संशयित पेशंट कोरोना तपासणीसाठी पाठवत होतो पण पेशंट तसेच परत यायचे. अगदी सुरवातीला ठराविक देशातून आलेल्या लोकांचीच तपासणी केली जात होती, त्यामुळे संभ्रम निर्माण होत होता.

एके दिवशी curfew आणि लॉकडाऊन जाहीर झाला आणि अवसानच गळाल. आपल्याला होईल का? क्लिनिकमधे पसरेल का ? काळजी वाटत होती. क्लिनिकमधे प्रत्येक वस्तूला हात लावताना एक भीतीशी वाटायला लागली. एके दिवशी क्लिनिक स्टाफ यायचा बंद झाला आणि आठवड्याभरासाठी क्लिनिक बंद केल.

घरी मुलांची दंगामस्ती चालायची, खाणपिण, जास्त झोपणं सार चालू होत पण अस्वस्थ वाटायचं. काय होतंय? का होतंय? तेच कळत नव्हत. उगीचच याला विचार, त्याला विचार, कि त्यांना काय वाटतंय ? अस माझ चालू होत. डॉक्टर असल्यामुळे भीती जास्त वाटते का कमी ते माहित नाही पण भीती वाटतं होती हे खरं. कधीचि TO DO लिस्ट बनवली होती. नवीन अप्लिकेशन डाउनलोड करून रंगबिरंगी अजून एक नवीन लिस्ट बनवली, रोज वाचायचे पण करत काहीच नव्हते. एका आठवड्यात हतबल वाटायला लागल. आठ दिवसांनी एक ऍडमीटेड पेशंट बघायला बाहेर पडले, घरी परत आल्यावर खूप दिवसांनी छान वाटल. तेव्हा लक्षात आल फक्त कामच आपल्या मनाला जिवंत ठेवू शकत आणि नेहमीपेक्षा कमी वेळ पण क्लिनिक सुरु झालं.

टिव्ही, इंटरनेटवर बातम्या दिसायच्या परदेशात डॉक्टर्स, पॅरामेडिक स्टाफ थकलाय, मास्क, PPE किटचा अभाव, विश्रांतीला वाव नाही, आश्चर्यकारक होत सगळं. ज्या देशामध्ये सुख, समृद्धी भरभरून आहे, सगळं काही ओसंडून वाहतंय तिथं हि अवस्था. पण हळूहळू आपल्या देशातील बातम्याही येऊ लागल्या. लोक मदतीसाठी बाहेर होती, त्यांच्या मुळे दैनंदिन थोडफार सुरळीत चालू होत.

पेशंटची संख्या रोज वाढत होती, सरकारी हॉस्पिटलमधे काम करणारी लोक अपुरी पडू लागली आणि खाजगी डॉक्टर्सनां कोरोनाबाधित रुग्णांसाठी असलेल्या हॉस्पिटल्सला येऊन काम कराव लागेल असं बातम्यात सांगीतल. एके दिवशी कलेक्टर ऑफिस मधून तसा फोनही आला " गरज पडल्यास तुम्हाला सेवा द्यायला याव लागेल" आणि आठवड्याभरात परत फोन आला, ससून हॉस्पिलला मिटिंगसाठी बोलावलं होत.

एक दिवस आधी Intensivist ची टीम तिथल्या ICU मध्ये कामासाठी रुजू झाली होती. मिटिंग झाली, फिजिशियनच्या काही टीम बनवल्या गेल्या, माझी ड्युटी एक आठवड्यानंतर होती. सुरुवातीला प्रशांत फार खुश नव्हता, काळजीत होता पण मी जायला तयार हे कळल्यावर तोहि तयार झाला. मुलांना सांगितलं, वेदांगला रडायला येत होत " तुला कशाला जायचंय ? ती लोक बाहेर गेली म्हणून त्यांना आजार झालाय, देव त्यांच्या कडे बघून घेईल, तुला आजार झाला तर? तू मरून गेलीस तर? " असं त्याचं दोनतिन दिवस अधूनमधून चालू होतं. थोड समजून सांगितलं आणि त्याला बहुतेक ते समजलं. विहानलाहि सांगितलं तर तो म्हणाला " मम्मा तू किती वर्षांनी वापस येणारे ? (त्याच्या साठी तास, दिवस सगळ्याचा हिशोब वर्षात असतो) दादा आणि माझ्यासाठी कुल्फी करून जाशील? " हसूच आल मला.

ससून हॉस्पिटल, दीडशे वर्षांपासून महाराष्ट्रातील लाखो लोकांवर उपचार करणार ठिकाण. रोज हजारो रुग्णांची ये जा असते. तितक्याच संख्येने काम करणारी डॉक्टर्स, नर्सेस व इतर लोकं. कोरोना व्हायरस पुण्यात आला आणि नायडू हॉस्पिटलसोबत ससून हॉस्पिटल कोरोना उपचारासाठीच अधिकृत ठिकाण बनवल गेलं. इतर रुग्णांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हॉस्पिटलच्या आवारातील अकरा मजली इमारत फक्त कोरोना उपचारासाठी राखीव ठेवण्यात आली. पेशंटसाठी खाट, मॉनिटर, टाचणी पासून ते व्हेंटिलेटरपर्यंत लागणाऱ्या सर्व गोष्टी, काम करणारी लोक, त्यांच्या कामाच, राहण्याच नियोजन, हजारो गोष्टी लागतात एक हॉस्पिटल चालवायला. थोड्या अवधीत इतकी मोठी यंत्रणा कार्यरत करण खरंच मोठ्या जोखमीचं काम आहे.

माझी ड्युटी ५ C म्हणजे सस्पेक्टेड वॉर्डमधे लावली होती, रोज सकाळी आठ ते दुपारी दोन, सहा तास. पहिल्या दिवशी सहाच्या सुमारास घरून निघाले. हॉटेलवर सामान ठेवून आठ वाजता ड्युटीला पोचायचं होत. हॉटेल जहांगीर हॉस्पिटलजवळ, ससून हॉस्पिटलपासून दोनेक किलोमीटर असेल. रोजच्याएवढा नाष्टा केला, दुपारपर्यंत भूक लागू नये म्हणून जबरदस्तीने जास्तीची दोन चार बिस्कीट खाल्ली पण पाणी पिताना घोट घोट ठरवून पित होते, बाथरूमला तर किती वेळा गेले माहित नाही, ब्लॅडरमधला प्रत्येक थेंब न थेंब बाहेर काढायचा प्रयत्न चालू होता. पोचले ससूनला, कॉलेजच्या पहिल्या दिवशी असते तशी धाकधुक वाटत होती. पाचव्या मजल्यावर पोचले. तिथे A ,B ,C असे वॉर्ड, सगळीकडे एक चक्कर मारली आणि C वॉर्ड मध्ये घुसले. डोंनिंगसाठी सामान शोधल, आजूबाजूला सगळा पसारा, काहीच सापडेना. ड्रेस होता पण मास्क, गॉगल, ग्लोव्हस काहीच नाही. क्षणभर माझ तर अवसानच गळालं, वाटलं आता आपल काही खरं नाही, पळून जाव परत. दहापंधरा मिनटं लागली सगळ्या गोष्टी गोळा करायला. यायच्याआधी बघितलेला डोंनिंगचा व्हिडीओ आठवून आठवून PPE किट घातली आणि पोचले कर्मभूमीवर.

PPE म्हणजे personal protective equipment ,कोरोनाबाधित पेशंटला तपासताना, त्यांच्यावर उपचार करताना इंन्फेकशनपासून बचाव करण्यासाठी घातला जाणारा ड्रेस. डोक्यापासून पायापर्यंत अखंड ,प्लास्टिकसारख्या कापडापासून बनलेला असतो. त्यासोबत डोक्याला केस बांधण्यासाठी एक वेगळी कॅप, N ९५ व सर्जिकल अशे दोन मास्क, गॉगल, फेस शिल्ड, दोन ग्लोव्हस, चप्पल वा बुटावरून घालण्यासाठी वेगळं कव्हर असं सगळं घालाव लागतं. हे सगळं घालण्याची व काढण्याची विशिष्ट अशी पद्धत असते. किट घातल्यानंतर संपूर्ण ड्युटी संपेपर्यंत बाथरूमला जाता येत नाही किंवा साध घोटभर पाणीहि पिता येत नाही. ड्युटी संपल्यावर संपूर्ण किट व्यवस्थीत काढून, नखशिखांत शरीर व सर्व घातलेल्या कपड्यांना स्वच्छ करणे गरजेचे असते. सरासरी सहा तास ड्युटी करणाऱ्या व्यक्तीला डोंनिंग, डोफिगंच्या वेळा पकडून सात ते साडेसात तास खाण्यापिण्याविना व लघुशंकेविना रहावं लागतं. PPE मधे अतिशय उकाडा जाणवतो.

घामाच्या धारा सगळी कडून ओघळत रहातात. एकावर एक दोन मास्क असल्यामुळे नीटसा श्वास घेता येत नाही व अधूनमधून तोंडानी श्वासोच्छवास घ्यावा लागतो. जास्त बोलताना व पायऱ्या चढताना थोडी धाप लागते. गॉगल व फेस शिल्डवर धुक्यासारखं सतत जमा होत रहात. दोनएक तासांनी मास्कची कडा, बांधलेल्या मास्कच्या दोऱ्या, गॉगल रुतायला लागतो, काय आणि कुठे दुखतंय तेच कळत नाही आणि हात लावून ते व्यवस्थितही करता येत नाही. नाकातोंडाच्या चित्रविचित्र हालचाली करून रुतणारा मास्क ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करावा लागतो. ओठ सुकले तर त्यांच्यावर जीभ फिरवायलाही भीती वाटते.

असो मी, पेशंट विभागात गेले, मोठ्ठा हॉल आणि दोन्ही बाजूला ४ - ५ फिट अंतराने वीस पेशंटचे कॉट. सर्व सिस्टर, डॉक्टर PPE मुळे सारखेच दिसत होते. PPE घालून चाल मंदावते आणि बदलतेहि, अंतराळात काम करणाऱ्या लोकांसारखी. सगळ्यांनी ड्रेसवर पेनाने आपापली नाव लिहिली होती पण प्रत्येक वेळेला त्यांच्याजवळ जाऊन, त्यांचं नाव वाचून बोलावं किंवा काम सांगाव लागायचं. सगळे कॉट भरलेले, जवळजवळ सगळेच रुग्ण गंभीर. एक तास गेला जागेच आणि सर्व गोष्टींचं भान यायला.

अकराच्या सुमारास अचानक थकवा आला, हातापायात अवसानच नव्हतं, तहान लागली होती. मटकन खुर्चीत बसले. थोड्या वेळात बरं वाटलं आणि काम परत सुरु झालं. घड्याळात दोन वाजले, ड्युटी संपली. मन शरीर फार दमलं होतं. रूममध्ये आल्यावरही तोंड सतत कोरड पडायचं, संपूर्ण दिवस कमालीचा थकवा जाणवत होता.

रोज रुग्णांची भर पडत होती. ताप, खोकला, दम लागणे हि लक्षणं व गंभीर स्वरूपाचा आजार असलेले, वेगवेगळ्या व्यधिनीं ग्रासलेले व कोरोना चाचणीच्या रिपोर्टची वाट बघणारे सारे रुग्ण संशयित वॉर्डमधे यायचे. तपासणी पाठवल्यापासून रिपोर्ट यायला साधारण चोवीस तास लागत होते. वार्डमधल्या सरासरी वीस ते तीस टक्के रुग्णांचे रिपोर्ट्स पॉसिटीव्ह यायचे. रिपोर्ट आल्यानंतर त्यांना कोरोना संक्रमित किंवा साध्या वॉर्ड मध्ये हलवल जायचं पण तोपर्यंत त्यांच्या आजाराच्या सर्व शक्यता लक्षात घेणं आणि आहे त्या सुविधांमधे योग्य उपचार देणं एक मोठं आव्हानं होत. सोबत इतर डॉक्टर्सही होते. पेशंटचं रक्त तपासायला पाठवणं, Xray करून घेणं, रिपोर्टस गोळा करणं, आवश्यकतेनुसार कृत्रिम श्वास देणं, पोटावर झोपवणं, समजून सांगणं यात सतत सगळे व्यस्त असायचे.

जिवन मरणाची रस्सीखेच सतत चालू असायची, कधी आम्ही जिंकायचो तर कधी काळ. यात कित्येक वेळेला हे विसरायला व्हायचं कि यात कोरोना रुग्णही आहेत. संक्रमणाची शक्यता लक्षात घेता, नातेवाईकांना रुग्णाला भेटू दिल जात नव्हतं पण फोनवरून तब्येतीची माहिती दिली जायची, एखादा गेला तरीही फोनचं.

मी काम करत असलेला ५ c विभाग कोरोना संशयित सिरीयस पेशंट वार्ड पासून संशयित ICU बनला होता. ICU साठी लागणाऱ्या अजून बऱ्याच गोष्टीं गरजेच्या होत्या. मी आणि सोबत काम करणाऱ्या डॉक्टर्सनी, तिथं काम करणाऱ्या स्टाफ व इंचार्जच्या मदतीनं ICU साठी लागणाऱ्या गोष्टींची जमवाजमव केली. करण्यासारखं खूप काही होतं पण तितक्याच अडचणीही होत्या. एका आठवड्यात काही गोष्टी मार्गी लागल्या आणि पुष्कळ राहील्या. रोज वाढणारी संख्या, मरणारे पेशंटस, सगळं भीतीदायक होत तर दुसऱ्या बाजूला आजारतून ठणठणीत बरे होउन घरी जाणाऱ्यांची संख्याहि मोठी होती आणि तेच सगळ्यांना काम करण्यासाठी प्रवृत्त करायला पुरेसं होत.

मला तिथे सगळ्यात जास्त प्रोहत्सानं कोणाकढुन मिळालं माहितेय? तिथे काम करणारे निवासी डॉक्टर्स. हाडाच्या कलाकाराला प्रेक्षक कोण? रंगमंच कुठला याने फरक पडत नाही, नाटक सुरु झालं कि तो आपल्या भूमिकेत हरवतो. अगदी तसंच, अजून कित्येक दिवस कोरोना वार्डमधे काम करावं लागेल हे माहित असतानाही अगदी जिव तोडून ती सारी काम करत होती. कामात, डोळ्यात कुठेही संकोच, भीतीचा लवलेशही नव्हता. त्यांची बरोबरी कदाचित शक्य नाही पण जमेल तितकं करायला मी नक्कीच तयार होते.

दररोज डोंनिंग करून वार्डात आल्यावरही बरीचशी लोक बाहेर आलेले केस, नीट न बसलेला मास्क, कपडे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचे. एके दिवशी PPE किट देणाऱ्या मुख्य सिस्टरांना जाऊन भेटले व बोलले " खरं तर डोंनिंग करताना एक मार्गदर्शक हवा पण ते शक्य नसेल तर डोंनिंग रुममधे आरसा लावावा जेणेकरून डोंनिंग नीट केलं जाईल कारण आरोग्य कर्मचाऱ्यांना संक्रमणापासून वाचवण्यासाठी ती महत्वाची गोष्ट आहे".

कामाच्या शेवटच्या दिवशी दहा बाय दहाच्या मोठ्या आरश्यात बघून मी डोंनिंग केलं.माझं बक्षीस होत ते.

संकट मोठंय, अचानक बांध फुटावा आणि काही कळायच्या आत सगळं पाण्याखाली जावं अशी काहीशी परिस्थिती आहे. कुठलीच योजना, नियोजन शंबर टक्के प्रभावी व अचूक ठरेल असं नाही. परंतु वेळेनुसार आणि गरजेनुसार त्यात बदल करून उद्देश साध्य होईल. डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटलमधील मामा, मावशी, फार्मासिस्ट, वैद्यकीय व सरकारी अधिकारी, पोलीस, कचरा उचलणारी माणसं, सिक्युरिटी गार्ड, जेवण पुरवणारी, कधी प्रकाश झोतात न आलेली, हातभार लावूनही आपल्याला कधीच माहित न होणारी असंख्य लोकं आपल्या शाररिक, आर्थिक, मानसिक अडचणींना तोंड देऊन, मजबुतीने पाय रोखून उभी आहेत.

या सर्वांप्रति मी कायम कृतज्ञ राहील.

या सगळ्या प्रवासात मला स्वतःला काय वाटलं ???

सुरुवातील काही लोक स्वइच्छेने, कोरोना बाधितांसाठी काम करण्यासाठी नाव देत होती, तेव्हा नव्हतं झालं धाडस.परंतू कलेक्टर ऑफिसमधून फोन आलेल्या क्षणापासून मी मानसिक द्रुष्ट्या पूर्णपणे तयार होते. एक जबाबदारी आली होती माझ्यावर आणि ती मी अगदी आंनदाने स्वीकारली. लढायला जाणाऱ्या सैनिकासारखं वाटत होतं. शिक्षणाबद्दल अभिमान वाटत होता. त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर वाटत होता ज्यांनी मला इथं पर्यंत यायला हातभार लावला व ज्यांच्यामुळे मी हे काम करू शकणारं होते.

मी एक स्त्री आहे किंवा घरात लहाण मुलं, म्हातारी माणसं आहेत म्हणून हि जबाबदारी मी नाकारणार नव्हते. पाण्यात दगड टाकल्यावर काहीवेळासाठी वलय निर्माण होतात तस माझ्याही मनात काही वेळेला मृत्यूच्या भीतीचे वलय उठले आणि विरले.

इथे शब्दात मांडलाय त्यापेक्षाही कितीतरी मोठा अनुभव, वेगळा दृष्टिकोन मला मिळाला. बांधल्या जात असलेल्या रामसेतूमधला मी फक्त एक वाळूचा कण होते. रुग्णांना बर करणं, माझ्या मागाहून येणाऱ्या सहकाऱ्यांना सोबत देणं, आजूबाजूच्या लोकांची थोडी भीती कमी करणं, आई म्हणून मुलांवर सामाजिक जबाबदारीचे संस्कार घडवणं यापैकी माझ्या कामातून काय साध्य होईल माहित नाही पण मनात एक समाधान असेल, गरजेच्या वेळी मी तिथे होते. - डॉ. सुषमा जाधव/गायकवाड,फिजिशीयन,पुणे.

#Doctorsdiary #Corona