Monday, April 20, 2020

आरएसएस सुप्रिमो गोळवलकर बाबासाहेबांना का भेटले होते?-प्रा.हरी नरके, रा.स्व.संघ 3




मराठ्यांना रोखण्यासाठी आम्हा ब्राह्मणांना मदत करा या त्यांच्या मागणीवर बाबासाहेब म्हणाले, रा.स्व. संघ हा तर विषवृक्ष आहे!

मराठा समाजाचा सामना करण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी आम्हा ब्राह्मणांना मदत करा, नाहीतर मराठे आपल्या सर्वांनाच संपवतील, आपण सारे मराठेतर एकत्र येऊन मराठ्यांचा बंदोबस्त करू असा प्रस्ताव घेऊन आर. एस. एस. सुप्रिमो गोळवलकरगुरूजी बाबासाहेबांना ७ सप्टेंबर १९४९ ला दिल्लीत जाऊन भेटले.

बाबासाहेबांनी त्यांना कठोरपणे खडे बोल सुनावले. " पेशवाईत तुम्ही लोकांनी आमच्यावर कितीतरी अत्याचार केले, हे मी कसे विसरू? तुम्ही पुन्हा पेशवाईची स्वप्नं बघता आहात. त्यासाठी तुम्ही रा.स्व.संघाच्या रूपात ब्राह्मण महासंघ सुरू केलेला आहे. तुमच्या संघात सारे ब्राह्मणच तर आहेत. तिथे ना मराठे आहेत ना महार. तुमचा संघ हा विषवृक्ष आहे. त्याचे परिणाम फार वाईट होणार आहेत. तुम्हाला संघटनाच बनवायची असेल तर ती जातीनिर्मुलनासाठी आणि चातुर्वण्यव्यवस्थेचा नाश करण्यासाठी सुरू करा. पेशवईतील पापांपासून तरच तुम्हाला मुक्ती मिळेल. जुन्या चुका सुधारा. ब्राह्मणराज्याची स्वप्नं विसरा. मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही." अशा कठोर शब्दात बाबासाहेबांनी गोळवलकरगुरूजींना फटकारले. बाबासाहेबांच्या एकाही प्रश्नाला ते उत्तर देऊ शकले नाहीत. चडफडत ते तिथून निघून गेले.

बाबासाहेब - गोळवलकर यांच्या भेटीचा हा तपशीलवार वृत्तांत लिहिणारे सोहनलाल शास्त्री हे दिल्लीतले मोठे विद्वान होते. ते या भेटीच्या वेळी तिथे प्रत्यक्ष हजर होते. ते बाबासाहेबांकडे नेहमी जातयेत असत.

गोळवलकरांबद्दल सोहनलाल शास्त्रींना माहिती देताना बाबासाहेब म्हणाले, " हे ब्राहमण गृहस्थ आहेत हिंदूंचे पोप. असे सनातनी विचारांचे धर्मगुरू जिथे आहेत तिथल्या लोकांचे कधीही भले होणार नाही!"

आणि संघवाले या भेटीबद्दल धादांत खोट्या अफवा पसरवतात. बाबासाहेब म्हणाले म्हणे, " संघाचे काम वाढवा, मी तुमच्या कामावर खूश आहे." चातुर्वर्ण्याची प्रस्थापना करणार्‍या संघटनेच्या कामावर बाबासाहेब कसे खूश होऊ शकतील?

दोघांची विचारधारा, कार्यप्रणाली, विषयपत्रिका सगळेच विरोधी असताना बाबासाहेब त्यांचे कौतुक कसे आणि का करतील?

- प्रा. हरी नरके, २० एप्रिल २०२०

{ पाहा: बाबासाहेब डा. अम्बेडकर के सम्पर्क में २५ वर्ष, सोहनलाल शास्त्री, भारतीय बौद्ध महासभा, दिल्ली प्रदेश, नई दिल्ली, १९७५, पृ. ५४/५५}

No comments:

Post a Comment